Archive for the ‘Bollywood’ Category

परतफेड -२

June 1, 2008

तू एक प्रतिष्ठित, यशस्वी व्यावसायिक. छोटासा सुखी संसार. एका बेसावध क्षणी तुझे पाऊल घसरते. त्या मोहाच्या क्षणातून जन्माला आलेला तुझा मुलगा. परिस्थितीच्या पिरगाळ्यातून तुला त्याला घरी आणावे लागते. तुझा संसार या वादळाने उध्वस्त व्हायला आलेला आहे. एका रात्री हा छोटा मुलगा घरातून गायब होतो. त्याला शोधायला रस्त्यावर तुझी तगमग होते आहे. मुलगा कुठेच दिसत नाही. तुझा मित्र तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. संवेदनाहीन मद्दड पोलीस इन्स्पेक्टर. तुझी -एका बापाची- अस्वस्थ घालमेल, मुलाचे वर्णन तू सांगतोस…
“बापका नाम? ” इन्स्पेक्टर.
“बापका नाम लेकर क्या करेंगे आप? बच्चा मिलनेपर उसे बापका नाम पूछेंगे? ” तुझा संताप अनावर
“बापका नाम? “  पोलीस इन्स्पेक्टर थंड.
“डी. के. मल्होत्रा” तू खालच्या आवाजात म्हणतोस.
“जरा जोरसे बोलिये.. “
“डी. के. मल्होत्रा… सुनाई नही देता क्या आपको? डी. के. मल्होत्रा! “  तू संतापाने फुटून टेबलवर मूठ आपटतोस. एका अगतिक, हताश बापाची कैफियत…

काळाच्या पुढे असलेला तू एक मनस्वी प्रतिभावंत शायर.  शब्दांनी रोज तुझी पूजा करावी अशी तुझी प्रतिभा. पण तू तितकाच अहंमन्य, गर्विष्ठ आणि फटकळ. कुणाशी जमवून घेणे तुला कधी जमलेच नाही. पण तुला याची फिकीरही नाही. ‘शायर तो वो अच्छा है, पर बदनाम बहोत है’ असं तू स्वतःविषयीच म्हणतोस. धर्म, कर्मकांडे, देव यांनाही तू लाथाडून दिले आहेस. व्यवहारही तुला कधी जमला नाही. आता कर्जात गळ्यापर्यंत बुडूनही तुझी ऐयाशी सुरुच आहे. आज रात्री दारुला पैसे आहेत. उद्याचं काय? तुझ्या शायरीचा कदरदान सावकार मित्र दरबारीमल. त्याच्याकडे तू परत पैसे उसने मागायला जातोस.
“हम्म. ” दरबारीमल तुझ्यापुढे पान ठेवतो. “पान तो आप खाते नहीं. सुना है जहर लगता है आपको… ” दरबारीमल हसतो.
“जहर होता तो खा लेता… ” तुझ्याही चेहऱ्यावर मिस्किल हसू. “पान है, इसलिये नही खाता.. “  दरबारीमलकडून घेतलेले पैसे घेऊन ताबडतोब तू जुगाराच्या अड्ड्यावर येतोस. बाहेर एक फकीर तुझीच गजल गात हिंडतोय ‘कोई दिन गर जिंदगानी और है.. ‘ तू हाताला येतील तेवढे पैसे त्याच्या कटोऱ्यात टाकतोस. अरे, इथे कुणाला फिकीर आहे? जिंदगी असली काय आणि नसली काय! ‘हो चुकी गालिब बलायें सब तमाम, एक मर्गे नागहानी और है’ जणू तुझी डेथ विशच… 

तू एक अपयशी, विस्मरणात गेलेला गोलंदाज. तुझी गुणवत्ता घाणेरड्या राजकारणाने कुजवून टाकलेली. आता तू चोवीस तास स्वतःला दारुत बुडवून घेतले आहेस. गावातला एक मुका-बहिरा पण जबरदस्त क्षमता असलेला मुलगा तुला सक्तीने स्वतःचा गुरू करून घेतो. तू थोडासा भानावर येतो आहेस.  तुझ्या डोळ्यांत आता थोडा प्रकाश आहे. तुला जे जमले नाही, ते याला जमेल कदाचित… तुझ्या शिष्याला… पण इथेही तेच घाणेरडे राजकारण येते. तुला ज्यांनी संपवले तेच गुरुजी इथेही सौदा करायला येतात.
“कोई डील नही गुरुजी” तू कणखरपणाने सांगतोस.
“अस्सं. म्हणजे अजून तुझा पीळ गेला नाही तर. ” गुरुजींच्या चेहऱ्यावर तेच मुत्सद्दी हास्य. “ठीक है. तो फिर मैं उसका भला चाहूंगा” जीभ चाटणाऱ्या एका शिकाऱ्याचे वाक्य.
तुझ्या आतून काहीतरी उफाळून येतं. हेच, हेच ते सगळे हरामखोर. सगळे कोंभ चिरडून टाकणारी हीच ती या साल्यांची सिस्टीम…
“बहुत दिनोंसे एक बात कहना चाहता था मैं आपसे, गुरुजी. ” तू संथपणे बोलू लागतोस. “आपसे, अपने बापसे, और उन सबसे, जिन्होंने मेरा भला चाहा है… ” तुझा उद्रेक होतो. “गो टू हेल! “

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेला तू एक विख्यात गजल गायक. गजलांच्या कार्यक्रमाच्या बहाण्याने भारतात हेरगिरी करण्यासाठी तुला पाकिस्तान सरकारने पाठवले आहे. एकीकडे तुला भारतातल्या आपल्या ऐश्वर्यसंपन्न भूतकाळाविषयी  हुरहूर आहे. दुसरीकडे भारतातून हाकलून दिल्याबद्दल चीड. आज पाकिस्तान तुझा देश आहे. पण बोलताबोलता कुणीतरी तुझा उल्लेख मुहाजिर म्हणून करतो. आपण अजूनही मुहाजिर? परके? निर्वासित? तुझ्या डोळ्यांत, स्वरांत एक विलक्षण वेदना दाटून येते. मुहाजिर?

तू एक अंध पण स्वाभिमानी तरुण. तुझे अर्थपूर्ण पण कोरडे आयुष्य. तुझ्या संस्थेत काम करणाऱ्या अशाच एका अभागी, पोळलेल्या तरुणीबरोबर तुझे सूर जमतात. तुमचे लग्नाचे ठरते आहे. कधीतरी तिच्या बोलण्यात ‘ड्यूटी’ हा शब्द येतो आणि तू अचानक चमकतोस. ड्यूटी? म्हणजे हिला आपल्याविषयी वाटणारी भावना ही फक्त… कणव? सहानुभूती? आपण आंधळे, अपंग म्हणून.. फक्त करुणा? ड्यूटी?
‘ड्यूटी’ हा शब्द तू स्वतःशी फिरवून फिरवून पाहतोस. तुझा दुखावलेला अभिमान तुझ्या भावनाहीन डोळ्यांतून ओघळत असतो…आपण ज्याला प्रेम वगैरे समजत होतो ती अशी फक्त दया?… फक्त ड्यूटी?  

तू भास्कर कुलकर्णी. सरकारी वकील. तुझा अशील एक आदिवासी. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून तुझा झगडा सुरू आहे. साऱ्या यंत्रणेशी, सगळ्या सिस्टिमशी. पण तुझा अशील काहीच बोलत नाही. तू त्याला बोलता करण्याचे सतत प्रयत्न करतोस. पण तो तोंडातून चकार शब्द काढत नाही. फक्त आपल्या गोठलेल्या थंड नजरेने बघत राहतो. तुला काही कळत नाही. तू अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत म्हणतोस, “कुछ तो बोलो, कुछ तो… “

तू इन्स्पेक्टर लोबो. एक प्रामाणिक पोलिस अधिकारी. भ्रष्टाचाराला नकार दिल्यानं तुला इतरांनी सापळ्यात अडकवलं आहे. आता तू पूर्णपणे दारुच्या आहारी गेलेला. एका गुत्त्यातच तुला अनंत वेलणकर भेटतो. तुझ्या दारुचे पैसे तो भागवतो. नशेने धुंद झालेल्या नजरेने तू स्वतःशी ओळख करून देतोस, “इन्स्पेक्टर लोबो. अंडर सस्पेन्शन ऍट प्रेझेंट, फॉर बिईंग अंडर दी इंफ्लुअन्स ऑफ अल्कोहोल, व्हाईल ऑन ड्यूटी… “

तू विनोद चोप्रा. एक व्यावसायिक फोटोग्राफर. बिल्डर तर्नेजा आणि आहुजा यांच्या कारवाया आणि कमीशनर डिमेलो याचा खून या लफड्यात अपघाताने सापडलेला. घोळ वाढत जातो आणि शेवटी कमिशनरचे प्रेत द्रौपदी आणि अनारकली म्हणून स्टेजवर येण्यापर्यंत असंख्य भानगडी होतात. या सगळ्यात दैनिक ‘खबरदार’ ची एडीटर शोभा आपल्याबरोबर आहे असा तुझा समज आहे. पण तीही शेवटी त्यांच्यातलीच निघते. सगळेच किडके, पोखरलेले लोक… यात शेवटी तू आणि तुझा पार्टनर बळीचे बकरे होतात…

सुधा. तुझी कोणे एके काळची पत्नी. एक तडजोड म्हणून केलेले हे लग्न केंव्हाच अर्थहीन झाले आहे. सुधा तुला सोडून जाते. मायावर तुझे खरे प्रेम. पण तीही दूरवर निघून गेलेली. अचानक एका पावसाळी रात्री तुला एका स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये सुधा भेटते. इतक्या दिवसांनी, अशी… तुम्हाला दोघांना जुने दिवस आठवतात. काही क्षण तसेच, वास्तवाकडे पाठ फिरवून जातात. पण अपरिहार्य अशी पहाट येते. सुधाचा नवरा तिला न्यायला येतो. तिने दरम्यान दुसरे लग्न केले आहे. हे सत्य तुझ्यावर कुणीतरी थोबाडीत मारावी तसे येऊन आदळते. तू पूर्ण उध्वस्त. सुधा तुझा दुसऱ्यांदा निरोप घेते. उजाडणाऱ्या पावसाळी पहाटे फलाटावर तू खांदे पाडून उभा आहेस. दिशाहीन…

असे हे आठवणींचे आणखी काही तुकडे. आमच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण पेरल्याबद्दल तुझी परतफेड करण्याचा हा एक प्रयत्न.

