Archive for October 14th, 2007

परतफेड

October 14, 2007

डॉक्टर सुधा. तिच्या वडिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना कणाकणाने मरताना पहायची तिच्यावर वेळ आली आहे. इतरांवर तशी वेळ येऊ नये या आदर्शवादी विचाराने कोळशाच्या खाणीतल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती आली आहे. कोळशाच्या खाणीत अपघात अगदी नेहमीचेच. एका अपघातात सापडलेला एक तरुण तिच्याकडे उपचारासाठी येतो. त्याच्या पायावरची जखम खोल आहे. ती साफ करताना त्याला वेदना होतील म्हणून डॉक्टर सुधा त्याला भुलेचे इंजेक्शन देऊ लागते. तो तरुण ते घ्यायला नकार देतो. “जखम फार खोल आहे, तुला फार वेदना होतील…” डॉक्टर सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तो तरीही ऐकत नाही. “व्हाय डोंट यू अंडरस्टँड?” ती चिडून विचारते. आपण कुठे, कोणा अडाण्यांच्या वस्तीत आहोत हे क्षणभर विसरुन…
“व्हाय डोंट यू अंडरस्टँड डॉक्टर?” भेदक नजरेचा तो तरुण खोल खर्जातल्या आवाजात विचारतो. “पेन इज माय डेस्टिनी अँड आय कॅनॉट एस्केप इट…”

आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला तो. त्याच्या बदल्याला निव्वळ रोख व्यवहारी स्वरुप आलेलं आहे. पैसा हेच सर्वस्व आहे ना, मग पैसा मिळवूनच दाखवतो अशा जळत्या संतापानं त्यानं जन्मदात्या बापाला संपवण्यासाठी तोच पैसा वापरायला सुरुवात केली आहे. त्याची सेक्रेटरी- आणि कदाचित मैत्रिण- असलेल्या गीताला यातलं काहीच माहीती नाही. “कशाला एवढा पैसा पैसा करतोस?” ती त्राग्यानं विचारते. मी? मी पैसा पैसा करतोय? तो गीताला आपल्या आईच्या फोटोसमोर घेऊन येतो. “माझी आई फार गरीब होती गीता. लेकिन उसके इस गुनाह के लिये उसे किसीने माफ नही किया…” त्याचा खर्जातला धीरगंभीर आवाज भरुन येतो. त्याचा करारी चेहरा क्षणात व्याकुळ, घायाळ होतो. त्याच्या डोळ्यांच्या कडांना पाणी साठून येतं….

आगापीछा नसलेला भणंग फिरस्ता तो. सज्जनांच्या गल्लीत त्याला एका वेगळ्याच मुखवट्याखाली सादर केलं आहे. बघताबघता तो एका मोठ्या खेळातलं प्यादं बनून गेलाय. पण आता त्याला सगळं समजून चुकलंय. हे राजकारणी, हे कारखानदार, त्यांचे लालसी राक्षसी चेहरे आणि यात चिरडले जाणारे अगणित सामान्यजन. मग तो बंडाला उभा राहिलाय. पण त्याच्याबरोबर कुणी आहे की नाही ते उद्या पहाटे कळणार आहे. रात्रभर तो जागाच आहे. त्याला या खेळात आणणारी, पण आता त्याच्या बाजूने असणारी सुभाषिणी त्याच्यासोबत आहे. रात्र संपता संपत नाही. तो अस्वस्थपणे फेऱ्या मारतो आहे. थोडा वेळ पडत का नाहीस? सुभाषिणी विचारते. “मेमसाब..” तो परत तशाच आवाजात म्हणतो. “रात्रीच्या सरत्या प्रहरात, काळोखात. एखाद्या भुकेजलेल्या बालकाचं रडणं ऐकू येतं तेंव्हा…” त्याचा गळा दाटून येतो. “तब रात बहोत लंबी लगती है मेमसाब..”

