जुने घर

गावातले जुने घर अगदीच आडनिडे होते. त्याला ना आकार, ना उकार. म्हणायला त्याला वाडा म्हणत आणि बाहेरून दिसायलाही ते दुमजली घर तालेवार दिसे, पण आत कशाचा कशाला मेळच नव्हता. बांधणार्‍याने अगदी ऐदीपणाने गवंड्याला बोलावून ‘इथे चार खण काढ, इथे एक ठेप दे, इथे एक मोरी बांध, इथे माळवदावर जायला जिना काढ’ असले काहीतरी सांगून ते बांधवून घेतले असावे. गवंड्यानेही काही पुढचा-मागचा, सोयी-गैरसोयीचा विचार न करता अगदी हुंबपणाने हाताला येईल ते सामान घेऊन दिवाळीतला किल्ला बांधावा तसे ते दणकट, ऐसपैस पण अत्यंत गैरसोयीचे घर बांधून टाकले असावे. जुने घर शाळेपासून, गावंदरी मळ्यापासून लांब वाटत असे. मळा अगदी गावाच्या कडेला लागून एस टी स्टँडजवळच होता. मळ्यातल्या घरासमोर एक प्रचंड मोठे वडाचे झाड होते. मळ्यात विहीर होती आणि विहिरीला भरपूर पाणी असे. मळ्यातल्या घराभोवती भरपूर रिकामी जागा होती आणि मळ्यात बैल, गायी, म्हशी, वासरे आणि रेडके असत. त्यामुळे मळ्यात जायला अगदी मजा येत असे. गावातले घर हे या सगळ्यांपासून दूर, वेड्यावाकड्या अरुंद आणि खडबडीत रस्त्याने बरेच अंतर चालून गेले की एका गल्लीवजा रस्त्यावर गचडीत बसलेले होते. जुन्या घरासमोरचा रस्ता अगदीच निरुंद होता आणि त्यावर कधीच डांबराचा थर पडलेला नव्हता. त्यामुळे जुन्या घरासमोरच्या रस्त्यावरून एका वेळी दोन एक्क्या बैलगाड्या काही जाऊ शकत नसत. मग ही गाडी डाव्या अंगाला घे, ती उजवीकडे वळव असे करावे लागत असे. त्यात कधीकधी त्या गाड्यांची चाके रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या गटारात जात आणि वेसणीचा फास बसून फुसफुसणार्‍या बैलांचे डोळे टरारल्यासारखे होत. एखाद्याने अंग मोकळे करण्यासाठी हातपाय ताणून अंगाला डाव्या-उजव्या बाजूने झोले द्यावेत तसा तो रस्ता इकडे तिकडे मनाला येईल तसा वळत वळत गेलेला होता आणि त्याला उतारही फार होता. जैनाच्या बस्तीपाशी दोन चार जोराचे पायडल मारले की मग पाय वर घेतले तरी सायकल त्या रस्त्याने खडखडत, उसळ्या घेत थेट पेठेपर्यंत जात असे.

जुने घर रस्त्याच्या पातळीपासून हातभर उंचीवर होते आणि दोन पायर्‍या चढूनच घरात जावे लागे. या पायर्‍यांचे दगडही निसटायला आले होते. गावातल्या सगळ्या घरांसारखे या घराच्या दारातूनच ग्राम पंचायतीचे गटार गेले होते. ते सदा तुंबलेले असे. कधीतरी ग्राम पंचायतीचा एखादा सफाई कामगार येऊन हातातल्या लोखंडी फावड्याने त्या गटारातली गदळ काढून त्याचे त्या गटारालगतच बारके बारके ढीग घालत असे. चार दिवस गटारातून काळे पाणी वाहत राही. मग वार्‍या-पावसाने, येणार्‍या-जाणार्‍या बैलगाड्या, माणसे यांच्या वर्दळीने आणि गल्लीत सदैव चालत असलेल्या कुत्र्यांच्या दंगलीने हे कचर्‍याचे ढीग पुन्हा विस्कटून गटारातच पडत आणि गटार पुन्हा तुंबत असे.

घराचा मुख्य दरवाजा चांगला बारा फूट उंचीचा होता. कोणे एके काळी त्याला चांगली मजबूत लाकडी दारेही असतील. पण मला आठवते तसे ती दारे अगदीच खिळखिळी झालेली होती. दोन्ही दारे चिरफाळलेली होती आणि त्या दारांच्या लाकडांना कीड लागलेली होती. दरवाजा लावताना दरवाज्यांवरच्या बारीक भोकांमधून पिवळसर भुक्की भुरुभुरू पडत असे. दाराच्या आतल्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीला तर काही अर्थच नव्हता. दरवाज्यातल्या फटीतून हात घालून बाहेरच्या माणसाला ती सहज काढता येत असे. दाराच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी म्हणून बसवलेले घडीव आयताकृती दगड बाकी अगदी ठसठशीतपणाने टिकून होते. त्यातल्या उजव्या बाजूच्या दगडावर बसून आजी समोरच्या घरातल्या धनगराच्या म्हातारीबरोबर गप्पा मारत असे. दरवाजाच्या आत गेल्यागेल्या दोन्ही बाजूला दोन ढेलजी होत्या. एका बाजूच्या ढेलजीवरचे छप्पर काही दिवस शाबूत होते आणि त्या ढेलजीतल्या अंधार्‍या कोंदट खोलीत काही दिवस कल्लव्वा आणि तिची अकरा का बारा मुले भाड्याने राहात होती. दुसर्‍या बाजूची ढेलज बाकी अगदी पडून गेली होती. तिच्यात गाईची वाळलेली वैरण नाहीतर शेणकुटे, तुरकाट्या असले काहीतरी जळण कसेतरी ठेवलेले असे.

आत गेल्यावर खडबडीत आणि उंचसखल असे चिंचोळे अंगण होते. वर्षातून एकदा पायाला अगदीच खडे टोचायला लागले की चार पाट्या मुरुम टाकून धुमुसाने नाहीतर बडवण्याने बडवून ते अंगण जरा त्यातल्या त्यात सपाट केले जाई. पण चार दिवस गेले की पावसापाण्याने वरची माती वाहून जाई आणि परत पायाला खडे टोचायला लागत. रोज अंगण झाडून काढणे आणि शेणकाल्याचा सडा टाकणे हे एक नित्याचे काम होते. अंगणात एक तुळशीवृंदावन होते . रोजची रांगोळी त्या वृंदावनापुरती असे. पण दिवाळीत बाकी अंगणभरच नव्हे, तर रस्त्यापर्यंत रांगोळ्या काढल्या जात. त्या अंगणाच्या मधूनच सांडपाण्याचा एक ओहोळ दरवाज्याकडे गेलेला होता. त्या ओहोळाला बाहेरच्या गटारात जायला काही साधन ठेवलेले नव्हते. एखाद्या बेवारशी कुत्र्यासारखा तो ओहोळ इथे-तिथेच पडलेला असे. अंगणात डाव्या हाताला पाण्याचा हौद होता. ग्राम पंचायतीचे पाणी अगदी कमी दाबाने यायचे, म्हणून त्या पाण्याची तोटी जमिनीपासून अगदी कमी उंचीवर होती. तिच्याखाली एक लहानशी बादली किंवा कळशी कशीबशी मावत असे. त्या कळशा, घागरी भरभरून तो अंगणातला पाण्याचा हौद भरणे हे एक मोठे काम होऊन बसले होते. ग्राम पंचायतीच्या पाण्याचा काही भरवसा नसे. ते कधी येई, कधी येत नसे. आले तरी किती वेळ टिकेल हेही काही सांगता येत नसे. उन्हाळ्यात तर आठवडाच्या आठवडा नळाला पाणी नसे. मग मळ्यातल्या विहिरीतून पाण्याचा मोठा हौद भरून तो बैलगाडीत घालून गावातल्या घरात आणावा लागे. ते पाणी बादल्याबादल्याने अंगणातल्या हौदात भरावे लागे. त्या बाहेरच्या हौदातून घराच्या परसात असलेल्या हौदात पाणी नेऊन टाकणे हे तर महाकठीण असे काम होते. घरात जायचे म्हणजे दगडी पायर्‍या, उंच उंबरे, जाती, उखळे,लहानमोठे कट्टे असे असंख्य अडथळे पार करत जावे लागत असे. त्यात घरातली एक चौकट काही दुसरीच्या आकाराची नव्हती. त्यामुळे सतत कुठे कमी तर कुठे जास्त वाकूनच एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जावे लागे. पण त्याची इतकी सवय झाली होती की न चुकता त्या त्या दारातून कमीजास्त वाकून लोक भराभरा दुसर्‍या खोलीत जात असत. कुणाला चौकट डोक्याला लागून जखम झाली आणि खोक पडली असे मला तरी आठवत नाही. पाणी भरण्याचे काम आम्ही लहान असताना गडीमाणसे करत. हे गडीही बहुदा वर्षाच्या कराराने बांधून घेतलेले असत. एक पोते जोंधळे आणि अकराशे-बाराशे रुपये यावर तो गडी वर्षभर पडेल ते काम करत असे. माझ्या वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षापासून अशी कामे करायला माणसे मिळेनाशी झाली, तेव्हा हे काम आमच्यावर आले. सकाळी बाहेरचा हौद भरणे आणि रात्री तेच पाणी आतल्या हौदात नेऊन टाकणे हे काम अत्यंत उत्साहाने कितीतरी वर्षे केल्याचे मला आठवते. नंतर नंतर तर दोन्ही हातात भरलेल्या कळशा घेऊन जवळजवळ धावतच अंगण, पडवी, सोपा, माजघर, स्वयंपाकघर ओलांडून जागोजागी वाकत वाकत परसात जायचे आणि तिथल्या हौदात धबाल करून त्या कळशा ओतायच्या यात मजाच मजा वाटत असे. बाहेरच्या हौदापासून आतल्या हौदापर्यंत एक पाईप आणि अर्ध्या हॉर्सपॉवरची एक मोटार यासाठी पैशाची जुळवाजुळव करायला माझ्या वडिलांना कित्येक वर्षे लागली. एकूणातच पाणी हा जुन्या घरातला एक फारच मोठा प्रश्न होता. घरातल्या बर्‍याच लोकांचा दिवसातला बराच वेळ पाण्याची व्यवस्था करण्यातच जात असे.

जुन्या घराचे अंगण काही फार मोठे नव्हते, पण त्यात एक बाग असावी अशी माझी शाळकरी महत्त्वाकांक्षा होती. बाग करण्याचे माझे लहानपणीचे कितीतरी प्रयत्न वाया गेले. शेवटी दांडगाईने मुर्दाडासारखी वाढलेली काही कर्दळीची झाडे एवढेच त्या बागेचे स्वरुप शिल्लक राहिले. बाकी मी लावलेली रोपे म्हणजे तरी काय म्हणा, कुणीतरी दिलेल्या गावठी गुलाबाच्या फांद्या, मळ्यातूनच आणलेले एखादे मोगर्‍याचे रोप किंवा शाळेतूनच उपटून आणलेले एखादे चिनी गुलाबाचे झुडूप. पण यातले काही म्हणजे काही त्या बागेत जगले नाही. पण एकदा कसे कुणास ठाऊक, माझ्या चुलत आत्याने मठातून आणलेले एक पारिजातकाचे झाड त्या बागेत रुजले आणि हां हां म्हणता ताडमाड वाढून बसले. मोजता येणार नाही इतक्या फुलांनी ते झाड फुलत असे आणि दर वर्षी श्रावणात आजी त्या फुलांचा लक्ष करत असे. त्या झाडाच्या भिंतीपलीकडे गेलेल्या फांद्या सावरायला म्हणून मी भिंतीवर चढलो आणि पायाखालची वीट फुटून धाडकन खाली कोसळलो होतो. मला लागले फारसे नव्हते पण घाबरून आणि मुक्या माराने मला हबक भरल्यासारखे झाले होते. सकाळी उठून ते पारिजातकाचे झाल हलवणे आणि त्याची परडीभर फुले गोळा करून ती परडी देवघराच्या कट्ट्यावर आणून ठेवणे हे घरातल्या मुलांचे आवडीचे काम होते. पुढे एका पावसाळ्यात रपारपा पाऊस पडत होता आणि नेहमीसारखेच दिवे गेलेले होते. एकदम वीज कडाडली आणि तसलाच काहीसा आवाज अंगणातूनही आला. अंधारात काही दिसले नाही पण ‘झाड पडलं जणु’ असे कोणीसे म्हणाले. दुसर्‍या दिवशीसकाळी बघतो तर खरेच तो पारिजातकाचा वृक्ष उन्मळून पडला होता. मग कुर्‍हाडीने तो तोडला आणि एखादे मेलेले जनावर गावाबाहेर नेऊन टाकावे तसे त्याचे रुक्ष खोड आणि खरखरीत फांद्या उकीरड्यावर नेऊन टाकल्या. घरातले एखादे माणूस जावे तसे काहीसे त्यावेळी झाल्याचे आठवते. त्या भुंड्या जागेकडे बरेच दिवस बघवतही नव्हते.

अंगणातल्या उजव्या बाजूला गुरांना दिवसा बांधायची जागा होती. कधी गाय, कधी म्हैस असले काहीतरी दुभते जनावर आणि त्याचे एखादे वासरु, रेडकू तेथे दिवसा बांधलेले असे. बर्‍याच वेळा भाकड जनावरे मळ्यातच असत. एखादी गाय किंवा म्हैस व्याली आणि तिच्या चिकाचे दिवस संपले की मग तिला घराकडे दुभत्यासाठी आणले जाई. काही वेळा घरातही गाईचे वेत होई. गाईचा पाडा असला किंवा म्हशीची रेडी असली तर त्यांना गाई-म्हशीचे थोडे दूध राखून ठेवलेले असे, म्हणून ती जरा तजेलदार दिसत. कालवडी किंवा रेडे पाळणे बाकी परवडत नसे. कालवडींचे दूध तुटले की त्या कुठल्या तरी कुळवाड्याकडे अर्धलेनी म्हणून दिल्या जात. मग अशा कालवडी मोठ्या होऊन गाभण राहिल्या की मग घरी परत येत. मग त्यांची अंदाजे काहीतरी किंमत ठरवून त्या किंमतीचा निम्माभाग त्या कुळवाड्याला दिला जाई, म्हणजे बहुतेक वेळा त्यांनी अंगावर घेतलेल्या उसनवारीतून वळता केला जाई. वासरांचा बाकी घरातल्या लहान मुलांना लगेच लळा लागे. बारके नुकतेच जन्मलेले वासरू धडपडत आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना घरातली मुले त्याच्या अवतीभवती असत. त्या वासराची नाळदेखील पूर्ण सुकलेली नसे. आपल्या मोठ्या, काळ्याभोर डोळ्यांनी ते वासरू टुकुटुकू इकडे-तिकडे बघत असे. मधूनच ‘बें.. ‘ असा काहीतरी आवाज काढी. शेजारीच बांधलेली त्याची आई घशातल्या घशात ‘डुर्र..’ असे काहीतरी करी. वासराच्या तोंडावरुन, पाठीवरून हात फिरव, त्याच्या ओलसर नाकाला हात लावून बघ, त्याच्या कानात बघ, असे तासनतास निघून जात. वासरे मोठी होऊन एखादे पान चघळायला लागली की त्याला वैरण भरवण्याची चढाओढ लागे. ते वासरू बाकी दिवसदिवस एकच पान चघळत बसलेले असे. रेडे बाकी त्यामानाने मठ्ठ असत. त्यांच्याकडे मोठ्या माणसांप्रमाणे मुलांचेही दुर्लक्षच होत असे. थंड, भावशून्य नजरेने आयुष्यात कसलीही उमेद नसलेल्या माणसासारखे ते तासनतास उभे असत. नुकत्याच जन्मलेल्या रेड्यालासुद्धा जन्मल्याचा आनंद असा काही होत असेल, असे त्याच्या चेहर्‍यावरून वाटत तरी नसे. पुढे म्हैस परत गाभण राहिली आणि तिचे दूध खारट व्हायला लागले की ते रेडे एक दिवस दिसेनासे होत. ते कुठे जात हे त्या वेळी कळत नसे. ते कापायला जात हे आज ध्यानात येते.

अंगण ओलांडले की घराचे मुख्य दार होते. त्याला ‘पत्र्याचे दार’ म्हणत. ते दार काही पत्र्याचे नव्हते, पण त्या दारानंतर जी पडवी होती, तिच्यावर पत्रा घातलेला होता. म्हणून त्याला पत्र्याचे दार म्हणत असावेत. पडवीत दगडी फरशी घातलेली होती. पडवीतच एका बाजूला गोठा होता. दुभते जनावर आणि तिचे वासरु, रेडकू जे काय असेल ते रात्री या गोठ्यात बांधले जाई. पडवीत मधोमध एक हातपंप होता. फार पूर्वी त्याला कधीतरी भरपूर पाणी होते म्हणे. पण आता वापरात नसल्याने त्याच्या जमिनीखालच्या सगळ्या नळ्या गंजून गेल्या होत्या. कधीतरी उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत त्या हातपंपाशी खेळण्याची लहर येई. त्या पंपाचा लांब, लोखंडी दांडा कुठेतरी इकडेतिकडे ठेवलेला असे. तो शोधून काढून तो त्या पंपाला बसवून त्याच्याशी चांगली अर्धा पाऊण तास झटापट केली की मग तो दांडा जड लागायला लागे आणि मग एकदम त्या नळातून गंजलेले लालभडक पाणी यायला लागे. ते काही म्हणजे काही कामाचे नसे. मोरीतून बाहेर जाऊन ते पाणी अंगणात पसरे आणि अंगण लालेलाल दिसायला लागे. गंजक्या लोखंडाचा वास पडवीभर पसरलेला असे आणि घरातली मोठी माणसे वैतागलेली असत.

पडवीच्या वर दोन पायर्‍या चढून सोपा होता. हा सोपाही सगळ्या घरासारखा दणकट, पण ओबडधोबड होता. मोठमोठे खांब, तुळ्या, त्या तुळ्या खचू नयेत म्हणून त्यांना आधारासाठी दिलेल्या ठेपा, असला सगळा हुमदांडगा कारभार होता.सोप्याच्या एका कोपर्‍यात एक लोखंडी हौद होता. हा हौद धान्याच्या साठवणीसाठी होता. ही धान्येही बहुदा जोंधळे किंवा खपली अशीच असत. क्वचित भात असे. भात म्हणजे न सडलेला तांदूळ. हे जोंधळे निवडून पिठाच्या गिरणीतून त्याचे भाकरीसाठी पीठ करून आणणे, खपली भरडून त्याचे गहू करून आणणे, ते गहू पाखडून, निवडून त्याचे परत गिरणीतून पीठ करून आणणे, भात मिठाच्या पाण्यात भिजत घालून ते दुसर्‍या दिवशी पाण्यातून उपसून लहानशा पोत्यांमध्ये घालून सायकलवरून शेजारच्या शहरातल्या पोह्याच्या भट्टीत घेऊन जाणे आणि त्याचे पोहे करून आणणे, असली प्रचंड कष्टाची कामे करण्यात घरातल्या लोकांचा बराच वेळ जात असे. हौदाच्या शेजारच्या कोनाड्यात कंदील, चिमण्या, सुंदर्‍या असा उजेडाचा जामानिमा असे. रोज संध्याकाळी कंदिलांच्या वाती साफ करणे, चिमण्यांत रॉकेल भरणे आणि मुख्य म्हणजे रांगोळीने कंदील आणि सुंदर्‍यांच्या काचा साफ करणे हे न चुकता करायचे काम असे.

सोप्यातली सगळ्यात सुखाची जागा म्हणजे सोप्यातला झोपाळा. त्या झोपळ्याच्या मागे लगेच वर माडीवर जाणारा लाकडी जिना होता, म्हणून झोपाळ्याचा झोका काही फार मोठा घेता येत नसे. पण त्या झोपाळ्यावर जेवणाच्या आधी पोटात भुकेने कासावीस होत असताना आणि पोटभर जेवणानंतर डोळ्यावर झोपेची सुरेख गुंगी येत असताना बसून हलके हलके झोके घेणे यात अपार आनंद वाटत असे. झोपाळ्यावर एका कडीला टेकवून ठेवलेला एक घट्ट तक्क्या होता. त्याला टेकून पायाने जमिनीला रेटा देऊन झोका घेतला की मग तर आपण एखाद्या लहानशा राज्याचे सम्राट आहोत असेच वाटत असे. त्या झोपाळ्याखाली जमिनीत एक पेव आहे, असे आजी सांगत असे.
झोपाळ्याशेजारच्या भिंतीत एक अतिशय खोल असा कोनाडा होता. त्यात जुना व्हॉल्वचा रेडीओ होता. त्यावर रेडीओ सिलोन आणि आकाशवाणी पुण्याचे सहक्षेपित होणारे कार्यक्रम अजूनही लक्षात आहेत. ‘आपली आवड’ नावाचा मराठी गाण्यांचा एक फर्मायशी कार्यक्रम त्या काळात फार प्रसिद्ध होता. त्या कार्यक्रमापेक्षा त्याचे’टायटल म्यूझिक’च अधिक आकर्षक वाटत असे. सिलोनवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’,’सदाबहार नग़मे’, ‘बदलते हुए साथी’, ‘जब आप गा उठें’ असे कार्यक्रम ऐकायला मजा येत असे. ‘गैरफिल्मी नज़में और गज़लें’ लागली की बाकी कंटाळा येत असे.

पडवीच्या भिंतींच्या वरच्या अर्ध्या भागात लोखंडी गज बसवलेले होते. त्यामुळे सोप्यात तसा बर्‍यापैकी उजेड येत असे. दारासमोर बसले की थेट रस्त्यावरून येणारी जाणारी माणसे दिसत. सोप्यातल्या भिंतींवर रविवर्म्याच्या चित्रांच्या स्वस्तातल्या प्रतींच्या मोठमोठ्या चौकटी होत्या. तिथेच दारासमोर हरणाच्या कातड्यावर बसून आजोबा गुरुचरित्राची पोथी वाचत असत.रविवारी येणारा जानबा न्हावी तिथेच बसून आजोबांची दाढी करत असे. मळ्यात जाताना हातात धरायची आजोबांची काठी तिथेच ठेवलेली असे.दसर्‍याला सोने द्यायला आजोबांकडे खूप लोकांची गर्दी होत असे. कोट-टोपी घालून आजोबा त्यांच्या त्या बैठकीवर बसलेले असत. त्यांच्या शेजारी चवल्या-पावल्यांनी भरलेले एक ताट असे. सोने देऊन वाकून नमस्कार करणार्‍यांना आजोबा हाताला येईल ते नाणेही देत असत. पुढे आजोबांना दिसायचे कमी झाले तेव्हा अक्षराला अक्षर लावून सोप्यात बसून मी आजोबांना ‘सत्यवादी’ वाचून दाखवत असे. पुढे काही वर्षांनी आजोबा गेले तेव्हा त्यांचे पार्थिव याच सोप्यात ठेवले होते. पूर्ण कावर्‍याबावर्‍या झालेल्या माझ्या वयाच्या घरातल्या मुलांना कुणीतरी घाईघाईने ‘आजोबांना नमस्कार करायला चला’ म्हणून सोप्यात नेले आणि तितक्याच घाईने दुसरीकडे घेऊन गेले, ते सगळे याच सोप्यात.

