दिलीप प्रभावळकरांच्या’एका खेळियाने’ ची सुधारित आवृत्ती नुकतीच वाचनात आली.’अक्षर प्रकाशन’ च्या या आवृत्तीत प्रभावळकरांनी त्यांच्या ‘वा गुरु!’ या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतचा त्यांच्या रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. ‘दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं रान पेटवलं असतं’ हे पु.ल. देशपांडेंचं वाक्य या पुस्तकाच्या वेष्टणावर छापलेलं आहे. (का? कुणास ठाऊक!वेष्टणावर प्रभावळकरांची प्रशंसा करणारी इतरही वाक्यं आहेत. पुस्तक नीट निरखून बघून वाचायला सुरवात करणार्यांना हा प्रथमग्रासे मक्षिकापात वाटू शकेल. प्रभावळकरांची प्रतिमा एका नटापलीकडे विचार करणारा, अर्थपूर्ण लेखन करणारा बहुरुपी कलाकार अशी आहे, त्यामुळे वेष्टणावरील ही वाक्ये आणि मुखपृष्ठावरील आणि पहिल्या काही पानांवरील मुद्दाम ‘पोझ’ देऊन काढलेले फोटो हे सुरवातीलाच विरस करुन जातात. उलट मलपृष्ठावरील आबा, सासू, नंदू आणि बापू या चार मोजक्या भूमिकांचे फोटो बघायला बरे वाटते. मुखपृष्ठाच्या जागी मलपृष्ठ आणि मलपृष्ठाच्या जागी मुखपृष्ठ अशी ‘अक्षर’ वाल्यांकडून ‘उसंडु’ झाली काय? ) रान पेटवणं म्हणजे काय हे माहिती नाही, पण मराठीतला (आणि आता हिंदीतलाही) एक गुणी अभिनेता, एक प्रयोगशील कलाकार, एक विचारी माणूस आणि एक सिद्धहस्त लेखक अशा अनेक भूमिकांतून प्रभावळकर आपल्याला भेटत आलेले आहेत. कॉलेजातील हौशी नाटकांनतर व्यावसायिक नाट्यभूमीवरची प्रभावळकरांची पहिली जोरदार ‘एंन्ट्री’ म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’ मधली त्यांची चेटकीण. या चेटकिणीबद्दल (आणि पुण्यात दोन प्रयोग असताना दुसर्या प्रयोगाला वेळ होतो म्हणून भर ट्रॅफिकमधून या चेटकिणीने स्कूटरवर मागे बसून लोकांना घाबरवत, दचकवत ‘जस्ट फॉर लाफ्स गॅग्ज’ मधल्या प्रसंगासारख्या केलेल्या प्रवासाबद्दल ) प्रभावळकरांनी इतरत्रही लिहिले आहे.त्यानंतरच्या ‘प्रेम कहाणी’, ‘आरण्यक’, ‘नगर अंधेरा’ या नाटकांमधून प्रभावळकरांची स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रियाच सुरु होती असे वाटते. ‘पोर्ट्रेट’ या एकांकिकेत प्रभावळकरांनी साकारलेल्या लष्करी अधिकार्याच्या भूमिकेबाबत बाकी कुतुहल वाटते. मतकरींची ही एकांकिका पहायला मिळायला हवी होती असे वाटते.
या पुस्तकात वर्णन केलेल्या ‘एलिअनेशन थिअरी’ या जर्मन रंगभूमीवरील कल्पनेची हे पुस्तक वाचताना गंमत वाटते. मराठी रंगभूमीवरची कल्पना काय तर अभिनय इतका खोल, उत्कट असावा की प्रेक्षकाचाही रंगमंच आणि वास्तव यात गोंधळ व्हावा. प्रेक्षकाला लेखकाने आपल्या लिखाणाने आणि अभिनेत्याने आपल्या अभिनयाने आपल्यामागे फरफटत नेले पाहिजे. ‘एलिअनेशन थिअरी’ मध्ये याच्या बरोबर विरुद्ध विचार मांडलेला आहे. एखाद्या नाट्यपूर्ण, उत्कट प्रसंगानंतर विंगेतून एका लाकडी बॉक्सवर हातोड्याने प्रहार करुन ‘टॉक’ असा मोठा आवाज काढला जाई, का, तर प्रेक्षकांना हे सगळं नाटक आहे, याचा फक्त भावनिक पातळीवर विचार करु नका, वैचारिक पातळीवरुन करा याची जाणीव करुन देण्यासाठी. ‘रसभंग’ वगैरे कल्पनांना येथे स्थान नाही, कारण मुळात प्रेक्षकाला नाटकात आस्वादक असे गुंतू द्यायचेच नाही. ‘समीक्षक’ या भूमिकेत माणूस शिरला की त्याला रसग्रहणापेक्षा चिरफाडीतच अधिक रस कसा वाटू लागतो याचे हे उदाहरण आहे, असे मला वाटते.
‘गजरा’ या दूरदर्शवरील कार्यक्रमांतून अनेक मराठी कलाकारांना ‘ब्रेक’ मिळाला आहे. त्याबद्दल दूरदर्शनचे आपण कायम आभार मानले पाहिजेत. ‘गजरा’ मध्ये प्रभवळकरांना या माध्यमात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तिचे सोने केले. ‘गजरा’ मध्ये काम करत करत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरवात झाली असावी. ‘पंचवीस एके पंचवीस’सारखी ‘बेस्ट ऑफ गजरा’ मध्ये समाविष्ट केलेली नाटिका दुसर्या कर्यक्रमासाठी टेप उपलब्द्ध नाही म्हणून पुसली जाते हे वाचून वैषम्यही वाटते.
त्यानंतरचा प्रभावळकरांचा मोठा पल्ला म्हणजे चिमणराव. प्रभावळकरांनी चिमणराव जिवंत केला, घराघरात नेला हे त्यांचे कर्तृत्व आहेच, पण ते चिमणरावात गुंतून पडले नाहीत, हे त्याहूनही मोठे कर्तृत्व आहे असे मला वाटते.’चिमणराव’ मालिका यशस्वी झाली पण तो चित्रपट चालला नाही याचे आपल्याला खूप वाईट वाटले असे प्रभावळकर लिहितात. पण त्या निमित्ताने त्यांना चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला हे एक बरे झाले. चिमणरावांच्या प्रतिमेतून बाहेर पडणे हे त्या वेळी प्रभावळकरांसमोरचे मोठेच आव्हान असले पाहिजे. ‘एक डाव भुताचा’ या प्रभावळकरांच्या पुढील – आणि खरे तर त्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाच्या- चित्रपटाच्या वेळी आपल्याला आलेले अनुभव, विशेषतः अशोक सराफ या अभिनेत्याबरोबर काम करताना आपल्याला अभिनेता आणि माणूस म्हणून त्याची जवळून झालेली ओळख याविषयी प्रभावळकरांनी मनापासून लिहिले आहे. आपली अशोक सराफ या अभिनेत्याविषयी मते काहीही असोत, पण नव्या मराठी माणसाला सांभाळून घेणारा, मदत करणारा मराठी माणूस हे -अगदी भूतकाळातले असले तरी- वाचायला बरे वाटते.
‘पळा पळा कोण पुढे पळतो तो’ या फार्ससंदर्भात प्रभावळकरांनी केलेले लिखाण मुळातून वाचावे असे आहे. एकतर बबन प्रभूंचा हा फार्स लेखन या दृष्टीकोनातून सगळ्यात अधिक जमलेला आहे. माझ्याकडे कुठेतरी त्याच्या संहितेचे जुनी, जीर्ण पुस्तक होते. ते वाचतानाही धोधो हसू फुटत असे. महामहोपाध्याय बिंदूमाधवशास्त्री , प्रमोदिनी, गागाचार्य, बन्सीधर, उकिडवे.. सगळी धमाल होती. एका वेळी पाच धोतर-पगडीवाल्यांची स्टेजवर पळापळ – त्यातही आत्माराम भेंडे, प्रभावळकर, भक्ती बर्वे ही कास्ट आणि भेंडेचं दिग्दर्शन यामुळे तो प्रकार भन्नाटच होत असणार यात शंका नाही.नटांच्या हातात नसलेल्या काही कारणांने हे प्रयोग बंद पडले असे प्रभावळकर म्हणतात तेंव्हा ते काय कारण असावे या भोचक कुतुहलापेक्षा काहीही असले तरी ते प्रयोग चालू रहायला पाहिजे होते असे वाटते.
‘झोपी गेलेला जागा झाला हे प्रभावळकरांचे त्यानंतरचे नाटक. ‘झोपी गेलेला जागा झाला’ चे गेल्या वर्षी ‘सुबक’ तर्फे पुनरुज्जीवन होऊन काही प्रयोग झाले होते. ‘झोपी…’ हा तसा त्या मानाने दुय्यम दर्जाचा फार्स. लेखनापेक्षा दिग्दर्शकाच्या आणि नटांच्या ‘इम्प्रूव्हायझेशन’ वर अधिक बेतलेला. ही पुढे मराठीतली पहिली प्रायोजित मालिका वगैरे झाली. दरम्यान प्रभावळकर नट म्हणून रंगभूमीवर आणि दूरदर्शनवर चांगलेच स्थिरावले होते. मराठी चित्रपटातही त्यांची वाटचाल सुरु होती. पण या माध्यमाबाबत, विशेषतः सुरवातीच्या काळात त्यांना मिळालेल्या मराठी चित्रपटांतील भूमिकांबाबत त्यांनी या पुस्तकात असमाधान व्यक्त केले आहे. ते बरोबरच आहे असे मला वाटते. अलका कुबलबरोबर नाचतानाचा त्यांचा एक फोटो या पुस्तकात आहे. त्याखाली ‘हे मी का करतोय?’ असं शीर्षक त्यांनी दिले आहे. ते अगदी योग्य वाटते. बेर्डे, पिळगावकर, कोठारे (आणि काही प्रमाणात अशोक सराफ) यांनी मराठी चित्रपटाला जे काही केले त्या अपराधाची तुलना एकता कपूरने खाजगी टीव्ही मालिकांना जे काही केले त्याच्याशीच होईल. त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही, वाड्यावरची धेंडे दोंद वाढवतात आणि माझ्या काशाचे पाय बाकी पांगळे होतात, आणि मोगरा मात्र फुलतच राहातो…त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही.. असो. प्रभावळकर या सगळ्यात खेचले गेले हे त्यांचे नशीब. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले हे आपले नशीब.’माझे सुदैव असे की मी त्यांची सून झाले, पण त्याहूनही मोठे सुदैव असे की मी त्यांची बायको झाले नाही’ प्रमाणे! याचे कारण असे की या माध्यमातूनच प्रभावळकरांनी पुढे ‘चौकट राजा’, ‘रात्र आरंभ’ असे परफॉर्मन्सेस दिले. पण ती पुढची गोष्ट झाली.
‘वासूची सासू’ हा प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातला पुढचा आणि महत्वाचा टप्पा. या पुस्तकात दिलेला दाराच्या चौकटीला रेलून उभ्या राहिलेल्या या सासूचा फोटो (एक चौकटीवरचा पुरुषी हात सोडला तर) ‘मारु’ दिसतो. एकूण हा सासूचा प्रयोग भन्नाटच होता. अरुण नलावडे, अतुल परचुरे (थोडाफार सुसह्य अविनाश खर्शीकरही) आणि दोन अफलातून भूमिकांत प्रभावळकर. बेरकी अण्णा नंतरनंतर सासूची भूमिका ‘एन्जॉय’ करायला लागतात तेंव्हाच्या गोंधळाला तर तोड नाही. ते चंद्रनमस्कार, ते लाडीक ‘शीतल, शीतल..’ ‘फार त्रास झाला हो हिच्या वेळेला’ वगैरे. या सगळ्या प्रकारात आपण जे करतो आहे ते यशस्वी होतं आहे हे कळाल्यानंतर नटाचं भान सुटणं अगदी शक्य असतं, पण आपलं ते सुटलं नाही असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. ते अगदी पटण्यासारखं वाटतं.
प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातले पुढचे महत्वाचे टप्पे म्हणजे ‘एक झुंज वार्याशी’, ‘नातीगोती’ , ‘एक हट्टी मुलगी’ आणि ‘घर तीघांचं हवं’ मधल्या त्यांच्या भूमिका. (तीघांचं मधली ‘ती’ हा उच्चारानुसार दीर्घ आहे, मग ती तिखटातल्या ‘ति’ सारखी र्हस्व का लिहिली जाते? पण ते असो.) \’एक झुंज वार्याशी’ हे पु.लंनी अवघ्या चार दिवसांत रुपांतरीत केलेलं आणि वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक आणि त्यातली सामान्य माणूस ही भूमिका हे मोठं आव्हान होतं आणि त्या प्रयोगाचा गंभीर ताण यायचा असं प्रभावळकर लिहितात. या नाटकादरम्यानची एक महत्वाची आठवण प्रभावळकरांनी लिहिली आहे. या नाटकात ‘सद सद् विवेकबुद्धी हा शब्द बर्याच वेळा येतो. बरेच लोक हा शब्द सत् सत् विवेकबुद्धी असा उच्चारतात.( हे दोन्ही शब्द सलग, पूर्ण असे वाचावेत) या नाटकाच्या प्रयोगाच्या तालमीदरम्यान मुद्दाम येणारे डॉ. अशोक रानडे यांनी नटांना हा शब्द कसा म्हणायचा – पहिला ‘द’ पूर्ण, दुसरा अर्धा हे मुद्दाम शिकवलं, आणि ते नाटकात काटेकोरपणे पाळलं गेलं. भाषाशुचितेचा हा आग्रह ‘केल्या गेली आहे.’ च्या जमान्यात मला फार निर्मळ वाटतो.
जवळजवळ वीस वर्षे अभिनय करुनही ‘एक झुंज वार्याशी’ या नाटकातून बरंच शिकायला मिळालं, फक्त आपली शिकायची तयारी हवी असं प्रभावळकर लिहितात तेंव्हा तर ते एका यशस्वी कलाकाराचं सूत्रच सांगून जातात असं वाटतं.
‘नातीगोती’ हेही गंभीर प्रकृतीचं नाटक. त्यातला काटदरे साकारताना आपण आपल्याला त्यात गुंतू दिलं नाही, त्यातला मतिमंद बच्चू गेल्यानंतर दोन्ही हातांनी तोंड झाकून ओक्साबोक्सी रडताना हाताच्या आड बाकी आपला चेहरा कोरा रहात असे असे प्रभावळकर लिहितात. कदाचित ‘एलिनेशन थिअरी’ चा त्यांच्यावरील प्रभाव तोवर कायम असेल. किंवा कदाचित हेच कलाकाराचं खरं कौशल्य असेल. त्यामुळे ‘नातीगोती’ मधले काटदरे बघताना प्रेक्षकांना त्रास होत असे, पण ते साकारताना आपल्याला अजिबात त्रास होत नसे, असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. ‘नातीगोती’ च्या प्रयोगादरम्यान जळगावच्या प्रेक्षकांनी प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांच्यामधील एका गंभीर प्रसंगात अश्लील शेरेबाजी केली आणि मग प्रभावळकरांना त्यांची काटदरेंची भूमिका सोडून त्या प्रेक्षकांना खड्या आवाजात कसं सुनवावं लागलं त्याची एक आठवण या पुस्तकात आहे. गावात बदल, बाकी अशी एखादी आठवण प्रत्येक अभिनेता-अभिनेत्रीच्या पुस्तकात असतेच. पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी एका लहान खेड्यात गणपत पाटलांच्या नाट्यप्रयोगाला त्या खेड्यातल्या भाबड्या, गोजिर्या, निरागस प्रेक्षकांनी हाच प्रकार केला होता, त्यावेळी मी तिथे होतो. गणपत पाटलांनी शेवटी मग आपला ‘नाच्या’ चा आवाज सोडून एकदम कणखर आवाज लावला होता. प्रेक्षक चरकले होते. पंचवीसेक वर्षांपूर्वी ‘भरत’ मध्ये अभिनेते राजशेखर यांना हाच प्रकार करावा लागला होता आणि विक्रम गोखलेंनी प्रयोगादरम्यान (प्रयोगाआधी आवाहन करुनही) कुणा एका ‘रसिका’चा मोबाईल फोन वाजू लागला तेंव्हा स्वतःच्याच थोबाडीत मारुन घेतली होती… असे प्रसंग हा प्रकार वाचताना आठवले. गंधर्वांच्या शालूंचं आणि थिरकवासाहेबांच्या तबल्याचं माहेरकौतुक असलेल्या रसिक, सहृदय मराठी प्रेक्षकाचा हा एक हिडीस, थिल्लर चेहरा प्रत्येक नटाने आणि कलाकृती बघण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक रसिकाने ध्यानात ठेवला पाहिजे, असे माझे मत आहे.
‘एक हट्टी मुलगी’ मधला इरसाल तात्या, ‘घर तीघांचं हवं’ मधला व्यसनी डीएन आणि ‘कलम ३०२’ मधील दुहेरी भूमिका – प्रभावळकरांच्या या भूमिका पहायला हव्या होत्या असे वाटते. पुढे ‘संध्याछाया’, ‘जावई माझा भला’ वगैरे नाटकांपर्यंत त्यांच्यातल्या प्रयोगशील अभिनेत्यावर त्यांच्यातल्या व्यावसायिक कलाकाराने मात केलेली असावी असेही वाटते. पण एकंदरीत या पुस्तकातील प्रभावळकर या अभिनेत्याचा नाट्यप्रवास- आणि प्रभावळकरांनी त्याचे केलेले शब्दांकन – हे दोन्हीही आपापल्या गुणामुळे वाचनीय झालेले आहेत.
‘हसवाफसवी’ आणि ‘बटाट्याची चाळ’ या दोन प्रयोगांच्या उल्लेखाशिवाय प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासाचे वर्णन पूर्ण होऊच शकणार नाही. ‘हसवाफसवी’ हा एक वेगळा, प्रसन्न प्रयोग होता. ‘बॉबी मॉड’ सोडला तर त्यातले काहीही कृत्रीम, चिकटवलेले वाटत नाही. कृष्णराव हेरंबकर अगदी त्यांच्या शेवटच्या ‘चिंतना’ सकट अस्सल वाटतात. (तेच काहीसे विकसित स्वरुपात गंगाधर टिपरे म्हणून नंतर दूरदर्शनवर आले) दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबाची आपल्या मुलीशी बोलतानाची जी आफ्रिकन म्हणून भाषा आहे तिच्यात स्वाहिली आणि पोर्तुगीज भाषेतले काही शब्द आपण वापरले तर प्रिन्स वांटुंग पिन् पिन् च्या भाषेत काही जपानी शब्द वापरले असे प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. प्रेक्षकांना जे स्टेजवर किंवा पडद्यावर दिसतं त्यामागे विचार करणार्या कलाकाराचा किती अभ्यास असतो, किती मेहनत असते, हे यावरुन ध्यानात येतं. पण ‘हसवाफसवी’ त खरा बाजी मारुन जातो तो अष्टवक्र नाना पुंजे. गेंगाण्या आवाजात वाकडीतिकडी पावले टाकत अत्यंत आगाऊपणे बोलणारा हा नाना कोंबडीवाला अतिशय लोकप्रिय झाला होता. एकूणच ‘हसवाफसवी’ यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाले होते. त्याचे ७५० प्रयोग झाल्यावर प्रभावळकरांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. कलाकाराकडे फक्त व्यावसायिक दृष्टीकोन असून चालत नाही, त्याला सतत आपल्यातल्या कलाकाराची वाढ चालू ठेवावी लागते – हे सगळं लिहायला-वाचायला ठीक आहे, पण यासाठी खरोखर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली की बरेच लोक कच खातात. प्रभावळकरांनी तसे केले नाही, हे फार बरे झाले.
‘बटाट्याची चाळ’ हे अर्थातच प्रभावळकरांना (आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींना) एक वेगळं आव्हान असलं पाहिजे. त्याच्या प्रयोगांत ‘पुलं’ आणायचे नाहीत, पण मूळ कलाकृतीला विटाही लावायच्या नाहीत असली काहीतरी कोंडी या दोघांची झाली असली पाहिजे. पुलंची ‘चाळ’ मी पाहिलेली नाही, पण प्रभावळकरांची चाळ बघताना मला हाच नट हे आव्हान पेलू शकतो असं जाणवलं होतं. चाळीमधलं ‘चिंतन’ सादर करताना त्यात ‘गंगाधर टिपरे’ डोकावतील की काय या शंकेने आपण ‘कॉन्शस’ झालो होतो असं प्रभावळकरांनी लिहिलं आहे. कलाकाराला आपल्या भूमिकांचं ‘बेअरिंग’ सांभाळताना आवश्यक असणार्या या एका वेगळ्या कौशल्याची जाणीव या लिखाणातून होते.
‘वा गुरु!’ या प्रभावळकरांच्या अगदी अलीकडच्या नाटकाविषयी प्रभावळकर मोजके लिहितात. यातील सप्रेसरांच्या भूमिकेचा अजून शोध सुरु आहे असे ते म्हणतात.
दूरदर्शनवरील प्रभावळकरांच्या काही प्रयोगांबाबत मी वर लिहिले आहे. त्यानंतर खाजगी वाहिन्या सुरु झाल्यावर आलेली ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका मराठीतल्या काही सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक ठरावी. ‘लोकप्रिय आहे ते ते सगळे थिल्लर असते’ या प्रमेयाला छेद देणारी ही मालिका. त्यातले आबा आपल्याला फार लवकर सापडले असे प्रभावळकर लिहितात. या मालिकेतले शिर्याचे -म्हणजे आबांच्या नातावाचे आणि आबांचे प्रसंग लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीन्ही दृष्टीकोनांतून सरस ठरले आहेत. प्रभावळकरांनी त्यांच्या आबा या भूमिकेविषयी फार सुरेख लिहिलं आहे. बर्याच लोकांना ठाऊक नसणारी आणि काही लोकांच्या विस्मरणात गेलेली ‘साळसूद’ या मालिकेतील प्रभावळकरांची ‘भार्गव’ ही खलभूमिका मला हे पुस्तका वाचताना आठवली आणि फार बरे वाटले. या सगळ्या मालिका, हे नाट्यप्रयोग पुन्हा एकदा पहावेसे वाटले.
शेवटी प्रभावळकरांच्या चित्रपटातील भूमिकांविषयी अगदी थोडे. अगदी अनपेक्षितपणे साकारावा लागलेला ( आणि म्हणून तयारीला अगदी वेळ न मिळालेला) ‘चौकट राजा’ मधला नंदू, ‘एन्काऊंटर-दी किलिंग’ मधला पुनाप्पा, ‘रात्र आरंभ’ मधले ठोंबरे, ‘कथा दोन गणपतरावांची’ मधले गणपतराव तुरे-पाटील, ‘मुन्नाभाई’ मधले गांधी आणि ‘सरकार राज’ मधले रावसाहेब या प्रभावळकरांच्या काही उल्लेखनीय भूमिका. विस्तारभयास्तव या भूमिकांबद्दल फार लिहीत नाही (आणि खुद्द प्रभावळकरांनीही आपल्या चित्रपटांतील भूमिकांबद्दल तसे कमीच लिहिले आहे. डॉ. लागूंनी ‘लमाण’ मध्ये असेच केले आहे. मुळात नाटकाची आवड असलेल्या कलाकाराला सिनेमा हे माध्यम फारसे आकर्षित करणारे वाटत नसावे!), पण ‘रात्र आरंभ’ हा चित्रपट ज्यांनी बघीतला नाही त्यांनी तो आवर्जून आणि शक्य तितक्या लवकर बघावा असे बाकी मला आवर्जून लिहावेसे वाटते.
