माझ्या संग्रहातील पुस्तके – प्रकाशवाटा

प्रकाश आमटेंच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर लिहावेसे वाटताच मी स्वतःला फार भावुक होऊन भाबडेपणाने काही न लिहिण्याविषयी बजावले. या पुस्तकावर तर लिहायचे, पण ते शक्यतो वस्तुनिष्ठ राहून, या तयारीने मी हे पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक वाचून संपताना मात्र या पुस्तकावर गदगदूनच लिहिले पाहिजे, अशी काहीशी मनाची धारणा झाली. (आणि मग तेवढी गदगद आपल्याला लिखाणात आणता येईल की नाही, याविषयी मनात शंका निर्माण झाली!) तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील, कथाकवितांमधील उडते पतंग असतील, तर वाहून न जाता (श्री. पु. भागवतांप्रमाणे!) तटस्थपणे हे वाक्य बरे आहे, ही उपमा चुकली आहे, हा शेवटचा पीळ ओ. हेन्रीसारखा, अशी चिकित्सा करता येते. आमटेंचे हे पुस्तक कोणत्याही चिकित्सेपलीकडचे आहे. काही काही लिखाणांत ‘आयुष्य नावाच्या जनावराचा वास’ इतका तीव्र असतो, की मग त्या लिखाणाला शैली, कलाकुसर वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासत नाही. ‘वो खलिश कहां से होती, जो जिगर के पार होता’ सारखे ते लेखन आपल्याला भेदून जाते.
प्रकाशवाटा’ हे मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकशाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक. वस्तुतः विलक्षण कर्तबगार माणसांच्या मुलांना फक्त आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. गांधींपासून गावसकरपर्यंत अशी उदाहरणे आहेत. ब्रॅडमनच्या मुलाने आपले आडनाव यासाठी बदलले म्हणतात. बाबा आमटे हे असेच एक आभाळउंच नाव. आमटेंची मुले सामान्य आयुष्य जगती, तर त्यांना त्याचे ओझेच झाले असते. प्रकाश आणि विकास या आमटेंच्या मुलांनी बाकी बाबांनी सुरु केलेले काम पुढे नेले आहे, वाढवले आहे. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा’.
१९७३ साली सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची त्या काळातली वर्णने वाचताना अंगावर शहारा येतो. आसपास घनदाट, रौद्र जंगल, अत्यंत विषम हवामान, वीज, पाणी, रस्ते… यातलं काहीही नाही, राहायला घर सोडाच, झोपडीही नाही, सपाट जागाही नाही, आणि ज्या माडिया गोंड आदिवासींच्या विकासासाठी हे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही वेडे तरुण लोक घरदार सोडून या जंगलात राहायला आले, ते, भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेले, शहरीकरणाचे वारेही न लागलेले , अतीमागासलेले आदिवासी लोक. अशा अवस्थेत नुसते पोकळ आदर्श आणि ”काहीतरी’ करुन दाखवायचं आहे’ अशी बालीश जिद्द कामाला येत नाही. जंगल हे पर्यटकांना कितीही मोहक वाटत असलं तरी शेवटी ही मोहकता जोवर मनात रात्रीचे डाकबंगल्यातले गरम पांघरुण शाबूत आहे, तोवरच कायम असते. निसर्गाच्या भीषण स्वरुपाशी सामना करताना सगळी शारीरिक आणि मानसिक ताकद पणाला लागते. अशा समग्र ताकदीनिशी हे झपाटलेले लोक कामाला लागले आणि सगळ्या अडीअडचणींवर मात करुन हेमलकशाचे आजचे जे रुप आहे, ते त्यांनी साकार केले. आणि या अडीअडचणींचे स्वरुप जरी पाहिले, तरी या लोकांना प्रेरित करणारी ती कोणती लोकविलक्षण शक्ती आहे, असा प्रश्न पडतो.
भामरागड हा विभाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरचा भाग. आनंदवनापासून साधारण २५० कि.मि. अंतर. रस्ते जवळजवळ नाहीतच, म्हणून हे अंतर पार करायला चक्क दोन दिवस लागायचे. सगळा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला. हे जंगल रम्य असले तरी भयानक होते. प्रचंड पाऊस, प्रचंड थंडी आणि प्रचंड उन्हाळा. काही ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीवर पोचणार नाही इतकी घनदाट झाडी. जंगली पशुपक्षी, विषारी सापविंचू, पुरात वाटेल येईल ते गिळंकृत करणार्‍या नद्या. इथले स्थानिक म्हणजे माडिया गोंड लोक. समाजाच्या मूळ प्रवाहापासून कैक योजने दूर असलेली ही अतिमागास आदिवासी जमात. शिक्षण नाही, उपजीविकेचा निश्चित असा मार्ग नाही, लोकसंपर्क नाही आणि कागदोपत्री महाराष्ट्रात असूनही मराठी भाषेचा गंध नाही. स्थानिक माडिया बोलीभाषा ही मराठीपेक्षा संपूर्ण वेगळी अशी भाषा आहे. मागासलेपण इतके, की अंगभर कपडे घातलेला शहरी माणूस पाहिला की आधी हे लोक घाबरुन चक्क पळूनच जात.
अशा रानटी जागेवर जाऊन आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी करणे हे बाबा आमटेंसारखा माणूसच करु जाणे. बाबांचे वाढते वय बघून भामरागड प्रकल्पाचे जबाबदारी प्रकाश आमटेंनी स्वीकारली. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि या दुर्गम भागात त्यांच्याबरोबर यायला त्यांच्या उच्च्शिक्षित पत्नी मंदाताई बिनतक्रार नव्हे तर आनंदाने तयार झाल्या! कुठल्या मुशीतून असले लोक तयार होतात, कोण जाणे! हेमलकसा भागातली जमीन सरकारने या प्रकल्पासाठी देऊ केली आणि काही मोजक्या सहकार्‍यांबरोबर प्रकाश आमटे इथे आले. इथल्या अडचणींना तर अंतच नव्हता. प्रकल्पासाठी सपाट जमीन आणि राहायला तंबू ठोकायचे म्हणून साफसफाई करायला सुरवात केली, तर वनखात्याच्या लोकांनी मनाई केली. त्या काळातल्या आमटेंच्या कामाची कल्पना केली तरी हादरुन जायला होते. वीज नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, माणसंही नाहीत. होतं ते फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. आनंदवनात रोगमुक्त झालेले, पण तरीही समाजानं अव्हेरलेले काही कार्यकर्ते हेमलकशाला आले होते. त्यांच्या मदतीनं प्रकाश आमटेंनी काम सुरु केलं. पण ज्यांच्या विकासासाठी हे काम सुरु केलं होतं ते आदिवासी या शहरी लोकांकडे फिरकतच नव्हते. मग माडिया भाषा शिकणं आलं, आदिवासींचा विश्वास संपादन करणं आलं, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं आलं…
आणि या वैद्यकीय उपचारांचे स्वरुप तर भीती वाटावी असे आहे. माडियांची जीवनशैली – हा शब्दतरी त्यांच्या बाबतीत लागू पडतो की नाही, कुणास ठाऊक- इतकी आदिम की प्रत्येक जण प्रचंड कुपोषणाचा बळी पडलेला असे.आंबील, भात आणि मिळेल ते प्राणी एवढंच अन्न. खायच्या प्राण्यांत अगदी मुंग्याही. दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका मध्यमवयीन माणसाचं वजन केवळ २३ किलो होतं हे वाचल्यानंतर आपल्या हातातला घास तसाच राहातो.मलेरिया, सेरेब्रल मलेरिया, झाडांवरुन पडून हातपाय मोडणं, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होणं असल्या या माडियांच्या समस्या. अस्वलाच्या हल्ल्याची आमट्यांनी वर्णन केलेली एक कथा मनावर एक कधीही न पुसणारा डाग पाडून जाते. डाग म्हणजे केवळ एक ठिपका नव्हे, तर एखादे लोखंडी अवजार लालभडक होईपर्यंत तापवून दिलेला चरचरीत डाग.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला एक माडिया उपचारांसाठी आला. त्याच्या चेहर्‍याचा ओठांपासूनचा टाळूपर्यंतचा भाग अस्वलाने एखादे फळ सोलावे, तसा सोलून काढला होता. (त्या चेहर्‍याचा फोटो तर डोळ्यांसमोरुन जाता जात नाही). डोळे फुटलेले, संपूर्ण आंधळा झालेला तो माणूस शुद्धीवर होता, आपल्यावर हल्ला कसा झाला ते सांगत होता. जखमेत माती, पालापाचोळा गेलेला. ती जखम बघून एक शिकाऊ डॉक्टरला तर चक्करच आली.आमटेंनी हळूहळू ती जखम स्चच्छ केली. जखम शिवायची म्हटले तर भूल कुठेकुठे म्हणून द्यायची, म्हणून भूल न देताच त्याचा फाटलेला चेहरा शिवायला सुरवात केली. जखमेवर घातलेले दीडशे टाके पूर्ण होईतो तो माडिया शांतपणे सहन करत बसला होता. चार-पाच दिवसांत तो बरा होऊन चालत आपल्या घरी गेला.
पण ही कथा इथे संपत नाही. त्याचे दोन्ही डोळे फुटले होते, त्यामुळे त्याला शिकार, जुजबी शेती असलं काही करणं शक्य नव्हतं. अशा बिन उपयोगाच्या माणसाला कोण आणि कसे पोसणार? त्याच्या नातेवाईकांनी त्याला खायला देणं कमी केलं, आणि उपासमारीनं तो माणूस दोन वर्षांत मरण पावला.
दुसरी अशीच एक कथा आहे ती कॉलर्‍याच्या साथीची. बांबूतोडीच्या कंत्राटदाराने जंगलात हजारो मजूर बांबू तोडण्याच्या कामावर आणले, पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे वगैरेंची व्यवस्था करण्याची त्याला काही गरजच भासली नाही. त्या लोकांनी प्रातर्विधीसाठी नदीचा वापर करायला सुरवात केली, आणि नदीचं पाणी भयानक प्रदूषित झालं. माडियांच्या वस्त्यांमध्ये कॉलर्‍याची साथ पसरली. एका रात्रीत तीनशे लोक आमट्यांकडे उपचारासाठी आले.एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. उपचारांनंतर मुलाला थोडं बरं वाटायला लागल्यावर ती मुलाला तिथंच ठेवून परत जायला निघाली. तिथल्या कार्यकर्त्यांनी तिला मुलाला पूर्ण बरं वाटेपर्यंत थांबायला सांगितलं. त्यावर ती बाई म्हणाली, “माझा नवरा काल या लागणीनं मेला. दोन मुलांना लागण झाली. त्या दोन्ही मुलांना घेऊन मी इकडं यायला निघाले, तर एक मुलगा वाटेतच गेला. त्याला झाडाखाली ठेवून मी इकडे आले. आता परत जाऊन त्याला पुरुन येते.”
‘प्रकाशवाटा’ मध्ये असे मनाचे तुकडे करणारे अनेक प्रसंग आहेत.अत्यंत बिकट परिस्थितीतून, जिवावर बेतणार्‍या प्रसंगांतून, सर्पदंश, मधमाशांचा, बिबट्याचा हल्ला, या सगळ्यांतून झगडत झगडत शेवटी जिवंत राहून हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणार्‍या काही झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. बाबा आमटेंनी सुरु केलेली ही चळवळ आता त्यांची तिसरी पिढी सांभाळते आहे, अधिक समर्थपणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांभाळते आहे – आमटेंच्या कथनात या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. हे एकट्यादुकट्याने करायचे काम नव्हे, याचा आमटे विनयपूर्वक उल्लेख करतात. हा – त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर – ‘जगन्नाथाचा रथ’ ओढण्यात अनेक लोकांचा, संस्थांचा हातभार लागला आहे. त्यातली बरीचशी नावे आपल्याला अपरिचित आहेत – म्हणजे आपल्या परिचितांपैकी फारशा कुणाचे इकडे लक्ष गेलेले दिसत नाही. ‘पु.ल. देशपांडे फाऊंडेशन’ सारखे सन्माननीय अपवाद सोडले तर. आणखी एक सुखद धक्का देऊन जाणारे नाव म्हणजे नाना पाटेकरचे. नानाने फारसा गाजावाजा न करत या कामाला गेल्या काही वर्षांत तीसेक लाख रुपये दिले आहेत, हे वाचून त्याच्याविषयीचे मतच बदलून जाते. (तसे ते ‘प्रहार’ बघूनही बदलले होते म्हणा!)
पुस्तक वाचून होताहोता डोक्यात विचारांचा ‘गल्बला’ सुरु होतो. उत्तम पुस्तकाचे हे एक गमक मानले जाते म्हणे. पण त्यातला सगळ्यात अस्वस्थ करुन जाणारा विचार हा, की कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नाही, मनुष्यबळ नाही – अशा अवस्थेत चार लोक हे इतके आभाळाइतके मोठे काम करु शकतात. शासकीय उदासीनता ही तर आता आपण गृहीतच धरली आहे (’ग्रेट भेट्’ मध्ये निखिल वागळेंशी बोलताना आमटेंनी याचे एक उदाहरण दिले होते. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आमटेंचे नक्की काम काय आहे, आणि ते कुठे आहे, याचा मंत्रालयात पत्ता नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शासकीय अभिनंदन आले ते आनंदवनाच्या पत्त्यावर – आणि तेही कुष्ठरोगी पुनर्वसनाचे काम केल्याबद्दल!) समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे. एक जुनी उपमा वापरायची तर ‘समुद्रातून एखादी जलपरी सुळकांडी मारुन वर यावी आणि समुद्राकडे पाठ करुन बकाबका भेळ खात बसलेल्या हजारो लोकांचे तिकडे लक्षही जाऊ नये’ असे काहीसे होते आहे. यातले चित्र थोडेसे – अगदी थोडेसे जरी वेगळे असते, तर हे चार लोक कायकाय करु शकले असते? मग लक्षात येते की सरकार आणि समाज यांच्यात थोडीशी जरी संवेदनशीलता शाबूत असती, तर असले प्रश्नच उद्भवले नसते. प्रकाश आमट्यांनी लिहिले आहे की हेमलकशाच्या जंगलातले बहुतेक पक्षी तिथल्या आदिवासींनी खाऊन संपवले आहेत; अगदी चिमण्या कावळेही. जर आपण थोडेसे अधिक जागृत असतो, तर हजारो आदिवासींबरोबरच हे लाखो पशु-पक्षीही वाचले असते!
एका बाजूला आमट्यांच्या कामाचा अभिमान वाटावा, आणि दुसर्‍या बाजूला स्वतःची लाज वाटावी अशा दोन्ही भावना एकाच वेळी मनात जागवणारे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
प्रकाशवाटा
डॉ. प्रकाश आमटे
शब्दांकन: सीमा भानू
समकालीन प्रकाशन
१५६ पृष्ठे
किंमत २०० रुपये