जुन्या घरातल्या भिंती चांगल्या तीन-तीन फुटी रुंद होत्या. घराच्या दोन्ही बाजूला चिकटूनच दुसरी घरे असल्यामुळे आतल्या खोल्यांना खिडक्या वगैरे असणे शक्यच नव्हते. सोप्यातून माजघरात गेले की एकदम गार वाटत असे. माजघर प्रचंड अंधारे होते. दिवा लावला नसेल तर माजघरात डोळ्यांत बोट घातले तरी दिसणार नाही इतका काळोख असे. सोप्यातून माजघरात जाताना वाटेत एक अतिशय उंच असा उंबरा होता. तो इतका उंच का होता आणि माजघरातून स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा इतका बुटका का होता हे मला आजपर्यंत कळालेले नाही. माजघरातून माडीवर जाणारा दुसरा दगडी जिना होता. तोही असाच एखाद्या गडाच्या पायर्‍या असाव्या तसा भक्कम, पण ओबडधोबड होता. त्याला काही कठडाबिठडा नव्हता, त्यामुळे त्यावरून जाताना जपून जावे लागे. तो जिनावरून बंद करता येईल असे एक छतातले दार होते. ते कशासाठी होते हेही कधी कळाले नाही. दोन्ही जिन्यांमधून पळापळी करताना पाय घसरून गडगडत खाली आल्याचे बाकी मला चांगले आठवते.

जुन्या घरातले स्वयंपाकघरही असलेच गैरसोयीचे होते. बराच काळ स्वयंपाक चुलीवरच होत असे. चुलीच्या जळणाची व्यवस्था करणे हे एक मोठे काम होते. शेतात तोडलेल्या झाडांच्या लाकडांचे लहानमोठे ढलपे, शेणकुटे,मक्याची बुरकुंडे, तुरकाट्या असले काहीबाही सरपण शेतावरून गाड्याच्या गाड्या भरून घरी येत असे. ते सरपण स्वयंपाकघराच्या माळ्यावर रचून ठेवलेले असे. आठ-पंधरा दिवसांतून हारेच्या हारे भरून ते सरपण खाली काढून द्यावे लागे. मग त्यावर स्वयंपाक आणि अंघोळीचे पाणी तापवले जाई. स्वयंपाकघरात चुलीवर बडवल्या जाणार्‍या गरम भाकरी, वाईलीवर उकळणारी मुगाची उदंड देशी लसूण घालून केलेली उसळ आणि घरच्या तांदळाचा भात हे म्हणजे ‘त्रैमूर्ती अवतार मनोहर’ वाटावे असे जेवण असे. जुन्या घरात जसे जेवलो, तसे पुढे आयुष्यात कुठेच मिळाले नाही. ताटभर गरमागरम माडगे ताट तोंडाला लावून प्यालो. गणपतीच्या एकवीस मोदकांचे ताट प्रत्येक मोदकावर एक चमचा तूप घालून संपवले. घरच्या आंब्यांचा आमरस बरोबरीने आसके दूध घालून वाडग्याने प्यालो. गरम भाकरीवर भरलेल्या दोडक्याची भाजी घालून तिचा काला करून जिभेला चटके देत चटकपटक खाल्ला आणि देशी रव्याचा गूळ, सुंठ आणि वेलदोडे घालून केलेला सांजा दूध-तूप घालून पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ला. जुने घर पूर्ण शाकाहारी होते. जुन्या घरात साधे एक अंडेही कधी फुटले नाही. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र ‘लुटुनी काय नेशी काळा, भाग्य माझे मागले, भोगले ते भोगले ‘ अशी माझी भावना आहे. दूध-दही-तूप तर घरचेच असे. स्वयंपाकघरात दुभत्याचे एक भिंतीतले फडताळ होते. दूध, ताक, झाकपाक केलेले अन्न हे गार पाण्याच्या भांड्यांमध्ये घालून त्या फडताळातच ठेवलेले असे. फ्रीज ही वस्तू गावातच कुणाकडे नव्हती.

स्वयंपाकघरातच एका बाजूला घरातील इतर सर्व जागांप्रमाणे अतिशय गैरसोयीचे असे देवघर होते. एका जुन्या देव्हार्‍यात असंख्य देवांच्या मूर्ती, शाळीग्राम, लंगडा बाळकृष्ण, शंख, देवांचे टाक असे गचडीने ठेवले होते. देवपूजेला वेगळा पुजारी वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती किंवा ऐपत नव्हती म्हणा. पूजेचे शास्त्र बाकी काटेकोरपणे पाळावे लागे. चंदनाचे खोड, सहाण,पूजेचे वस्त्र हे सगळे जागच्या जागी ठेवावे लागे. गणपतीला दुर्वा, द्राशाळाचे फूल, शंकराला पांढरे फूल हे चुकवून चालत नसे. परसात दगडाची एक प्रचंड पिंड होती. तिच्यावर एरवी उन-पावसाचाच अभिषेक होत असे. पण शिवरात्रीला तिच्यावरही पांढरे फूल चढत असे.

स्वयंपाकघरातून परसात गेले की तिथे न्हाणीघर होते. त्या अंधार्‍या,दिव्याची आणि उजेडाची सोयसुद्धा नसलेल्या जागेला मला दुसरा शब्द सुचत नाही. वर्षानुवर्षे त्या न्हाणीघरातल्या चुलवणावर काळ्याकुट्ट पडलेल्या एका जुनाट हंड्यात अंघोळीचे पाणी तापवले जाई. पाणी तापवायचा बंब आला तोही फार नंतर. न्हाणीघर सतत ओले आणि अंधारे असे आणि त्याच्या कोपर्‍यात लठ्ठ,किळसवाण्या बेडक्या बसलेल्या असत.परसात एका कोनाड्यात दोन वरवंट्यासारखे दगड होते. त्या ‘ताईबाई’ आहेत असे म्हटले जाई. दर अमावस्येला ताईबाईला नारळ वाढवावा लागे.

जुन्या घराला अत्यंत बेंगरुळपणाने बांधलेली माडी होती. सोप्यावरच्या माडीला ‘बाहेरची माडी’ आणि माजघरावरच्या माडीला ‘आतली माडी’ असे नाव होते. दोन बहिणींपैकी झकपक असणार्‍या एकीने शिकून-सवरून नोकरी करावी आणि शहरात राहणारा सुशिक्षित नवरा पटकवावा आणि दुसरीने आपली बेताची बुद्धी आणि सामान्य रुप याची जाण ठेवून खेड्यातल्या एखाद्या शेतकर्‍याच्या गळ्यात माळ घालावी तसे या दोन माड्यांचे झाले होते. बाहेरच्या माडीवर नंतर फरशी केली, भिंतींना गिलावा केला आणि घरातला एकुलता एक सीलिंग फॅनही बाहेरच्या माडीतच लागला. आतली माडी ही बाकी वर्षानुवर्षे तशीच बिनगिलाव्याची, खडबडीत आणि पोपडे उडालेल्या जमिनीची आणि कोंदट राहिली होती. बाहेरच्या माडीला समोर पत्र्याची का असेना, पण एक गच्ची होती आणि कोजागिरीला आटवलेले दूध प्यायला किंवा चंद्रग्रहण बघायला ही गच्ची वापरली जात असे. आतल्या माडीत एका बाजूला ज्वारीची पोती रचलेली असत आणि एका कोपर्‍यात साठवणीचे कांदे ठेवलेले असत. बाहेरच्या माडीत आमच्या अभ्यासाच्या पुस्तकांचे कपाट होते, तर आतल्या माडीच्या छतांच्या वाशांना लसणाच्या माळा टांगलेल्या असत. आतल्या माडीत नाही म्हणायला उन्हाळ्यात आंब्याची अढी घातली जात असे तेव्हा ती माडी पिकलेल्या आंब्यांच्या सुवासाने दरवळून जात असे. उन्हाळ्यात दोन्ही माड्या चरचरीत तापत आणि पावसाळ्यात गच्चीतल्या पत्र्यावर जोराचा तडतड पाऊस वाजू लागला की छपरांतून सुरवंट टपटप अंथरुणात पडत.

त्या रानवट, गावठी जुन्या घरात, असल्या सगळ्या वेड्यावाकड्या,गाठीगाठीच्या आयुष्यात धडपडत, मिळेल तशी मुसंडी मारत, प्रसंगी अंग चोरून घेत माझे बालपण जगण्याचा प्रयत्न करत होते!

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

अनुभव

’तुम्ही काही म्हणा सर, दोन हजार वीस साली भारत ही महासत्ता होणार. होणार म्हणजे होणारच.  हां, आता अगदी दोन हजार वीस म्हणजे शब्दश: धरु नका तुम्ही, पाचदहा वर्षं इकडंतिकडं. पण होणार. ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजा…’ मी चहाचा घोट घेताघेता उत्साहाने म्हणालो. ’युरोप युएसए सोडाच. त्या इकॉनॉमीज सॅच्युरेट होताहेत. पण  ब्रिक्स कंट्रीजमध्येही आपल्याशी सामना करु शकणारं कुणी नाही. आपली इकॉनॉमी तर वाढणार आहेच. अ‍ॅग्रीकल्चरमध्येही आपण पाच टक्क्यांच्या वर ग्रोथ रेट गाठणार. गाठणार काय, गाठलाच म्हणून समजा या वर्षी.  बाकी सर्व्हिसेस तर आहेतच. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण ठीकठाक आहोत. पण ते सुधारेल हळूहळू. आणि दुसरं मह्त्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेलं कुशल मनुष्यबळ बघा.  स्किल्ड ह्यूमन रिसोर्सेस. जगात प्रत्येक वर्षी सगळ्यात जास्त ग्रॅज्युएट्स आणि पोस्टग्रॅज्युएट्स भारतातल्या विद्यापीठांतून बाहेर पडतात. हे सगळे कॅन्डिडेट्स आपण सगळ्या जगाला पुरवू शकू. आता या मोठ्या तरुण लोकसंख्येचा टॅलन्ट हा तर मोठा अ‍ॅसेट आहेच, पण दुसरा म्हणजे भाषा. इंग्लिश ही सगळ्या जगाची बिझनेस लँग्वेज आहे. भारतात जगातले सगळ्यात जास्त इंग्लिश बोलणारे-लिहिणारे लोक आहेत. ते झालंच तर……’ आपण फार बोलतोय असं वाटून मी थोडा थांबलो.  माझ्या समोरचे पिकलेले प्राध्यापक मिशीत हसले. ’तुमच्या तोंडात साखर पडो, राजाधिराज…’ ते म्हणाले. ’साखर पडो, साखर. पण तुमच्या आवडत्या लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर हे सगळं असं केळीच्या खुंटासारखं सरळसोट असतंय होय? काय ते तुम्ही म्हणालात ते.. कुशल मनुष्यबळ वगैरे…’
मी पुन्हा थांबलो. या वर्षी पुण्यातल्या एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु होती आणि विद्यार्थ्यांचे समूहसंवाद आणि वैयक्तिक मुलाखती – जीडीपीआय- यासाठी आम्ही काही लोक जमलो होतो.  काही प्राध्यापक, काही इंडस्ट्रीतले लोक….ही संस्था म्हणजे पुण्याच्या- पर्यायाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक जीवनात मोलाची भर घालणारी वगैरे म्हणून प्रसिद्ध आहे. गेली काही वर्षं अशा प्रवेशप्रक्रियांमध्ये उमेदवार मुलांशी संवाद साधणं हा अगदी आनंददायक अनुभव होता. या मुलांच्या सामाजिक जाणिवा, आसपासच्या परिस्थितीबाबत असलेलं त्यांचं भान, स्वतंत्र विचार करण्याची त्यांच्यात असलेली क्षमता आणि तसा विचार करण्याचं त्यांच्यांत असलेलं धाडस,    (विद्यार्थी असूनही) या मुलांमध्ये आढळणारी नम्रता आणि संभाषणचातुर्य यांनी मी प्रभावित झालो होतो. या वर्षी असेच काहीसे स्वत:ला समृद्ध बनवणारे आणि आपल्या व्यवसायाविषयी समाधानाची भावना मनात आणून देणारे फार दुर्मिळ क्षण येतील या आशेने आम्ही लोक या संस्थेच्या आवारात आलो होतो. चहापान सुरु होतं. एकूण व्यवस्था उत्तमच होती. दोन दोन परीक्षकांचे गट केलेले, प्रत्येकाच्या नावाचं छोटं फोल्डर, प्रत्येक परीक्षकाचं ओळखपत्र, नवीकोरी उत्तम दर्जाची पेन्स, पेन्सिल्स, इरेझर्स, नाश्त्यासाठी मोजके पण चविष्ट पदार्थ. संस्थेच्या संचालकांनी बरोबर नवाच्या ठोक्याला स्वागताचं छोटसं भाषण सुरु केलं. त्यात ही प्रवेशप्रक्रिया किती महत्त्वाची आहे, आम्हा परीक्षकांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी किती मोठी आहे आणि आम्ही अत्यंत वस्तुनिष्ठपणे, कोणत्याही पूर्वगृहशिवाय ही जबाबदारी पूर्ण करणं संस्थेसाठी किती गरजेचं आहे असं वगैरे आवर्जून सांगितलं. उत्तम इंग्रजी, विनम्र आणि नेमके शब्द आणि प्रामाणिक भावना. चहा-कॉफीचे कप खाली ठेवून निघताना येते दोनतीन दिवस फार चांगले जाणार अशी एक भावना मनात येऊन गेली. त्या प्राध्यापकांचे शब्द बाकी मनातून जात नव्हते.
प्रत्यक्ष ग्रूप डिस्कशन्सना सुरवात झाली आणि कुठंतरी काही खटकायला लागलं. मुलं-मुली आक्रमकपणे बोलत होती, सफाईदारपणानंही बोलत होती.  ’लिसनिंग स्किल्स’चं महत्त्व आठवून इतरांचं ऐकूनही घेत होती, पण सगळंच वरवरचं, उथळ बोलणं. कुणी मध्येच काही डेटा देत होतं: या वेबसाईटवर हे म्हटलं आहे, ’टाईम्स’ मधली ही अशी आकडेवारी आहे वगैरे, पण कुठे स्वत:चा विचार काही नाही. वैयक्तिक मुलाखतीत तर हे अधिकच जाणवायला लागलं. राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते का? या प्रश्नाला ’नव्हते बहुदा.. की होते?’ असे उत्तर या विद्यार्थ्यांपैकी एकाकडून मिळाले. या उत्तरापेक्षाही हे उत्तर देताना त्याच्या चेहर्‍यावरचे मिश्किल हसू अधिक धक्कादायक होते. नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्री आहेत, गीर हे भारतातले वाघांसाठीचे सर्वात मोठे अभयारण्य आहे, जयराम रमेश हे केंद्रीय शेतीमंत्री आहेत, २६ जानेवारी १९४८ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे, भारतातली चित्त्यांची संख्या ५०० च्या आसपास आहे आणि सगळ्यावर कळस म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि परवेझ मुशर्रफ हे आग्रा समीटसाठी इस्लामाबाद येथे भेटले…. अशी उत्तरं ऐकू यायला लागली.  मला काही कळेनासं झालं होतं. मी माझ्या सोबतच्या परीक्षकाकडं प्रश्नार्थक नजरेनं बघीतलं. त्यानंही हताशपणे खांदे उडवले.
’इंदिरा गांधींच्या मारेकर्‍यांची नावं सांगता येतील?’ मी तरीही आशा सोडली नव्हती.
’सम सिंग, राईट? ही वॉज अ सर्ड, वॉजन्ट ही?’ ‘सर्ड’ या शब्दाकडं मी दुर्लक्ष केलं.
’सम सिंग?’
’सॉरी, आय वॉजन्ट बॉर्न देन..’ समोरची कन्यका म्हणाली.
मी मनात म्हणालो, नथुराम गोडसे हे नाव मला ठाऊक आहे. गांधीहत्त्येच्या वेळी मीही जन्मलो नव्हतो, बये!
’वाचता काय आपण?’
’वेल, आयम नॉट रिअली इनटू रीडिंग. बट आय रीड सम बुक्स – इंग्लिश-मोस्टली…’
’इंग्रजी काय वाचता तुम्ही?’
’चेतन भगत – थ्री मिस्टेक्स ऒफ माय लाईफ, वन नाईट…’
’पुरे, पुरे… हिंदी?’
’हिंदी, यू मीन बुक्स?’
’हो, बुक्सच.’
’नॉट रिअली. स्कूलमध्ये वाचले होते लेसन्स . परसाई ऒर समथिंग… सॉरी’
’हिंदी कविता?’
’बच्चन’
’व्हॉट ऒफ हिम?’
’फादर ऑफ अमिताभ बच्चन. ग्रान्डपा ऑफ अभिषेक.’
आता ही बया अभिषेक किती हॉट किंवा किती कूल आहे हे सांगेल या भयाने मी पुढचा प्रश्न विचारला नाही. पण त्या बयेनंतर आलेली मुलं-मुली यांच्यात मला सरस-निरस करणं मोठं मुश्किल होऊन बसलं. बहुदा सगळे इंग्रजी माध्यमातले, म्हणून एकाला गंमतीनं ’ अ सेंट सेंट अ सेंट ऒफ अ सेंट टु अनादर सेंट’ या वाक्याचं ’ सेंट’ हा शब्द न वापरता इंग्रजीत भाषांतर कर म्हणून सांगितलं तर तो जवळजवळ तुच्छतेनंच हसला. ’कसले जुनेपुराणे प्रश्न विचारता..’ असा त्याच्या चेहयावर भाव होता. मग पुढचा ’जॉन व्हेअर जेम्स हॅड हॅड……’ हा प्रश्न काही मी विचारला नाही.
पंडीतजी जाऊन जेमतेम आठवडा झाला होता. भारताच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या आठवड्याभरात महत्त्वाचं असं काय झालं या प्रश्नाला दहातल्या आठांनी फक्त कपाळावर एक आठी टाकली. एकजण ’ओह दॅट, सम सिंगर डाईड, राईट? ऑर वॉज ही अ म्यूझिशियन?’ असं म्हणाला. एका मुलीला बाकी नावानिशी माहिती होतं. नशीब आमचं! भारतातल्या प्रसिद्ध संगीतकारांचं एखादं उदाहरण सांग म्हटल्यावर एकूणेकांनी रहमानचं नाव घेतलं. ’सतार, संतूर, सरोद’ असलं यातल्या बर्‍याचजणांनी काही ऐकलेलंही नव्हतं. एक दोन मराठी मुलांना आवडते मराठी लेखक विचारले तर पु.ल. देशपांडे या एकाच नावावर गाडी अडून बसली. एखाद्या कवीचं नाव विचारल्यावर एकानं फाडकन संदीप खरेचं नाव घेतलं. पुढे? पुढे काही नाही…..
दुपारच्या जेवणाला संस्थेचे संचालक भेटले. त्यांच्याजवळ मी जराशी नाराजी प्रकट केली त्यावर ते म्हणाले,’छे, छे, असले अवघड प्रश्न विचारुन कसं चालेल, सर? तुम्ही तर डिग्रीच्या मुलांना डॉक्टरेटचे प्रश्नच विचारले. थिंक ऑफ देअर एज, सर..’ मी काहीच बोललो नाही.
त्याबरोबरच सुमारे दोन वर्षांपूर्वी वाचलेलं काही आठवलं आणि मनात जरा चरकल्यासारखंही झालं. ’ते लिबरल आहेत’ नावाच्या वृंदा भार्गवे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखाचं कात्रण कालपरवा कागदपत्रांची आवराआवरी करताना सापडलं होतं. तीन-साडेतीनशे मुला-मुलींच्या लेखिकेने घेतलेल्या मुलाखतीवर आधारित हा लेख आहे. लेखिकेनं घेतलेल्या मुलाखतीतली मुलं-मुली म्हणजे आजच्या ’जनरेशन वाय’ चे प्रातिनिधित्व करणारी – आधुनिक वेशभूषा, प्रत्येकाजवळ महागडा मोबाईल फोन, दुचाकी आणि जवळजवळ प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक बेफिकीर भाव – अशी. ही मुलं कुठल्या माध्यमातून शिकणारी होती, याबाबत लेखिकेने काही लिहिलेलं नाही, पण सगळी मुलं मराठी होती इतकं नक्की. लेखिकेने घेतलेल्या मुलाखतींमधून या मुलांचं सामान्यज्ञान, एकूण समाजाविषयी त्यांना असलेलं भान, सजगता यावर काही प्रकाश पडतो, असे वाटते. या तरुण पिढीचे लेखिकेने केलेले परीक्षण – ते प्रातिनिधिक आहे असा लेखिकेचाही दावा नाही – विचार करायला लावणारे वाटते. उदाहरणार्थ ’तुषार’ नावाच्या मुलाला ’तुषार’ या शब्दाचा अर्थ काही पटकन सांगता आला नाही. खूप विचार करुन त्यानं सांगितल,’बुद्धिमान’! हे उत्तर नाही म्हटल्यावर त्यानं पुढं सूर्य, फूल, पानं असं काय वाट्टेल ते सांगायला सुरवात केली. ’मराठीचं पुस्तक वाचलंस का’ या प्रश्नावर त्यानं झटकल्यासारखं ’नाही, गाईड आणलेलं, पण वेळच मिळाला नाही’ असं तुटक उत्तर दिलं. या मुलाच्या मुलाखतीच्या सुरवातीनंच भारावून जाऊन मी त्या लेखाचा पुढचा भाग वाचला होता.
’का रे, नोकरी करतो कुठं?’
’छे… छे…’
’मराठी काय वाचलंस? पुस्तकं,लेखक, कवी?
’काहीच नाही’
’वर्तमानपत्र?’
’येतं घरी एक.’
’त्यातलं काय?’
’स्पोर्टस’
’कोणती बातमी?’
’आठवड्यापासून नाही वाचलं’
’मराठी म्हण सांग बरं एखादी? किंवा वाक्प्रचार?’
’कडी लावा आतली, मी नाही त्यातली.’
या पुढची मुलं म्हणजे तुषारच्याच काळ्या-गोर्‍या प्रती असल्यासारख्या होत्या. ’आत्मचरित्र’ म्हणजे काय या प्रश्नाला शंभरातले नव्वद ’आ..शिट.. ओह, जस्ट तोंडात आहे, ओ गॉड, वन सेकंद, वन सेकंद….’ अशी उत्तरं या मुलांनी दिली. आवडता लेखक कोणता हे विचारल्यावर या मुलांचे पहिले उत्तर ’सुनील गावसकर’ असे होते (कारण त्यांच्या पुस्तकात ’सनी डेज’ मधला उतारा धडा म्हणून होता), मराठी साहित्यातील साहित्यिक कोण यावर ’शिरवाडकर’ असे उत्तर या मुलांपैकी काहीजणांकडून आले, पण त्यांचं काय वाचलं, ऐकलं, पाहिलं यावर दुमडलेल्या ओठांची चित्रविचित्र घडी बघायला मिळाली असे या लेखिकेचे अनुभव आहेत. आवडता कवी यावर एक मुलानं ’सुनील जाधव’ हे नाव घेतलं ’हे कोण?’ असं विचारल्यावर तो म्हणाला की ’आमच्या शेजारीच राहतात, कविता बेस करतात’ त्यांच्या काही ओळी सांग म्हतल्यावर तो म्हणाला की ’कविता लक्षात नाही राहत, अर्थ सांगू का?’
कविता- असं समजून चालू की – प्रत्येकाचा प्रांत नाही. कथा- कादंबर्‍यांमध्येही या मुलांपैकी कित्येकांना शून्य रस असलेलाच दिसला. मोजक्या काहींनी मृत्युंजयचं नाव घेतलं (या कादंबरीचे लेखक त्यांच्या मते कर्नल शिवाजी भोसले!). या मुलांपैकी प्रत्येक जणच टीव्ही पहाणारा होता, पण टीव्हीवरचे आवडते कार्यक्रम विचारल्यावर मुलं क्रिकेट आणि एखाद-दुसरा रिअ‍ॅलिटी शो आणि मुली कौटुंबिक हिंदी मेलोड्रामापलीकडं जायला तयार नव्हत्या. बातम्या, राजकारण, समाजकारण याच्याशी तर या मुलांचा काही संबंधच नव्हता. वर्तमानपत्रातलं राशीभविष्य वाचणारे बरेचजण होते, पण अग्रलेख वाचणारा एकही नव्हता. सांस्कृतिक जीवन आणि इतिहासाची या मुलांना ओळख तरी आहे का हे पहावं म्हणून लेखिकेने त्यांना काही प्रश्न विचारले आणि विनायक दामोदर सावरकर हे पूर्ण नाव त्यातल्या एकाला माहिती आहे हे कळाल्यानं आपल्याला भरुन आलं असं लेखिका लिहिते. त्यांचं कार्य काय यावर त्याच गुणी विद्यार्थ्यानं ’सावरकरांनी दामोदर टॉकीज बांधलं’ असं उत्तर दिलं. टिळक आगरकरांपेक्षा या मुलांना गांधी जवळचे होते, पण ते त्यांच्या विचारांमुळे नव्हे, तर ’लगे रहो मुन्नाभाई’मुळे
राजकारणात या मुलांना काही गती किंवा रस असावा अशी अपेक्षा करणंच फोलपणाचं होत. तरीही आमदार आणि खासदार यांतला फरक यापैकी बहुतेक मुलांना ठाऊक नव्हता, हे वाचून मला दचकायला झालं. ही सगळी मुलं मराठी, म्हणून लेखिकेने या मुलांना काही मराठी शब्दांचे अर्थ विचारले. त्याला मिळालेली उत्तरं तर मती गुंग करुन टाकतात. सहिष्णू म्हणजे श्रीविष्णूचा भाऊ, सलिल म्हणजे लिलीचे फूल, अजिंक्य म्हणजे पराभूत, अटकळ हा नवीन शब्द दिसतो, चट्टामट्टा हा शब्द ऐकलेलाच नाही, नट्टापट्टासारखा आहे का?, धादांत म्हणजे ज्याचा लवकर अंत होतो तो, लाखोली म्हणजे लाख रुपयांची खोली…साहित्य अकादमीविषयी विचारलं तर ’पोलिस अकादमीसारखी असणार बा’ हे उत्तर..
या सगळ्या मुलाखत प्रकरणात आपल्याला काही अगदी मूलभूत प्रश्नांची उत्तरंही देता आली नाहीत, याची या तरुण वर्गाला कुठे खंत वगैरे वाटल्याचं लेखिकेला दिसलं नाही. लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात लेखिका लिहिते, ‘आता आपापल्या वाहानांजवळ येऊन त्या सगळ्यांनी एकच गिलका-गला केला….ह्या… करत परीक्षांची टर उडवली.टपून बसलेल्या चॅनलवाल्यानं उत्साह, उन्माद, जोश, आनंद सुटीचा या न्यूजसकटरसभरीत वर्णनाला प्रारंभही केला. काहींनी त्यांना कॅमेर्‍यात बंद करुन’बोला’ अशीखूणही केली. चेकाळून अनेकांनी इंग्रजी शब्दांचा आधार घेत परस्परांना हॅपी हॉलिडेजची आलिंगनं दिली. तरुण नावाचं भांडवल घेऊन. या सगळ्यात मी पास झाले की नाही हे मला कळालंच नाही.
भार्गवांचे हे अनुभव तसेच जगल्यासारखं मला वाटू लागलं.
दिवस पुढे सरकला. चित्रपटाचं एकच रीळ परत परत बघीतल्यासारखा अनुभव. चेहरे वेगळे, पण एकाच छापाचे. स्मार्ट, तरतरीत, आत्मविश्वासानं फुलून आलेले. कपड्यांचा उत्तम सेन्स. मुली तर एखाद्या फॆशन शो ला आल्यसारख्या नटलेल्या. सगळं कसं करेक्ट. पोलिटिकली करेक्ट.
दुपारच्या चहाला सकाळचेच मिश्कील प्राध्यापक भेटले. ’हं… काय म्हणतात तुमचे इंटरव्ह्यूज? तुमचं स्किल्ड ह्यूमन रिसोर्स? कधी होणार म्हणताय भारत महासत्ता?’  त्यांनी विचारलं. ’दोन हजार वीस साली’…’ मी चहाचा घोट घेताघेता म्हणालो. पण यावेळी माझा आवाज खाली आलेला होता. खूपच खाली.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 5 टिप्पणियां

