Archive for April 26th, 2007

साहिर – श्री.विनायक यांचा प्रतिसाद – ३

April 26, 2007

“प्यासा”ची गाणी प्रसिद्ध झाली. त्याआधी त्याने विद्रोही गाणी लिहिली नव्हती. चकले, परछाईया, ताजमहल वगैरे कविता लिहिल्या होत्या. खरे तर मला फक्त “जिन्हे नाज़ है हिंद पर” आवडते. ते अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. पण “प्यासा” चे यश साहिरच्या डोक्यात गेले. आपण कोणाही संगीतकाराची कारकीर्द घडवू किंवा बिघडवू शकतो अशी बढाई तो मारू लागला. संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त मानधन घेऊ लागला. बर्मनदादांशी भांडण झाले. देव आनंद, गुरू दत्त दुरावले. नया दौर, सोने की चिडीया नंतर ओ. पी. पण साहिरबरोबर काम करणार नाही म्हणाला. गुणी संगीतकार जयदेवशीही भांडण झाले. गाण्यासाठी जयदेवने आपल्या घरी तबला पेटी घेऊन यावे या क्षुल्लक कारणावरून. मदनमोहन, अनिल बिस्वास, हेमंतकुमार, सी. रामचंद्र पण एक दोन चित्रपटांनंतर त्याच्याजवळ फिरकले नाहीत. अर्थात त्याने खय्यामला फिर सुबह होगी द्यावा अशी सूचना त्याच्या निर्माता दिग्दर्शकाला केली होती हे खरे. पण खय्यामनेही तो व शगुन सोडून पुढे  “कभी कभी” पर्यंत साहिरबरोबर काम केले नाही.

अशा परिस्थितीत साहिर पुनरागमन करू शकला ते रोशनमुळे. बिचारा रोशन. बरसात की रात च्या आधी ३२ चित्रपटांमध्ये ४४ गीतकारांबरोबर काम केले, उत्तमोत्तम गाणी दिली, पण व्यावसायिक यश काही मिळाले नाही. बरसात की रात प्रसिद्ध झाल्याने दोघांनाही फायदा झाला. रोशन – साहिर यांनी अत्यंत दर्जेदार गाणी दिली आणि ती लोकप्रिय पण झाली. बाबर, चित्रलेखा, ताजमहल, दिल ही तो है, बहू बेगम, दूज का चाँद, सर्वच चित्रपटांबद्दल हे खरे आहे. तीच गोष्ट जयदेवच्या  जोरू का भाई, हम दोनो आणि मुझे जीने दो ची. पण मला सर्वात आवडलेली गाणी म्हणजे खय्यामच्या फिर सुबह होगी आणि शगुन मधली.

रोशनचे १६ नोव्हेंबर १९६७ ला निधन झाले आणि साहिरला उतरती कळा लागली. रवी आणि एन. दत्ता यांनी दिलेली बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटातली गाणी मला खास आवडत नाहीत. त्यानंतर कभी कभी चा अपवाद वगळता साहिरने १९८० पर्यंत खास कामगिरी केली नाही.
तुम्ही जर ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्या (धक्का – कलाटणी तंत्रवाल्या)वाचत असाल तर साहिरबाबत माझे मत असेल याचा अंदाज येईल. आधीची प्रस्तावना यासाठीच होती की साहिरची बहुतेक चांगली गाणी मला माहिती आहेत हे वाचकाला समजावे. तरीही गीतकार म्हणून शैलेंद्र, शकील काही प्रमाणात मजरूह हे मला जास्त आवडतात. साहिरची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातले सामाजिक विचार सांगणे हे एक. पण साहिर ते करताना कधी कधी अकलात्मक पातळीवर उतरतो. “औरत ने जनम दिया मर्दोंको”, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा” वगैरे याची उदाहरणे आहेत.

