Archive for July, 2009

आयुर्वेद उवाच

July 26, 2009

ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्याविषयी आम्ही अपार आदर बाळगून आहोत. एकंदरीत सगळ्याच गोष्टींचे बाजारीकरण झाले पाहिजे या ‘सकाळ’ समूहाच्या मोहिमेत आयुर्वेदाचे कार्पोरेटायझेशन करून डॉ. तांबे यांनी आपला जो खारीचा वाटा उचलला आहे तो केवळ ‘काबिले तारीफ’ आहे असे आमचे मत आहे. हे करत असतानाच तंतोतंत ‘गरीबांचे रामदेव महाराज’ ही आपली प्रतिमा जनमानसात रुजवण्यात डॉ. तांबे यांना आलेले यश पाहून तर आमचा उर भरून येतो, आणि ‘कोण म्हणतो मराठी माणूस उद्योजकतेत कमी पडतो? ‘ असे आम्हाला (दारेखिडक्या बंद करुन एकांतात) ओरडावेसे वाटते. डॉ. तांबे यांची शुक्रवारी ‘सकाळ’सोबत प्रसिद्ध होणारी ‘फॅमिली डॉक्टर’ ही पुरवणी तर आम्हाला साक्षात अमृतानुभव देऊन जाते. लहानपणी ‘चांदोबा’ किंवा ‘नवनीत’ आणि त्यानंतर काही विवक्षित रंगाच्या पातळ पॉलिथीन पेपरमध्ये गुंडाळलेली समाजवर्ज्य पुस्तके आम्ही ज्या आवडीने वाचली त्या आवडीने आम्ही हल्ली ‘फॅमिली डॉक्टर’ वाचत असतो. सांधेदुखीपासून ते मानसिक रोगांपर्यंत सगळे रोग दूर करणारे मॉडर्न धन्वंतरी आम्हाला डॉक्टरांच्या रुपात दिसू लागतात. साळीच्या लाह्या, नाचणीचे सत्त्व, उकडलेली पडवळे, दुधीचा रस यांमध्ये आम्हाला तांबड्या पांढऱ्या रश्शाचा, तळलेल्या सुरमईचा आणि सुक्क्या मटणाचा भास होऊ लागतो. शिवाय ही पुरवणी वाचल्याने आमच्या सामान्यज्ञानात अपरंपार भर पडली आहे, ते वेगळेच. एरवी ‘पिचू’ ही काय भानगड आहे, आणि त्याचे काय करायचे असते, याबाबत आमच्या मनात फार म्हणजे फारच गोंधळ होता. तो दूर केल्याबद्दल डॉ. तांब्यांचे आभार मानावे तेवढे कमीच.
इतके सगळे व्याप मागे असताना (हो, ‘फॅमिली डॉक्टर’चे संपादन, त्यात लेख लिहिणे, वाचकांच्या शंकांना उत्तरे; एका माणसाने कायकाय म्हणून करावे? ) डॉक्टरसाहेब विविध समारंभांत उपस्थिती लावतात तेंव्हा बाकी आम्हाला जवळजवळ गहिवरुनच येते. चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव घेऊन रंगमंचावरून बाबामहाराज सातारकरांप्रमाणे सतत मंद स्मित करणाऱ्या डॉक्टरांची छबी जवळजवळ रोज प्रत्येक प्रमुख मराठी वर्तमानपत्रात (म्हणजे ‘सकाळ’ मध्ये) येत असते. आजच्या ‘सकाळ’ मध्ये आलेल्या छायाचित्रात बाकी डॉक्टरांच्या जोडीला रंगमंचावर प्रतापराव पवार, अनील अवचट, मोहन धारिया अशा नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या ऐवजी मराठीतली काही गायक मंडळी दिसली तेंव्हा अचंबा वाटला. बातमी वाचली तेंव्हा ‘जीवनसंगीत’ अर्थात गाण्यांतून आयुर्वेद किंवा आयुर्वेदातून गाणे अशी काहीशी ही भानगड आहे, असे कळाले. ‘आशयघन गाणी आणि भारतीय संगीत मंत्रांसारखेच काम करतात’ असे डॉक्टरांचे मत वाचले. जरासा गोंधळ झाल्यासारखा वाटला, (गाणी आणि मंत्र? मंत्रपुष्पांजलीऐवजी ‘कळा ज्या लागल्या जीवा’ चालेल का? गायत्री मंत्राऐवजी ‘एक लाजरा न साजरा मुखडा?’