जुना काळ

गावात अठरापगड जातींचे लोक होते. जैन, मराठा, धनगर, लिंगायत माळी या त्यातल्या जाती प्रमुख. महार, मांग, ढोर, पिचाटी हे त्यांच्या खालोखाल. ब्राह्मणांची आणि मुसलमानांची मोजकी घरे. ख्रिस्ती, पारशी वगैरे कुणी नाहीच. एखाद्याचे नाव दुसर्‍याच्या नावापेक्षा पेक्षा वेगळे असावे, तितकेच गावात जातीचे महत्त्व होते. आर्थिकदष्ट्या मागासलेल्या गटाचा दाखला भरताना शाळेतल्या मुलांना त्यात जातीचा उल्लेख करावा लागे. त्यापलीकडे रोजच्या जगण्यात जातीचा काही संबंध येत नसे. शाळेतल्या वर्गात ब्राह्मणाची मुले त्यातल्या त्यात हुषार होती. पण त्यावरुन स्फोट व्हावे असे त्याचे कुणाला काही वाटत नसे. ब्राह्मणांची काही मुले त्यातल्या त्यात शुद्ध बोलत आणि ब्राह्मणांच्या मुली स्वत:विषयी बोलताने ’मी येते, मी गेले, मी बघीतले’ असे म्हणत. बाकी तमाम लोक, अगदी मुलीसुद्धा  ’येतो, जातो, खातो’ अशी क्रियापदे वापरत.. ब्राह्मणांची काही मुले बाकी कुणब्याच्या मुलांपेक्षा अधिक कळकट आणि घाणेरडी राहात आणि तशीच शिवराळ, अशुद्ध भाषा बोलत. रोजच्या जगण्याचा आणि जिवंत राहाण्याचा संघर्ष इतका प्रखर होता की तुझी जात- माझी जात, तुझी भाषा-माझी भाषा असा वगैरे  विचार करत बसणे कुणाला फारसे परवडण्यासारखे नव्हते. पण तरी कुणी कसे राहावे, कसे वागावे याबाबत गावाच्या कल्पना स्पष्ट, आखीव होत्या. गावातली पाटीलकी, कुळकर्णीपण संपले होते, पण या कुटुंबांना गावात मान होता. गावातले जुने म्हातारे पाटील आणि कुळकर्णी यांच्या शब्दापुढे जाण्याची अगदी त्या वेळच्या नवीन पिढीचीही शामत नव्हती. गावातले म्हातारे कुळकर्णी संध्याकाळी त्यांच्या नातवाचा हात धरुन हळूहळू चालत मळ्याकडे निघाले की रस्त्यावरुन येणाराजाणारा त्यांना आदराने रामराम करत असे. ’दिवाणजी, मळ्याकडं निगालायसा? बर, बर..बरं हायसा न्हवं?’ अशी चौकशी करत असे. गावातले लहानसहान तंटे गावचे पाटील सोडवत असत आणि त्यांच्या शब्दांचा अनमान करण्याची कुणाची हिंमत नसे. या सगळ्याच्या बदल्यात या सगळ्या कुटुंबाना सूक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखे आयुष्य जगावे लागे. रस्त्यावरच्या चिंचेच्या झाडावर दगड फेकणार्‍या कुळवाड्याच्या पोरांकडे कुणाचे लक्षही जात नसे, पण पाटील-कुळकर्ण्यांच्या मुलांना असले काही करण्याची मुभाच नव्हती.
गावातले मुसलमान मोहरमचे पीर बसवत पण त्या पिरांची नावे शिवगोंड पाटील पीर, चावडी पीर अशी हिंदू होती. पिराच्या दर्शनाला सगळा गाव लोटत असे आणि पीर अंगात येणारे  बहुतेक लोक तर बिगर मुसलमानच होते. असंख्य वस्त्रांनी जड झालेला तो पिराचा ताबूत ’तडतड तडतड’ वाजणार्‍या ताशामागे धुपाचा दरवळ घेऊन आमच्या दारात येत असे आणि पिराच्या पायावर पाणी घालायला आणि अंगात आलेल्या माणसाच्या पायावर डोके ठेवायला एकच गर्दी उडत असे. शिवगोंड पाटील पिराच्या आणि चावडी पिराच्या विसर्जनाच्या दिवशी प्रसादाचे सरबत आमच्या घरुन जात असे. दुपारची झोप झाली की माझे वडील दोन घागरी भरुन सरबत तयार करत असत. सरबत म्हणजे काय, तर भरपूर गूळ, सुंठ आणि बडीशेपेची पूड घालून केलेले पातळसर पाणी. मग मशीदीतून कुणी मौलवी एकदोन माणसांबरोबर हातात धुमसत्या नाडापुड्या आणि समोर तो धुंदी आणणारा ताशा घेऊन ते सरबत न्यायला येत असे. पीर हे कुण्या जातीचे नव्हे, तर सगळ्या गावाचेच दैवत होते. सगळ्या जातीचे लोक पिराला नवस बोलत. मला आठवते, आमच्या नव्या विहिरीचे खोदकाम सुरु होते आणि विहिरीला पाणी लागू दे, मग तुला चांदीचा नाल चढवीन असा  वडीलांनी नवस बोलला होता. सुदैवाने विहिरीला भरपूर पाणी लागले आणि तो नवस फेडायला आम्ही घरातले सगळे वाजतगाजत शिवगोंड पिराच्या मशीदीत गेलो. वडीलांनी तो चांदीचा नाल पिरावर चढावला आणि समोर उभ्या असलेल्या माळ्याच्या फणफणून अंगात आले. मशीदीतल्या त्या कुंद, भारलेल्या वातावरणात तो घुमायला लागला. अंगात आलेल्या माणसाचे शब्द काही कळत नव्हते, पण ’तुझे बरे होईल, भले होईल, पोरेबाळे खुशाल राहातील, तुझी शेते पिकतील, तुझ्या वडीलांच्या प्रकृतीला आराम पडेल’ असे काहीसे तो  मुसलमानी हिंदीत म्हणत  होता. तो उदबत्त्यांचा वास, ती गर्दी, पिरावर चढवलेला तो चांदीचा लखलखीत नाल आणि त्या ताशाच्या तडतडीच्या पार्श्वभूमीवर त्या पीर अंगात आलेल्या लालबुंद डोळ्यांच्या आणि असंख्य घागरी पाणी सतत पायावर घेतल्यामुळे आणि गावभर अनवाणी हिंडल्यामुळे फुटक्या टाचांच्या  माणसाचे कळणारे-न कळणारे शब्द मला आजही आठवतात आणि अंगावर सरसरुन काटा येतो. पिरांच्या विसर्जनाच्या दिवशी तर सगळा गाव बेभान होऊन नाचत असे. स्वत:भोवती गिरक्या घेणारे पीर एकमेकांना स्पर्श करत आणि ’पिरांच्या ’भेटी’ झाल्या” असे लोक म्हणत’. रात्री पिराच्या मैदानात ’खाई’ होई. संध्याकाळपासूनच त्या मैदानात एका उथळ, आयताकार खड्ड्यात मोठमोठी लाकडे पेटवली जात. रात्रीपर्यंत तो खड्डा रसरसत्या निखार्‍यांनी भरुन जात असे. ते इंगळी अंगार फुलले की मग त्यावरुन पिराचे उपासक इकडून तिकडे पळत जात. कुणी हातात ओंजळभर निखारे घेऊन ते वर उधळत असे. ’खाई’ खेळणार्‍या कुणाला कधी भाजले असे माझ्या तरी स्मरणात नाही. रात्री उशीरपर्यंत लोक खाई खेळत आणि अंगाभोवती गोधड्या, कांबळी गुंडाळून विस्मयभरल्या नजरेने प्रेक्षक ती खाई बघत असत. पिराच्या विसर्जनाची मिरवणूक रात्री दहा-अकराच्या सुमाराला वाजतगाजत नदीच्या दिशेने जाई आणि गाव विलक्षण शांत, मोकळा मोकळा वाटू लागे. रात्री उशीरा कधीतरी मिरवणुकीत नाचणारे मुसलमान पिराचे विसर्जन करुन परत येत आणि येताना गंभीर, खर्जातल्या आवाजात काहीतरी प्रार्थनेसारखे, मंत्रासारखे म्हणत. गावातल्या शांत, थंड हवेत शे-दोनशे लोकांनी खालच्या सप्तकात म्हटलेले ते स्वर ऐकताना हुरहुरल्यासारखे होत असे. थोडी भीतीही वाटत असे.
गावात सर्वात जास्त घरे जैनांची. जैन समाज हा भगवान महावीरांचा उपासक. गावात दोन जैनबस्त्या होत्या. जैनांची पूजा-अर्चा त्या बस्त्यांमध्ये चालत असे. जैन लोक कष्टाळू आणि पैशाला चिकट. धोतराला ठिगळे जोडून, गाठी बांधून ते वापरतील. स्वत:च्या पैशाने कुणाला कधी अर्धा कप चहा पाजणार नाहीत. पण घरात पाच पाच लाखाचे सोने बाळगतील.  गावातल्या कुणाची (बहुदा गाव सोडून शहरात जाणार्‍या एखाद्या ब्राह्मणाचीच) जमीन विकायची झाली तर जैनाचा आकडा सगळ्यात मोठा असे. जैनांच्यात खास जैनी आडनावाचे लोक होते. टारे, भबुजे, भगाटे, आवटे, कुगे, कर्‍याप्पा, चकोते, टेंगिनकिरे, हातगिणे असली खडबडीत, ओबडधोबड आडनावे. पाटील समाजातल्या बहुतेक मुलांची नावे ’गोंडा’ हा प्रत्यय जोडलेली असत. भीमगोंडा, पायगोंडा, नरसगोंडा, बाबगोंडा अशा नावाची माझ्या वर्गात मुले होती. बाकी मुले चंद्या, शंकर्‍या, विज्या, रावशा, भरत्या अशा नावाची. मुली छ्बू, मंगल, राजी, रुकमी अशा नावाच्या. एकूण गावावर आणि गावातल्या लोकांवर एक उग्र, खडबडीत कळा होती. नदीच्या काठावर वसलेले निसर्गाच्या कुशीतले, प्रेमळ, साध्या, देवभोळ्या लोकांचे पुस्तकातल्या कवितेतले गाव आणि आमचे गाव याचा एकमेकांशी काही संबंधच नव्हता. आमच्या गावातले लोकही तसेच उग्र, मळकट दिसणारे होते. वाढलेल्या दाढ्या, पानतंबाखू खाऊन लालपिवळे झालेले दात, अंगाला एक गावठी दर्प , फाटके, मळके कपडे आणि तोंडात शिवराळ कानडीमिश्रित भाषा असे गावातल्या माणसांचे एकूण रुप असे. बायका एकजात चोपलेल्या, पोराबाळांचे लेंढार सांभाळणार्‍या आणि सासू, नवरा आणि नणंदा यांच्याकडून होणार्‍या छळाने सुकून गेलेल्या असत. गावात जातपात फारशी नव्हती, पण किरकोळ कुरबुरी चालूच असत. त्यांचे कारणही जगण्याचा मूलभूत झगडा असेच असे. कुणाचे पोटरीला आलेले जोंधळ्याचे पीक रातोरात कुणी कापून नेई, कुणाच्या शेतातला बांध कुणी दोन सर्‍या सरकवून घेई आणि बांधावर असलेल्या लिंबाच्या, आंब्याच्या झाडावरुन तर सतत भांडणे होत. हे शेतकरी भांडणे गावात सुटली नाहीत की तालुक्याला जाऊन एकमेकांविरुद्ध कज्जे घालत आणि वकिलांच्या संसाराची सोय करत. वर्षानुवर्षे हे कज्जे चालत आणि तारखेला तालुक्याला गेलेले  वादी-प्रतिवादी संध्याकाळी एकाच येष्टीने तालुक्याहून परत येत. बहुदा पुढची तारीख पडलेली असे. येष्टी ष्ट्यांडावर उतरुन हे वादी प्रतिवादी एकमेकांकडे तांबारल्या नजरेने बघत, खाकरुन धुळीत थुंकत आणि मिशीवर मूठ फिरवत अंधारात आपापल्या घरांकडे चालू लागत. हे वर्षानुवर्षे होत राही…
गावाचे ग्रामदैवत भैरोबा होते. भैरोबा हा धनगरांचा देव. गावाबाहेरच्या देवळात भैरोबाचा उग्र मुखवटा होता. तो नेमका कसा होता हे बाकी कधी दिसले नाही. कारण गाभार्‍यात प्रचंड अंधार असे. श्रावणातल्या तिसर्‍या रविवारी भैरोबाची जत्रा असे. देवाची गावभर पालखी निघे आणि खारीक-खोबरे उधळायला आणि देवाचे दर्शन घ्यायला मोठी गर्दी होत असे. पालखीसमोर भलीमोठी सासनकाठी तोलत धनगर नाचत असत आणि देवावर उधळलेल्या भंडार्‍याने सगळे वातावरण भगवे-पिवळे होऊन जात असे. भैरोबा हे जागृत दैवत आहे, असा गावाचा विश्वास होता. मुले न होणारी जोडपी भैरोबाला ’मूल होऊ दे, तुझ्या कळसावरुन त्याला खाली टाकीन’ असला क्रूर, न समजण्यासारखा नवस बोलत. एकदोन वर्षात तो नवस फेडायला ते जोडपे येत असे. बरोबर असलेल्या लवाजम्यात एक कुंची घातलेले आणि काजळाने डोळे बरबटलेले तान्हे बाळ असे. मग एकदोन माणसे देवाच्या कळसावर चढत. दोनपाच माणसे एक दणकट चादर चारी बाजूनी हातात पकडून हात वर करत आणि मग ती कळसावर चढलेली माणसे त्या तान्ह्या बाळाला अलगद त्या चादरीत सोडून देत. ते अंतर चारपाच फुटाचेच असे, पण ते दृष्य बघताना काळजात धस्स होत असे. ते लहानगे बाळ त्या धक्क्याने कळवळून रडायला लागे आणि सगळे बघे ’भैरोबाच्या नावानं चांगभलं’ च्या आरोळ्या देत. रासवट, अडाणी पण चोख श्रद्धेच्या ललकार्‍या उठत. श्रावणात हवा पावसाळी कुंद असे आणि त्या तसल्या आजारी हवेतच देवळाकडे जाणार्‍या वेड्यावाकड्या उंचसखल वाटेवर जत्रेतील दुकाने, हॉटेले थाटलेली असत. भजी, जिलबी, बत्तासे, भेंडबाजे असले गावठी चवीचे पदार्थ त्या हॉटेलांत मिळत असत. एक घोट घेतला की थुंकून टाकावा असे वाटावे इतका गोड चहा गावातले गावडे पुन्हापुन्हा पीत असत. त्यावर चरचरीत तंबाखूचे पान खात नाहीतर कडक वासाच्या गावठी बिड्या ओढत. पानाच्या पिचकार्‍यांनी आणि बिडीच्या कडवट वासाने सगळे वातावरण अफिमी होत असे. भैरोबाच्या जत्रेच्या निमित्ताने गावात बैलगाड्यांच्या शर्यती होत, सुदृढ जनावरांच्या स्पर्धा होत आणि जत्रेच्या दिवशी रात्री माळावर तमाशाचा फड रंगत असे. या तमाशाची पटकथा कुणी सेन्सॉर केलेली नसे आणि असली तरी त्या तमाशात काम करणारे नट त्यात ऐन वेळी हशा पिकवण्यासाठी पदरची इतकी वाक्ये घालत, की त्या मूळ कथेला  काही अर्थच राहिलेला नसे. भडक मेकप केलेल्या रावणासमोर उभा असलेला, किंचित पोट सुटलेला कोदंडधारी राम ’रावण्ण्ये, तुजायला लावला घोडा…’ असे म्हणून जबरदस्त हशा घेत असे आणि त्यात कुणाच्या भावना वगैरे दुखावत नसत. पुढे नाचणार्‍या बायका आल्या की मग तर काय प्रेक्षकांत लैंगिकतेचा सामुदायिक उद्रेकच होत असे. प्रेक्षकांतून टाळ्या, शिट्ट्यांबरोबर जे शेरे मारले जात, ज्या फर्मायशी केल्या जात त्याने आजही नागर मंडळींच्या कानातले केस जळतील. पण त्या नाचणार्‍या बायकांना आणि इतर तमासगीर मंडळींना त्याचे काही नसे. तसेच अश्लील विनोद होत, सुमार रुपाच्या आणि सुमार बांध्याच्या बटबटीत मेकप केलेल्या बायका तशाच नाटकीपणे नाचत राहात आणि जनता चेकाळून चेकाळून तमाशा बघत राही.