माझा दुसरा आक्षेप असा आहे की तो चक्क अनुकरण (वाङमयचौर्य?) करतो. “जिसे तू कबूल कर ले” मधल्या ओळींचे शकीलच्या “जो खुशी से चोट खाये” मधील ओळींशी साम्य आहे ते आधी लिहिलेच आहे. दुसरे उदाहरण “दीदी” मधल्या “तुम मुझे भूल भी जाओ” मधल्या

ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है
ज़ुल्फ़ो रुख्सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है

आणि फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या “मुझसे पहली सी मुहब्बत मेरे मेहबूब ना माँग” मधल्या या ओळी पहा.

और भी गम है दुनिया में गमे मुहब्बत के सिवा
राहते(सुख) और भी है वस्ल( मीलन) की राहत के सिवा

फ़ैज़ ची कविता आधीची आहे. तसेच साहिरच्या गाण्यातला “मैने तुमसेही नहीं सबसे मुहब्बत की है” हा बचावही लंगडा वाटतो. कवी नीरजनेही “नई उमर की नई फसल” मध्ये (संगीतकार – रोशन) एक याच प्रकारचे गाणे लिहिले आहे. “आज की रात बडी शोख बडी नटखट है”. त्यातला प्रियकर प्रेयसी ला काय म्हणतो पहा.

“पर ठहर वो जो वहाँ लेटे है फुटपाथों पर
लाश भी जिनकी कफ़न तक न यहाँ पाती है
और वो झोपडे छतभी न है सरपर जिनके
छाते छप्पर ही जहाँ जिंदगी सो जाती है
पहले इन सब के लिये एक इमारत गढ लूँ
फिर तेरी माँग सितारों से भरि जाएगी”

हे जास्त आवडले.

साहिरचा कल  गाण्यातून विचार मांडण्याकडे जास्त आहे. त्याला भावना मांडता येत नाहीत. त्याबाबतीत शकीलला तोड नाही. मात्र काही प्रसिद्ध कवितांवर parody  प्रकारच्या रचना छान केल्या आहेत. उदा. महंमद इक्बाल कट्टर पाकिस्तानवादी झाल्यावर त्यांनी लिहिले होते
“चीनो अरब हमारा हिंदोस्ताँ हमारा
मुस्लिम है हम सारा वतन हमारा सारा जहाँ हमारा”

त्यावर साहिरचे “चीनो अरब हमारा” गाणे म्हणजे जबरदस्त चपराक आहे. किंवा ब्राउनिंगच्या प्रसिद्ध ओळी आहेत

god is in the heaven and all is right with the world

त्यावर साहिर यांनी लिहिले “आसमाँ पे है खुदा और जमींपे हम, आजकल वो इस तरफ़ देखता है कम”. हाच धागा पकडून गुलजार यांनी “हालचाल सब ठीकठाक है” (मेरे अपने) लिहिले. त्यात

“अल्लामिया जाने कोई जिये या मरे
आदमी को तो खूनबून सब माफ़ है” अशा ओळी आहेत.

“देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इन्सान” चे विडंबन ” देख तेरे भगवान की हालत क्या हो गई इन्सान कितना बदल गया भगवान” (रेल्वे प्लॉटफॉर्म) असे केले आहे.

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद -२

April 26, 2007

गीतकार साहिरच्या कारकीर्दीचे मी चार टप्पे मानतो.