कारखानदार बापाचा एकुलता एक मुलगा ‘तो’. युनियन लीडरकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं आपल्या मित्राला – सोमूला – कामागारांचा नेता बनवलं. पण सोमूला अचानक त्या कामगारांचा काय पुळका आला कुणास ठाऊक! तो आता खरोखरच त्यांच्यातला एक होऊन गेलाय. ‘त्या’ची  तगमग, तडफड होते. भेटायला आलेल्या सोमूला तो आत बोलावतो, पण ‘त्या’चं मन कडवटून गेलंय . सगळा जहरी विखार  चेहऱ्यावर घेऊन तो एक पायरी खाली उतरतो आणि अत्यंत कुत्सितपणे एकच शब्द म्हणतो “नमकहराम……”

निवृत्ती अगदी जवळ आलेला एक तत्त्वनिष्ठ पोलीस अधिकारी. आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक रहाण्याच्या त्याच्या वृत्तीने त्याला कायम मागे पडावे लागले आहे. आता एक शेवटची महत्त्वाची जबाबदारी त्याच्या शिरावर आहे. एका तथाकथित दहशतवाद्याला न्यायालयापर्यंत सुरक्षित पोचवण्याची. त्यातही असंख्य अडथळे येतात.भ्रष्ट राजकारणी आणि त्यांना संपूर्ण विकल्या गेलेल्या पोलीस यंत्रणेसमोर तो एकटा आहे. त्या दहशतवाद्याला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला आमची ड्यूटी करु द्या… तसाच एक किडलेला अधिकारी त्याला हुकूम सोडतो. ड्यूटी? काय ड्यूटी आहे तुमची? ‘त्या’च्या म्हाताऱ्या डोळ्यांत पुन्हा एकदा अंगार उसळतो. ‘सदरक्षणाय, खलनिर्दलणाय’ हीच ना? ‘वो.. उधर लिखा हे … पीछे’ तो गरजतो.

‘तो’ एक बुद्धीमान शिक्षक अधिर. त्याची एक विद्यार्थिनी आपल्या मादक जाळ्यात ओढू पहाते. तो बधत नाही. ती सगळं त्याच्यावरच उलटवते. तिचा बाप त्याला चाबकानं बेदम मारतो. त्याच्या डोक्यात स्फोट होतो. आता तो मानसिक संतुलन हरवून बसलाय. वेड्यांच्या इस्पितळात. त्याचा भाऊ त्याला भेटायला येतो. ‘सुधीर…’ ‘त्या’च्या डोळ्यात फक्त एक वेडसर चमक आहे. ‘तुझं नाव सुधीर असायला नको होतं. तुझं नाव असायला होतं अधिर. आणि माझं? गर्दभ!… तू बदला का घेत नाहीस सुधीर? एक चाबूक घेऊन जा हं तिच्याकडे… बदला… चाबूक…’ 

तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अट्टल गुन्हेगार. त्याचा बदला घेण्यासाठी आणि त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार झालेली एक तरुणी. तिचा उपभोग घेऊन झाल्यावर तो तिला अगदी निरागसपणे विचारतो, ‘तीन तासांपूर्वी आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो, आणि आता तू इथे .अशी… का?’ ‘तूच माझ्या स्वप्नातला राजकुमार…’ ती काहीतरी बहाणा करते. ‘त्या’च्या चेहऱ्यावर एक छद्मी, कुजकट हसू उमटतं ‘ रोमँटिक बातें मुझे बहोत बोर करती है सोनिया…’

मूकबधिरांना प्रशिक्षण देणारा तो एक अत्यंत प्रतिभावान, पण विक्षिप्त शिक्षक. त्याच्या एका अंध आणि मूकबधिर विद्यार्थिनीच्या बहिणीचा साखरपुडा आहे. त्या विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला लिहिलेले एक पत्र तो वाचून दाखवतो आहे. ‘माझ्या नशिबात नाही हे सगळं. पण तुझ्या तर आहे…’ त्याचा आवाज दाटून येतो. ‘नवरी नाही होऊ शकणार मी कधीच, पण नवरीची बहीण तर होईन….’ ‘त्या’चे कमालीचे बोलके डोळे पाणावतात. ‘आय प्रॉमिस, दॅट आय विल नॉट क्राय, ऍज यू वॉक विथ मार्क टोर्डस अ न्यू लाईफ..’ तो चष्मा काढून डोळे पुसतो. एक विलक्षण वेदनापूर्ण हास्य त्याच्या चेहऱ्यावर येतं. ‘सो, ऑन धिस हॅपी नोट…. अ टोस्ट… फॉर सारा… अँड मार्क..’ तो ग्लास उंचावतो.