‘सरकार राज’ रिलीज झाला त्या दिवसाची गोष्ट. रांगेत उभे राहून रात्रीच्या खेळाची तिकिटे काढली होती. सोबत एक असाच अमिताभ बच्चनचा ‘डाय हार्ड’ फॅन होता. सिनेमा सुरु झाला. बच्चन पितापुत्र रावसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला जातात असा प्रसंग होता. झोपाळ्यावर पाठमोरे बसलेले रावसाहेब आणि त्यांना वाकून नमस्कार करणारे बच्चन पितापुत्र असा तो प्रसंग. रावसाहेबांचा चेहरा आधी दिसत नाही. कॅमेरा हळूहळू वर येतो आणि मग फेटा बांधलेले, वृद्ध रावसाहेब आशीर्वाद देताना दिसतात. प्रभावळकरांचा चेहरा दिसल्यावर माझा बच्चनप्रेमी मित्र उत्स्फूर्तपणे म्हणाला, “हां… हे ठीक.हे ठीक. मला वाटलं साहेबांना कुणा ऐर्यागैर्यासमोर वाकायला लावतात काय…” या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याचे आठ रिटेक्स झाले आणि पर्यायाने बच्चनद्वयींना आठ वेळा प्रभावळकरांना वाकून नमस्कार करावा लागला. ‘पोएटिक जस्टिस’ यालाच म्हणतात की काय, कुणास ठाऊक!
काही असो, हे पुस्तक मला आवडले. आत्मचरित्रांचा सुकाळ झालेला असताना प्रभावळकरांनी ज्या संयमाने आणि खोल विचार करुन हे पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर प्रभावळकरांचा मी अधिकच मोठा प्रशंसक, चाहता झालो आहे असे मला वाटते. आनंद आहे.
एका खेळियाने
दिलीप प्रभावळकर
अक्षर प्रकाशन
सुधारित आवृत्ती, मे २०११, किंमत ३५० रुपये.
एका खेळियाने
ती
तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला.
“हॅलो, कोण बोलतंय?….” ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा लांब न्यावा लागला. आवाज एकदम खणखणीत. भाषेला थोडासा हेल . थोडासा कोल्हापुरी, थोडासा अमराठीही.
“हॅलो… बाबा…. आहेत का?” मी चाचरत विचारले.
“ह्हो…” पुन्हा तसाच ठसकेबाज आवाज.”बाबा, तुझा फोन आहे.”
मग मी तिच्या वडीलांशी वगैरे बोललो. नंतर लवकरच त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी तिला पहिल्यांदा बघीतले. तिच्याकडे बघताना अगदी प्रथम जाणवला आला तो तिच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास. सहा-सात वर्षे वय, लहानसर चण, गोरा म्हणता येईल असा वर्ण, सोनेरी छटा असलेले मोकळे सोडलेले सुळसुळीत केस, पांढरेशुभ्र, लहानसे, एकसारखे रेखीव दात, चमकदार भिरभिरते डोळे आणि चेहर्यावर आत्मविश्वास. नुकतेच सगळे जग जिंकले आहे असा आत्मविश्वास. ही मुलगी मला प्रथमदर्शनीच आवडून गेली.
“ये इकडे” मी तिला जवळ बोलावले. या वयाच्या मुली साधारण असे कुणी जवळ बोलावले की लाज लाज लाजतात. आपल्या आई बाबांच्या अंगावर लोळण घेतात , पळून जातात आणि काही म्हणजे काही केले तरी जवळ येत नाहीत. इथे या मुलीने पहिला धक्का दिला. ती चक्क माझ्या व माझ्या पत्नीच्या शेजारी येऊन बसली. नावगाव विचारले तर तिने ते अगदी स्पष्ट शब्दांत न लाजता सांगितले आणि मी तिला देऊ केलेले चॉकलेट माझ्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतले. मी हसलो. “राहतेस का आमच्याबरोबर इथेच हॉटेलात?” मी तिला विचारले. “च्क्क…” ती म्हणाली. “माझी मॅथ्सची टेस्ट आहे उद्या..” मग बघता बघता तिच्याशी गट्टी जमली. तिने मग तिच्या वर्गातील सगळ्या मुला-मुलींची एक ते एकोणचाळीस अशा वर्गक्रमांकानुसार नावे म्हणून दाखवली (हे या वयातल्या मुला-मुलींच्या लक्षात कसे राहाते कुणास ठाऊक!), मांडीवर उलटा-सुलटा हात आपटत ती शिकत असलेल्या कर्नाटक संगीतातले एक गाणे म्हणून दाखवले (तिचे वडील मागून ‘आता पुरे… हं, आता बास…अशा खाणाखुणा करत होते!), माझ्या मुलाचा मोबाईल फोन हातात घेऊन त्यातल्या कायकाय गंमतीजंमती बघीतल्या आणि उरलेला वेळ कधी एका पायावर तर कधी दोन्ही पायावर नाचत मस्त धुडगूस घातला.
मग एकदोन दिवसांत आम्हाला त्यांच्या घरी एक दिवस राहायला जायचा योग आला. तो दिवसभर ही मुलगी भिंगरीसारखी भिरभिरत होती. दुपारच्या जड जेवणानंतर तिने कुणाच्या डोळ्याला डोळाही लागू दिला नाही. सतत तिची काही ना काही बडबड, कधी आपली चित्रे दाखवणे, आपल्या शाळेबद्दल काही सांगणे असे काहीकाही सुरु होते. दुपारी आम्ही बाहेर गेलो. गाडीत जरा गर्दी होत होती, म्हणून मी तिला पुढच्या सीटवर माझ्याजवळ बोलावले. माझ्या मांडीवर बसून ती मला त्या शहरातल्या वेगवेगळ्या जागांविषयी, ठिकाणांविषयी सांगत होती. तिची स्कूल बस कुठे येते, किती वाजता येते, शाळेत पहिली सुट्टी किती वाजता होते, मग लंच ब्रेकमध्ये ती डब्यातून नेलेले कायकाय खाते हे सगळे सगळे तिने सांगून घेतले. मध्येच गाडी पार्क करताना गाडीच्या मागच्या बाजूला एक कुत्रे आले तर ती अस्सल कोल्हापुरी हेल काढून म्हणाली,”कुत्रं मरतंय आता..” आणि पुन्हा खळखळून हसली. मला हसू आवरेना. महाराष्ट्राबाहेर जन्मलेली, वाढलेली ही एवढीएवढी मुलगी – घर सोडले तर आसपास मराठी बोलणारेही कुणी नसावे- तिच्यात हे कृष्णेचे-पंचगंगेचे पाणी कुठून आले? कॉलेजात असताना शिकलेल्या जेनेटिक्स या विषयाला परत एकदा सलाम करावासा वाटला.
त्याच दिवशी आम्हाला परत यायला निघायचे होते. आमच्या त्या स्नेह्यांच्या पत्नीने त्या मुलीच्या हातात आम्हाला देण्यासाठी काही भेटवस्तू दिल्या. त्या मुलीने मग “दादा , हे तुला, काकू, हे तुला..” असे म्हणून त्या आमच्या हातात दिल्या. त्या कुटुंबाच्या आदरातिथ्याने आधीच संकोचलेलो आम्ही अधिकच संकोचलो. “आवडलं का तुम्हाला?” त्या मुलीने धीटपणे आम्हाला विचारले. तिला तिच्या आईने तसे विचारायला सांगितले असावे.
त्या छोट्या मुलीला मी जवळ घेतले. “हो, खूप खूप आवडलं” मी म्हणालो. “पण सगळ्यात जास्त आम्हाला तू आवडलीस…”
आमचे स्नेही आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला येणार होते. त्या मुलीला व तिच्या आईला वेगळीकडे जायचे होते. त्या दोघींना रिक्षा स्टँडवर सोडून आम्ही पुढे निघालो तेंव्हा तिच्या आईबरोबर तिनेही तिचा छोटासा पंजा हलवून आम्हाला निरोप दिला. रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात तिचे सुळसुळीत केस चमकत होते आणि तिच्या लहानशा चेहर्यावर तेच आत्मविश्वासपूर्ण हसू होते.
सुनीताबाई
सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त. ’पु.लं च्या प्रतिभेमागची खरी शक्ती’ इथपासून ते ’पु.लंच्या दारातलं कुत्रं’ इथपर्यंत विविध विशेषणे सुनीताबाईंना लावली गेली. गंमत म्हणजे यातली बरीचशी त्यांच्या कानावरही गेलेली होती. पु.लंच्या एकूण बहुरुपी व्यक्तिमत्वापुढे सुनीताबाईंची प्रतिमा (आणि प्रतिभा) काळवंडलेली, झाकोळल्यासारखीच राहिली असे खूप लोकांचे –अगदी खुद्द – पुलंचेही मत होते. ’आहे मनोहर तरी..’ नंतर तर त्यात भरच पडली. ’आहे मनोहर तरी…’ चे जसे कौतुक झाले तशी त्यावर सडकून टीकाही झाली. कितीतरी (भाबड्या) लोकांना हा सुनीताबाईंनी हेतुपुरस्सर केलेला मूर्तीभंजनाचा प्रकार वाटला. दरम्यान पुलंना महाराष्ट्रातील रसिकांनी आपले दैवत वगैरे बनवून टाकलेले होतेच. लेखन, संगीत, दिग्दर्शन, अभिनय अशा अनेक कलाक्षेत्रांत लीलया संचार करणारा हा माणूस चार भिंतींच्या आत तुमच्याआमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, एक टिपिकल नवरा आहे – किंवा कुठलाही माणूस, नवरा तसाच असतो- हे काहीसे कटु सत्य वाचकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम ’आहे मनोहर तरी..’ ने केले. सामान्य वाचकांच्या त्या पुस्तकावर उड्या पडल्या त्या पुलं आणि सुनीताबाई यांच्या खाजगी जीवनाबद्दल त्यांच्या मनात असलेल्या कुतुहलामुळेच. ’आहे मनोहर तरी…’ या पुस्तकात इतर बरेच काही आहे, पण त्यातून लक्षात राहिला तो म्हणजे सुनीताबाईंनी पुलंच्या आयुष्यात आणलेला व्यवहारीपणा, त्याला लावलेली शिस्त आणि त्यामुळे पुलंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात पडलेला फरक.
पुढे जी.ए.कुलकर्णी यांनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रांचा एक मोठा खंड, सुनीताबाईंनी जी.एंना लिहिलेल्या पत्रांचे ’प्रिय जी.ए.’ हे पुस्तक, त्याशिवाय सुनीताबाईंनी स्वतंत्रपणे लिहिलेली ’सोयरे सकळ’, ’मण्यांची माळ’, ’समांतर जीवन’ ही पुस्तके प्रकाशित झाली. यांतून सुनीताबाईंची एक स्वतंत्र, स्वयंप्रकाशी प्रतिमा वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी राहात गेली. मंगला गोडबोल्यांनी लिहिलेले व अरुणा ढेरे यांच्या एका स्वतंत्र लेखाचा समावेश असलेले, सुनीताबाईंच्या मृत्यूनंतर एका वर्षाने प्रसिद्ध झालेले ’सुनीताबाई’ हे पुस्तक नुकतेच माझ्या संग्रहात आले आहे.
मंगला गोडबोले या काही माझ्या फार आवडीच्या लेखिका आहेत असे म्हणता येणार नाही. त्यांची विनोदी पुस्तके एका विवक्षित वर्गात कितीही लो्कप्रिय झालेली असली तरी ’बडीशेप चघळताना वाचायची पुस्तके’ यापलीकडे त्यांचे फारसे अस्तित्व नाही असे माझे मत आहे. एकूणात चिंचाआवळी भाबडेपणा हाच त्यांच्या पुस्तकांचा स्थायीभाव आहे. त्यातल्या त्यात पु.ल.देशपांड्यांबद्दल लिहिताना तर मंगलाबाई देवघरात निरांजन लावून हातात मीठमोहर्या घेऊनच लिहायला बसत असल्यासारख्या वाटतात. असो. या पुस्तकात हा भाबडेपणा त्यांनी टाळला आहे असे त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, पण सुनीताबाईंशी अत्यंत मोजका परिचय असताना त्यांनी सुनीताबाईंचे इतके तपशीलवार चरित्र लिहिणे हे म्हणजे भास्करबुवा बखल्यांना एकदाही न पहाता किंवा त्यांची एकही रेकॉर्ड न ऐकता त्यांच्या गायकीविषयी पुलंनी लिहिलेल्या लेखाइतके विचित्र वाटते. पण हा एक दोष सोडला तर मंगलाबाईंनी हे पुस्तक लिहून एक फार दांडगे काम केले आहे.
The borderline between genius and insanity is very thin असे म्हणतात. अलौकिक प्रतिभा आणि वैयक्तिक आयुष्यातले यश, त्यातली शिस्त असा एकत्र मिलाफ क्वचितच बघायला मिळतो. नित्यनूतननिर्मितीचा वर आणि विस्कटलेल्या आयुष्याचा शाप हेच बहुदा एकत्र नांदताना दिसतात. पुलंची एकूण वृत्ती आणि संस्कारांतून त्यांची झालेली जडणघडण यातून एरवी त्यांचे आयुष्य काही उधळले गेले असते असे वाटत नाही, पण ते इतके सार्थ झाले असते असेही नाही. अर्थात अमुक झाले असते तर, तमुक झाले असते तर अशा कल्पनांना काही अर्थ नाही, पण व्यवस्थितपणा, व्यवहारीपणा, गोष्टी वेळच्या वेळी करणे, लक्षात ठेऊन करणे हे अपला स्वभावातच नाही याची जाहीर कबुली पुलंनी दिलेली आहे. सुनीताबाईंनी पुलंच्या जीवनातला हा सगळा व्यवहार काटेकोरपणे सांभाळला. सुनीताबाईंना ओळखणार्या लोकांना त्यांच्या परवानगीशिवाय पुलंचे दर्शनसुद्धा कसे अशक्य होते याची कल्पना आहे. सुनीताबाई या स्वत: अत्यंत तत्वनिष्ठ, आदर्शवादी आणि कणखर स्वभावाच्या होत्या. याउलट पुलंचा स्वभाव काहीसा घळ्या म्हणता येईल असा. पुलंच्या या स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेणे हे एकदा सोडून अनेकदा झाले. (’गुळाचा गणपती’ चे उदाहरण सर्वश्रुतच आहे) त्यामुळे पुलंमधली सर्जनशीलता जपायची असेल आणि त्यांच्या हातून अधिकाधिक नवनिर्मिती व्हायची असेल तर त्यांच्यावर आणि त्यापेक्षा अधिक त्यांच्या चाहत्यांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे असे सुनीताबाईंना वाटले असावे. हा अंकुश ठेवणे म्हणजे तरी काय? तर त्यांच्या लेखना-वाचनाच्या वेळा सांभाळणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांच्या नाट्यप्रयोगांची, पुस्तकांच्या आवृत्यांची, काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची, प्रवासाची व्यवस्था बघणे आणि यापलीकडे जाऊन पु.ल.देशपांडे फाऊंडेशन चे सतत विस्तारत जाणारे काम बघणे. ही नुसती यादी बघीतली – आणि तशी ती फारच अपूर्ण आहे- तरी सुनीताबाईंच्या कामाची व्याप्ती ध्यानात येते.
हे सगळे सुनीताबाईंनी आनंदाने, प्रेमाने केले. पुलंच्या आयुष्यात विलक्षण उंची गाठून गेलेले काही क्षण केवळ सुनीताबाईंच्या आग्रहामुळे, काही वेळा अट्टाहासामुळे आले. मग ते कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम करणे असो नाहीतर आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या सरकारस्थापनेच्या गौरवसभेत जाहीर भाषण करण्याला नकार देणे असो. पुलंच्या एका नाट्यप्रयोगाचे पन्नास प्रयोग झाले की त्यांनी दुसरा प्रयोग लिहायला घ्यायचा या सुनीताबाईंच्या आग्रहामुळेच पुलंकडून इतके विपुल लिखाण लिहून झाले हे अगदी सुनीताबाईंच्या टीकाकारांनाही नाकारता येणार नाही. याशिवाय ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीच्या सुनीताबाईंनी जे जे करायचे ते उत्तमच झाले पाहिजे असा सतत आग्रह धरला. म्हणूनच पुलंचे लिखाण, त्यांचे नाट्यप्रयोग, कवितावाचन आणि मुख्य म्हणजे पु.ल. देशपांडे फाऊंडेशनचे सामाजिक कार्य इतके चोख, निर्दोष आणि देखणे झाले. आपले काम उत्तमच असावे, असे प्रत्येकालाच वाटते, पण त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेण्याची किती लोकांची तयारी असते? अशी मेहनत सुनीताबाईंनी आयुष्यभर घेतली. मग ते पुलंनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे मुद्रणशोधन असो की पुलंच्या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान क्षणभर विंगेत येणाया पुलंसाठी हातात घोटभर पाण्याचा ग्लास घेऊन उभे राहाणे असो. पुलंच्या प्रयोगांची तिकिटविक्री, ध्वनिक्षेपण यंत्रणा, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था, कलाकारांची येण्याजाण्याची व्यवस्था, त्यांना देण्यात येणारे मानधन यात कुठेही चूक होता कामा नये यासाठीच सुनीताबाईंनी अत्यंत चोख आणि अथक प्रयत्न केले. Behind every successful man there is a woman हे म्हणायला ठीक आहे, पण सुनीताबाईंनी ते आपल्या कणखरपणाने सिद्ध करुन दाखवले.
सुनीताबाईंच्या या कणखरपणाची कितीतरी उदाहरणे या पुस्तकात आहेत. त्यातली बरीचशी वाचताना ’हे जरा जास्तच होते आहे की काय?’ असे वाटते. काही प्रसंग बाकी माणसात इतके आंतरिक बळ येते तरी कुठून असा प्रश्न पडावा असे आहेत. मालेगावच्या महात्मा गांधी विद्यालयचा बोजवारा उडाल्यावर आणि भाऊसाहेब हिरे आणि शंकरराव देव कितीही आदर्शवादी असले तरी मखरात बसलेले मातीच्या पायांचे देव आहेत हे ध्यानात आल्यावर सुनीताबाईंनी त्यांच्या फटकळ स्वभावानुसार तडकाफडकी राजिनामा दिला. मालेगावातल्या गैरव्यवहाराची कबुली देणारी आणि त्याबद्दल माफी मागणारी भाऊसाहेब हिर्यांची पत्रे सुनीताबाईंकडे आहेत हे कळाल्यावर त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न आचार्य अत्र्यांनी केला. ती पत्रे मिळवण्यासाठी अत्र्यांनी विनवण्या, पैशाची लालूच दाखवणे आणि नंतर चक्क दमदाटी असले प्रकार केले, पण सुनीताबाई मुळीच बधल्या नाहीत. अत्रे हे त्या काळात फार मोठे प्रकरण होते. त्यांच्यासमोर त्या तुलनेने सर्वार्थाने अगदी लहान असलेल्या सुनीताबाईंचा हा कणखरपणा थक्क करुन टाकणारा आहे. असा खंबीरपणा त्यांनी आयुष्यात बर्याच वेळा दाखवला. पुलंच्या प्रत्येक नाट्यप्रयोगाची रॉयल्टी मिळण्याबाबत असो, की पु.ल देशपांडे फाऊंडेशनचा चोख व्यवहार सांभाळण्याबाबत असो, सुनीताबाईंनी कधीही तडजोड केली नाही.
या पुस्तकाच्या निमित्ताने संसारात नवराबायकोने एकमेकांवर किती अधिकार गाजवावा असा एक प्रश्न वाचकाच्या मनात येतो. खुद्द सुनीताबाईंनाही पुलंच्या हयातीत (आणि विशेषत: पुलंच्या निधनानंतर) ’आपण जरा जास्तच केले की काय?’ अशी टोचणी लागली होती. ’मी त्याचा गिनिपिग तर केला नाही ना?’ असा प्रश्न त्यांनी ’आहे मनोहर तरी..’ मध्ये स्वत:लाच विचारला आहे. सुनीताबाईंच्या या प्रचंड कष्टाळू, झपाटलेल्या आणि ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीचा अतिरेक होतो आहे की काय असे वाटावे असे काही उल्लेख या पुस्तकात आहेत. सुनीताबाईंच्या अतिचिकित्सक वृत्तीमुळे पुलंचे, एकूण मराठी साहित्यविश्वाचे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा आणि पुलं यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्या असंख्य रसिकांचे नुकसान झाले की काय असे वाटावे असेच हे उल्लेख आहेत. परदेशात लेखकाच्या निधनानंतर त्याला आलेली (आणि बहुतेक वेळा त्याने इतरांना लिहिलेली) पत्रे प्रकाशित करण्याची पद्धत आहे. मराठीत ’जीएंची निवडक पत्रे’ चे चार खंड आणि ’प्रिय जी.ए., सप्रेम नमस्कार’ यांचे ढळढळीत उदाहरण आहे. पुलंच्या मृत्यूनंतर पुलंना आलेली मान्यवर लोकांची सुमारे अडीच हजार पत्रे प्रकाशित करावी, त्यातून समाजाच्या त्या काळातल्या जडणघडणीवर काही प्रकाश पडावा अशी योजना पुढे आली होती. पण पत्रावर प्रताधिकार कुणाचा – पत्र पाठवणार्याचा की पत्र ज्याला पाठवलं त्याचा यावर सुनीताबाईंनी इतका खल केला की शेवटी ती योजनाच बारगळली. कदाचित त्यांना आधी आलेल्या एकदोन कटु अनुभवांमुळे असेल, पण ’पुस्तक छापून आल्यावर एकाही पत्रलेखकानं आक्षेप घेतलेला मला चालणार नाही’ अशी भूमिका सुनीताबाईंनी घेतली. त्यांच्या या अलवचिक धोरणामुळे यातलं एकही पत्र आजवर प्रकाशित होऊ शकलेलं नाही. काही गोष्टी वेळच्या वेळी होण्यात गंमत असते. आता तर पुलं जाऊनही अकरा वर्षे होऊन गेली. आता अशी पत्रे प्रकाशित झाली तरी पुलंना आणि त्यांच्या जबर्या लोकसंग्रहाला ओळखणारी पिढीच आता हळूहळू संपत चालली आहे. सुनीताबाईंनी त्यांची ताठर भूमिका किंचित शिथील केली असती तर हा अनमोल ठेवा रसिकांसमोर वेळेत आला असता. असेच काहीसे खुद्द पुलंनी लिहिलेल्या पत्रांबाबतही वाटते. पुलं स्वत: जबरे पत्रलेखक होते. पुलंच्या निधनानंतर ’पुलंची निवडक पत्रे’ काही प्रसिद्ध झाली नाहीत. जी.एंच्या पत्रांच्या प्रसिद्धीबाबबत पुढाकार घेणार्या सुनीताबाईंनी याबाबत असे का केले असावे?
पुलंच्या नाट्यप्रयोगांबाबतही असेच झालेले दिसते. ऐन बहरातल्या पुलंच्या नाट्यप्रयोगाचे चित्रीकरण सुनीताबाईंनी करु दिले नाही. चित्रीकरण करताना पुलं कॉन्शस होतील, प्रेक्षकांचा रसभंग होईल, या चित्रीकरणाचा पुढे दुरुपयोग होईल अशा सबबी पुढे करुन सुनीताबाईंनी पुलंच्या प्रयोगांचे चित्रीकरण करण्यास मनाई केली. यामागची निश्चित मानसिकता आजही ध्यानात येत नाही. पुलंच्या आज उपलब्द्ध असलेल्या चित्रफितींचा दर्जा अत्यंत सामान्य आहे. याहून उत्तम दर्जाचे चित्रीकरण करुन पुलंचे हे असामान्य प्रयोग अजरामर करुन ठेवता आले असते. सुनीताबाईंच्या या भूमिकेमागचे, त्यांना असे चित्रीकरण करण्यामागचे ऐतिहासिक महत्त्व त्यावेळी ध्यानात आले नसावे हे कारण आज पटत नाही. त्यांच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्तेच्या स्त्रीला रंगमंचावर घडणारे हे असले काही विलक्षण नाट्य अजरामर करुन ठेवण्याचे महत्त्व नक्की कळाले असणार. मग सुनीताबाईंनी हे चित्रीकरण का करु दिले नाही? यावर लेखिकेने सुचवलेले दुसरे कारण – या ना त्या प्रकारे आपला पुलंच्या प्रयोगावरच नव्हे तर आयुष्यावर वरचष्मा असावा असे सुनीताबाईंना वाटले असावे – हेच खरे असावे असे वाटते आणि मग ते कारण आपल्याला अस्वस्थ करुन जाते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना स्वत:लाही आपल्या या वर्तनाचा पश्चाताप झाला असावा असे दिसते आणि मग तर या वरकरणी एकमेकांना अत्यंत अनुरुप अशा जोडप्यामधला हा कळत नकळत जाणवणारा विसंवाद मनाला खिन्न करुन जातो. अगदी कोणतीही पुरुषी मानसिकता बाळगायची नाही असे ठरवले तरीही अशा प्रसंगी पुलंनी किती तडजोडी केल्या असतील, त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना येते आणि अशा कटुतेचे कोणतेही प्रतिसाद आपल्या वागण्यात, जगण्यात आणि लिखाणात उमटू न देणार्या त्या पुरुषोत्तमाविषयीचा आदर वाढीला लागतो.