१. १९५० ते १९५७ – याला सचिनदेव बर्मन पर्व म्हणू या. कारण या काळात त्याने प्रामुख्याने त्यांच्यासाठीच गीते लिहिली. यातील अजूनही बरीचशी गाणी मलाही माहिती नाहीत. “सजा” मधल्या ” तुम न जाने किस जहाँ में खो गये” पासून सुरूवात झाली. मग देव आनंदच्या बाजी, टॅक्सी ड्रायव्हर, फंटुश, घर नं. ४४, मुनीमजी, जाल बऱ्याचशा चित्रपटांसाठी त्याने गाणी लिहिली. देव आनंदच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत अशी हलकीफुलकी गाणी लिहिली, ती बरीच लोकप्रिय पण झाली. पण “जाये तो जाये कहाँ”, “दुखी मन मेरे, सुन मेरा कहना” वगैरे गाणी मला कविता म्हणून सामान्य वाटतात. मात्र “जाल”मधले “पिघला है सोना दूर गगन में फैल हरे है शाम के साये”, घर. नं ४४ मधले “फैली हुई है सपनोंकी बाहे”, तसेच “मुनीमजी” मधले ” साजन बिन नींद न आए” ही मला अतिशय आवडतात.

देव आनंद शिवाय इतर चित्रपटांपैकी “देवदास” मधली जास्त प्रसिद्ध झाली. संजोप रावांनी “जिसे तू कबूल कर ले” चा आवडत्या गाण्यांमध्ये उल्लेख केला आहे म्हणून एक मजा सांगतो. शकील बदायुनींनी १९५३ सालच्या दिल ए नादान मध्ये एक गाणे लिहिले होते “जो खुशीसे चोट खाए वो जिगर कहाँ से लाऊँ”. त्यातल्या ह्या ओळी पहा.

मुझे तेरी आरजू है
मेरे दिल में तू ही तू है
बसे गैर जिस में आकर
मैं वो घर कहाँ से लाऊँ

आता १९५५ सालच्या “देवदास” मधल्या “जिसे तू…” मधल्या या ओळी पहा.

तुझे और की तमन्ना
मुझे तेरी आरजू है
तेरे दिल में गम ही गम है
मेरे दिल में तू ही तू है

आता याला काय म्हणावे?

बाकी “अंगारे ” मध्ये तलत चे एक सुंदर गीत आहे, ” डूब गये आकाश के तारे जाके न तुम आये”. त्यातल्या

बहते बहते चाँद की कश्ती दूर गगन में खोने लगी
आस की इक नन्हीं सी किरन थी वो भी ओझल होने लगी

अशा सुंदर ओळी आहेत. आणखी राधाकृष्ण, शहेनशहा, जीवनज्योती वगैरे चित्रपटातली गीते मीच जास्त ऐकली नाहीत.

सचिनदेव बर्मन सोडून त्या काळात मदनमोहनसाठी “रेल्वे प्लॅटफॉर्म” मध्ये, अनिल बिस्वास साठी “दो राहा” मध्ये (एकच गाणे), जयदेव साठी “जोरू का भाई” व श्यामसुंदर “अलिफ़ लैला” साठी गाणी लिहिली. यातील बरीचशी गाणी अप्रसिद्ध असली तरी देव आनंदच्या वर सांगितलेल्या चित्रपटातल्या गाण्यांपेक्षा जास्त सुंदर आहेत. ज्यांनी “चाँद मध्यम है”, “मुहब्बत तर्क की मैंने”, “अब तेरा इंतजार कौन करे” आणि “बहार आई खिली कलियाँ” ज्यांनी ऐकली आहेत त्यांना मी काय म्हणतो ते समजेल.

त्यानंतर १९५७ मध्ये ‘प्यासा’ आला.

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद -१

April 26, 2007

साहिरवर मी लिहिलेल्या लेखाला विविध प्रतिसाद आले. त्यातील श्री. विनायक यांचा दीर्घ आणि अभ्यासू प्रतिसाद इथे टप्प्याटप्प्याने देत आहे.

 आपण नेहमीच माझ्या परखड मताचा आदर करता. म्हणूनच ते इथे देतो. लेख अपुरा वाटला. एखाद्या पी. एच. डी. करणार्‍या विद्यार्थ्याने लिटरेचर रिव्ह्यूच नीट केला नसावा तसे झाले आहे. एकूण ३-४ प्रतिसाद लिहिण्याचा विचार आहे.

पहिल्याने एक दोन चुका झाल्यात ते सांगतो.

दिल जो न कह सका’ (भीगी रात),- हे गाणे साहिरचे नाही. हे अफलातून सुंदर गीत मजरूह ने लिहिले आहे. संगीतकार रोशनमुळे अनेकांचा असा गोंधळ होतो.

हम दर्द के मारों का’ (दाग) – हे गाणे हसरत जयपुरींनी लिहिले आहे. साहिरने नाही. हे गाणे जुन्या “दाग” मधले आहे – गीतकार – शैलेंद्र – हसरत. साहिरने गाणी लिहिलेला “दाग” नवीन आहे.

आणखी कुठली गाणी हवी होती ते प्रथम लिहितो.

१. तुम न जाने किस जहाँ में खो गये – सजा
२. तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले – बाजी
३. चांद मध्यम है आसमाँ चुप है नींद की गोद में ये जहाँ चुप है – रेल्वे प्लॅटफॉर्म
४. बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाये बंजारा – रेल्वे प्लॅटफॉर्म
५. बहार आयी खिली कलियाँ हँसे तारे चले आओ – अलिफ़ लैला (संगीतकार श्यामसुंदर)
६. पिघला है सोना दूर गगन में फैल रहे है श्याम के साये – जाल
७. ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिल की दास्ताँ – जाल
८. वो देखे तो उनकी इनायत ना देखे तो रोना क्या, जो दिल गैर का हो उस दिल का होना क्या और न होना क्या – फंटुश (दुखी मन मेरे – अगदीच सुमार आहे यापुढे)
९. फैली हुई है सपनों की बाहे आजा चल दे कहीं दूर वहीं मेरी मंज़िल वही तेरी राहे – घर नं ४४ (अति सुंदर गीत)
१०. साजन बिन नींद न आए बिरह सतावे – मुनीमजी (यात शैलेंद्र व साहिर दोघांची गाणी आहेत आणि हे गाणे शैलीवरून हे शैलेंद्रने लिहिले असावे असा माझा ठाम समज आहे. पण ऑफिशियली साहिरने लिहिले आहे)
११. जीवन के सफर मे राही – मुनीमजी
१२. सुरमयी रात ढलती जाती है रूह गम से पिघलती जाती है, अब तेरा इंतजार कौन करे – जोरू का भाई (तलत, संगीतकार – जयदेव)
१३.सुबह का इंतजार कौन करे – जोरू का भाई (लता)
१४. इंतजार और अभी और अभी और अभी – चार दिल चार राहे (लता, संगीतकार अनिल बिस्वास)
१५. कभी तो सुध लेता जा मोरे बलमा – चार दिल चार राहे (मीना कपूर)
१६. मुहब्बत तर्क की मैने गरेबाँ सी लिया मैने – दो राहा (संगीतकार – अनिल बिस्वास)अनेकांच्या मते हे तलत चे सर्वोत्कृष्ट गीत आहे.
१६. कश्ती का खामोश सफ़र है शाम भी है तनहाई भी दूर किनारे पर बजती है लहरोंकी शहनाई भी आज मुझे कुछ कहना है – गर्ल फ़्रेंड (संगीतकार – हेमंतकुमार)
१७. उम्र हुई तुम से मिले फिर भी जाने क्यूँ ऐसे लगे जैसे पहली बार मिले हम – बहुरानी (संगीतकार – सी. रामचंद्र)
१८. आसमाँ पे है खुदा और जमीं पे हम आजकल वो इस तरफ़ देखता है कम – फिर सुबह होगी
१९. फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझ को – फिर सुबह होगी
२०. दो कलियाँ बचपन की – फिर सुबह होगी
२१. वो सुबह कभी तो आएगी – फिर सुबह होगी
२२. जो “बोर” करे यार को उस प्यारसे तौबा – फिर सुबह होगी (एक धमाल विनोदी कव्वाली)