Published in: on June 25, 2009 at 3:35 am Leave a Comment

खरं काय आणि खोटं काय

“दुनिया ही अशी तिरपागडी आहे बघ, बापू” गौतम म्हणाला. ” ती आहे तशी रंगरंगीली, आणि म्हणून तुम्ही लेखक अगदी बाह्या सरसावून लिहायला बसता. पण या रंगीबेरंगी दुनियेतले फार थोडे रंग लेखकांना त्यांच्या लिखाणात आणता येतात. आता तुझंच उदाहरण घे. तू कथा लिहितोस. कधीकधी चांगल्याही लिहितोस” गौतमचा स्वर किंचित मिश्किल झाला. ” म्हणून तुला वाटेल की लेखकाच्या कल्पनाशक्तीसमोर सत्य हे काहीच नव्हे. तुझ्या लिखाणातली पात्रं, त्यांचे विचार जगावेगळे, अगदी झगझगीत असतात असं वाटेल तुला. पण वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. या.. आसपास वावरणाऱ्या सामान्य, अतिसामान्य अशा लोकांच्या डोक्याची टोपणं काढून बघितली तर आत भावना, वासना, विकृती, विकार यांचं असं जाळं दिसेल तुला, की ज्याचं वर्णन करायला जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या लेखकाची प्रतिभा पुरी पडणार नाही. माणसाच्या मनाचा काही अंदाजच येत नाही बघ…”

