साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद – ४

By sanjopraav

साहिरला जिथे कवी म्हणून अमाप यश मिळाले त्या “प्यासा”, “बरसात की रात”, “शगुन” “कभी कभी” वगैरे चित्रपटात मुख्य पात्र एका कवीचे होते. त्यामुळे त्याला बऱ्याच प्रमाणात स्वातंत्र्य होते. ज्या ठिकाणी भावनाशील पात्रे आली तिथे साहिर कमी पडला. “देवदास” आणि “लैला मजनू” ही त्याची उदाहरणे. २००२ मध्ये शाहरुख खानचा ” देवदास” प्रदर्शित झाला तेव्हा आमच्या न्यूजग्रुपवर एकूणच आधीच्या देवदासांवर चर्चा सुरू होती. सैगलच्या देवदासचे संगीत थोर आहे असे सर्वांचे एकमत होतेच, त्यामानाने दिलीपकुमारच्या “देवदास”चे संगीत फिके पडले. त्याचे कारण सचिनदेव बर्मन असे बहुतेकांचे मत पडले. तिथे मी “गीतकार म्हणून साहिरची निवड चुकली” असे लिहिले, बराच गदारोळ झाला, साहिरचे चाहते चिडले इतके की माझ्यावर न्यूजग्रुप सोडून जायची वेळ आली. एक तर सैगलच्या जादुई आवाजापुढे तलत काय दुसरा कोणीही गायक फिकाच पडला असता. पण देवदासच्या तोंडी असलेली साहिरने लिहिलेली “मितवा, लागी रे कैसी ये अनबुझ आग” किंवा “किसको खबर थी ऐसे भी दिन आयेंगे” ही गाणी आज कोणालाही फारशी आठवत नाहीत. उलट आठवतात ती “आन मिलो आन मिलो श्याम साँवरे”, “गोरी साजन की हो गई” ही भजने, आणि “जिसे तू कबूल कर ले”. आज इतक्या वर्षांनंतर मी सहज विचार केला की आज जर माझ्या हातात देवदास ने कुठली गाणी म्हणावीत हे ठरवणे असते तर मी “कोई सागर दिल को बहलाता नहीं बेखुदी में भी करार आता नहीं”, आणि “गुजरे है आज इश्क में हम उस मकाम से, नफरत सी हो गई है मुहब्बत के नामसे” या शकीलने लिहिलेल्या गाण्यांची निवड केली असती आणि ती “देवदास” च्या प्रेमभंग झालेल्या व दारूत बुडालेल्या व्यक्तिरेखेशी जास्त सुसंगत ठरली असती. “लैला मजनू” नावाच्या जुन्या चित्रपटामध्ये शकीलने गाणी लिहिली आहेत, संगीतकार गुलाम महंमद (“पाकिजा”वाले). “चल दिया कारवाँ रुक गये हम यहाँ”, “आसमाँ वाले तेरी दुनिया से जी घबरा गया”, “बहारोंकी दुनिया पुकारे तू आजा”, देख ली ऐ इश्क तेरी मेहरबानी देख ली” ही तलत – लता, तलत – आशा, यांची गाणी आजही अजरामर आहेत. (हो, या चित्रपटात शम्मीकपूर चक्क तलतच्या आवाजात गायलाय). उलट नवीन “लैला मजनू”ची गीते साहिरने लिहिली आहेत, संगीतकार मदन मोहन – जयदेव. “कोई पत्थर से ना मारो मेरे दीवानेको”, “तेरे दर पे आया हूँ झोली भर के जाऊँ गा” वगैरे गाणी खराब आहेत. कुठल्याच बाबतीत दोन लैला मजनूंची तुलना करू नये हे उत्तम.

Leave a Reply