’ललित’ मध्ये पुलंनी मासिक सदर लिहावं अशा प्रस्तावाला पुलं काहीसे अनुकूलच होते. पण सुनीताबाईंनी नाना शंका, प्रश्न उपस्थित करुन त्या प्रस्तावाला फाटे फोडले. शेवटी ते झाले नाहीच. हे करण्यामागचा सुनीताबाईंचा उद्देश कितीही पवित्र असला – की सदरलेखनात पुलंची प्रतिभा त्यांच्या मते ’वाया’ जाऊ नये – तरी त्यामुळे पुलंच्या लेखनाचा एक वेगळा आणि अनोळखी पैलू कायमचा अंधारात राहिला हे डोळ्यांआड करता येत नाही. माणसांमध्ये रमणार्या पुलंच्या लोकसंग्रहावर, लोकसंवादावर सुनीताबाईंनी मर्यादा आणल्या. यात पुलंसारख्या प्रतिभावंत कलाकाराचा वेळ वाया जाऊ नये हा सुनीताबाईंचा हेतू उदात्त असेलही; पण पुलंच्या वैयक्तिक आनंदाचे काय? नवनिर्मितीचे समाधान मिळावे म्हणून आपल्या वैयक्तिक खुषीचे असे किती क्षण पुलंना आपल्या मनाविरुद्ध कुर्बान करावे लागले असतील? पुलंच्या अवघ्या आयुष्याची ’योजना’ करणाया, त्यांच्या आयुष्याचेच व्यवस्थापन करणाया सुनीताबाई जेंव्हा पुलंच्या सन्मानार्थ दुसर्या कुणीतरी आयोजित केलेल्या मेजवानीचा ’मेनू’ ठरवू लागतात, ’भाईला हे आवडतं, हे त्याला सोसत नाही..’ असं सांगू लागतात आणि न राहावून ती मेजवानी आयोजित करणार्यांपैकी कुणीतरी धीर एकवटून त्यांना सांगतो की पुलंना आवडते ते त्यांना खाऊ घालणे हा आमचा आनंद आहे, तो कृपया आम्हाला मिळू द्या, त्यांना काय आवडतं, काय नाही हे त्यांना सांगू द्या तेंव्हा आपल्या कडक शिस्तीने पुलंच्या प्रतिभेला नवनवीन पालवी फुटू देणाया सुनीताबाईंची शिस्त ही तुरुंगातील, इस्पितळातील शिस्त वाटू लागते. पुलंविषयीच्या कणवेने मन भरुन येते. पण तो सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला.
पुलं गेल्यानंतर सुनीताबाईंनीही आवराआवरीला सुरुवात केली होती. पुलंच्या आकाशवाणीवरील भाषणांचे व श्रुतिकांचे ’रेडिओवरील भाषणे व श्रुतिका’ हे पुस्तक त्यांनी पुलंच्या पहिल्या स्मृतिदिनाला मौज प्रकाशनाकडून प्रसिद्ध करुन घेतले. पुलंच्या इतर भाषणांचे ’सृजनहो’ हे पुस्तक त्यानंतर वर्षाने प्रसिद्ध झाले. पुलंचा खाजगी पत्रव्यवहार नष्ट करण्याचे प्रचंड काम त्यांनी काही मदतनिसांना हाताशी घेऊन पूर्ण केले. पुलंसारखी आपली आपल्या शेवटच्या आजारात अवस्था होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याला कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये या आशयाचं ‘ऍडव्हान्स डायरेक्टिव्ह फॉर हेल्थ केअर’ नावाचं इच्छापत्र तयार करुन घेतलं. त्यानंतर सुनीताबाईंनी स्वत:ला जवळजवळ घरात कोंडूनच घेतलं. काही मोजके प्रसंग सोडले तर त्यानंतर त्या घराबाहेर पडल्याच नाहीत. सावरकरांप्रमाणे आपल्याला कुणी या गलितगात्र अवस्थेत बघू नये, आपली जनमानसातली प्रतिमा ढळू नये यासाठीच ही धडपड होती का? कुणास ठाऊक! पण पुलं गेल्यानंतर जगण्याचे प्रयोजनच संपावे अशी सुनीताबाईंनी स्वत:ची करुन घेतलेली अवस्था समजण्याच्या पलीकडची होती. पहिला जी.ए.कुलकर्णी पुरस्कार स्वीकारायलाही त्या आल्या नाहीत. तो पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला आणि त्याची चित्रफीत दुसया दिवशी रसिकांना दाखवली गेली. त्या चित्रफीतीत अशक्तपणे आपले केस सावरणार्या, आपण चांगले दिसतो आहोत की नाही याबाबत कॉन्शस झालेल्या सुनीताबाई बघून मनाला यातना झाल्या. ’परी यासम हा..’ हा लघुपट रसिकांबरोबर बघणारे आणि तो संपल्यावर टाळ्यांच्या गजरात रसिकांकडे वळून त्यांना नम्रपणे नमस्कार करणारे हे जोडपे आठवले. ’ध्यानीमनी’ नाटकाचा प्रयोग पहिल्या रांगेतून बघणारे आणि तो प्रयोग संपल्यावर कितीतरी वेळ टाळ्या वाजवणारे हे जोडपे आठवले. या दोन्ही प्रसंगात वाजणारी एक टाळी माझी होती हेही मला आठवले.
असे स्वयंप्रकाशी, तेज:पुंज सार्थ आयुष्य लाभलेल्या सुनीताबाईंचा शेवट पुलंप्रमाणेच करुण व्हावा हे बाकी मनाला पटत नाही. पुलं अखेरपर्यंत प्रकाशात राहिले, त्यामुळे त्यांची प्रकृती, त्यांच्या वेदना, त्यांचे केविलवाणे परावलंबित्व लोकांना माहिती होत राहिले. सुनीताबाईंच्या बाबतीत असे झाले नाही. ऑगस्ट २००८ ला घरच्या घरी सुनीताबाई तोल जाऊन पडल्या आणि मग अगदी शेवटपर्यंत ७ नोव्हेंबर २००९ पर्यंत त्या अंथरुणाला खिळूनच राहिल्या. त्या काळात त्यांना नको ते परावलंबित्व, आर्थ्रायटिसच्या यातना आणि एकटेपण असे कायकाय सहन करावे लागले. इतके संपन्न आयुष्य जगलेल्या सुनीताबाईंचा असा परावलंबी अवस्थेत कणाकणाने शेवट व्हावा हे काही बरे झाले नाही. शेवटपर्यंत आपला दिमाख, तोरा न सोडलेल्या सुनीताबाई तशाच, एखादी वीज चमकून नाहीशी व्हावी तशा, एखादा तारा निखळून पडावा तशा लुप्त व्हायला पाहिजे होत्या असे वाटले.
’सुनीताबाई’ हे पुस्तक मला आवडलेच, पण या पुस्तकाने मला अस्वस्थ केले. याच पुस्तकात ’ऐसे कठिण कोवळेपणे’ या नावाचा अरुणा ढेरे यांचा सुनीताबाईंवरचा एक सुंदर लेख आहे. अरुणा ढेरे यांना देशपांडे कुटुंबाचा प्रत्यक्ष सहवास बराच काळ लाभला. अरुणाबाईंचा हा लेख म्हणजे या पुस्तकावरचा कळसच आहे.
अशी पांखरुन छाया, लावोनियां माया
आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया
या आरती प्रभूंच्या या लेखात ढेरे यांनी उधृत केलेल्या ओळी या जोडप्याला किती समर्पक होत्या असे वाटून जाते.
या पुस्तकात काही दुर्मिळ सुंदर छायाचित्रेही आहेत. त्यातली बरीचशी मंडळी आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. एका पानावर पूर्ण पानभर सुनीताबाईंचे एक कृष्णधवल छायाचित्र आहे. लख्ख गोर्यापान वर्णाच्या, साधीशी साडी नेसलेल्या करारी मुद्रेच्या ताठ उभ्या असलेल्या सुनीताबाई. पु.ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची पत्नी यापलीकडे आपल्या तत्वांशी, मूल्यांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या, सच्च्या मनाच्या, संवेदनशील, कष्टाळू, प्रतिभावान आणि रसिक सुनीताबाई. या पुस्तकाचे मुखपृष्ठ याच चित्रावर आधारलेले आहे. सगळे पुस्तक वाचून झाल्यावर मनात विचाराविचारांचा गल्बला होतो, घशाशी काही कढ येतात, ’न मागता दिलेल्या आणि न सांगता परत नेलेल्या या देवाघरच्या माणसां’ बद्दल बरेच काही वाटत राहाते. पण शेवटी लक्षात राहातात त्या या सुनीताबाई.
माझ्या संग्रहातील पुस्तके ११ ‘समुद्र’
‘ स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?’ ‘व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?’ हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो. नवरा-बायकोच्या नात्यात तर हे अधिकच प्रकर्षाने दिसते. एकमेकांत मिसळून गेलेले नवरा बायको खरोखर तसे मिसळून गेलेले असतात का? (तसे मिसळून जाणे आवश्यक आहे का हा वेगळा प्रश्न आहे). वर्षानुवर्षे एकत्र जगल्यानंतर (सहजीवनानंतर म्हणा हवे तर) ‘अमक्याची बायको’ किंवा ‘अमक्याचा नवरा’ ही स्त्री-पुरुषांची एकच ओळख शिल्लक राहाते का? राहावी का? याही पलिकडे जाऊन ज्याच्याबरोबर किंवा जिच्याबरोबर आपण सगळे आयुष्य काढतो त्याच्या किंवा तिच्या मनातले सगळे पदर आपल्याला उलगडलेले असतात का?
हा काही नवीन प्रश्न नाही. पण या विषयावरची मिलिंद बोकिलांची ‘समुद्र’ ही नव्वद पानांची कादंबरी अगदी नव्या पद्धतीने विचार करायला लावणारी आहे. मिलिंद बोकील हा तशा नव्या पण झपाट्याने जुन्या होत जाणार्या पिढीतला वेगळ्या वाटेने जाणारा लेखक. बोकिलांच्या ‘उदकाचिया आर्ति’ आणि ‘झेन गार्डन’ या कथासंग्रहांतून मानवी नात्यांमधली गुंतागुंत समजून घेण्याची त्यांची कुवत आणि त्यांचे यथायोग्य चित्रण करण्याची त्यांची क्षमता दिसून आलेलीच आहे. ‘समुद्र’ मध्ये बोकील एक पाऊल पुढे टाकतात. भास्कर आणि नंदिनीच्या लौकिकार्थाने अत्यंत सुखी संसारातला एक तिढा ते दोघे सुटीवर म्हणून गेलेले असताना उघडा होतो. विश्वास या पायावर आधारलेले त्या दोघांमधले नाते या नव्या खुलाशाने किंचित थरथरते. ‘हे असे का?’ हा भास्करला प्रश्न पडतो. एखाद्या टिपिकल साचेबंद नवर्याप्रमाणे त्याचीही प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होते. आधी लिहिल्याप्रमाणे ‘स्त्रीला नेमके काय हवे असते?’ हा प्रश्न त्यालाही पडतो…
स्पॉयलर अलर्टचा दोष पत्करुन लिहायचे झाले तर ‘अस्तित्व’ या महेश मांजरेकरच्या चित्रपटाच्या चाकोरीतून जाणारी कथा. पण या कथेच्या निमित्ताने बोकील एकूणच स्त्री-पुरुष यांच्यामधील नात्यांवर काही मार्मिक भाष्य करतात. स्त्री आणि पुरुष हे फक्त शरीरांनी नव्हे तर शरीरांपासून प्रत्येक गोष्टीने, विशेषतः मनाने, भिन्न आहेत, आणि भिन्नच असतील – यात सरस-निरस हा प्रश्नच नाही – हे ‘समुद्र’ चे फार ढोबळ असे सार झाले. खरे तर ‘समुद्र’ चे अमुक असे सार नाहीच. ‘समुद्र’ ही या मध्यमवयीन जोडप्याने दोघांना एकत्र वेळ काढता यावा म्हणून घेतलेली सुटी आहे. या सुटीच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारी समुद्राची मंद गाज आहे. हवेतला किंचित उकाडा आहे. आणि या सगळ्या सुस्तावलेल्या सुटीत या जोडप्याचे हळूहळू सुटे होत जाणारे आयुष्य आहे, ‘सहजीवन’ आहे.
‘समुद्र’ आपल्याला विचार करायला लावते. स्वतःला तपासून बघायला लावते. पुस्तकाचे किंवा एकंदर कुठल्याही कलाकृतीचे हे यश म्हणावे लागेल. नवर्याच्या हातात हात गुंफून फिरायला बाहेर पडलेली बायको या ठोकळ दृष्याकडे बघताना आरशासमोर आरसा ठेवलेला असावा पण प्रत्येक आरशातले प्रतिबिंब दुसर्या प्रतिबिंबापेक्षा जरासे तिरके असावे तशा काही शक्यता दिसायला लागतात. ‘खरेखुरे आयुष्य हे काल्पनिक विश्वापेक्षा कितीतरी नाट्यमय, अकल्पनीय असू शकते’ हे एक (काल्पनिक) कादंबरी वाचतानाच पटते.
बाकी बोकिलांची सरळ, संयत भाषा आता परिचित झाली आहे. शरीरसंबंधांची वर्णने करताना ती जरा अधिक अलंकारिक, सूचक होते, पण तेवढे क्षम्य ठरावे. रस्त्यावरच्या रहदारीपासून सुटीवर गेल्यावर खोलीत गेल्यागेल्या अधीरपणे बायकोला मिठीत घेणार्या नवर्यापर्यंत बोकीलांनी बारीक निरखलेले असते. आणि त्यांच्या लिखाणात ते तसे बारकाईने आणि अगदी सहजपणाने येत जाते. नवरा गाडी चालवत असताना नकळत झोपी जाणारी नंदिनी आपण कुठेतरी पाहिलेली असते, पण नवर्याच्या दंडातले गोळे बघून ‘इट ऍक्चुअली टर्नस अस ऑफ’ असे ती म्हणते तेंव्हा आपण थोडे थबकतो.
‘समुद्र’ हे ‘मौज’चे मार्च २००९ चे प्रकाशन. जुलै २०१० मध्ये या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. म्हणजे एकंदरीत मराठी पुस्तकाच्या मानाने बरेच म्हणायचे. मराठीतली काही सर्वोत्तम पुस्तके निवडली तर त्यात ‘समुद्र’ ची वर्णी लागणार नाही. पण ‘समुद्र’ मला आवडली. एका बैठकीत संपली हेही आवडले आणि पुस्तके विकत घेताना शंभर वेळा विचार करायच्या सध्याच्या दिवसांत ८० रुपये ही या पुस्तकाची किंमत तर फारच आवडली.
माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो
विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते. उर्दू साहित्यातील प्रखर आणि विवादास्पद लिखाण करणार्या सआदत हसन मंटोची ओळख करुन देणारी पुस्तिका नुकतीच वाचनात आली. मंटो या लेखकाचे नाव जितके विचित्र, तितकाच तो माणूसही विचित्र होता. मंटो जेमतेम त्रेचाळीस वर्षे जगला, पण त्याची ही वर्षे एखाद्या निखार्यासारखी होती. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच. मंटोच्या साहित्यात हेच झालेले दिसते. मंटोचा आयुष्यपट बघताना त्याच्या व इतर काही थोर साहित्यीकांच्या जीवनातील काही विस्मयकारक साम्ये डोळ्यांसमोर येतात. साहीरप्रमाणे मंटोचे त्याच्या वडीलांशी कधी पटले नाही. गालिबसारखा तो ’आधा मुसलमान’ होता आणि मजाजसारखा (’ऐ गमे दिल क्या करुं’ वाल्या) तो दारुच्या जबरदस्त आहारी गेलेला होता. मजाजसारखाच मंटोलाही दारुनेच संपवला. पण मला वाटते संवेदनशील माणसाची हीच शोकांतिका असते. ’गम कुछ इस कदर बढे, की मैं घबराके पी गया’ हे लिहिले आहे साहीरने, पण ते इतरही बर्याच साहित्यिकांना लागू असावे, असे वाटते. याचा अर्थ कुणीही दारुड्या गणागणपाने स्वत:ला संवेदनशील आणि जगाच्या निर्घृणतेचा बळी म्हणवून पीत राहावे असे नाही, पण शैलेंद्रपासून मदनमोहनपर्यंत आणि अशी अनेक उदाहरणे ही शोकांतिका अधोरेखित करुन जातात, हे खरे. असो.
मंटोचे घराणे मूळचे काश्मिरवासी. नंतर ते पंजाबमध्ये येऊन स्थायिक झाले. मंटोची भावंडे धार्मिक वृत्तीची, प्रतिष्ठीत आणि संयमी स्वभावाची होती. मंटो बाकी पहिल्यापासूनच क्रांतिकारक, बंडखोर, नास्तिक आणि बेफाम प्रवृत्तीचा होता. मानवी स्वभावाचा हा एक पीळ न समजण्यासारखा आहे. एकाच कुटुंबातील दोनपाच लोक सरळ, रेल्वेच्या रुळासारखे, कागदी पिशव्यांसारखे, घड्या घातलेले आयुष्य जगत असतात आणि त्यांचाच एखादा रक्ताचा भाऊ संपूर्ण उद्धस्त, विस्कटलेले भणंग आयुष्य जगतो (आणि एक दिवस मरुन जातो!). हे असे का होते याला काही उत्तर नसावे. असलेच तर ते शंभर टक्के पटेल असे नाही. वाचनाची जबरदस्त आवड असणारा मंटो, वाचलेली पुस्तके विकून टाकून त्या पैशांतून उंची सिगारेटी ओढणारा मंटो, तरुण वयात शिक्षणावरुन लक्ष उडाल्याने बेछूटपणे जगत राहाणारा मंटो, स्वातंत्र्यपूर्व काळात कधी सशस्त्र क्रांतीची स्वप्ने बघणारा तर कधी वैफल्यग्रस्त होऊन स्मशानात जाऊन बसणारा मंटो, तरुण वयातला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी दारु, चरस, कोकेनसारखी व्यसनं करणारा मंटो आणि एकदा लेखन हेच आपलं खरं काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा तुफानी वेगानं नाटकं, निबंध, व्यक्तिचित्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा लिहिणारा मंटो … यातला खरा मंटो कोणता हेच कळेनासे होते. उत्तम लेखक हा आधी उत्तम वाचक असावा लागतोच. मंटोने विशेषत: परदेशी साहित्यिकांचे उत्तमोत्त्म साहित्य वाचलेले होते. लिहायला सुरवात केल्यानंतर प्रथम पत्रकारिता, नंतर हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित लिखाण आणि मग स्वतंत्र नाटके, कथा असा मंटोचा लेखनप्रवास घडला. मंटोच्या मुंबईतील सिनेमाच्या विश्वातील सफरीबद्दल या पुस्तकात फारसे नाही. पण एकंदरीत या मायानगरीला मंटो फारसा पसंत पडला नाही, असेच दिसते. १९४८ साली मंटो पाकिस्तानात निघून गेला आणि पाकिस्तानात गेल्याचा त्याला (साहिरप्रमाणेच) पश्चाताप होत राहिला. त्याने अहमद नदीम कासमी यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: ’ वास्तविक मी आता अशा अवस्थेला पोहोचलो आहे जिथे नकार आणि विश्वास यात फरकच राहिलेला नाही’. हे वाचल्यावर मला चटकन ’गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया’ हेच आठवले. पाकिस्तानात त्याने विपुल लिखाण केले हे खरे, पण वैयक्तिक जीवनात त्याची घसरणच होत राहिली. त्याचे मद्यपान तो मुंबईत असतानाच वाढले होते, पाकिस्तानात गेल्यावर मात्र ’दारुनेच त्याला प्यायला सुरवात केली’.
मंटोच्या वैयक्तिक वैफल्याला त्याने शहरात बघीतलेले दाहक जीवन मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेले दिसते. ग्रामीण आणि प्रादेशिक जीवनाबद्दल मंटोने फारसे लिहिले नाही. मंटोचे लेखन हे तात्कालिन शहरी संस्कृती, फाळणी, हिंदु-मुस्लीम दंगे, त्या काळातील शहरी जीवनातील समस्यांचे आळोखेपिळोखे आणि सामाजिक प्रश्न अशा विषयांवर केंद्रित झालेले आहे. वेश्या आणि वेश्यांचे आयुष्य यांवर मंटोने कित्येक कथा लिहिल्या आहेत. त्यातल्या कैक कथांवर अश्लीलतेचे आणि बीभत्सतेचे आरोप झाले. ’ठंडा गोश्त’, ’काली सलवार’, ’खोल दो’ अशा त्याचा कथा प्रचंड वादग्रस्त ठरल्या. त्यामागची कारणेही सहज समजण्यासारखी आहेत. साठेक वर्षांपूर्वीचा काळ, समाजात वेगाने होणारी स्थित्यंतरे आणि दुटप्पी, कावेबाज समाजाला सहन न होणारे मंटोचे ढोंगे उघडी करणारे लेखन हे समीकरणच स्फोटक असले पाहिजे. ’खोल दो’ या कथेत सकीनावर तिच्याच जातीचे लोक, रजाकार, अत्याचार करतात. बेशुद्ध पडलेल्या सकीनाला उपचाराकरता डॊक्टरांकडे नेतात तेंव्हा डॊक्टर म्हणतात की तिला खुली मोकळी, हवा मिळण्यासाठी ’खिडकी खोल दो’. ’खोल दो’ हे शब्द ऐकून अर्धवट शुद्धीत असलेली सकीना आपल्या हातांनी आपल्या पायजम्याची नाडी सोडते आणि विजार खाली सरकवते. हे असले सगळे लिहिणाया मंटोला त्या काळातील लोकांनी सैतान समजून जिवंत जाळले नाही हेच नवल. मंटोच्या कथांमध्ये थैमान घालणारी कामवासना, हिंसाचार, शारिरीक व मानसिक कुरुपता, ओंगळपणा हे सगळे एकूण समाजाला पचायला जडच गेले असणार.
एका बाजूला असले भेदक लिखाण करत असताना मंटोने दुसरीकडे हलकेफुलके विनोदी लिखाणही केले आहे. मंटोची विनोदी नाटके, लेख, निबंध यांची संख्या खूप मोठी आहे. पाकिस्तानात असताना मंटोचे बारा कथासंग्रह, दोन निबंधसंग्रह, दोन व्यक्तिरेखांचे संग्रह, एक लघुकादंबरी आणि त्याच्या कथांवर झालेल्या खटल्यांच्या संदर्भातले एक पुस्तक असे बरेच साहित्य प्रसिद्ध झाले होते. पाकिस्तानात असताना जवळजवळ दिवसाला एक कथा असा त्याचा लिखाणाचा वेग होता. वर्तमानपत्राच्या कार्यालयातल्या खुर्चीत उकीडवा बसून मंटो झरझर लिहीत असे. कथा लिहून झाली की तिच्या मानधनातून दारु खरेदी करत असे. असले काही वाचले की एकीकडे त्याच्या प्रतिभेबद्दल आदर आणि दुसरीकडे त्याच्या व्यसनांबद्दल घृणा असले काहीसे मनात येते. मंटोने त्याच्या मुंबईतील मुक्कामात बकालातले बकाल आयुष्य अनुभवलेले होते. भायखळा आणि नागपाडा भागातल्या अंधार्या चाळी, म्हशींचे गोठे, घोड्यांचे तबेले, इराण्यांची हॉटेले आणि वेश्यांची मोठी वस्ती असलेला फोरास रोड हे सगळे त्याने बघीतले, अनुभवले. यातूनच त्याने उर्दू भाषेत ’टंटा, मस्तक, मस्का-पॊलिश, मालपानी, दादा, घोटाला, फोकट, कंडम’ अशा अनेक शब्दांची भर घातली. त्यामुळे मंटोची स्वतःची उर्दू लेखनाची एक शैली विकसित झाली असावी असे वाटते.