” अरे पण गौतम, कुठे लिखाणातले झगझगीत रंग आणि कुठे हे तुझं वास्तवातलं जग – निव्वळ काळं, पांढरं, किंवा करडं फार फार तर… ” मी जरा जास्तच पुस्तकी बोलून गेलो असं मला वाटलं. गौतमही जरासा हसला. ” नाही, हस तू माझ्या बोलण्यावर, पण तुझं बोलणं काही पटलं नाही बुवा आपल्याला. माझ्या पद्धतीचं लिखाण घे, रहस्यकथा. तुला असं म्हणायचंय का की अगाथा ख्रिस्तीच्या एखाद्या कादंबरीतल्या रहस्यापेक्षा एखाद्या पोलीस स्टेशनच्या क्राईम डायरीत अधिक रोमांच असेल? किंवा दुसरं उदाहरण घेऊ. अं.. समजा भयकथा. धारपांची ‘लुचाई’ किंवा ‘चंद्राची सावली’ वाचताना अजूनही मध्ये थांबून आजूबाजूला बघून घेतो मी. हो, आणि तूसुद्धा. अगदी दिवसाही. असला थरार प्रत्यक्ष ‘तशा’ जागी गेलो तरी जाणवेल आपल्याला? लेखकाच्या कौशल्याला काहीच महत्त्व नाही असं म्हणायचंय काय तुला?”

“हां. तू म्हणतोस ते अगदीच काही चूक नाही” गौतमने सिगरेट पेटवली. सिगरेटच्या धुराच्या निळसर रेषांमागून तो त्याच्या किंचित खर्जातल्या आवाजात बोलू लागला. एखाद्या प्राध्यापकासारखा. एखाद्या तत्त्वज्ञासारखा. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकासारखा म्हणा वाटलं तर.

“वास्तवाचे काळे, पांढरे, करडे रंग म्हणालास तू बापू. आपल्या सगळ्यांची आयुष्यं अशाच रंगाची असतात. पण याच्या किती छटा, किती शेड्स! वास्तव हे कंटाळवाणं, एका साच्यातून काढल्यासारखं असलं तरी ते एकमेकाच्या फोटोकॉपीसारखं नाही” गौतम झेरॉक्स कधीच म्हणत नसे. ” प्रत्येक आयुष्याचा निराळा पीळ असतो. प्रत्येक आयुष्याचे पदर वेगळे. रस्त्याच्या कडेला खड्डा खणता खणता थोडा वेळ थांबून बिडी ओढणारा एखादा मजूर घे. त्याच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे तुम्हा लेखकांना? त्याच्या आयुष्यात काहीच नाट्य नसेल? तो कधी संतापानं इंगळासारखा लाल झाला नसेल? कधी द्वेषानं, मत्सरानं धुमसला नसेल? कधी हतबलतेनं, अगदी निराश होऊन ढासळला नसेल? का कधी एखाद्या नाजूक स्पर्शानं मोहरला नसेल? पण यातलं किती आणि काय तुम्हा लेखकांना कागदावर आणता आलं आहे? लिखाण म्हणजे … निव्वळ कागदी बुडबुडे. त्याला वास्तवाची धग नाही. एखाद्या अनुभवातला जाळ जसाच्या तसा कागदावर उतरवता येणं अगदी अशक्य आहे. मुळात लिखाण ही प्रक्रियाच इतकी कृत्रिम आहे, की तिचा स्पर्श झाला की मूळ अनुभव मेलाच म्हणून समज तू बापू. माझी तक्रार ही तुझ्या लिखाणाविषयी नाही रे. तुम्ही लेखक मंडळी अगदी निष्ठेनं काम कराल, पण तुमची अवजारंच अशी बोथट, गंजलेली आहेत, त्याला तुम्ही काय करणार बापू?”

“हं. म्हणजे आमचं लिखाण ते तेवढं कृत्रिम, आणि तुझं, काय म्हणालास ते.. वास्तव ते तेवढं जिवंत असंच म्हणायचंय ना तुला?”

“अं, अगदी तसं नाही, पण जवळजवळ तसंच.”

“मग गौतमजी, या तुमच्या वास्तवात काय जिवंत आहे बघूया हं” मीही जरा चिडलो आणि खुर्चीवर अस्ताव्यस्त पडलेला ‘सकाळ’ उचलला. “छा! पेपर तर हल्ली चाळायच्याही लायकीचे राहिले नाहीत! पण यातली कुठलीही एक बातमी घेऊ आपण गौतम. मला सांग हं यात काय नाट्य, काय जिवंतपणा आहे ते! हे बघ, ‘वडगाव मावळच्या तलाठ्याला लाच घेताना अटक’. काय नाट्य आहे यात? सरकारी अधिकारी, सामान्य जनतेला नाडणे, लाचलुचपत, अगदी असह्य झाल्यावर कुणीतरी केलेली तक्रार. आता दोनचार दिवस आत जाईल तो आणि मग कुणाच्या लक्षातपण राहणार नाही ही बातमी. काय, काय नाट्य आहे यात? “

“बापूसाहेब, तुम्ही नेमकी तुमचा स्वतःचा मुद्दा खोडून काढणारी बातमी निवडली. अरेरे! मर्फीज लॉ! ” गौतम हसत म्हणाला.
“का? काय झालं? “

“बापू, हा चौधरी मला चांगला माहीत आहे. सरकारी नोकरांत अशी माणसं अपवादानंच बघायला मिळतात. धुतल्या तांदळासारखं चारित्र्य आहे त्याचं. त्याला अडकवलाय तिथल्या आमदारानं. माहुलीच्या अभयारण्यात गेल्या महिन्यात हरिणांची शिकार झाली होती बघ. त्यात महत्त्वाची साक्ष आहे चौधरींची. संपतराव जोंधळेची चाल आहे ही सगळी. आता हा आदर्शवादी तलाठी, त्याच्यावर दबाव टाकणारी ही राजकारणी धेंडं, चौधरीला रोजच्या रोज बसणारे चटके, तरीही ताठ मानेनं जगण्याची त्याची जिद्द… यातलं काय आणि कसं तुला तुझ्या एखाद्या कथेत लिहिता येईल? आणि समजा लिहिलीसच तू एखादी कथा, तर ती किती उबवलेली, किती कृत्रिम वाटेल? तेव्हा बापूसाहेब, आपला पराभव मोठ्या मनानं मान्य करा आणि शांतपणानं एक सिगरेट ओढा.” गौतम म्हणाला.

“आणि ते.. ते चौधरी? ” मी गौतमनं पुढं केलेल्या पाकिटातली सिगरेट उचलत विचारलं.

“ते सुटतील बापू. सकाळी शिंदे वकिलांशी बोललोय मी. आपल्याला अशा माणसांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अशा माणसांची आपल्याला गरज आहे, बापू. आपल्यालाही आणि.. “

आणि कुणाला गरज आहे हे मला आता कधीच कळणार नाही. गौतमचं वाक्य तोडून अचानक दरवाज्यावरची घंटी वाजली. काहीशा अनिश्चितपणे वाजवल्यासारखी. एकदा. दोनदा.