परतफेड

October 14, 2007

डॉक्टर सुधा. तिच्या वडिलांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना कणाकणाने मरताना पहायची तिच्यावर वेळ आली आहे. इतरांवर तशी वेळ येऊ नये या आदर्शवादी विचाराने कोळशाच्या खाणीतल्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती आली आहे. कोळशाच्या खाणीत अपघात अगदी नेहमीचेच. एका अपघातात सापडलेला एक तरुण तिच्याकडे उपचारासाठी येतो. त्याच्या पायावरची जखम खोल आहे. ती साफ करताना त्याला वेदना होतील म्हणून डॉक्टर सुधा त्याला भुलेचे इंजेक्शन देऊ लागते. तो तरुण ते घ्यायला नकार देतो. “जखम फार खोल आहे, तुला फार वेदना होतील…” डॉक्टर सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. तो तरीही ऐकत नाही. “व्हाय डोंट यू अंडरस्टँड?” ती चिडून विचारते. आपण कुठे, कोणा अडाण्यांच्या वस्तीत आहोत हे क्षणभर विसरुन…
“व्हाय डोंट यू अंडरस्टँड डॉक्टर?” भेदक नजरेचा तो तरुण खोल खर्जातल्या आवाजात विचारतो. “पेन इज माय डेस्टिनी अँड आय कॅनॉट एस्केप इट…”

आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला तो. त्याच्या बदल्याला निव्वळ रोख व्यवहारी स्वरुप आलेलं आहे. पैसा हेच सर्वस्व आहे ना, मग पैसा मिळवूनच दाखवतो अशा जळत्या संतापानं त्यानं जन्मदात्या बापाला संपवण्यासाठी तोच पैसा वापरायला सुरुवात केली आहे. त्याची सेक्रेटरी- आणि कदाचित मैत्रिण- असलेल्या गीताला यातलं काहीच माहीती नाही. “कशाला एवढा पैसा पैसा करतोस?” ती त्राग्यानं विचारते. मी? मी पैसा पैसा करतोय? तो गीताला आपल्या आईच्या फोटोसमोर घेऊन येतो. “माझी आई फार गरीब होती गीता. लेकिन उसके इस गुनाह के लिये उसे किसीने माफ नही किया…” त्याचा खर्जातला धीरगंभीर आवाज भरुन येतो. त्याचा करारी चेहरा क्षणात व्याकुळ, घायाळ होतो. त्याच्या डोळ्यांच्या कडांना पाणी साठून येतं….

आगापीछा नसलेला भणंग फिरस्ता तो. सज्जनांच्या गल्लीत त्याला एका वेगळ्याच मुखवट्याखाली सादर केलं आहे. बघताबघता तो एका मोठ्या खेळातलं प्यादं बनून गेलाय. पण आता त्याला सगळं समजून चुकलंय. हे राजकारणी, हे कारखानदार, त्यांचे लालसी राक्षसी चेहरे आणि यात चिरडले जाणारे अगणित सामान्यजन. मग तो बंडाला उभा राहिलाय. पण त्याच्याबरोबर कुणी आहे की नाही ते उद्या पहाटे कळणार आहे. रात्रभर तो जागाच आहे. त्याला या खेळात आणणारी, पण आता त्याच्या बाजूने असणारी सुभाषिणी त्याच्यासोबत आहे. रात्र संपता संपत नाही. तो अस्वस्थपणे फेऱ्या मारतो आहे. थोडा वेळ पडत का नाहीस? सुभाषिणी विचारते. “मेमसाब..” तो परत तशाच आवाजात म्हणतो. “रात्रीच्या सरत्या प्रहरात, काळोखात. एखाद्या भुकेजलेल्या बालकाचं रडणं ऐकू येतं तेंव्हा…” त्याचा गळा दाटून येतो. “तब रात बहोत लंबी लगती है मेमसाब..”

कारखानदार बापाचा एकुलता एक मुलगा ‘तो’. युनियन लीडरकडून झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं आपल्या मित्राला – सोमूला – कामागारांचा नेता बनवलं. पण सोमूला अचानक त्या कामगारांचा काय पुळका आला कुणास ठाऊक! तो आता खरोखरच त्यांच्यातला एक होऊन गेलाय. ‘त्या’ची  तगमग, तडफड होते. भेटायला आलेल्या सोमूला तो आत बोलावतो, पण ‘त्या’चं मन कडवटून गेलंय . सगळा जहरी विखार  चेहऱ्यावर घेऊन तो एक पायरी खाली उतरतो आणि अत्यंत कुत्सितपणे एकच शब्द म्हणतो “नमकहराम……”

निवृत्ती अगदी जवळ आलेला एक तत्त्वनिष्ठ पोलीस अधिकारी. आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक रहाण्याच्या त्याच्या वृत्तीने त्याला कायम मागे पडावे लागले आहे. आता एक शेवटची महत्त्वाची जबाबदारी त्याच्या शिरावर आहे. एका तथाकथित दहशतवाद्याला न्यायालयापर्यंत सुरक्षित पोचवण्याची. त्यातही असंख्य अडथळे येतात.भ्रष्ट राजकारणी आणि त्यांना संपूर्ण विकल्या गेलेल्या पोलीस यंत्रणेसमोर तो एकटा आहे. त्या दहशतवाद्याला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला आमची ड्यूटी करु द्या… तसाच एक किडलेला अधिकारी त्याला हुकूम सोडतो. ड्यूटी? काय ड्यूटी आहे तुमची? ‘त्या’च्या म्हाताऱ्या डोळ्यांत पुन्हा एकदा अंगार उसळतो. ‘सदरक्षणाय, खलनिर्दलणाय’ हीच ना? ‘वो.. उधर लिखा हे … पीछे’ तो गरजतो.

‘तो’ एक बुद्धीमान शिक्षक अधिर. त्याची एक विद्यार्थिनी आपल्या मादक जाळ्यात ओढू पहाते. तो बधत नाही. ती सगळं त्याच्यावरच उलटवते. तिचा बाप त्याला चाबकानं बेदम मारतो. त्याच्या डोक्यात स्फोट होतो. आता तो मानसिक संतुलन हरवून बसलाय. वेड्यांच्या इस्पितळात. त्याचा भाऊ त्याला भेटायला येतो. ‘सुधीर…’ ‘त्या’च्या डोळ्यात फक्त एक वेडसर चमक आहे. ‘तुझं नाव सुधीर असायला नको होतं. तुझं नाव असायला होतं अधिर. आणि माझं? गर्दभ!… तू बदला का घेत नाहीस सुधीर? एक चाबूक घेऊन जा हं तिच्याकडे… बदला… चाबूक…’ 

तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अट्टल गुन्हेगार. त्याचा बदला घेण्यासाठी आणि त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याच्याशी शय्यासोबत करायला तयार झालेली एक तरुणी. तिचा उपभोग घेऊन झाल्यावर तो तिला अगदी निरागसपणे विचारतो, ‘तीन तासांपूर्वी आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो, आणि आता तू इथे .अशी… का?’ ‘तूच माझ्या स्वप्नातला राजकुमार…’ ती काहीतरी बहाणा करते. ‘त्या’च्या चेहऱ्यावर एक छद्मी, कुजकट हसू उमटतं ‘ रोमँटिक बातें मुझे बहोत बोर करती है सोनिया…’

मूकबधिरांना प्रशिक्षण देणारा तो एक अत्यंत प्रतिभावान, पण विक्षिप्त शिक्षक. त्याच्या एका अंध आणि मूकबधिर विद्यार्थिनीच्या बहिणीचा साखरपुडा आहे. त्या विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला लिहिलेले एक पत्र तो वाचून दाखवतो आहे. ‘माझ्या नशिबात नाही हे सगळं. पण तुझ्या तर आहे…’ त्याचा आवाज दाटून येतो. ‘नवरी नाही होऊ शकणार मी कधीच, पण नवरीची बहीण तर होईन….’ ‘त्या’चे कमालीचे बोलके डोळे पाणावतात. ‘आय प्रॉमिस, दॅट आय विल नॉट क्राय, ऍज यू वॉक विथ मार्क टोर्डस अ न्यू लाईफ..’ तो चष्मा काढून डोळे पुसतो. एक विलक्षण वेदनापूर्ण हास्य त्याच्या चेहऱ्यावर येतं. ‘सो, ऑन धिस हॅपी नोट…. अ टोस्ट… फॉर सारा… अँड मार्क..’ तो ग्लास उंचावतो.

असे आठवणीतले अनेक तुकडे. आमच्या निरर्थक आयुष्यांना अर्थ देणारे. त्याच्या पासष्टीनिमित्त त्याची परतफेड करण्याचा हा एक प्रयत्न. अत्यंत दुबळा, अपुरा, पण प्रामाणिक. 

एक हवाहवासा ‘बावर्ची’

October 14, 2007

शिवनाथ शर्मांचा संसार मोठा आहे. स्वतः ते, थोरला मुलगा रामनाथ, मधला काशिनाथ आणि आणि धाकटा विश्वनाथ. रामनाथबाबू एका कंपनीत हेडक्लार्क आहेत. काशिनाथसर प्राध्यापक आहेत आणि विश्वनाथराव सिनेमात संगीत दिग्दर्शक होण्याची स्वप्ने बाळगून आहेत. रामनाथबाबूंच्या पत्नी सीतादेवी आणि त्यांची लाडकी, लाडावलेलीच म्हणा ना, कन्या मीता. सीतादेवींचे सारखे सांधे धरलेले असतात, त्यामुळे त्यांना फारसे काम होत नाही.मीता नृत्य शिकते आहे. त्या नृत्याची तालीम आणि नटणेमुरडणे यातच ती मश्गुल आहे. त्यातून रामनाथबाबूंना जरा..अं.. घ्यायची सवय आहे. संध्याकाळ झाली की त्यांची बाटली उघडते. काशिनाथसर तत्त्ववादी प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी शोभाताई जरा सुखवस्तू आहेत. त्यांचा मुलगा पिंटू शाळकरी आहे. विश्वनाथरावांचे अजून लग्न झालेले नाही. त्यांची संगीतातली कुवत बेताचीच, पण एकंदरीत थाट कलंदर आहे.
आता इतकी सगळी आत्ममग्न माणसे एका घरात असताना घरातले काम कुणी करायचे हा जटील प्रश्न आहे. शिवनाथजी आपल्या सुनांवर वैतागतात, पण बिचाऱ्यांचे वय झाले आहे, त्यांचे कोण ऐकणार? त्यातून दोन्ही मुले आपापल्या बायकांच्या ताटाखालची मांजरे आहेत. येऊनजाऊन घरातल्या कामाला जुंपली जाते ती कृष्णा. ही पण शिवनाथजींची नातच. बिचारीचे आईवडील नाहीत, मग काय? काहीही पाहिजे असले की ‘कृष्णा, कृष्णा…’ अशा झाल्या हाका सुरु. पण पोरगी सालस, अगदी गुणी आहे हो. सगळ्यांच्या सेवेला सारखी हजर असते. मीता तिच्याच बरोबरीची, पण कृष्णाने मीतासाठी ओव्हलटीन करुन आणले तरी मीताबाईंचे डोळेसुद्धा उघडलेले नाहीत. एवढं सगळं करुन कृष्णा कॉलेजला जाते आहे. तिथल्या एका प्राध्यापकाबरोबर तिचे काही हळुवार बंध गुंफले जाताहेत…

पण एवढ्या मोठ्या खटाल्यात ती तरी एकटी काय पुरी पडणार?  घरातल्या कामाची, विशेषत: स्वयंपाकाची अगदी दैना उडाली आहे. भात आहे, तर भाजी नाही, भाजी आहे तर पोळी नाही…. काही विचारु नका. रामनाथबाबूंना रोज कामावर जायला उशीर होतो आणि साहेबाच्या शिव्या खाव्या लागतात. काशिनाथसर कसेबसे धावतपळत मस्टर गाठतात. विश्वनाथराव कित्येक दिवस उकडलेल्या अंड्यांवर नाश्त्याचं भागवून नेताहेत आणि शिवनाथजींना तर सकाळचे आठ वाजले तरी चहासुद्धा मिळालेला नाही.