सआदत हसन मंटोवरच्या वारिस अल्वी यांनी लिहिलेल्या आणि विश्वास वसेकरांनी अनुवादित केलेल्या या लहानशा पुस्तकाने मंटोचे लेखन वाचावेसे मला वाटू लागले आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांचे हेच साध्य असते. मंटोचे जितके पचेल तितके लेखन मुळातून वाचावे, इतर अनुवादित स्वरुपात वाचावे असे हे पुस्तक वाचून इतरही वाचकांना वाचले तर साहित्य अकादमीचा हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल. अशा लहानशा पुस्तकाची किंमत अकादमीने अगदी नाममात्र – पंचवीस रुपये- ठेवली आहे हे या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल.
तर्क जाणत्यांचा
ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्याच लोकांनी त्यांचा हेतू साध्य झाल्यावर तिच्याकडे मागे वळून पाहिलेही नाही. त्याबद्दल तिला खंत वाटली असेलही, पण तिने त्याचा सल मनात ठेवला नाही. तिचे आयुष्य तसे कष्टातच गेले. आज सत्तरीच्या पुढे असणार्या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशा खस्ता खाल्या, ज्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला, तसे तिनेही केले. त्यातून तिने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. दुर्गम भागात तिने शिक्षिका म्हणून नोकरीला सुरवात केली. लहान वयात लग्न झालेले, तशाच लहान वयात तिला मातृत्व लाभले. तिच्या लहानग्या मुलाला दुर्गम भागात औषधोपचार न मिळाल्याने मृत्यू आला. विशीतल्या जोडप्याला अशा प्रसंगाने खचवून टाकले असते, पण अत्यंत सकारात्मक भूमिकेमुळे ती आणि तिचा नवरा या घटनेनंतर चोवीस तासांत आपापल्या कामावर रुजू झाले. नंतर तिच्या नवर्यावर अत्यंत अवघड अशी दुखणी आली. या सगळ्यांतून ती जिद्द आणि श्रद्धा यांच्या बळावर तरून गेली. ईश्वरावर तिची अढळ श्रद्धा होती. कर्मकांडेही ती करायची, पण तिच्या नवर्याच्या निधनानंतर पुढच्या पिढीने दिवस वगैरे काही विधी करायचे नाहीत असे ठरवल्यानंतर तिने त्या निर्णयाला अजिबात विरोध केला नाही. उलट त्या पैशांतून काही गरीब विद्यार्थ्यांना जेवण, शाळांना पुस्तकांची भेट असे बरेच काही तिने केले. नंतर नंतर कर्मकांडांमधील फोलपणा तिच्या ध्यानात आला आणि तसे मोकळेपणाने मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही तिने दाखवली.
एक उत्तम शिक्षिका म्हणून तिने अनेक सन्मान आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले. संस्कृतवर तिचे प्रभुत्व होते आणि तो विषय शिकवण्याची तिच्याजवळ हातोटी होती. दहावीला तिच्याकडून संस्कृत शिकलेल्या आणि संस्कृतमध्ये बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही शेकड्यांत मोजावी लागेल. शिक्षणक्षेत्रात काम करत असतानाच तिने सहकारी बँकेचे संचालकपद स्वीकारले आणि त्या क्षेत्रात एक निस्पृह आणि प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती म्हणून नाव कमावले. शिक्षण आणि सहकार या दोन्ही तशा बदनाम क्षेत्रांत काम करुनही तिचे मन कधी कडवटले नाही. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता तिने अनेक मुलांना अन्नाला लावले, अनेकांवर चांगले संस्कार केले, अनेकांना मदत केली.
एप्रिल महिन्यात तिला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. तिची भूक कमी झाली आणि तिला थकवा जाणवू लागला. तिची पाठदुखी दिवसेंदिवस वाढतच गेली. सर्व प्राथमिक तपासण्यांत काही निष्पन्न झाले नाही. पुण्यात कबीरबाग येथे सांधेदुखीवर आसने आणि व्यायाम असे उपचार दिले जातात. ते उपचार तिने एकदोन दिवस घेतले असतील, नसतील तोच तिच्या पायांमधील शक्ती कमीकमी होत गेली. शेवटी शेवटी तर तिला पायाची बोटेही हलवता येईनाशी झाली. पायांत संवेदना होत्या, पण पाय लुळे पडले. हे सांध्यांशी, हाडांशी संबंधीत दुखणे असावे, असे वाटल्याने तिला संचेती हॉस्पेटलमध्ये दाखल केले. तेथे तिच्या असंख्य तपासण्या झाल्या. एमाराय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी…. शेवटी तिच्या पाठीचे मणके वयोमानाप्रमाणे झिजले आहेत, त्यांतील काही मणक्यांवर कसलीशी वाढ झाली आहे आणि शस्त्रक्रिया केल्याशिवाय काही नक्की काय झाले आहे ते कळणार नाही असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत पडले. तिच्या पायाच्या नसांवर दाब पडल्याने तिच्या पायांमधील शक्ती गेली आहे असे डॉक्टरांना वाटत होते. त्याप्रमाणे तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेत तिच्या मणक्यांचे ‘डीकॉंप्रेशन’ केले आणि मणक्यांना आधार म्हणून धातूची एक पट्टी काही खिळ्यांच्या सहाय्याने तिच्या पाठीत बसवली. ती पाठीच्या मणक्यावर जी काही गाठ होती ती ‘नॉन हॉजकिन्स लिंफोमा’ ची होती असे बायॉप्सीमध्ये कळाले. दरम्यान तिच्या पायांच्या हालचालींत काहीच फरक पडला नव्हता. तिचे पंगूपण तसेच होते. एरवी अत्यंत उत्साही आणि सतत कामात असणार्या या स्त्रीला असे पडून राहाणे किती त्रासदायक झाले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. तिच्या जखमेचे टाके सुकले असतील, नसतील इतक्यात तिच्यावर उपचार करण्यासाठी काही कर्करोगावरील उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हे कॅन्सर स्पेशालिस्ट रुबी हॉल क्लिनिकमधील होते. बरेच नावाजलेले, पेशंटसचा अखंड ओघ असणारे हे तज्ज्ञ. त्यांनीही बर्याच तपासण्या केल्या आणि या लिंफोमावर अत्यंत तातडीने रेडिएशन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे ती जखम अर्धवट सुकलेली असतानाच तिला पाच सत्रांत रेडिएशनचे उपचार देण्यात आले. त्यामुळे ती जखम थोडीशी चिघळली पण ते नॉर्मल आहे, आणि काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सगळे ठीक होईल असे या कॅन्सर स्पेशालिस्टनी सांगितले.
काही दिवसांसाठी या स्त्रीला घरी सोडण्यात आले. पण तसे करतानाच आता या कॅन्सरवर केमोथेरपी घेणे आवश्यक आहे असे सांगून एका आठवड्यानंतर पुन्हा इस्पितळात दाखल होण्यास सांगण्यात आले. या एका आठवड्यात ही स्त्री घरी आपल्यावर योग्य उपचार होत आहेत, आणि आपण लवकरच रोगमुक्त होऊन आपल्या पायावर उभे राहू या समजात अत्यंत आनंदात होती. दरम्यान तिला देण्यात येणारी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट तिने अतिशय मनापासून स्वीकारली. विविध प्रकारचे व्यायाम ती अगदी मन लावून करत राहिली. त्याबरोबर तिचा जप, स्तोत्रे आणि एकंदरीतच देव आपल्या पाठीशी आहे ही श्रद्धा यामुळे तिचे मनोबल उत्तम प्रकारे टिकून राहिले होते. येणार्याजाणार्याला ती ‘आता लवकरच मी माझ्या पायावर उभी राहणार’ असे हसून सांगत असे. आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची आपल्याला अजिबात भीती वाटली नाही कारण भुलीच्या औषधांचा परिणाम होईपर्यंत सतत माझ्या तोंडात ‘माझ्या’ देवाचे नाव होते असे ती सांगत असे.
एका आठवड्यानंतर तिला परत संचेती हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीसाठी दाखल केले. सतत चोवीस तास काही ना काही औषधे तिच्या शरीरात शिरेवाटे देण्यात आली. नंतरचेही तीनचार दिवस बरे गेले. मग अचानक तिची प्रकृती खूपच खालावली. खाणेपिणे बंद झाले. श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ लागला, धाप लागली, रक्तदाब खूपच खाली आला आणि रक्तातल्या पेशींचे प्रमाण धोकादायक रीत्या ढासळले. त्या दरम्यान घेतलेल्या रक्याच्या नमुन्यात प्लेटलेटसची संख्या ३००० पर्यंत कमी होती. अर्थात हे रक्तविश्लेषणाचे रिपोर्टस रुग्णाच्या नातेवाईकांपर्यंत कधी पोचलेच नाहीत हा भाग वेगळा. मग धावाधाव झाली. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तिच्यावर औषधांचा भडिमार झाला. बारा -चौदा तासांत सुमारे लाखभर रुपयांची औषधे तिच्या शरीरात सोडली गेली. श्वास घेताना ती तडफडू लागली. तोंडावरचा ऑक्सिजन मास्क हाताने बाजूला करून ‘मी दमून गेले आहे’ असे तिने मला खोल आवाजात सांगितले. ‘ शी इज क्रिटिकल बट नॉट (यट) ऑन हर डेथ बेड’ असे डॉक्टरांनी सांगितले. ‘वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट’ हे अजरामर वाक्य तर होतेच.तर पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कार्डियाक अरेस्टने तिचे हृदय बंद पडले. ते पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नानंतर ते अडखळत, अनियमितपणे सुरू झाले. त्यातच तिला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. हे तिचे अगदी अख्रेरचे क्षण आहेत हे ध्यानात आल्यावर ‘डॉक्टर, प्लीज डोंट डू एनीथिंग. लेट हर गो’ असे म्हणून मी आयसीयूच्या बाहेर पडलो. पाचेक मिनिटांत डेथ सर्टिफिकेटमधला तपशील विचरण्यासाठी आयसीयूमधल्या नर्सने माझ्या खांद्यावर टकटक केली.
औषधांनी , इंजेक्शनसनी सुजलेला तिचा देह, ऑक्सिजन मास्कने व्रण पडलेला तिचा निस्तेज चेहरा… हे सगळे सुन्न मनाने विद्युतदाहिनीत सरकवताना माझ्या मनात दुःख अधिक होते की राग हे आज सांगणे कठीण आहे. दु:खाचे विश्लेषण होऊच शकत नाही. रागाचे तसे नाही. हा राग फक्त डॉक्टरांच्यावर नव्हता. कसाईपणा हा त्यांचा धर्म आहे, आणि त्यांनी त्या धर्माचे पालन केले इतकेच. यातला थोडा राग त्या निधन पावलेल्या स्त्रीवरही होता. इतका संपूर्ण विश्वास कुणावरही असणे बरे नव्हे, हे तिला कळायला पाहिजे होते. डॉक्टरच्या दृष्टीने पेशंटचे शरीर ही एक प्रयोगशाळा असते आणि विविध प्रयोग ‘करून बघण्या’पलीकडे त्यांनाही फार करता येत नाही, हे तिला कळायला हवे होते. त्यांचा तर्कही सामान्यांपेक्षा थोडा जाणता असला तरी तो निव्वळ तर्कच आहे, हे तिने ओळखायला पाहिजे होते. पेशंटवर उपचार, त्यांना बरे करणे ही डॉक्टरांची प्राथमिकता असते असा तिचा समज होता. ते तसे नसते, हे तिला मरण्यापूर्वी कळायला हवे होते.
थोडा राग तिचा ज्याच्यावर संपूर्ण आणि अचल विश्वास होता त्या परमेश्वरावरही होता. ‘तो’ आपल्या पाठीशी आहे म्हणजे आपले सगळे बरे होणार हा विश्वास ‘त्याने’ तिला दिला होता. या भाबड्या विश्वासाने कदाचित तिचे शेवटचे काही दिवस सुखाचे गेलेही असतील, पण अगदी अखेरच्या क्षणी मृत्यूच्या कराल जबड्यात जाताना हा परमेश्वरही आपल्या मदतीला फारसा आला नाही, हे तिला समजायला पाहिजे होते. समजलेही असेलही, कुणास ठाऊक!
इस्पितळातून परत आणलेल्या सामानातील तिची जपाची माळ, देवतांच्या छोट्या तसबीरी, आरत्यांची, स्तोत्रांची लहानशी पुस्तके या सगळ्या गोष्टी एकेक करून बाजूला ठेवत असताना माझे मन पूर्ण निर्विकार झाले होते. ‘अपंग म्हणून जगणे तिला अत्यंत क्लेशदायक झाले असते, म्हणून झाले हे फार बरे झाले’ या विचाराचे पांघरुण खूप अपुरे, तुटक वाटत होते. एरवी प्रत्येक क्षणाला सोबत असणारे तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.
केतकर
शिक्षक या व्यक्तीविषयी आदर वाटावा असे फार कमी लोक आजवर भेटले. लहानपणी शाळेत असताना आमच्या हिंदी शिक्षकांचे ज्ञान ‘मकान’ म्हणजे शेत आणि ‘मूंगफली’ म्हणजे मुगाच्या डाळीपासून तयार केलेला पदार्थ असे सांगण्याइतपत अगाध होते. त्या वेळी मी नुकताच ‘रोटी, कपडा और मकान’ हा अप्रतिम चित्रपट पाहिलेला असल्याने ‘मकान’ म्हणजे शेत असणे शक्य नाही, इतपत माहिती होते. त्यावरून मी हिंदीच्या शिक्षकांशी वाद घातलेलाही आठवते. वाद घालण्याची परंपरा इतकी जुनी आहे. असो.
काही वर्षांपूर्वी एका व्यवसायानिमित्त मुंबईच्या गुप्ता नावाच्या माणसाला भेटलो. त्याने मला पुण्यातल्या केतकर नावाच्या गृहस्थांना भेटायला सांगितले. ‘उसने नीम के ऍप्लिकेशनपे बहुत काम किया है, ही इज नोन ऍज दी नीम मॅन’ असे म्हणून त्याने मला केतकरांचा नंबर दिला. केतकर हे नाव आणि पत्ता शनिवार पेठ, पुणे म्हटल्यावर मी जरा भीतभीतच केतकरांना फोन केला. चारपाच वेळा रिंग वाजली आणि कुणीतरी फोन उचलला.
“केतकर.” करारीपणा आणि तुसडेपणा यांच्या मधल्या आवाजात कुणीतरी म्हणालं.
मी स्वतःचा परिचय करून दिला आणि काम आहे, कधी भेटायला येऊ? असं विचारलं.
“रविवारी सकाळी साडेनऊ वाजता फोन करा.” आवाज पुन्हा तसलाच. हा काय पुण्याच्या हवापाण्याचा गुणधर्म आहे की काय कुणास ठाऊक!
“रविवारी…. ” मी चाचरत म्हणालो, “जरा तातडीचं काम होतं, आज उद्या नाही का भेटता येणार?”"रविवारी म्हणजे रविवारी.” केतकर कडकपणे म्हणाले. “चौदा तारखेला. त्याच्या आधी मला वेळ नाही. नमस्कार. “
मग मी रविवारी (फोन करून) त्यांच्या घरी गेलो. शनिवार पेठेतल्या एका जुन्या वाड्यात पहिल्या मजल्यावर ते राहत होते. दारावर एम. के. पेस्ट कंट्रोल आणि मोहन केतकर अशा पाट्या होत्या. मी बेल वाजवली. केतकरांनी दार उघडलं.
सडपातळ अंगयष्टीने अधिकच वाटणारी बर्यापैकी चांगली उंची, मूळचा उजळ असावासा वाटणारा पण आता रापलेला वर्ण, चेहर्यावर वयाच्या आणि कष्टाच्या रेषा, डोक्यावरच्या बर्याच केसांनी निरोप घेतलेला, भरपूर नाक आणि भेदक डोळे. भेदक पण जरासे मिष्किलही. पण एकंदरीत जरा दबकल्यासारखं व्हावं असंच व्यक्तिमत्त्व.
परिचय, नमस्कार चमत्कार झाले. “चहा घेता? ” केतकरांनी विचारलं
“घेऊ की!” मी म्हणालो. शनिवार-सदाशिव या परिसरात तुम्ही संकोचलात की मेलात. चहापाणी सोडाच, कुणी उन्हाळ्यात पंखाही लावणार नाही, इतपत पुणं आता मला समजायला लागलं होतं.
चहा झाला. केतकरांनी सिग्रेट पुढे केली. मीही जरा मोकळा झालो. मग तुम्ही कुठले, आम्ही कुठले हे झालं. त्यात केतकर काही दिवस जयसिंगपूरला झुऑलजी शिकवायला होते, असं कळालं. बायॉलजीचा मास्तर आणि तोही गावाकडचा! मी खूष झालो. ओळखीपाळखी निघाल्या आणि मला तर केतकरांना एका ठिकाणी भेटल्याचंही आठवलं. केतकरांच्या बाकी काही लक्षात नव्हतं.
“अहो म्हणजे केतकरसाहेब, माझ्या मामाला, मावशीला तुम्ही शिकवलेलं असणार. म्हणजे सर तुम्ही आमचे. अहो, मग मला अहोजाहो काय म्हणताय? अरे म्हणा!” मी म्हणालो. कसं कुणास ठाऊक, केतकरांना ते पटलेलं दिसलं. मग पहिल्या भेटीतच त्यांनी मला अरे म्हणायचं आणि मी त्यांना सर, हे ठरून गेलं.
“हं. तर मायक्रोबायॉलॉजिस्ट काय तू?… कायकाय विषय असतात रे तुमच्या एमेस्सीला?” केतकरांनी मुलाखत घेताना विचारावं तसं विचारलं. मी सटपटलोच. आता हा प्राध्यापक माझी लक्तरं धुवायला काढतोय की काय म्हटलं! मी काहीतरी जुजबी सायटॉलजी, बायोकेमिस्ट्री अशी उत्तरं दिली.
“बायोकेमिस्ट्री काय? टीसीए सायकल आठवतंय का?” केतकर सोडायला तयार नव्हते.
“अहो, फार वर्षं झाली त्याला सर. टीसीए म्हणजे क्रेब्ज सायकल ना? थोडंथोडं आठवतंय, ऑक्झॅलोऍसिटेट, सायट्रेट, आयसोसायट्रेट, अल्फाकीटोग्लुटारेट…. ” मी अडखळलो.
“पुढे?” केतकर मिष्किलपणे म्हणाले
“नाही बुवा आठवत.”
“सक्सिनिल को ए, सक्सिनेट, फ्युमॅरेट आणि मॅलेट. नॉट बॅड हां!” हे ते मला म्हणाले की स्वतःला कुणास ठाऊक! पण एकंदरीत केतकरांना बरं वाटलं असावं.
पहिल्या भेटीतच हे पाणी काही वेगळं आहे असं माझ्या ध्यानात आलं. मग केतकर बर्याच वेळा भेटले, भेटतच राहिले. काही व्यावसायिक कारणानं आम्ही एकत्र आलो खरे, पण ते कारणही नंतर विरघळून गेलं. केतकर झुऑलजीचे प्रोफेसर होते खरे, पण त्यांनी प्राध्यापकी सोडूनही आता बरीच वर्षं झाली. गेली काही वर्षं ते पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. त्या आधी काही वर्षं त्यांनी इंडस्ट्रीतही काम केलं होतं. आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे, मुलंही आपापल्या मार्गाला लागली आहेत, पण केतकरांचा धडपड्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सतत त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं.
प्रखर बुद्धी, विज्ञानावर गाढ श्रद्धा, प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या कानसेवर पारखून घ्यायची जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती आणि असं इतकं चिकित्सक राहायचं असेल तर त्याला आवश्यक असणारा किंचित तुटक, तिरका स्वभाव. आजपर्यंत केतकर मला इतके समजले आहेत. एरवी गंभीर आणि कडक वाटणारे केतकर खेळकर आणि मिष्किलही आहेत. बोलताबोलता ते एखादा खोचक विनोद करतील आणि खळखळून हसतीलही. त्यांच्या बोलण्याची एक विशिष्ट ढब आहे. संथपणे, किंचित कापर्या, हेलकावणार्या खर्जातल्या आवाजात ते बोलतात. त्यांचं मराठी आणि इंग्रजी उत्तम आहे, पण उच्चारांवर छाप बाकी अस्सल पुणेरी. एखाद्या किचकट शास्त्रीय प्रयोगाचं वर्णनही ते करतात ते मंत्रपुष्पांजली म्हटल्याच्या आविर्भावात. त्यांचं मराठीही वेगळंच आहे. त्यांच्या बोलण्यात जुने, बोलीभाषेतून हद्दपार झालेले शब्द सहजपणे येतात. ‘जरा वेळ थांब’ ला ते सहजपणानं ‘क्षणभर थांब’ म्हणून जातात. काहीतरी जबरदस्त दिसलं, झालं, कळालं की त्याला ते ‘ज्याचं नाव ते!’ असं म्हणतात. एकदा मी त्यांना दुपारी काय करताय? असं विचारत होतो.
” उद्या दुपारी ना? अं.. अरे हो, माझं उद्या दुपारी त्या ऑयस्टर हॉटेलमध्ये लग्न आहे..”
“आँ…?” माझ्या हातातली काडेपेटी खाली पडली.
केतकर नेहमीप्रमाणे खळखळून हसले. “लग्न म्हणजे, जायचंय मला किडे मारायला!” त्यांनी हाताने पंप मारल्याचा आविर्भाव केला. “म्हणजे पेस्ट कंट्रोलला रे….” ते म्हणाले.
साधारणतः पन्नाशीनंतर माणसाची शारीरिक आणि मानसिक लवचिकता कमी होत जाते. नवीन गोष्टी शिकण्याची, स्विकारण्याची इच्छाही. केतकरांचंही थोडंसं तसं झालं आहे. “मला त्या तुमच्या कंप्युटरमधलं आणि इंटरनेटमधलं काही कळत नाही.” असं ते वरचेवर म्हणतात. पण इंटरनेटबद्दल त्यांना सगळी माहिती असते. “आता नवीन काही वाचावसं वाटत नाही” असंही ते परवा म्हणाले. पण जे ठाऊक आहे, आणि ज्याचा अभ्यास केलेला आहे, ते केतकरांच्या मनात अगदी जिवंत, धगधगीत आहे. केतकर एरवी इतके मोकळे असले तरी काहीकाही बाबतीत त्यांनी स्वतःला शिंपल्यासारखं मिटून घेतलेलं आहे. (हे स्वतः केतकरांनी लिहिलं असतं तर कदाचित ‘हर्मिट क्रॅब’ सारखं असं म्हणाले असते!)