गौतम त्याच्या खुर्चीतून ताडकन उठला. हातातल्या सिगरेटचं थोटूक त्यानं भरून वाहत असलेल्या रक्षापात्रात चुरडून विझवलं. पश्चिमेकडची खिडकी उघडली आणि दारही उघडलं.

दारात एक तरुणी उभी होती. साधारण तीस- बस्तीस वय, किंचित स्थूलपणाकडं झुकणारा बांधा, सावळा वर्ण, महागडा पण एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला काहीसा विसंगत पोषाख आणि जरासा भडकच मेकअप. उंची डीओरंडचा वास. थोडक्यात जिला पाहिल्यावर कपाळावर एखादी आठी चढावी तशी व्यक्ती. अपेक्षेप्रमाणेच गौतमच्या कपाळावर गुरुदत्तसारखं आठ्यांचं जाळं उमटलं.

“गौतम.. गौतम सरदेसाई? “

“मीच. या, आत या. ” गौतम त्याच्या नेहमीच्या मार्दवानं म्हणाला. स्त्रीदाक्षिण्य हा आता कालबाह्य होत चाललेला गुण गौतमच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग होता. ‘शिव्हलरी इज डाइंग फास्ट बट इट इज नॉट क्वाईट डेड, बापू’ तो नेहमी म्हणत असे.

ती तरुणी आत आली. थोडीशी बावरलेली, गोंधळलेली. गौतमनं दाखवलेल्या खुर्चीवर जराशी अवघडूनच बसली. फिरत्या नजरेनं तिनं एकदा आसपास बघून घेतलं.

“मी शर्वरी. शर्वरी कारखानीस. मला सुनेत्राकडून तुमच्याविषयी कळलं. सुनेत्रा साखरपे…? “

“हां.. हां.. त्यांचं एक छोटंसं काम केलं होतं मी मध्ये” गौतम म्हणाला.

“तुमच्या दृष्टीनं ते छोटं असेल गौतमसाहेब, पण सुनेत्राताई म्हणते की तुमचे उपकार या जन्मात फिटायचे नाहीत. “

गौतम संकोचला. स्तुती त्याला पचवता येत नसे. विशेषतः एखाद्या स्त्रीने तोंडावर स्तुती केली की तो अगदी लाजून जात असे.
त्याचा संकोच शर्वरीच्याही लक्षात आला असावा.

“मला एक सांगा मिस कारखानीस, चष्मा तुम्ही नेहमी वापरता, की फक्त नेटसर्फिंग करताना? ” गौतमने विचारलं.
शर्वरी दचकलीच. “तुम्हाला… तुम्हाला कसं कळलं हे? ” तिनं चाचरत विचारलं.

गौतम फक्त हसला. “ते जाऊ दे. काय, प्रॉब्लेम काय आहे? ” तिच्या समोरच्या खुर्चीत बसत त्यानं विचारलं.
शर्वरीनं जरा साशंकपणानं माझ्याकडे नजर टाकली.

“ओह, हा माझा अगदी जवळचा मित्र बापू, अगदी आपला माणूस आहे. तुम्ही अगदी मोकळेपणानं बोला मिस कारखानीस. “

“गौतमजी, मी… आम्ही कोतवाल कॉलनीत राहतो. ‘इच्छापूर्ती’ बंगला. बाबांनी मोठ्या हौसेनं हा बंगला बांधला पाच वर्षांपूर्वी. पण त्यात राहायला ते काही फार दिवस जगले नाहीत. आम्ही राहायला आलो आणि सहा महिन्यांतच.. ” तिचा आवाज कापरा झाला. “हार्टचा त्रास होता त्यांना.. माझ्यावर फार जीव बाबांचा. मला भाऊ-बहीण कुणी नाही. ‘तुझं लग्न होईपर्यंत मला देवानं जगवावं बेटा’ ते नेहमी म्हणत असत. पण… “

गौतमनं पाण्याचा ग्लास तिच्यापुढं सरकवला. शर्वरीनं पाण्याचा एक घोट घेतला आणि ती बोलू लागली.

“बाबा गेले आणि वर्षभरातच आईनं दामलेकाकांशी लग्न केलं. दामलेकाका बाबांचे बिझनेसमधले पार्टनर. नाही… तसं आधीपासून काही नसावं.. ” गौतमच्या उंचावलेल्या भुवया पाहून शर्वरी म्हणाली. “दामलेकाकांचं घरी येणंजाणं होतं. बाबांचा फार विश्वास काकांवर. काकांचं लग्न राहूनच गेलं असावं बहुतेक. बाबा गेले, मी होस्टेलवर. आई फार एकटी झाली होती. काकांनीच मग आईला विचारलं वाटतं, त्या दोघांनी ठरवलं आणि मला सांगितलं. मलाही त्यात काही गैर वाटलं नाही. शेवटी आईला तिचं आयुष्य आहेच की. “

“हम्म. ” गौतम म्हणाला.

“दामलेकाका म्हणते मी त्यांना, पण माझ्यापेक्षा फार मोठे नाहीयेत ते वयानं. इन फॅक्ट, आईपेक्षा लहानच आहेत ते जरासे. बाबांचा बिझनेस उत्तम होता. त्यांच्या गुंतवणुकीही चांगल्या आहेत. सगळ्या गुंतवणुकींची वारस म्हणून बाबांनी माझं नाव घातलंय. बंगलाही माझ्याच नावावर आहे. व्याज चांगल्यापैकी येतं मला. मी मला हवे तितके पैसे काढून घेते आणि बाकीचे आईकडं देते. तुम्हाला कंटाळा तर आला नाही ना, गौतमजी? “

“छे, छे, उलट भलतीच इंटरेस्टिंग आहे हो तुमची ही केस. मग पुढे? “

“मी काही फार करियरिस्ट वगैरे नाही गौतमजी. ग्रॅज्युएट झाल्यावर आईनं लगेच माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. एकदोन ठिकाणी जमतही आलं होतं, पण…. नाही झालं. मी तशी फार बाहेर जाणाऱ्यांतलीही नाही. वाचन, टीव्ही आणि हल्ली इंटरनेट – बस्स. एवढंच माझं आयुष्य. पण चारचौघींसारखा संसार असावा एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यातून माझ्या डोळ्यांमध्ये मोठा दोष आहे. तुम्हाला कसं कळलं माहिती नाही मला, पण जाड चष्मा घालूनही नीटसं दिसत नाही मला. इंटरनेटवर कविता लिहिते मी, पण स्क्रीनवर त्या वाचण्यासाठी भिंग घ्यावं लागतं मला. त्यातून तिशी झाली माझी. त्यामुळं फार अपेक्षा बिपेक्षा नाहीत माझ्या. दिलीप भेटले आणि आता सगळं ठरवल्यासारखं होईल असं वाटायला लागलं. पण नशीबच खोटं आहे हो माझं. आधी बाबा गेले आणि आता दिलीपही.. ” शर्वरी दोन्ही हातांच्या तळव्यांत चेहरा लपवून हुंदके द्यायला लागली.

मी आणि गौतमनं एकमेकांकडं बघितलं. गौतमनं मला हातानंच ‘असू दे’ अशी खूण केली आणि शर्वरीच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. पाचेक मिनिटानं शर्वरी शांत झाली.