मग शेवटी सगळे मिळून ठरवतात की काही नाही, आता एक चांगला स्वयंपाकी ठेवायचा. पण  या इतक्या तऱ्हेवाईक लोकांच्या हाताखाली कुणी टिकला तर पाहिजे! जो येतो, तो महिना पंधरवड्यात गाशा गुंडाळून परत जातो. मग कृष्णा आहेच भांडी घासायला.

अशात एक दिवस रघू येतो. दिसायला देखणा, हसतमुख आणि बोलणं तर  जिभेवर बर्फी ठेवलेली असावी असं. बरं, पगाराची फार अपेक्षा म्हणाल तरे हा पठ्ठ्या चक्क अर्ध्या पगारावर काम करायला तयार झालाय. आणि कुणी सांगितली काय माहीत, पण याला घरातल्या सगळ्यांची खडानखडा माहिती आहे. घरात तर एक भाजी करावी म्हटलं तर चार वांगीही नाहीत. पण रघू डगमगत नाही. काही कच्ची केळी आणि सुरण यातूनच तो असे फर्मास कबाब तयार करतो की रामनाथबाबूंना वाटतं की मटणाचेच कबाब आहेत!
पण ही आखुडशिंगी, बहुगुणी गाय या पागलखान्यात टिकणार का, ही खरी शंका आहे. सुना तर हा कुणीतरी जादूटोणा करणारा तांत्रिक आहे, या शंकेने भेदरल्या आहेत, अहो, दोन रुपयात हा पिशवीभर भाजी घेऊन आला मंडईतून! रामनाथबाबूंनी संध्याकाळी बाटली उघडली आणि रघूने त्यांना कोकाकोला आणि लिंबू पिळून फर्मास कॉकटेल बनवून सर्व्ह केले. शिवाय तोंडात टाकायला मसाला डाळही आहे. काशिनाथसर दमून आले आणि एक कपभर चहा मिळेल का हा त्यांचा प्रश्न संपायच्या आत रघू चहा घेऊन हजर. शिवाय बरोबर खायला कचोरीपण.

अगदी स्वप्नातला देवदूत वाटावा असा हा ‘बावर्ची’ शर्मांच्या घरी चक्क टिकून राहिला. नुसताच टिकला नव्हे तर घरातलाच एक होऊन गेला. फक्त स्वतःसाठीच जगणाऱ्या या लोकांना त्यानं दुसऱ्याला आनंद देण्यातला आनंद समजावून सांगितला. त्यांच्यातले ताणलेले, तुटत चाललेले संबंध पुन्हा घट्ट केले आणि शेवटी कृष्णाच्या आयुष्याचे भले व्हावे म्हणून स्वतःवर वाईटपणा घेऊन निघून गेला. दुसऱ्या गावी, दुसऱ्या घरी, दुसऱ्या नात्यांवर फुंकर घालण्यासाठी…

१९७२ साली प्रदर्शित झालेला हृषिकेश मुखर्जींचा ‘बावर्ची’ हा असा साधा, पण अंतर्मुख करणारा चित्रपट आहे. ‘इट इज सो सिंपल टु बी हॅपी, बट सो डिफिकल्ट टु बी सिंपल’ हे साधे सूत्र सांगताना कुठेही प्रचारकी थाट न आणणारा. आनंद, नमकहराम आणि (त्या मानाने फारसा गाजावाजा न झालेला) बावर्ची या त्रिसूत्रीतला तितकाच प्रभावी  आणि नि:संशय आणि संपूर्णपणे राजेश खन्नाचा चित्रपट. यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या राजेश खन्नाला हृषीदांनी अर्धी खाकी तुमान, गांधी टोपी आणि खांद्यावर टॉवेल या वेशभूषेत सादर करण्याचे धाडस केले. (याआधी राजकपूरने ‘जिस देश में गंगा बहती है’ मध्येही असेच धाडस यशस्वी करुन दाखवले होते) राजेश खन्नाच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी ही एक यात शंका नाही. जया भादुरीची कृष्णाही अशीच बावनकशी. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ म्हणजे काय ते ही भूमिका पाहून शिकावे. दुर्गा खोटे आणि उषा किरण यांनी साकारलेल्या सुनाही अगदी आपल्या घरातल्या वाटाव्या अशा. दुर्गाबाईंचा फणकारा तर बघत रहावा असा. आपण निष्पाप आहोत हे कळवळून सांगताना माझ्या हातून काही भलतंसलतं घडलं असेल तर मी मरुन जाईन असं कृष्णा सांगते त्यावर’ सुनो, शाम के वक्त लडकी की बातें सुनो’ हा संवाद दुर्गाबाईंनी असा म्हटलाय की ज्याचं नाव ते! पोरक्या पोरीविषयी माया, काळजी आणि एकंदरीत झाल्या प्रकाराबद्दल गलबलून आलेलं मन हे सगळं एका वाक्यात कसं सांगता येतं हेच जणू त्या दाखवून देतात. ए. के. हंगल यांचे रामनाथजी आणि असरानीचे विश्वनाथराव असेच मझा आणून जातात. काशिनाथसर झालेल्या (आणि कुठेही नामोल्लेख नसलेल्या) गुणी आणि नैसर्गिक पुढे अभिनेत्याचे काय झाले हे काही केल्या कळत नाही. काली बॅनर्जीची मीताही अगदी मोकळी आणि दिलखुलास. तिच्या किंचित बायली नृत्यशिक्षकाच्या भूमिकेतला पेंटलही लक्षात रहातो. त्याचे आणि राजेश खन्नाचे उर्दू आणि हिंदी भाषा या विषयावरचे संवाद असेच अर्थपूर्ण.अर्थात हे इतके भरताड लिहिण्यापेक्षा संवाद गुलजार यांचे आहेत, इतके लिहिले तरी पुरे. 

पण मला विचाराल तर ‘बावर्ची’ चा खरा हीरो आहे तो हरिंद्रनाथ चटोपाध्याय. शिवनाथ शर्माच्या खट भूमिकेत हरिंद्रनाथांनी धमाल केली आहे. त्यांचा कवडीचुंबकपणा, कृष्णाविषयी त्यांच्या पोटात असलेली अपार माया, आळशी सुना आणि त्यांना घाबरुन असणारी नालायक मुले यांच्यांवरचा त्याचा राग हे सगळे हरिंद्रनाथजींनी सुरेख दाखवले आहे.  मुलांना आणि सुनांना धारेवर धरताना हा म्हातारा आपल्या ओळखीच्या एखाद्या खडूस आजोबांची आठवण करुन देतो. ‘भोर आयी गया अंधियारा’ या गाण्यात चटोपाध्यायबाबू अगदी रंगून गायलेपण आहेत. एकंदरीतच निखळ आनंद मिळवून देणारी ही भूमिका.

 

आणि ‘बावर्ची’ चा उल्लेख मदनमोहन यांच्या संगीताविषयी आणि कैफी आजमींच्या गाण्यांविषयी न लिहिता केला तर त्या गुन्ह्याला क्षमा नाही. मन्नाडे यांचा आवाज या चित्रपटात राजेश खन्नाला एकदम ‘सूट’ होतो. ‘तुम बिन जीवन कैसा जीवन’ हे मन्नादांचे सोलो आणि बिलावल रागावर आधारित ‘भोर आयी..’ ही दोन्ही गाणी नितांतसुंदर. ‘मोहे नैना बहाये नीर’ आणि ‘काहे कान्हा करत बरजोरी’ हीही गाणी सुंदर.

तर असा हा हवाहवासा वाटणारा ‘बावर्ची’ पहावा आणि मन आनंदाने भरुन जावे. या चित्रपटातला शेवटचा ‘पंच’ आणि अमिताभ बच्चनचे निवेदन अशा गोष्टी नसत्या तरी काही बिघडले नसते असे वाटते, यातच सगळे आले.

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद ५

April 30, 2007

अनुकरणाचाच विचार करतो आहोत तर आणखी एक – दोन उदाहरणे बघू. गीतकार राजा मेहंदी अलि खान यांनी  “आपकी परछाईयाँ” चित्रपटासाठी लिहिलेले एक गीत

“अगर मुझसे मुहब्बत है मुझे सब अपने गम दे दो
इन आखोंका हर एक आँसू मुझे मेरे सनम दे दो”

आणि साहिरने “शगुन” साठी लिहिलेले

“तुम अपना रंजो गम अपनी निगेबानी मुझे दे दो
शाम -ए – गम की कसम ये दुख ये हैरानी मुझे दे दो”

ही दोन्ही गीते बरीच लोकप्रिय झाली. पण “आपकी परछाईयाँ” १९६४ चा व “शगुन” १९६७ चा हे गीतकोशात वाचल्यावर साहिर माझ्या मनातून उतरला.

साहिरने नवीन “दाग” साठी लिहिलेले

“जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग” 

 हे (एकच) गाणे मला आवडले होते. पण माधव मोहोळकरांनी त्यांच्या साहिरवरच्या लेखात या गाण्याभोवती संशयाचे धुके असल्याचे लिहिले आहे. हीच गजल त्यांनी रेडिओ पाकिस्तान वर कतिल शिफाईची म्हणून ऐकल्याचे लिहिले आहे. मनोगतावर मिलींद फणश्यांनी या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी कतिल शिफ़ाईच्या असून अंतरे साहिरने लिहिले असल्याची माहिती दिली आहे.

कधी कधी मला कम्युनिस्ट विचारांच्या कवींचे मेहमी आश्चर्य वाटते. एकाच कल्पनेचा/विचाराचा  निरनिराळ्या भाषेत आणि शब्दांत आविष्कार त्यांच्या कवितातून होतो हे “great men think alike” म्हणायचे की अनुकरण म्हणायचे? “ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है”चे एक उदाहरण साहिर, नीरज, फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या कवितातून दाखवले आहेच. आपल्या कुसुमाग्रजांची “काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात” ही मला त्याच पंगतीतली वाटते.