गावातले बरेचसे लोक शेतकरी होते. दोनपाच किराणा मालाचे  दुकानदार, एखादे सायकल दुकान चालवणारा, एकदोन चहाचिवडा देणारी हॉटेले चालवणारे आणि मग इतर बारा बलुतेदार. नोकरी करणारे बहुतेक लोक प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिक्षक होते. गावात असलेले एक डॉक्टर आर.एम.पी. पदवीधारक होते आणि दुसर्‍या एका कम्पाऊन्डरने एका मोठ्या डॉक्टरकडे उमेदवारी करुन कसलीही पदवी नसताना स्वत:चा दवाखाना सुरु केला होता. तो लोकांना भसाभस इंजेक्शने टोचत असे आणि त्याच्या हाताला गुण आहे असा समज असल्याने त्याच्या दवाखान्यात तोबा गर्दी होत असे. गावात सतत रोगराईच्या साथी असत. पिण्याच्या पाण्याचे हाल असल्याने पोटाच्या विकारांने, जंतांने आणि नारुने लहान मुले पिडलेली असत. देवीचे जवळजवळ उच्चाटन झालेले होते, पण गोवर, कांजिण्या, डोळे येणे आणि पाचवीला पुजलेला ताप यांनी मुले हैराण झालेली असत. दवाखान्यात येणारे बरेचसे लोकही या ’थंड, ताप, डोसकं’ अशा आजाराने ग्रस्त असत. म्हातारी माणसे दमा, क्षय आणि पक्षाघाताने – गावाकडे त्याला ’लकवा मारणे’ असा शब्दप्रयोग होता- मरायला टेकलेली असत. बायकांची अवस्था तर फारच केविलवाणी असे. जेमतेम पदर येतो न येतो तोच होणारे लग्न, लागोपाठ होणारी मुले, अपुरा आणि नि:सत्व आहार आणि सतत दडपून, कुचमत जगावे लागणारे आयुष्य यामुळे त्या विझून गेल्यासारख्या दिसत. तिशीच्या आत बयाच बायका जख्ख म्हातार्‍या दिसायला लागत, आजाराने ग्रासत आणि झिजून झिजून मरुन जात. जननमार्गाचे आजार, मूळव्याध, अवघड जागी होणारी करटे अशा आजारांबाबत तर संकोच आणि अडाणीपणा यामुळे वर्षानुवर्षे यातना सहन करत त्या जगत असत. हसतमुख, प्रफुल्ल चेहयाचे लोक अगदी अभावानेच बघायला मिळत. तरुण लोकांमध्ये ’दारु पिऊन मरणे’ वाढत चालले होते. चांगल्या, सुसंस्कृत कुटुंबातली मुलेही बघताबघता दारुच्या आहारी जात आणि लवकरच सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवरुन झिंगायला लागत. त्याच्या घरचे लोक त्याला मारहाण करणे, कोंडून घालणे, दारु सुटावी म्हणून त्याच्या जेवणातून काही देशी औषधे घालणे  आणि अगदी हमखास म्हणजे वेगवेगळ्या देवांना वेगवेगळे नवस बोलणे असले उपाय करत. ती तरुण मुले अंधारलेल्या डोळ्यांनी आणि भकास चेहयाने सकाळीसकाळी दारुच्या शोधात निघालेली दिसली की त्यांच्या मनातला त्यांनी मदतीसाठी चालवलेला आक्रोश ऐकू येत असे. मन कालवल्यासारखे होई. पुढे काही दिवसांनी त्यांच्यातला कुणीतरी गेला असे कळत असे आणि त्याची पांढया कपाळाची तरुण विधवा कुणासमोर तरी बसून रडताना दिसे.
गावातले मरण हे गावातल्या जगण्याइतकेच भीषण होते. घरातले माणूस मेल्यानंतर जितका आक्रोश जास्त तितकी आपली त्या माणसावरची माया जास्त असे लोकांना वाटते, असा सर्वमान्य समज होता. जिवंतपणी एखादी म्हातारी अर्ध्या भाकरीला आणि कोपभर चहाला महाग झालेली असे, पण ती मेल्यावर तिच्या घरात तिच्या लेकीसुनांनी उंच आवाजात चालवलेली रडारड ऐकून वैफल्य येत असे. ’कुटं गेलीस गं माजे बाई… आता मी आई कुनाला म्हनू गं… माज्या हातच्या पोळ्या आता कुनाला खायाला घालू गं…’ असा तो नाटकी उद्रेक आठ-दहा दिवस चालू राही. परगावाहून त्या बाईच्या बहिणी – मावळणी सांत्वनासाठी येत. येष्टी बसमध्ये कडेवरच्या लेकराला भिस्कुट भरवणारी आणि आपल्या पदराने त्याचा शेंबूड पुसणारी बाई येष्टीतून उतरताच जादू व्हावी तशी झिंज्या सोडून कालवा करायला लागे. ’तुला बगायला आलो की गं.. आता कुटं तुला बगू गं….’ अशी कडवी म्हणत अंगावरच्या लुगड्याचा पदर मातीत लोळवत ती बाई रडत-लोळत तिच्या घराकडे जायला लागे आणि तिच्या कडेवरचे लेकरु आतापर्यंत बर्‍या असलेल्या आपल्या आईला अचानक काय झाले हे न कळाल्याने भेदरुन आंग काढी. मुसलमान आणि लिंगायत समाजात मृत व्यक्तींचे दफन केले जाते. लिंगायत समाजात मृतदेहाला खुर्चीवर बसवून दफनभूमीपर्यंत नेले जाई आणि गुलाल उधळलेला, मान लटलट हलणारा तो मृतदेह डोळ्यांसमोरुन बरेच दिवस हलत नसे. काही शेतकर्‍यांचे दफन त्यांच्या शेतातच होत असे आणि मग त्यावर वर्षा-सहा महिन्यांत त्यांच्या मुलांपैकी कुणीतरी दगडी समाधी बांधत असे. हिंदूंची स्मशानभूमी गावापासून दोनतीन किलोमीटर दूर, नदीच्या काठावर होती आणि पावसाचे दिवस असले की कुणाला जास्त झाले म्हटले की लोकांच्या पोटात गोळा येत असे. वरंधार पावसात, चिखल तुडवत ती तिरडी नदीकाठी न्यायची आणि कसलाही आडोसा नसलेल्या ठिकाणी अर्ध्या ओल्या सरणावर  ते दहन करायचे म्हणजे इतरांच्या दृष्टीनेही मरणच होते. एरवी अंथरुणावर खितपत पडलेल्या एखाद्या दुर्लक्षित म्हातार्‍याचा रक्षाविसर्जनाचा –राख सावडण्याचा- कार्यक्रम बाकी जोरात होत असे. शे-पाचशे लोक जमत, त्या म्हातार्‍याच्या आवडीचे पदार्थ आणले जात – त्यात कधीकधी मटण आणि दारुही असे – पिंड मांडला जाई आणि कावळा शिवला की हुकमी हुंदके देऊन त्या म्हातार्‍याचे नातेवाईक एकमेकांच्या मानेवर डोकी टाकत. हे सगळे नाटक अगदी व्यावसायिक वाटावे अशा सफाईने केले जाई. दोनपाच महिने जात आणि त्या म्हातार्‍याच्या नावावर असलेल्या जमीनीच्या मालकीवरुन त्याच्या वारसांमध्ये भांडणे सुरु होत.
गावात लैंगिकतेची ओळख अगदी कमी वयात होत असे. भाद्रपदात गल्लीगल्लीत हेंडकुळे लागत आणि जुगलेली कुत्री उलटी होऊन सुटी होण्यासाठी धडपडत. अशा कुत्र्यांना दगड मारण्यार्‍यांची लैंगिक विकृती आज समजल्यासारखी वाटते. लैंगिक संबंधाची ओळखही न झालेली मुलेही असे करण्यात पुढे असत. (फ्रॉईडची मते त्या वेळी वाचलेली नव्हती!) उकीरड्यावर किडे टिपणार्‍या गावठी कोंबड्यांतील एखादा तुर्रेबाज नर अचानक तिरकी तिरकी धाव घेई आणि ’क्वॅक क्वॅक..’ असे ओरडत, पायातल्या पायात धडपडत पळणार्‍या कोंबडीची मान चोचीत धरुन तिच्यावर चढे. दोनचार सेकंद पिसांचा धुरळा उठे आणि मग तो नर त्या कोंबडीला सोडून परत दाणे, किडे टिपायला लागे. दावणीच्या गाई, म्हशी माजावर – गावाकडच्या भाषेत ’वाफेवर’- आल्या की चारा खाणे सोडून अस्वस्थ होऊन हंबरत आणि पायांनी जमीन उकरत निरणातून सोट गाळत. त्यांच्या डोळ्यांत वासनेचे ते आदिम मूक थैमान दिसत असे. मळ्यातली गडीमाणसे अशा जनावरांना पहाटेपहाटे ’गाभ घालवायला’ गावाबाहेर घेऊन जात असत. लक्कडकोटात त्या गाई, म्हशींना बंद केले की वळूला किंवा रेड्याला मोकळे केले जाई. आपला वरचा ओठ वर वळवून, नाक फेंदारुन तो नर त्या मादीचा कामसुगंध हवेतून शोषून घेई, मग धडपडत आपले वरचे पाय उचलून त्या मादीवर चढत असे. त्याच्या हातभर लांबीच्या लालपिवळ्या सोटाखाली त्या माद्या वाकत,  तोंडाचा आ वासून सुस्कारे टाकत. तो नर नवखा असला तर त्याला हा संभोग नीट जमत नसे. मग आसपास उभी असलेली जाणकार माणसे त्याला मदत करीत. ती कोवळी मादी, तो हपापलेला, कामधुंद नर आणि त्या परमैथुनातून सुख मिळवणारी ती रांगडी, गावठी माणसे असे जणू वासनेचे एक लालभडक, जळते, एकसंध, सलग फिरणारे वर्तुळ तयार होत असे. असा तो नर दोनचार वेळा त्या मादीला जुगला – त्याला दोनचार ’काठ्या’ लागणे असा ग्राम्य पण चपखल शब्दप्रयोग होता – की मग तो कामतृप्त झालेला नर त्या मादीवरुन उतरत असे आणि ती थकलेली पण अत्यंत समाधानी मादी हळूहळू चालू लागे. जणू स्वत:चेच स्खलन झालेले असावे अशा आविर्भावात आसपासचे लोकही पांगत. हे सगळे अगदी उघडपणे, राजरोसपणे होत असे. शनिवारी सकाळच्या शाळेला जाताना तर हमखास दिसणारे हे दृष्य. याचा नेमका अर्थ अगदी लहानपणीच कळू लागे. चौथी-पाचवीपासूनच असले काही दिसले की शाळेला जाणारी लहान मुलेसुद्धा तेथे रेंगाळायला लागत आणि मुली लाजून गडबडीने घाईघाईत चालायला लागत. घराघरांतून पाळलेली मांजरे, छपरांवर, झाडांवर उड्या मारणारी माकडे, उकीरड्यांवर आणि चिखलात लोळणारी डुकरे – हे सगळे प्राणी आपापल्या जोडीदारांबरोबर रत होत आणि पिलावळ प्रसवीत. त्यामुळे पुनरुत्पादन कसे होते हे अगदी पोरवयापासून नीट कळायला लागे.  व्यायला झालेल्या गाईच्या निरणातून स्त्राव गळायला लागला की घरातले लोक गरम पाणी, शिजवलेले राळे अशा तयारीला लागत. तास-दोन तास उठबस करुन मग ती गाय- म्हैस कुंथायला लागे. तिच्या पाठीमागून काळ्यानिळ्या रंगाचा बुळबुळीत फुगा बाहेर येई आणि ती अस्वस्थपणे घशातल्या घशात हंबरायला लागे. तो फुगा  फुटला की मग त्यातून वासराचे खूर आणि डोक्याचा पुढचा भाग बाहेर येई. मग गावातला जाणकार डोक्याचे मुंडासे खोचत पुढे होई आणि हातावर एक थुंक टाकून वासराचे ते पाय धरुन हळूच वासराला बाहेर ओढून काढी. ती गाय-म्हैस तोंडाचा आ वासून एक शेवटची कळ देई आणि मोकळी होई. हे सगळे अगदी नेहमी होत असल्यासारखे होते, त्यामुळे जसे जनावरांचे असते तसेच माणसांचे असणार हे व्यवहारी शहाणपण शिकवण्याची कुणाला काही गरज नव्हती. ’स्टॉर्क’ वगैरे फसवणूकही चालण्यासारखी नव्हती.
गावातल्या वडाराच्या बायका चोळी घालत नसत आणि त्या बायका घाईघाईने चालायला लागल्या की  त्यांची पदराआडची ओघळलेली, थुलथुलीत छाती लुटूलुटू हलत असे. कधीकधी एखादी वडारीण चालताचालता रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबून आपला पदर बाजूला करी आणि आपला सावळा पण पुष्ट, दुधाळ स्तन सुटा करुन नि:संकोचपणे कडेवरच्या मुलाच्या तोंडात त्याचे बोंडूक देई. ते मूल मग हातपाय झाडत चुरुचुरु चोखायला लागे. हे सगळे अगदी चारचौघांत निगरगट्टपणे होत असे आणि यात कुणाला काही विशेष वाटतही नसे. हे सगळे  बघून नजर मेलेली असे. जैनांचे ’निर्वाण’ स्वामी पूर्ण दिगंबर अवस्थेत असत. त्यांचे पूर्ण वाढ झालेले केसाळ पुरुषी लिंग बघतानाही काही वाटत नसे. स्वामींच्या पायावर पाणी घालणार्‍या, मोरपिसांच्या झाडूने त्यांचे आसन झाडणार्‍या जैनाच्या बायकांचा त्या स्वामींच्या लिंगाला कधी नकळत स्पर्शही होत असे. अशा स्त्रियांमध्ये काही बालविधवा, काही लहानपणीच देवाला वाहिलेल्या भाविणीही असत. ’निर्वाण भाळ छलु’ (’पूर्ण नग्न फारच चांगले) हे अशा स्त्रियांच्या तोंडी ऐकलेले काही गावठी शब्द आज अतृप्त मानवी लैंगिक भावनांची काही गुंतागुंत सुचवून जातात. त्या वेळी बाकी असले काही डोक्यात येत नसे.
मानवी लैंगिक संबंधाबाबतचे उरलेसुरले कुतुहल लोकांच्या बोलण्यातून शमत असे. गावाकडच्या बोलण्यात शब्दागणिक शिवी असे. या शिव्याही अत्यंत स्पष्ट, चोख आणि नेमक्या असत. त्यातले लैंगिक उल्लेख हे थेट आणि सर्जनशील असत. मानवी कोणत्या लैंगिक अवयवांना नेमके काय म्हणतात हे अगदी लहान वयात कोणत्याही प्रकारचे लैंगिक शिक्षण न घेता कळाले याचे कारण आसपास असलेले उघडे, बिनईस्त्रीचे वातावरण. चौथीपाचवीतला एखादा थोराड मुलगा हातची मूठ बांधून करंगळीशेजारी तळव्याच्या त्वचेला पडणाया घडीकडे बोट दाखवत काही सूचक, चावट बोले आणि आसपासची तशीच थोराड मुले फिदीफिदी हसत. गावाकडच्या कसदार खाण्याने, भरघोस कष्टाने आणि मोकळ्या वागण्याने मुले-मुली लवकर वयात येत. सातवी-आठवीत बहुतेक प्रत्येक मुलगी महिन्यातून चार दिवस शाळेला येत नसे आणि पाचव्या दिवशी ती न्हाऊन शाळेत आली की एखाद्या पुष्ट मक्याच्या कणसासारख्या दिसणार्‍या त्या सुस्नात मुलीकडे बघून वर्गातली काही दांडगी मुले अत्यंत वाह्यात असे काही बोलत. असले सगळे आसपास असताना काही शिकायचे राहिले असे होत नसे. आठव्या-नवव्या इयत्तेत असलेल्या पण वयाने बयाच थोर असणाया मुलांच्या शरीरात ज्वानीच्या अनावर लाटा उसळत. त्यातली काही पैसेवाली मुले चक्क वेश्यांकडे जात. बाकीची मुले गावातच निचर्‍याचे साधन शोधत. गावात चोरटे लैंगिक संबंध तर वाट्टेल तितके असत. एखादी जून, अनुभवी, पाशमुक्त ठसठशीत वडारीण किंवा चांभारीण आणि तिच्याकडून आपली कामतृषा भागवणारी कोवळी पण जोरकस मुले असले काही त्या काळात ऐकू येत असे, दिसतही असे.
गावातली बोलीभाषा अगदी रांगडी, खेडवळ होती. सीमाभाग असल्याने गावातले बरेचसे लोक कानडी बोलत. पण त्या नम्र, गोड भाषेचा आमच्या गावात बोलल्या जात असलेल्या भाषेशी अंघोळीइतकाही संबंध नव्हता. गावातली बोलीभाषा खडबडीत उतारावरुन टमरेल खडखडत जावे तशी होती. गावात सदैव वचावचा भांडणे चालत आणि भांडणात एकमेकांच्या आईमाईचा स्वच्छ, बिनकासोट्याचा उल्लेख होत असे. एखादा दारुडा नवरा संध्याकाळी बायकोच्या झिंज्यांना हात घालत “रांडे, उंडगे, कुनाकुनाखाली झोपलीस आं?” म्हणत तिला बडव बडव बडवत असे आणि ती चवताळलेली बाई त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत “आयघाल्या, बाराबोड्याच्या, तुज्या शेमन्यात जोर आस्ता तर मी कुनाकडं कशाला गेलो आस्तो रं हांडग्या..” असं जोरजोरात ओरडत असे. काम न करता दुपारी झोपणार्‍या आपल्या पोटच्या मुलाला एखादा गांजलेला बाप बांधावर उभा राहून ’नाड खज्जाळीच्या, तुज्यायला लावला डॉंबारी..” म्हणून शिव्या देत असे आणि विहिरीवर पाण्यासाठी भांडताना बायका एकमेकीला “व्हयमाले, तुला वड्याच्या काटानं मांगानं हेपल्लला गं रांडं..” असं मोकळेपणाने म्हणत असत. या शिव्यांमधला जहरीपणा जाऊन त्यांची निव्वळ फोलपटे शिल्लक राहिली होती. शाळेतली मुलेही एकमेकाशी बोलताना सहजपणे ’रांडेच्या’ वगैरे शब्द वापरत. हे सगळे अगदी मोठ्मोठ्यांदा बोलले जाई. गरीबी, अडाणीपणा, रोगराई, व्यसनाधीनता या सगळ्यांमुळे टेकीला आलेले हे पुरुष आणि पोराबाळांचे लेंढार, नवर्‍याचा उन्मत्तपणा, सासुरवास आणि कष्ट- न संपणारे अपरिमित कष्ट यांनी मरायला टेकलेल्या पण लवकर न मरणार्‍या बायका – हे सगळे लोक असे तोंड फुटल्यासारख्या शिव्या द्यायल्या लागले की ते सगळेच आपल्या ठसठसणार्‍या गळवासारख्या आयुष्याला आणि असले बिनबापाचे, कणाहीन निरर्थक  आयुष्य देणाऱ्या त्या कृपासिंधू करुणाकरालाच शिव्या देत आहेत, असे वाटत असे.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