“माफ करा, गौतमजी. कधी कधी मनावर ताबाच राहत नाही हो. ” ती जराशा अपराधीपणानं म्हणाली.
“असू दे. चालायचंच. तर काय म्हणत होता तुम्ही. हे दिलीप… “

“दिलीप दातार. वासुदेव मधलं नाव. आमचं लग्न ठरलंय, पण.. “

“थांबा, थांबा. मला जरा सविस्तर सांगा मिस कारखानीस. कोण हे दिलीप? कुठं भेटले तुम्हाला? “

“सॉरी. तर.. महिन्याभरापूर्वीची गोष्ट. गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते मी. संध्याकाळच्या रागांच्या मैफिली होत्या बघा त्या आठवडाभर. माझी आणि आईची सीझन तिकिटं होती, पण आईचा पाय मुरगाळला आणि तिला बेडरेस्ट सांगितली डॉक्टरांनी. काका येतो म्हणाले माझ्याबरोबर, पण त्यांना ऐनवेळी टूरवर जावं लागलं. मग एक तिकीट त्यांनी परत केलं आणि मी एकटीच गेले. ते तिकीट ज्यांनी आयत्या वेळी काकांकडून विकत घेतलं तेच दिलीप. दिलीप दातार. बी. ई. आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दिलीप मला भेटले त्या कार्यक्रमात आणि नंतरही आम्ही भेटलो. दुसऱ्या आठवड्यातच त्यांनी मला मागणी घातली आणि मी हो म्हणून टाकलं. “

“आणि तुमचे आई बाबा? “

“आई तर खूशच झाली. काकांनाही आनंद झाला. साखरपुडा जोरात करायचा म्हणाले ते. त्यांचं टूरवर जाणं वाढलंय ना खूप हल्ली, पण आता टूरबिर सगळं बंद म्हणाले. साखरपुड्याला कुणाकुणाला बोलवायचं याची यादी पण काढली आम्ही बसून. दिलीप खूप बिझी असतात ना, त्यामुळं आम्ही संध्याकाळी सातनंतरच भेटायचो. काकांच्या ऑफिसमध्येही फॉरेन डेलिगेशन आलं होतं कुठलंसं. त्यामुळं काकांची आणि त्यांची गाठच पडेना. फोटो बघितला काकांनी दातारांचा आणि म्हणाले, नशीब काढलंस तू शर्वरी… “

“हे दातार.. कुठले हे? घरी कोण कोण असतं? कुठल्या कंपनीत आहेत नोकरीला? “

“अं… मला फारसं नाही सांगता येणार, पण सुपरसॉफ्ट की कुठली कंपनी आहे. संग्रामनगरला कुठंशी ऑफिस आहे. नवीन कंपनी आहे, आणि ऑफिसही शिफ्ट होतंय म्हणे. त्यामुळं नक्की सांगता नाही येणार मला. दातार मूळचे अमरावतीचे. आईबाबा नाहीयेत त्यांना. एक मोठी बहीण. ती भुवनेश्वरला असते. ती.. त्या यायच्या होत्या साखरपुड्याला… ” शर्वरीचा आवाज परत चोंदल्यासारखा झाला.

“आणि मग…? “

“दहा तारखेचा मुहूर्त होता साखरपुड्याचा. सगळी तयारी झाली होती. नऊ तारखेला रात्री आम्ही फिरायला गेलो होतो. मी आणि दिलीप. चांदणं पडलं होतं सुरेख. त्यांनी अंगठी घातली बोटात माझ्या. म्हणाले, ‘शर्वरी, मला वचन दे, जन्मोजन्मी माझीच होऊन राहशील… ‘. मी म्हणाले, ‘ हे असलं कसलं बोलणं? आणि अंगठी उद्याच्या मुहूर्तावर नाही का घालायची? ‘ तर म्हणाले, ‘खरं प्रेम करणाऱ्यांना मुहूर्ताचा संकेत लागत नाही शर्वरी’ मी वचन दिलं त्यांना तेव्हा गहिवरले ते. म्हणाले, ‘आयुष्यभर प्रेमाला पारखा झालेला माणूस आहे मी. तू माझ्या जीवनात हिरवळ फुलवलीस, शर्वरी. ‘ नऊ वाजता त्यांनी मला घरी सोडलं तेव्हा माझा हात हातात घेऊन म्हणाले, ‘उद्या भेटू, आयुष्यभर एकमेकांचे होऊन राहण्यासाठी.. ‘ किती, किती आनंदात होते मी गौतमजी त्या दिवशी.. “

मी गौतमकडे पाहिलं. रोमँटिक बोलण्याला तो फार कंटाळत असे. गौतमला कंटाळा आला असला तरी त्यानं तो चेहऱ्यावर दाखवला नव्हता.

“ही गोष्ट नऊ तारखेची, मिस कारखानीस. म्हणजे चार दिवसांपूर्वीची. पुढे काय झालं? “

“तेच काही कळत नाही गौतमजी. दहा तारखेला सकाळी आठ वाजता त्यांची बहीण, भावजी आणि मुलांना घेऊन हॉलवर यायचे होते दिलीप. आठ वाजले, नऊ वाजले.. त्यांचा पत्ता नाही. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. बाकी कुठला पत्ता, काही ठावठिकाणा नाही. आम्ही सगळे गोंधळून गेलो. आई तर रडायलाच लागली. इतकी सगळी माणसं आलेली आमच्याकडची. इतकं चोरट्यासारखं झालं आम्हाला. आणि मी तर घाबरूनच गेले. कुठे असतील हो दिलीप? काय झालं असेल त्यांना? हल्ली कायकाय वाचतो ना आपण पेपरमध्ये. आणि त्यांची बहीण, भावजी, मुलं.. ते लोक तरी कुठे आहेत?.. ” शर्वरी रडवेल्या चेहऱ्यानं विचारत होती.

नशीब तरी काय एकेक प्रश्न मांडून ठेवतं माणसांपुढं! मला त्या मुलीची दया आली. गौतम बाकी नेहमीप्रमाणं स्थितप्रज्ञ होता. आपल्या डायरीत काहीतरी नोंद करून ठेवत त्यानं विचारलं. “मग तुम्ही काय केलं? “

“आम्ही पोलिसांत गेलो, गौतमजी. इतके हलकटासारखे वागले पोलीस! म्हणे पत्ता काय, कंपनी काय, काही माहिती नाही, आम्ही तपास तरी कशाच्या जोरावर करायचा? एक कसला तरी रिपोर्ट लिहिला आणि म्हणाले आठ दिवसांनी फोन करून बघा. आई तर अंथरुणावरच आहे गेले चार दिवस. काका इतके चिडलेत, म्हणाले, सापडू तर दे, खूनच करतो त्याचा. पण माझं मन मला सांगतंय गौतमजी. दिलीप धोका देणाऱ्यातले नाहीत. त्यांच्यावर नक्कीच काहीतरी संकट कोसळलंय गौतमजी. प्लीज, प्लीज मला मदत करा.. “

“हम्म. मिस कारखानीस, या दिलीप दातारांचा फोटो आहे तुमच्याकडं म्हणालात तुम्ही.. “

शर्वरीनं तिच्या पर्समधून एक पासपोर्ट साइज फोटो काढला. “फारसा स्पष्ट नाही आलेला फोटो हा, आणि अलीकडचाही नाहीये. पण तुम्हाला कल्पना येईल. ” ती म्हणाली.

गौतमच्या खांद्यावरून मी त्या फोटोकडं नजर टाकली. चाळिशीचा माणूस. विरळ होत चाललेले केस, सर्वसाधारण नाकडोळे, डोळ्यांवर गॉगल. “डोळ्यांना तीव्र उजेड सहन होत नाही त्यांना. म्हणून डॉक्टरांनी गॉगल वापरायला सांगितलाय त्यांना. ” शर्वरीनं खुलासा केला

“आणखी काही? “

“स्वभावानं खूप भोळे आहेत हो दिलीप. आणि अगदी सज्जन. स्वभाव अगदी लोण्यासारखा बघा. आवाजही अगदी मृदू आहे त्यांचा. लहानपणी टॉन्सिल्सचा खूप त्रास झाला म्हणे त्यांना. म्हणून अगदी हळुवारपणे बोलतात ते. पण इतके प्रेमळ म्हणून सांगू… “

“मिस कारखानीस, त्यांचे काही इतर डिटेल्स आहेत तुमच्याकडं? त्यांचं कार्ड म्हणा, त्यांच्या कंपनीचा नंबर म्हणा.. “

“अं.. त्यांचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडे, पण तो… हं, ते मी सांगितलंच तुम्हाला. आणि हो, त्यांनी काही इ-मेल्स पाठवल्या होत्या मला. त्यांचेही प्रिंट आऊटस आणलेत मी. “

गौतमच्या चेहऱ्यावर अचानक उत्सुकता आली. “कुठलं.. कंपनीचं अकाउंट आहे त्यांचं? ” त्यानं विचारलं.