२३. तुम चली जाओगी परछाईयाँ रह जाएगी कुछ ना कुछ हुस्न की रानाईयाँ रह जाएगी – शगुन
२४. तुम अपना रंजो गम – शगुन
२५. बुझा दिये है खुद अपने हाथो मुहब्बतों के दिये जला के – शगुन
२६. जिंदगी जुल्म सही जब्र सही गम ही दिल की परियाद सही रूह का मातम ही सही… हम ने हर हाल में जीने की कसम खायी है – शगुन
२७. पर्वतोंके पेडों पर शाम का बसेरा है – शगुन
२८. ये पर्बतोंके दायरे ये शाम का धुआँ ऐसे में क्यूँ न छेड दे दिलों की दास्ताँ – वासना (संगीतकार चित्रगुप्त)
२९. अश्कोंमें जो पाया है वो गीतोंमें दिया है उस पर भी सुना है के जमाने को गिला है – चाँदी की दीवार
३०. अब कोई गुलशन ना उजडे अब वतन आज़ाद है – मुझे जीने दो
३१. रात भी है कुछ भीगी भीगी चाँद भी है कुछ मध्यम मध्यम – मुझे जीने दो
३२. नदी नाले न जाओ श्याम तोरे पैया पडूं – मुझे जीने दो
३३. माँग में भर ले रंग सखी री आँचल भर दे तारे मीलन रितु आ गयी- मुझे जीने दो
३४.यहाँ तो हर चीज बिकती है बाबुजी तुम क्या क्या खरीदोगे – साधना
३५. मितवा, मितवा, लागी रे कैसी ये अनबुझ आग – देवदास
३६. किस को खबर थी ऐसे भी दिन आएंगे – देवदास
३७. आन मिलो आन मिलो श्याम साँवरे – देवदास
३८. मैने चाँद और सितारोंकी तमन्ना की थी मुझ को रातोंकी सियाही के सिवा कुछ ना मिला – चंद्रकांता (संगीतकार – एन. दत्ता)
३९. जब भी जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग – दाग
४०.मायूस तो हूँ वादेसे तेरे, मैं अपने खयालोंके सदपे तू पास नहीं और पास भी है – बरसात की रात (या चित्रपटातील माझे अत्यंत आवडीचे गाणे)
४१. मैंने शायद तुम्हे पहले भी कहीं देखा है – बरसात की रात
४२. जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात
४३. गरजत बरसत सावन आयो रे – बरसात की रात (साधारण अशाच मुखड्याचे गीत रोशनच्या “मल्हार” मध्ये लताने गायले आहे. “गरजत बरसत भीगत आईलो” ती पारंपारिक रचना आहे, मला ती जास्त आवडते)
४४. ऐसी खुशी लेके आया चाँद – बरसात की रात
४५. मेरे साथी खाली जाम, तुम आबाद घरोंके वासी मैं आवारा बदनाम – दूज का चाँद (रोशन)
४६. गीत मेरा सुलाए जगाए तुझे प्यार के पालने में झुलाए तुझे – सुरत और सीरत ( या चित्रपटात हे एकच गीत साहिरचे आहे, बाकी सर्व शैलेन्द्रची, संगीतकार – रोशन)
४७. निगाहें मिलाने को जी चाहता है – दिल ही तो है
४८. तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नहीं – दिल ही तो है
४९. तुम्हारी मस्त नज़र गर इस कदर नही होती – दिल ही तो है
५०. संसारसे भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे – चित्रलेखा
५१. छा गये बादल नील गगन पर घुल गया कजरा साँझ ढले – चित्रलेखा
५२. कहे तरसाए जियरा – चित्रलेखा
५३ मन रे तू काहे न धीर धरे – चित्रलेखा

यापैकी प्रत्येक गाण्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. पण आपण म्हटल्याप्रमाणे फक्त गाणे लिहून सलाम करावा हेच उत्तम.