अगा जे घडलेचि नाही

विश्वास पाटलांचे ‘नॉट गॉन विथ दी विंड’ हे पुस्तक वाचत होतो. त्यात ‘पिंजरा’च्या निर्मितीदरम्यान घडलेल्या काही विलक्षण गोष्टींचे उल्लेख आहेत. या कथेवर शांतारामबापू चित्रपट बनवणार हे ठरल्यावर त्यात नायिकेचे काम संध्याबाई करणार हेही ठरल्यासारखेच होते. शांतारामबापूंच्या सहकाऱ्यांना बाकी हे फारसे पसंत नव्हते. (ही पसंत नसण्यासारखीच गोष्ट आहे. तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी , ब्रह्मचारी मास्तरला एका क्षणात मोहात पाडणारी चंद्रकला कशी मादक, मोहक, मांसल हवी. बाईंमध्ये ते ‘इट्ट’ मुळातच नाही. त्यातून ‘पिंजरा’ पर्यंत बाई बऱ्यापैकी जून व थोराड दिसू लागल्या होत्या. त्यामुळे अशा निबर बाईची उघडी पोटरी आणि गुडघा बघून मास्तरांच्या आदर्शाचे इमले ढासळावेत, हे काही पटत नाही. असो. ) शांतारामबापूंचा बरा मूड बघून कुणीतरी बापूंना संध्याबाईऐवजी जयश्री गडकर या भूमिकेसाठी अधिक योग्य आहेत असे सुचवले. त्यावर बापू हसून म्हणाले, “अरे, हा चित्रपटच मी संध्यासाठी बनवतो आहे. ” झाले, विषय संपला.
ध्येयवादी मास्तरच्या भूमिकेसाठीही पहिली निवड अरुण सरनाईकांची होती. पण त्या काळात बापूंचे आणि सरनाईकांचे संबंध बिघडलेले होते. म्हणून ही भूमिका डॉ. लागूंकडे आली. हे सगळे वाचून मनात येते, डॉक्टरांच्या जागी अरुण सरनाईक आणि संध्याबाईंच्या जागी  जयश्री गडकर  असत्या तर काय झाले असते? जे झाले ते न होता, जे झाले नाही ते झाले असते, तर काय झाले असते?
अशीच काहीशी कथा ‘पिंजरा’च्या हिंदी आवृत्तीबाबतही आहे. खरे खोटे कोण जाणे, पण ‘पिंजरा’ मधील मास्तरचा रोल मिळावा म्हणून दिलीपकुमार चक्क दोनदा शांतारामबापूंना भेटून गेला म्हणे. दिलीपकुमार जर ही भूमिका करणार असेल तर नायिकेच्या कामासाठी वहिदा रेहमानला राजी करता येईल असे काही लोकांचे त्या काळात मत होते. बापूंनी हिंदीत केलेला ‘पिंजडा’ कधी आला आणि कधी गेला कुणाला कळालेसुद्धा नाही. पण दिलीपकुमार – वहिदा रेहमानने हा ‘पिंजडा’ केला असता तर काय झाले असते?
दिलीपकुमारवरून आठवले.  ‘प्यासा’  तला  विजय  आणि  ‘संगम’  मधला  गोपाल  या दोन्ही  दिलीपकुमारने  नाकारलेल्या भूमिका.  ‘ प्यासा’ चे गुरुदत्तने  सोने केले, पण जांभळट ओठाचा भावशून्य राजेंद्रकुमार बघणे ही ‘संगम’ बघण्यामधली सर्वात मोठी शिक्षा आहे.  ती भूमिका दिलीपकुमारने केली असती तर काय झाले असते?
‘मधुमती’च्या वेळची गोष्ट. त्या काळात दिलीपकुमार नायक म्हटल्यावर पार्श्वगायक महंमद रफी किंवा तलत महमूद हे ठरल्यासारखेच होते. ‘मधुमती’ मधली मुकेशच्या आवाजातली  एकूण एक गाणी खरे तर तलतच्या आवाजात रेकॉर्ड व्हायची होती. पण त्या काळात मुकेशला जरा वाईट दिवस आले होते. तलतला हे कळाल्यावर त्याने उमद्या मनाने स्वतःहून त्या गाण्यांसाठी मुकेशची शिफारस केली. पुढे ‘मधुमती’ च्या गाण्यांनी इतिहास घडवला. पण ‘सुहाना सफर’ आणि  ‘दिल तडप तडप के’ ही गाणी तलतच्या आवाजात ऐकायला कशी वाटली असती?  (विशेष  म्हणजे ‘मधुमती’ मधले दिलीपकुमारच्या तोंडी असलेले एकमेव दुःख/ विरहगीत ‘टूटे हुए ख्वाबोंने’ हे महंमद रफीच्या पदरात पडले आहे! ) ‘कितना हसीं है मौसम’ हे गाणेही तलत रेकॉर्डिंगला येऊ न शकल्यामुळे अण्णा चितळकरांनी स्वतः गायिले आहे. हे गाणे ऐकताना ते तलतला डोळ्यांसमोर ठेऊन बांधलेले आहे, हे उघडपणे कळतेच. (पूर्वीच्या गाण्यांमध्ये असे कळत असे.)  हे गाणेही जर तलतने गायिले असते तर काय झाले असते? लताबाई रेकॉर्डिंगला येऊ न शकल्यामुळे मदनमोहन यांनी ‘नैना बरसे’ त्या दिवशी स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केले . पुढे ते लताबाईंच्या आवाजातही रेकॉर्ड केले आणि ‘वह कौन थी? ‘ मध्ये शेवटी लताबाईंच्या आवाजातलेच गाणे ठेवले आहे. पण मदनमोहन यांच्या आवाजातले ते गाणे ऐकून असे वाटते की जर हेच गाणे चित्रपटात ठेवले असते तर काय झाले असते? ( ‘दस्तक’ मधल्या ‘माई री’ प्रमाणे)
तलत महमूद असा अनेक वेळा कमनशिबी ठरला. ‘कितनी हसीन रात’ हे त्याच्या आवाजात रेकॉर्ड होऊनही प्रत्यक्षात चित्रपटात ऐनवेळी त्याच्या जागेवर महेंद्रकपूरने गायलेले गाणे आले. ‘चल उड जा रे पंछी’ हेही तलतच्या आवाजात रेकॉर्ड झाले होते, पण ते रफीच्या आवाजात रेकॉर्ड करून चित्रपटात घेतले गेले. तलतच्या सुदैवाचे (मला माहिती असणारे ) एकमेव उदाहरण म्हणजे ‘जहांआरा’ मधली सगळी गाणी. ‘जहांआरा’ च्या आसपास तलतचा आवाज संपत आला होता. पण या चित्रपटातील नायकाला फक्त तलतचा आवाजच न्याय देऊ शकेल या भूमिकेवर संगीतकार मदनमोहन अडून बसले. या गाण्यांचे तलतने काय केले हे सांगण्याची गरज नाही. पण निर्माता-दिग्दर्शक यांच्या आग्रहापुढे झुकून मदनमोहन यांनी ही गाणी महंमद रफीच्या आवाजात रेकॉर्ड केली असती तर काय झाले असते?
‘देवदास’ या बिमल रॉय यांच्या चित्रपटाबाबतही असेच सांगता येईल. ‘देवदास’ पूर्ण झाल्यावर बिमल रॉय यांनी एकदा खाजगीत बोलताना ‘मला माझा देवदास हवा तसा मिळाला, पण पारो आणि चंद्रमुखीच्या बाबतीत मात्र मला तडजोड करावी लागली’ असे म्हटले होते. बिमलदांना पारो म्हणून मीनाकुमारी आणि चंद्रमुखी म्हणून नर्गिस हवी होती. या ना त्या कारणाने हे झाले नाही. (कदाचित ते बरेच झाले.  वैजयंतीमालाने  चंद्रमुखी  अजरामर केली आहे.  ‘जिसे तू कबूल कर ले’ हे नर्गिसवर पिक्चराईज झाले असते तर…? नको, ती कल्पनाही करणे नको! ) हीच नर्गिस ‘मुघल-ए-आझम’ च्या नायिकेसाठेची पहिली निवड होती (नर्गिसचे अनारकलीच्या स्क्रीन टेस्टच्या वेळी घेतलेले अनारकलीच्या गेट अप मधील छायाचित्र उपलब्ध आहे) हे एक आणि याच नर्गिसच्या ‘मदर इंडिया’ मधील भूमिकेसाठी सुलोचनाबाईंचे नाव जवळजवळ नक्की झाले होते हे दुसरे – आज हे सगळे ऐकायला कसे वाटते?
‘तीसरी कसम’ मधली हीराबाईची भूमिका करायला मीनाकुमारीला केवळ हीरो राजकपूर आहे म्हणून म्हणून कमाल अमरोहींनी मनाई केली होती. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनि तर सिमी गरेवालची हीराबाई म्हणून पहिली निवड केली होती. ( आणि तिचे फोटो बघून शम्मी कपूर ‘अरे, ये तुम्हारी हीरॉईन है? अरे ये तो… ‘ असे काहीसे तिच्या शरीरसंपदेला उद्देशून भयंकर बोलला होता!) वहिदा रेहमान ही उत्तम नृत्यांगना आहे, त्यामुळे नौटंकीचं काम करणारी, काहीसं गावरान, उत्तान नाचणारी हीराबाई म्हणून ती शोभणार नाही असं दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांना वाटलं होतं. बासुदांच्याच ‘अनुभव’ मध्ये संजीवकुमारच्या जागी प्राणला घेऊन एका दिवसाचं शूटिंगही झालेलं होतं. प्रकाश मेहरांच्या ‘जंजीर’ मध्ये तर अमिताभच्या वाट्याला राजकुमार, देव आनंद यांनी नाकारलेली भूमिका आली. (हे बेष्ट आहे. ‘जानी, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं.. ) अमिताभला घेऊन नऊ दहा रिळे शूटिंग केल्यावर ‘मेला’ मध्ये अमिताभच्या जागेवर संजय खान आला. (हा ‘मेला’ आणि त्यातला संजय खान आज कुणाला आठवतही नाही. ‘मेला’नंतर दोन वर्षांनी ‘मेला’ चे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनीच ‘जंजीर’ केला) ….
या सगळ्या ‘न झालेल्या कहाण्यांची’ विश्वासार्हता हा भाग तूर्त सोडून देऊ. पण ‘गंगाधरपंताचे पानिपत’ या गोष्टीत उल्लेख केल्यासारखी जर एखादी चवथी मिती असेल, आणि या चवथ्या मितीत हे सगळे न झालेले झाले असेल, तर ते बघायला, ऐकायला किती मजा येईल!

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

मुख्यमंत्र्यांचे पत्र

‘महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी या संदर्भाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातर्फे श्री. वसंतराव गणपुले यांना त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. आपल्याला आरोग्याची आणि आनंदाची अनेक वर्षे लाभोत ही महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री श्री. युवराजदादा बोराटे यांच्यातर्फे कामना. ‘
वसंतरावांनी थरथरत्या हातांनी ते पत्र टेबलावर ठेवले. “काय भाषा वारतात हे लोक शोभा! साधं, सोपं मराठी कसं लिहावं हे या सरकारी बाबूंना कधी कळणार कुणास ठाऊक! ” त्यांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला. “आं? काय म्हणालास?” त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसलेल्या शोभाताईंनी विचारलं.”क्काय? ” न्याहारीसाठी त्या उकडलेले एक अंडे कसेबसे संपवण्याच्या प्रयत्नात होत्या. “शोभा, हिअरिंग एड काढून कशाला ठेवतेस ते? लावत जा गं कायम… ” वसंतराव म्हणाले. “तुला ऐकू येईल इतक्या मोठ्यांदा बोलणं जमत नाही मला आता. ” वसंतराव जरासे चिडल्यासारखे झाले होते. “का, काय झालं आता? ” शोभाताईंनी हिअरिंग एड लावून विचारले. वसंतरावांनी चष्मा काढून हातात घेतला. “शोभा, वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्रांच्या ऑफिसमधून अभिनंदनाचं पत्र पाठवणं ठीक आहे. चांगलंच आहे. पण जरा भाषा चांगली वापरा की. चांगली मरू दे, बिनचूक तरी लिहा की. ही काय यशवंतराव चव्हाणांच्या भाषणासारखी काँग्रेसी भाषा… ” ” शांत, वसंतराव, शांत… ” वसंतरावांच्या अंगावरची शाल सारखी करत शोभाताई म्हणाल्या. “शंभरी आली आता तुमची. आली काय, झालीच म्हणा. लहानसहान गोष्टींनी ब्लडप्रेशर वाढवून घ्यायचे दिवस राहिले नाहीत आता. अरे, सरकारी कारभार आहे हा. सरकारी कर्मचाऱ्यांनी भाषेच्या, व्याकरणाच्या चुका करू नयेत ही कसली भलती अपेक्षा तुझी? ” वसंतराव काहीच बोलले नाहीत. शोभाताईंनी ते पत्र उचलले आणि बघितल्या न बघितल्यासारखे करून परत टेबलवर ठेवले. “शंभरी पूर्ण झाल्याबद्दल सरकारी अभिनंदनाचं पत्र. आता तीन वर्षं गेली की तुलाही असं पत्र येईल शोभा. ” घसा साफ करून वसंतराव म्हणाले. “तेवढं आयुष्य द्यावं देवानं मला. काय? ” शोभाताईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य उमटलं. “काय झालं हसायला? ” त्यांनी विचारलं, पण शोभाताई काहीच बोलल्या नाहीत. ‘इतकी वर्षं संसार करून ही बाई कितपत कळाली आपल्याला? हिचं हे असलं हसणं तर आपल्याला आयुष्यभर उमगलंच नाही… ‘ वसंतरावांच्या मनात येऊन गेलं. ‘बट आय स्टिल डोंट अंडरस्टॅंड वुमन…’ फार फार वर्षांपूर्वी बघितलेलं आईनस्टाईनचं कार्टून त्यांना आठवलं.
वसंतरावांच्या शंभरीचा त्यांच्या मुलांनी, नातवंडांनी दणकेबाज बेत आखला होता. गेला आठवडाभर नुसती धामधूम सुरू होती. सगळा बंगला रोषणाईच्या दिव्यांनी लखलखत होता. सगळे नातेवाईक, सगेसोयरे, इष्टमित्र आवर्जून वसंतरावांना आणि शोभाताईंना भेटायला आले होते. अमेरिकेत, युरोपमध्ये शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या वसंतरावांच्या नातवंडांनी आपापल्या रजा, सुट्ट्या तीन तीन वर्षांपासून प्लॅन केल्या होत्या. प्रसिद्धीमाध्यमांना लहानलहान का होईना, मुलाखती देतांना आणि शोभाताईंबरोबर फोटोंसाठी ‘पोझ’ देताना वसंतराव अगदी थकून गेले होते. या मुलाखती, हा समारंभ कशासाठी असा प्रश्न त्यांना अधूनमधून पडत असे. काय केलं आपण आयुष्यात विशेष असं? वयाची शंभर वर्षं पूर्ण केली म्हणून इतका मोठा समारंभ? त्यांना कधी कधी काही कळेनासंच होई. पण आता कुणाला विरोध करून कटुता निर्माण करावी असं काही त्यांना वाटत नसे. आजची मेजवानी हा तर सगळ्या समारंभाचा कळसच होता. बरोबर अकरा वाजता एकमेकाच्या आधाराने वसंतराव आणि शोभाताईंनी मेजवानीच्या हॉलमध्ये प्रवेश केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. करड्या रंगाच्या नव्या सूटमध्ये वसंतराव एखाद्या जुन्या पण चकचकीत पॉलिश केलेल्या प्रचंड लाकडी घड्याळासारखे दिसत होते. थोडेसे थकलेले, पण अजूनही पाठीचा कणा ताठ असलेले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या, हातांवरच्या सुरकुत्या पिकलेल्या आंब्याच्या सालीसारख्या दिसत होत्या.
वसंतरावांचा जन्म सकाळी अकरा वीसचा. मिनिटकाटा चारवर आला आणि हॉलमधल्या मंडळींनी टाळ्यांच्या तालावर ‘हॅपी बर्थडे टू यू.. ‘ म्हणायला सुरवात केली. चांदीच्या सुरीने वसंतरावांनी टेबलवरचा प्रचंड चॉकलेट केक कापला आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. शोभाताईंनी केकचा एक छोटा तुकडा वसंतरावांना भरवला. ‘शुगरबिगरचा विचारही डोक्यात आणू नकोस, शोभा’ वसंतराव मिष्किलपणे म्हणाले. कुणीतरी एक माईक वसंतरावांच्या तोंडासमोर आणून धरला. ‘बोला, काहीतरी सर.. ‘ तो म्हणाला. कुणीतरी जुना विद्यार्थी असावा.
वसंतरावांनी आधारासाठी शोभाताईंकडे बघीतलं. ‘बोल, चार शब्द. ‘ त्या म्हणाल्या.
“आवर्जून सगळे आलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. ” वसंतराव म्हणाले. त्यांना आता खरंच फार थकल्यासारखं वाटत होतं.
त्यानंतरची त्यांचा सन्मानाची, गौरवाची भाषणं, जंगी खाना हे सगळं वसंतरावांच्या मनात एखाद्या धूसर स्वप्नासारखं सरकून गेलं. पाहुण्यांचे आभार मानताना त्यांच्या नातवानं ‘आता तीन वर्षानं पुन्हा सगळे अशाच एका कार्यकर्मासाठी भेटू. आजीच्या शंभरीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्हाला आत्ताच देऊन ठेवतो… ‘ असं म्हटलेलं बाकी त्यांना स्पष्टपणे आठवत होतं.
रात्री अंथरुणावर पडल्यापडल्या वसंतरावांनी शोभाताईंचा हात हातात घेतला. “आयुष्य तसं बरं गेलं, नाही का शोभा? लहानपण गरीबीत गेलं, तरुण वयात जबाबदाऱ्या होत्या, पण आता म्हातारपणी वाटतंय की काही फार वाईट जगलो नाही आपण… ”
“तू असशील म्हातारा, वसंता. ” शोभाताईंनी फणकाऱ्याने त्यांचा हात वसंतरावांचा हातातून काढून घेतला. “मला नाही हो म्हातारीबितारी म्हटलेलं चालणार. मला अजून परतवंडं बघायचीयत, त्यांना मांडीवर खेळवायचंय, जोजवून झोपवायचंय, त्यांची दृष्ट काढायचीय.. ”
वसंतरावांनी सुस्कारा सोडला. “वानप्रस्थाश्रम वगैरे काही तुला पटत नाही असं दिसतंय, शोभा. संसारात अजून तू अडकलेली आहेसच. मला बाकी तुझ्या शंभरीला तुला आलेलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनाचं पत्र बघायचंय फक्त. तुझी शंभरी बघीतली की मी मरायला मोकळा झालो बघ.. ” वसंतरावांचा आवाज बारीक झाला होता.
“पण माझ्या शंभरीला असले सोहळे नकोत रे बाबा. तुला हौस आहे मिरवून घ्यायची, पण मला नकोत असल्या काही पंगतीबिंगती. साधी, घरगुती करावी शंभरी. तीही नाही केली तरी चालेल अगदी. ” शोभाताई म्हणाल्या. पण वसंतरावांना झोप लागली होती. हात लांबवून शोभाताईंनी दिवा बंद केला. ते वृद्ध जोडपं झोपी गेलं.

———————————————————————————————-

मधल्या तीन वर्षांत फारसं काही झालं नाही. वसंतराव आणि शोभाताई जितके व्हायचे तितके म्हातारे झाले. शोभाताईंच्या मांडीवर त्यांचं पहिलं परतवंड खेळलं. शोभाताईंचा वाढदिवस येतायेता वसंतराव अगदीच थकले. शोभाताईंची शंभरी अगदी त्यांच्या इच्छेनुसार अगदी घरगुती स्वरुपात पार पडली. गणपुल्यांचे अगदी घरचे लोक सोडले तर कुणाला निमंत्रणंच पाठवली नव्हती. तरीही शोभाताईंना शंभराच्या वर शुभेच्छापत्रं आली. वसंतरावांनी त्यातलं प्रत्येक पत्र थरथरत्या हातात मोठं भिंग घेऊन वाचलं. ‘मुख्यमंत्र्यांचं पत्र काही नाही आलं शोभा’ ते पुन्हा पुन्हा हेच म्हणत होते. “वसंता, म्हातारचळ लागलाय रे तुला, म्हातारचळ. अरे, असलं काहीतरी चालू करतात लोक निवडणुका तोंडावर आल्या की. मध्यंतरी सरकार बदललं नाही का? आताच्या सरकारच्या लक्षातसुद्धा नसेल असलं काही ” शोभाताई समजूतदारपणामं एकदोनदा म्हणाल्या.
आज सगळे पाहुणे परत गेले होते. वसंतरावांना सकाळपासूनच एकटंएकटं वाटत होत. तरीही ते कसली तरी वाट बघत होते. थोडेसे अधीर होऊन. गुरुवार होता. प्रत्येक गुरुवारी वसंतरावांची गावातच राहाणारी नात आजीला देवळात घेऊन जायला येत असे. संध्याकाळी बाहेर जायची हल्ली शोभाताईंनाही भीती वाटत असे, म्हणून सकाळीच त्या दोघी देवळात जात असत. त्याप्रमाणे वसंतरावांची नात आली. शोभाताई आताशा घरात फिरताना काठी वापरत असत, पण बाहेर जाताना बाकी त्या ती घेत नसत. त्याप्रमाणं त्या निघाल्या. “आमच्याकडं लॅचची किल्ली आहेच, आजोबा. येतोच आम्ही तासाभरात. तुम्ही काय करताय? ” वसंतरावांच्या नातीनं विचारलं. “काही नाही गं. टीव्ही बघतो जरा वेळ. या तुम्ही सावकाश.. ” वसंतराव म्हणाले. त्या दोघी गेल्या. फाटक लावून घेतल्याच ‘दण्ण’ असा आवाज आला आणि वसंतरावांनी शेजारचा टेलीफोन उचलला. थरथरत्या हाताने त्यांनी बरेच प्रयत्न करून मिळवलेला आणि त्याहूनही अधिक प्रयत्न करून लक्षात ठेवलेला नंबर फिरवला.
“नमस्कार. जनसंपर्क कार्यालय.. ” पलीकडच्या माणसाच्या आवाजातलं मार्दव वसंतरावांना सुखावून गेलं.
“नमस्कार. मी वसंत गणपुले बोलतोय.. ” वसंतराव म्हणाले. “माझं वय आता एकशे तीन आहे.. ” त्यांना थोडासा दम लागला होता.
“बोला, सर, बोला.. ” पलीकडच्या माणसाच्या आवाजात आता आदरही होता. ‘हे ‘सर’ म्हणणं बाकी फक्त आपल्या वयामुळं असावं’ वसंतरावांच्या मनात येऊन गेलं. त्यांनी घसा साफ केला.
“हे बघा, मला शंभर वर्षं पूर्ण झाली तेंव्हा मला मुख्यमंत्र्यांचा सहीचं अभिनंदनाचं पत्र आलं होतं.. ” ते म्हणाले.
“बरोबर, सर. आमच्याच कार्यालयाकडून आलं असणार ते. ”
“हं.. तर मला आता असं विचारायचंय की ही पद्धत तुम्ही बंद का केली? ”
“बंद? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर… अजूनही शंभरी पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आमच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र जातंच. ही पद्धत सुरू आहे, सर. ”
“बर. मग मला असं सांगा, की गेल्या आठवड्यात माझ्या पत्नीचा शंभरावा वाढदिवस झाला. तिला का नाही आलं हे मुख्यमंत्र्यांचं पत्र? ” वसंतरावांनी विचारलं
“असं होणार नाही, सर.. ” पलीकडचा माणूस गोंधळला असावा. “शंभरी पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे प्त्र जातं. इन फॅक्ट, ही पत्रं एक महिना आगोदर पाठवली जातात; वेळेवर मिळावी म्हणून .. ”
“मग हे पत्र कसं काय नाही आलं? ” वसंतरावांचा आवाज थोडासा चढला होता. शंभरी पूर्ण केलेल्या माणसाचा जितपत चढू शकेल तितपतच.
” एक मिनिट सर, मी चेक करतो. जरा आपल्या पत्नीचं नाव सांगता का प्लीज? ”
“शोभा वसंत गणपुले.. ” वसंतराव म्हणाले.
“एकच मिनिट हं सर, प्लीज होल्ड ऑन.. ” पलीकडच्या माणसानं फोन होल्ड मोडवर टाकला असावा. बासरीची सुरेल धून सुरू झाली. ‘भटियाळी.. पन्नालाल घोष’ वसंतरावांच्या मनात आलं. ‘सरकारी अभिरुची सुधारली म्हणावी का काय… ‘ ते भटियाळीत गुंगून गेले….
“हॅलो.. ” वसंतराव भानावर आले.
“हं, बोला.. ” ते म्हणाले.
“माफ करा हं सर, तुम्हाला थांबावं लागलं, पण आमची सिस्टीम जरा स्लो आहे आज… ” पलीकडचा माणूस म्हणाला.
“असू दे, बोला” वसंतराव म्हणाले.
“मिस्टर गणपुले, तुम्हाला माहिती असेल, की आमच्या खात्याकडं प्रत्येक व्यक्तीची खरीखुरी जन्मतारीख असते, अगदी पुराव्यासकट. आणि त्यानुसार वयाची शंभर वर्षं पूर्ण झाली, की आम्ही त्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या सहीचं अभिनंदनाचं पत्र पाठवतो.. ”
“बरोबर. मग? ”
“शोभा.. आपलं शोभाताई वसंतराव गणपुले, ‘श्रीकृपा’ बंगला, सहयोग सोसायटी, विद्यानगर .. या आपल्या पत्नी. बरोबर ना सर? ”
“होय. ” वसंतराव आता थोडेसे कंटाळल्यासारखे झाले होते.
” तर यांना त्यांच्या शंभरीनिमित्त अभिनंदनाचं पत्र गेलं आहे, सर. माझ्याकडे इथे नोंड आहे बघा, सर.. ”
“पत्र पाठवलं आहे म्हणता, तर मग ते आम्हाला मिळालं कसं नाही? ” वसंतराव आता फोन ठेवण्याच्या विचारात होते.
“असं असणार नाही, सर, असं होणार नाही. आमच्या इथे तशी नोंद आहे सर. पण.. तुम्ही म्हणताय की.. सर, आमच्याकडच्या नोंदीनुसार हे पत्र गेलं आहे सर एकोणीस नोव्हेंबरला. एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पाच. म्हणजे पाच वर्षांपूर्वी, सर.. ”
वसंतराव मिष्किलपणाने हसले. ‘थँक यू. थँक यू, व्हेरी मच…. ” त्यांनी फोन ठेवला. फाटकाचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून बाहेर बघितलं शोभाताई देवदर्शन आटोपून परत आल्या होत्या.