“नाही. कंपनीच्या अकाउंटमधून आपली बोलणी नको म्हणाले ते. जीमेल अकाउंट आहे त्यांचं. हे ते चार प्रिंट आऊटस.. अं.. जरा खाजगी मेल्स आहेत गौतमजी, तेव्हा.. “

“आय अंडरस्टॅंड मिस कारखानीस. या खोलीतल्या गोष्टी कधीच बाहेर जात नाहीत. मी बघतो काय करायचं ते. तुमचा नंबर देऊन ठेवा. मी कळवतो तुम्हाला काय ते. दरम्यान स्वतःला जरा सावरा. आईकडेही लक्ष द्या. आणि हो, मन जरा घट्ट करा”

“म्हणजे? मला दिलीप भेटतील ना परत? ” शर्वरीनं धीर एकवटून विचारल्यासारखं विचारलं.

“स्पष्ट सांगायचं तर मला फारशी आशा वाटत नाही, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला. “तेव्हा तुम्ही या दातारांना विसरण्याचा प्रयत्न करावा, हे उत्तम. “

“ते या जन्मी तरी शक्य नाही गौतमजी. मी वचन दिलंय दिलीपना. माझ्या नशिबात सुख असेल तर ते मला भेटतीलच. इथं, किंवा जिथं ते असतील तिथं. हा माझा नंबर गौतमजी. आणि हो, तुमचा काही ऍडव्हान्स..? ” शर्वरीनं पर्स उघडली.

गौतम हसला. “तशी वेळ आली तर मी तुम्हाला सांगीन, मिस कारखानीस. सध्या काही नको. “

“मग येऊ मी? ” शर्वरी खुर्चीतून उठली

“या, मिस कारखानीस. ” गौतम म्हणाला.
मी दरवाजा बंद करून वळलो तो गौतम एक नवी सिगरेट पेटवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य होतं.
“काय मग बापूसाहेब, काय म्हणतायत तुमच्या शर्वरीताई? ” त्यानं विचारलं.

“हं. म्हणजे नेहमीप्रमाणं तू माझ्याकडून काढून घेऊन मग मला ते चुकीचं कसं आहे, हे सांगणार म्हण की. ”

“तसं समज. पण काय, तुला वाटतं तरी काय या मुलीबद्दल? ” गौतमनं विचारलं.

“हे बघ गौतम, मी काही तुझ्यासारखा व्यावसायिक नाही. पण तुझं बघून बघून जे शिकलोय ते सांगतो. बघ तुला पटतंय का.. ” मी म्हणालो.

“बापू तू बोल तर खरा. मग बघू आपण तर्क काय, निष्कर्ष काय ते. ” गौतम म्हणाला.

“हम्म. शर्वरी कारखानीस… ” मी मगाशी राहिलेली सिगरेट उचलली. “वय काय, तीस- बत्तीस. आर्थिक सुस्थिती तर दिसतेच आहे. भारी ड्रेस, कानातल्या हिऱ्याच्या कुड्या, बाहेर गाडी आणि ड्रायव्हर तर असणारच. आणखी काय सांगू? आणि हो, ते चष्मा आणि नेटसर्फिंगचं काही ध्यानात नाही आलं बुवा माझ्या.. “

“माझ्या तर्कसंगतीची पद्धत वापर ना बापू. कितीही उत्तम दर्जाची चष्म्याची फ्रेम असली तरी ती सतत वापरणाऱ्याच्या नाकावर एक लहानशी आडवी रेघ दिसते. मिस कारखानिसांनी ती मेकअपनं लपवण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण अस्पष्ट का होईना, ती रेघ दिसतेच. तर मग चष्मा. बाहेर जाताना तिनं तो लावला नाही, याचं कारण म्हणजे तिला त्याची लाज वाटते. म्हणजे त्याचा नंबर बराच जास्त असला पाहिजे. तिनं कॉंटॅक्ट लेन्सेस लावल्या होत्या, हे तर तुझ्या लक्षात आलं असेलच. आणि तिच्या ड्रेसच्या बाह्या बघितल्यास तू? सतत कंप्युटरचा माऊस हाताळणाऱ्या व्यक्तींच्या बाहीवर ती बाही टेबलच्या कडेवर जिथं घासली जाते, तिथे एक आडवी खाच येते. या शर्वरीची आर्थिक स्थिती सामान्य असती, तर ती कुठंतरी नोकरी करते, असा निष्कर्ष मी काढला असता. पण तसं नाही. आणि बाहेर गाडी तर होतीच तिची. मगाशी खिडकी उघडायला मी उठलो तेव्हाच रस्त्यावर पार्क केलेली तिची होंडा सिटी मला दिसली. मग अशा सुस्थितीतल्या मुलीला तासनतास टेबलाशी बसायला कोणती गोष्ट प्रवृत्त करत असेल? उत्तर अगदी उघड आहे. इंटरनेट! “

“वा, काय लॉजिक आहे गौतम! मानलं तुला… ” मी कौतुकानं म्हणालो. ” आणखी काही? “

“आणखी बरंच काही. ” गौतम म्हणाला. “त्या मुलीच्या कपड्यांबद्दल, आर्थिक स्थितीबद्दल तू म्हणालास, पण तिचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर तू काही बोलला नाहीस. तिचे कपडे, दागिने आठव. जरासे भडकच नव्हते वाटत? अशा अडचणीच्या वेळीही ती पूर्ण मेकअप करून आली होती. आणि तिची भाषा.. दिलीपविषयी, तिच्या बाबांविषयी बोलताना किती स्वप्नाळूपणे बोलत होती ती.. ‘अहो दिलीप’ असा उल्लेख… टीव्हीवरल्या मराठी मालिका बघत असणार ही मुलगी. आणि इंटरनेटवर काय लिहिते ही? कविता! “

” अच्छा. म्हणजे ही लग्नाचं वय उलटून चाललेली, आपल्या शारीरिक दुबळेपणाविषयी काहीशी खंतावलेली, श्रीमंत घरातली, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी आणि काहीशी उथळच मुलगी, नाही का गौतम? “

“बरोबर. आणि मग तिला हा भेटतो, कोण, काय म्हणता तुम्ही लेखक मंडळी त्याला.. हां, तिच्या स्वप्नांतला राजकुमार. हाही वय होत चाललेला, शरीरानं आणि मनानं दुबळा आणि खऱ्या प्रेमाला आंचवलेला. अशा स्वप्नाळू, कवीमनाच्या मुलींना फार आकर्षण असतं अशा मुलांचं. रांगड्या, मॅचो मुलांपेक्षा अशी काहीशी बायलीच मुलं आवडतात त्यांना. वात्सल्य आणि ममत्व ही तर मॅमेलियन्सची वैशिष्ट्येच आहेत. ‘बायका एरवी कितीही कंठाळ्या असल्या तरी ज्या दिवशी तुम्हाला हँगओव्हर असतो, त्या दिवशी त्या अगदी देवदूतच होतात’ असं वुडहाऊस म्हणतो, आठवतं? आणि मग त्यांचं प्रेम, शपथा, आणाभाका – ते चांदणं, ती हिरवळ, ते एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून कॉफी पिणं वगैरे… सगळे सगळे ते तुमचे शब्दांचे बुडबुडे! “

“पण त्या दिलीपचं पुढं झालं काय? तो आणि त्याची बहीण, मेव्हणे वगैरे गेले तरी कुठं? “

