श्रद्धा आणि अंधश्रद्धा

‘श्रद्धेच्या परीक्षणाला विरोध का?’ या माझ्या लिखाणाला आलेल्या प्रतिसादात काही लोकांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या व्याख्या स्पष्ट कराव्यात असे म्हटले आहे. काहींनी ते व्यक्तिसापेक्ष असून तसे करता येणार नाही असे म्हटले आहे.

माझ्या मते ते इतके अवघड नाही. प्रयत्न तर करूया.

एक ताजे उदाहरण घेऊ. नुकतेच दिवंगत झालेले भाजपचे तरूण नेते प्रमोद महाजन यांच्यासंदर्भात विविध मते व्यक्त करण्यात आली. महाजन यांचे वाद्ग्रस्त व्यक्तिमत्व, शिवानी भटनागर हत्येशी त्यांचा जोडला गेलेला संबंध, रिलायन्स इंड्स्ट्रीजशी त्यांच्या जवळीकीमुळे त्यांच्यावर उडालेले शिंतोडे, सोनिया गांधींची मोनिका लेविन्स्कीबरोबर त्यांनी केलेली तुलना, त्यांनी सांभाळलेली भाजपची २००० कोटींची व्यवस्था…यामुळे त्यांचे टीकाकारही भरपूर होते. पण यातल्या कशावरही विश्वास न ठेवता किंबहुना असे काही असूच शकणार नाही अशा भूमिकेचे लोकही आहेत. तसेच या सगळ्याची कल्पना असूनही ‘शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच…पण तरीही पंतप्रधान होण्याची योग्यता असलेला एक मराठी राजकारणी गेला’ अशी व्यवहारी भूमिका घेणारेही लोक आहेत.

मला वाटते या एकाच उदाहरणातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक दिसून येतो. महाजन आजारी असताना श्रद्धा व अंधश्रद्धा याचे दुसरे उदाहरण दिसून आले. आपण स्वतः व आपले कुटुंबीय अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असताना ( व एकीकडे महाजनांवर शक्य ते सगळे वैद्यकीय उपचार सुरु असताना – प्रयत्नवाद सोडलेला नाही!) त्यांचा मुलगा राहुल देवळात, दर्ग्यात, गुरुद्वारामध्ये प्रार्थना करत होता. स्वतःची मानसिक गरज म्हणून आणि आपल्या संबंधितांना आधार मिळावा म्हणून.

ही श्रद्धा.

त्याचवेळी देशभर जप-जाप्य, मृत्युंजय मंत्राचे पठण याचे पेव फुटले होते. महाजन वाचणे ही ‘मेडीकल इम्पॉसिबिलिटी’ झाल्यावरसुद्धा ‘आमच्या मंत्रांनी ते परत येतीलच’ असे म्हणून लोक पुन्हापुन्हा मंत्रजागर करत होते, यज्ञात परत परत तूप ओतत होते.

ही अंधश्रद्धा.

संकटकाळात अमुक एका व्यक्तिच्या / नामाच्या स्मरणाने मला बळ मिळते, आधार मिळतो व त्या संकटावर मात करण्यासाठीच्या माझ्या प्रयत्नात भर पडते.

ही श्रद्धा.

संकटकाळात देवाला नवस बोलणे, नवस न फेडल्यास देवाचा कोप होतो असा समज करून घेणे, भूतबाधा, मांत्रिक, भगत, भानामती, प्लँचेट यावर विश्वास ठेवणे, दृष्ट लागणे, दृष्ट काढणे, नजर वाईट असते असे मानणे, जन्मपत्रिका, कुन्डली, रास, गृह – तारे यांची स्थिती, नियतीवाद, उपास-तापास, व्रतवैकल्ये, गंडे, दोरे, ताईत यांनी आपल्यावरील संकटांचे मोचन होईल असा विश्वास ठेवणे, शकुन- अपशकुन, शुभ-अशुभ, पाप-पुण्य, तीर्थ- प्रसाद, पूजा-अर्चा, मासिक धर्माच्या काळात स्त्रीला अपवित्र समजणे, मनुष्यरूपी कुठल्याही प्राण्यामध्ये परमेश्वराचा अंश असतो म्हणून त्याची आराधना करणे….

आणि सर्वात महत्वाचे- ‘हे असे का? ‘ हा प्रश्न न विचारणे

ही अंधश्रद्धा.