(जेफ्री आर्चर यांच्या ‘दी क्वीन्स बर्थडे टेलिग्राम’ या कथेचा स्वैर अनुवाद)

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

रेल्वे स्टेशन

नायक आणि नायिका यांची भेट. कधी अपघाताने, कधी गैरसमजातून, तरी कधी आणखी कशीतरी. कधी त्यांच्यातली किंचित भांडणे, वाद आणि मग त्यातूनच हळूहळू फुलत जाणारे प्रेम. या सगळ्यात कधी मध्ये असलेला सूक्ष्म खलनायक, तर कधी काळ आणि परिस्थिती यांनीच ओढलेल्या रेघा. समजूतदार नायक आणि हतबल नायिका यांनी परिस्थितीचा केलेला स्वीकार आणि शेवटी आगगाडीतून निघून जाणारे त्यांच्यापैकी कुणीतरी. शेवटच्या भेटीसाठी धावतपळत स्टेशनवर आलेले कुणीतरी आणि निघून जाणारी पाठमोरी आगगाडी.

हिंदी चित्रपटांचा एके काळी हा लाडका प्लॉट होता. अर्थात भारतीय प्रेक्षकाला ‘आणि मग राजा आणि राणी सुखाने नांदू लागली’ असा शेवट हवा असतो, त्यामुळे निघून गेलेल्या गाडीपलीकडे उभा असलेला नायक (मग त्याच्याकडे पाहून नायिकेच्या चेहऱ्यावर हास्य फुलणे) , किंवा गाडी निघून गेल्यानंतरही स्टेशनवर एका बाकड्यावर विमनस्कपणे बसलेली नायिका (नायकाने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवणे, तिने वर बघणे आणि तिच्या चेहऱ्यावर…इत्यादी इत्यादी ) , किंवा नायिकेला स्टेशनवर बघून नायकाने चालत्या गाडीतून उडी मारून परत येणे – बहुदा असा सुखांत त्याच्या पदरात पडतो. ‘तीसरी कसम’ सारखा एखादा अपवाद सोडला तर रेल्वे स्टेशन हे बहुदा नायक आणि नायिकेच्या मीलनाचे साक्षीदार बनून राहिले आहे. ‘तीसरी कसम’ ची बातच न्यारी पण त्यावर दुवा क्र. १ लिहून झाले आहे.

‘बंदिनी’ चे आणखी एक उदाहरण. शामळू नायकाच्या प्रतिमेतून बाहेर पडलेला अशोककुमार आणि नैसर्गिक अभिनयाची उपजत जाण असलेली नूतन यांनी हा प्रसंग सुरेख फुलवला आहे. ‘मेरे साजन है उस पार’ ला तर जगात तोड नाही. कृष्णधवल चित्रीकरणाचे स्वतःचे एक बलस्थान आहे. जुने कोळशाचे इंजीन, वाफेचे आणि धुराचे भपकारे, रात्र याला कृष्णधवल चित्रीकरणाने एक वेगळी ‘डायमेन्शन’ – मिती येते. ‘प्यासा’, ‘जागते रहो’, ‘देवदास’ अशी या संदर्भात आठवणारी काही उदाहरणे. बंदिनीमधला हा अंधाऱ्या जागेत चित्रीत केलेला प्रसंग आणि त्याला साक्षीदार ते रेल्वे स्टेशन ही एक सुंदर आठवण आहे. आता बिमलदा नाहीत, दादामुनी नाहीत, शैलेंद्र नाही, सचिनदा नाहीत आणि नूतनही नाही. त्यामुळे जराशी हळवी वाटणारी ही आठवण.

‘परिचय’ हे पुढचे उदाहरण. ‘साउंड ऑफ म्युझिक’ पासून प्रेरणा वगैरे सोडून द्या. रमाचे रवीवरचे प्रेम अगदी शेवटच्या क्षणी कळाल्यानंतर तिला घेऊन रवीला शोधण्यासाठी स्टेशनवर धावपळ करणारे रायसाहब. (प्राणचा माझ्या मते सर्वोत्कृष्ट परफॉरमन्स. अगदी जवळचा स्पर्धक म्हणजे ‘बॉबी’. ‘पूरब और पश्चिम’ ला कांस्यपदक. अर्थात ही वैयक्तिक मते.) . रवीला सोडायला आलेले किंचित बहिरे रवीचे मामा. एकही शब्द न बोलता केवळ डोळ्यांतून तगमग दाखवणारी रमा – जया भादुरी आणि अगदी शेवटच्या क्षणी चालत्या गाडीतून उडी मारणारा रवी जीतेंद्र. तो गुलजारच्या सिनेमातला साधासुधा नायक असल्याने तो गाडीतून उडी मारल्यावर थेट गाणे सुरू न करता लंगडून पडतो. मग त्याला आधार देऊन उठवणारी रमा. आणि केवळ गुलजारच लिहू शकेल असा रायसाहेबांनी मामा हंगलजींना म्हटलेला “पंडीतजी, बुजुर्गी इसी में है के हम लोग अब यहां से चले” हा संवाद.

‘परिचय’ चे हेच वैशिष्ट्य आहे. त्या काळात उत्तमोत्तम हिंदी चित्रपट आले, पण ‘परिचय’ ची एक खास जागा आहे. त्यातल्या बाल कलाकारांकडून करवून घेतलेला सहजसुंदर अभिनय ( हे मला वाटते, संपूर्णपणे दिग्दर्शकाचे कौशल्य आहे. ‘मासूम’ हे आणखी एक उदाहरण), ‘नारायण’ सारख्या साध्या घरगड्याच्या पात्राला असरानीने दिलेली उंची, संजीवकुमारने (आणि विनोद खन्नाने) छोट्याशा भूमिकेत पाडलेली खोल छाप, ए. के. हंगल आणि लीला मिश्रासारखे आपल्याला असावेत असे वाटणारे मामा-मामी , (लीला मिश्राला तर तोडच नाही. पदर सावरण्यासारख्या साध्या गोष्टीतून ती अभिनेत्री दुर्गाबाईंसारखे एक खानदानी वातावरण पडद्यावर तयार करते. शिवाय हाताशी गुलजारचे संवाद आहेत. जागेवर जेवणाचे ताट मागणाऱ्या नवऱ्याला ‘अंग्रेज चले गये, इन्हें छोड गये’ हा तिचा फणकारा कुठल्याही पन्नास-साठ वर्षे एकत्र नांदलेल्या जोडप्याची आठवण करून देतो! ) गाण्यांचा अप्रतिम वापर (मुसाफिर हूं यारो, सारे के सारे आणि अविस्मरणीय बीती ना बितायी रैना), सुरेख संगीत (रवीने नीलेशच्या खोलीत बसून वाजवलेला सतारीचा सुंदर तुकडा आठवा! ) आणि जया भादुरी व प्राण. या सुगरणीच्या ताटात अंमळ मीठ कमी पडलेला जीतेंद्र सहज चालून जातो. चालत्या गाडीतून उडी मारल्याने पाय दुखावलेला जीतेंद्र जया भादुरीच्या आधाराने विव्हळत पण हसतहसत रेल्वे स्टेशनच्या बाहेर पदतो आणि त्या फ्रेमवर फ्रीझ होऊन हा सिनेमा संपतो.

अगदी असेच ‘चितचोर’ मध्येही घडते. इथे बाकी नायक अमोल पालेकर आणि नायिका झरीना वहाब यांच्यामध्ये आलेला विजयेंद्र घाटगे नावाचा एक सुगंधित खोडरबराचा तुकडा आहे. बाकी हंगलबाबू आणि मास्टर राजू इथेही आहेतच, आणि तितक्याच झोकात आहेत. लीला मिश्राच्या जागेवर तिची नवी आवृत्ती दीना पाठक आहे – तितकीच दिलखुलास आणि नैसर्गिक. मराठीत जशी सुलोचना, रत्नमाला, शांता तांबे अशा गुणी अभिनेत्रींची मालिका आहे, तशा हिंदीतल्या दुर्गा खोटे, दुलारी (एखाद्या प्रसंगातही जिंकून जाणारी – उदा. ‘दीवार’. तेथे तर समोर शशीकपूरसारखे युकॅलिप्टसचे झाड आहे. ‘इतनी बडी शिक्षा एक टीचरके घरसेही मिल सकती है’.बाजूला हंगल नावाचे लिंबाचे लोणचे आहेच! ‘भई मै म्युनिसिपल टीचर था, पिछले साल रिटायर हुवा हूं, अब कुछ ट्यूशन व्यूशन कर लेता हूं’, दुलारीचे दुसरे उदाहरण ‘जॉनी मेरा नाम’ मधले), सुलोचना, लीला मिश्रा आणि दीना पाठक या अभिनेत्री. मला वाटते, या अभिनेत्र्यांना दिग्दर्शकाने ‘या सीनला तुम्ही अमुक असे करा’ असे काही सांगावे लागत नसावे. त्यांची नैसर्गिक शैलीच इतकी लोभस आहे, की दिग्दर्शकाला फक्त त्यांना प्रसंगाची सिच्युएशन काय आहे, इतकेच सांगावे लागत असावे.

संपूर्ण चित्रपटात नायकाने नायिकेला स्पर्शही न करणे (चूभूदेघे) , संपूर्ण चित्रपटभर नायिका अंगभर साडीत आणि नायक चक्क बुशकोट-पँटमध्ये- तोही शर्ट पँटमध्ये न खोचता बाहेर सोडलेला, आणि नायक हा चक्क बावळट वाटणारा (अमोल पालेकरने आपण ओव्हरऍक्टिंगही करू शकतो हे इथे दाखवून दिले आहे) असली सगळी वजाबाकी घेऊनही ‘चितचोर’ हा सदा तरुण, ताजा चित्रपट आहे. राजश्री प्रॉडक्शनचे पुढे ‘हम साथ साथ है’ सारखे देवानंदी भजे झाले ते सोडून द्या, पण ‘चितचोर’ आजही सदासुहागन आहे. ‘चितचोर’ मधली गाणी आणि त्या गाण्यांचे चित्रीकरण हे एक आनंदाचे सुगंधी बेट आहे.पण त्यांविषयी काही लिहू नये. या ‘चितचोर’ मध्ये रेल्वे स्टेशन येते ते कपाळावर एखादी आठी उमटवण्यापुरते. हताश नायिका नायकाला शोधायला स्टेशनवर जाते तेही तिच्या साताठ वर्षांच्या छोट्या दोस्ताला बरोबर घेऊन. इथे दिग्दर्शकाच्या निरिक्षणाला एक सलाम केला पाहिजे. मानसिक खळबळ उडालेल्या या तरुणीला आधार वाटतो तो तिच्या लहान मित्राचा. हा छोटा मुलगा तिला मदत काय करणार? पण ‘एक रुका हुवा फैसला’ मधील अनू कपूरच्या शब्दांत म्हणायचे तर ‘औरतोंकी फितरतही कुछ और होती है’ त्या वेळी तिला हा लहान आधारही महत्त्वाचा वाटतो. स्त्रीमनाचे इतके अचूक वाचन करणाऱ्या दिग्दर्शकाचे कौतुक आहे. हताश नायिका स्टेशनवरून घरी येते तेंव्हा तिचा चितचोर तिची वाट बघत असतो. इथे चित्रपट संपतो.

हृषीदांच्या ‘खूबसूरत’ मध्ये उलटे घडते. निघून जाणारी नायिका आणि तिला स्टेशनवर शोधायला आलेला नायक आणि त्याची आई. दीनाजी आणि अशोककुमार हे ‘खूबसूरत’ चे आधारस्तंभ. अशोककुमार हे तर ‘खूबसूरत’ चे ‘युनिक सेलिंग प्रपोझिशन’ आहे. डायनिंग टेबलवर काफिया जुळवताना बायकोची चाहूल लागून चूप होणारा हा बुजुर्ग ‘पिया बावरी’ मध्ये सुनेच्या नृत्याला ‘धा तिकता, ता धिक ता’ असा सुरेल ठेकाही धरतो. या सगळ्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य पहा, यात दुय्यम भूमिका करणारे कलाकारही आपापले सीन खाऊन जातात. उदाहरणार्थ ‘खूबसूरत’ मधले डेव्हिड आणि केस्टो मुखर्जी. तसेच रेखाच्या बहिणीच्या लग्नात मध्यस्थी करणारा दादामुनींचा मित्र आणि राकेश रोशनच्या लग्नासाठी मध्यस्थी करणारा त्याचा मित्र. हे एकदोन प्रसंगाचे धनी, पण ते प्रसंग आणि हे अभिनेते लक्षात राहातात. मग ‘खूबसूरत’ मध्ये रेखा ही राकेश रोशनची मोठी बहीण वाटते आणि राकेश रोशन हा स्वतःचाच मादाम तूसाँ म्यूझियममधला पुतळा वाटतो, या गोष्टी खटकत नाहीत. रेल्वे स्टेशनवरील शेवटच्या प्रसंगाबरोबर ‘खूबसूरत’ मधली अशोककुमार – दीना पाठक यांची अदाकारी लक्षात राहाते आणि ‘संगीत में तो ये कमाल है, और नृत्यमें तो… कमाल अमरोही’ असे गंमतीदार संवाद लक्षात राहातात.

असे हे रेल्वे स्टेशनवरचे हिंदी चित्रपटांचे शेवट. ‘अंगूर’ चा गमतीदार शेवटही रेल्वे स्टेशनवर होतो. ‘इजाजत’ हा तर सगळा सिनेमाच रेल्वे स्टेशनवर घडतो. पण वेगवेगळ्या चित्रपटांत, वेगवेगळ्या प्रसंगांत सुखदुःखाचे साक्षीदार बनून राहाते एक साधेसे रेल्वे स्टेशन.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

हॉटेलात आलेली माणसं-१

प्रास्तविकः मुक्तसुनितांच्या ‘बने, बने’ च्या पुढील भागांची अनंत काळापर्यंत वाट पाहून त्यांच्या या उत्तम लेखमालेचा अकाली आणि अपघाती मृत्यू झाला असावा या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. प्रच्छन्न प्रतिभेच्या प्रसन्न उन्मेषावर असा कालौघाचा घाव पडावा यामुळे मनचंद्रम्यावर काळिम्याचे दाट धुके दाटून आले. (मुक्तसुनितांचे नुसते नाव जरी घेतले तरी भाषेचे काय भजे होते ते पहा!) त्यामुळे त्यांच्या ‘बनी’ प्रमाणे आम्हाला नाईलाजाने आमच्या मानसपुत्राला – हणम्याला- कण्हतकुथत जन्म द्यावा लागला. हणम्याने एका हातात आमचे बोट धरुन (आणि दुसर्‍या हाताने आपली ढुंगणावरची घसरणारी चड्डी सावरत – लिखाणाच्या पहिल्या परिच्छेदात असला एखादा शब्द असला की लिखाणाला – ‘सत्यकथे’च्या भाषेत सांगायचे तर – ‘टोक’ येते म्हणे!) आमचा हणम्या आमच्याबरोबर मिसळीच्या हॉटेलात आला त्याची ही कथा आहे. या लिखाणातला आमचा हणम्या तर काल्पनिक आहेच, पण खुद्द आम्हीदेखील फारसे अस्सल नाही. इतर पात्रे आणि संकेतस्थळावरील काही खर्‍याखुर्‍या व्यक्ती यांच्यांत काही साधर्म्य आढळल्यास तो – वेल, योगायोगच समजावा!)

“हणम्या, सांभाळून, नाहीतर पडशील गाढवा वेंधळ्यासारखा! हंगाश्शी! आलास का आत? तर हेच आपले ते जगप्रसिद्ध हॉटेल बरे! बघ कसा झगमगाट आहे, कशी गर्दी आहे ते! असा दणका उडवून द्यावा लागतो, काय समजलास! आणि ते गल्ल्यावर बसलेले मालक बघितलेस का? काय? काय म्हणालास? गबदुल?च च च … तुला अगदीच रे कसे व्यवहारज्ञान नाही? गुटगुटीत म्हणावे हणम्या! शब्द हे शस्त्र असते. ते सांभाळून वापरावे. कर, नमस्कार कर मालकांना. कशाला? अरे इथली पद्धत आहे तशी. हा मालक बाकी राजा माणूस आहे बरं का. श्शू… नको तेथे डोके चालते तुझे! ज्या हॉटेलात जाईन तिथे मी हेच म्हणत असतो हे आत्ताच कशाला आठवायला पाहिजे तुला? गप्प बस बघू. तर मी काय सांगत होतो, माणूस अगदी लाखात एक. बुधवार – शनिवार तर दहा लाखात एक. शास्त्रीय संगीतातला अगदी तज्ज्ञ आहे बरे! काय? असे कोण म्हणते? अरे, कोण म्हणजे काय गाढवा? खुद्द मालकच म्हणतात तसे! तुला नाही का पटत? सांगू का एखादी यमनातली चीज म्हणायला? काय म्हणालास? त्यापेक्षा मी म्हणतो त्यावर विश्वास ठेवलेला बरे? हम्म. आलास म्हणायचा लायनीवर. चल , पुढे चल बघू.
हे बघ, इथे ओळीने बसले आहेत ना ते मालकांचे भालदार-चोपदार. अरे, इतक्या महत्वाच्या हॉटेलाची राखण करायची म्हणजे रखवाली नको का करायला? बरेच आहेत तसे, पण तूर्त दोघांचीच ओळख करुन देतो तुला. हे पहिले. अरे, घाबरु नको हणम्या! चष्म्याच्या वरुन बघत बोलायची सवय आहे त्यांना, त्यात भ्यायचं काय? हे इथले जुने-जाणते बरं का? नाव? नावात काय आहे? आणि मी नाव सांगितलं की तू म्हणायचास की मालकांनी आपल्या गोतावळ्यातल्या आडनावबंधूंचीच वर्णी लावली आहे म्हणून! तर नाव जाऊ दे! हा पाहिलास का त्यांच्या हातातला हातोडा. कशाला? अरे, कवितांची तोडफोड करायला उपयोगी पडतो तो! पाहिलास कसा वजनदार आहे तो. हां, आता गंज चढलाय त्यावर थोडा, पण एखादी परदेशवारी घडली की कल्हई करुन आणतील ते त्याला. काय? त्यांच्या हाताशी असलेले कागद? कविता असतील म्हणतोस त्या? वेडा रे वेडा! अरे, ते कागद आहेत राजिनाम्यचे! ‘सोडतो, सोडून चाललो, संबंध संपले’ असे अधूनमधून म्हणावे लागते हणम्या! त्याशिवाय आपले वजन कसे वाढणार? बघीतलंस का किती वजन वाढलं आहे ते! जग हे असे आहे बघ हणम्या! अजून बच्चा आहेस बघ तू हणम्या!
चला पुढे. हे दुसरे. काय? काय म्हणालास? यांच्या चेहर्‍यावरची रया अशी गेलेली का? आता काय सांगू तुला हणम्या! ही फार मोठी कथा आहे. सांगतोच तुला. एकदा काय झाले , रखुमाईला पंढरीत कोणी विचारेना बरं का. मग तिला आला राग. गेली मग ती फणफणत विठोबाकडे आणि म्हणली, ‘पंढरीनाथा, झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठठला’. विठोबा आपला भोळा. तो म्हणाला, ‘तु पूडे हो रकुमाई, मि एतोच..’ अरे, अरे उच्चार म्हणजे काय? हा सगळा सुद्द्लेखनाचा मामला आहे. पण ते जाऊ दे. मग विठोबा आपले सगळे चंबूगबाळे आवरून एकनाथांना, नामदेवबुवांना ‘अमुचा रामराम घ्यावा’ वगैरे म्हणून आले. आणि आता बघतात तर काय! रुकमाबाई आपली पुन्हा ‘शंकरा’च्या दरबारात रमलेली. तीही आपल्या खर्‍याखुर्‍या रुपासकट बरं का! मग काय करणार बिचारा विठोबा? कुठे जाणार तो? मग त्याच्या तोंडावरची रया जाणारच की! काय, आले का ध्यानात?
बघ, कसा भराभर हात चालतो आहे या दुसर्‍यांचा. काहीतरी माहितीप्रद लिहीत असतील म्हणतोस? छे रे! ‘माहितीची देवाणघेवाण’ म्हटली की थरकाप उडतो बिचार्‍यांचा. ते ना, बसल्याबसल्या नवनव्या स्वाक्षर्‍यांची प्रॅक्टीस करत आहेत. काय करणार बिचारे! स्वतःची अशी फक्त स्वाक्षरीच जमते त्यांना. जाऊ दे, जाऊ दे, त्या स्वाक्षरीतल्या शुद्धलेखनाच्या चुका काढत बसलास तर रात्र होईल इथेच. चल पुढे जाऊ.
हा ताटभर मिसळ समोर घेऊन बसलेला नरपुंगव पाहिलास का? हा आपल्या भीमाचा फिरंगी अवतार बरं का! काय! जेन? तीही मिळेल की त्याला एखादी. हा आपल्या हॉटेलाचा जाणकार बरं का! अगदी ‘पॅसिफिक’ महासागराइतके ज्ञान आहे त्याला. बघ त्याचे बाहू कसे फुरफुरताहेत, बघ त्यांच्या मांडीचे पट कसे वळताहेत, आणि गर्दन तर एखाद्या खोंडासारखी आहे, नाही का? गाणं? कुठल? गाणं आठवलं बुवा तुला? ‘मासूम’ मधलं कुठलं गाणं? आणि त्यात काय स्वतःचे शब्द घातलेस तू? काय? ‘बहुत खूबसूरत है ये बॉडी लेकिन अगर ब्रेन भी होता तो क्या बात होती’.. श्शू… चूप अगदी. एका फटक्यासरशी होत्याचा नव्हता करुन टाकेल तो तुला. गप्प बस अगदी. चल पुढे.
हे पहा आपल्या कपाळावर चार वैचारिक आठ्या चढवून बसलेले मिसळीचे ‘भक्त’. वैचारिकतेचे हे सम्राट बरं का. इतके की जगात कोण वैचारिक आहे आणि कोण सामान्य हे त्यांना म्हणे नुसत्या नजरेने समजते. त्यांच्याभोवतीची ती ‘वर्तुळा’कार आभा पाहिलीस का? जपून हो हणम्या. हळूच त्यांच्या मागून त्यांना वळसा घालून आपण पुढे जाऊ. काय म्हणालास? लाथ मारतील? अरे, ते चालेल एकवेळ. त्यांच्या मागून गेलो तर लाथ मारतील, पुढून गेलो तर मात्र… जाऊ दे. असल्या गुदगुल्या तुला न कळालेल्याच बर्‍या.
काय म्हणालास? पाय दुखायला लागले. बरं बसूया थोडा वेळ. जरा वेळाने इतरांशीही परिचय करुन देईन हो तुझा. भूक ना? मलाही लागली आहेच. काय मागवू? मिसळ?”