” ते बघू आपण. पण सध्या तरी आपण त्या दिलीपनं पाठवलेल्या मेल्स वाचू. अं काय लिहितो हा… अरेरे, वाचू नये रे कुणाचं खाजगी काही.. त्यातल्या त्यात प्रेमात पडलेल्या माणसांचं.. ” गौतमनं त्या प्रिंट आऊटसचे कागद उलगडले. “अरे वा, अगदी रसिक आहेत हो ‘हे’ दिलीप. बघ की, पहिल्याच मेलमध्ये गालिब कोट केलाय त्यानं.. इष्क पर जोर नहीं, है ये वो आतिश गालिब, जो लगाये ना लगे और बुझाये ना बने’ “

“क्या बात है, गौतम. लोक अजूनही प्रेमपत्रांत गालिब वगैरे लिहितात? “

“अरे पुढं ऐक. ‘युवर स्टॅच्युएस्क फिगर रिव्हॉल्वज इन माय ड्रीम्स… ‘ ही शर्वरी आणि स्टॅच्युएस्क? तिला अवरग्लास फिगर म्हटलं नाही, हे नशीबच आपलं बापू. “

“आईज ऑफ दी बिहोल्डर, गौतम, आईज ऑफ दी बिहोल्डर. “

“हम्म. खरं आहे तू म्हणतोयस ते. आणि आपले दिलीप चांगले वाचकही दिसताहेत. डिलेक्टेबल डिनर, इनक्रेडिबल इंबेसिलिटी ऑफ माय काँफ्रेअर्स, माय अनएंडिंग पेरिग्रेशन्स… वा वा वा.. लेखक व्हायचा हा माणूस इंजिनिअर कसा काय झाला? आणि हे बघ, ऑफिसमधल्या राजकारणाला ‘बेत न्वा’ हा शब्द वापरलाय यानं.. आणि हे काय? ‘फॉरएव्हर युवर्स टिल दी ग्रिम रिपर सेपरेटस अस… ‘ म्हणजे तत्त्वज्ञानीही दिसताहेत हे दिलीप. आणि ‘काऊंटलेस ऑस्क्युलेशन्स? ‘ बापू, नको रे पुढचं वाचायला आपण. ती शर्वरी हे कागद द्यायला का संकोचत होती ते कळतंय मला आत. “

” पण यातनं काही कळतंय का आपल्याला? “

“हम्म. बरंच काही कळतंय बापू. आता फक्त एक करायचं आपण. शर्वरीच्या आईबाबांशी एकदा बोलून घेऊ. तिचा नंबर लिहिलेला कागद होता ना इथं कुठंतरी? एक काम कर. तिला फोन लाव, आणि तिच्या घरचा आणि दामलेंचा फोन नंबर घे तिच्याकडून. आणि दामलेंचा मेल आयडीपण घे. “

“तू काय करतोयस? “

“आता फारसं करता येण्यासारखं काही नाही बापू. तू तेवढे डिटेल्स घे, मी बघतो सकाळी अर्धवट राहिलेलं शब्दकोडं सुटतंय का ते! ” गौतम म्हणाला.