भारतीय घटनेमद्धे शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे व चौकस बुद्धी वाढवणे ही भारतीय नागरिकाची प्रमुख कर्तव्ये म्हणून दिली आहेत. ‘मी हे का करु’ हा प्रश्न प्रत्येकाने प्रथम स्वतःला आणि नंतर इतरांना विचारण्याचे धाडस केल्यास हा गुंता पट्कन सुटू शकेल. पण हा प्रश्न विचारण्याचे धाडस न झाल्याने समाजाचे आजपर्यंत अपरिमीत नुकसान झाले आहे.पुरुषांपेक्षा बायकांना दात कमी असतात असे ऍरिस्टॉटलने म्हटले. कित्येक वर्षे ते समाजाने मान्य केले. किमान दोघांचे दात मोजून बघावे इतकेही धाडस दाखवणे कुणाला जमले नाही. विमानातून पक्ष्यांची मोजदाद करत असताना डॉ. सलीम अली म्हणाले खाली दिसणाऱ्या एका थव्याकडे पाहून म्हणाले ‘लिहा— सत्तर पक्षी’. कुणीसे विचारले ‘ सर, सत्तर कशावरून?’ सलीम अली म्हणाले ‘ बिकॉज सलीम अली सेज सो’. समाजाला मागे नेणाऱ्या अशा असंख्य घटना घडल्या आहेत….

घडत आहेत.

गप्प रहा… बोलू नका… हे असे का हा प्रश्न विचारू नका….

‘का?’ हा प्रश्न समाजपंडीतांना कधीच आवडला नाही. विवेकबुद्धीच्या निकषावर कोणतेही तत्व, देवाचे अस्तित्वदेखील पारखून पहावे असे म्हणणाऱ्या सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यावा लागला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते एवढेच म्हणण्याचा अपराध करणाऱ्या गॅलीलीओला एकांतवासात आंधळा, करूण मृत्यू आला. युरोपातील चिकित्सावादही त्यानंतर कित्येक शतके निपचिप पडून राहिला. भारतातील तर बातच सोडा. इंग्रज सैंन्याच्या गोळ्या थोपवायच्या असतील तर पुण्याच्या तटाभोवती जानवी व सोवळी बांधायला सांगणऱ्या पळपुट्या बाजीरावाचे उदाहरण पुरेसे आहे.

मग करावे तरी काय?

विवेकाची एक आचारसंहिता सांगतो – पटते का बघा.

मी आजपासून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय ती मान्य करणार नाही.

जर गेल्या सहा महिन्यात तुम्ही आजवर ज्याच्यावर गाढ श्रद्धा ठेवली आहे अशा एकाही बाबतीतले तुमचे मत अजिबात बदलले नसेल, तर तुमची नाडी तपासून पहा- कदाचित तुम्ही मृत झालेले असाल!

हे वाक्य माझे ब्रीदवाक्य असेल.

आईच्या गर्भातले बालक सर्वात लवचिक असते तर मरण पावलेल्या माणसाचे शरीर हे सर्वात अलवचिक. हेच मनाच्या आणि विचारांच्या बाबतीही खरे आहे. लाइफ इज अ जर्नी फ्रॉम फ्लेक्सीबिलिटी टू रिजीडीटी. त्यामुळे मी माझे मन , माझे विचार तरूण ठेवण्याचा प्रयत्न करीन.

देवळात / दर्ग्यात / चर्चमद्धे गेल्यावर मला बरे वाटते, कारण असे केल्याने बरे वाटले पाहिजे असे माझ्या मनाचे कंडीशनींग झाले आहे. एखाद्या बागेत किंवा स्मशानात गेल्यावरही मला तितकेच बरे वाटू शकेल पण त्यासाठी मला माझ्या मनावरचे आधीचे संस्कार पूर्ण पुसून टाकले पाहिजेत आणि तसे करण्याची माझी मानसिक तयारी नाही./ इच्छा नाही. किंबहुना तसे करून बघितल्यानंतर्ही मला बाग/ स्मशानापेक्षा देवळात जास्त बरे वाटत असेल तर तो देवळाचा गुणधर्म असू शकेल किंवा माझ्या मनाची तयारी पूर्ण न झाल्याचे लक्षण – हे मी मान्य करीन.

माझी श्रद्धा ही नम्र व लवचिक असेल. काशी विश्वेश्वराच्या देवळातली प्रचंड घाण, शिर्डीच्या साईमंदिरातले उबग आणणारे व्यापारीकरण, पंढरपूरच्या विठ्ठ्लमंदिरातली बडव्यांची पुंडगिरी हे बघून अशा ठिकणी देवाचे वास्तव्य कसे असेल हा प्रश्न मला पडल्यास तो दडपून न टाकता त्याला नैसर्गिक मानून त्याची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न करीन.

श्रद्धेचा अंगिकार करताना मला पटलेल्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मला असले पाहिजे, तसेच न पटलेल्या गोष्टी इतरांच्या दबावापुढे न झुकता नाकारण्याचेही. पण हे करत असताना मी प्रत्येक गोष्टीवर विचार आणि चिकित्सा करून माझे वैयक्तिक निष्कर्ष काढीन. त्याबाबत माझी भूमिका ही आग्रही किंवा न्यायाधिशी असणार नाही.

माझ्या मताशी पूर्ण विसंगत किंवा माझ्या मतांवर आघात करणारे एखादे मत अंतिम सत्य असू शकेल याची मी जाणिव ठेवीन. गुरोर्वाक्य प्रमाणम या वृत्तीचा मी त्याग करेन. इन्ग्रजी नवाचा आकडा मला नऊ दिसतो, पण टेबलापलीकडल्या माणसाला तो सहा दिसतो. हा दृष्टीकोनातला फरक मी मान्य करीन.

दोन कवितांचा उल्लेख करून हा लांबलेला विचार संपवतो

व्यर्थ गेला तुका

व्यर्थ ज्ञानेश्वर

संतांचे पुकार

वांझ गेले

(जिज्ञासूंनी पूर्ण कविता वाचावी)

आणि

इतिहासाचे अवजड ओझे

डोक्यावर घेऊन ना नाचा

करा पदस्थल त्यांचे आणिक

चढुनि त्यावर भविष्य वाचा.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

18 Responses to श्रद्धा आणि अंधश्रद्धा

  1. प्रमोद देव कहते हैं:

    संजोपजी नमस्कार!
    सर्वप्रथम मी आपले अभिंदन करतो कारण एका वादग्रस्त विषयाला आपण हात घातल्याबद्दल; पण एक सांगू का श्रध्दा आणि अंधश्रध्दा ह्या कोणत्या तरी एका गृहितकावर अवलंबून असतात असे मी मानतो.त्यामुळे ह्या संकल्पना बर्‍याच प्रमाणात व्यक्तिसापेक्ष असतात.

    उदा. बरेच लोक एखाद्या बाबा-बुवा-गुरुला मानतात. तो म्हणतो तेच खरे असे म्हणतात;पण त्याच वेळी अशाच तर्‍हेच्या दुसर्‍या बाबा लोकांना (ज्यांना मानणारेही असे बरेच लोक असतात) ते भोंदू असे म्हणतात.हेच उलटपक्षीही असते.
    आता इथे दोन्ही बाबा स्वत:ला इश्वराचे अवतार म्हणवतात आणि त्यांचे त्यांचे भक्तही तसेच मानतात. त्यांच्यासाठी ती श्रध्दा असते आणि विरुध्द पक्षीय साधूच्या भक्तांची श्रध्दा असते ती अंधश्रध्दा असे मानले जाते.
    मी म्हणतो तेच खरे आणि बाकी म्हणतात ते सगळे खोटे असा सगळा प्रकार असल्यामुळे ही सगळी शब्दांची फेकाफेक चाललेली असते.

    मी स्वत: लोकांच्या संकल्पनेतील देव मानत नसल्यामुळे मला हे सगळेच भोंदू वाटतात आणि दुरून बघताना मस्त करमणूकही होत असते.असे किती तरी लोक मी बघितलेत की ज्यांनी कपडे बदलावेत इतक्या सहजपणे गुरु बदललेत पण ‘स्व’ चा शोध घेण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही.

    देव सगळीकडे असतो असे एकदा मान्य केले(हे एक गृहित आहे) की मग कुठेही असू शकतो. जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी तो आहे हे मान्य करावेच लागते.मग तो बागेत असेल तसाच देवळात असेल.इस्पितळात असेल तसाच स्मशानातही असेल. शांत,निर्मळ वातावरणात असेल तसा बजबजपूरीतही असेल हे मान्य करावेच लागेल.ह्या गोष्टींना अंत नाही.

    म्हणूनच गृहित चुकले की उत्तर हे चुकणारच. तेव्हा ह्या भानगडीत पडण्यात काहीच मजा नाही. ज्यांना त्यांना त्यांच्या लाईनीप्रमाणे जाऊ द्या. जोपर्यंत झुकणारे आहेत तोपर्यंत झुकवणारे जन्मणारच आणि हे असेच जगाच्या अंतापर्यंत चालत राहणार आहे. हा लढा कधीच न संपणारा नाही.

    प्रमोद देव.

  2. Koham कहते हैं:

    Chaan lihila aahe…Praveen Devanni mhantalyapramane, tumachya shraddha andhashraddhanchya kalpana lok manya karatilach asa nahi…..karan tyachi konati legal, scientific definition hou shakanar nahi…..mazi shraddha tumhala andhashraddha vatu shakel…..prayatna changla hota pan vyaktisapekshata bajula karata yena ashakya aahe hya babatit. tyapeksha pratyekani apali sadsadvivekabuddhi vaparun ha nirnay ghyava ase vatate..

  3. yogesh कहते हैं:

    जर गेल्या सहा महिन्यात तुम्ही आजवर ज्याच्यावर गाढ श्रद्धा ठेवली आहे अशा एकाही बाबतीतले तुमचे मत अजिबात बदलले नसेल, तर तुमची नाडी तपासून पहा- कदाचित तुम्ही मृत झालेले असाल!

    हे अगदी पटले. समुद्राचे पाणी गोड झाले म्हणून झुंडीने येऊन ते पिणे, अमिताभच्या सिद्धिविनायक/विंध्यवासिनी देवीच्या दर्शनाला मुख्य बातमी म्हणून दाखवणे, सचिनने नागबळी विधी करणे या गोष्टी आपल्या समाजाची होणारी अधोगतीच दाखवतात.

  4. माधव कुळकर्णी कहते हैं:

    सन्जोप राव,
    लेख आवडला, बहूतांश गोष्टींशी सहमत आहे.
    जेव्हा आपल्या स्वतःसाठी आपण प्रयत्न करूनही यश मिळत नाही (लक्षात घ्या; प्रयत्न करूनही हे म्हणतोय !) तेव्हा एक मानसीक परिस्थिती निर्माण होते…. हेच दुसऱ्याचे उदाहरण जेव्हा डोळ्यासमोर येते व परिस्थिती उलट असते म्हणजे त्या गृहस्थाने प्रयत्न न करता यश येणे हे द्योतक कशाचे ?
    नशीब ? कुंडली ?? त्याच्यावर कोणाची तरी कृपा ??? नेमके काय ?

    माझेच उदाहरण सांगतो- गेल्या दोन वर्षांत मी जी कामे रोजची असतात (व्यवसाय, घरची किंवा इतर ) तीच वेळेवर त्याच आत्मीयतेने करतोय, परंतु सुरळीत चाललेले कुठलेही काम अचानक बिघडते. दोन वर्ष सहन केल्यावर कोणीतरी सांगीतले की “सिंह राशीला साडेसाती सुरू आहे, शनीची उपासना करा”
    उगीच भानगड नको म्हणून तेही करून बघीतले…
    परिणाम अगदी उलटे झाले- विश्वास नाही ठेवणार; पण प्रत्येक कार्यात अडथळे येउ लागले.
    दुसऱ्याने सांगीतले “अरे, शनिला कधीच कृपादृष्टी नसते- त्याची उपासना करून तू त्याची वक्र दृष्टी स्वतःकडे ओढवून घेतलीस तेव्हा सगळ्या उपासना बंद कर”
    असेही मला ते कठीणच जायचे म्हणून लगेच उपासना बंद केली.
    जरा परिस्थिती सुधारली…..

    दुसरे गांगुलीचे उदाहरण-
    त्याची हकालपट्टी व्हायच्या वेळी तो जसा खेळायचा व आज जसा खेळतोय त्या पद्धतीत जमीन आस्मानाचे अंतर नाही पण आज यश येतेय !

    ग्रह मानवी आयुष्यावर काय परिणाम करतात ?
    पौर्णीमे किंवा अमावस्येलाच वेडसर लोकांच्या वागण्यात फरक का पडतो ?
    मेडीकली हे ऑब्जर्व्ह केले आहे की, मानवाच्या लैंगीक गरजाही अमावस्या ते पौर्णीमा व उलट अश्या वेगवेगळ्या असतात….
    हे विज्ञान आहे का ?

    किती तरी प्रश्न हे अनुत्तरीत आहेत.
    महाभारतातले ब्रह्मास्त्र म्हणजेच अग्नी१/२ का ?
    संजयने काचेच्या गोलकात बघून महाभारताचे धावते वर्णन धृतराष्ट्राला सांगीतले ते म्हणजे टिव्ही सारखे समालोचन का ?
    शंकराने हलाहल प्राशन केले, त्याची सवय/व्यसन त्याला आधीपासून असावे म्हणून का ?

    जोवर आपण एखाद्या गोष्टीचे प्रमाण सिद्ध करीत नाही तोवर त्या गोष्टीचे अस्तित्त्व स्विकारत नाही व ही ह्या युगाची चालीरीत आहे ह्याबद्दल शंकाच नाही…… पण हे पुर्वीच्या काळात घडून गेले त्याचे प्रमाण सिद्ध करण्याइतपत कुवत आपल्यात आज आहे का ह्याचा विचार केल्यास पुराणातली वानगी कुठेतरी विचार करायला लावतात हे नक्कीच.

    कदाचित हे चक्र असेच सुरू राहिल व सचिन तेंडूलकरला ५००० वर्षांनी देव मानणारे व त्याच्या आजच्या सर्वसामान्य गोष्टीला अप्रूप मानणारी मानव जाती तयार झाल्यास कोणी सांगावे ???

  5. Swapnil कहते हैं:

    lekh aavadala…ekun ek goshta patali…

  6. Yeshwant Kakad कहते हैं:

    Sanjeev, this poem is not by Kusumagraj but by Vinda Karandikar. Its kaNikaa, not a poem.

    इतिहासाचे अवजड ओझे

    डोक्यावर घेऊन ना नाचा

    करा पदस्थल त्यांचे आणिक

    चढुनि त्यावर भविष्य वाचा.

  7. Prachi कहते हैं:

    mi hi far astik nahi ahe. pan mi roz puja karte ti tyat mala samadhan milat mhanun. ani ekhadyadivashi rahili puja tar mala tuache vaithi vatat nahi. ani mahnunch sankat kali devala navas vagaire karane mala ajibat patat nahi. ya cha ayth tumhi devala (jyachyavar tumachi itaki shrddha ahe) manasachya patalivar anun chakk lach deta. i hate it.

    mala swataha la kontyahi prasiddh mandirat jayala avadat nahi. gavabaher chi mandire jast chhan vatatat.

    lekh agadi uttam. mazya manatale chhan shabddat utaravalyasarakhe vatale

  8. शुचि कहते हैं:

    आपला लेख फार आवडला. तळमळीने , समाज डोळ्यासमोर ठेऊन लिहीलेला असा सुरेख लेख आहे. पारायण करावा असा, विचारप्रवृत्त करावयास भाग पाडणारा.
    ____________________
    काही वैयक्तीक मुद्दे –
    (१) >>मी आजपासून प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केल्याशिवाय ती मान्य करणार नाही>>>
    हे म्हणणं म्हणजे स्वतःचा मेंदू ओव्हर-अ‍ॅक्टीव्ह करण्यासारखं आहे. “mind has one eye while heart has thousand eyes” या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि हृदयानी जगाकडे पहायचा सराव करावा लागतो. लहानपणी सगळे करतात पुढे आपण विसरतो. तेव्हा आपल्या वरील वाक्याशी मी असहमत आहे.

    (२)कोणत्याही बाबाच्या मागे लागणे हे मला वैयक्तीक रीत्या धोकादायक वाटतं. अनुभव / संकेत आल्याखेरीज तसं करूही नये. अनुभव्/संकेतांची प्रत्येकाची आपली आपली जाण.

    (३) ज्योतीष हे शास्त्र नाही हे मला कळतं पण वळत नाही.

  9. Vikas kamble कहते हैं:

    Shradha hich andhshradha aste.

  10. Vivek कहते हैं:

    खुप छान
    आणखीन थोडे
    श्रध्दा हि तपासण्या योग्य असावी
    श्रध्दा ही सोन्या सारखी आसावी
    सोने किती ही प्रखर आगीत टाकले तरी अजुन पिवळे धमक होते त्याच प्रमाणे श्रध्दा हि तपासुन घेतली पाहिजे

  11. madhav कहते हैं:

    dr. madhav soman says that this is a good article !

  12. vinod sadashiv maske . कहते हैं:

    Khupch Uttam lekh aahe.

  13. prachi sawant कहते हैं:

    chaaan……..mi sahamat ahe

  14. Suhas shintre कहते हैं:

    Ha khup Sundar lekh ahe yatun andhshradhiyanche dole nakich ughadtil

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s