Archive for May, 2008

आसपास

May 29, 2008

उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही
अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी
शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने
भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे
अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या
जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

जीवन म्हणजे ऐसे तैसे, असे जगावे, तसे जगावे
पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

‘तें’ ना श्रद्धांजली

May 26, 2008

विजय तेंडुलकरांना श्रद्धांजलीस्वरुपात प्रदीप नावाच्या माझ्या एका मित्राने लिहिलेले हे काही:

I read in eSakaal, the sad but inevitable news a while ago of the
death of Vijay Te.n.

I took fascination for his writting when I read his ‘शांतता कोर्ट चालू आहे’ sometimes around 1967. The play simply zapped me, it was
way beyond what I had lived by until then– the staple diet of
Kanetkar’s melodramatic रायगड etc. Here was someone who looked deep
into the lives and minds of humans in a way that I had rarely
experienced before (the notable exception being जीए. I had read his
वस्त्र in 1965’s सुगंध दिवाळी and ever since looked forward to his
stories in दिवाळी अंक.. collections of his short stories had come out
before, but werenot available until much later, say early seventees).
But in his own way, Te.n impresssed on my adolescent mind deeply then.
And much like जीए, he kept me bound to his incisionary works until his
death.

His घाशीराम set out a new dimension in Marathi theatre– it was my
priviledge to watch its shows in its early days, with its original
cast. And I did this three- four times during those heady days.
Unfortunately, the play got caught up in wrong controversy and we
Marathi’s (as always) lost the chance to really celebrate a great
creation in our theatre. After all, if we are content to live with the
mush, mushy world of Kanetkar’s and the likes, who can save us?

Just two/ three years ago, I had come across two of his essays in some
Diwali anks. One explored at depth, his relationship with his own son
(late Raju) and attempted to put it in the context of his own
relationship with his father– through his own turbulent years. It was
written in a typical deadpan fashion that was characteristic of him,
but that is where his strength lay. Another essay was on a bizzare
experience sometime during his young days, wandering around Falkland
Road (Mumbai’s infamous red light district). He narrated, yet again in
a deadpan fashion, a real fight that he witnessed there between two
dada’s! Here was a Marathi middle class person, set up in an entirely
different world, a world of prostitution, thuggery, physical fights
and much more. But his narration never never betrayed his middle class
upbringing. He was there amidst it all, a silent and curious observer,
but one with a great feeling of empathy. This underlying subtle
sensntivity coupled with an eye for observation and the ability to
surmise the ways of those humans stood him apart from the rest.

I differ sharply from his ’secular stance’ in the last few years– one
which drew him to ‘feel like murdering Modi’ because I have a
different take on those issues. We had drifted apart but despite his
loud posturings on these counts in the lastfew years, I still have a
feeling of reverence and fondness for this great author.

Mid way through the fiftees is a time when one lives with parting
company with one’s elderlies– you loose your parents, your kith and
kin that shaped your life, and people whom you adored ever since you
started looking around yourself to the world. But I still will find
difficult to bear with these losses. Sahir wrote…’ मैं पल दो पल का शायर हूं…. कल और आयेंगे नगमों की
खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले
तुमसे बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करे
क्यों कोई मुझको याद करे
मसरुफ जमाना मेरे लिये
क्यों वक्त सुहां बरबाद करे
True, but the memory lives on.

Rest in peace (at least now) Te.n

हे इथे प्रसिद्ध करण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद, प्रदीप.

हे काय नशीबी आले

May 26, 2008

हे काय नशीबी आले हे भाग्य हे असले कसले
बघ निघून गेले वजीर राजे डावपेचही फसले

मी डोळे उघडून बघतो तेंव्हा रात्र पुन्हा उलगडते
या अंधाराने हात ओलसर दिशादिशांना पुसले

बहार माझा बघता बघता काल सुकोनी गेला
फूल एकटे हाती उरले तेही पण हिरमुसले

डोळे मिटता स्पर्श कुणाचा झाला डोक्यावरती
उग्र विषारी सर्प दुतोंडी जागोजागी डसले

सोबत होते, तेही गेले निघून दुसऱ्या वाटे
चाहूल कसली, जाळीमध्ये काय पुन्हा खसफसले 

पाठ फिरवुनी चालू लागलो आयुष्य चुरगाळोनी
शरीर सोबत, फिकीर कोणा, असले किंवा नसले

धुक्यातून उलगडणारे जी.ए. – ४

May 15, 2008

‘ हे परमेश्वरा, आता माझे आयुष्य संपणार व मी तुझ्यापुढे येऊन उभा राहणार. मी फार पापी आहे, म्हणून त्या क्षणी तू मला क्षमा कर. पण तूच मला असे निर्माण करून ठेवलेस, याबद्दल त्या क्षणी मीदेखील तुला क्षमा करीन.’
-उमर खय्याम

