Archive for February 17th, 2007

पहिला दिवस-1

February 17, 2007

भांडाभांड विद्यापीठाशी संलग्न ‘मनोगत वादविवाद आणि भांडणकला महाविद्यालय’ चा आजचा पहिला दिवस.

आपल्याला पहिल्याच दिवशी उशीर झाला की काय या काळजीने घाबराघुबरा झालेला सर्किट कोपऱ्यावरुन घाईघाईने वळाला तसे शामियान्यातून येणारे भीमसेनअण्णांच्या मारव्याचे सूर त्याच्या कानावर पडले. सर्किटच्या भव्य कपाळावरच्या आठ्यांत एकीची भर पडली.”आता या नोकरीत काय आपल्याला अण्णा आणि बाबुजीच ऐकत रहायला लागणार वाटतं!’ तो स्वतःशीच म्हणाला ‘या’चंद्रा’चा कलेकलेने वाढणारा लहरीपणा आपल्याला सहन करायला लागणार तर!’ . व्वा! अचानकच जमून गेलेल्या कोटीनं त्याच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते एक दुर्मिळ हास्य उमटलं. तरीही अमेरिकेतली उत्तम नोकरी सोडून भारतात मास्तरकी करण्याचा निर्णय घेऊन आपण चूक तर केली नाही ना, ही शंका त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
शामियान्यात मारवा गुंजत होता खरा, पण एकंदरीत आसपास शुकशुकाटच होता. मंडपाबाहेर चित्त, सन्जोप राव आणि माधव कुळकर्णी सिगरेट ओढत उभे होते. शेजारी दोन खुर्च्या टाकून दिगम्भा आणि अत्त्यानंद गप्पा मारत होते.
“काय रे, नऊची वेळ होती ना? मला वाटलं की मलाच उशीर झालाय…’ सर्किट म्हणाला.
“अरे, तात्याच्या महाविद्यालयाचा कार्यक्रम!” माधव म्हणाला “ सकाळी नऊचा रात्री नऊला सुरु झाला तरी नशीब. तशी सत्यनारायणाची पूजा सुरु झालीय आत, पण हा सन्जोप म्हणाला की साधुवाण्याचं नाव ऐकलं की म्हणे त्याचं ब्लडप्रेशर वाढतं. मग म्हटलं चला बुवा, एकेक सिग्रेट मारून येऊ…”
“नमस्कार, मी अत्त्यानंद” बुवा नम्रपणे उठून उभे राहिले.
“नमस्कार, मी सर्किट”
“हो, ओळखलं मी तुम्हाला” बुवा अधिकच नम्र झाले. “विद्वत्तेचं तेज कुठे लपून रहातं का? मी तुमचा निस्सीम चाहता आहे. तुम्ही लिहायचं थांबवलंत, वाईट वाटलं मला. अहो, कुणी कसं वागो, आपण आपलं सत्कृत्य करत रहावं, नाही का? आता माझ्यासारखा य:कश्चित माणूस लिहीत रहातो..”
“हो, तुमचे ‘रम्य दिवस’ वाचतो मी, आवडतात मला…”
“कसचं कसचं… आपण लेखनसम्राट, मी आपला पांढऱ्यावर काळं करणारा…”
बुवा याच थाटात बोलत राहिले असते पण दरम्यान चित्तची सिग्रेट संपली होती. “चला आत जाऊ या” तो एकदम म्हणाला. मंडळी आत जायला निघाली
“काय रे सन्जोप..” माधव आणि सन्जोप मागे रेंगाळले होते
“काय?”
“नाही, तो अत्यानंद मगाशी सर्किटला जे म्हणत होता..”
“त्याचं काय?”
“मला वाटतं, आतल्या सगळ्या मंडळींना एकेकटं गाठून तो तेच म्हणत होता.. असं मला वाटतंय हं..”
“माधवा, तुझ्या शंका फार हं. जाऊ दे ना, एखाद्याला वाटतं, सगळ्यांना चांगलं म्हणावं…”
“अरे, पण त्याने हा रोल घेतला तर वेदश्री काय करणार?”
सन्जोप ठोठो हसला.एवढ्यात काळा टी शर्ट घातलेला कुणीतरी घाईघाईने आत जाताना दिसला. “ओळखलंस का याला?” दिगम्भाने चित्तला विचारले. “चेहरा तरी ओळखीचा वाटतोय बुवा..” चित्त म्हणाला “अरे हो, मगाशीच हा घाईघाईने मंडपाच्या बाहेर जाताना दिसला होता, पण त्या वेळी तर त्याच्या अंगावर पांढरा शर्ट होता मला वाटतं…” 
“बरोबर” दिगंभाने खुलासा केला. “तर पांढरा शर्ट घातला असेल तेंव्हा त्याला अनिरुद्ध १९६९म्हणायचं, आणि काळा शर्ट असेल तेंव्हा…?”