असे आठवणीतले अनेक तुकडे. आमच्या निरर्थक आयुष्यांना अर्थ देणारे. त्याच्या पासष्टीनिमित्त त्याची परतफेड करण्याचा हा एक प्रयत्न. अत्यंत दुबळा, अपुरा, पण प्रामाणिक. 

एक हवाहवासा ‘बावर्ची’

October 14, 2007

शिवनाथ शर्मांचा संसार मोठा आहे. स्वतः ते, थोरला मुलगा रामनाथ, मधला काशिनाथ आणि आणि धाकटा विश्वनाथ. रामनाथबाबू एका कंपनीत हेडक्लार्क आहेत. काशिनाथसर प्राध्यापक आहेत आणि विश्वनाथराव सिनेमात संगीत दिग्दर्शक होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. रामनाथबाबूंच्या पत्नी सीतादेवी आणि त्यांची लाडकी, लाडावलेलीच म्हणा ना, कन्या मीता. सीतादेवींचे सारखे सांधे धरलेले असतात, त्यामुळे त्यांना फारसे काम होत नाही.मीता नृत्य शिकते आहे. त्या नृत्याची तालीम आणि नटणेमुरडणे यातच ती मश्गुल आहे. त्यातून रामनाथबाबूंना जरा..अं.. घ्यायची सवय आहे. संध्याकाळ झाली की त्यांची बाटली उघडते. काशिनाथसर तत्त्ववादी प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी शोभाताई जरा सुखवस्तू आहेत. त्यांचा मुलगा पिंटू शाळकरी आहे. विश्वनाथरावांचे अजून लग्न झालेले नाही. त्यांची संगीतातली कुवत बेताचीच, पण एकंदरीत थाट कलंदर आहे.
आता इतकी सगळी आत्ममग्न माणसे एका घरात असताना घरातले काम कुणी करायचे हा जटील प्रश्न आहे. शिवनाथजी आपल्या सुनांवर वैतागतात, पण बिचाऱ्यांचे वय झाले आहे, त्यांचे कोण ऐकणार? त्यातून दोन्ही मुले आपापल्या बायकांच्या ताटाखालची मांजरे आहेत. येऊनजाऊन घरातल्या कामाला जुंपली जाते ती कृष्णा. ही पण शिवनाथजींची नातच. बिचारीचे आईवडील नाहीत, मग काय? काहीही पाहिजे असले की ‘कृष्णा, कृष्णा…’ अशा झाल्या हाका सुरु. पण पोरगी सालस, अगदी गुणी आहे हो. सगळ्यांच्या सेवेला सारखी हजर असते. मीता तिच्याच बरोबरीची, पण कृष्णाने मीतासाठी ओव्हलटीन करुन आणले तरी मीताबाईंचे डोळेसुद्धा उघडलेले नाहीत. एवढं सगळं करुन कृष्णा कॉलेजला जाते आहे. तिथल्या एका प्राध्यापकाबरोबर तिचे काही हळुवार बंध गुंफले जाताहेत…

पण एवढ्या मोठ्या खटाल्यात ती तरी एकटी काय पुरी पडणार?  घरातल्या कामाची, विशेषत: स्वयंपाकाची अगदी दैना उडाली आहे. भात आहे, तर भाजी नाही, भाजी आहे तर पोळी नाही…. काही विचारु नका. रामनाथबाबूंना रोज कामावर जायला उशीर होतो आणि साहेबाच्या शिव्या खाव्या लागतात. काशिनाथसर कसेबसे धावतपळत मस्टर गाठतात. विश्वनाथराव कित्येक दिवस उकडलेल्या अंड्यांवर नाश्त्याचं भागवून नेताहेत आणि शिवनाथजींना तर सकाळचे आठ वाजले तरी चहासुद्धा मिळालेला नाही.