जी.एं. चे मराठी वाचन

जी. एं. चे बरेचसे आयुष्य कर्नाटकात गेले. ते कानडी उत्तम बोलत असत. त्यांचा अभ्यासाचा आणि अध्यापनाचा विषय इंग्रजी. आणि त्यांचे लिखाण आहे ते सगळे मराठीमध्ये. मराठी भाषेबद्दल – किंवा एकंदरीतच भाषांबद्दल – त्यांना आदर वाटत असे. भाषा ही कोणत्याही लेखकापेक्षा मोठी आहे, असते असे त्यांना वाटे.एखाद्या  लेखकाने अमुक एका भाषेला काही दिले असे म्हणणे म्हणजे आपल्यासारखा मुलगा झाला म्हणून आपल्या आईचे अभिनंदन करण्यासारखे आहे, असे ते म्हणतात. मराठीच्या भवितव्याविषयी कपाळावर काही वैचारिक आठ्या चढवण्याची सध्या फॅशन आहे पण पंचवीस – सव्वीस वर्षांपूर्वी ‘समजा, जर काही जण मराठीच्या विरुद्ध पचंग बांधून तयार झाले आहेत, आणि तेवढ्याने कापरे भरण्याइअतकी जर मराठी दुबळी असेल तर तिने सरळ उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी जावे हे बरे’ हे जी. एंनी लिहिलेले वाक्य बरेच काही सांगून जाते.

कुलकर्णी हे आडनाव आणि इतरांना कस्पटक्षुद्र लेखण्याची वृत्ती यात काही गणित आहे का ते एकदा पाहिले पाहिजे. जी.एं चे मराठी वाचनही भरपूर असले तरी फारच कमी मराठी लेखक – कवींच्या रचना त्यांना आवडत असत. बालकवी, खानोलकर, ग्रेस ही काही चटकन आठवणारी नावे. माडखोलकरांविषयीही त्यांनी बरे लिहिले आहे. माडखोलकरांच्या लिखाणात ‘प्रमाथी’ , ‘उर्जस्वल’ असे शब्द येत असले तरी त्यांच्या लिखाणाला स्वतःची एक ऐट, एक श्रीमंती आहे असे त्यांना वाटते.  जुन्या पिढीतले लेखक विनायक लक्ष्मण बर्वे उर्फ ‘कवी आनंद’ यांनी केलेल्या ग्रेच्या विलापिकांचा अनुवाद आणि त्यांची ‘मुचकुंददरी’ ही कादंबरी आपल्याला आवडल्याचे ते लिहितात. अनिलांच्या कविता आणि कुसुमावती देशपांड्यांचे लिखाण हे जी. एंच्या आवडीचे. पण त्यांच्या प्रेमपत्रांच्या संग्रहावर (‘कुसुमानिल’) बाकी ते तुटून पडलेले दिसतात. खरेच आहे म्हणा! अगदी साहित्यीकांची झाली म्हणून काय झाले, प्रेमपत्रे ही काय प्रसिद्ध करण्याची गोष्ट आहे?

माधव आचवल ही जी.एंचे दूरपर्यंतचे मित्र. त्यांच्या ‘किमया’ या पुस्तकाविषयी लिहिताना जी.एंना शब्द पुरत नाहीत. ”आचवलांचे लेखन स्वयंप्रकाशी आहे. स्वतःचा निळसर लाल प्रकाश घेऊन ते ताजे असते’ असे ते म्हणतात.किमया’ कडे वाचक – टीकाकारांनी दुर्लक्षच केले, ही जाणीवही त्यांना टोचून जाते. ‘ समुद्रातून एखादी जलपरी सुळकी मारून वर येऊन निघून जावी, आणि कडेच्या कट्ट्यावर बसून बकाबका भेळ खाणाऱ्यांचे तिकडे लक्षही नसावे’ असे काहीसे त्यांनी या पुस्तकाबाबत लिहिले आहे. (जी.एंचे वैयक्तिक आयुष्य विरोधाभासांनी आणि पूर्वगृहांनी भरलेले असले तरी आचवलांना खूष करण्यासाठी जी.एं असले काही लिहितील, असे वाटत नाही. अनंतराव कुलकर्णी हेही जी.एंचे जवळचे मित्रच. पण त्यांचे पुस्तक (जेनी) जी.एंना मुळीच आवडले नाही. तसे त्यांनी अनंतरावांना स्पष्टपणे लिहिले आहेच.)