मध्यंतरी एकदा गोमूत्राचा शेतीसाठी वापर या विषयावर बोलत होते. म्हणाले, ” हे बघ, कुणी काही सांगतो म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवणं बरं नव्हे. शास्त्राचे विद्यार्थी ना आपण? आता शेतजमिनीत गोमूत्र, गोमय, आणखी काही – काय ते तुम्ही अमृतपाणी की काय म्हणता ते – हे घातलं की नक्की कायकाय होतं त्याचा अभ्यास करायला पाहिजे. केमिकल चेंजेस काय होतात, फ्लोरा आणि फॉना कसा बदलतो याचा शास्त्रीय अभ्यास व्हायला पाहिजे. खूप मोठं काम आहे रे हे. टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे कुणीतरी. मग हे जर खरंच उपयोगाचं आहे असं दिसलं तर त्याचं स्टँडर्डायझेशन करून ते शेतकर्यांना देता येईल. आणि असंलं काहीही होत नाही असं जरी आपल्याला प्रूव्ह करता आलं तरी हेसुद्धा महत्त्वाचंच फाईंडिंग आहे. अरे, रिसर्चमध्ये निगेटिव्ह रिझल्टसही महत्त्वाचे असतात…”
“अहो, तुम्ही म्हणताय ते खरंच महत्त्वाचं आहे.” मी उत्साहानं म्हणालो, “आपण एक प्रोजेक्ट करुया का यावर? मी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला असलेली मुलं देतो. तुम्ही फक्त त्यांना गायडन्स द्यायचा. वाटल्यास आपण तीनचार गट करुया. एक गट बेसवर्क करेल. दुसरा… “
केतकर नकारार्थी मान हलवत होते.
“काय झालं, सर?”
“ही सगळी सव्य अपसव्यं तू कर हवी तर! पण मला बाकी आता विद्यार्थ्यांशी बोलायला लावू नकोस. त्रास होतो रे! एखादा असतो मारे एमेस्सी झुऑलजी वगैरे. त्याला विचारलं की बाबा पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांत फरक काय? तर त्याचा चेहरा असा होतो की ज्याचं नाव ते! मग त्याला म्हटलं की जाऊ दे, तुला मराठीत विचारतो; कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट म्हणजे काय माहिती आहे का तुला? तर तो म्हणतो की हे बीएस्सीला होतं, आता विसरलो. आता काय बोंबलणार अशा पोरांसमोर? एखादा बॉटनीवाला असतो, त्याला म्हटलं की वांग्याची, मिरचीची फॅमिली सांग तर तो म्हणतो, अहो हे सगळं हल्ली इंटरनेटवर लगेच आणि फुकट मिळतं. ते कुणी कशाला लक्षात ठेवेल? अरे, मी तर आता जुना झालो, ही मुलं तरुण आहेत; त्यांचं ज्ञान जास्त अपडेटेड असायला पाहिजे. त्यांनी मला चार नव्या गोष्टी सांगायला पाहिजेत. आणि होतंय काय, की मला जे पन्नास वर्षांपूर्वीचं आठवतंय तेवढंही या कार्ट्यांच्या लक्षात असत नाही. म्हणून प्लीज, मला असलं काही करायला सांगू नकोस…” मी काहीच बोललो नाही.
तसाच कधीतरी ‘म्युझियम ऑफ ऑर्थ्रोपोडा’ चा विषय निघाला. कीटकांचा शास्त्रोक्त अभ्यास करून केलेला हा पुण्यातला एकमेव संग्रह. तोही केतकरांच्या घराण्यानंच केलेला. पुढे ज्या जागेवर तो संग्रह होता, ती जागाच पाडली गेली म्हणून तो संग्रह पुण्यातला एका प्रथितयश महाविद्यालयाला देणगी म्हणून देण्यात आला. अपेक्षा अशी होती की ते महाविद्यालय त्या संग्रहाचं जतन आणि शक्य झाल्यास संवर्धनही करेल.
“धूळ खात पडलीत रे सगळी स्पेसिमेन्स!” केतकर सांगत होते. “कित्येक तर बुरसून, किडून गेलीयत. माती झाली रे माती सगळ्याची! कितीतरी शिकता आलं असतं त्यातून. किती लोकांना उपयोग झाला असता. किती रिसर्च करता आला असता, पण कुणाला काय आहे त्याच?…” केतकरांचा आवाज अधिकच कापरा झाला होता.
मध्ये एकदा मी त्यांना फोन केला होता.
“सर, एक काम आहे. “
“बोल. “
“अहो, घरात कुठून तरी एक उंदीर शिरलाय. हुसकावून जात नाही. लपून बसतोय. वैताग आलाय आणि किळस वाटत्ये हो! काही उपाय सांगा की.. “
“घे लिहून. ” केतकर म्हणाले. “औषधाचं नाव रोबॅन. स्पेलिंग आर ओ बी ए एन. वीसेक रुपयांचं एक पाकिट असतं. सहा वड्या होतील त्याच्या. वर्तमानपत्राचा चतकोर कागद घ्यायचा. त्यावर एक वडी ठेवायची. त्यावर थेंबभर गोडंतेल टाकायचं आणि आपलं कपाट, फ्रिज आणि भिंत याच्यामध्ये मोकळी जागा असते की नाही, त्यात हा कागद गुंडाळून ठेवायचा.”
“गुंडाळून का बरं?”
“कारण उंदीर इज अ क्यूरियस ऍनिमल. तू त्याचं खाद्य उघड्यावर ठेवलंस तर त्याला संशय येईल. तो पहिल्या दिवशी नुस्ता वास घेऊन जाईल. दुसर्या दिवशी ते खाद्य तिथंच दिसलं तर तो खाईल. आता रोबॅन कंटेन्स ब्रोमोडायलॉन. काय आहे हे?”
“नाही बुवा माहिती!”
“इट इज ऍन ऍंटीकोऍग्युलंट. त्यामुळं त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव होईल. इंटर्नल ब्लीडिंग. आणि तो घराच्या बाहेर जाऊन मरेल.”
“वा. आता कुठं मिळेल मला हे रोबॅन? “
“कुठल्याही शेती सेवा केंद्रात मिळेल. तू मंडईच्या बाजूला जाणार आहेस का एकदोन दिवसांत? बरं मग स्वारगेटकडे? मग असं कर, माझ्या घरी ये. तुला रोबॅन देतो, शिवाय एक कप चहा आणि एक सिग्रेटही देतो. अगदीच नशिबवान असलास तर रात्रीचं उरलेलं काही खायलाही देतो.”
“रात्रीचं उरलेलं? हा काय प्रकार आहे?
“अरे, कोकणस्थाच्या घरी पाहुण्याला खायला म्हणजे शिळंपाकंच..!” केतकर खदखदून हसले.
तर असे हे केतकर! ज्या वयात कोणत्याही नवीन ओळखी नको वाटत असतील अशा त्यांच्या वयात मी त्यांना भेटलो. ज्या वयात गुरू म्हणून आपला अहंकार फुलू लागलेला असतो, अशा माझ्या वयात मला ते गुरू या भूमिकेत भेटले. वास्तविक त्यांचं माझं जमण्याचं काहीच कारण नव्हतं. पण हे मेतकूट जमून गेलं. त्यांचं माहिती नाही, पण माझा बाकी बराचसा स्वार्थ साधून गेला. एका खरोखर ज्ञानी माणसाची संगत मला लाभली. त्याहून महत्त्वाचं म्हणजे निखळ ज्ञान, चिकीत्सा आणि सत्य – सगळे पूर्वग्रह, संस्कार, संकेत बाजूला ठेऊन शोधलेलं निव्वळ झळझळीत सत्य – यावरचा माझा विश्वास केतकरांनी पुनरुज्जीवित केला, अधोरेखितही केला.
अलिकडे एखाद्या रविवारी फोन वाजतो. केतकर असतात.
“आहेस का घरी? “
“आहे की! काय हुकूम? “
“काही नाही. तुझ्या घराच्या कोपर्यावर आलोय, म्हटलं रिकामा असशील तर ये सिग्रेट ओढायला.”
“अहो, हे काय बोलणं झालं सर? आलोच. “
मी जातो. केतकर एका सिग्रेटीच्या थोटकावर दुसरी पेटवत असतात.
“जाड झालास.”
“होय हो. आजकाल कामात अडकलोय इतका! वेळच होत नाही व्यायामाला. खाणंपिणंही बिनसलंय.”
“अरे सकाळी व्यवस्थित खाऊन बाहेर पडत जा, रात्री जेवला नाहीस तरी चालेल. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, डिनर लाईक अ पॉपर, माहिती आहे ना?”
“होय. सर, हल्ली ते आपोआपच होतं. प्रोफेसर आणि पॉपर यात फरक आहे कुठं आता “
आम्ही दोघेही हसतो. केतकर सिग्रेट पुढे करतात.
“घे.”
“नको, हा तुमचा ब्रँड झेपायचा नाही मला. मी आपली लाईट घेतो. बाकी काय म्हणताय?”
“चाललंय. किडे मारतोय. अरे, परवा तुझी आठवण आली होती. म्हटलं तुला विचारावं. तू मायक्रोबायॉलॉजिस्ट…”
“अहो सर, माझा आणि मायक्रोबायॉलजीचा काही संबंध आहे का आता? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आठवतंय मायक्रोमधलं..!”
“नाही तरीपण तू तज्ज्ञ त्यातला! मला एक सांग, समज एक चांगली सुपीक जमीन आहे. ब्लॅक कॉटन सॉईल. भरपूर ऑरगॅनिक मॅटरही आहे त्यात. आपल्याला त्यात समज सोयाबीन लावायचं आहे. काय? आता मी त्यात समज एक बॅक्टेरिअल कल्चर घातलं. किती? तर प्रत्येक एकराला… “
केतकर रंगात येऊन बोलत असतात. त्यांच्या चेहर्यावर एखाद्या नुकत्याच सायन्स शिकायला लागलेल्या मुलाचं कुतूहल असतं. त्यांचा आवाज एका विज्ञानाच्या प्राध्यापकाचा नसतो, एका वस्तुनिष्ठ अभ्यासकाचा असतो. त्यांच्या डोळ्यात एका विज्ञानप्रेमीची चमक असते. केतकर बोलत असतात, आणि मी भारावून, अधिकाधिक नम्र होत ऐकत असतो. केतकरांच्या सिग्रेटीवर अर्धा इंच राख जमलेली असते. माझ्याही.
जुने घर
गावातले जुने घर अगदीच आडनिडे होते. त्याला ना आकार, ना उकार. म्हणायला त्याला वाडा म्हणत आणि बाहेरून दिसायलाही ते दुमजली घर तालेवार दिसे, पण आत कशाचा कशाला मेळच नव्हता. बांधणार्याने अगदी ऐदीपणाने गवंड्याला बोलावून ‘इथे चार खण काढ, इथे एक ठेप दे, इथे एक मोरी बांध, इथे माळवदावर जायला जिना काढ’ असले काहीतरी सांगून ते बांधवून घेतले असावे. गवंड्यानेही काही पुढचा-मागचा, सोयी-गैरसोयीचा विचार न करता अगदी हुंबपणाने हाताला येईल ते सामान घेऊन दिवाळीतला किल्ला बांधावा तसे ते दणकट, ऐसपैस पण अत्यंत गैरसोयीचे घर बांधून टाकले असावे. जुने घर शाळेपासून, गावंदरी मळ्यापासून लांब वाटत असे. मळा अगदी गावाच्या कडेला लागून एस टी स्टँडजवळच होता. मळ्यातल्या घरासमोर एक प्रचंड मोठे वडाचे झाड होते. मळ्यात विहीर होती आणि विहिरीला भरपूर पाणी असे. मळ्यातल्या घराभोवती भरपूर रिकामी जागा होती आणि मळ्यात बैल, गायी, म्हशी, वासरे आणि रेडके असत. त्यामुळे मळ्यात जायला अगदी मजा येत असे. गावातले घर हे या सगळ्यांपासून दूर, वेड्यावाकड्या अरुंद आणि खडबडीत रस्त्याने बरेच अंतर चालून गेले की एका गल्लीवजा रस्त्यावर गचडीत बसलेले होते. जुन्या घरासमोरचा रस्ता अगदीच निरुंद होता आणि त्यावर कधीच डांबराचा थर पडलेला नव्हता. त्यामुळे जुन्या घरासमोरच्या रस्त्यावरून एका वेळी दोन एक्क्या बैलगाड्या काही जाऊ शकत नसत. मग ही गाडी डाव्या अंगाला घे, ती उजवीकडे वळव असे करावे लागत असे. त्यात कधीकधी त्या गाड्यांची चाके रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या गटारात जात आणि वेसणीचा फास बसून फुसफुसणार्या बैलांचे डोळे टरारल्यासारखे होत. एखाद्याने अंग मोकळे करण्यासाठी हातपाय ताणून अंगाला डाव्या-उजव्या बाजूने झोले द्यावेत तसा तो रस्ता इकडे तिकडे मनाला येईल तसा वळत वळत गेलेला होता आणि त्याला उतारही फार होता. जैनाच्या बस्तीपाशी दोन चार जोराचे पायडल मारले की मग पाय वर घेतले तरी सायकल त्या रस्त्याने खडखडत, उसळ्या घेत थेट पेठेपर्यंत जात असे.
जुने घर रस्त्याच्या पातळीपासून हातभर उंचीवर होते आणि दोन पायर्या चढूनच घरात जावे लागे. या पायर्यांचे दगडही निसटायला आले होते. गावातल्या सगळ्या घरांसारखे या घराच्या दारातूनच ग्राम पंचायतीचे गटार गेले होते. ते सदा तुंबलेले असे. कधीतरी ग्राम पंचायतीचा एखादा सफाई कामगार येऊन हातातल्या लोखंडी फावड्याने त्या गटारातली गदळ काढून त्याचे त्या गटारालगतच बारके बारके ढीग घालत असे. चार दिवस गटारातून काळे पाणी वाहत राही. मग वार्या-पावसाने, येणार्या-जाणार्या बैलगाड्या, माणसे यांच्या वर्दळीने आणि गल्लीत सदैव चालत असलेल्या कुत्र्यांच्या दंगलीने हे कचर्याचे ढीग पुन्हा विस्कटून गटारातच पडत आणि गटार पुन्हा तुंबत असे.
घराचा मुख्य दरवाजा चांगला बारा फूट उंचीचा होता. कोणे एके काळी त्याला चांगली मजबूत लाकडी दारेही असतील. पण मला आठवते तसे ती दारे अगदीच खिळखिळी झालेली होती. दोन्ही दारे चिरफाळलेली होती आणि त्या दारांच्या लाकडांना कीड लागलेली होती. दरवाजा लावताना दरवाज्यांवरच्या बारीक भोकांमधून पिवळसर भुक्की भुरुभुरू पडत असे. दाराच्या आतल्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीला तर काही अर्थच नव्हता. दरवाज्यातल्या फटीतून हात घालून बाहेरच्या माणसाला ती सहज काढता येत असे. दाराच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी म्हणून बसवलेले घडीव आयताकृती दगड बाकी अगदी ठसठशीतपणाने टिकून होते. त्यातल्या उजव्या बाजूच्या दगडावर बसून आजी समोरच्या घरातल्या धनगराच्या म्हातारीबरोबर गप्पा मारत असे. दरवाजाच्या आत गेल्यागेल्या दोन्ही बाजूला दोन ढेलजी होत्या. एका बाजूच्या ढेलजीवरचे छप्पर काही दिवस शाबूत होते आणि त्या ढेलजीतल्या अंधार्या कोंदट खोलीत काही दिवस कल्लव्वा आणि तिची अकरा का बारा मुले भाड्याने राहात होती. दुसर्या बाजूची ढेलज बाकी अगदी पडून गेली होती. तिच्यात गाईची वाळलेली वैरण नाहीतर शेणकुटे, तुरकाट्या असले काहीतरी जळण कसेतरी ठेवलेले असे.
आत गेल्यावर खडबडीत आणि उंचसखल असे चिंचोळे अंगण होते. वर्षातून एकदा पायाला अगदीच खडे टोचायला लागले की चार पाट्या मुरुम टाकून धुमुसाने नाहीतर बडवण्याने बडवून ते अंगण जरा त्यातल्या त्यात सपाट केले जाई. पण चार दिवस गेले की पावसापाण्याने वरची माती वाहून जाई आणि परत पायाला खडे टोचायला लागत. रोज अंगण झाडून काढणे आणि शेणकाल्याचा सडा टाकणे हे एक नित्याचे काम होते. अंगणात एक तुळशीवृंदावन होते . रोजची रांगोळी त्या वृंदावनापुरती असे. पण दिवाळीत बाकी अंगणभरच नव्हे, तर रस्त्यापर्यंत रांगोळ्या काढल्या जात. त्या अंगणाच्या मधूनच सांडपाण्याचा एक ओहोळ दरवाज्याकडे गेलेला होता. त्या ओहोळाला बाहेरच्या गटारात जायला काही साधन ठेवलेले नव्हते. एखाद्या बेवारशी कुत्र्यासारखा तो ओहोळ इथे-तिथेच पडलेला असे. अंगणात डाव्या हाताला पाण्याचा हौद होता. ग्राम पंचायतीचे पाणी अगदी कमी दाबाने यायचे, म्हणून त्या पाण्याची तोटी जमिनीपासून अगदी कमी उंचीवर होती. तिच्याखाली एक लहानशी बादली किंवा कळशी कशीबशी मावत असे. त्या कळशा, घागरी भरभरून तो अंगणातला पाण्याचा हौद भरणे हे एक मोठे काम होऊन बसले होते. ग्राम पंचायतीच्या पाण्याचा काही भरवसा नसे. ते कधी येई, कधी येत नसे. आले तरी किती वेळ टिकेल हेही काही सांगता येत नसे. उन्हाळ्यात तर आठवडाच्या आठवडा नळाला पाणी नसे. मग मळ्यातल्या विहिरीतून पाण्याचा मोठा हौद भरून तो बैलगाडीत घालून गावातल्या घरात आणावा लागे. ते पाणी बादल्याबादल्याने अंगणातल्या हौदात भरावे लागे. त्या बाहेरच्या हौदातून घराच्या परसात असलेल्या हौदात पाणी नेऊन टाकणे हे तर महाकठीण असे काम होते. घरात जायचे म्हणजे दगडी पायर्या, उंच उंबरे, जाती, उखळे,लहानमोठे कट्टे असे असंख्य अडथळे पार करत जावे लागत असे. त्यात घरातली एक चौकट काही दुसरीच्या आकाराची नव्हती. त्यामुळे सतत कुठे कमी तर कुठे जास्त वाकूनच एका खोलीतून दुसर्या खोलीत जावे लागे. पण त्याची इतकी सवय झाली होती की न चुकता त्या त्या दारातून कमीजास्त वाकून लोक भराभरा दुसर्या खोलीत जात असत. कुणाला चौकट डोक्याला लागून जखम झाली आणि खोक पडली असे मला तरी आठवत नाही. पाणी भरण्याचे काम आम्ही लहान असताना गडीमाणसे करत. हे गडीही बहुदा वर्षाच्या कराराने बांधून घेतलेले असत. एक पोते जोंधळे आणि अकराशे-बाराशे रुपये यावर तो गडी वर्षभर पडेल ते काम करत असे. माझ्या वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षापासून अशी कामे करायला माणसे मिळेनाशी झाली, तेव्हा हे काम आमच्यावर आले. सकाळी बाहेरचा हौद भरणे आणि रात्री तेच पाणी आतल्या हौदात नेऊन टाकणे हे काम अत्यंत उत्साहाने कितीतरी वर्षे केल्याचे मला आठवते. नंतर नंतर तर दोन्ही हातात भरलेल्या कळशा घेऊन जवळजवळ धावतच अंगण, पडवी, सोपा, माजघर, स्वयंपाकघर ओलांडून जागोजागी वाकत वाकत परसात जायचे आणि तिथल्या हौदात धबाल करून त्या कळशा ओतायच्या यात मजाच मजा वाटत असे. बाहेरच्या हौदापासून आतल्या हौदापर्यंत एक पाईप आणि अर्ध्या हॉर्सपॉवरची एक मोटार यासाठी पैशाची जुळवाजुळव करायला माझ्या वडिलांना कित्येक वर्षे लागली. एकूणातच पाणी हा जुन्या घरातला एक फारच मोठा प्रश्न होता. घरातल्या बर्याच लोकांचा दिवसातला बराच वेळ पाण्याची व्यवस्था करण्यातच जात असे.
जुन्या घराचे अंगण काही फार मोठे नव्हते, पण त्यात एक बाग असावी अशी माझी शाळकरी महत्त्वाकांक्षा होती. बाग करण्याचे माझे लहानपणीचे कितीतरी प्रयत्न वाया गेले. शेवटी दांडगाईने मुर्दाडासारखी वाढलेली काही कर्दळीची झाडे एवढेच त्या बागेचे स्वरुप शिल्लक राहिले. बाकी मी लावलेली रोपे म्हणजे तरी काय म्हणा, कुणीतरी दिलेल्या गावठी गुलाबाच्या फांद्या, मळ्यातूनच आणलेले एखादे मोगर्याचे रोप किंवा शाळेतूनच उपटून आणलेले एखादे चिनी गुलाबाचे झुडूप. पण यातले काही म्हणजे काही त्या बागेत जगले नाही. पण एकदा कसे कुणास ठाऊक, माझ्या चुलत आत्याने मठातून आणलेले एक पारिजातकाचे झाड त्या बागेत रुजले आणि हां हां म्हणता ताडमाड वाढून बसले. मोजता येणार नाही इतक्या फुलांनी ते झाड फुलत असे आणि दर वर्षी श्रावणात आजी त्या फुलांचा लक्ष करत असे. त्या झाडाच्या भिंतीपलीकडे गेलेल्या फांद्या सावरायला म्हणून मी भिंतीवर चढलो आणि पायाखालची वीट फुटून धाडकन खाली कोसळलो होतो. मला लागले फारसे नव्हते पण घाबरून आणि मुक्या माराने मला हबक भरल्यासारखे झाले होते. सकाळी उठून ते पारिजातकाचे झाल हलवणे आणि त्याची परडीभर फुले गोळा करून ती परडी देवघराच्या कट्ट्यावर आणून ठेवणे हे घरातल्या मुलांचे आवडीचे काम होते. पुढे एका पावसाळ्यात रपारपा पाऊस पडत होता आणि नेहमीसारखेच दिवे गेलेले होते. एकदम वीज कडाडली आणि तसलाच काहीसा आवाज अंगणातूनही आला. अंधारात काही दिसले नाही पण ‘झाड पडलं जणु’ असे कोणीसे म्हणाले. दुसर्या दिवशीसकाळी बघतो तर खरेच तो पारिजातकाचा वृक्ष उन्मळून पडला होता. मग कुर्हाडीने तो तोडला आणि एखादे मेलेले जनावर गावाबाहेर नेऊन टाकावे तसे त्याचे रुक्ष खोड आणि खरखरीत फांद्या उकीरड्यावर नेऊन टाकल्या. घरातले एखादे माणूस जावे तसे काहीसे त्यावेळी झाल्याचे आठवते. त्या भुंड्या जागेकडे बरेच दिवस बघवतही नव्हते.
अंगणातल्या उजव्या बाजूला गुरांना दिवसा बांधायची जागा होती. कधी गाय, कधी म्हैस असले काहीतरी दुभते जनावर आणि त्याचे एखादे वासरु, रेडकू तेथे दिवसा बांधलेले असे. बर्याच वेळा भाकड जनावरे मळ्यातच असत. एखादी गाय किंवा म्हैस व्याली आणि तिच्या चिकाचे दिवस संपले की मग तिला घराकडे दुभत्यासाठी आणले जाई. काही वेळा घरातही गाईचे वेत होई. गाईचा पाडा असला किंवा म्हशीची रेडी असली तर त्यांना गाई-म्हशीचे थोडे दूध राखून ठेवलेले असे, म्हणून ती जरा तजेलदार दिसत. कालवडी किंवा रेडे पाळणे बाकी परवडत नसे. कालवडींचे दूध तुटले की त्या कुठल्या तरी कुळवाड्याकडे अर्धलेनी म्हणून दिल्या जात. मग अशा कालवडी मोठ्या होऊन गाभण राहिल्या की मग घरी परत येत. मग त्यांची अंदाजे काहीतरी किंमत ठरवून त्या किंमतीचा निम्माभाग त्या कुळवाड्याला दिला जाई, म्हणजे बहुतेक वेळा त्यांनी अंगावर घेतलेल्या उसनवारीतून वळता केला जाई. वासरांचा बाकी घरातल्या लहान मुलांना लगेच लळा लागे. बारके नुकतेच जन्मलेले वासरू धडपडत आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना घरातली मुले त्याच्या अवतीभवती असत. त्या वासराची नाळदेखील पूर्ण सुकलेली नसे. आपल्या मोठ्या, काळ्याभोर डोळ्यांनी ते वासरू टुकुटुकू इकडे-तिकडे बघत असे. मधूनच ‘बें.. ‘ असा काहीतरी आवाज काढी. शेजारीच बांधलेली त्याची आई घशातल्या घशात ‘डुर्र..’ असे काहीतरी करी. वासराच्या तोंडावरुन, पाठीवरून हात फिरव, त्याच्या ओलसर नाकाला हात लावून बघ, त्याच्या कानात बघ, असे तासनतास निघून जात. वासरे मोठी होऊन एखादे पान चघळायला लागली की त्याला वैरण भरवण्याची चढाओढ लागे. ते वासरू बाकी दिवसदिवस एकच पान चघळत बसलेले असे. रेडे बाकी त्यामानाने मठ्ठ असत. त्यांच्याकडे मोठ्या माणसांप्रमाणे मुलांचेही दुर्लक्षच होत असे. थंड, भावशून्य नजरेने आयुष्यात कसलीही उमेद नसलेल्या माणसासारखे ते तासनतास उभे असत. नुकत्याच जन्मलेल्या रेड्यालासुद्धा जन्मल्याचा आनंद असा काही होत असेल, असे त्याच्या चेहर्यावरून वाटत तरी नसे. पुढे म्हैस परत गाभण राहिली आणि तिचे दूध खारट व्हायला लागले की ते रेडे एक दिवस दिसेनासे होत. ते कुठे जात हे त्या वेळी कळत नसे. ते कापायला जात हे आज ध्यानात येते.