मग शेवटी सगळे मिळून ठरवतात की काही नाही, आता एक चांगला स्वयंपाकी ठेवायचा. पण  या इतक्या तऱ्हेवाईक लोकांच्या हाताखाली कुणी टिकला तर पाहिजे! जो येतो, तो महिना पंधरवड्यात गाशा गुंडाळून परत जातो. मग कृष्णा आहेच भांडी घासायला.

अशात एक दिवस रघू येतो. दिसायला देखणा, हसतमुख आणि बोलणं तर  जिभेवर बर्फी ठेवलेली असावी असं. बरं, पगाराची फार अपेक्षा म्हणाल तरे हा पठ्ठ्या चक्क अर्ध्या पगारावर काम करायला तयार झालाय. आणि कुणी सांगितली काय माहीत, पण याला घरातल्या सगळ्यांची खडानखडा माहिती आहे. घरात तर एक भाजी करावी म्हटलं तर चार वांगीही नाहीत. पण रघू डगमगत नाही. काही कच्ची केळी आणि सुरण यातूनच तो असे फर्मास कबाब तयार करतो की रामनाथबाबूंना वाटतं की मटणाचेच कबाब आहेत!
पण ही आखुडशिंगी, बहुगुणी गाय या पागलखान्यात टिकणार का, ही खरी शंका आहे. सुना तर हा कुणीतरी जादूटोणा करणारा तांत्रिक आहे, या शंकेने भेदरल्या आहेत, अहो, दोन रुपयात हा पिशवीभर भाजी घेऊन आला मंडईतून! रामनाथबाबूंनी संध्याकाळी बाटली उघडली आणि रघूने त्यांना कोकाकोला आणि लिंबू पिळून फर्मास कॉकटेल बनवून सर्व्ह केले. शिवाय तोंडात टाकायला मसाला डाळही आहे. काशिनाथसर दमून आले आणि एक कपभर चहा मिळेल का हा त्यांचा प्रश्न संपायच्या आत रघू चहा घेऊन हजर. शिवाय बरोबर खायला कचोरीपण.

अगदी स्वप्नातला देवदूत वाटावा असा हा ‘बावर्ची’ शर्मांच्या घरी चक्क टिकून राहिला. नुसताच टिकला नव्हे तर घरातलाच एक होऊन गेला. फक्त स्वतःसाठीच जगणाऱ्या या लोकांना त्यानं दुसऱ्याला आनंद देण्यातला आनंद समजावून सांगितला. त्यांच्यातले ताणलेले, तुटत चाललेले संबंध पुन्हा घट्ट केले आणि शेवटी कृष्णाच्या आयुष्याचे भले व्हावे म्हणून स्वतःवर वाईटपणा घेऊन निघून गेला. दुसऱ्या गावी, दुसऱ्या घरी, दुसऱ्या नात्यांवर फुंकर घालण्यासाठी…