पण अशी उदाहरणे फार कमी. याउलट शरच्चंद्र चॅटर्जी, टागोर या लोकप्रिय लेखकांविषयी जी.एं. चे मत फारसे बरे नव्हते. पतीसाठी भयंकर त्याग वगैरे करणाऱ्या शरदबाबूंच्या नायिकांची जी.एं नी भरपूर टवाळी केली आहे. टागोरांची विश्वमानव ही कल्पना तर त्यांना कधीच पटली नव्हती. ‘माणूस नावाचा बेटा’ या आपल्या कथेत त्यांनी या कल्पनेची खिल्ली उडवली आहे. ‘कवितेत टागोरांचे काळजीपूर्वक विंचरलेले केस कधी विस्कटत नाहीत’ या शब्दांत त्यांनी टागोरांना निकालात काढले आहे. उर्दू शायरीही त्यांना फारशी रुचत नसे. ‘वन ऑफ माय ग्रेटेस्ट प्लेझर्स इन लाईफ वुड बी टु कॅच होल्ड ऑफ टेन फ्लॅबी उर्दू पोएटस ऍंड किक दी हेल आउट ऑफ देअर माशाल्ला- सुभानल्ला’ असे ते लिहितात. कळस म्हणजे ज्या पु. ल. ,सुनीताबाई देशपांड्यांशी त्यांचे त्यातल्या त्यात बरे होते, त्या पु. लं. चा विनोदही जी.एंना फारसा आवडत नसे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधले एक व्यक्तिचित्र (नंदा प्रधान?) आपल्याला आवडल्याचे त्यांनी लिहिले आहे. इतरत्र बाकी पु. लं च्या लिखाणाविषयीची त्यांची भूमिका म्हणजे ‘ पाच -दहा मिनिटांच्या सूचनेने गदगदून जाणारा लेखक’, ‘विनोद करताना आपण विनोद केलाच पाहिजे असा त्यांचा इतका जॉनीवॉकरध्यास असतो, की एखादी ‘जागा’ आपण चुकलो नाही ना, असा त्यांना अधीरपणा असतो. एखादा पहिलवान जसा दिसेल त्याला धोबीपछाड टाकायच्या विचारात असावा, तसे विनोदी लेखक दिसेल त्या सिच्युएशनमधून विनोद उकळण्याच्या नादात असतात’ अशी आहे. (जी. एंचे हे म्हणणे  दुटप्पीपणाचे तर आहेच, पण फारसे पटणारेही नाही. फारसे एवढ्यासाठी की पु. लंनीही आपला विनोद काही वेळा सस्त्या लोकप्रियतेसाठी वापरल्यासारखे वाटते. विशेषतः त्यांनी स्वतःच्या लिखाणाच्या काढलेल्या ध्वनीमुद्रिकांच्याबाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. या क्षणी आठवणारी दोन उदाहरणे अशी – ‘असा मी असामी’ मधील धोंडो भिकाजीच्या कपड्यांच्या खरेदीबाबत ‘आपल्या नवऱ्याला मळकट रंगाचे कपडे घेतले तरच आपलं सौभाग्य अबाधित राहील अशी आमच्या हिची समजूत असावी’ असे ते मूळ लिखाणात म्हणतात. ध्वनीमुद्रिकेत बाकी ते ‘आमचं सगळं मळखाऊ डिपार्मेंट ना.. ‘ असे म्हणतात. ‘राणीसाहेबांच्या चंद्रशेखर या कुत्र्याचे शेपटीवरील फोड गुरुदेव आपल्या अंगावर कुठे घेणार या चिंतेने मी प्रदक्षिणेच्या निमित्ताने गुरुदेवांच्या मागच्या अंगाला असलं काही एक्सटेन्शन आहे का हे बघून घेतलं’  असा ध्वनीमुद्रिकेत उल्लेख आहे. आता यातला एक्सटेन्शन हा शब्द मूळ लिखाणात नाही. हे बदल करावे असे पु. लंना का वाटले असावे? ही काही श्राव्य माध्यमाची गरज नाही. मला तर हे पब्लीकला खूष करण्यासाठी केलेले वाटते. ज्या काळात हे ध्वनीमुद्रण झाले त्या काळात पु. लं. मराठी साहित्यविश्वाच्या सम्राटपदी होते. तरीही ही आळवणी करणे पु. लंना गरजेचे का वाटले असावे? असो.) भास्करबुवा बखले यांचे गायन पु. लंनी प्रत्यक्षात कधी ऐकले नाही. त्यांच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रिकाही उपलब्ध नाहीत – पण पु. लंनि त्यांच्या गायकीवर मोठा लेख लिहिला, या उबवलेपणाचीही जी.एंनी टिंगल केली आहे. पु. लं. च्या लिखाणाविषयी सुनीताबाई देशपांड्यांना लिहिलेल्या पत्रांत बाकी जी.एंनी सतत प्रशंसेचा सूर लावला आहे. केशवराव दाते आणि भास्करबुवांची व्यक्तिचित्रे आपल्याला ‘सपाट’ वाटली असे त्यांनी सुनीताबाईंना लिहिले आहे खरे, पण इतरांना पु. लंविषयी लिहिताना असलेली धार त्यांनी इथे जाणीवपूर्वक बोथट केल्याचे जाणवते. हा दुटप्पीपणा जी.एंच्या इतर बऱ्याच बाबतींतही दिसून येतो, पण त्याविषयी नंतर कधीतरी.