दुसरे उदाहरण ताजमहालाविषयी दृष्टीकोनाचे. आतापर्यंत सर्वसामान्य माणसाचा दृष्टीकोन

“बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल” किंवा

“एक शहनशाह ने बनवाके हँसी ताजमहल
सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है” (कवी – शकील बदायुनी)

असा होता. पण कम्युनिस्ट विचाराच्या कवींना अचानक ताजमहाल हे बादशहाच्या पैशाच्या उधळपट्टीचे, सामान्य मनुष्याच्या/मजुरांच्या शोषणाचे, प्रतीक वाटायला लागले. साहिरने लिहिले

“एक शहेनशहाने दौलत का लेकर सहारा
हम गरीबोंकी मुहब्बत का उडाया है मजाक
मेरी मेहबूब कहीं और मिला कर मुझ को”

कुसुमाग्रजांच्या “ताजमहाल” कवितेत नक्की ओळी आठवत नाहीत पण असाच विचार आहे. तसेच सुमित्रानंदन पंतांच्या “ताज” मधल्या या ओळी पहा.

” हाय! मृत्यू का ऐसा अमर, अपार्थिव पूजन?
जब विषण्ण, निर्जीव पडा हो जग का जीवन
स्फटिक सौध में हो शृंगार मरण का शोभन,
नग्न, क्षुधातुर , वासविहीन रहे जीवित जन”

(ह्या ओळी माधव मोहोळकरांच्या पुस्तकातून घेतल्या आहेत). आता हा प्रकार तर रविकिरण मंडळापेक्षाही वाईट दिसतो. कारण रविकिरण मंडळातले कवी विषय एकच असला तरी अभिव्यक्ती आणि विचार वेगवेगळे  असत, इथे विषय तोच, विचारही तोच, फक्त शब्दकळा आणि भाषा थोडीशी वेगळी. अशा गोंधळात साहिरची कविता कितपत स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार मानायची हे ठरवणेही कठीण आहे.

“एक शहेनशाने दौलत का लेकर सहारा..” हे गीत “गझल” चित्रपटात महंमद रफ़ीने गायले आहे. संगीतकार मदनमोहन. तो एक भलताच विनोदी प्रकार झाला आहे. गाण्याचा मूड संतापाचा, चिडीचा आहे. कवी चिडून म्हणतो “मेरी मेहबूब कहीं और मिला कर मुझ को” आणि चित्रपटातल्या गाण्याची चाल चक्क रोमँटिक आहे. मदनमोहनला गाण्याचा मूडच समजला नाही की आपल्यापेक्षा एक रुपया रुपया साहिरने जास्त घेतल्याचा सूड उगवला आहे कळत नाही.

साहिर – श्री. विनायक यांचा प्रतिसाद – ४

April 30, 2007

साहिरला जिथे कवी म्हणून अमाप यश मिळाले त्या “प्यासा”, “बरसात की रात”, “शगुन” “कभी कभी” वगैरे चित्रपटात मुख्य पात्र एका कवीचे होते. त्यामुळे त्याला बऱ्याच प्रमाणात स्वातंत्र्य होते. ज्या ठिकाणी भावनाशील पात्रे आली तिथे साहिर कमी पडला. “देवदास” आणि “लैला मजनू” ही त्याची उदाहरणे. २००२ मध्ये शाहरुख खानचा ” देवदास” प्रदर्शित झाला तेव्हा आमच्या न्यूजग्रुपवर एकूणच आधीच्या देवदासांवर चर्चा सुरू होती. सैगलच्या देवदासचे संगीत थोर आहे असे सर्वांचे एकमत होतेच, त्यामानाने दिलीपकुमारच्या “देवदास”चे संगीत फिके पडले. त्याचे कारण सचिनदेव बर्मन असे बहुतेकांचे मत पडले. तिथे मी “गीतकार म्हणून साहिरची निवड चुकली” असे लिहिले, बराच गदारोळ झाला, साहिरचे चाहते चिडले इतके की माझ्यावर न्यूजग्रुप सोडून जायची वेळ आली. एक तर सैगलच्या जादुई आवाजापुढे तलत काय दुसरा कोणीही गायक फिकाच पडला असता. पण देवदासच्या तोंडी असलेली साहिरने लिहिलेली “मितवा, लागी रे कैसी ये अनबुझ आग” किंवा “किसको खबर थी ऐसे भी दिन आयेंगे” ही गाणी आज कोणालाही फारशी आठवत नाहीत. उलट आठवतात ती “आन मिलो आन मिलो श्याम साँवरे”, “गोरी साजन की हो गई” ही भजने, आणि “जिसे तू कबूल कर ले”. आज इतक्या वर्षांनंतर मी सहज विचार केला की आज जर माझ्या हातात देवदास ने कुठली गाणी म्हणावीत हे ठरवणे असते तर मी “कोई सागर दिल को बहलाता नहीं बेखुदी में भी करार आता नहीं”, आणि “गुजरे है आज इश्क में हम उस मकाम से, नफरत सी हो गई है मुहब्बत के नामसे” या शकीलने लिहिलेल्या गाण्यांची निवड केली असती आणि ती “देवदास” च्या प्रेमभंग झालेल्या व दारूत बुडालेल्या व्यक्तिरेखेशी जास्त सुसंगत ठरली असती. “लैला मजनू” नावाच्या जुन्या चित्रपटामध्ये शकीलने गाणी लिहिली आहेत, संगीतकार गुलाम महंमद (“पाकिजा”वाले). “चल दिया कारवाँ रुक गये हम यहाँ”, “आसमाँ वाले तेरी दुनिया से जी घबरा गया”, “बहारोंकी दुनिया पुकारे तू आजा”, देख ली ऐ इश्क तेरी मेहरबानी देख ली” ही तलत – लता, तलत – आशा, यांची गाणी आजही अजरामर आहेत. (हो, या चित्रपटात शम्मीकपूर चक्क तलतच्या आवाजात गायलाय). उलट नवीन “लैला मजनू”ची गीते साहिरने लिहिली आहेत, संगीतकार मदन मोहन – जयदेव. “कोई पत्थर से ना मारो मेरे दीवानेको”, “तेरे दर पे आया हूँ झोली भर के जाऊँ गा” वगैरे गाणी खराब आहेत. कुठल्याच बाबतीत दोन लैला मजनूंची तुलना करू नये हे उत्तम.

साहिर – श्री.विनायक यांचा प्रतिसाद – ३

April 26, 2007

“प्यासा”ची गाणी प्रसिद्ध झाली. त्याआधी त्याने विद्रोही गाणी लिहिली नव्हती. चकले, परछाईया, ताजमहल वगैरे कविता लिहिल्या होत्या. खरे तर मला फक्त “जिन्हे नाज़ है हिंद पर” आवडते. ते अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. पण “प्यासा” चे यश साहिरच्या डोक्यात गेले. आपण कोणाही संगीतकाराची कारकीर्द घडवू किंवा बिघडवू शकतो अशी बढाई तो मारू लागला. संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त मानधन घेऊ लागला. बर्मनदादांशी भांडण झाले. देव आनंद, गुरू दत्त दुरावले. नया दौर, सोने की चिडीया नंतर ओ. पी. पण साहिरबरोबर काम करणार नाही म्हणाला. गुणी संगीतकार जयदेवशीही भांडण झाले. गाण्यासाठी जयदेवने आपल्या घरी तबला पेटी घेऊन यावे या क्षुल्लक कारणावरून. मदनमोहन, अनिल बिस्वास, हेमंतकुमार, सी. रामचंद्र पण एक दोन चित्रपटांनंतर त्याच्याजवळ फिरकले नाहीत. अर्थात त्याने खय्यामला फिर सुबह होगी द्यावा अशी सूचना त्याच्या निर्माता दिग्दर्शकाला केली होती हे खरे. पण खय्यामनेही तो व शगुन सोडून पुढे  “कभी कभी” पर्यंत साहिरबरोबर काम केले नाही.

अशा परिस्थितीत साहिर पुनरागमन करू शकला ते रोशनमुळे. बिचारा रोशन. बरसात की रात च्या आधी ३२ चित्रपटांमध्ये ४४ गीतकारांबरोबर काम केले, उत्तमोत्तम गाणी दिली, पण व्यावसायिक यश काही मिळाले नाही. बरसात की रात प्रसिद्ध झाल्याने दोघांनाही फायदा झाला. रोशन – साहिर यांनी अत्यंत दर्जेदार गाणी दिली आणि ती लोकप्रिय पण झाली. बाबर, चित्रलेखा, ताजमहल, दिल ही तो है, बहू बेगम, दूज का चाँद, सर्वच चित्रपटांबद्दल हे खरे आहे. तीच गोष्ट जयदेवच्या  जोरू का भाई, हम दोनो आणि मुझे जीने दो ची. पण मला सर्वात आवडलेली गाणी म्हणजे खय्यामच्या फिर सुबह होगी आणि शगुन मधली.

रोशनचे १६ नोव्हेंबर १९६७ ला निधन झाले आणि साहिरला उतरती कळा लागली. रवी आणि एन. दत्ता यांनी दिलेली बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटातली गाणी मला खास आवडत नाहीत. त्यानंतर कभी कभी चा अपवाद वगळता साहिरने १९८० पर्यंत खास कामगिरी केली नाही.
तुम्ही जर ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्या (धक्का – कलाटणी तंत्रवाल्या)वाचत असाल तर साहिरबाबत माझे मत असेल याचा अंदाज येईल. आधीची प्रस्तावना यासाठीच होती की साहिरची बहुतेक चांगली गाणी मला माहिती आहेत हे वाचकाला समजावे. तरीही गीतकार म्हणून शैलेंद्र, शकील काही प्रमाणात मजरूह हे मला जास्त आवडतात. साहिरची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातले सामाजिक विचार सांगणे हे एक. पण साहिर ते करताना कधी कधी अकलात्मक पातळीवर उतरतो. “औरत ने जनम दिया मर्दोंको”, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा” वगैरे याची उदाहरणे आहेत.

माझा दुसरा आक्षेप असा आहे की तो चक्क अनुकरण (वाङमयचौर्य?) करतो. “जिसे तू कबूल कर ले” मधल्या ओळींचे शकीलच्या “जो खुशी से चोट खाये” मधील ओळींशी साम्य आहे ते आधी लिहिलेच आहे. दुसरे उदाहरण “दीदी” मधल्या “तुम मुझे भूल भी जाओ” मधल्या

ज़िंदगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है
ज़ुल्फ़ो रुख्सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में
इश्क ही एक हकीकत नहीं कुछ और भी है

आणि फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांच्या “मुझसे पहली सी मुहब्बत मेरे मेहबूब ना माँग” मधल्या या ओळी पहा.

और भी गम है दुनिया में गमे मुहब्बत के सिवा
राहते(सुख) और भी है वस्ल( मीलन) की राहत के सिवा

फ़ैज़ ची कविता आधीची आहे. तसेच साहिरच्या गाण्यातला “मैने तुमसेही नहीं सबसे मुहब्बत की है” हा बचावही लंगडा वाटतो. कवी नीरजनेही “नई उमर की नई फसल” मध्ये (संगीतकार – रोशन) एक याच प्रकारचे गाणे लिहिले आहे. “आज की रात बडी शोख बडी नटखट है”. त्यातला प्रियकर प्रेयसी ला काय म्हणतो पहा.

