असं समाजाशी इतकं तुटक राहून कसं चालेल
म्हणून गाडीची काच खाली घेतली
आणि बोटांनी ठेकाही धरला सूक्ष्म
एका ओळखीच्या मोरयागीताच्या रिमिक्सवर
तरुण आहेत, थोडी मस्ती चालायचीच
म्हणून कौतुकाचाही प्रयत्न केला
काही लचकणाऱ्या कमरा बघून
जरा मनाचे कोपरे दुमडूनच
पण तरीही
आणि उलट्या दिशेने येणाऱ्या
एका सहकुटुंब मोटारसायकलवाल्यालाही
हसून हात केला ओळखीचा
बिचारा असेल मुलाबाळांना
आरास दाखवायला आला
अशी समजूत काढत
स्वतःचीच
एरवी असतोच की आपण शिस्तबद्ध
जबाबदार आणि शांतताप्रेमी
काही दिवस असेही
संस्कृती, श्रद्धा, भावना यांचे
असं म्हणत गाडून टाकली
उसळणारी मुक्ताफळं
शेवटी समाज म्हणजे तरी काय
वगैरे वगैरे
आणि एका धूमधडाक्यानं
हादरलो अचानक अंतर्बाह्य
गुलालाचा एक ढग
अंगाखांद्यावर कोसळेपर्यंत
एक पिचकारीही आली काचेशी, अंगाशी
गुटख्याची, किंचित हातभट्टीचीही
काच वर करता करता
पहिला सलाम केला तो
आपल्या अल्पसंख्याक बुद्धीवादी वगैरे नपुंसकतेला
आणि दुसरा
खुद्द बाप्पालाच
म्हणालो मनापासून
विघ्नहर्त्या
ही उरलीसुरलीही नाळ
असलेली समाजाशी
कापून टाक बाबा
पुढच्या वर्षीपर्यंत
मग ये लवकर
किंवा तुला हवा तेंव्हा
माझं काहीही
म्हणणं नाही
September 10, 2008 at 6:17 am |
Atishay aavadali kavita!
म्हणालो मनापासून
विघ्नहर्त्या
ही उरलीसुरलीही नाळ
असलेली समाजाशी
कापून टाक बाबा
पुढच्या वर्षीपर्यंत
मग ये लवकर
किंवा तुला हवा तेंव्हा
माझं काहीही
म्हणणं नाही
September 10, 2008 at 3:23 pm |
अगदी बरोबर अभिव्यक्ति. माझ्यासारखा लोकांना तर माहीतच पडत नाही काय करायचं.