पण एक माणूस म्हणून पु. लं विषयी जी.एंना आदर असावा असेच वाटते. पु. लंनी सामाजिक कार्याला केलेल्या मदतीविषयी आणि त्यातही स्वतः अनामिक रहण्याच्या निर्णयाविषयी जी.एं अत्यंत भारावून गेलेले दिसतात. विकास आमटेंना लिहिलेल्या पत्रात ते पु. लं. विषयी ‘ मला वाटते हा माणूस निघून गेल्यावर बसलेल्या जागी थोडा सूर्यप्रकाश सांडलेला आढळत असेल -आणि त्या प्रकाशाला मंद सुगंध असतो तो सौ. सुनीता देशपांडे यांच्या साहचर्याचा’ ‘ असे लिहितात. पु. लं. च्या गप्पांची मैफल जमवण्याच्या हातोटीविषयीही जी.एंनी असेच कौतुकाने (आणि थोड्या असूयेनेही?) लिहिले आहे. इचलकरंजीच्या फाय फाउंडेशनच्या समारंभात – जी. एंनी हजेरी लावलेल्या अत्यंत मोजक्या समारंभांपैकी एक – ‘पु. लं माझ्याविषयी फार मोठ्या मनाने बोलले – जुन्या काळच्या एखाद्या तालेवार स्त्रीने मोठ्या मोठ्या पशांनी ओटी भरावी त्याप्रमाणे.’ असे जी. एं लिहितात तेंव्हा फक्त या शब्दांची आणि त्यामागच्या भावनांची गर्भश्रीमंती लक्षात राहते. तो दुटप्पीपणा, ती विसंगती गेली खड्ड्यात!  

जी. एंचा मराठी कवितांचा जबरदस्त अभ्यास होता. पाडगावकर आणि बोरकर हे जी.एंच्या आवडत्या कवींमधले. पण पु. शि. रेग्यांच्या कविता या आपल्या आयुष्यातला एक ‘ब्लाईंड स्पॉट’ राहिला आहे, असे ते म्हणतात. मर्ढेकरांच्या कवितांविषयीही जी.ए. ‘इनडिफ्रंट’ होते, असेच वाटते. सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे विविध संतांनी केलेल्या रचनांविषयीही जी.एंना फारशी आपुलकी वाटत नसे. याला कारण म्हणजे जी.एंचा पराकोटीचा नास्तिकवाद असावा. मर्ढेकरही नास्तिक असले, तरी ते श्रद्धाळू होते. जी.एं. कडे बाकी असल्या कसल्याही श्रद्धा सापडत नाहीत.  तरी मर्ढेकरांच्या काही कवितांचा ते आपल्या लिखाणात उल्लेख करतात.  (त्या कविताही अशा चमत्कारिकच आहेत – उदाहरणार्थ ‘ दाखवितील ते भोक रिकामे, जिथे असावे मांसल लिंग’ या ओळींचा उल्लेख करावा – किमान दोनदा- असे जी.एंना का वाटले असावे? त्यातही जी.एं या ओळींचे स्वतःचे म्हणून जे रुप सादर करतात ‘जेथ असावे मांसल लिंग, त्या ठिकाणी निव्वळ भोकच नव्हे तर वळवळणारे किडे..’ जिथे असावे मांसल लिंग, तिथे दिसावा निव्वळ बुरसा..’ हे सगळे काय आहे?) ग्रेसच्या कवितांना बाकी ते ‘विशाल उग्र आयुष्याने मध्येच डोळा उघडून आपल्याकडे रोखून पाहावे असा अनुभव देणारी तुमची कविता’ असे ते म्हणतात. खानोलकर हेही जी. एंचे आवडते लेखक – कवी. ‘खानोलकरांना लाभलेला तेजस्पर्श असलेला मराठीत आज दुसरा लेखक नाही’ असे त्यांचे मत होते. कवी मनमोहन यांच्याविषयी त्यांनी ‘ ताऱ्या – ग्रहांची बटणे लावणारा हा माणूस असल्यामुळे जो भाग बटणे लावून झाकावा, तोच उघडा पडला’ असे जी.ए. लिहितात. मराठी समकालीन कथाकारांच्या थोड्या कथा मनापासून आवडल्याचे जी. एंनी  लिहिले आहे. गाडगीळांची ‘तलावातले चांदणे’, गोखल्यांची ‘यात्रा’, थोरल्या माडगूळकरांची ‘वीज’, दळवींची रुक्मिणी, खानोलकरांची ‘सनई’ आणि शंकर पाटलांची ‘दसरा’ या कथा आपल्याला आवडल्याचे जी. ए. लिहितात- बऱ्याच वेळा या कथा आपण न लिहिल्याबद्दलची खंतही त्यांच्या लिखाणात येते. या कथांवर एक नजर टाकली की स्वतःच्या आवडीनिवडींविषयीचे जी.एं नी वारंवार (आणि कदाचित जाणीवपूर्वक) अधोरेखित केलेले ‘गावाचे एक आणि गावंढ्याचे (गावड्याचे?) एक’ हे मत ध्यानात येते. ( माडगूळकरांची ‘वीज’ घ्या – ही खरेतर जी. एं धाटणीचीच कथा. कुरुप, अपंग मुलात जागृत होणाऱ्या लैंगिक भावना आणि त्याची घुसमट या विषयावरची की कथा. ) जी. एं. ची स्वतःची अशी विकसित झालेली शैली – आणि त्यांच्या टीकाकारांच्या मते त्यांची मर्यादाही – अशीच कुठून कुठून जमा होत गेली असली पाहिजे. मराठीतल्या काही अतिशय अपरिचित,  अनोळखी लेखक -लेखिकांचा जी.ए. मुद्दाम उल्लेख करतात. अच्युत पारसनीस,  कृष्णा जे. कुलकर्णी,  मीना दीक्षित हे त्यातले काही लेखक. वामन चोरघडे यांच्या जिवंत अनुभवाने जी.ए. प्रभावित झालेले दिसतात,  पण त्यांच्या कथांमध्ये बाकी या अनुभवांच्या वर्णनाचा खोटा,  चोरटा सूर – जसा सुधीर फडक्यांच्या काही गाण्यांत लागला आहे तसा –  लागला आहे,  असे त्यांना वाटते. मामा वरेरकरांचे ‘अवघा महाराष्ट्र आपल्याला अनुल्लेखाने मारतो आहे’ हे मत हाही जी. एं. च्या टवाळीचा आवडता विषय. 