Uncategorized में प्रकाशित किया गया | 3 टिप्पणियां

लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे

“लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन.” सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला.
“भलतंसलतं म्हणजे?”
“म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश सरकारवर नाराज झाल्या वगैरे..”
“अरे,मग ते खरं नाही का? पेपरमध्ये छापून आलंय तसं…”
“कुठल्या पेपरमध्ये? सकाळमध्ये? सकाळवर किमान तू तरी विश्वास ठेऊ नयेस” तो धूर सोडत म्हणाला.
“फक्त सकाळमध्ये नाही. बर्‍याच पेपरांत आलंय. बरं ते जाऊ दे. त्या अमिन सायानींना दिलेल्या मुलाखतीचं काय?
“काय त्याचं?”
“काय म्हणजे … त्यात लताबाई म्हणतात की.. म्हणजे एकीकडे म्हणतात की… की थोरले बर्मनदा मला वडिलांच्या ठिकाणी होते आणि दुसरीकडे म्हणतात की बर्मनदांनी एक गाणं पुन्हा रेकॉर्ड करायला पाहिजे म्हटल्यावर आमचे गैरसमज झाले आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही कोण माझ्याबरोबर काम करायला नकार देणारे. मीच तुमच्याबरोबर काम करत नाही ज्जा..”
“मग त्यात काय एवढं? तसं झालंसुद्धा असेल..”
“अरे मग नंतर ‘आता आर्डीला लाँच करायच्या वेळी आलात की नाही झकत पाय धरायला..’ हा माज कशाला?”
“माज? माज तुझ्या मते. माज? आम्ही याला स्वाभिमान म्हणतो. सेल्फ रिस्पेक्ट. एस्टीम. माज? ‘नुसती मराठी येता कामा नये, तो जन्माने मराठी असला पाहिजे’ असं परवा राजाभाऊ म्हणाले त्यालाही तू माजच म्हणशील. हा माज नव्हे. हा अभिमान. अस्मिता. हाच तो मराठी बाणा..”
“हां, हे चांगलं आहे. म्हणजे हा बाणा तुम्ही आपापल्यात भांडायला वापरणार म्हणा की.”
“बर्मनदा कुठे मराठी होते?” त्याने एक प्रश्नार्थक झुरका घेतला.
“च्च… अरे मराठी- अमराठी नाही रे. संगीताच्या क्षेत्राविषयी म्हणतोय मी. ‘तुम्ही असाल एवढे थोर, ज्येष्ठ संगीतकार वगैरे, पण शेवटी माझ्यासमोर झुकलातच की नाही’ हा तुझ्या मते बाणेदारपणा काय?’
“ऑफ कोर्स. आणि समजा असला माज तर असू दे. मी म्हणतो लताबाईंनी करावाच एवढा माज. तो शोभूनही दिसतो त्यांना. त्यांनी माज नाही करायचा तर काय अमरसिंगांनी करायचा?”
“हम्म. आता तू म्हणशील की आण्णा चितळकरांबाबत लताबाईंनी केलं तोही स्वाभिमानच. सेल्फ रिस्पेक्ट.”
“काय केलं आण्णांबाबत?”
“हेच की आण्णांचा कोणता तरी रेकॉर्डिस्ट होता. तो म्हणे लताबाईंबद्दल काहीतरी बोलला. लताबाई मग आण्णांना म्हणाल्या की त्याला काढून टाका, तरच मी गाणार. आण्णा म्हणाले की बाई, हा माझा जुना सहकारी आहे. त्याला काढून टाकणं काही मला जमणार नाही. मग लताबाई म्हणाल्या की… तेच रे!! II धॄII असं म्हणूया आपण फार तर. बाईंनी गायचं थांबवलं आण्णांबरोबर. मग ‘ऐ मेरे वतन के लोगों’ च्या वेळी आण्णा पाय धरायला आले आणि बाई फणकारुन म्हणाल्या की आणंच्याबरोबर गाणं? मी नाही ज्जा! दिल्लीला तालमी? मी नाही ज्जा! शेवटी गीतकार प्रदीप हात जोडून म्हणाले की बाई, तुम्ही हे गाणं गायलं नाही तर हे गाणं तसंच पडून राहील बरं का. मग बाईंनी आपला जरतारी पदर सावरला आणि एक समाजकल्याण खात्यासारखा निश्वास टाकून म्हणाल्या की बरं येते बाई. मग बाई दिल्लीला गेल्या, त्यांनी ते गाणं पंडीतजींसमोर म्हटलं आणि पंडीतजी….”
“पुरे, पुरे. II धॄII II धॄII II धॄII …. पण महाशय, हाही कणखर मर्‍हाटी बाणाच. अगदी आण्णाही मराठी असले म्हणून काय झालं? ते कितीही थोर संगीतकार असले म्हणून काय? ”
“खरं आहे. ‘मुझपे इल्जाम-ए-बेवफाई है, बेचैन नजर आणि तुम अपनी याद भी दिलसे मिटा जाते तो अच्छा था’ ही सगळी रत्नं त्यांनी एकाच सिनेमात दिलेली असली म्हणून काय झालं? ‘अनारकली’ ला लताबाईंचा आवाज त्यांनी अजरामर केला असला म्हणून काय झालं? आणि पंडीतजींसमोर जेंव्हा हे गाणं बाईंनी गायलं तेंव्हा संगीतकाराचा उल्लेख करायला दिलीपकुमार सोयीस्करपणे विसरला म्हणून काय झालं असंच ना??”
“गुरुवर्य,…” त्यानं शेवटचा झुरका घेऊन सिगारेट रक्षापात्रात विझवली. “कुजकटपणा नको. बोलायचा मुद्दे सुचले नाही की माणूस असा तिरक्यात शिरतो. आण्ण्णा माझेही आवडते. पण म्हणून त्यांनी काय लताबाईंबरोबर पंगा घ्यायचा?”
“पंगा… घाणेरडा पण अगदी बरोबर शब्द वापरलात महाराज. पंगा. शिवसेनट पंगा. म्हणजे आपल्याला पाहिजे ते झालं नाही की घ्यायचं वैर. वर्चस्व. वर्चस्व की लडाई. ‘सहर’ मध्ये अर्शद वारसीची आई झालेली सुहासिनी मुळ्ये सांगते तशी अनकंडीशनल पॉवर. आणि आम्ही पामर असं समजत होतो की कलेच्या पवित्र वगैरे क्षेत्रात असलं काही राजकारण असत नाही. असू नये. ‘मेरी तो सारी दुनिया घूम फिर के अनिलदाके पास आती है ‘ म्हणणारा तलत आणि ‘ ये तो तलतका बडप्पन है, मैं तो एक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं’ असं म्हणणारे अनिलदा हे आमचे आदर्श.’विद्येप्रमाणेच कलाही विनयानं शोभते असले आमचे बुरसटलेले समज. आम्हाला असली पंग्याची भाषा कशी कळणार, सरकार?”
“व्वा. शब्द अगदी शेणखतात बुडवून ठेवल्यासारखे कुजके वापरलेत साहेब. बट राईट. म्हणून तुमच्या तलतला सत्तरीनंतर एकही गाणं मिळालं नाही आणि अनिल विश्वास दिल्लीत मेला तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला दहा माणसंसुद्धा नव्हती. लताबाई बघ. आजही त्या जिथं पाऊल ठेवतील, लोग वहांकी मिट्टी चूमनेको तैयार है…”
“ओहोहो. आहाहा. एहेहे…. हे आमच्या ध्यानातच आलं नाही बृहस्पती. शेवटी तुम्ही याच फूटपट्टीनं मोजणार नाही का सगळं! रफीसारखा सरळ माणूस लताबाईंच्या या वर्चस्वाला आव्हान देतो तेंव्हा लताबाई हेच करतात, अं? काये ते तुमच्या भाषेत? हां, पंगा. सुमन कल्याणपूरला तुम्ही कुजवलंत का? या प्रश्नावर लताबाई म्हणतात की मी कुजवणारी कोण? संगीतकारच म्हणायचे की आमच्याकडं ओरिजीनल लता आहे, तर आम्ही लताची नक्कल कशाला घेऊ? पंगा. आशाचं काय म्हटल्यावर बाई म्हणणार की आशाचं काही नव्हतं हो इतकं, पण ते भोसलेसाहेब होते ना, ते फार दुष्ट होते. पण ते गेले बघा अकाली. अरेरे, फार वाईट झालं हो. पण त्यानंतर आता सग्गळं सुरळीत झालं आहे. पंगा, अं?”
“चष्मा बदला शहजादे, चष्मा बदला. तुम्हाला बासुंदीत मिठाची कणी टाकायची एवढी हौस असेल तर दुसरीकडे जा. लताबाईंविषयी असलं काहीबाही आम्ही तरी ऐकून घेणार नाही.” त्याने नवी सिगारेट पेटवली.
“तुम्ही असं बोलणार हे माहीतच होतं राजाधिराज. घाऊक प्रेम आणि घाऊक तिटकारा करणारे तुम्ही. तुम्हाला असली वस्तुनिष्ठता कशी पटणार? पण ध्यानात ठेवा आचार्य, एखादा ओंकारप्रसाद नय्यर निघतो. दशकातून एकदा निघतो, पण निघतो. आणि तो अशा माज करणार्‍यांना.. ओहो, चुकलो, अशा बाणेदारांना आपली जागा दाखवून देतो. ‘तू नही और सही, और नही और सही’ असं म्हणून जातो. पंगा घेणार्‍यांबरोबर तसाच पंगा घेतो…”
“ते मला काही माहिती नाही पण लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन.” सिगारेट ओढणारा माझा मित्र पुन्हा म्हणाला.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 20 टिप्पणियां

माझे खाद्य-पेय जीवन-३

‘भूक लागली की खाणे ही प्रकृती, आपल्यातले अर्धे दुसर्‍याला देणे ही संस्कृती आणि भूक नसताना खाणे ही विकृती’ अशा चमत्कृतीजन्य फालतू सुभाषितांनी इतिहास भरलेला आहे.पोटभर नाश्ता केला की ‘सलाड आणि ग्लासभर ताक’ असले हलकेफुलके जेवण करावे हे पथ्यकर वाक्य डोळ्याआड करावे आणि दुपारचे अस्सल म्हराटी जेवण घ्यावे. दुपारचे जेवण अंगावर येऊ नये हे खरे, पण म्हणून दुपारी अर्धपोटी राहाणे हेही काही खरे नाही. आठवडाभर कचेरीत घाम गाळून कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळवले की रविवारी दुपारी चाखतमाखत जेवायला आपण रिकामे होतो. शनिवारी रात्री पार्टी व्हावी आणि रविवारी दुपारी मेजवानी. रविवारी दुपारी सुस्ती उतरली की मग क्यालरीबिलरीजचा विचार सुरु करावा. त्यामुळे रविवारचे दुपारचे जेवण याला केवळ शनिवारचे पापक्षालन इतकेच अस्तित्व असू नये. इथे मग मुख्य कलाकार म्हणून भाकरी की चपाती हा वाद संभवत नाही. चपाती किंवा भाकरी, भाजी, वरण किंवा आमटी, कोशिंबीर आणि भात हे दुपारचे जेवण जमून जाते. ‘पोळी’ ही अ‍ॅनिमिक भाजीबरोबर डब्यातून न्यायची सोय आहे, तर चपाती ही मांडी घालून बडवायची हौस आहे. बाकी ही चपाती आपल्या काकांसारखी. सदैव बेरजेचे गणित मांडणारी. तूप घातलेल्या काकवीबरोबर संसार मांडणारी, तशीच भाजी – मटण- चिकन यांच्याबरोबरही जमून जाणारी. दुपारच्या जेवणात जाडसर खरपूस डागाच्या चपातीवर तूप असावे. एकवेळ तूप नसले तरी चालेल, पण चपातीबरोबर दमदार चवीची भाजी पाहिजे. बटाट्याची डोसाभाजी डोशात कितीही चविष्ट लागत असली तरी दुपारच्या जेवणात चपातीबरोबर आली की ती थकलेल्या गृहीणीची आयत्या वेळची तडजोड वाटते. एकंदरीतच बटाटा हे फसलेल्या स्वयंपाक नियोजनाचे द्योतक आहे. ज्यांना होस्टेल आणि मेस हे शब्द परिचयाचे आहेत, त्यांना बटाटा हा जिन्नस काही दु:खद दिवसांची याद दिलवून जातो. कोबी- फ्लॉवर हेही शहरी संस्कृतीचा आब राखून जगणारे गृहस्थ. बटाट्याच्या रसभाजीत फ्लॉवर खपून जातो खरा, पण तोही धर्मांतर करुन पवित्र झाल्यासारखा. भाजी खरी असावी ती देशीच. ‘भाजीत भाजी मेथीची, अमकी माझ्या प्रीतीची’ हे काही नाव घेण्यापुरतेच नाही. पीठ पेरुन केलेली मेथीची गोळाभाजी प्रसंगी अंडा बुर्जीला अस्मान दाखवून जाते.
‘मला पालेभाजी आवडत नाही’ असे अभिमानाने सांगणार्‍याला आपण दयेशिवाय काय देऊ शकतो? मेथी, पालक, राजगिरा, चाकवत यांच्या गोळाभाज्या असोत की रसभाज्या, त्यांना एक दणकेबाज मराठी चव असते. अर्थात पालेभाजीने रसना उत्तेजितच नव्हे तर तृप्त व्हायला करणारीचा (किंवा गणपासारख्या करणार्‍याचा) हात सुगरणीचा पाहिजे. पालेभाजी म्हणजे ‘मिनरल्स आणि फायबर्स’ डोळ्यासमोर ठेवून केलेली तडजोड नव्हे. ते शाकाहाराचे एक स्वतंत्र मानचिन्ह आहे. बाकी पालेभाजी भाकरीबरोबर जशी लागते, तशी चपातीबरोबर लागत नाही. भाकरी- मग ती ज्वारीची असो, बाजरीची असो, की तांदळाची – ती पालेभाजीला मस्त साथ देऊन जाते. बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, लेकुरवाळी भाजी, लोणी आणि ताजे ताक यासाठी आल्हाददायक हिवाळा संपवून रखरखीत उन्हाळ्याची चाहूल देणारी संक्रांतही चालेल असे वाटते .त्या मानाने अंबाडी, चुका, शेपू, अळू या दुय्यम समजल्या जाणार्‍या पालेभाज्या. अळू तर पात्रता फेरीतून एकदम फायनललाच जावे तसा श्राद्धापक्षांतून एकदम लग्नाच्या पंगतीतच जाऊन बसला आहे. पण पुणेरी अळूचे जोशींच्या वड्यांसारखे जरा अवास्तवच कौतुक झाले आहे. सुक्या खोबर्‍याचे तुलडे घालून केलेले अळूचे फतफते भाताबरोबर लागते बरे, पण दणकेबाज पालेभाजीची गंमत त्यात नाही. कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी आणि तव्यावरुन डायरेक्ट पानात आलेली भाकरी हे कसे न मोजता खायचे काम आहे. सोबत शेंगदाण्याची जाडसर वाटलेली चटणी असली तर क्या कहने!
फळभाज्यांमध्ये बटाटा, कोबी आणि फ्लॉवर हे सपक फिरंगी तिरंगी सोडले तर इतर भाज्या डोंबारणीच्या उफाड्याच्या पोरीसारखे ‘उम्फ’ घेऊन येतात. भरल्या वांग्याची शेंगदाण्याचे कूट, काळा मसाला, कांदा, कोथिंबीर, मीठ, गूळ आणि लालभडक तिखट घालून केलेली भरली भाजी एखाद्या आजारी माणसाचीही वासना चाळवून जाईल. घाटावर ब्राह्मणेतर कुटुंबांत वांग्याची अशी भाजी वांग्याच्या देठांसकट करतात. या भाजीत गूळ नसतो आणि मसाल्याचे तिखट कंजूषी न करता पडलेले असते. त्यातले ते शिजलेले आणि मसाल्यात मुरलेले देठही एक वेगळी चव देऊन जाते. दोडक्याला ‘करोगेटेड बॉक्स’ म्हणून हिणवणार्‍या पुळचट नागर जनांकडे येशू ख्रिस्ताच्या भूमिकेतून पाहावे. दोडक्याच्या शिरांच्या चटणीच्या कौतुकात मूळ देशी दोडक्याचे मूल्यमापन हरवले आहे. वांग्यासारखीच दोडक्याचीही भरुन भाजी करावी. बेताच्या रसात बेताचीच शिजलेली ही मसालेदार भाजी चवीने खाणार्‍याला ‘त्या’ देणार्‍यानेच ‘टेस्ट बडस’ चे एक जादा पाकिट दिलेले असते. चवीने खाणारा अशा चटकदार भाजीत मटण मसाल्याचे रुप बघतो. अशीच वंचना गवार आणि पडवळाच्या वाट्याला येते. गवारीची शेंगदाणे घालून केलेली सुकी भाजी किंवा गोळे घालून केलेली रसभाजी यांना तोड नाही. गवारीच्या जोडीलाच विविध प्रकारच्या शेंगा येतात. श्रावणघेवड्यापासून फरसबीपर्यंत या शेंगाचे विविध प्रकार अगदी मंडईत खरेदीला गेल्यापासून आल्हाद देणारे. ‘तूपघेवडा’ नावाचा एक घेवड्याचा गावठी प्रकार असतो, त्याची तुपकट भाजी आता फक्त आठवणीत राहिली आहे. शेंगांच्या उल्लेखाबरोबर आठवते ते शेवग्याचे नाव. शेवग्याच्या शेंगा म्हणे औषधी असतात. असेनात का बापड्या! पण तुरीच्या डाळीच्या आमटीतल्या शेवग्याचा शेंगा सगळे टेबल म्यानर्सबिनर्स गुंडाळून ठेवून चोखून खाताना मला तरी असले काही आठवत नाही.
पडवळ त्या मानाने जरासे दुधी भोपळ्याच्या वळणावर जाणारे. पडवळाची रसभाजी हल्ली फारशी कुणाला ठाऊक असत नाही. भिजवलेल्या हरभर्‍याची डाळ घातलेली ही भाजी एक वेगळीच चव देऊन जाते. तशीच अवस्था भेंडीची आहे. ‘भेंडी’ हा शब्द काही फारशा चांगल्या अर्थाने वापरला जात नाही. त्यातल्या त्यात भेंडीची भाजी म्हणजे फारफारतर काचर्‍या करुन केलेली सुकी भाजी. पण भेंडीची रसभाजी खाल्ल्लीय तुम्ही? भेंडीचा बुळबुळीतपणा जावा म्हणून त्या भाजीत चिंच, आमसुल नाही तर लिंबाचा रस घालतात. ही भाजी जराशी गोडसर असते. गरम भात, तूप आणि भेंडीची ही अशी भाजी हे रात्रीचे जेवण असावे. असे ऊनऊन जेवावे आणि लवकर पांघरुणात गडप व्हावे. बाहेर जोरदार पाऊस किंवा कडाक्याची थंडी असेल तर काय, सोने पे सुहागाच! दहीभेंडी हाही एक जमून जाणारा प्रकार. हल्ली हाटेलात बुंदी रायता नावाचा एक भयानक गिळगिळीत पदार्थ देतात. मुळातच शेळपट पुरुषाने लग्नानंतर आक्रमक बायकोपुढे अगदी पोतेरे पोतेरे होऊन जावे तसला हा पदार्थ. दहीभेंडीतली भेंडी बाकी दह्यातही आपली अस्मिता जपून असते. सामान्यांचे पडवळाहून नावडते म्हणजे कारले . पण कारल्याच्या कडवटपणालाच त्याचा ‘यू एस पी’ बनवणारी सुगरण मिळाली तर कारल्याची भाजी अपरिमित आनंद देऊन जाते. ढबू मिरचीची (याचे सिमला मिरची असे नामकरण करणार्‍यांचा निषेध असो!) पीठ पेरुन केलेली भाजीही सुरेख लागते. फक्त घास कोरडा होऊन तोठरा बसण्याची शक्यता असते. यावरही उपाय आहे. सोबत वाटीभर गोड दही घ्यावे. साईचे असल्यास अधिक उत्तम. भाजीची चव द्विगुणित होते. डिंगरी हा शहरातला शब्द झाला. गावाकडे याला ‘मुळ्याच्या शेंगा’ म्हणतात. शेपूसारखीच ही अत्यंत उग्र वासाची भाजी – बर्‍याच लोकांना न आवडणारी. पण कोवळ्या डिंगर्‍यांची शेंगदाणे घालून केलेली भाजी ज्यांना आवडते त्यांना ती कोळंबीच्या कालवणासारखी चटकदार वाटते. त्या मानाने तोंडली, नवलकोल, ढेमसे, आर्वी वगैरे रणजी खेळणारे खेळाडू. शेवग्याच्या पानाची भाजी आणि ओल्या हरभर्‍याच्या पानांची भाजी हे अगदीच दर्दी खवय्यांचे काम. केळफूल आणि हादग्याचा फुलांची भाजी हेही त्याच लायनीतले मेंबर. हादग्याच्या फुलांची भाजी करताना त्यातले ‘नर’ काढून टाकावे लागतात, नाहीतर ती भाजी कडू होते. लहानपणी शेतातून असली फुले गोळ करुन आणायची आणि त्यातले नर काढून ती भाजीसाठी द्यायची हे आवडीचे काम होते. बेसन घालून केलेली हादग्याच्या फुलांची भाजी आता कोठे मिळेल बरे?
होस्टेलच्या मेसला रोज रात्री उसळ असे. ही योजना ज्याने सुरु केली त्याचे कल्याण असो. कडधान्यांची उसळ ही भाज्या महाग झाल्यावर करायची तडजोड नाही. उसळींचे शाकाहारात एक स्वतंत्र स्थान आहे. पण उसळी खाव्यात त्या चवीसाठी. फक्कड उसळीचा चमचमीत घास घेताना कुणी ‘प्रोटीन्स’ हा शब्द उच्चारला तर दाताखाली खडा आल्यासारखे वाटते. मटकीची उसळ मिसळीसाठीच अधिक प्रसिद्ध आहे, पण खर्‍या कोल्हापुरी मिसळीत (पोह्यांसारखेच) तिला स्थान नाही. हल्ली ढाब्याढाब्यांवर ‘आख्खा मसूर’ नावाची एक उसळ मिळते. कोणत्याही गोष्टीचा सतत कंटाळा येणार्‍या आणि ‘साधे वरण’ ही पाककौशल्याची कमाल मर्यादा असणार्‍या सपक पोरींच्या नवर्‍यांना कधीतरी अस्सल जेवायला मिळावे म्हणून केलेली ही सोय आहे. बाकी हाटेलात जाऊन उसळी खाणे हे हाटेलात पोहे खाण्याइतकेच निरर्थक आहे. मसुराला मोड आणता येतात, त्याने कदाचित त्यातली पोषणमूल्येही वाढत असतील; पण बिनमोडाच्या मसुराची लसूण घालून केलेली उसळ जशी चविष्ट लागते, तशी मोडाच्या मसुराची लागत नाही. वाटाण्याचेही तसेच आहे. पण काळा वाटाणा आणि हरभर्‍याची उसळ बाकी मोड आणूनच करावी. हरभर्‍याच्या उसळीवर तेलाचा ‘कट’ पाहिजे, आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीत ओले खोबरे. काळसर वाटाणे, त्यांचे शुभ्र, फडफडीत मोड, लालभडक रस्सा आणि त्यावर परत पांढरेशुभ्र खोबरे ही रंगसंगतीच भूक दुप्पट करणारी आहे. मूग पचायला सोपे असतात म्हणे. असोत बापडे. मुगाची भरपूर लसूण आणि कोथिंबीर घालून केलेली घट्ट उसळ खाताना असले काही आठवू नये. चवळी किंवा अळसुंदाची रस्सेदार उसळ अशीच मजा आणून जाते. राजमा आणि छोले बाकी त्या मानाने परके वाटतात. आम्लपित्ताची आठवण करुन देणारेही.
आमटी ही तर मराठी जेवणाची शोभा आहे. ‘भातपिठले’ आणि ‘भातआमटी’ यातले सरसनिरस ठरवणे अवघड आहे. तुरीच्या (चिंचगूळ घातलेल्या) आमटीबरोबर साधा भात पाहिजे आणि कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी. कोवळ्या हरभर्‍याची – ज्याला गवाकडे ‘सोलाणा’ म्हणतात- झणझणीत आमटी आणि गरम भाकरी हे असेच एक दिलखेचक कॉम्बिनेशन आहे. दुसरी प्रसिद्ध आमटी म्हणजे शेंगदाण्याची. वरईच्या किंवा भगरीच्या जोडीला येणार्‍या शेंगदाण्याच्या आमटीने उपवासाचे सार्थक होते. टोमॅटोचे सार ही बाकी शुद्ध फसवाफसवी आहे. सार खरे ते आमसुलाचे. आजारपणातून उठलेल्या माणसाचा आहार म्हणून किंचित बदनाम झालेले , पण एकदम भूक चाळवणारे. त्यातली तुपाची फोडणी, जिरे आणि कढीलिंब यांचे आमसुलाशी असे काही जमून जाते, की ज्याचे नाव ते! कढीही अशीच मजा आणून जाते. हल्ली कढीत कसल्याकसल्या भजी, काकडीचे तुकडे.. काय वाट्टेल ते घालतात. अस्सल कढीला असले काही नखरे लागत नाहीत. कढी, खिचडी, तूप, मेतकूट, पापड .. फारफारतर लिंबाचे लोणचे. ‘माणसाला किती जागा लागते?’ या धर्तीवर ‘जगात सुखी व्हायला फार काय लागते?’ असा प्रश्न पाडणारे हे जेवण . पण खिचडी-कढी ही खरी तर हिवाळ्यातल्या रात्रीची मजा.
मराठी जेवणात ‘डाव्या उजव्याला’ फार महत्व आहे. चटणी, लोणचे, मीठ, लिंबू आणि कोशिंबीर हे अस्सल मराठी थाळीतले मानाचे शिलेदार. शेंगदाणा, लसूण, कारळे, जवस, तीळ, दोडक्याच्या शिरा या तर नेहमीच्या चटण्या झाल्या. उन्हाळ्यात गूळ, तिखट, मीठ घालून केलेल्या कैरीच्या चटणीच्या आठवणीने तोंडाला चळचळून पाणी सुटते. तसेच काहीसे कवठाच्या चटणीबाबत. पण कवठाची चटणी ही जेवणात खाण्याची गोष्ट नव्हे. कवठाची चटणी तशीच खावी आणि तीही त्या कवठाच्या भकलात घेऊन. कवठाचे बी चावून खावे. अगदी चारोळ्यासारखे लागतात. बी काढून कवठे खाणे म्हणजे साल काढून सफरचंद खाण्यासारखे आहे. आमसुलाची चटणी तिला लाभलेल्या संदर्भाने एरवी अस्पर्श झाली आहे, पण तीही एक वेगळीच खमंग चव.
कोशिंबिरीचे काकडी आणि टोमॅटो हे सेहवाग-तेंडुलकर. गाजराची फोडणी दिलेली आणि सढळ हाताने शेंगदाण्याचे कूट घातलेली कोशिंबीरही जमून जाते. बीट बाकी स्वतःचे काहीही अस्तित्व नसलेले. केवळ ‘लोह’ हा विचार करुनच खायच्या लायकीचे. मुळ्याची कोशिंबीर न आवडणारेच लोक अधिक. पण मुळ्याच्या वासाची बिअरच्या वासासारखीच सवय व्हावी लागते. आणि एकदा ही सवय झाली की मुळ्याच्या कोशिंबिरीसारखी कोशिंबीर नाही, तुम्हाला सांगतो! दहीकांदाही असाच मजा आणून जातो. दहीकांद्याचे मांसाहारी जेवणाशी नाते जोडले आहे, पण शाकाहारातही तो खपून जातो. दहीकांदा कालवताना त्यात चिमूटभर साखर आणि एवढे जिरे घालावेत. एकदम भन्नाट चव तयार होते. वांग्याचे आणि लाल भोपळ्याचे भरीत हेही ‘ऑल टाईम फेवरिट’ मध्ये मोडणारे. पण कैरीच्या कायरसाला पर्याय नाही. आंबटगोड चवीचा हा कायरस चपातीबरोबर खावा किंवा तूप भाताबरोबर. जीभ आभाराचे भाषण करु लागते!
तात्पर्य काय, की कोणतेही पक्वान्न, गोडधोड असले काही नसतानाही दुपारचे साधे शाकाहारी जेवणही कधीकधी ‘जीवन त्यांना कळले हो’ असे म्हणायला लावते. रात्रीच्या रंगीबेरेंगी जेवणाची रंगीत तालीम किंवा सकाळच्या भक्कम नाश्त्यावर उतारा एवढेच रविवार दुपारच्या जेवणाचे स्वरुप नसते. असले साधे पण मर्दानी – मर्दानी हा शब्द फक्त ‘फिगरेटिव्हली’ – जेवण झाले की कुणी दूरदर्शीपणाने आधीच आणून फ्रीजमध्ये ठेवलेली मसाला पानपट्टी लावतो, तर कुणी नुस्तीच बडीशेप खाऊन कोपर्‍यावर जाऊन आपापली विल्स, गोल्ड फ्लेक काय असेल ती शिलगावतो. हेही नको असेल तर साधे सुपारीचे एक खांड चघळत राहावे. पंखा अंमळ मोठा करावा, एखादे पातळ पांघरुण घ्यावे, डोळ्यासमोर टाईम्स धरावा…. थोड्या वेळाने हातातला टाईम्स गळून पडतो, पंख्याच्या ‘हम्म..’ अशा आवाजात एक बारीक खर्ज मिसळतो… आठवडाभर घाम गाळून उपसलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटू लागणारी रविवार दुपार सुरु झालेली असते….