अंगण ओलांडले की घराचे मुख्य दार होते. त्याला ‘पत्र्याचे दार’ म्हणत. ते दार काही पत्र्याचे नव्हते, पण त्या दारानंतर जी पडवी होती, तिच्यावर पत्रा घातलेला होता. म्हणून त्याला पत्र्याचे दार म्हणत असावेत. पडवीत दगडी फरशी घातलेली होती. पडवीतच एका बाजूला गोठा होता. दुभते जनावर आणि तिचे वासरु, रेडकू जे काय असेल ते रात्री या गोठ्यात बांधले जाई. पडवीत मधोमध एक हातपंप होता. फार पूर्वी त्याला कधीतरी भरपूर पाणी होते म्हणे. पण आता वापरात नसल्याने त्याच्या जमिनीखालच्या सगळ्या नळ्या गंजून गेल्या होत्या. कधीतरी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत त्या हातपंपाशी खेळण्याची लहर येई. त्या पंपाचा लांब, लोखंडी दांडा कुठेतरी इकडेतिकडे ठेवलेला असे. तो शोधून काढून तो त्या पंपाला बसवून त्याच्याशी चांगली अर्धा पाऊण तास झटापट केली की मग तो दांडा जड लागायला लागे आणि मग एकदम त्या नळातून गंजलेले लालभडक पाणी यायला लागे. ते काही म्हणजे काही कामाचे नसे. मोरीतून बाहेर जाऊन ते पाणी अंगणात पसरे आणि अंगण लालेलाल दिसायला लागे. गंजक्या लोखंडाचा वास पडवीभर पसरलेला असे आणि घरातली मोठी माणसे वैतागलेली असत.
पडवीच्या वर दोन पायर्या चढून सोपा होता. हा सोपाही सगळ्या घरासारखा दणकट, पण ओबडधोबड होता. मोठमोठे खांब, तुळ्या, त्या तुळ्या खचू नयेत म्हणून त्यांना आधारासाठी दिलेल्या ठेपा, असला सगळा हुमदांडगा कारभार होता.सोप्याच्या एका कोपर्यात एक लोखंडी हौद होता. हा हौद धान्याच्या साठवणीसाठी होता. ही धान्येही बहुदा जोंधळे किंवा खपली अशीच असत. क्वचित भात असे. भात म्हणजे न सडलेला तांदूळ. हे जोंधळे निवडून पिठाच्या गिरणीतून त्याचे भाकरीसाठी पीठ करून आणणे, खपली भरडून त्याचे गहू करून आणणे, ते गहू पाखडून, निवडून त्याचे परत गिरणीतून पीठ करून आणणे, भात मिठाच्या पाण्यात भिजत घालून ते दुसर्या दिवशी पाण्यातून उपसून लहानशा पोत्यांमध्ये घालून सायकलवरून शेजारच्या शहरातल्या पोह्याच्या भट्टीत घेऊन जाणे आणि त्याचे पोहे करून आणणे, असली प्रचंड कष्टाची कामे करण्यात घरातल्या लोकांचा बराच वेळ जात असे. हौदाच्या शेजारच्या कोनाड्यात कंदील, चिमण्या, सुंदर्या असा उजेडाचा जामानिमा असे. रोज संध्याकाळी कंदिलांच्या वाती साफ करणे, चिमण्यांत रॉकेल भरणे आणि मुख्य म्हणजे रांगोळीने कंदील आणि सुंदर्यांच्या काचा साफ करणे हे न चुकता करायचे काम असे.
सोप्यातली सगळ्यात सुखाची जागा म्हणजे सोप्यातला झोपाळा. त्या झोपळ्याच्या मागे लगेच वर माडीवर जाणारा लाकडी जिना होता, म्हणून झोपाळ्याचा झोका काही फार मोठा घेता येत नसे. पण त्या झोपाळ्यावर जेवणाच्या आधी पोटात भुकेने कासावीस होत असताना आणि पोटभर जेवणानंतर डोळ्यावर झोपेची सुरेख गुंगी येत असताना बसून हलके हलके झोके घेणे यात अपार आनंद वाटत असे. झोपाळ्यावर एका कडीला टेकवून ठेवलेला एक घट्ट तक्क्या होता. त्याला टेकून पायाने जमिनीला रेटा देऊन झोका घेतला की मग तर आपण एखाद्या लहानशा राज्याचे सम्राट आहोत असेच वाटत असे. त्या झोपाळ्याखाली जमिनीत एक पेव आहे, असे आजी सांगत असे.
झोपाळ्याशेजारच्या भिंतीत एक अतिशय खोल असा कोनाडा होता. त्यात जुना व्हॉल्वचा रेडीओ होता. त्यावर रेडीओ सिलोन आणि आकाशवाणी पुण्याचे सहक्षेपित होणारे कार्यक्रम अजूनही लक्षात आहेत. ‘आपली आवड’ नावाचा मराठी गाण्यांचा एक फर्मायशी कार्यक्रम त्या काळात फार प्रसिद्ध होता. त्या कार्यक्रमापेक्षा त्याचे’टायटल म्यूझिक’च अधिक आकर्षक वाटत असे. सिलोनवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’,'सदाबहार नग़मे’, ‘बदलते हुए साथी’, ‘जब आप गा उठें’ असे कार्यक्रम ऐकायला मजा येत असे. ‘गैरफिल्मी नज़में और गज़लें’ लागली की बाकी कंटाळा येत असे.
पडवीच्या भिंतींच्या वरच्या अर्ध्या भागात लोखंडी गज बसवलेले होते. त्यामुळे सोप्यात तसा बर्यापैकी उजेड येत असे. दारासमोर बसले की थेट रस्त्यावरून येणारी जाणारी माणसे दिसत. सोप्यातल्या भिंतींवर रविवर्म्याच्या चित्रांच्या स्वस्तातल्या प्रतींच्या मोठमोठ्या चौकटी होत्या. तिथेच दारासमोर हरणाच्या कातड्यावर बसून आजोबा गुरुचरित्राची पोथी वाचत असत.रविवारी येणारा जानबा न्हावी तिथेच बसून आजोबांची दाढी करत असे. मळ्यात जाताना हातात धरायची आजोबांची काठी तिथेच ठेवलेली असे.दसर्याला सोने द्यायला आजोबांकडे खूप लोकांची गर्दी होत असे. कोट-टोपी घालून आजोबा त्यांच्या त्या बैठकीवर बसलेले असत. त्यांच्या शेजारी चवल्या-पावल्यांनी भरलेले एक ताट असे. सोने देऊन वाकून नमस्कार करणार्यांना आजोबा हाताला येईल ते नाणेही देत असत. पुढे आजोबांना दिसायचे कमी झाले तेव्हा अक्षराला अक्षर लावून सोप्यात बसून मी आजोबांना ‘सत्यवादी’ वाचून दाखवत असे. पुढे काही वर्षांनी आजोबा गेले तेव्हा त्यांचे पार्थिव याच सोप्यात ठेवले होते. पूर्ण कावर्याबावर्या झालेल्या माझ्या वयाच्या घरातल्या मुलांना कुणीतरी घाईघाईने ‘आजोबांना नमस्कार करायला चला’ म्हणून सोप्यात नेले आणि तितक्याच घाईने दुसरीकडे घेऊन गेले, ते सगळे याच सोप्यात.
जुन्या घरातल्या भिंती चांगल्या तीन-तीन फुटी रुंद होत्या. घराच्या दोन्ही बाजूला चिकटूनच दुसरी घरे असल्यामुळे आतल्या खोल्यांना खिडक्या वगैरे असणे शक्यच नव्हते. सोप्यातून माजघरात गेले की एकदम गार वाटत असे. माजघर प्रचंड अंधारे होते. दिवा लावला नसेल तर माजघरात डोळ्यांत बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख असे. सोप्यातून माजघरात जाताना वाटेत एक अतिशय उंच असा उंबरा होता. तो इतका उंच का होता आणि माजघरातून स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा इतका बुटका का होता हे मला आजपर्यंत कळालेले नाही. माजघरातून माडीवर जाणारा दुसरा दगडी जिना होता. तोही असाच एखाद्या गडाच्या पायर्या असाव्या तसा भक्कम, पण ओबडधोबड होता. त्याला काही कठडाबिठडा नव्हता, त्यामुळे त्यावरून जाताना जपून जावे लागे. तो जिनावरून बंद करता येईल असे एक छतातले दार होते. ते कशासाठी होते हेही कधी कळाले नाही. दोन्ही जिन्यांमधून पळापळी करताना पाय घसरून गडगडत खाली आल्याचे बाकी मला चांगले आठवते.
जुन्या घरातले स्वयंपाकघरही असलेच गैरसोयीचे होते. बराच काळ स्वयंपाक चुलीवरच होत असे. चुलीच्या जळणाची व्यवस्था करणे हे एक मोठे काम होते. शेतात तोडलेल्या झाडांच्या लाकडांचे लहानमोठे ढलपे, शेणकुटे,मक्याची बुरकुंडे, तुरकाट्या असले काहीबाही सरपण शेतावरून गाड्याच्या गाड्या भरून घरी येत असे. ते सरपण स्वयंपाकघराच्या माळ्यावर रचून ठेवलेले असे. आठ-पंधरा दिवसांतून हारेच्या हारे भरून ते सरपण खाली काढून द्यावे लागे. मग त्यावर स्वयंपाक आणि अंघोळीचे पाणी तापवले जाई. स्वयंपाकघरात चुलीवर बडवल्या जाणार्या गरम भाकरी, वाईलीवर उकळणारी मुगाची उदंड देशी लसूण घालून केलेली उसळ आणि घरच्या तांदळाचा भात हे म्हणजे ‘त्रैमूर्ती अवतार मनोहर’ वाटावे असे जेवण असे. जुन्या घरात जसे जेवलो, तसे पुढे आयुष्यात कुठेच मिळाले नाही. ताटभर गरमागरम माडगे ताट तोंडाला लावून प्यालो. गणपतीच्या एकवीस मोदकांचे ताट प्रत्येक मोदकावर एक चमचा तूप घालून संपवले. घरच्या आंब्यांचा आमरस बरोबरीने आसके दूध घालून वाडग्याने प्यालो. गरम भाकरीवर भरलेल्या दोडक्याची भाजी घालून तिचा काला करून जिभेला चटके देत चटकपटक खाल्ला आणि देशी रव्याचा गूळ, सुंठ आणि वेलदोडे घालून केलेला सांजा दूध-तूप घालून पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ला. जुने घर पूर्ण शाकाहारी होते. जुन्या घरात साधे एक अंडेही कधी फुटले नाही. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र ‘लुटुनी काय नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले ‘ अशी माझी भावना आहे. दूध-दही-तूप तर घरचेच असे. स्वयंपाकघरात दुभत्याचे एक भिंतीतले फडताळ होते. दूध, ताक, झाकपाक केलेले अन्न हे गार पाण्याच्या भांड्यांमध्ये घालून त्या फडताळातच ठेवलेले असे. फ्रीज ही वस्तू गावातच कुणाकडे नव्हती.
स्वयंपाकघरातच एका बाजूला घरातील इतर सर्व जागांप्रमाणे अतिशय गैरसोयीचे असे देवघर होते. एका जुन्या देव्हार्यात असंख्य देवांच्या मूर्ती, शाळीग्राम, लंगडा बाळकृष्ण, शंख, देवांचे टाक असे गचडीने ठेवले होते. देवपूजेला वेगळा पुजारी वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती किंवा ऐपत नव्हती म्हणा. पूजेचे शास्त्र बाकी काटेकोरपणे पाळावे लागे. चंदनाचे खोड, सहाण,पूजेचे वस्त्र हे सगळे जागच्या जागी ठेवावे लागे. गणपतीला दुर्वा, द्राशाळाचे फूल, शंकराला पांढरे फूल हे चुकवून चालत नसे. परसात दगडाची एक प्रचंड पिंड होती. तिच्यावर एरवी उन-पावसाचाच अभिषेक होत असे. पण शिवरात्रीला तिच्यावरही पांढरे फूल चढत असे.
स्वयंपाकघरातून परसात गेले की तिथे न्हाणीघर होते. त्या अंधार्या,दिव्याची आणि उजेडाची सोयसुद्धा नसलेल्या जागेला मला दुसरा शब्द सुचत नाही. वर्षानुवर्षे त्या न्हाणीघरातल्या चुलवणावर काळ्याकुट्ट पडलेल्या एका जुनाट हंड्यात अंघोळीचे पाणी तापवले जाई. पाणी तापवायचा बंब आला तोही फार नंतर. न्हाणीघर सतत ओले आणि अंधारे असे आणि त्याच्या कोपर्यात लठ्ठ,किळसवाण्या बेडक्या बसलेल्या असत.परसात एका कोनाड्यात दोन वरवंट्यासारखे दगड होते. त्या ‘ताईबाई’ आहेत असे म्हटले जाई. दर अमावस्येला ताईबाईला नारळ वाढवावा लागे.
जुन्या घराला अत्यंत बेंगरुळपणाने बांधलेली माडी होती. सोप्यावरच्या माडीला ‘बाहेरची माडी’ आणि माजघरावरच्या माडीला ‘आतली माडी’ असे नाव होते. दोन बहिणींपैकी झकपक असणार्या एकीने शिकून-सवरून नोकरी करावी आणि शहरात राहणारा सुशिक्षित नवरा पटकवावा आणि दुसरीने आपली बेताची बुद्धी आणि सामान्य रुप याची जाण ठेवून खेड्यातल्या एखाद्या शेतकर्याच्या गळ्यात माळ घालावी तसे या दोन माड्यांचे झाले होते. बाहेरच्या माडीवर नंतर फरशी केली, भिंतींना गिलावा केला आणि घरातला एकुलता एक सीलिंग फॅनही बाहेरच्या माडीतच लागला. आतली माडी ही बाकी वर्षानुवर्षे तशीच बिनगिलाव्याची, खडबडीत आणि पोपडे उडालेल्या जमिनीची आणि कोंदट राहिली होती. बाहेरच्या माडीला समोर पत्र्याची का असेना, पण एक गच्ची होती आणि कोजागिरीला आटवलेले दूध प्यायला किंवा चंद्रग्रहण बघायला ही गच्ची वापरली जात असे. आतल्या माडीत एका बाजूला ज्वारीची पोती रचलेली असत आणि एका कोपर्यात साठवणीचे कांदे ठेवलेले असत. बाहेरच्या माडीत आमच्या अभ्यासाच्या पुस्तकांचे कपाट होते, तर आतल्या माडीच्या छतांच्या वाशांना लसणाच्या माळा टांगलेल्या असत. आतल्या माडीत नाही म्हणायला उन्हाळ्यात आंब्याची अढी घातली जात असे तेव्हा ती माडी पिकलेल्या आंब्यांच्या सुवासाने दरवळून जात असे. उन्हाळ्यात दोन्ही माड्या चरचरीत तापत आणि पावसाळ्यात गच्चीतल्या पत्र्यावर जोराचा तडतड पाऊस वाजू लागला की छपरांतून सुरवंट टपटप अंथरुणात पडत.
त्या रानवट, गावठी जुन्या घरात, असल्या सगळ्या वेड्यावाकड्या,गाठीगाठीच्या आयुष्यात धडपडत, मिळेल तशी मुसंडी मारत, प्रसंगी अंग चोरून घेत माझे बालपण जगण्याचा प्रयत्न करत होते!
अनुभव
’तुम्ही काही म्हणा सर, दोन हजार वीस साली भारत ही महासत्ता होणार. होणार म्हणजे होणारच. हां, आता अगदी दोन हजार वीस म्हणजे शब्दश: धरु नका तुम्ही, पाचदहा वर्षं इकडंतिकडं. पण होणार. ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजा…’ मी चहाचा घोट घेताघेता उत्साहाने म्हणालो. ’युरोप युएसए सोडाच. त्या इकॉनॉमीज सॅच्युरेट होताहेत. पण ब्रिक्स कंट्रीजमध्येही आपल्याशी सामना करु शकणारं कुणी नाही. आपली इकॉनॉमी तर वाढणार आहेच. अॅग्रीकल्चरमध्येही आपण पाच टक्क्यांच्या वर ग्रोथ रेट गाठणार. गाठणार काय, गाठलाच म्हणून समजा या वर्षी. बाकी सर्व्हिसेस तर आहेतच. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण ठीकठाक आहोत. पण ते सुधारेल हळूहळू. आणि दुसरं मह्त्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेलं कुशल मनुष्यबळ बघा. स्किल्ड ह्यूमन रिसोर्सेस. जगात प्रत्येक वर्षी सगळ्यात जास्त ग्रॅज्युएट्स आणि पोस्टग्रॅज्युएट्स भारतातल्या विद्यापीठांतून बाहेर पडतात. हे सगळे कॅन्डिडेट्स आपण सगळ्या जगाला पुरवू शकू. आता या मोठ्या तरुण लोकसंख्येचा टॅलन्ट हा तर मोठा अॅसेट आहेच, पण दुसरा म्हणजे भाषा. इंग्लिश ही सगळ्या जगाची बिझनेस लँग्वेज आहे. भारतात जगातले सगळ्यात जास्त इंग्लिश बोलणारे-लिहिणारे लोक आहेत. ते झालंच तर……’ आपण फार बोलतोय असं वाटून मी थोडा थांबलो. माझ्या समोरचे पिकलेले प्राध्यापक मिशीत हसले. ’तुमच्या तोंडात साखर पडो, राजाधिराज…’ ते म्हणाले. ’साखर पडो, साखर. पण तुमच्या आवडत्या लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर हे सगळं असं केळीच्या खुंटासारखं सरळसोट असतंय होय? काय ते तुम्ही म्हणालात ते.. कुशल मनुष्यबळ वगैरे…’
मी पुन्हा थांबलो. या वर्षी पुण्यातल्या एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु होती आणि विद्यार्थ्यांचे समूहसंवाद आणि वैयक्तिक मुलाखती – जीडीपीआय- यासाठी आम्ही काही लोक जमलो होतो. काही प्राध्यापक, काही इंडस्ट्रीतले लोक….ही संस्था म्हणजे पुण्याच्या- पर्यायाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक जीवनात मोलाची भर घालणारी वगैरे म्हणून प्रसिद्ध आहे. गेली काही वर्षं अशा प्रवेशप्रक्रियांमध्ये उमेदवार मुलांशी संवाद साधणं हा अगदी आनंददायक अनुभव होता. या मुलांच्या सामाजिक जाणिवा, आसपासच्या परिस्थितीबाबत असलेलं त्यांचं भान, स्वतंत्र विचार करण्याची त्यांच्यात असलेली क्षमता आणि तसा विचार करण्याचं त्यांच्यांत असलेलं धाडस, (विद्यार्थी असूनही) या मुलांमध्ये आढळणारी नम्रता आणि संभाषणचातुर्य यांनी मी प्रभावित झालो होतो. या वर्षी असेच काहीसे स्वत:ला समृद्ध बनवणारे आणि आपल्या व्यवसायाविषयी समाधानाची भावना मनात आणून देणारे फार दुर्मिळ क्षण येतील या आशेने आम्ही लोक या संस्थेच्या आवारात आलो होतो. चहापान सुरु होतं. एकूण व्यवस्था उत्तमच होती. दोन दोन परीक्षकांचे गट केलेले, प्रत्येकाच्या नावाचं छोटं फोल्डर, प्रत्येक परीक्षकाचं ओळखपत्र, नवीकोरी उत्तम दर्जाची पेन्स, पेन्सिल्स, इरेझर्स, नाश्त्यासाठी मोजके पण चविष्ट पदार्थ. संस्थेच्या संचालकांनी बरोबर नवाच्या ठोक्याला स्वागताचं छोटसं भाषण सुरु केलं. त्यात ही प्रवेशप्रक्रिया किती महत्त्वाची आहे, आम्हा परीक्षकांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी किती मोठी आहे आणि आम्ही अत्यंत वस्तुनिष्ठपणे, कोणत्याही पूर्वगृहशिवाय ही जबाबदारी पूर्ण करणं संस्थेसाठी किती गरजेचं आहे असं वगैरे आवर्जून सांगितलं. उत्तम इंग्रजी, विनम्र आणि नेमके शब्द आणि प्रामाणिक भावना. चहा-कॉफीचे कप खाली ठेवून निघताना येते दोनतीन दिवस फार चांगले जाणार अशी एक भावना मनात येऊन गेली. त्या प्राध्यापकांचे शब्द बाकी मनातून जात नव्हते.
प्रत्यक्ष ग्रूप डिस्कशन्सना सुरवात झाली आणि कुठंतरी काही खटकायला लागलं. मुलं-मुली आक्रमकपणे बोलत होती, सफाईदारपणानंही बोलत होती. ’लिसनिंग स्किल्स’चं महत्त्व आठवून इतरांचं ऐकूनही घेत होती, पण सगळंच वरवरचं, उथळ बोलणं. कुणी मध्येच काही डेटा देत होतं: या वेबसाईटवर हे म्हटलं आहे, ’टाईम्स’ मधली ही अशी आकडेवारी आहे वगैरे, पण कुठे स्वत:चा विचार काही नाही. वैयक्तिक मुलाखतीत तर हे अधिकच जाणवायला लागलं. राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते का? या प्रश्नाला ’नव्हते बहुदा.. की होते?’ असे उत्तर या विद्यार्थ्यांपैकी एकाकडून मिळाले. या उत्तरापेक्षाही हे उत्तर देताना त्याच्या चेहर्यावरचे मिश्किल हसू अधिक धक्कादायक होते. नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्री आहेत, गीर हे भारतातले वाघांसाठीचे सर्वात मोठे अभयारण्य आहे, जयराम रमेश हे केंद्रीय शेतीमंत्री आहेत, २६ जानेवारी १९४८ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे, भारतातली चित्त्यांची संख्या ५०० च्या आसपास आहे आणि सगळ्यावर कळस म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि परवेझ मुशर्रफ हे आग्रा समीटसाठी इस्लामाबाद येथे भेटले…. अशी उत्तरं ऐकू यायला लागली. मला काही कळेनासं झालं होतं. मी माझ्या सोबतच्या परीक्षकाकडं प्रश्नार्थक नजरेनं बघीतलं. त्यानंही हताशपणे खांदे उडवले.
’इंदिरा गांधींच्या मारेकर्यांची नावं सांगता येतील?’ मी तरीही आशा सोडली नव्हती.
’सम सिंग, राईट? ही वॉज अ सर्ड, वॉजन्ट ही?’ ‘सर्ड’ या शब्दाकडं मी दुर्लक्ष केलं.
’सम सिंग?’
’सॉरी, आय वॉजन्ट बॉर्न देन..’ समोरची कन्यका म्हणाली.