अगदी आश्चर्यकारकरीत्या खांडेकर हे जी.एंचे एके काळचे आवडते लेखक – दैवतच – होते. याच खांडेकरांची जी.एंनी ‘ हरीभाऊनी मराठी साहित्यात आणून टाकलेल्या सामाजिक गाठोड्यांचा शेवटचा फेरीवाला’ अशी थट्टाही केली आहे. नंतरनंतर बाकी खांडेकर हे लेखक म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून आपल्याला श्रेष्ठ वाटत होते असे त्यांनी म्हटले आहे, ही बाकी थोडी सारवासारव वाटते.  श्री.म. माटे यांच्या काही कथांविषयीही जी.एं भरभरून लिहितात. पण इथेही त्यांचा खवचटपणा आहेच. ‘सावित्री मुक्यानेच मेली’ हे कथेचे नाव आहे की एखाद्या टूथपेस्टची जाहिरात?’ हा खास जी.ए. शैलीचा प्रश्न.  इतर बाजारू लेखकांना – विशेषतः स्त्री लेखकांना- त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांनी फक्त तळायचे शिल्लक ठेवले आहे. त्यांच्या खोट्या, उबवलेल्या शब्दांना, उपमांना जी. एंनी काटेफांजराने झोडपले आहे. नयना आचार्य यांच्या ‘प्रतिभेचा स्पर्श, सूक्ष्म निरीक्षण, तरल संवेदना’ अशा शब्दांवर टीका करताना ‘ या बाईंना, काही लोकांना सतत शिंका येतात तसे प्रतिभेचे झंकार येतात. ‘ असे जी. ए. लिहितात. विशेष म्हणजे जी. एंच्या स्वतःच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक लिखाणातही – इतक्या तकलादू नसल्या तरी – उपमा -उत्प्रेक्षा खच्चून भरलेल्या असतात. या विरोधाभासाचे नवल वाटते.  धनी वेलणकरांच्या पुस्तकात आलेल्या असंख्य विसंगतीपूर्ण उल्लेखांचा ( दर शनिवारी मुंग्यांना साखर घालणे पण साखर संपली की मुंग्या चिरडून टाकणे -कारण मुंग्या उपद्रवी असतात! ) ते असाच टोपीउडवू उल्लेख करतात. पण अशा विक्षिप्त वृत्तीच्या लोकांविषयी आपल्याला एक सुप्त कुतूहल आहे, असे त्यांनी कबूल केले आहे. (उदाहरणार्थ, स्त्री ही आपल्या विकासातील मोठी धोंड आहे असे मानून आपल्या बायकोचा जाहीर पाणउतारा करणारा आणि नंतर अतिव वैफल्याने तिच्याशीच रत होणारा टॉलस्टॉय – त्याला म्हणे चौदा की सोळा मुले झाली! )  विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते ‘सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही’ असे म्हणतात. गो. नि. दांडेकरांची बरीच पुस्तके जी.एंनी वाचली होती आणि त्यांतल्या भाबडेपणावर त्यांनी सणसणीत टीकाही केली आहे. जयवंत दळवींचे लिखाण – आणि ‘ठणठणपाळ’ – जी.एंना आवडत असे. दळवींचे आणि जी. एंचे अनेक वर्षाचे मैत्रीचे संबंध होते, पण – आणि हा ‘पण’ हा जी. एंच्या आयुष्याचाच एक भाग झाला होता – पण यालाही एक विचित्र विरोधाभासाचा वास आहे. एकंदरीतच जी. एंचे साहित्यिक आयुष्य – आणि खाजगी आयुष्य तर जास्तच – विरोधाभास, विसंगती, पूर्वग्रह यांनी भरलेले एक गाठोडे होते.