१९७२ साली प्रदर्शित झालेला हृषिकेश मुखर्जींचा ‘बावर्ची’ हा असा साधा, पण अंतर्मुख करणारा चित्रपट आहे. ‘इट इज सो सिंपल टु बी हॅपी, बट सो डिफिकल्ट टु बी सिंपल’ हे साधे सूत्र सांगताना कुठेही प्रचारकी थाट न आणणारा. आनंद, नमकहराम आणि (त्या मानाने फारसा गाजावाजा न झालेला) बावर्ची या त्रिसूत्रीतला तितकाच प्रभावी  आणि नि:संशय आणि संपूर्णपणे राजेश खन्नाचा चित्रपट. यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्नाला हृषीदांनी अर्धी खाकी तुमान, गांधी टोपी आणि खांद्यावर टॉवेल या वेशभूषेत सादर करण्याचे धाडस केले. (याआधी राजकपूरने ‘जिस देश में गंगा बहती है’ मध्येही असेच धाडस यशस्वी करुन दाखवले होते) राजेश खन्नाच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी ही एक यात शंका नाही. जया भादुरीची कृष्णाही अशीच बावनकशी. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ म्हणजे काय ते ही भूमिका पाहून शिकावे. दुर्गा खोटे आणि उषा किरण यांनी साकारलेल्या सुनाही अगदी आपल्या घरातल्या वाटाव्या अशा. दुर्गाबाईंचा फणकारा तर बघत रहावा असा. आपण निष्पाप आहोत हे कळवळून सांगताना माझ्या हातून काही भलतंसलतं घडलं असेल तर मी मरुन जाईन असं कृष्णा सांगते त्यावर’ सुनो, शाम के वक्त लडकी की बातें सुनो’ हा संवाद दुर्गाबाईंनी असा म्हटलाय की ज्याचं नाव ते! पोरक्या पोरीविषयी माया, काळजी आणि एकंदरीत झाल्या प्रकाराबद्दल गलबलून आलेलं मन हे सगळं एका वाक्यात कसं सांगता येतं हेच जणू त्या दाखवून देतात. ए. के. हंगल यांचे रामनाथजी आणि असरानीचे विश्वनाथराव असेच मझा आणून जातात. काशिनाथसर झालेल्या (आणि कुठेही नामोल्लेख नसलेल्या) गुणी आणि नैसर्गिक पुढे अभिनेत्याचे काय झाले हे काही केल्या कळत नाही. काली बॅनर्जीची मीताही अगदी मोकळी आणि दिलखुलास. तिच्या किंचित बायली नृत्यशिक्षकाच्या भूमिकेतला पेंटलही लक्षात रहातो. त्याचे आणि राजेश खन्नाचे उर्दू आणि हिंदी भाषा या विषयावरचे संवाद असेच अर्थपूर्ण.अर्थात हे इतके भरताड लिहिण्यापेक्षा संवाद गुलजार यांचे आहेत, इतके लिहिले तरी पुरे. 

पण मला विचाराल तर ‘बावर्ची’ चा खरा हीरो आहे तो हरिंद्रनाथ चटोपाध्याय. शिवनाथ शर्माच्या खट भूमिकेत हरिंद्रनाथांनी धमाल केली आहे. त्यांचा कवडीचुंबकपणा, कृष्णाविषयी त्यांच्या पोटात असलेली अपार माया, आळशी सुना आणि त्यांना घाबरुन असणारी नालायक मुले यांच्यांवरचा त्याचा राग हे सगळे हरिंद्रनाथजींनी सुरेख दाखवले आहे.  मुलांना आणि सुनांना धारेवर धरताना हा म्हातारा आपल्या ओळखीच्या एखाद्या खडूस आजोबांची आठवण करुन देतो. ‘भोर आयी गया अंधियारा’ या गाण्यात चटोपाध्यायबाबू अगदी रंगून गायलेपण आहेत. एकंदरीतच निखळ आनंद मिळवून देणारी ही भूमिका.

 

आणि ‘बावर्ची’ चा उल्लेख मदनमोहन यांच्या संगीताविषयी आणि कैफी आजमींच्या गाण्यांविषयी न लिहिता केला तर त्या गुन्ह्याला क्षमा नाही. मन्नाडे यांचा आवाज या चित्रपटात राजेश खन्नाला एकदम ‘सूट’ होतो. ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’ हे मन्नादांचे सोलो आणि बिलावल रागावर आधारित ‘भोर आयी..’ ही दोन्ही गाणी नितांतसुंदर. ‘मोहे नैना बहाये नीर’ आणि ‘काहे कान्हा करत बरजोरी’ हीही गाणी सुंदर.

तर असा हा हवाहवासा वाटणारा ‘बावर्ची’ पहावा आणि मन आनंदाने भरुन जावे. या चित्रपटातला शेवटचा ‘पंच’ आणि अमिताभ बच्चनचे निवेदन अशा गोष्टी नसत्या तरी काही बिघडले नसते असे वाटते, यातच सगळे आले.