मी मनात म्हणालो, नथुराम गोडसे हे नाव मला ठाऊक आहे. गांधीहत्त्येच्या वेळी मीही जन्मलो नव्हतो, बये!
’वाचता काय आपण?’
’वेल, आयम नॉट रिअली इनटू रीडिंग. बट आय रीड सम बुक्स – इंग्लिश-मोस्टली…’
’इंग्रजी काय वाचता तुम्ही?’
’चेतन भगत – थ्री मिस्टेक्स ऒफ माय लाईफ, वन नाईट…’
’पुरे, पुरे… हिंदी?’
’हिंदी, यू मीन बुक्स?’
’हो, बुक्सच.’
’नॉट रिअली. स्कूलमध्ये वाचले होते लेसन्स . परसाई ऒर समथिंग… सॉरी’
’हिंदी कविता?’
’बच्चन’
’व्हॉट ऒफ हिम?’
’फादर ऑफ अमिताभ बच्चन. ग्रान्डपा ऑफ अभिषेक.’
आता ही बया अभिषेक किती हॉट किंवा किती कूल आहे हे सांगेल या भयाने मी पुढचा प्रश्न विचारला नाही. पण त्या बयेनंतर आलेली मुलं-मुली यांच्यात मला सरस-निरस करणं मोठं मुश्किल होऊन बसलं. बहुदा सगळे इंग्रजी माध्यमातले, म्हणून एकाला गंमतीनं ’ अ सेंट सेंट अ सेंट ऒफ अ सेंट टु अनादर सेंट’ या वाक्याचं ’ सेंट’ हा शब्द न वापरता इंग्रजीत भाषांतर कर म्हणून सांगितलं तर तो जवळजवळ तुच्छतेनंच हसला. ’कसले जुनेपुराणे प्रश्न विचारता..’ असा त्याच्या चेहयावर भाव होता. मग पुढचा ’जॉन व्हेअर जेम्स हॅड हॅड……’ हा प्रश्न काही मी विचारला नाही.
पंडीतजी जाऊन जेमतेम आठवडा झाला होता. भारताच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या आठवड्याभरात महत्त्वाचं असं काय झालं या प्रश्नाला दहातल्या आठांनी फक्त कपाळावर एक आठी टाकली. एकजण ’ओह दॅट, सम सिंगर डाईड, राईट? ऑर वॉज ही अ म्यूझिशियन?’ असं म्हणाला. एका मुलीला बाकी नावानिशी माहिती होतं. नशीब आमचं! भारतातल्या प्रसिद्ध संगीतकारांचं एखादं उदाहरण सांग म्हटल्यावर एकूणेकांनी रहमानचं नाव घेतलं. ’सतार, संतूर, सरोद’ असलं यातल्या बर्याचजणांनी काही ऐकलेलंही नव्हतं. एक दोन मराठी मुलांना आवडते मराठी लेखक विचारले तर पु.ल. देशपांडे या एकाच नावावर गाडी अडून बसली. एखाद्या कवीचं नाव विचारल्यावर एकानं फाडकन संदीप खरेचं नाव घेतलं. पुढे? पुढे काही नाही…..
दुपारच्या जेवणाला संस्थेचे संचालक भेटले. त्यांच्याजवळ मी जराशी नाराजी प्रकट केली त्यावर ते म्हणाले,’छे, छे, असले अवघड प्रश्न विचारुन कसं चालेल, सर? तुम्ही तर डिग्रीच्या मुलांना डॉक्टरेटचे प्रश्नच विचारले. थिंक ऑफ देअर एज, सर..’ मी काहीच बोललो नाही.
त्याबरोबरच सुमारे दोन वर्षांपूर्वी वाचलेलं काही आठवलं आणि मनात जरा चरकल्यासारखंही झालं. ’ते लिबरल आहेत’ नावाच्या वृंदा भार्गवे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखाचं कात्रण कालपरवा कागदपत्रांची आवराआवरी करताना सापडलं होतं. तीन-साडेतीनशे मुला-मुलींच्या लेखिकेने घेतलेल्या मुलाखतीवर आधारित हा लेख आहे. लेखिकेनं घेतलेल्या मुलाखतीतली मुलं-मुली म्हणजे आजच्या ’जनरेशन वाय’ चे प्रातिनिधित्व करणारी – आधुनिक वेशभूषा, प्रत्येकाजवळ महागडा मोबाईल फोन, दुचाकी आणि जवळजवळ प्रत्येकाच्या चेहर्यावर एक बेफिकीर भाव – अशी. ही मुलं कुठल्या माध्यमातून शिकणारी होती, याबाबत लेखिकेने काही लिहिलेलं नाही, पण सगळी मुलं मराठी होती इतकं नक्की. लेखिकेने घेतलेल्या मुलाखतींमधून या मुलांचं सामान्यज्ञान, एकूण समाजाविषयी त्यांना असलेलं भान, सजगता यावर काही प्रकाश पडतो, असे वाटते. या तरुण पिढीचे लेखिकेने केलेले परीक्षण – ते प्रातिनिधिक आहे असा लेखिकेचाही दावा नाही – विचार करायला लावणारे वाटते. उदाहरणार्थ ’तुषार’ नावाच्या मुलाला ’तुषार’ या शब्दाचा अर्थ काही पटकन सांगता आला नाही. खूप विचार करुन त्यानं सांगितल,’बुद्धिमान’! हे उत्तर नाही म्हटल्यावर त्यानं पुढं सूर्य, फूल, पानं असं काय वाट्टेल ते सांगायला सुरवात केली. ’मराठीचं पुस्तक वाचलंस का’ या प्रश्नावर त्यानं झटकल्यासारखं ’नाही, गाईड आणलेलं, पण वेळच मिळाला नाही’ असं तुटक उत्तर दिलं. या मुलाच्या मुलाखतीच्या सुरवातीनंच भारावून जाऊन मी त्या लेखाचा पुढचा भाग वाचला होता.
’का रे, नोकरी करतो कुठं?’
’छे… छे…’
’मराठी काय वाचलंस? पुस्तकं,लेखक, कवी?
’काहीच नाही’
’वर्तमानपत्र?’
’येतं घरी एक.’
’त्यातलं काय?’
’स्पोर्टस’
’कोणती बातमी?’
’आठवड्यापासून नाही वाचलं’
’मराठी म्हण सांग बरं एखादी? किंवा वाक्प्रचार?’
’कडी लावा आतली, मी नाही त्यातली.’
या पुढची मुलं म्हणजे तुषारच्याच काळ्या-गोर्या प्रती असल्यासारख्या होत्या. ’आत्मचरित्र’ म्हणजे काय या प्रश्नाला शंभरातले नव्वद ’आ..शिट.. ओह, जस्ट तोंडात आहे, ओ गॉड, वन सेकंद, वन सेकंद….’ अशी उत्तरं या मुलांनी दिली. आवडता लेखक कोणता हे विचारल्यावर या मुलांचे पहिले उत्तर ’सुनील गावसकर’ असे होते (कारण त्यांच्या पुस्तकात ’सनी डेज’ मधला उतारा धडा म्हणून होता), मराठी साहित्यातील साहित्यिक कोण यावर ’शिरवाडकर’ असे उत्तर या मुलांपैकी काहीजणांकडून आले, पण त्यांचं काय वाचलं, ऐकलं, पाहिलं यावर दुमडलेल्या ओठांची चित्रविचित्र घडी बघायला मिळाली असे या लेखिकेचे अनुभव आहेत. आवडता कवी यावर एक मुलानं ’सुनील जाधव’ हे नाव घेतलं ’हे कोण?’ असं विचारल्यावर तो म्हणाला की ’आमच्या शेजारीच राहतात, कविता बेस करतात’ त्यांच्या काही ओळी सांग म्हतल्यावर तो म्हणाला की ’कविता लक्षात नाही राहत, अर्थ सांगू का?’
कविता- असं समजून चालू की – प्रत्येकाचा प्रांत नाही. कथा- कादंबर्यांमध्येही या मुलांपैकी कित्येकांना शून्य रस असलेलाच दिसला. मोजक्या काहींनी मृत्युंजयचं नाव घेतलं (या कादंबरीचे लेखक त्यांच्या मते कर्नल शिवाजी भोसले!). या मुलांपैकी प्रत्येक जणच टीव्ही पहाणारा होता, पण टीव्हीवरचे आवडते कार्यक्रम विचारल्यावर मुलं क्रिकेट आणि एखाद-दुसरा रिअॅलिटी शो आणि मुली कौटुंबिक हिंदी मेलोड्रामापलीकडं जायला तयार नव्हत्या. बातम्या, राजकारण, समाजकारण याच्याशी तर या मुलांचा काही संबंधच नव्हता. वर्तमानपत्रातलं राशीभविष्य वाचणारे बरेचजण होते, पण अग्रलेख वाचणारा एकही नव्हता. सांस्कृतिक जीवन आणि इतिहासाची या मुलांना ओळख तरी आहे का हे पहावं म्हणून लेखिकेने त्यांना काही प्रश्न विचारले आणि विनायक दामोदर सावरकर हे पूर्ण नाव त्यातल्या एकाला माहिती आहे हे कळाल्यानं आपल्याला भरुन आलं असं लेखिका लिहिते. त्यांचं कार्य काय यावर त्याच गुणी विद्यार्थ्यानं ’सावरकरांनी दामोदर टॉकीज बांधलं’ असं उत्तर दिलं. टिळक आगरकरांपेक्षा या मुलांना गांधी जवळचे होते, पण ते त्यांच्या विचारांमुळे नव्हे, तर ’लगे रहो मुन्नाभाई’मुळे
राजकारणात या मुलांना काही गती किंवा रस असावा अशी अपेक्षा करणंच फोलपणाचं होत. तरीही आमदार आणि खासदार यांतला फरक यापैकी बहुतेक मुलांना ठाऊक नव्हता, हे वाचून मला दचकायला झालं. ही सगळी मुलं मराठी, म्हणून लेखिकेने या मुलांना काही मराठी शब्दांचे अर्थ विचारले. त्याला मिळालेली उत्तरं तर मती गुंग करुन टाकतात. सहिष्णू म्हणजे श्रीविष्णूचा भाऊ, सलिल म्हणजे लिलीचे फूल, अजिंक्य म्हणजे पराभूत, अटकळ हा नवीन शब्द दिसतो, चट्टामट्टा हा शब्द ऐकलेलाच नाही, नट्टापट्टासारखा आहे का?, धादांत म्हणजे ज्याचा लवकर अंत होतो तो, लाखोली म्हणजे लाख रुपयांची खोली…साहित्य अकादमीविषयी विचारलं तर ’पोलिस अकादमीसारखी असणार बा’ हे उत्तर..
या सगळ्या मुलाखत प्रकरणात आपल्याला काही अगदी मूलभूत प्रश्नांची उत्तरंही देता आली नाहीत, याची या तरुण वर्गाला कुठे खंत वगैरे वाटल्याचं लेखिकेला दिसलं नाही. लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात लेखिका लिहिते, ‘आता आपापल्या वाहानांजवळ येऊन त्या सगळ्यांनी एकच गिलका-गला केला….ह्या… करत परीक्षांची टर उडवली.टपून बसलेल्या चॅनलवाल्यानं उत्साह, उन्माद, जोश, आनंद सुटीचा या न्यूजसकटरसभरीत वर्णनाला प्रारंभही केला. काहींनी त्यांना कॅमेर्यात बंद करुन’बोला’ अशीखूणही केली. चेकाळून अनेकांनी इंग्रजी शब्दांचा आधार घेत परस्परांना हॅपी हॉलिडेजची आलिंगनं दिली. तरुण नावाचं भांडवल घेऊन. या सगळ्यात मी पास झाले की नाही हे मला कळालंच नाही.
भार्गवांचे हे अनुभव तसेच जगल्यासारखं मला वाटू लागलं.
दिवस पुढे सरकला. चित्रपटाचं एकच रीळ परत परत बघीतल्यासारखा अनुभव. चेहरे वेगळे, पण एकाच छापाचे. स्मार्ट, तरतरीत, आत्मविश्वासानं फुलून आलेले. कपड्यांचा उत्तम सेन्स. मुली तर एखाद्या फॆशन शो ला आल्यसारख्या नटलेल्या. सगळं कसं करेक्ट. पोलिटिकली करेक्ट.
दुपारच्या चहाला सकाळचेच मिश्कील प्राध्यापक भेटले. ’हं… काय म्हणतात तुमचे इंटरव्ह्यूज? तुमचं स्किल्ड ह्यूमन रिसोर्स? कधी होणार म्हणताय भारत महासत्ता?’ त्यांनी विचारलं. ’दोन हजार वीस साली’…’ मी चहाचा घोट घेताघेता म्हणालो. पण यावेळी माझा आवाज खाली आलेला होता. खूपच खाली.
जुना काळ
गावात अठरापगड जातींचे लोक होते. जैन, मराठा, धनगर, लिंगायत माळी या त्यातल्या जाती प्रमुख. महार, मांग, ढोर, पिचाटी हे त्यांच्या खालोखाल. ब्राह्मणांची आणि मुसलमानांची मोजकी घरे. ख्रिस्ती, पारशी वगैरे कुणी नाहीच. एखाद्याचे नाव दुसर्याच्या नावापेक्षा पेक्षा वेगळे असावे, तितकेच गावात जातीचे महत्त्व होते. आर्थिकदष्ट्या मागासलेल्या गटाचा दाखला भरताना शाळेतल्या मुलांना त्यात जातीचा उल्लेख करावा लागे. त्यापलीकडे रोजच्या जगण्यात जातीचा काही संबंध येत नसे. शाळेतल्या वर्गात ब्राह्मणाची मुले त्यातल्या त्यात हुषार होती. पण त्यावरुन स्फोट व्हावे असे त्याचे कुणाला काही वाटत नसे. ब्राह्मणांची काही मुले त्यातल्या त्यात शुद्ध बोलत आणि ब्राह्मणांच्या मुली स्वत:विषयी बोलताने ’मी येते, मी गेले, मी बघीतले’ असे म्हणत. बाकी तमाम लोक, अगदी मुलीसुद्धा ’येतो, जातो, खातो’ अशी क्रियापदे वापरत.. ब्राह्मणांची काही मुले बाकी कुणब्याच्या मुलांपेक्षा अधिक कळकट आणि घाणेरडी राहात आणि तशीच शिवराळ, अशुद्ध भाषा बोलत. रोजच्या जगण्याचा आणि जिवंत राहाण्याचा संघर्ष इतका प्रखर होता की तुझी जात- माझी जात, तुझी भाषा-माझी भाषा असा वगैरे विचार करत बसणे कुणाला फारसे परवडण्यासारखे नव्हते. पण तरी कुणी कसे राहावे, कसे वागावे याबाबत गावाच्या कल्पना स्पष्ट, आखीव होत्या. गावातली पाटीलकी, कुळकर्णीपण संपले होते, पण या कुटुंबांना गावात मान होता. गावातले जुने म्हातारे पाटील आणि कुळकर्णी यांच्या शब्दापुढे जाण्याची अगदी त्या वेळच्या नवीन पिढीचीही शामत नव्हती. गावातले म्हातारे कुळकर्णी संध्याकाळी त्यांच्या नातवाचा हात धरुन हळूहळू चालत मळ्याकडे निघाले की रस्त्यावरुन येणाराजाणारा त्यांना आदराने रामराम करत असे. ’दिवाणजी, मळ्याकडं निगालायसा? बर, बर..बरं हायसा न्हवं?’ अशी चौकशी करत असे. गावातले लहानसहान तंटे गावचे पाटील सोडवत असत आणि त्यांच्या शब्दांचा अनमान करण्याची कुणाची हिंमत नसे. या सगळ्याच्या बदल्यात या सगळ्या कुटुंबाना सूक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखे आयुष्य जगावे लागे. रस्त्यावरच्या चिंचेच्या झाडावर दगड फेकणार्या कुळवाड्याच्या पोरांकडे कुणाचे लक्षही जात नसे, पण पाटील-कुळकर्ण्यांच्या मुलांना असले काही करण्याची मुभाच नव्हती.
गावातले मुसलमान मोहरमचे पीर बसवत पण त्या पिरांची नावे शिवगोंड पाटील पीर, चावडी पीर अशी हिंदू होती. पिराच्या दर्शनाला सगळा गाव लोटत असे आणि पीर अंगात येणारे बहुतेक लोक तर बिगर मुसलमानच होते. असंख्य वस्त्रांनी जड झालेला तो पिराचा ताबूत ’तडतड तडतड’ वाजणार्या ताशामागे धुपाचा दरवळ घेऊन आमच्या दारात येत असे आणि पिराच्या पायावर पाणी घालायला आणि अंगात आलेल्या माणसाच्या पायावर डोके ठेवायला एकच गर्दी उडत असे. शिवगोंड पाटील पिराच्या आणि चावडी पिराच्या विसर्जनाच्या दिवशी प्रसादाचे सरबत आमच्या घरुन जात असे. दुपारची झोप झाली की माझे वडील दोन घागरी भरुन सरबत तयार करत असत. सरबत म्हणजे काय, तर भरपूर गूळ, सुंठ आणि बडीशेपेची पूड घालून केलेले पातळसर पाणी. मग मशीदीतून कुणी मौलवी एकदोन माणसांबरोबर हातात धुमसत्या नाडापुड्या आणि समोर तो धुंदी आणणारा ताशा घेऊन ते सरबत न्यायला येत असे. पीर हे कुण्या जातीचे नव्हे, तर सगळ्या गावाचेच दैवत होते. सगळ्या जातीचे लोक पिराला नवस बोलत. मला आठवते, आमच्या नव्या विहिरीचे खोदकाम सुरु होते आणि विहिरीला पाणी लागू दे, मग तुला चांदीचा नाल चढवीन असा वडीलांनी नवस बोलला होता. सुदैवाने विहिरीला भरपूर पाणी लागले आणि तो नवस फेडायला आम्ही घरातले सगळे वाजतगाजत शिवगोंड पिराच्या मशीदीत गेलो. वडीलांनी तो चांदीचा नाल पिरावर चढावला आणि समोर उभ्या असलेल्या माळ्याच्या फणफणून अंगात आले. मशीदीतल्या त्या कुंद, भारलेल्या वातावरणात तो घुमायला लागला. अंगात आलेल्या माणसाचे शब्द काही कळत नव्हते, पण ’तुझे बरे होईल, भले होईल, पोरेबाळे खुशाल राहातील, तुझी शेते पिकतील, तुझ्या वडीलांच्या प्रकृतीला आराम पडेल’ असे काहीसे तो मुसलमानी हिंदीत म्हणत होता. तो उदबत्त्यांचा वास, ती गर्दी, पिरावर चढवलेला तो चांदीचा लखलखीत नाल आणि त्या ताशाच्या तडतडीच्या पार्श्वभूमीवर त्या पीर अंगात आलेल्या लालबुंद डोळ्यांच्या आणि असंख्य घागरी पाणी सतत पायावर घेतल्यामुळे आणि गावभर अनवाणी हिंडल्यामुळे फुटक्या टाचांच्या माणसाचे कळणारे-न कळणारे शब्द मला आजही आठवतात आणि अंगावर सरसरुन काटा येतो. पिरांच्या विसर्जनाच्या दिवशी तर सगळा गाव बेभान होऊन नाचत असे. स्वत:भोवती गिरक्या घेणारे पीर एकमेकांना स्पर्श करत आणि ’पिरांच्या ’भेटी’ झाल्या” असे लोक म्हणत’. रात्री पिराच्या मैदानात ’खाई’ होई. संध्याकाळपासूनच त्या मैदानात एका उथळ, आयताकार खड्ड्यात मोठमोठी लाकडे पेटवली जात. रात्रीपर्यंत तो खड्डा रसरसत्या निखार्यांनी भरुन जात असे. ते इंगळी अंगार फुलले की मग त्यावरुन पिराचे उपासक इकडून तिकडे पळत जात. कुणी हातात ओंजळभर निखारे घेऊन ते वर उधळत असे. ’खाई’ खेळणार्या कुणाला कधी भाजले असे माझ्या तरी स्मरणात नाही. रात्री उशीरपर्यंत लोक खाई खेळत आणि अंगाभोवती गोधड्या, कांबळी गुंडाळून विस्मयभरल्या नजरेने प्रेक्षक ती खाई बघत असत. पिराच्या विसर्जनाची मिरवणूक रात्री दहा-अकराच्या सुमाराला वाजतगाजत नदीच्या दिशेने जाई आणि गाव विलक्षण शांत, मोकळा मोकळा वाटू लागे. रात्री उशीरा कधीतरी मिरवणुकीत नाचणारे मुसलमान पिराचे विसर्जन करुन परत येत आणि येताना गंभीर, खर्जातल्या आवाजात काहीतरी प्रार्थनेसारखे, मंत्रासारखे म्हणत. गावातल्या शांत, थंड हवेत शे-दोनशे लोकांनी खालच्या सप्तकात म्हटलेले ते स्वर ऐकताना हुरहुरल्यासारखे होत असे. थोडी भीतीही वाटत असे.