- हे आमच्या चावट मनाचे प्रश्न! ) पण नेटाने पुढे वाचत राहिलो. डॉक्टर पुढे म्हणाले काव्याचा आशय, शब्दोच्चारांबरोबर शक्तीचे स्पंदन आणि भाव एकत्र येते ( ‘वर्तमानपत्रात ‘येते’ असे आहे, ते ‘येतो’ असे हवे होते’ हा आमच्या चावट मनाचा विचार आम्ही त्रिफळा चूर्णासारखा गिळून टाकला.), तेंव्हा जीवनसंगीत आकाराला येते’हे बाकी काही म्हणजे काही कळाले नाही.
मग पूर्ण लेख वाचल्यावर कळाले ते असे, की गाणी ही विशिष्ट रोग किंवा अस्वास्थ्यावरील रामबाण चिकित्सा आहे असे बालाजीपंतांना म्हणायचे आहे. त्या गाण्यांची प्रात्यक्षिके आणि त्यावर डॉक्टरांचे त्या गाण्यांचा औषधी उपयोग यावरील निरुपण असा तो कार्यक्रम होता. ‘मोहुनिया तुजसंगे’ हे गजाननराव वाटव्यांचे गाणे आणि ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गाणे यामुळे पित्ताचे संतुलन होते, ‘मेरा रंग दे बसंती ‘ या गाण्याने हृदयातली शक्ती जागृत होते, ‘हवा मे उडता जाये’ या गाण्याने शरीराच्या नाड्या व सांधे मोकळे करण्याचा अनुभव येतो असे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही चकीतच झालो! म्हणजे आता निर्मात्याला गीतकार, संगीतकाराबरोबरच एखाद्या आयुर्वेदाचार्यालाही करारबद्ध करावे लागणार तर!
तांबेजी पुढे म्हणतात, ‘शरीरातील अग्नी संतुलित करण्यासाठी ‘दशरथा, घे हे पायसदान’ हे गाणे उपयुक्त आहे (बरोबर! खीरच ती! -पुन्हा आमचे चावट मन! ), तर रक्तदाब, मधुमेही रुग्णांना ‘नैनों में बदरा छाये’ हे गाणे( थ्यांक्यू डॉक्टर मदनमोहन कोहली! – पु. आ. चा. म.!). स्मृतीवर्धन आणि मेंदूचे विकार यासाठी ‘जो तुम तोडो पिया’ हे ‘सिलसिला’ चित्रपटातील मीराबाईचे भजन लागू पडेल तर हृदयविकारावर ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ वर बेतलेले ‘किसीके मुस्कराहटोंपे हो निसार’ हे गाणे. ( ‘किसीके मुस्कराहटोंपे ‘ हे ‘वैष्णव जन तो वर बेतलेले? ऋषीचे कूळ? गाण्याचे मूळ?- पु. आ. चा. म.! )
चला! मग बंधू आणि भगिनींनो, मेडिक्लेमच्या पॉलिसीचा प्रीमीयम भरला नसेल, तर भरू नका! तेवढ्या पैशात काही क्यासेटी आणि सिड्या विकत घ्या. रोग खल्लास!
इन्शुरन्स एजंटाला आम्ही आजच घरी बोलावले होते. त्याला येऊ नको म्हणून फोन करावा म्हणून आम्ही फोन उचलणार तोच बालाजींचा आणखी एक अक्सीर इलाज नजरेस पडला.
बालाजी म्हणतात, ‘ओ सजना बरखा बहार आयी’ या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्वराच्या मीलनाची आहे. (जिच्या केवळ दर्शनाने फास्टींग आणि पीपी दोन्ही शुगर्स वाढाव्या ती साधना, आणि तिला परमेश्वराच्या मीलनाची इच्छा? तीही अतिउत्कट? – पु. आ. चा. म.!) मलविसर्जन आणि आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे!

आमच्या हातातील रिसीव्हर गळून पडला. ‘हे गाणे सादर झाल्यानंतर ‘प्रेक्षागृहाकडून स्वच्छतागृहाकडे’ किती लांब रांग लागली’ असे विचारण्याचेही आमच्या चावट मनाला सुचले नाही!
तूर्त आम्ही आमच्या तमाम वयोवृद्ध नातेवाईकांना आणि इष्टमित्रांना त्यांच्या साठ्या आणि पंचाहत्तऱ्यांसाठी भेट देण्यासाठी म्हणून ‘बेस्ट ऑफ सलील चौधरी’ ही कॅसेट घाऊक दरात मिळेल का या चौकशीत आहोत. ग्लासभर गरम पाणी, दूधतूप, सकाळचा दुसरा चहा, ‘इसपगुल’ आणि लिक्विड प्याराफीन यांपेक्षा ही दूरगामी गुंतवणूक स्वस्तात पडेल असा आमच्या चावट मनाचा होरा आहे!

मैफल

July 15, 2009

आण्णांनी तळव्यावरची तंबाखू नीट मळून घेतली. दोन-तीनदा ती या हातातून त्या हातात अशी केली. आणि मग तिचा एक तबीयतदार बार भरला. हात झटकून टाकत ते म्हणाले, “ऐका बांडुंगअली… “
गोऱ्यापान, घाऱ्या डोळ्यांच्या बुवांनी हातातल्या सिग्रेटवरची राख झटकली. ते थोडेसे पुढे सरकले.
“माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं
सांगा राघू मी न्हाई कधी म्हटलं
आता नका रुसू
जरा जवळ बसू
खुदुखुदू हसू
दोन जिवाचं भांडण मिटलं”
“व्वा, आण्णा व्वा! ” बुवांनी दाद दिली. आण्णाही आता रंगात आले.
“नका वळवू हो मान
करा शब्दाचा मान
बघा देऊन ध्यान
माझ्या अंगावर काटं उठलं

आम्हा बायकांची सवय
नाही म्हणजेच होय
आता कशाचा संशय
राजाराणीचं नातं पटलं”
“आण्णा,आण्णा… गावरान लिहावं तर तुम्हीच! ” आण्णांचे हात हातात धरून बुवा म्हणाले. “आमची पेनं आम्ही भंगारात विकावी बघा! “
“अहो तसं नाही बुवा! ” आण्णा गमतीनं म्हणाले “गद्यनगरीचे तुम्ही सरदार, तर पद्याच्या राऊळातले आम्ही पुजारी! काय खरं की नाही रामभाऊ?”
रामदादांनी मान हलवली. दादांच्या शेजारी बसलेले साध्या शर्ट-पँटमधले लहानसर चणीचे गृहस्थ हळूच म्हणाले, “बुवा, आण्णांची लेखणी पाहिली की भाईंचे शब्द आठवतात. सगळे शब्द ‘हमारे लिये कुछ सेवा’ म्हणून उभे असतील येथे! आमच्या ‘मुंबईचा जावई’च्या वेळेची गोष्ट सांगतो तुम्हाला, बुवा. शृंगारिक गाणं पाहिजे होतं आम्हाला. शृंगारिक, पण सभ्य. जरासं सूचकही. आण्णांनी जरा विचार केला आणि एका बैठकीत ‘का रे अबोला’ लिहून काढलं. त्यातली सूचकता मी तुम्हाला सांगायला नको…
रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे
आणि यातलं मीटर इतकं नेमकं आहे रामदादा, की मला फारसं काही करावंच लागलं नाही. नारळात जन्मतःच पाणी असावं तशी आण्णांच्या शब्दातच चाल दडलेली असते. बाकी पुढचं काम आशाबाईंनी अगदी सोपं केलं… “
आण्णा खुशीत येऊन हसले.