“केशवसुमार!” सन्जोप, माधव आणि सर्किट एका सुरात म्हणाले 
“करेक्ट” दिगंभा म्हणाला. “पण हा अशी धावपळ का करतोय बुवा?”
“काही नाही रे…” माधवने खुलासा केला. “त्याला आत एखादी नवीन कविता सापडली असणार, आणि इतर कुणाला कळायच्या आत तिचं विडंबन करायचं असेल त्याला. म्हणून ही सगळी धावपळ.”
मंडपाच्या आत सत्यनारायणाची पूजा रंगात आली होती. महाविद्यालयाचे प्रणेते तातोबा जातीने पूजेला बसले होते. त्यांच्या गुटगुटीत तनूवर सोन्याचा गोफ शोभून दिसत होता. हाताच्या बोटातल्या जाडजूड अंगठ्या चमकत होत्या. एखाद्या सापाने बेडकाला गिळण्याऐवजी बेडकानेच सापाला गिळले तर त्याच्या मुद्रेवर जसा तृप्त,शांत भाव येईल तसा भाव त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ! पूजा सांगणारे गुरुजी मात्र समारंभाला अगदीच विशोभित होते. किडकिडीत शरीरयष्टी, वाढलेली दाढी, किडके दात आणि चिरकटलेला आवाज. “या तात्याला महाविद्यालयाच्या उद्घाटनाला एक चांगला गुरुजी पण मिळू नये का?” मिलिंद फणसेने सर्वसाक्षीला विचारले. “अरे मिलिंद, तू यांना ओळखलं नाहीस का? हे शिंत्रे गुरुजी! म्हणजे तात्याचं वशिल्याचं तट्टू!” टग्याने परस्पर उत्तर दिले.”कंपूबाजी नाही तर समारंभ कसला? खि..खि…खि….” टग्याचे हसणे बाकी अगदी तस्से राहिले आहे!
“जेवणाची काही व्यवस्था आहे की नुसताच तीर्थ प्रसाद?” माधवने जयंताला विचारले. सिगारेटच्या वासाने अस्वस्थ झालेला जयंता पूजेला बसलेल्या तात्याजवळ गेला. “तात्या, असल्या शुभ कार्यात तरी तुझ्या प्राध्यापकांना व्यसनांपासून दूर रहायला सांग. अरे, शरीरसंपदा महत्त्वाची. विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार हे लोक…? जयंता भावनाविवश झाला होता.
“पंग ट्यांचं ट्यांना कयाया णको का?” तात्याने मुखरस सांभाळत पहिल्यांदा तोंड उघडले. त्या किमामी जर्द्याच्या खुश्बोयुक्त प्रश्नाने जयंता खचल्यासारखा झाला. “आता काय बोलणार? इथे साक्षात महाविद्यालयाचे प्रणेतेच एकसोबीस तीनसो लावून पूजेला बसलेत! आता तक्रार तरी कुणाजवळ करायची?” जयंता स्वतःशीच म्हणाला. 
अखेरीस पूजा आटोपली. सध्या तरी महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच संख्या अधिक वाटत होती. तीन विद्यार्थी बाकी कपाळाला गंधबिंध लावून मनोभावे हात जोडून उभे होते. तीघांच्याही हातातल्या वहीवर शारीरिक बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करून वस्त्रप्रावरणांचाही बहुतेक संपूर्ण त्याग केलेल्या एकेका स्वामींचे उन्मनिय असस्थेतले फोटो लावलेले होते. त्यावरून ते सचिन म्हेत्रे, नितीन व नाम्या असावेत अशी शंका बऱ्याच प्राध्यापकांना आली.
“राम राम मंडळी. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो” प्रणेते बोलायला उठले. “सगळं काही जमलं आहे, पण च्यायला महाविद्यालयाला समर्पक असं बोधवाक्य काही सापडलं नाही. आता आपल्याकडे इतकी विद्वान मंडळी आहेत, तेंव्हा तुमच्याकडूनच काही सूचना आल्या तर बघू. काय जयंता, काही सुचतंय का?”
“मला वाटतं ‘सत्यं शिवं सुंदरम’ हे समर्पक ठरेल” जयन्ता.