धुक्यातून उलगडणारे जी ए-३

May 9, 2008

जी.एं. चे इंग्रजी वाचन

‘शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी ईच टाईम ट्राईंग टु कट निअरर टु द एकिंग नर्व्ह’ 
                                                       -स्ट्रिंडबर्ग

चांगला लेखक हा उत्तम वाचक असलाच पाहिजे यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही.  जी.एं चे इंग्रजी साहित्याचे वाचन अफाट होते. (याला त्यांचे इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक असणे एवढेच कारण असावे असे वाटत नाही. प्राध्यापकांचे वाचन आणि त्यांचा व्यासंग चांगला असला पाहिजे, हे सूत्र तर कधीच कालबाह्य झाले आहे!)  कर्नाटक विश्वविद्यालयाचे वाचनालय हे तर त्यांचे दुसरे घरच होते. जगातले उत्तमोत्तम साहित्य मिळवून ते वाचणे, त्यावर विचार, चिंतन (! ) करणे हा जातिवंत वैचारिक गुण जी. एंमध्ये प्रकर्षाने दिसतो. धारवाडमध्ये त्यांच्या घरी स्वतः विकत घेतलेल्या चार – साडेचार हजार पुस्तकांचा संग्रह होता. चार – साडेचार हजार! याशिवाय वेळोवेळी वाचनालयातून आणून वाचलेली, मित्रांनी, स्नेह्यांनी वाचायला दिलेली असंख्य पुस्तके, जवळजवळ तितकीच मासिके – हे निव्वळ आकडेच चकरावून टाकणारे आहेत. जी. एंचे इंग्रजी वाचन हे थोडेसे त्यांच्या पेशातील गरजेमुळे, आणि बरेचसे त्यांच्या इंग्रजीवरील प्रेमामुळे झाले आहे. ‘इंग्रजी भाषेला एक आणि सिगारेटला एक – अशा दोन गोष्टींना अर्पण करण्यासाठी मला दोन पुस्तके लिहायची आहेत’  असे त्यांनी म्हटले आहे.

जी. एंच्या इंग्रजी वाचनाचा धांडोळा घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.  एकतर त्यांनी आपले आवडते म्हणून जे लेखक/ कवी सांगितले आहेत, ते भलतेच आहेत. ‘गावाचे एक तर गावड्याचे (गावंढ्याचे? ) एक’ हे तर त्यांचे आवडते वाक्य. ‘जे जे लोकप्रिय आहे, ते दर्जेदार नसतेच’ हा त्यांचा जबरदस्त पूर्वग्रह इथेही तितक्याच प्रभावीपणे दिसतो.  ‘इफ अ बुक इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर, आय बिकम सस्पिशिअस अबाउट इट. दी लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर ऑफ इंटेलिजन्स इन ऍन ऑर्डिनरी रीडर इज सो लो, दॅट इफ अ बुक टचेस दॅट, ऑलवेज इन्व्हेरिएबली दी बुक मस्ट बी बॅड’ असे त्यांनी म्हटले आहे. थोडा विचार केला तर हे पटूही लागते. ‘वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की सहा महिने त्याच्याकडे बघवतही नाही’ या एका वाक्यात ते त्या थोर लेखकाची वाट लावून टाकतात. अमेरिकन पेपरबॅक्सवर तर त्यांनी निव्वळ जहरीपणाने लिहिलेले आहे. आयन रँड ही लोकप्रिय लेखिकाही जी. एंना वर्ज्यच होती. ‘काळ्या काचेचे मणी घालून एखाद्या प्रॉफेटेसचा आव आणणारी ही बाई म्हणजे एक बुडबुडा होती’ असे त्यांना वाटते. तिची ‘वुई द लिव्हिंग’ ही कादंबरी दोस्तोव्हस्कीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे समजणाऱ्या एका मित्राशी त्यांचे संबंध दुरावले. ही कादंबरी फार फार तर एखाद्या हिंदी चित्रपटासाठी योग्य आहे, असे त्यांना वाटे. जी. एंचे हिंदी चित्रपटांविषयीचे मत ध्यानात घेता धिस इज सेईंग अ लॉट!

दोस्तोव्हस्की हे तर त्यांचे व्यसनच होते. दोस्तोव्हस्की आणि ओ’नील यांच्या कथांमधील आकर्षक साचाहीनता ओ. हेन्रीच्या कथांमधील निव्वळ कसबापेक्षा त्यांना कितीतरी सरस वाटत असे. इंग्रजी साहित्यातले जी.एं. चे स्वतःचे आवडते लेखक अगदी दुर्लक्षित, लोकप्रिय नसलेले असे होते. ल्यूक्रेशियस हा इसवीसनपूर्व काळातला रोमन कवी आणि तत्त्वज्ञ जी.एं. नी स्वतःच्या तिशीच्या आत वाचला होता आणि त्याने ते बरेच प्रभावितही झाले होते. ल्यूक्रेशियस नंतर त्यांना बराच अपूर्ण वाटत असे. असेच त्यांचे झ्वाईगच्या बाबतीतही झाले होते. एक वाचक म्हणून मला स्वतःला जी. एंचा हा मोठा गुण वाटतो. वयानुसार आणि अनुभवानुसार अभिरुचीत असा बदल घडत राहणे आवश्यकच आहे, असे मला वाटते. अगदी पालापाचोळा तुलना करायची तर ‘ग्रीन सॅलड डेज’ मध्ये व. पु. काळे वाचणे व त्या पुस्तकांच्या प्रेमात वगैरे पडणे आणि नंतर त्यांचे कोणतेही पुस्तक हातातही न धरवणे – अशी जशी अगदी सामान्य वाचकाची उत्क्रांती होते तसे!  (लग्नानंतर प्रथम शरीरसंबंधाचा अनुभव घेतल्यानंतर या सगळ्याचा अर्थ काय असा प्रश्न पडणारा ‘पार्टनर’ मधला नायक  आजही थोडा सुसंगत वाटतो, पण यावर उत्तर म्हणून ‘चांदनी रात सनम चांदके लच्छे लच्छे, दो उंगली चमडी के लिये, मर गये अच्छे अच्छे’ लिहिणारा पार्टनर त्या वेळी फार मोठा तत्त्वज्ञ वगैरे वाटला होता, आज तो पोरकटच नव्हे तर चक्क खुळचट वाटतो ! असो. ) आवडता कलाकार हा अथपासून इतिपर्यंत आवडला पाहिजे या भाबडेपणापासूनही  जी. ए. दूर होते. इथे जी. एं आणि पु. ल. यांच्यातला मोठा फरक दिसून येतो. ‘वुडहाऊस हा बालगंधर्वांच्या गाण्यासारखा आहे, तो एकतर पूर्ण आवडतो, किंवा अजिबात आवडत नाही’ असे पु. लंचे मत आहे. एक आस्वादक म्हणून मला जी. एंची वस्तुनिष्ठता अधिक पटते. ‘रायटिंग, नॉट द रायटर!’ मग एखाद्या आवडत्या लेखकाच्या लिखाणात हिणकस काही आले, तर ते तसे आहे, हे सांगण्याचे धैर्य पाहिजे.  (वुडहाऊअसचे तरी सगळे लिखाण कुठे दर्जेदार आहे? ) ‘मी उगाच सांगत नाही ‘ या गडकऱ्यांच्या ओळींवर ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ मध्ये जी टिंगल आहे, ती जी.एंच्या याच मताचे प्रतिबिंब आहे. ऑलिव्ह श्रायनर या लेखिकेचे ‘स्टोरी ऑफ ऍन आफ्रिकन फार्म’ हे जी. एंचे आवडते पुस्तक. त्याचे भाषांतर करण्याचाही त्यांना कैकदा मोह झालेला आहे. पण या लेखिकेच्या इतर कादंबऱ्या ‘ आपल्याकडे स्त्री लेखिका ज्या लायकीच्या कादंबऱ्या लिहितात, त्याच लायकीच्या’ असे जी. एंचे मत होते. स्त्री लेखिकांविषयी जी. एंची मते ध्यानात घेता त्यांना काय म्हणायचे आहे, ते कळते. हेन्री जेम्सचे फक्त ‘आर्ट ऑफ फिक्शन’ हे पुस्तक जी. एंना आवडत होते. त्याची इतर पुस्तके न वाचण्याच्या लायकीची असे त्यांचे रोखठोक मत होते. या सगळ्या यादीत मॉमचा समावेश असावा, याची गंमत वाटते. मॉम हा तसा लोकप्रिय लेखक. तरी जी. एंनी तो त्यांच्या प्रसिद्ध नियमाला बगल देऊन वाचला, आणि त्याचे ‘ऑफ ह्यूमन बॉंडेजेस’ त्यांना आवडले, हे एक नवलच. नीत्शे या तत्त्वज्ञ कवीच्या ‘बर्थ ऑफ ट्रॅजेडी’ या पुस्तकाचा ते तसाच आवडलेल्या पुस्तकांत उल्लेख करतात . विल्यम गोल्डिंगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे, हे तर सर्वज्ञातच आहे. ओ’नीलच्या ‘लाँग डेज जर्नी इंटू नाईट’ या नाटकाचाही त्यांनी ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ या नावाने अनुवाद केला आहे. (आपल्या) दुर्दैवाने त्यांनी त्या हस्तलिखितावर ‘हे प्रकाशनार्थ नाही’ असे स्पष्टपणे लिहिले असल्याने तो अनुवाद वाचकांसाठी उपलब्ध नाही.

बेलॉक हा जी. एंचा आवडता लेखक. बेलॉकच्या ‘हिज सिन्स वेअर स्कार्लेट, बट हिज बुक्स वेअर रेड’ या वाक्याचा आणि त्यातील ‘रेड’ या शब्दावरील श्लेषाचा ते उल्लेख करतात.  याशिवाय Wole Soyinka या आफ्रिकन नाटककाराचे The Strong Breed हे व इतर नाटके, मार्टीन ब्यूबर नावाचा एक ज्यूईश तत्त्वज्ञ, अनेक अप्रसिद्ध लेखकांची प्रवासवर्णने, थोर हेरुडू नावाच्या लेखकाचे ‘अकू अकु’ हे पुस्तक, प्रेस्कॉट या लेखकाचे ‘कॉंक्वेस्ट ऑफ पेरु’ हे पुस्तक… बापरे! यातली बरीचशी पुस्तके वाचणे तर सोडाच, पण त्यांची आणि त्यांच्या लेखकांची नावेही ऐकलेली नाहीत.  