Uncategorized में प्रकाशित किया गया | 9 टिप्पणियां

माझे खाद्य-पेय जीवन-२

डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत.
वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही.Bon Appétit!

सकाळची आन्हिकं उरकली आणि नवाच्या आधी आरशासमोर उभा राहून माणूस कमरेच्या पट्ट्याशी ओढाताण करु लागला की शरीराचा कणनकण ‘खायला द्या…खायला द्या…’ म्हणून कल्लोळ करु लागतो. (महिलांनाही हेच होत असावे, पण तो अनुभव मला नाही!) ही नाश्त्याची वेळ आहे. नाश्त्याचे न्याहारी, नाश्ता आणि ब्रेकफास्ट असे तीन उपप्रकार आहेत. शिळी भाकरी गरम दुधात कुस्करुन त्याबरोबर लसणीची चटणी घेतली की ती न्याहारी. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ वाचतावाचता काटेचमच्यानी पोटात ढकलायचे बेचव अन्न म्हणजे ब्रेकफास्ट. (त्यानंतर फळाचा रस – चुकलो, फ्रूट ज्यूस- आणि ब्लडप्रेशरची किंवा मल्टिव्हिटॅमिनची गोळी नसली तरे ब्रेकफास्टच्या टायचा सामोसा नीट जमत नाही!) आणि तुम्हीआम्ही सकाळीसकाळी जे हाणतो, तो नाश्ता. नाश्ता हे तुमच्या रोजच्या जेवणातले सगळ्यात मोठे जेवण असावे, नाश्त्याला तुम्ही दिवसाभरात जेवढे खाता त्याच्या चाळीस टक्के खावे, नाश्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीन्स घ्या, फळे घ्या.. विज्ञान असले बरेच काही सांगते. पण विज्ञान सांगते म्हणून नाश्ता घेणे म्हणजे घशातले जंतू मरावेत म्हणून व्हिस्की पिण्यासारखे आहे. उत्साही सकाळची उदात्त परीपूर्ती म्हणजे नाश्ता. नाश्ता असा असावा, की जो करुन झाला की त्या इंग्रजी कवीप्रमाणे ‘स्वर्गात देव आहेत, आणि एकंदरीत जगाचं बरं चाललं आहे’ असं वाटायला लागावं!
पारंपारिक मराठी नाश्त्याचे उपमा आणि पोहे हे म्हणजे पणशीकर-घाणेकर आहेत. सदासर्वदा लोकप्रिय. उपम्याचे उपमा आणि उप्पीट असेही उपप्रकार आहेत, आणि बारीक पंडुरोगी रव्याचा उडुपी उपमा आणि सणसणीत देशी जाड गव्हाचा उपमा असेही. सपक मिरचीचे लहान तुकडे आणि कढीलिंबाच्या भरड पानांनी भरपूर असा पांढरट रंगाचा शेवेने सजवलेला उपमा हे उडुपी मंडळींनी दिलेले प्रकरण आहे. गावरान देशी उप्पीटाला असली कलाकुसर परवडत नाही. त्यातल्या भरड रव्यासोबत मजबूत देशी शेंगदाणे आणि तिखट मिरचीचे मोठेमोठे तुकडे असतात. ते तुकडे बाजूला काढून ठेवायचे नसतात. फारफारतर ते दाढेखाली आले की ‘स्स..’ असे म्हणून पाण्याचा एक घोट घ्यायचा असतो. अश उप्पीटात कधीकधी आमसुलही येते. अशा उप्पीटाबरोबर काही घेणे म्हणजे अशा उप्पीटाचा अपमान केल्यासारखे आहे. पण जरा बुजरी मंडळी अशा उप्पीटावर साईचे दही घेतात, तेही बरे लागते. उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. आंबोलीहून गोव्याला जाताना घाट उतरायच्या आधी कामतांचे हाटेल आहे. तिथल्या उपम्यात वेलदोडे घातलेले असतात. तीही एक वेगळीच चव लागते.
पोहे बाकी अजरामर आहेत. कांदेपोहे आणि ‘मुलगी पाहाणे’ हा संबंध तर सर्वश्रुतच आहे. कोणत्याही गोष्टीत बटाटा घालून खाण्यार्‍या मुंबईकरांनी बटाटापोहे नावाचा एक धेडगुजरी पदार्थ बनवला. पण खरे पोहे दोनच. भरपूर ओले खोबरे आणि हिरव्या मिरच्या घालून ‘वरुन लावलेले’ ‘आलेपाक’ या अर्थहीन नावाचे विशेषेकरुन महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात खाल्ले जाणारे पातळ पोहे आणि दहीपोहे. आलेपाक हा पदार्थ बाकी नाश्यापेक्षा दुपारच्या वेळेचे खाणे म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. ‘दडपे पोहे’ हे याचे शहरी नाव. फोडणी घातल्यावर काही वेळ हे दडपून ठेवायचे असतात आणि मग कपबशीतल्या बशीतून वाढायचे असतात. किंवा चक्क वर्तमानपत्राच्या कागदावर. वाढताना बाकी वर पुन्हा खोबर्‍याची पेरणी पाहिजे. लिंबू आणि कोथिंबीर हे या पोह्यांचे प्राण. ‘है इसीमे प्यारकी आबरु, वो जफा करे, मै वफा करुं’ असे गुणगुणत हे पोहे सवडीने, रेंगाळत रेंगाळत खावे, अर्धा कप चहा घ्यावा, आणि ‘इट्टला, पांडुरंगा’ म्हणत हात झाडत उठावे. आलेपाक हा हातानेच खायचा असतो. चमच्याने आलेपाक खाणार्‍याला जो कोणी आदिबल्लवाचार्य असेल, त्याचा भीषण शाप लागतो म्हणे!
दहीपोहे हे पोहेमंडळीतले दुर्लक्षित धाकटे भावंड आहे. अगदी गुणी, पण थोरल्या भावांच्या कर्तबगारीने झाकोळून गेलेले. त्यामुळे दहीपोह्याचे काही नखरे नाहीत. दहीपोहे कसेही खावेत. फक्त ते चांगले भिजलेले असावेत. प्रेमभंगासारखेच दहीपोहे जितके मुरतील तितके अधिक स्वादिष्ट होत जातात. भिजवलेले पोहे, दूध, दही आणि मीठ ही बेसिक एडीशन. त्यावर मेतकूट, तळलेल्या मिरच्यांची फोडणी, लिंबाचे तिखट लोणचे किंवा चक्क लालभडक मसाल्याचे तिखट – हे सगळे ‘अ‍ॅड ऑन’स. फोडणीच्या दहीपोह्यात चिमूटभर साखर पाहिजे. आणि बरोबर मुरलेले माईनमुळ्याचे लोणचे असले तर क्या बात है! नरकचतुर्थीला आजही असले दहीपोहे सकाळी सात वाजता पानात येतात आणि फराळाचे सार्थक होते!
पोहे -उपम्याच्या जोडीला साबुदाण्याची खिचडी , मिसळ, दोसे-उत्ताप्पे आणि थालीपीठ ही मंडळी म्हणजे भट, दुभाषी, लागू, गोखले या लायनीतली. दर्जाने उत्तम, पण ते रोजचे काम नव्हे. खिचडी आणि मिसळ यावर सगळे बोलून लिहून झाले आहे. ईश्वराचा शोध जसा कुणाला कुठे लागेल याचा नेम नाही, तशी आपल्या चवीची मिसळ कुणाला कुठे मिळेल हेही सांगता येत नाही. ‘कोल्हापुरात कुठेही जा, मिसळ चांगलीच मिळणार’ असा अभिमान बाळगणारा मी, खुद्द कोल्हापुरात एकदोन ठिकाणी जाड फरसाण, मृतावस्थेतले पोहे, जाड कापलेला कांदा आणि कावीळ झालेला ‘कट’ याचा फुळकावणी लगदा अर्धवट टाकून उठलो आहे. आणि अगदी अपेक्षा नसताना इंदौरात तीनतीनदा रस्सा मागून घेतलेला आहे. मिसळीचे बाकी एक आहे. अस्सल कुलीन गायकाला जशी तानेगणिक दाद पाहिजे असते आणि मैफिलभर शांतता पाळून शेवटी फक्त ‘कर्टन कॉल’ करण्याने त्याचे समाधान होत नाही, तसे मिसळीला दाद घासागणिक आणि घसागणिक गेली पाहिजे. मिसळीच्या पहिल्या घासात पंचेद्रिये जागृत होत नसतील, तर त्यापेक्षा उकडलेला बटाटा खावा.
फक्त दोसे- उत्तप्प्यांसाठी ‘उठाव लुंगी-बजाव पुंगी’ म्हणणारी शिवसेना सोडावी आणि कोपर्‍यावरच्या शेट्टीकडे जाऊन मसाला दोसा खावा. दोश्याच्या रंगावरुन आणि त्याच्या कडकपणावरुन त्याचे घराणे कळते. चेंबूरच्या एका हाटेलात (मला वाटते ‘गीता भवन’ ) राजकपूरला असा कुरकुरीत मसाला दोसा हाताने तोडून खाताना पाहिले आणि ‘दिलका हाल सुने दिलवाला’ हे पटून गेले! रवा दोसा हाही जितका कुरकुरीत आणि जाळीदार तितका अधिक चविष्ट. रवा दोसा काट्याचमच्याने खाता आला तर त्याला नापास जाहीर करुन तो उडुपी सोडून द्यावा. उत्तप्पावरील कांदाही असाच खरपूस कडक झाला असला पाहिजे. ‘ओनियन टमाटो उत्तप्पा’ हा बाकी खरपूसपणाला मारकच प्रकार. एकतर त्या बियाळ टमाटोच्या चकत्या नीट शिजत नाहीत, आणि दुसरे त्या ओलसर टमाटोने त्या खरपूस उत्तप्प्याचाच लगदा होऊन जातो. आमच्या कराडचा शेट्टी त्या उत्तप्पावर तो तव्यावर असतानाच शेंगदाण्याची तिखट चटणी पेरायचा. ते गणितही झकास जमून जायचे. पण दोसा उत्तपा हे स्वयंप्रकाशित जीव. चटणी-सांबार असल्यास उत्तम, नसल्यास एकेकटेही तबीयत खुश करुन जाणारे. इडलीचे तसे नाही. इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे. सांबारस्वरुपी नवरा कायम संतापी, पण त्याच्याशिवाय इडलीला अस्तित्व नाही. हल्ली उडप्याकडे ‘सांबार मिक्स या सेबरेट?’ असा एक अपमानजनक प्रश्न विचारला जातो . इडली वेगळी आणि सांबार वेगळे म्हणजे एखाद्या सुंदर बाईने खालच्या आणि वरच्या ओठाला वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक लावण्यासारखे आहे.इडली ही सांबाराने न्हालेली नव्हे तर सांबारात बुडालेली पाहिजे. एकेक तुकडा इडली सांबाराच्या चमच्याबरोबर खाणे हे नवख्याचे काम. जाणकार कोण काय म्हणेल याची पर्वा न करता इडली आणि सांबार यांची आधी जिवाशिवाचे ऐक्य करुन घेतो. हे झाले की आणखी एक प्लेट सांबार मागवावे आणि मग जीभ रतिक्लांत होईस्तोवर हे मिश्रण हाणावे. मधून चटणी घेणे वगैरे ऐच्छिक बाबी. पुण्यातल्या ‘स्वीट होम’ने इडली सांबारात बारीक शेव घालून वेगळेपणा आणला, पण तेही तसे दुय्यमच. एरवी कळकट शेट्टीच्या हातची वाफाळती इडली आणि सुक्या मिरचीचे तुकडे घातलेले सांबार याला तोड नाही. सांबारातले भोपळ्याचे, वांग्याचे अगदी वेळीप्रसंगी दोडक्याचे तुकडेही खाता येतात, पण सांबारातल्या शेवग्याच्या शेंगाच्या तुकड्यांचे काय करायचे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ‘जादा चटणी- सांबारला एक्स्ट्रा चार्ज पडेल’ या मेनूवरील ओळीच्या निषेधार्थ तर मनसेला सुपारी दिली पाहिजे. मटणथाळीतला पांढरा आणि तांबडा रस्सा जसा मागायला लागू नये, आणि कांदा-लिंबू तर कायम वाढता असावा, तसे इडली-मिसळीतले सांबार हे न मागता पानात आले पाहिजे. काय जादा पैसे घ्यायचे, ते नंतर घ्या ना लेको!
थालीपीठ हा समस्त शहरी समाजाची कीव करावी असा विषय आहे. पुणे -कोल्हापूर रस्त्यावरच्या भुईंजजवळच्या ‘विरंगुळा’ हाटेलातल्या थालिपिठाचे तर ‘सारेगामा’ तल्या अल्पजीवी तार्‍यांइतके अवास्तव कौतुक झाले आहे. तेलाने थबथबलेली ती कडक पिठाची तबकडी म्हणजे थालीपीठ नव्हे. खरे थालीपीठ ज्याचे होते ती नुसती भाजणी तशीच खावी इतकी खमंग असते. थालीपिठातला कांदा बाकी पांढरा पाहिजे, कोथिंबीर कोवळी आणि नुक्ती तोडलेली पाहिजे आणि लसूण-मिरची गावरान पाहिजे. असे थालिपीठ करताना त्यात तव्यावरच मधेमधे भोके पाडून त्यात तेलाची थेंब सोडला पाहिजे. आणि सोबतीला लोणी किंवा दही तर पाहिजेच पाहिजे. असे एकच थालीपीठ खावे आणि त्याच्या आठवणीवर सहा महिने काढावेत.
या बिनीच्या शिलेदारांबरोबर शेवयाचा उपमा, मक्याच्या कणसांचा उपमा, लाह्याच्या पिठांचा उपमा, धिरडी, फोडणीचा भात, फोडणीची पोळी, कसलेकसले वडे आणि अगदीच आयत्या वेळचे म्हणून आम्लेट-ब्रेड असे नाश्त्याचे इतरही प्रकार आहेत. पण नाश्ता कोणताही असो, त्याने ‘अन्नादाता सुखी भवः’ असे म्हणावेसे वाटले पाहिजे. सकाळी भरपेट नाश्ता केला की दिवसभर शरीर उत्साही राहाते, असे विज्ञान सांगते. मला वाटते, हे शरीरापेक्षा मनाला अधिक लागू आहे. मनाजोगता नाश्ता झाला की मनच ‘बनके पंछी गाये प्यारका तराना’ म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची!

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां