साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद ५

By sanjopraav

अनुकरणाचाच विचार करतो आहोत तर आणखी एक – दोन उदाहरणे बघू. गीतकार राजा मेहंदी अलि खान यांनी  “आपकी परछाईयाँ” चित्रपटासाठी लिहिलेले एक गीत

“अगर मुझसे मुहब्बत है मुझे सब अपने गम दे दो
इन आखोंका हर एक आँसू मुझे मेरे सनम दे दो”

आणि साहिरने “शगुन” साठी लिहिलेले

“तुम अपना रंजो गम अपनी निगेबानी मुझे दे दो
शाम -ए – गम की कसम ये दुख ये हैरानी मुझे दे दो”

ही दोन्ही गीते बरीच लोकप्रिय झाली. पण “आपकी परछाईयाँ” १९६४ चा व “शगुन” १९६७ चा हे गीतकोशात वाचल्यावर साहिर माझ्या मनातून उतरला.

साहिरने नवीन “दाग” साठी लिहिलेले

“जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग” 

 हे (एकच) गाणे मला आवडले होते. पण माधव मोहोळकरांनी त्यांच्या साहिरवरच्या लेखात या गाण्याभोवती संशयाचे धुके असल्याचे लिहिले आहे. हीच गजल त्यांनी रेडिओ पाकिस्तान वर कतिल शिफाईची म्हणून ऐकल्याचे लिहिले आहे. मनोगतावर मिलींद फणश्यांनी या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी कतिल शिफ़ाईच्या असून अंतरे साहिरने लिहिले असल्याची माहिती दिली आहे.

कधी कधी मला कम्युनिस्ट विचारांच्या कवींचे मेहमी आश्चर्य वाटते. एकाच कल्पनेचा/विचाराचा  निरनिराळ्या भाषेत आणि शब्दांत आविष्कार त्यांच्या कवितातून होतो हे “great men think alike” म्हणायचे की अनुकरण म्हणायचे? “ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है”चे एक उदाहरण साहिर, नीरज, फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या कवितातून दाखवले आहेच. आपल्या कुसुमाग्रजांची “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात” ही मला त्याच पंगतीतली वाटते.

दुसरे उदाहरण ताजमहालाविषयी दृष्टीकोनाचे. आतापर्यंत सर्वसामान्य माणसाचा दृष्टीकोन

“बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल” किंवा

“एक शहनशाह ने बनवाके हँसी ताजमहल
सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है” (कवी – शकील बदायुनी)

असा होता. पण कम्युनिस्ट विचाराच्या कवींना अचानक ताजमहाल हे बादशहाच्या पैशाच्या उधळपट्टीचे, सामान्य मनुष्याच्या/मजुरांच्या शोषणाचे, प्रतीक वाटायला लागले. साहिरने लिहिले

“एक शहेनशहाने दौलत का लेकर सहारा
हम गरीबोंकी मुहब्बत का उडाया है मजाक
मेरी मेहबूब कहीं और मिला कर मुझ को”

कुसुमाग्रजांच्या “ताजमहाल” कवितेत नक्की ओळी आठवत नाहीत पण असाच विचार आहे. तसेच सुमित्रानंदन पंतांच्या “ताज” मधल्या या ओळी पहा.

” हाय! मृत्यू का ऐसा अमर, अपार्थिव पूजन?
जब विषण्ण, निर्जीव पडा हो जग का जीवन
स्फटिक सौध में हो शृंगार मरण का शोभन,
नग्न, क्षुधातुर , वासविहीन रहे जीवित जन”

(ह्या ओळी माधव मोहोळकरांच्या पुस्तकातून घेतल्या आहेत). आता हा प्रकार तर रविकिरण मंडळापेक्षाही वाईट दिसतो. कारण रविकिरण मंडळातले कवी विषय एकच असला तरी अभिव्यक्ती आणि विचार वेगवेगळे  असत, इथे विषय तोच, विचारही तोच, फक्त शब्दकळा आणि भाषा थोडीशी वेगळी. अशा गोंधळात साहिरची कविता कितपत स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार मानायची हे ठरवणेही कठीण आहे.

“एक शहेनशाने दौलत का लेकर सहारा..” हे गीत “गझल” चित्रपटात महंमद रफ़ीने गायले आहे. संगीतकार मदनमोहन. तो एक भलताच विनोदी प्रकार झाला आहे. गाण्याचा मूड संतापाचा, चिडीचा आहे. कवी चिडून म्हणतो “मेरी मेहबूब कहीं और मिला कर मुझ को” आणि चित्रपटातल्या गाण्याची चाल चक्क रोमँटिक आहे. मदनमोहनला गाण्याचा मूडच समजला नाही की आपल्यापेक्षा एक रुपया रुपया साहिरने जास्त घेतल्याचा सूड उगवला आहे कळत नाही.

Leave a Reply