ऑलिव्ह श्रेनर, कॉनराड रिक्टर, डब्ल्यू. एच. हडसन हेही जी.एंचे आवडते लेखक. रिक्टरच्या कादंबऱ्यांचे तर त्यांनी अनुवादही केले आहेत. निसर्ग विरुद्ध माणूस हा संघर्ष हा जी. एंच्या वाचनाचा आणखी एक आवडता विषय. त्यातही जी.एंचा नियतीवादी (आणि निराशावादीही) पिंड लक्षात घेता कष्ट आणि यश यापेक्षा करुणा आणि भीषणता याकडे त्यांचे मन अधिक आकर्षित होत असले पाहिजे. ‘नाईल नदीचा उगम शोधत जाणारे प्रवासी, वेश पालटून मक्केला जाऊन येणारा रिचर्ड बर्टन, ऍथेऑनच्या खोऱ्यात वेड्याप्रमाणे शिरलेली माणसे, उघड्या डोळ्यांनी मृत्यू पत्करणारा ओटस.. या विविध माणसांत असमाधानाचा असला कोणता अंगार होता की ज्यासाठी आम्ही क्षुद्र माणसे कणाकणाने झिजत शेणगोळा आयुष्य जगतो, ते सगळे बाजूला सारून त्यांना असला जुगार खेळणेच भाग पडावे? ‘असा प्रश्न त्यांना पडतो. हाच तो जी. एंच्या वाचनातला दुसरा विशेष. सरधोपट, मिळमिळीत आयुष्यापेंक्षा, अनुभवांपेक्षा तीव्र, टोकदार आणि दाहक अनुभव जी. एंना जास्त आकर्षक वाटत असत असे दिसते. ‘आपले स्वतःचे आयुष्य असेच नीरस, कोमट, निरर्थक  झाले म्हणून जी.ए. हतबल, निराश झाल्यासारखे वाटतात’ असे जी. एंच्या पत्रांच्या चौथ्या खंडाची प्रस्तावना लिहिणारे विजय पाडळकर यांना वाटते.  आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल – विशेषतः आपल्या लिखाणाबद्दल जी. ए. असमाधानी असतीलही – किंबहुना होतेच- ‘आत्मचरित्र लिहिणे म्हणजे एका अर्थाने आपले आयुष्य पुन्हा जगणे – आणि माझे एकच आयुष्य इतके असह्य आहे, की ते पुन्हा जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही’ या अर्थाचे त्यांनी काहीसे लिहिले आहे. कदाचित म्हणूनच जगावेगळे तीक्ष्ण अनुभव त्यांना अधिक आकर्षक वाटत असावेत. मृत्यूविषयीचे जबरदस्त आकर्षण हेही त्यांच्या याच वृत्तीचे द्योतक वाटते.  

‘आत्महत्या आणि खून या दोन बिंदूंशिवाय जास्त उत्कट, जळजळीत काही असूच शकणार नाही, आणि नेमके हेच शब्द वाड.मयाला कधी गवसत नाहीत’ असे जी. एंना वाटत असे. त्यामुळेच की काय, जी. एंच्या आवडत्या बऱ्याच साहित्यीकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कोसलर, सिल्व्हिया प्लाथ, बेरिमन, स्टीफन झ्वाइग, कावाबाटा, हेमिंग्वे इत्यादि.   जी. एंचा स्वतःचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच होती.

या सगळ्याशी अत्यंत विसंगत अशी गोष्ट म्हणजे लैंगिक साहित्याचे वाचन. ‘माझ्याजवळ जितके लैंगिक साहित्य आहे, तितके इतर कोणत्याही लेखकाकडे असणार नाही’ असे त्यांनी (म. द. हातकणंगलेकरांना) लिहिल्याचे आठवते. त्या काळात अगदी इरसाल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लैंगिक साहित्याचे जी. एंनी अगदी भरपूर वाचन केले होते. त्यातल्या खाचाखोचा, एकंदरीत स्त्री-पुरुषांमधल्या शारिरीक संबंधाबाबत सगळी नैसर्गिक (आणि अर्थातच अनैसर्गिक) माहिती त्यांना होती.

पण हा काही जी. एंनी वाचलेल्या इंग्रजी पुस्तकांचा ताळेबंद नव्हे. जी. एंच्या एकंदर वाचनातील दहा टक्केसुद्धा नावे या लेखात आली नसतील. पण तो मुद्दाच नाही. एखाद्या आडगावी राहून, जगाच्या कानाकोपऱ्यातून दुर्मिळ, अनोळखी लेखकांना धुंडाळून सातत्याने त्यांचे वाचन करणे- व्यासंग हा एरवी सस्ता वाटणारा शब्द इथे चपखल बसावा – एवढेच नव्हे, तर त्यावर स्वतःची रसग्रहणात्मक – टीकात्मक मते तयार करणे, त्यांची समकालीन लेखकांशी, मित्रांशी दीर्घ पत्रांतून देवाणघेवाण करणे – हा सगळा केवढा जगड्व्याळ उपक्रम आहे! आणि हे सगळे करत असताना प्रत्यक्ष स्वतःचे लेखन या सगळ्याशी अंघोळीपुरताही संबंध नसलेल्या मराठी भाषेतून करणे हे आणखी एक थोर. इंग्रजीप्रमाणे जी. एंचे मराठी वाचनही जबरदस्तच होते.