गावात सर्वात जास्त घरे जैनांची. जैन समाज हा भगवान महावीरांचा उपासक. गावात दोन जैनबस्त्या होत्या. जैनांची पूजा-अर्चा त्या बस्त्यांमध्ये चालत असे. जैन लोक कष्टाळू आणि पैशाला चिकट. धोतराला ठिगळे जोडून, गाठी बांधून ते वापरतील. स्वत:च्या पैशाने कुणाला कधी अर्धा कप चहा पाजणार नाहीत. पण घरात पाच पाच लाखाचे सोने बाळगतील. गावातल्या कुणाची (बहुदा गाव सोडून शहरात जाणार्या एखाद्या ब्राह्मणाचीच) जमीन विकायची झाली तर जैनाचा आकडा सगळ्यात मोठा असे. जैनांच्यात खास जैनी आडनावाचे लोक होते. टारे, भबुजे, भगाटे, आवटे, कुगे, कर्याप्पा, चकोते, टेंगिनकिरे, हातगिणे असली खडबडीत, ओबडधोबड आडनावे. पाटील समाजातल्या बहुतेक मुलांची नावे ’गोंडा’ हा प्रत्यय जोडलेली असत. भीमगोंडा, पायगोंडा, नरसगोंडा, बाबगोंडा अशा नावाची माझ्या वर्गात मुले होती. बाकी मुले चंद्या, शंकर्या, विज्या, रावशा, भरत्या अशा नावाची. मुली छ्बू, मंगल, राजी, रुकमी अशा नावाच्या. एकूण गावावर आणि गावातल्या लोकांवर एक उग्र, खडबडीत कळा होती. नदीच्या काठावर वसलेले निसर्गाच्या कुशीतले, प्रेमळ, साध्या, देवभोळ्या लोकांचे पुस्तकातल्या कवितेतले गाव आणि आमचे गाव याचा एकमेकांशी काही संबंधच नव्हता. आमच्या गावातले लोकही तसेच उग्र, मळकट दिसणारे होते. वाढलेल्या दाढ्या, पानतंबाखू खाऊन लालपिवळे झालेले दात, अंगाला एक गावठी दर्प , फाटके, मळके कपडे आणि तोंडात शिवराळ कानडीमिश्रित भाषा असे गावातल्या माणसांचे एकूण रुप असे. बायका एकजात चोपलेल्या, पोराबाळांचे लेंढार सांभाळणार्या आणि सासू, नवरा आणि नणंदा यांच्याकडून होणार्या छळाने सुकून गेलेल्या असत. गावात जातपात फारशी नव्हती, पण किरकोळ कुरबुरी चालूच असत. त्यांचे कारणही जगण्याचा मूलभूत झगडा असेच असे. कुणाचे पोटरीला आलेले जोंधळ्याचे पीक रातोरात कुणी कापून नेई, कुणाच्या शेतातला बांध कुणी दोन सर्या सरकवून घेई आणि बांधावर असलेल्या लिंबाच्या, आंब्याच्या झाडावरुन तर सतत भांडणे होत. हे शेतकरी भांडणे गावात सुटली नाहीत की तालुक्याला जाऊन एकमेकांविरुद्ध कज्जे घालत आणि वकिलांच्या संसाराची सोय करत. वर्षानुवर्षे हे कज्जे चालत आणि तारखेला तालुक्याला गेलेले वादी-प्रतिवादी संध्याकाळी एकाच येष्टीने तालुक्याहून परत येत. बहुदा पुढची तारीख पडलेली असे. येष्टी ष्ट्यांडावर उतरुन हे वादी प्रतिवादी एकमेकांकडे तांबारल्या नजरेने बघत, खाकरुन धुळीत थुंकत आणि मिशीवर मूठ फिरवत अंधारात आपापल्या घरांकडे चालू लागत. हे वर्षानुवर्षे होत राही…
गावाचे ग्रामदैवत भैरोबा होते. भैरोबा हा धनगरांचा देव. गावाबाहेरच्या देवळात भैरोबाचा उग्र मुखवटा होता. तो नेमका कसा होता हे बाकी कधी दिसले नाही. कारण गाभार्यात प्रचंड अंधार असे. श्रावणातल्या तिसर्या रविवारी भैरोबाची जत्रा असे. देवाची गावभर पालखी निघे आणि खारीक-खोबरे उधळायला आणि देवाचे दर्शन घ्यायला मोठी गर्दी होत असे. पालखीसमोर भलीमोठी सासनकाठी तोलत धनगर नाचत असत आणि देवावर उधळलेल्या भंडार्याने सगळे वातावरण भगवे-पिवळे होऊन जात असे. भैरोबा हे जागृत दैवत आहे, असा गावाचा विश्वास होता. मुले न होणारी जोडपी भैरोबाला ’मूल होऊ दे, तुझ्या कळसावरुन त्याला खाली टाकीन’ असला क्रूर, न समजण्यासारखा नवस बोलत. एकदोन वर्षात तो नवस फेडायला ते जोडपे येत असे. बरोबर असलेल्या लवाजम्यात एक कुंची घातलेले आणि काजळाने डोळे बरबटलेले तान्हे बाळ असे. मग एकदोन माणसे देवाच्या कळसावर चढत. दोनपाच माणसे एक दणकट चादर चारी बाजूनी हातात पकडून हात वर करत आणि मग ती कळसावर चढलेली माणसे त्या तान्ह्या बाळाला अलगद त्या चादरीत सोडून देत. ते अंतर चारपाच फुटाचेच असे, पण ते दृष्य बघताना काळजात धस्स होत असे. ते लहानगे बाळ त्या धक्क्याने कळवळून रडायला लागे आणि सगळे बघे ’भैरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या आरोळ्या देत. रासवट, अडाणी पण चोख श्रद्धेच्या ललकार्या उठत. श्रावणात हवा पावसाळी कुंद असे आणि त्या तसल्या आजारी हवेतच देवळाकडे जाणार्या वेड्यावाकड्या उंचसखल वाटेवर जत्रेतील दुकाने, हॉटेले थाटलेली असत. भजी, जिलबी, बत्तासे, भेंडबाजे असले गावठी चवीचे पदार्थ त्या हॉटेलांत मिळत असत. एक घोट घेतला की थुंकून टाकावा असे वाटावे इतका गोड चहा गावातले गावडे पुन्हापुन्हा पीत असत. त्यावर चरचरीत तंबाखूचे पान खात नाहीतर कडक वासाच्या गावठी बिड्या ओढत. पानाच्या पिचकार्यांनी आणि बिडीच्या कडवट वासाने सगळे वातावरण अफिमी होत असे. भैरोबाच्या जत्रेच्या निमित्ताने गावात बैलगाड्यांच्या शर्यती होत, सुदृढ जनावरांच्या स्पर्धा होत आणि जत्रेच्या दिवशी रात्री माळावर तमाशाचा फड रंगत असे. या तमाशाची पटकथा कुणी सेन्सॉर केलेली नसे आणि असली तरी त्या तमाशात काम करणारे नट त्यात ऐन वेळी हशा पिकवण्यासाठी पदरची इतकी वाक्ये घालत, की त्या मूळ कथेला काही अर्थच राहिलेला नसे. भडक मेकप केलेल्या रावणासमोर उभा असलेला, किंचित पोट सुटलेला कोदंडधारी राम ’रावण्ण्ये, तुजायला लावला घोडा…’ असे म्हणून जबरदस्त हशा घेत असे आणि त्यात कुणाच्या भावना वगैरे दुखावत नसत. पुढे नाचणार्या बायका आल्या की मग तर काय प्रेक्षकांत लैंगिकतेचा सामुदायिक उद्रेकच होत असे. प्रेक्षकांतून टाळ्या, शिट्ट्यांबरोबर जे शेरे मारले जात, ज्या फर्मायशी केल्या जात त्याने आजही नागर मंडळींच्या कानातले केस जळतील. पण त्या नाचणार्या बायकांना आणि इतर तमासगीर मंडळींना त्याचे काही नसे. तसेच अश्लील विनोद होत, सुमार रुपाच्या आणि सुमार बांध्याच्या बटबटीत मेकप केलेल्या बायका तशाच नाटकीपणे नाचत राहात आणि जनता चेकाळून चेकाळून तमाशा बघत राही.
गावातले बरेचसे लोक शेतकरी होते. दोनपाच किराणा मालाचे दुकानदार, एखादे सायकल दुकान चालवणारा, एकदोन चहाचिवडा देणारी हॉटेले चालवणारे आणि मग इतर बारा बलुतेदार. नोकरी करणारे बहुतेक लोक प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक होते. गावात असलेले एक डॉक्टर आर.एम.पी. पदवीधारक होते आणि दुसर्या एका कम्पाऊन्डरने एका मोठ्या डॉक्टरकडे उमेदवारी करुन कसलीही पदवी नसताना स्वत:चा दवाखाना सुरु केला होता. तो लोकांना भसाभस इंजेक्शने टोचत असे आणि त्याच्या हाताला गुण आहे असा समज असल्याने त्याच्या दवाखान्यात तोबा गर्दी होत असे. गावात सतत रोगराईच्या साथी असत. पिण्याच्या पाण्याचे हाल असल्याने पोटाच्या विकारांने, जंतांने आणि नारुने लहान मुले पिडलेली असत. देवीचे जवळजवळ उच्चाटन झालेले होते, पण गोवर, कांजिण्या, डोळे येणे आणि पाचवीला पुजलेला ताप यांनी मुले हैराण झालेली असत. दवाखान्यात येणारे बरेचसे लोकही या ’थंड, ताप, डोसकं’ अशा आजाराने ग्रस्त असत. म्हातारी माणसे दमा, क्षय आणि पक्षाघाताने – गावाकडे त्याला ’लकवा मारणे’ असा शब्दप्रयोग होता- मरायला टेकलेली असत. बायकांची अवस्था तर फारच केविलवाणी असे. जेमतेम पदर येतो न येतो तोच होणारे लग्न, लागोपाठ होणारी मुले, अपुरा आणि नि:सत्व आहार आणि सतत दडपून, कुचमत जगावे लागणारे आयुष्य यामुळे त्या विझून गेल्यासारख्या दिसत. तिशीच्या आत बयाच बायका जख्ख म्हातार्या दिसायला लागत, आजाराने ग्रासत आणि झिजून झिजून मरुन जात. जननमार्गाचे आजार, मूळव्याध, अवघड जागी होणारी करटे अशा आजारांबाबत तर संकोच आणि अडाणीपणा यामुळे वर्षानुवर्षे यातना सहन करत त्या जगत असत. हसतमुख, प्रफुल्ल चेहयाचे लोक अगदी अभावानेच बघायला मिळत. तरुण लोकांमध्ये ’दारु पिऊन मरणे’ वाढत चालले होते. चांगल्या, सुसंस्कृत कुटुंबातली मुलेही बघताबघता दारुच्या आहारी जात आणि लवकरच सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवरुन झिंगायला लागत. त्याच्या घरचे लोक त्याला मारहाण करणे, कोंडून घालणे, दारु सुटावी म्हणून त्याच्या जेवणातून काही देशी औषधे घालणे आणि अगदी हमखास म्हणजे वेगवेगळ्या देवांना वेगवेगळे नवस बोलणे असले उपाय करत. ती तरुण मुले अंधारलेल्या डोळ्यांनी आणि भकास चेहयाने सकाळीसकाळी दारुच्या शोधात निघालेली दिसली की त्यांच्या मनातला त्यांनी मदतीसाठी चालवलेला आक्रोश ऐकू येत असे. मन कालवल्यासारखे होई. पुढे काही दिवसांनी त्यांच्यातला कुणीतरी गेला असे कळत असे आणि त्याची पांढया कपाळाची तरुण विधवा कुणासमोर तरी बसून रडताना दिसे.
गावातले मरण हे गावातल्या जगण्याइतकेच भीषण होते. घरातले माणूस मेल्यानंतर जितका आक्रोश जास्त तितकी आपली त्या माणसावरची माया जास्त असे लोकांना वाटते, असा सर्वमान्य समज होता. जिवंतपणी एखादी म्हातारी अर्ध्या भाकरीला आणि कोपभर चहाला महाग झालेली असे, पण ती मेल्यावर तिच्या घरात तिच्या लेकीसुनांनी उंच आवाजात चालवलेली रडारड ऐकून वैफल्य येत असे. ’कुटं गेलीस गं माजे बाई… आता मी आई कुनाला म्हनू गं… माज्या हातच्या पोळ्या आता कुनाला खायाला घालू गं…’ असा तो नाटकी उद्रेक आठ-दहा दिवस चालू राही. परगावाहून त्या बाईच्या बहिणी – मावळणी सांत्वनासाठी येत. येष्टी बसमध्ये कडेवरच्या लेकराला भिस्कुट भरवणारी आणि आपल्या पदराने त्याचा शेंबूड पुसणारी बाई येष्टीतून उतरताच जादू व्हावी तशी झिंज्या सोडून कालवा करायला लागे. ’तुला बगायला आलो की गं.. आता कुटं तुला बगू गं….’ अशी कडवी म्हणत अंगावरच्या लुगड्याचा पदर मातीत लोळवत ती बाई रडत-लोळत तिच्या घराकडे जायला लागे आणि तिच्या कडेवरचे लेकरु आतापर्यंत बर्या असलेल्या आपल्या आईला अचानक काय झाले हे न कळाल्याने भेदरुन आंग काढी. मुसलमान आणि लिंगायत समाजात मृत व्यक्तींचे दफन केले जाते. लिंगायत समाजात मृतदेहाला खुर्चीवर बसवून दफनभूमीपर्यंत नेले जाई आणि गुलाल उधळलेला, मान लटलट हलणारा तो मृतदेह डोळ्यांसमोरुन बरेच दिवस हलत नसे. काही शेतकर्यांचे दफन त्यांच्या शेतातच होत असे आणि मग त्यावर वर्षा-सहा महिन्यांत त्यांच्या मुलांपैकी कुणीतरी दगडी समाधी बांधत असे. हिंदूंची स्मशानभूमी गावापासून दोनतीन किलोमीटर दूर, नदीच्या काठावर होती आणि पावसाचे दिवस असले की कुणाला जास्त झाले म्हटले की लोकांच्या पोटात गोळा येत असे. वरंधार पावसात, चिखल तुडवत ती तिरडी नदीकाठी न्यायची आणि कसलाही आडोसा नसलेल्या ठिकाणी अर्ध्या ओल्या सरणावर ते दहन करायचे म्हणजे इतरांच्या दृष्टीनेही मरणच होते. एरवी अंथरुणावर खितपत पडलेल्या एखाद्या दुर्लक्षित म्हातार्याचा रक्षाविसर्जनाचा –राख सावडण्याचा- कार्यक्रम बाकी जोरात होत असे. शे-पाचशे लोक जमत, त्या म्हातार्याच्या आवडीचे पदार्थ आणले जात – त्यात कधीकधी मटण आणि दारुही असे – पिंड मांडला जाई आणि कावळा शिवला की हुकमी हुंदके देऊन त्या म्हातार्याचे नातेवाईक एकमेकांच्या मानेवर डोकी टाकत. हे सगळे नाटक अगदी व्यावसायिक वाटावे अशा सफाईने केले जाई. दोनपाच महिने जात आणि त्या म्हातार्याच्या नावावर असलेल्या जमीनीच्या मालकीवरुन त्याच्या वारसांमध्ये भांडणे सुरु होत.
गावात लैंगिकतेची ओळख अगदी कमी वयात होत असे. भाद्रपदात गल्लीगल्लीत हेंडकुळे लागत आणि जुगलेली कुत्री उलटी होऊन सुटी होण्यासाठी धडपडत. अशा कुत्र्यांना दगड मारण्यार्यांची लैंगिक विकृती आज समजल्यासारखी वाटते. लैंगिक संबंधाची ओळखही न झालेली मुलेही असे करण्यात पुढे असत. (फ्रॉईडची मते त्या वेळी वाचलेली नव्हती!) उकीरड्यावर किडे टिपणार्या गावठी कोंबड्यांतील एखादा तुर्रेबाज नर अचानक तिरकी तिरकी धाव घेई आणि ’क्वॅक क्वॅक..’ असे ओरडत, पायातल्या पायात धडपडत पळणार्या कोंबडीची मान चोचीत धरुन तिच्यावर चढे. दोनचार सेकंद पिसांचा धुरळा उठे आणि मग तो नर त्या कोंबडीला सोडून परत दाणे, किडे टिपायला लागे. दावणीच्या गाई, म्हशी माजावर – गावाकडच्या भाषेत ’वाफेवर’- आल्या की चारा खाणे सोडून अस्वस्थ होऊन हंबरत आणि पायांनी जमीन उकरत निरणातून सोट गाळत. त्यांच्या डोळ्यांत वासनेचे ते आदिम मूक थैमान दिसत असे. मळ्यातली गडीमाणसे अशा जनावरांना पहाटेपहाटे ’गाभ घालवायला’ गावाबाहेर घेऊन जात असत. लक्कडकोटात त्या गाई, म्हशींना बंद केले की वळूला किंवा रेड्याला मोकळे केले जाई. आपला वरचा ओठ वर वळवून, नाक फेंदारुन तो नर त्या मादीचा कामसुगंध हवेतून शोषून घेई, मग धडपडत आपले वरचे पाय उचलून त्या मादीवर चढत असे. त्याच्या हातभर लांबीच्या लालपिवळ्या सोटाखाली त्या माद्या वाकत, तोंडाचा आ वासून सुस्कारे टाकत. तो नर नवखा असला तर त्याला हा संभोग नीट जमत नसे. मग आसपास उभी असलेली जाणकार माणसे त्याला मदत करीत. ती कोवळी मादी, तो हपापलेला, कामधुंद नर आणि त्या परमैथुनातून सुख मिळवणारी ती रांगडी, गावठी माणसे असे जणू वासनेचे एक लालभडक, जळते, एकसंध, सलग फिरणारे वर्तुळ तयार होत असे. असा तो नर दोनचार वेळा त्या मादीला जुगला – त्याला दोनचार ’काठ्या’ लागणे असा ग्राम्य पण चपखल शब्दप्रयोग होता – की मग तो कामतृप्त झालेला नर त्या मादीवरुन उतरत असे आणि ती थकलेली पण अत्यंत समाधानी मादी हळूहळू चालू लागे. जणू स्वत:चेच स्खलन झालेले असावे अशा आविर्भावात आसपासचे लोकही पांगत. हे सगळे अगदी उघडपणे, राजरोसपणे होत असे. शनिवारी सकाळच्या शाळेला जाताना तर हमखास दिसणारे हे दृष्य. याचा नेमका अर्थ अगदी लहानपणीच कळू लागे. चौथी-पाचवीपासूनच असले काही दिसले की शाळेला जाणारी लहान मुलेसुद्धा तेथे रेंगाळायला लागत आणि मुली लाजून गडबडीने घाईघाईत चालायला लागत. घराघरांतून पाळलेली मांजरे, छपरांवर, झाडांवर उड्या मारणारी माकडे, उकीरड्यांवर आणि चिखलात लोळणारी डुकरे – हे सगळे प्राणी आपापल्या जोडीदारांबरोबर रत होत आणि पिलावळ प्रसवीत. त्यामुळे पुनरुत्पादन कसे होते हे अगदी पोरवयापासून नीट कळायला लागे. व्यायला झालेल्या गाईच्या निरणातून स्त्राव गळायला लागला की घरातले लोक गरम पाणी, शिजवलेले राळे अशा तयारीला लागत. तास-दोन तास उठबस करुन मग ती गाय- म्हैस कुंथायला लागे. तिच्या पाठीमागून काळ्यानिळ्या रंगाचा बुळबुळीत फुगा बाहेर येई आणि ती अस्वस्थपणे घशातल्या घशात हंबरायला लागे. तो फुगा फुटला की मग त्यातून वासराचे खूर आणि डोक्याचा पुढचा भाग बाहेर येई. मग गावातला जाणकार डोक्याचे मुंडासे खोचत पुढे होई आणि हातावर एक थुंक टाकून वासराचे ते पाय धरुन हळूच वासराला बाहेर ओढून काढी. ती गाय-म्हैस तोंडाचा आ वासून एक शेवटची कळ देई आणि मोकळी होई. हे सगळे अगदी नेहमी होत असल्यासारखे होते, त्यामुळे जसे जनावरांचे असते तसेच माणसांचे असणार हे व्यवहारी शहाणपण शिकवण्याची कुणाला काही गरज नव्हती. ’स्टॉर्क’ वगैरे फसवणूकही चालण्यासारखी नव्हती.
गावातल्या वडाराच्या बायका चोळी घालत नसत आणि त्या बायका घाईघाईने चालायला लागल्या की त्यांची पदराआडची ओघळलेली, थुलथुलीत छाती लुटूलुटू हलत असे. कधीकधी एखादी वडारीण चालताचालता रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबून आपला पदर बाजूला करी आणि आपला सावळा पण पुष्ट, दुधाळ स्तन सुटा करुन नि:संकोचपणे कडेवरच्या मुलाच्या तोंडात त्याचे बोंडूक देई. ते मूल मग हातपाय झाडत चुरुचुरु चोखायला लागे. हे सगळे अगदी चारचौघांत निगरगट्टपणे होत असे आणि यात कुणाला काही विशेष वाटतही नसे. हे सगळे बघून नजर मेलेली असे. जैनांचे ’निर्वाण’ स्वामी पूर्ण दिगंबर अवस्थेत असत. त्यांचे पूर्ण वाढ झालेले केसाळ पुरुषी लिंग बघतानाही काही वाटत नसे. स्वामींच्या पायावर पाणी घालणार्या, मोरपिसांच्या झाडूने त्यांचे आसन झाडणार्या जैनाच्या बायकांचा त्या स्वामींच्या लिंगाला कधी नकळत स्पर्शही होत असे. अशा स्त्रियांमध्ये काही बालविधवा, काही लहानपणीच देवाला वाहिलेल्या भाविणीही असत. ’निर्वाण भाळ छलु’ (’पूर्ण नग्न फारच चांगले) हे अशा स्त्रियांच्या तोंडी ऐकलेले काही गावठी शब्द आज अतृप्त मानवी लैंगिक भावनांची काही गुंतागुंत सुचवून जातात. त्या वेळी बाकी असले काही डोक्यात येत नसे.
मानवी लैंगिक संबंधाबाबतचे उरलेसुरले कुतुहल लोकांच्या बोलण्यातून शमत असे. गावाकडच्या बोलण्यात शब्दागणिक शिवी असे. या शिव्याही अत्यंत स्पष्ट, चोख आणि नेमक्या असत. त्यातले लैंगिक उल्लेख हे थेट आणि सर्जनशील असत. मानवी कोणत्या लैंगिक अवयवांना नेमके काय म्हणतात हे अगदी लहान वयात कोणत्याही प्रकारचे लैंगिक शिक्षण न घेता कळाले याचे कारण आसपास असलेले उघडे, बिनईस्त्रीचे वातावरण. चौथीपाचवीतला एखादा थोराड मुलगा हातची मूठ बांधून करंगळीशेजारी तळव्याच्या त्वचेला पडणाया घडीकडे बोट दाखवत काही सूचक, चावट बोले आणि आसपासची तशीच थोराड मुले फिदीफिदी हसत. गावाकडच्या कसदार खाण्याने, भरघोस कष्टाने आणि मोकळ्या वागण्याने मुले-मुली लवकर वयात येत. सातवी-आठवीत बहुतेक प्रत्येक मुलगी महिन्यातून चार दिवस शाळेला येत नसे आणि पाचव्या दिवशी ती न्हाऊन शाळेत आली की एखाद्या पुष्ट मक्याच्या कणसासारख्या दिसणार्या त्या सुस्नात मुलीकडे बघून वर्गातली काही दांडगी मुले अत्यंत वाह्यात असे काही बोलत. असले सगळे आसपास असताना काही शिकायचे राहिले असे होत नसे. आठव्या-नवव्या इयत्तेत असलेल्या पण वयाने बयाच थोर असणाया मुलांच्या शरीरात ज्वानीच्या अनावर लाटा उसळत. त्यातली काही पैसेवाली मुले चक्क वेश्यांकडे जात. बाकीची मुले गावातच निचर्याचे साधन शोधत. गावात चोरटे लैंगिक संबंध तर वाट्टेल तितके असत. एखादी जून, अनुभवी, पाशमुक्त ठसठशीत वडारीण किंवा चांभारीण आणि तिच्याकडून आपली कामतृषा भागवणारी कोवळी पण जोरकस मुले असले काही त्या काळात ऐकू येत असे, दिसतही असे.
गावातली बोलीभाषा अगदी रांगडी, खेडवळ होती. सीमाभाग असल्याने गावातले बरेचसे लोक कानडी बोलत. पण त्या नम्र, गोड भाषेचा आमच्या गावात बोलल्या जात असलेल्या भाषेशी अंघोळीइतकाही संबंध नव्हता. गावातली बोलीभाषा खडबडीत उतारावरुन टमरेल खडखडत जावे तशी होती. गावात सदैव वचावचा भांडणे चालत आणि भांडणात एकमेकांच्या आईमाईचा स्वच्छ, बिनकासोट्याचा उल्लेख होत असे. एखादा दारुडा नवरा संध्याकाळी बायकोच्या झिंज्यांना हात घालत “रांडे, उंडगे, कुनाकुनाखाली झोपलीस आं?” म्हणत तिला बडव बडव बडवत असे आणि ती चवताळलेली बाई त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत “आयघाल्या, बाराबोड्याच्या, तुज्या शेमन्यात जोर आस्ता तर मी कुनाकडं कशाला गेलो आस्तो रं हांडग्या..” असं जोरजोरात ओरडत असे. काम न करता दुपारी झोपणार्या आपल्या पोटच्या मुलाला एखादा गांजलेला बाप बांधावर उभा राहून ’नाड खज्जाळीच्या, तुज्यायला लावला डॉंबारी..” म्हणून शिव्या देत असे आणि विहिरीवर पाण्यासाठी भांडताना बायका एकमेकीला “व्हयमाले, तुला वड्याच्या काटानं मांगानं हेपल्लला गं रांडं..” असं मोकळेपणाने म्हणत असत. या शिव्यांमधला जहरीपणा जाऊन त्यांची निव्वळ फोलपटे शिल्लक राहिली होती. शाळेतली मुलेही एकमेकाशी बोलताना सहजपणे ’रांडेच्या’ वगैरे शब्द वापरत. हे सगळे अगदी मोठ्मोठ्यांदा बोलले जाई. गरीबी, अडाणीपणा, रोगराई, व्यसनाधीनता या सगळ्यांमुळे टेकीला आलेले हे पुरुष आणि पोराबाळांचे लेंढार, नवर्याचा उन्मत्तपणा, सासुरवास आणि कष्ट- न संपणारे अपरिमित कष्ट यांनी मरायला टेकलेल्या पण लवकर न मरणार्या बायका – हे सगळे लोक असे तोंड फुटल्यासारख्या शिव्या द्यायल्या लागले की ते सगळेच आपल्या ठसठसणार्या गळवासारख्या आयुष्याला आणि असले बिनबापाचे, कणाहीन निरर्थक आयुष्य देणाऱ्या त्या कृपासिंधू करुणाकरालाच शिव्या देत आहेत, असे वाटत असे.