“पर ठहर वो जो वहाँ लेटे है फुटपाथों पर
लाश भी जिनकी कफ़न तक न यहाँ पाती है
और वो झोपडे छतभी न है सरपर जिनके
छाते छप्पर ही जहाँ जिंदगी सो जाती है
पहले इन सब के लिये एक इमारत गढ लूँ
फिर तेरी माँग सितारों से भरि जाएगी”

हे जास्त आवडले.

साहिरचा कल  गाण्यातून विचार मांडण्याकडे जास्त आहे. त्याला भावना मांडता येत नाहीत. त्याबाबतीत शकीलला तोड नाही. मात्र काही प्रसिद्ध कवितांवर parody  प्रकारच्या रचना छान केल्या आहेत. उदा. महंमद इक्बाल कट्टर पाकिस्तानवादी झाल्यावर त्यांनी लिहिले होते
“चीनो अरब हमारा हिंदोस्ताँ हमारा
मुस्लिम है हम सारा वतन हमारा सारा जहाँ हमारा”

त्यावर साहिरचे “चीनो अरब हमारा” गाणे म्हणजे जबरदस्त चपराक आहे. किंवा ब्राउनिंगच्या प्रसिद्ध ओळी आहेत

god is in the heaven and all is right with the world

त्यावर साहिर यांनी लिहिले “आसमाँ पे है खुदा और जमींपे हम, आजकल वो इस तरफ़ देखता है कम”. हाच धागा पकडून गुलजार यांनी “हालचाल सब ठीकठाक है” (मेरे अपने) लिहिले. त्यात

“अल्लामिया जाने कोई जिये या मरे
आदमी को तो खूनबून सब माफ़ है” अशा ओळी आहेत.

“देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इन्सान” चे विडंबन ” देख तेरे भगवान की हालत क्या हो गई इन्सान कितना बदल गया भगवान” (रेल्वे प्लॉटफॉर्म) असे केले आहे.

कवी गीतकार २: साहिर

April 21, 2007

सकारात्मक दृष्टीकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, म्हणजे काय? तर एका तरुणीला तणावाखाली असताना नखे कुरतडण्याची सवय होती. ती जावी म्हणून कुणीतरी तिला योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी तिच्या बोटांची न कुरतडलेली नखे पाहून कुणीतरी विचारले की आता ती तुझी सवय गेलेली दिसतेय. त्यावर उदासवाणे हसून ते तरुणी म्हणाली की नाही, पण योग शिकायला लागल्यापासून आता मी पायाची नखे कुरतडते!

विनोद सोडा, पण साहिर लुधियानवी या गुणी गीतकाराच्या बाबतीत आपल्याला असेच काहीसे म्हणता येईल. साहिरच्या स्वभावात त्याच्या  वडीलांचे सरंजामी वर्तन (निदा फाजलींच्या शब्दांत ‘फ्यूडल रवैय्या’ (रवैया – काय शब्द आहे!)) आणि  त्याच्या आईला त्यांनी दिलेली कनिष्ठ वागणूक यामुळे एक कडवटपणा आणि प्रस्थापितांविरुद्ध बंडाची भावना जन्माला आलेली दिसते. लहानपणीच्या अशा घटनांनी मन करपले जाणे ही काही चांगली गोष्ट नाही, पण यात चांगले बघायचेच झाले तर त्यामुळे साहिरच्या उत्तमोत्तम क्रांतिकारी रचना आपल्याला वाचायला मिळाल्या. स्त्रीचे पुरुषाकडून होणारे शोषण यावर साहिरने लिहिलेल्या या ओळी आजही अंगावर शहारा आणतात….

औरत ने जनम दिया मर्दोंको, मर्दोंने उसे बाजार दिया
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया

औरत म्हणजे काय? तर एक ऐयाशीची चीज! आणि चीज म्हटले की तिला विकता आणि विकत घेता येते! साहिर म्हणतो…

तुलती है कहीं दीनारोंमें, बिकती है कहीं बाजारोंमें
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारोंमें
ये वो बेईज्जत चीज है जो, बट जाती है इज्जतदारोंमें

राजपूत स्त्रियांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी केलेलेया अग्निप्रवेशाचे आपल्याला केवढे कौतुक! पतीच्या चितेवर सती जाणाऱ्या स्त्रीला आपण केवढे महान करुन ठेवले आहे! पण या जिवंत जळण्यातली वेदना कोण लक्षात घेतो?

औरत के जिंदा जलने पर, कुर्बानी और बलिदान कहा
इस्मत के बदले रोटी दी और उसको भी अहसान कहा

(इस्मत म्हणजे अब्रू – धन्यवाद चित्त!)

आणि ही सगळ्या श्रद्धा चुरगाळून टाकणारी, मनाला खोल  भेगा पाडणारी ओळ.. कसली नाती घेऊन बसलात? जगात खरं नातं एकच! पुरुष आणि स्त्री… नर आणि मादी.. माणूस आणि पशु यात काय फरक आहे?

औरत संसार की किस्मत है, फिर भी तकदीर की हेटी है
अवतार पयंबर जनती है, फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदकिस्मत मां है जो, बेटोंकी सेजपे लेटी है     (साधना)

म्हणूनच का कुणास ठाऊक, साहिरच्या गीतांमधला दर्द इतर भावनांपेक्षा अधिक प्रभावीपणे उमटलेला दिसतो. अर्थात असे लिहिणे म्हणजे साहिरच्या उत्तुंग प्रतिभेवर अन्याय करण्यासारखे आहे.

इतनी हसीन इतनी जवां रात क्या करें
जागे है कुछ अजीब से जजबात क्या करें
सासों में घुल रही है किसी सास की महक
दामन को छू रहा है कोई हाथ क्या करें     (आज और कल)

ही रफीच्या आवाजाने चार चांद लावलेली बेचैनी असो किंवा

 तुझमें जो लोच है तेरी तहरीर में नही
जो बात तुझमें है तेरी तसवीर में नही     (ताज महल)

ही पुन्हा रफीच्या आवाजातलीच नक्षीदार नजाकत असो, तिथे साहिरच्या लेखणीची आपली एक छाप आहेच, पण

हम गमजदा हैं लाये कहां से खुशी के गीत
देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम

हे बाकी साहिरचे खास स्वतःचे वाटते!

मैं दूं भी तो क्या दूं ऐ शोख नजारों
ले दे के मेरे पास कुछ आंसू हैं कुछ आहें

असो किंवा

इसको ही जीना कहते है तो यूंही जी लेंगे
उफ न करेंगे लब सी लेंगे आंसू पी लेंगे
गम से अब घबराना कैसा गम सौ बार मिला   (प्यासा)

यातला दु:खाच्या अतीव टोचणीतून आलेला कोडगेपणा असो, तिथे साहिर निखाऱ्यासारखा फुलून आलेला दिसतो. ‘प्यासा’ त साहिर

सनसनाहट सी हुई
थरथराट सी हुई
जाग उठे ख्वाब कई
बात कुछ बन ही गयी  

किंवा

मोहे अपना बना लो
मेरी बांह पकड
मैं हूं जनम जनम की दासी
मेरी प्यास बुझा दो, मनहर गिरिधर
मैं हूं अंतर्घट तक प्यासी
प्रेम सुधा इतनी बरसा दो
की जग जल थल हो जाये    

किंवा

हम आप के कदमों पर गिर जायेंगे रश खा कर
इस पर भी हम अपने आंचल की हवा दे तो 

अशा तरल ओळीही लिहितो आणि

ये पुरपेच गलियां, ये बदनाम बाजार
ये गुमनाम राही, ये सिक्कोंकी झनाकार
ये इसमत के सौदे, ये सौदों पे तकरार
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है

ये सदियों से बेखौफ सहमी सी गलियां
ये मसली हुई अधखिली जर्द कलियां
ये बिकती हुई खोखली रंगरलियां
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है   

अशा दुभंगून टाकणाऱ्या ओळीही. यातल्या ‘मसली हुई अधखिली जर्द कलियां’ ने तर मनावर एक न पुसला जाणारा चरचरीत डाग पडतो! ‘जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, मेरे सामनेसे हटा दो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया….’ हे आक्रंदणारे कविमन ‘प्यासा’ ला आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

एकीकडे ते तसे तर दुसरीकडे तलतच्या स्वर्गीय आवाजात साहिरच्या अर्थवाही ओळी आहेत…
कही ऐसा न हो पांव मेरे थर्रा जाये
और तेरी मरमरी बाहोंका सहारा न मिले
अश्क बहते रहें खामोशा सियाह रातोंमें
और तेरे रेशमी आंचल का किनारा न मिले    (सोने की चिडिया)

काहीकाही गाण्यांचं नशीबच असं असतं की गाणं ‘हिट’ होण्यासाठी आवश्यक सगळं त्यात असूनही ते म्हणावं तितकं लोकप्रिय होत नाही. ‘तराना’ मधल्या ‘नैन मिले नैन हुए बावरे’ चा मी यापूर्वी असाच उल्लेख केला होता. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ मधलं ‘दिल से मिलाके दिल प्यार कीजिये’ हे असंच एक कमनशिबी गाणं. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ म्हटलं की लगेच ‘ जाये तो जाये कहां’ गुणगुणावसं वाटतं. ते गाणं थोर आहे याबाबत वादच नाही. पण ‘दिल से मिलाके दिल’ काही कमी गोड नाही. ‘शरमाना कैसा, घबराना कैसा, जीने से पहले मर जाना कैसा’  हे साहिरचे शब्द, लताचा शोख आवाज आणि सचिनदांची नटखट रचना.. क्या कहने!

‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने’ मध्ये ‘मैं तुझे दूध ना बक्षूंगी तुझे याद रहे’ असले जळते शब्द लिहिणारा साहिर ‘कभी कभी’ मध्ये शायराबाबतचे काय पण आपणा सर्वांबाबतचे एक निष्टुर पण अपरिहार्य सत्य सांगून जातो…

कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले तुमसे बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करे क्यूं कोई मुझको याद करे
मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहाँ बरबाद करे     

‘हम दोनो’ मधील ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ या गाण्याचा रंग काही वेगळाच आहे. ‘हर फिक्र को धुंए मे उडाता चला गया’ ही एखाद्या चित्रासारखी डोळ्यापुढं उभी रहाणारी कल्पना तर
‘गम और खुषी में फर्क न महसूस हो जहां
मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया ’ इथं युद्धात सगळ्या भावभावना बेचिराख झालेल्या सैनिकाची मनस्थिती! ‘वो सुबह कभी तो आयेगी’ हा दुर्दम्य आशावाद एकीकडं तर
‘जो भी है वो ठीक है जिक्र क्यूं करें
हम ही सब जहान की फिक्र क्यूं करें
जब उसे ही गम नही क्यूं हमें हो गम (फिर सुबह होगी)
ही बेफिकिरी दुसरीकडं! साहिरच्या लेखणीचे हे रंग थक्क करुन टाकतात.’क्या मिलिये ऐसे लोगोंसे जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये, असली सूरत छुपी रहे’ (इज्जत) असे लोकांच्या दिखाऊपणावर आघात करणारा साहिर ‘ आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू,जो भी है , बस यही इक पल है ’ (वक्त) अशा काव्यमय ओळीही लिहितो आणि ‘दूर रहकर न करो बात करीब आ जाओ, याद रह जायेगी ये रात करीब आ जाओ’(अमानत) असेही. ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’ असं साहिर म्हणतो आणि ‘जहां में ऐसा कौन है के जिस को गम मिला नही’ (हम दोनो) हेही साहिरच म्हणतो! ‘के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये’ असं साहिर म्हणतो आणि  ’मैं जानता हूं की तू गैर है मगर यूंही’ (कभी कभी) हेही साहिरच म्हणतो! ‘उनका भी गम है, अपना भी गम है,अब दिल के बचने की उम्मीद कम है एक कश्ती, सौ तूफां, जाये तो जाये कहां..’ (टॅक्सी ड्रायव्हर) लिहिणाराच साहिर ‘ये शोखियां ये बांकपन, जो तुझमें है, कहीं नहीं’ (वक्त) असंही लिहितो!

आणि ज्या काही गाण्यांच्या उल्लेखाशिवाय साहिरवरचा लेख म्हणचे चुन्यावाचून पान ठरेल त्या गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ना तो कारवांकी तलाश है’ ही ‘बरसातकी एक रात’ मधली कव्वाली! त्या कव्वालीविषयी लिहायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती कव्वाली जशीच्या तशी उतरवून काढायची आणि एक सलाम ठोकून बाजूला उभं रहायचं!’मेरे नामुराद जुनून का, है इलाज कोई तो मौत है, जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर की तलाश है’ काय किंवा ‘इश्क मजनू की वो आवाज है जिसके आगे, कोई लैला किसी दीवार से रोकी ना गयी’ काय… हे साहिरनं कोणत्या कैफात लिहिलं कुणास ठाऊक! ‘धूल का फूल’ मधलं ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ हेही माझं अत्यंत आवडतं गाणं. कुणाला ते प्रचारकी थाटाचंही वाटेल. वाटू दे! यातल्या किती लोकांना ‘कुरान न हो  जिसमें वो मंदिर नही तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नही है’ असं लिहिता येईल? यातला साहिरचा प्रस्थापितांविरुद्दचा विखार रफीच्या टिपेल्या पोचलेल्या आवाजात आपल्या आत मृतवत झालेल्या एका माणसाला गदागदा हलवतो…’इन्सानोंके लाशोंसे कफन बेचनेवाले… ये महलोंमें बैठे ये कातिल ये लुटेरे…’ छे!

तलतची जशी वाईट गाणी फारच कमी आहेत तसंच साहिरचंही आहे. करपलेलं बालपण, गरीबी, विफल प्रेम, त्या काळात इस्लाममध्ये न स्वीकारला जाणारा नास्तिक स्वभाव, जवळजवळ गर्वाच्या जवळ जाणारा अत्यंत तीव्र स्वाभिमान आणि उणंपुरं साठ वर्षाचं आयुष्य या सगळ्यात साहिर नावाच्या एका जादुगारानं  जे काय तयार केलं ते अफलातून आहे. मग हे सगळं बघतानाच आपण सैरभैर होऊन जातो. ‘दिल जो न कह सका’ (भीगी रात), ‘जिसे तू कबूल कर ले ’ (देवदास) -त्यातलं ‘मेरी बेबसी है जाहिर, मेरी आहें बेअसरसी’ हे खास- ‘देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से’ (एक महल हो सपनोंका), ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही’ (दिल ही तो है), ‘चीन -ओ -अरब हमारा’ (फिर सुबह होगी), ‘तेरी दुनिया में जीने से’ (हाऊस नं ४४), ‘छू लेने दो’ (काजल), ‘चलो इक बार फिर से’ (गुमराह), ‘हम दर्द के मारों का’ (दाग) अशी एकाहून एक रत्नं आठवत जातात. पारिजातकाच्या झाडाखाली बसलं असताना कुणीतरी ते झाड गदागदा हलवावं तसं सगळं आयुष्यंच नाजूक सुगंधी फुलांनी भरुन जातं!  ते प्रतिभेचं झाड हलवणारा अदृष्य हात असतो साहिर लुधियानवीचा!  

काबुल एक्सप्रेस

April 15, 2007

कबीर खान या दिग्दर्शकाच्या ‘सेहर’ या चित्रपटाविषयी मी पूर्वी लिहिले होते. त्याचाच ‘काबुल एक्सप्रेस’ हा चित्रपट पाहिला. ९/११ या घटनेनंतर अल-कायदा आणि तालिबानची पाळेमुळे उध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. त्या कारवाईत पाकिस्तानी सैन्यही सामिल झाले होते. तालिबान हे अमेरिका आणि पाकिस्ताननेच उभे केलेले भूत- पण आता मात्र पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक नाही असे म्हणून हात झटकून टाकले. तालिबानच्या उभारणीसाठी पाकिस्तानातून गेलेल्या सैनिकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. या सगळ्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातून वार्ताहर अफगाणिस्तानमध्ये गेले. असेच दोन भारतीय तरुण  आणि एक अमेरिकन वार्ताहर तरुणी, त्यांना काबुलपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतलेला एक अफगाणी ड्रायव्हर आणि या सगळ्यांना ओलीस धरुन पाकिस्तानी सीमेपर्यंत पोचण्याची धडपड करणारा एक पाकिस्तान आर्मीचा ‘तालिब’ यांची ही कथा.

या कथेत नायक-नायिका नाहीत, खलनायकही नाही.(गाणे-बिणे तर नाहीच नाही!) या वार्ताहरांना ओलीस धरणारा तालिबही तसा क्रूर वगैरे नाही. परिस्थितीच्या आणि नियतीच्या अगम्य चक्रात भरडले जाणारे हे अगदी साधे लोक आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्वार्थ यात त्यांची आयुष्ये होरपळून निघालेली आहेत. या साध्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांची ही चटका लावणारी कथा. यातल्या पात्रांच्या बोलण्यातून आजूबाजूच्या परिस्थितीला स्पर्श होत जातो. अफगाणिस्तानमधील भग्न इमारती, उध्वस्त झालेली शहरे आणि त्याबरोबरच ढासळलेले लोक पाहून अंगावर शहारा येतो. काय दोष आहे या लोकांचा? त्यांना ना तर तालिबानशी काही मतलब आहे, ना अमेरिकेशी. का त्यांचा आयुष्याची अशी न संपणारी फरफट सुरु आहे? आणि कधीपर्यंत?

‘काबुल एक्सप्रेस’ अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत नाही. पण तो तुम्हाला मुळापासून हादरवून टाकतो. अफगाणिस्तानच्या पाकिस्तानी सीमेवर अमेरिकन सैनिकांनी पकडून आणलेल्या ‘तालिब’ मध्ये ‘आपले’ किती लोक आहेत या चिंतेने तडफडणारा पाकिस्तानी सैनिक – पण एकही पाकिस्तानी ‘तालिब’ नाही असे सरकारनेच जाहीर केल्याने त्याला तसे सांगताही येत नाही- त्या ‘तालिब’ पैकी पळून जाणाऱ्या एकावर गोळ्या मारतो, पण त्या त्याला लागू नयेत अशा बेताने. न जाणो तो ‘आपला’ असला तर! पण अमेरिकन सैनिकांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. एक अमेरिकन सैनिक सहजपणे गोळी मारुन त्या ‘तालिब’ ला ठार करतो. तो अफगाणी असे, की पाकिस्तानी! युद्धाची ही अपरिहार्य निष्ठुरता आपल्याला स्पर्श करुन जाते. अस्वस्थ करुन जाते.

‘अ गुड क्राफ्टसमन कॅन प्रोड्यूस अ मास्टरपीस विथ इंफिरिअर टूल्स’ हे पटावे अशी कबीर खानची या चित्रपटातली कामगिरी आहे. अर्थात अर्शद वारसी हे काही ‘इंफिरिअर टूल’ नाही – नॉट बाय एनी स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन! पण जॉन अब्राहम या माणसाविषयी बाकी आदर वाटावा असे त्याने आत्तापर्यंत काही केल्याचे स्मरणात नाही.( बिपाशा बसूशी मैत्री सोडून!) पण ‘काबुल एक्सप्रेस’ हा संपूर्ण दिग्दर्शकाचाच चित्रपट आहे. अफगाणिस्तानच्या भग्न अवशेषांमध्ये  व्यायाम करणारा जॉन आणि त्याच्याकडे मान वळवून कुतुहलाने पहाणारा एक अफगाणी छोकरा. तुलाही करायचाय व्यायाम माझ्याबरोबर? ये… जॉन त्याला खुणेनेच बोलावतो. तो छोकरा उठून उभा रहातो. त्याच्या एका पायाच्या जागेवर पोकळी आहे… कुबडीवर रेलून तो जॉनकडे बघतो आणि आपल्या आत कुठेतरी काहीतरी तुटतं..  काबुलच्या त्या खडबडीत रस्त्यावर तालिबच्या हातातल्या रेडिओवर कुठल्यातरी हिंदुस्थानी रेडिओ स्टेशनची खरखर ऐकू येते.. नंतर अस्पष्टपणे काही ओळखीचे सूर ऐकू येतात…
‘मै जिंदगीका साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवेमें उडाता चला गया..’
नकळत हे दोन्ही भारतीय स्वतःशी गुणगुणायला लागतात. हळूच त्यात एक तिसरा सूर मिसळतो. तो असतो त्या ‘तालिब’ चा. तुमची हिंदी गाणी, तुमचे हिंदी चित्रपट.. अहो, आमचंच आहे तेही सगळं… आम्ही तर म्हणतोच की ‘माधुरी दिक्षीत दो, काश्मीर लो…’ मग हा भेसूर चेहऱ्याचा पाकिस्तानी तालिब आपल्याला सरहदीपलीकडचा आपलाच कुणी सगा वाटायला लागतो. गुलजारच्या ‘सरहद…’ ची आठवण येते.. अर्शद तर त्याला शेवटी म्हणतोच, इम्रान साहेब, तुम्ही काही एवढे वाईट नाही आहात. तुम्ही जर तालिब नसतात, तर कदाचित आपण चांगले दोस्तही होऊ शकलो असतो…. एक दीर्घ सुस्कारा टाकून तालिब म्हणतो. ” ते तुम्ही लोक म्हणता ना, तसं… अगले जनममें…” 

‘काबुल एक्सप्रेस’ चे संवाद ‘सेहर’ सारखेच लक्षात रहाणारे आहेत. तालिबने आपले नाव ‘इम्रान खान अफ्रीदी’ म्हणून संगितल्यावर ‘नाव तर जबरदस्त आहे तुमचं… क्रिकेट वगैरे खेळत असालच…’ असं त्याला अर्शद वारसी विचारुन जातो ” तो क्या तुम्हारे मुल्क नें जिसका नाम सचिन होता है वो हर बच्चा बल्लेबाज होता है?” हा तालिबचा प्रश्न त्या वातावरणातही आपल्याला हसवून जातो. ‘मी कोकही पीत नाही आणि पेप्सीही’ असं त्या अमेरिकन तरुणीनं सांगितल्यावर ‘व्हॉट टाईप ऑफ अमेरिकन यू आर?’ हा अगदी नैसर्गिक प्रश्न आणि ‘दी सेन्सिबल टाईप, आय गेस….’ हे तिचं उत्तरही लक्षात रहाण्यासारखं. त्या जीवनमरणाच्या खाईत कपिल देव श्रेष्ठ की इम्रान खान हा अर्शद आणि तालिबचा वाद अगदी आपला वाटणारा.

काल ‘काबुल एक्सप्रेस’ पाहिला. आनंद तर झालाच, पण अस्वस्थही झालो. ‘बिटरस्वीट एक्सपिरिअन्स’ यालाच म्हणत असावेत. अशा प्रकारच्या चित्रपटांचं हे यशच म्हणायला पाहिजे. ‘यशराज फिल्म्स’ सारख्या मोरपंखी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला असा चित्रपट काढावासा वाटला हेही.

गुलजार नावाचा कवी

March 25, 2007

फार वर्षांपूर्वींची गोष्ट. रेडिओ सिलोनवर रविवारी’एस.कुमार्स का फिल्मी मुकद्दमा’ नावाचा एक कार्यक्रम लागत असे. ‘सजीली रंगीली टेरीन की बहार, संजो लाये है एस. कुमार’ हे त्याचं जिंगल अद्यापि लक्षात आहे. त्या कार्यक्रमात एकदा गीतकार गुलजार यांच्यावर आरोप केला गेला होता, की त्यांची गाणी फार दुर्बोध, कळायला अवघड अशी असतात. उदाहरणार्थ ‘पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकोंके नशेमन तक इस मोड पे जाते है’ म्हणजे काय? गुलजार यांनी याचं काय स्पष्टीकरण दिलं हे लक्षात नाही, पण त्यांनी असं सांगितल्याचं आठवतं की माझ्या ओळींचे शब्दशः अर्थ घेऊ नका. ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे’ मधल्या ‘आवाज’ चा अर्थ स्वरयंत्रातून बाहेर पडणारा ध्वनी असा नाही. ‘हमारा देश हमें आवाज दे रहा है’ मधला ‘आवाज’चा अर्थ काय आहे पहा! ‘है नाम होटोंपे अब भी लेकिन, आवाज में पड गयी दरारें’ मधल्या ‘आवाज’ चा अर्थ पहा! ‘मोरा गोरा अंग लइ ले, मोहे शाम रंग दइ दे ‘ पासून गीतलेखनाला सुरुवात करणाऱ्या गुलजार यांची ओळख अशी सांकेतिक गाणी लिहिणारा गीतकार अशीच आहे. यातल्या बऱ्याच गाण्यांना आर.ड़ी. बर्मन यांचा परीसस्पर्श झाल्यानं ती अधिक सुंदर झाली हे खरं, पण तो झाला नसता तरी ती तितकीच आशयसंपन्न राहिली असती असं वाटतं. अर्थात या पहिल्या गाण्यावर असलेली शैलेंद्रच्या लोकगीतांची छाप लपून रहात नाही. (तोहे राहू लागे बैरी, मुसकाये जी जलायके) पण नंतर बाकी गुलजार यांची गीते अगदी स्वतंत्र अंगाने गेलेली दिसतात. खरंतर हा माणूस आधी कवी आणि मग गीतकार. म्हणून गुलजार यांच्या गाण्यांत काव्यगुण विपुलतेने आढळतो. गुलजार यांच्या रचना समजून घ्यायच्या तर त्यांच्या गीतांमधील ही सांकेतिकता कळावी लागेल. ‘वो यार है जो खुशबू की तरहा, जिस की जुबाँ उर्दू की तरहा’ याचा अर्थ काय हे समजावून सांगणं कठीण आहे. ‘उर्दू की तरहा’ म्हणजे उर्दू की गैरउर्दू असा प्रश्न इथे गैरलागू आहे. ‘तावीज बनाके पहनूं उसे, आयत की तरह मिल जाये कहीं’ याचा आपल्याला कळालेला अर्थ आणि गुलजार यांना अभिप्रेत असलेला अर्थ एकच आहे का? मग अशा वेळी गालिबसारखे गुलजार यांचेही काव्य ‘या तो आप समझे या खुदा समझे’ म्हणून सोडून द्यायचे का? संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार यांच्या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. ‘जीने के लिये सोचा ही नही दर्द संभालने होंगे, मुस्कराये तो मुस्करानेके कर्ज उतारने होंगे’ असं लिहून जाणारे गुलजार ‘वक्त के सितम कम हसीं नही,आज यहां है कल कहीं नही’ असंही लिहितात. ‘सुरमई अंखियोंमें नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे’ ही लोरी ‘सदमा’ ला काय करूण झालर देऊन जाते! ‘आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है’ हा गुलजार यांचा खट्याळपणा आणि ‘सीधे सीधे रास्तोंको हल्का सा मोड दे दो, बेजोड रूहोंको थोडासा जोड दे दो’ हा अबोल प्रेमभाव! गुलजार यांच्या गीतांमध्ये रात्र, स्वप्न. चंद्र यांचे उल्लेख अनेकवेळा येतात.कुठे सलील चौधरींच्या सुरावटीवर मुकेश ‘कभी कभी तो आवाज देकर मुझको जगाया ख्वाबोंने’ म्हणतो तर कुठे किशोरकुमार कधी ‘चांद चुराके लाया हूं, चल बैठे चर्च के पीछे’ म्हणतो तर कधी ‘फिर वही रात है ख्वाबोंकी’! गुलजार यांच्या पहिल्यावाहिल्या गीतातही ‘छुप जाउंगी रात ही में, मोहे पीहा संग दई दे’ आहे आणि ‘बदरी हटाके चंदा, छुपकेसे झाके चंदा’ हेही आहे!रस्ता, वळण हीही गुलजार यांची आवडती प्रतिमा. रस्ता वळाला की चाल वळणे हे तुमचेआमचे झाले. ‘मै मुड गया तो साथ साथ, राह मुड गयी’ हा तो खास गुलजार टच! ‘इस मोडसे जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते , कुछ तेज कदम राहे’ इथेही रस्ते आहेतच ,पण ‘इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है’ यातला हळुवारपणा पहा! तीच गोष्ट ‘जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है’ या गाण्याची. ‘प्यार की तुम इंतेहा हो, प्यार का आगाज हम’ या ओळीतले सौंदर्य जसे मोहवणारे तसेच ‘जीने की तुमसे वजह मिल गयी है, बडी बेवजह जिंदगी जा रही थी’ या ओळीतलेही. गालिबचा गुलजार यांच्या शायरीवरील प्रभाव हाही एक फार मनोरंजक विषय आहे. ‘दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन, बैठे रहे तसव्वरे जाना किये हुये’ या गालिबच्या मुखड्याचा वापर करून गुलजार यांनी एक स्वतंत्र गीत लिहिले आहे हे तर आपल्याला माहिती आहेच. पण उपमा उत्प्रेक्षांचा चमत्कारिक वाटावा असा कल्पक वापर हेही दोघांचे समान वैशिष्ट्य आहे. गालिबप्रमाणेच गुलजार यांच्या प्रतिमा सांकेतिक असल्यामुळेच की काय कुणास ठाऊक, पण अगदी वेगळ्या असतात. प्रेयसीच्या आगमनाला आम शायरांनी थंड हवेच्या झुळुकीची उपमा सर्रास दिली आहे. गुलजार बाकी याला ‘तेरा आना भी गर्मियोंकी लू है’ म्हणतात! प्रेयसीच्या बोलण्यात इतरांना चंदनाचा, वाळ्याचा वगैरे सुगंध दिसतो, गुलजारना बाकी ‘तेरी बातों में किमाम की खुशबू है’ असे म्हणावेसे वाटते. या किमामच्या आणि जर्द्याच्या खुशबूमध्ये जे रंगीलेपण आहे ते इतर सुगंधांत नाही!याच गीतात दिल्लीचा उल्लेख ते ‘बल्लीमारा’च्या गल्लीसकट करतात. याच गल्लीत गालिबचे वास्तव्य होते हे आपण जाणतोच. धडकत्या हृदयावर तर शेकड्यानी गाणी लिहिली गेली आहेत, पण या जळत्या हृदयातल्या आगीवर बिडी पेटवून घे असं आवाहन करणाऱ्या प्रियेची कल्पना गुलजारच करू जाणोत! (‘बीडी जलायले जिगरपे पिया, जिगरमां बडी आग है’- इथेही ती बिडी आहे, सिग्रेट नव्हे – हे सिग्रेट सोडून बिडी ओढायला लागणाऱ्या चांगदेव पाटलाइतके – किंवा सिग्रेटीचे मचूळ ब्रँड सोडून वडारणीच्या रासवट अलिंगनासारखी चार मिनार ओढणाऱ्या दत्तू जोशीसारखे साक्षात्कारी!) गुलजार यांची ही सांकेतिक संवेदनशीलता कधीकधी त्यांची मर्यादा होते की काय अशीही शंका येऊ लागते. ‘जब तारें जमीं पर चलते हैं, आकाश जमीं हो जाता है, उस रात नही फिर घर जाता, वो चांद यही सो जाता है’ हे थोडेसे उबवलेले वाटते. ‘आंखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है’ हे नकोसे वाटते. मग तेवढ्यात वसंतरावांनी बांधलेले सुरेल ‘पपीहरा’ आठवते. इक घन बरसे, इक मन प्यासा इक मन प्यासा, इक मन तरसे सावन तो संदेसा लाये मेरे आंख से मोती पाये दान मिले बाबुलके घरसे गुलजार यांच्या गैरफिल्मी रचनांतून त्यांच्यातला गीतकाराआधीचा कवी दिसतो. ‘स्पर्श’ मालिकेसाठी वापरलेल्या हाथ छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते वक्त की शाख से लम्हे नही तोडा करते या ओळी किंवा शाम से आंख में नमी सी है आज फिर आपकी कमीसी है या ओळी पहा. इथली ‘कमीसी’ या शब्दाची निवड हीच ती गुलजार शैली. ‘जिंदगी यूं हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा’ हीपण एक शीच सुरेख गजल. आणि शेवटी गुलजार यांची एक अप्रतिम कविता. स्रहद्दीपलीकडचे लोक आणि आपण यांच्याविषयी एक गीतकार नव्हे तर एक हळुवार कवी किती कमी शब्दांत किती काय काय सांगून जातो हेच पहा: सुबह सुबह इक थाप की दस्तक पर दरवाजा खोला, देखा सरहद के उस पार से कुछ मेहमान आये है आंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाये पांव धोये, हाथ धुलाये, आंगन में आसन लगवाये और तंदूर पे मकई के कुछ मोटे मोटे रोट पकाये पोटली में मेहमान मेरे, पिछली सालोंकी फसलोंका गुड लाये थे आंख खुली तो देखा घर में कोई नही था हाथ लगाकर देखा तो तंदूर अभीतक बुझा नही था और होटोंपर मीठे गुड का जायका अबतक चिपक रहा था ख्वाब था शायद, ख्वाबही होगा सरहद पर कल रात सुना है चली थी गोली सरहद पर कल रात सुना है कुछ ख्वाबोंका खून हुवा है

कवीमनाचा व्यापारी-राज कपूर

March 11, 2007

वुडहाऊससारखा राजकपूरही एकतर संपूर्ण आवडावा लागतो, नाहीतर अजिबात नाही. ‘दे गयी धोखा हमें नीली नीली आंखे’ हे एकतर संपूर्ण पटते किंवा अजिबात नाही ‘तुम्हारा कसूर नही है रीटा, मेरी सूरत ही ऐसी है’ यावर पूर्ण विश्वास बसतो, किंवा अजिबात नाही!
पैशाच्या राक्षसी जबड्यात आदर्शवादाचा बळी जाणे, हे आपण किती वेळा पाहिले आहे! ‘श्री ४२०’ काढणारा राज कपूर ‘राम तेरी गंगा मैली’ काढू शकतो याला काय म्हणावे? ‘केलेवाली, अगर मैने तुम्हारा पैसा नही दिया तो?’ ‘तो हम समझेगा, हमारा बेटा खा गया’ हा प्रसंग चित्रीत करणारा हळवा दिग्दर्शक झीनत अमानसारख्या नायिकेला घेऊन सिनेमा काढतो हा कुणाचा पराभव म्हणायचा? ‘मोती कुत्ता नही है…’ यामागची वेदना तुम्हाला कळत नाही, तर मग घ्या लेको डिंपलपासून सोनिया सहानीपर्यंत सगळ्यांचे वस्त्रहरण केलेला आंबटशौकीन ‘बॉबी’!’ हा कुणी कुणावर उगवलेला सूड म्हणायचा?
पण ते असो. तो संवेदनशीलतेची भळभळती जखम वागवणारा राज कपूर आपल्याला आठवायचा नाही. ही जखम होण्याआधीचा, तळहातावर हृदय घेऊन प्रेमाच्या शोधात वावरणारा राज कपूर आपण आठवू. ‘आज गरीब भी गरीब को नही पहचानता’ ही व्यथा बाळगणारा, ‘ये घर तो ईट पत्थर का है, लेकिन उस सोने के घर से तुम हम को कैसे निकालेगा मिस डिसा?’ अशी माया लावणारा, ‘दिलपे मरनेवाले, मरेंगे भिखारी’ म्हणत हसणारा… प्रेमभंग आणि विरह यातच धन्यता मानण्याच्या त्या जमान्यात राज कपूरकडं दु:ख आणि वेदना व्यक्त करण्यासाठी एक अमोघ अस्त्र होतं ते म्हणजे हास्य. एकीकडे खुरटलेली दाढी आणि वर्षानुवर्षे बरा होत नसणारा बद्धकोष्ठ असल्यासारखा चेहरा घेऊन ‘ टूटे हुवे ख्वाबोंने’ म्हणत ‘दलीप’ फिरत होता. दुसरीकडे चुकून दोन वेळा कायम चूर्ण घेतल्यासारखा चेहरा घेऊन ‘दुखी मन मेरे’ म्हणत देव आनंद प्रेमाचे ‘गली कूंचे’ धुंडाळत होता. त्यात ‘टूटा जिस तारे पे नजर थी हमारी’ म्हणून राज कपूर हसला आणि देवदास होण्याची तमन्ना बाळगणारी एक पिढी ‘ अपना आदमी है, भिडू…’ म्हणत गारद झाली.  ‘ऐ दिल की लगी क्या तुझ को खबर, एक दर्द उठा भर आई नजर’ म्हणत हातातल्या चाकूनं त्यानं नारळाच्या झाडावर प्रियेच्या नावाची अक्षरं खोदत स्मित केलं आणि लोकांचे डोळे पाणावले. ‘जाण्याआधी मला तुझे न रडणारे डोळे पाहू दे’ असं त्या रशियन पाहुणीनं म्हणताच त्यानं डोळ्यावरचा काळा चष्मा काढला आणि तो हसला…. असा हसला की व. पु. काळ्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यापेक्षा त्यानं एखादा हुंदका दिला असता, तर जास्त बरं झालं असतं!

राज कपूरचं हेच हास्य कधीकधी कमालीचं जहरी आणि कडवट होत असे. ‘ओ मेरे सनम…’ या गाण्याच्या वेळी
‘सुनते थे प्यार की दुनिया में दो दिल मुश्किल से समाते है
क्या गैर वहां, अपनों तक के, साये भी न आने पाते है
हमने आखिर क्या देख लिया
क्या बात है क्यूं हैरान है हम”

असं म्हणत हातातला व्हिस्कीचा ग्लास फिरवत राज कपूरनं केलेलं छद्मी हास्य कोण विसरेल?

राज कपूरचा चेहरा नुसताच देखणा नव्हता, तर तो कमालीचा लवचिक होता. श्री ४२० मध्ये मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या सुशिक्षित तरुणाला एक भिकारी जीवनातले एक कडवट सत्य सांगतो, ‘पढे-लिखे, इमानदार. मेहनती इन्सान को यहां काम नही मिल सकता. क्योंकि ये बंबई है मेरे भाई, बंबई!’. या प्रसंगात राज कपूरने चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि दु:ख याचं काय बहारदार मिश्रण दाखवलंय! याच सिनेमात ‘इचक दाना बिचक दाना’ या गाण्याच्या वेळी नर्गिसने घातलेल्या उखाण्याचे उत्तर तो चुकीचे देतो, तेंव्हाचे त्याचे शरमणे, लाजणेही असेच लक्षात राहून गेले आहे.

‘भोला-भाला छोरा’ च्या भूमिका करताना राज कपूरच्या चेहऱ्यावरची निरागसता पहात रहावी अशी असे. त्यात त्याला मिळालेले संवादही आशयपूर्ण आणि प्रवाही होते. ‘जिस देश में गंगा बहती है’ मध्ये फटाकडी कम्मो त्याला ‘तुम कौन जात हो – मरद के औरत?’ असं विचारते तेंव्हा ‘अभी तक तो मरद हूं जी, आगे शिवजी मालिक है’ असं तो म्हणतो ते अगदी लाजवाब. ‘माफ करना कम्मोजी, मुझे अंदर की बात समझनेमे जरा टैम लगता है..’ हेही पालुपद अगदी लोभस.

आणि राज कपूरची माझ्या मते सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे ‘जागते रहो’.  ही तर काय, सेल्युलॉइडवर बंदिस्त झालेली एक कविताच आहे. जबरदस्त बांधीव पटकथा आणि शंभू मित्रांचे हळुवार दिग्दर्शन यांनी हा चित्रपट ‘आर. के. ‘ च्या ‘क्लासिक्स’ या यादीत जाऊन बसला आहे. खेडेगावातून रोजगाराच्या शोधात आलेला आणि एक पेलाभर पाणी प्यायला मिळावे म्हणून कासावीस झालेला एक तरुण – त्याला शहराचे कायकाय रंग एका रात्रीत बघायला मिळतात! सभ्यतेचे बुरखे पांघरून आपले हिडीस चेहरे लपवणाऱ्या या लोकांच्या गर्दीत त्याला एका रात्रीत धडा मिळतो तो बेईमान होण्याचा! या महाचोरांनी ‘चोर, चोर’ म्हणून आळ घेतलेला हा तरुण शेवटी सकाळच्या प्रकाशापासूनही लपू पहातो. मग तिथे येते एक छोटी निरागस मुलगी  त्याला विचारते : ‘डरते हो? क्यों? तुमने तो कुछ नही किया है!’ अरे, खरंच की! ‘मन सुद्द तुझं.. ची आठवण यावी असा प्रसंग! मग हा निष्पाप तरुण ताठ मानेने त्या चोरबाजारातून बाहेर पडतो. एका रात्रीत पर्दाफाश झालेल्या संभवितांना पोलीस पकडून नेत असतात. ते सगळं मागं टाकून, जणू त्या रात्रीबरोबर रात्रीचे सगळे अनुभव मावळल्यासारखे मागे टाकून हा तरुण प्रकाशात येतो  आणि त्याला समोरच्या मंदिरात झाडांना पाणी घालणारी एक तरुणी दिसते. पाणी! ज्यामुळे हे सगळं रामायण घडलं ते घोटभर पाणी! व्याकुळ झालेला हा तरुण तिच्याकडे पाण्याची याचना करतो. भिकाऱ्यासारखा दिसणारा हा तरुण बघून ती तरुणी क्षणभर बावरते. मग तिच्या चेहऱ्यावर करुणा दाटून येते. अपार, कैवल्यस्वरूपी करुणा!  ती घागरीतल्या पाण्याची धार त्याच्या हातात धरते आणि तो तहानलेला, थकलेला तरुण ओंजळीने ते पाणी घटाघटा पिऊ लागतो. चित्रपट संपतो.
‘जागते रहो’ मधला ‘जिंदगी ख्वाब है’ म्हणत झिंगणारा मोतीलाल जसा कायमस्वरूपी लक्षात राहिलाय तसाच हा गावंढळ, अशिक्षित अनामिक राज कपूर! मळके, फाटकेतुटके कपडे, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर भीती आणि कोरडा पडलेला घसा आपल्या हृदयाला स्पर्श करून जातो.

‘नसीब’ या तद्दन बाजारू सिनेमात मनमोहन देसाईनं आख्खी फिल्म इंडस्ट्री एका गाण्यात गोळा केली. त्या वेळी वेटर अमिताभनं आग्रहानं ऍकॉर्डियन राजकपूरच्या गळ्यात अडकवलं आणि त्या थकलेल्या, बेडौल शरीराच्या शोमननं त्यावर बोटं फिरवत चार पावलं टाकली….. काळ सर्रकन मागे गेला. निळ्या डोळ्यांचा, लालबुंद चेहऱ्याचा एक देखणा प्रेमी आपल्या प्रेमाचा जाहीर इजहार करीत गायला लागला
‘आप हमारे दिल को चुराकर, ख्वाब चुराये जाते हैं
ये इकतर्फा रस्म-ए-वफा हम, फिरभी निभाये जाते हैं
चाहत का दस्तूर है लेकिन, आपको ही मालूम नही
जिस महफिल में शमा हो, परवाना जायेगा’

हाच राज कपूर आपण आठवू आणि लक्षात ठेवू. ‘आज तुम्हे विद्या की नही, माया की जरूरत है’ हा साक्षात्कार होण्यापूर्वीचा ‘सीधी सी बात, ना मिर्ची मसाला’ सांगणारा एक दिलवाला!’रंजो गम मेरे जीवन साथी, आंधियोंमे जली जीवन बाती, भूख ने है बडी प्यार से पाला’ म्हणत अगदी तस्से हसणारा!