पलीकडे संगीताची बैठक रंगात आली होती. “‘न तुम बेवफा हो’ ची काय चाल दिल्यायस भय्या! मान गये तुमको! ” केस आणि मिशा पिकलेल्या दादांनी त्या पंजाबी तरुणाचे हात हातात घेतले होते. “और तेरे ‘कदर जाने ना’ के तो क्या कहने! “
“आपका आशीर्वाद है दादा! ” तो पंजाबी लाजल्यासारखा झाला होता. “आपके सामने तो बच्चा हूं दादा! आप तो पारखी हो! कुठूनकुठून असली रत्नं शोधून आणता खुदा जाने! आता या तपनकुमारचंच बघा ना… ” गर्दीत मागे लपलेल्या तपनकुमारला त्या पंजाब्यानं पुढं ओढून आणलं. “कहांसे लाये इस मुलायमसी आवाज को, दादा? “
“अल्लाची देन आहे भय्या! मैं तो इक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं! या तपनलाही मी पहिला चान्स दिला खरा, पण त्याचं खरं चीज तूच केलंस भय्या! ‘बेरहम आसमां’ मध्ये काय धून आहे तुझी! आणि काय गायलाय बरखुरदार!
“शुक्रिया, दादा! मेहेरबानी.. ” तो लाजरा संकोची तरुण म्हणाला.
कोपऱ्यातून मेंडोलिनचे विलक्षण करुण सूर ऐकू आले. एक देखणी पण उग्र चेहऱ्याची व्यक्ती सगळ्यांकडे पाठ फिरवून एकटीच मेंडोलीन छेडीत बसली होती.
“आप अकेले क्यूं बैठे हो मियां? महफिलमें आ जाईये.. ” दादा म्हणाले.
“मला या वाजंत्रीवाल्यांच्यात बोलावू नका दादा. मी एकटा आहे तेच बरं आहे. “
“असं कसं म्हणता मियां…? “
“मग काय म्हणू दादा? ” त्याने मेंडोलीन खाली ठेवलं. “इस पंजाबी छोरे की तारीफ कर रहे थे आप. इतरांच्या धुना चोरून त्यावर जगणारे लोक हे.माझ्या ‘ये हवा ये रात ये चांदनी’ वरुन उचलून यानं ‘तुझे क्या सुनांऊ मैं दिलरुबा’ बांधलं. आणि हा म्हणे संगीतकार! “
“अरे हो, हो, मियां! संगीत अल्लाघरची देन आहे. आप क्यूं खफा हो रहे हो? सात सुरांवर सगळ्यांचा तितकाच अधिकार आहे.. ” दादा म्हणाले.
“हां, फार तारीफ करू नका दादा. आपकोभी नही बक्षा इसने. आपल्या ‘सीनेमें सुलगते हैं अरमां’ वरनं यानं हुबेहूब ‘तुम चांद के साथ चले आओ’ घेतलंय. खोटं वाटत असेल तर विचारा त्याला.. “
भय्या जरासा शरमला. “कुबूल मियां, कुबूल. वो तर्ज है ही इतनी प्यारी..”
“हम्म. ” तो उग्र चेहऱ्याचा माणूस म्हणाला. “पण लताकडून तू जे काही करून घेतलंस त्यासाठी एक जाम भरतो भय्या मी, खुदा मुआफ करे. माझ्याखालोखाल लताला न्याय देणारा तूच. ‘एक लता गाती है, बाकी सब रोती हैं’ असं मी म्हणालो
तर सगळी इंडस्ट्री तुटून पडली माझ्यावर. तू बाकी तेच सच आहे, हे दाखवून दिलंस सगळ्यांना. शाब्बास, शाब्बास बे फौजी. “
” पण मियां, याच लताला तुम्ही म्हणे ऐकवलं होतं, ‘ लताजी ठीक से गाईये, ये हमारी तर्ज है, उस मियां की नही’? “
“हां जरुर. आणि अगदी नौशादचं नाव घेऊन ऐकवलं होतं. अरे, लता असली म्हणून काय झालं? संगीतसे बडा कौन होता है? और हम? हम उसके पुजारी है भाई, कोई नौकर नही हैं. अल्लाचा हात डोक्यावर घेऊन पैदा झालेला असतो संगीतकार. मजाल है की कोई ऐरा गैरा हमसे ऐसी वैसी बात करें? भय्या, दुनियेला जूत्याखाली ठेवलं आपण. भूखे मर गये, पर कभी किसीके पास काम मांगने नही गये… “
त्या पंजाबी तरुणाच्या डोळ्यांत पाणी तरारलं. “सच्ची बात मियां, सच्ची बात. ही अकड फार जालिम चीज असते. हमसे अच्छा भला कौन जाने… “
त्या उग्र चेहऱ्याच्या माणसानं मेंडोलीन उचललं. हलके हलके हिमवृष्टी सुरू व्हावी तसे हृदय पिळवटून टाकणारे करुण सूर पुन्हा हळुवारपणे बरसू लागले.

स्वत:शीच कुणीतरी म्हटलेल्या काही ओळी ऐकू आल्या आणि सगळ्यांचीच नजर तिकडे गेली.
“सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावेत असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाहीत, की माझ्या शब्दांनी दिव्यत्वाशी नाते जोडणारे महाकाव्य निर्माण झाले नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे. परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालांनो, मी हीन-दीन, दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही, ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या जळजळीत सूर्यप्रकाशात मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोकुळसरी मी क्षणभर त्याच्या सुवर्णवैभवात पाहिली आहे. येत असताना माझे हात रिकामे असले तरी रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मारव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझ्या पायभार खेड्यासाठी विनादैन्य येथे पाऊल टाकत आहे… “
हा कोण बुवा आणि तो हे काय म्हणत आहे या अर्थाने काही लोकांनी एकमेकांकडे भुवया उंचावून पाहिले.
पण त्या काळा चष्मा घातलेल्या पाठमोऱ्या माणसाने काही मागे वळून पाहिले नाही.

दुसऱ्या एका बाजूला चारच लोक काहीतरी बोलत होते. त्यातले एक चष्मेवाले, पातळ मागे फिरवलेले केस असणारे साध्या बुशशर्ट-पँटमधले गृहस्थ म्हणाले, “मलाही माझी वाट सापडायला फार वेळ लागला. सुरवातीला सामाजिक कादंबऱ्या, कथा… कायकाय लिहिलं. अहो, तुम्हाला खरं वाटणार नाही, एक नाटकही लिहून पाहिलं. मग ठरवलं की भय्या, आपली वाट वेगळी. फारशी मळलेली नाही, फार लोकप्रियही नाही. पण हेच आपण करायचं. “
“पण कधी खंत नाही वाटली तुम्हाला? तुम्ही लोकप्रिय झालात, तुमचा स्वतःचा असा वाचक वर्ग निर्माण झाला, तुमच्या कथा कादंबऱ्या गाजल्यापण. समर्थ आणि अप्पा म्हणजे मराठीतले होम्स -वॉटसन असं लोक म्हणतात. पण… माफ करा हं, कधी पहिल्या फळीतले लेखक म्हणून तुमचं नाव आलं नाही. कुठले पुरस्कार, संमेलनाचं अध्यक्षपद असलं काही नाही. कधी… कधी आपल्यावर अन्याय होतोय असं वाटलं नाही? “
ते चष्मेवाले गृहस्थ फक्त मंदपणे हसले.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंद्यांनी सिगारचा एक दीर्घ झुरका घेतला. आपल्या चष्म्यावरून एकदा प्रतिस्पर्ध्याकडं बघून घेतलं आणि पटावरील घोडा अडीच घरं पुढं नेला. “चेक, डिकास्टा” ते म्हणाले.
डिकास्टा किंचित हसला. “वाटलंच होतं! ब्रिलियंट मूव्ह, जिवाजीराव! पण हा डिकास्टाही काही कच्च्या गुरुचा चेला नाही. हा आला आमचा राजा पांढऱ्या घरात! “
खेळ कुतुहलानं बघणाऱ्या माणिकरावांनी अडकित्त्यात बराच वेळ धरून ठेवलेली सुपारी अखेरीस फोडली. “पन मी काय म्हनतो सीयेमसायेब, तुमी आपापसात समेट का नाय करून राह्यले. “
“अहो तसं नाही, माणिकराव…. ” जिवाजीराव म्हणाले. एवढ्यात पटावर कुणाची तरी सावली पडली म्हणून त्यांनी मान वर करून बघीतलं. साधा कॉटनचा झब्बा पायजमा, चष्मा, उधळलेले कुरळे केस, खांद्याला शबनम अशी एक किरकोळ आकृती शेजारी उभी होती.
“अरे, ये ये ये.. ” जिवाजीराव उत्साहानं म्हणाले. “तुझी वाटच बघत होतो. किती उशीर केलास? काय डिकास्टा, आता आमची बाजू झाली की नाही भक्कम? “
“तुमची? की आमची? ” डिकास्टानं मिष्किलपणे विचारलं.
“हम्म. बघूया कोणाची ते. बस, तू बस रे गड्या. “
दिगू टिपणीस शेजारच्या खुर्चीत बसला.