“पण या महाविद्यालयाचा आणि सत्याचा काय संबंध? एकलव्याने शंका काढली.
“‘हान तिच्या आयला’ पटतंय का बगा समद्यास्नी” खेडूत.
“यात न पटण्यासारखे काही नाही, पण सगळ्यांची संमती असल्यास माझा विरोध आहे” जीवन जिज्ञासा.
“जीजि, तुझ्या या विधानाला माझा विरोध आहे” सर्किट
“मला वाटते…” मुक्तसुनिताने प्रथमच संभाषणात भाग घेतला. आतापर्यंत तो एका पुस्तकात डोके खुपसून बसला होता. “मला वाटते, ‘भविष्यसरणावरचे अर्धवर्तमानबाष्प पेटवूया’ हे रास्त ठरेल”
“आणि हा काय शिकवणार म्हणे? मराठी? खि…खि…खि…” सन्जोपच्या कानात टग्या.
“थांबा, थांबा…” चित्त पुढे सरसावला. “मनोगतच्या वैचारिक पार्श्वभूमीला अनुषंगून मी असं सुचवतो की
‘अलहक कि तिरी वसअते तखईल के आगे
सहरा कफे खाकस्तर व गुलशन कफसे रंग’
हे बोधवाक्य ठेवूया….”
आता यातले एक अक्षरही कुणाला न कळाल्यामुळे चित्तचा ठराव सर्वसहमतीने मंजूर होणार अशी चिन्हे दिसत असतानाच कुणाचा तरी भ्रमणध्वनी खणखणला. मुळात प्राचार्य म्हणून निवड झालेले पण  नंतर फक्त ज्ञानेश्वरी या विषयासाठीचा अर्धवेळ प्राध्यापक विनायक बोलत होता. प्रणेतांचे आणि त्याचे काय बोलणे झाले कुणास ठाऊक, पण प्रणेत्यांनी अचानक ‘मौनं सर्वार्थ साधनं’ हे बोधवाक्य ठरले असल्याचे जाहीरच करून टाकले.
पहिला दिवस, त्यामुळे प्राध्यापकांच्या ‘आपापसात’ ओळखी करून देण्याचा कार्यक्रम सुरु झाला.
“मी दिगम्भा. मी शास्त्रीय संगीत आणि हिंदी चित्रपटसमीक्षा हे विषय शिकवतो”
“आणि त्याचा अर्धवेळ सहायक म्हणून इतर कुठल्याच विषयात गती नसलेला सन्जोप काम करेल” प्रणेते रोखठोक शब्दात.
“म्हणजे दिगम्भाने लिहायचे, आणि सन्जोपने त्याचा त्याचा अर्थ मराठीत सांगायचा….” माधव कुळकर्णीला हे चांगले जमते!
“मी नरेंद्र गोळे. मी हिंदी चित्रपटगीतांचा मराठीत अनुवाद करतो…”
“का?”
“का म्हणजे? लोकांना चांगल्या हिंदी गाण्यांचा अर्थ नको कळायला? आता नुकताच मी एक अनुवाद केला आहे” गोळे जरा चालीत गायलाच लागले
“धोका धोका…
धोका धोका वई वई वई
धोका धोका वई वई वई
झाली रे झाली
मला झाली रे झाली…”
“वा, वा, काय गाणं आहे की त्रिफळा चूर्णाची जाहिरात? खि..खि…खि…” टग्याच तो! त्याचं तोंड कोण धरणार?
तेवढ्यात छुन छुन छुन असा पैंजणाचा आवाज आला. कुठला तरी जीवघेणा परफ्यूम आसमंतात दरवळला. शेलाट्या बांध्याची, केतकी वर्णाची, काळ्याभोर डोळ्यांची, अठ्ठावीस -तीस वर्षांची एक तरुणी – तरुणीच ती! – गर्दीतून वाट काढत पुढे आली. आकाशी रंगाची साडी, बिनबाह्याचा ब्लाऊज, चेहऱ्यावर माफक मेकअप, केसांची कुठली तरी आधुनिक रचना आणि तीत माळलेला ताजा मोगरीचा गजरा – प्राध्यापकांपैकी निम्मे जागीच गारद झाले. असंख्य दिलांचा खातमा करत ती तरुणी थेट प्रणेत्यांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसली.
“मंडळी,” प्रणेते घसा साफ करून म्हणाले ” माझ्या खाजगी सचिवांची ओळख करून देतो…”
“माझं नाव रीतू” ती सुंदरी म्हणाली.”रीतू नाडगौडा”.