संध्याकाळी मी गौतमच्या फ्लॅटवर आलो तेंव्हा गौतम खुर्चीच्या दांड्यांवर पाय ठेवून पेंगत होता. माझ्याजवळच्या किल्लीनं मी दार उघडलं आणि तो आवाज ऐकून त्यानं आपले झोपाळलेले डोळे उघडले.
“भले शाब्बास! ” मी म्हणालो. “आम्ही इकडे कोडं सुटतंय का ते बघतोय, आणि महाराज झोपा काढतायत! “
“कोडं सुटलं की. ” गौतम म्हणाला.
“सुटलं? “
“हो. बत्तीस आडवा शब्द ‘पचंग’ आहे, ‘पंचांग’ नाही. आपण ‘पंचांग’ धरून चाललो होतो, त्यामुळं सगळा घोळ झाला. ‘पचंग बांधुनी तयार व्हा रे’”
“गौतम…मित्रा, शब्दकोड्याविषयी बोलत नाही मी. शर्वरी… मिस कारखानीसांचं कोडं सुटलं की नाही? “
“हां ते होय! ते काही फारसं अवघड कोडं नाही. सुटेल. वाजले किती? पाच? चल, आपण एक चहा मारून येऊ आणि बघू मग त्या मिस कारखानीसचं कोडं सुटतंय का ते.”
चहा पिऊन आम्ही परत येत होतो. माझ्या खांद्यावर हात ठेवून गौतम म्हणाला, “बापू, माझी एक जुनी धारणा आहे बघ. एखादं कोडं सोडवताना, जे जे निव्वळ अशक्य आहे, ते काढून टाकत जायचं. मग जे शेवटी शिल्लक राहील, तेच सत्य असलं पाहिजे; मग ते कितीही असंभव का असेना… “
“खरं आहे. ” मी म्हणालो.
“आता ही शर्वरीचीच केस बघ. या दिलीपच्या गायब होण्यामागं काय कारणं असतील? त्यानं त्याच्याविषयी, त्याच्या नोकरीविषयी दिलेली माहिती अशी अर्धवट, गूढ का आहे? या दिलीपच्या नाहीसं होण्यानं कुणाला सर्वात जास्त फायदा होणार आहे? मी अशी केस सोडवताना नेहमी स्वतःला त्या गुन्हेगाराच्या जागावर ठेवतो. या केसची गंमत अशी आहे, की यात गुन्हेगार कोण आहे, तेच कळत नाही. दिलीप? त्याचं तर शर्वरीवर खरंखुरं प्रेम दिसतंय. बरं, त्यानं शर्वरीकडून काही पैसे वगैरे उकळले असते, तर तेही समजण्यासारखें होतं. पण शर्वरीच्या बोलण्यात तसंही काही आलेलं नाही. मग काय? तुला काय वाटतं? “
“काही कळत नाही गौतम. “
“हम्म. आपल्यासमोर या साखळीच्या कड्या विखरून पडल्या आहेत बापू. फक्त त्यांना जोडणारा एक धागा अजून अदृष्य आहे. एकदा तो धागा दिसला की सगळं सगळं स्पष्ट होईल. चल, मी संध्याकाळी शर्वरीच्या आईवडीलांना भेटायला
बोलावलं आहे. बघूया त्यांच्या भेटीतून काही नवीन कळतं का ते. “
आम्ही वर गेलो. गौतमनं कंप्यूटर सुरू केला. ई मेल्स तपासता तपासता त्याच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हसू आलं. त्यानं त्याची डायरी उघडली आणि त्यातली नोंद वाचत तो म्हणाला, ” त्या दिलीपचं पूर्ण नाव काय म्हणाली शर्वरी? दिलीप वासुदेव दातार, नाही का? जीनीयस! बापू कोडं सुटलं आपलं! “
“सुटलं? काय झालं मग या दिलीपचं? कुठं आहे तो? “
गौतमनं एक प्रिंट कमांड दिली आणि तो प्रिंट आऊट माझ्यासमोर धरुन काही बोलायला तो तोंड उघडणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. मी पुढं होऊन दार उघडलं. दारात एक मध्यम उंचीचे, चाळीशीच्या आसपासचे गृहस्थ उभे होते. माझ्याकडं बघून काहीसे हसत ते म्हणाले, “मी नंदकुमार दामले. शर्वरी… मुलगी माझी. मला गौतम सरदेसाईंना भेटायचं आहे. आपण…? “
“मी बापू. गौतम आत आहेत. या ना, आत या. “
दामलेंनी मोकळेपणानं माझा हात आपल्या हातात घेतला. “तुमच्याविषयीही बोलली शर्वरी माझ्याशी. तुम्हा दोघांशी बोलल्यावर खूप धीर आलाय, म्हणाली. काय बघा ना वेळ आली तिच्यावर. सोन्यासारखी मुलगी.. “
“काळजी करू नका, दामले. सगळं ठीक होईल. ” मी त्यांना आतल्या खोलीत नेत म्हणालो.
गौतमनं दामलेंना बसायला सांगितलं. तिसऱ्या खुर्चीत मी बसलो. मी दामलेंकडं निरखून पाहिलं. कोकणस्थी रंग, चाळीशीनंतरही टिकलेले घनदाट केस. ते काळजीपूर्वक वळवलेले. डायही केला असावा. उत्तम कपडे. आणि भेदक बुद्धीमान डोळे. खोलवर घुसणारे तीक्ष्ण घारे डोळे.
“काय घेणार? चहा? कॉफी? ” गौतमनं विचारलं.
“काही नको, थँक्स. गेले चार दिवस अन्नपाण्यावरची वासनाच उडालीय आमची. ही तर खचलीच आहे. म्हणून तुमच्या मेलमध्ये तुम्ही तिला घेऊन या म्हणून लिहिलं होतं, पण काही शक्य झालं नाही ते. ” दामले म्हणाले.
गौतम आपल्या खुर्चीत जरासा रेलला. “हं. तुमचं उत्तर वाचलं मी दामले. आणि ते वाचून मला वाटलं तुम्ही मिस कारखानिसांच्या आईंना बरोबर आणलं नाही तेच बरं केलं. ” तो म्हणाला.
मला गौतमच्या शब्दांचं आश्चर्य वाटलं. शब्दांचं आणि शब्दांच्या निवडीचंही.
“हो, आता निराशा पचवण्याची ताकद नाही आहे हो तिच्यात. ” दामले म्हणाले. “मी त्या दोघींनाही सांगतोय गेले चार दिवस, की आपण दिलीपला विसरून जायला हवं; पण त्यांना ते शक्य होत नाहीये. शर्वरी तर.. मला भीती वाटते गौतमसाहेब, ती काही बरंवाईट तर… “
“अरे, नवल आहे. ” गौतम हसत म्हणाला. “मी तर तुम्हाला आज इथं चांगली बातमी द्यायला बोलावलं होतं.”
दामलेंच्या डोळ्यांत आता रागाची किंचित लाली आली. “काय.. अर्थ काय तुमच्या बोलण्याचा? ” त्यांनी जरा चढ्या स्वरात विचारलं.
“अर्थ असा दामलेसाहेब, की तुमचे दिलीप वासुदेव दातार मला सापडले आहेत. “
दामले ताडकन उठून उभे राहिले. “क्क.. कुठे आहेत ते? ” त्यांनी विचारलं.
गौतमनं हातातली पेन्सिल वरखाली हालवली. “खाली बसा दामले. स्वतःला फार हुषार समजता नाही का तुम्ही. आता इतक्या सहजासहजी सुटका नाही व्हायची तुमची. खाली बसा आणि मी सांगतो ती गोष्ट ऐका.”
“या पाताळयंत्री माणसाचा नीचपणा बघ, बापू, ” माझ्याकडं वळून गौतम म्हणाला. ” वयानं आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या बाईशी यानं लग्न केलं ते निव्वळ पैशाकडं बघून. कारखानिसांना हार्ट ट्रबल सुरू झाल्यावरच याच्या डोक्यात ती चक्रं फिरायला लागलेली असणार. पण लग्न झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की इस्टेट सगळी शर्वरीच्या नावावर आहे. जोवर शर्वरीचं लग्न होत नाही, तोवर ती बिचारी नेमानं तिच्या आईकडं पैसे देत राहील, आणि तिच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर हा हरामखोर चैन करत राहील..पण पुढं काय? एकदा का शर्वरीचं लग्न झालं की सगळा पैसा, सगळी इस्टेट गेली याच्या हातातून. “
दामलेंनी खिशातला रुमाल काढून घाम पुसला.
“मग हा करतो काय? तर शर्वरीचं लग्नंच होऊ नये यासाठी प्रयत्न करायला लागतो. एकदोनदा जुळत आलेलं लग्न नाही जमलं असं म्हणाली ती. मला खात्री आहे, यानंच त्याच्यात मोडता घातलेला असणार. पण हे फार दिवस चालणार नाही, हे कळाल्यावर हा एक वेगळीच शक्कल लढवतो. “
मी अवाक होऊन ऐकत होतो. दामले खाली मान घालून बसले होते. “शर्वरी किती हळवी, किती भावनाप्रधान आहे हे आपण बघीतलं बापू. याच्याही हे ध्यानात आलेलं असणार. शिवाय शर्वरीची कमकुवत नजर. त्याचाच फायदा घ्यायचा ठरवला यानं. हा करतो काय, तर स्वतःच वेषांतर करून दातार होतो. दिलीप वासुदेव दातार. शर्वरीला हा भेटतो तेही संध्याकाळनंतर. त्याचा गॉगल, त्याचा कमकुवत आवाज, त्याचे जाड कपडे… हा फोटो बघ बापू… आणि कुणीतरी अप्रतिम मेकअप आर्टिस्ट.शर्वरीला काही शंका येत नाही. ती त्याच्यात गुंतत जाते. मग त्या आणाभाका, त्या शपथा.. कशासाठी? तर तिनं पुन्हा लग्नाचा विचारही करू नये याच्यासाठी! आणि साखरपुड्याला तो उगवतच नाही. उगवणार कसा? होणारा जावई म्हणजे खुद्द सासराच आहे ना! “
गौतमनं दामलेंकडं तिरस्कारानं बघीतलं. “अमरावतीचं घर, भुवनेश्वरची बहीण, मेव्हणे, भाचे.. सगळ्या थापा!” शर्वरीनं आणलेले इ मेलचे प्रिंट आऊटस दामलेंसमोर टेबलवर फेकले. ” इंग्रजी उत्तम लिहिता तुम्ही दामले. फ्रेंचही शिकलायत वाटतं! छान, छान! शर्वरीला आलेली ‘बिले दू’ काय? यू हॅव माय ‘कॅस्ट ब्लाँश’ मिस्टर सरदेसाई काय? आणि शायरीची काय आधीपासूनच आवड आहे की या कामासाठी वाचली खास? आं?”
आपल्या खुर्चीतून उठून गौतम आता खोलीत येरझाऱ्या घालत होता. ” काय माणूस आहे बघ हा बापू. किती विलक्षण बुद्धीमत्ता! पण चुकीच्या ठिकाणी लावली कामाला. आपल्या बुद्धीचा माज चढला ना एखाद्याला, की तो माज उतरायलाही वेळ लागत नाही. दामले, फार मस्त गेम खेळलात तुम्ही. पण टाईप करताना ती स्पेलचेक लावण्याची सवय तेवढी लावून घ्या बुवा. टाईप करताना ‘एस’च्या जागेवर घाईघाईत कधीकधी ‘ए’ टाईप होतो तुमचा. या मेल्स बघा दिलीप दातारच्या आणि ही तुमची मेल मघाची. आणखीही एकदोन गोष्टी आहेत सारख्या. की सायबरक्राईमला फोन करून दोन्हींचे आय पी ऍड्रेसेस चेक करायला सांगू? पण तुम्ही तयार लोक नाही का! दोन वेगवेगळ्या ठिकाणांहूनही पाठवल्या असतील मेल्स.. “
“गंमत.. गंमत होती ती सरदेसाई” दामले तुटक आवाजात म्हणाले.
“गंमत? एखाद्या निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळणं ही गंमत? अरे नीच माणसा… “
“हे बघा सरदेसाई, उगीच शिव्या द्यायचं काम नाही. ” दामलेंच्या आवाजात आता मग्रुरी आली होती. ते उठून उभे राहिले होते. “तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो. बाकी तुमची काय तक्रार असेल तर तुम्ही पोलिसात जा, कोर्टात जा… “
“पोलीस! हूं! ” गौतम तुच्छतेनं म्हणाला. दामलेंच्या समोर उभं राहून त्यानं दामलेंच्या डोळ्यांत रोखून बघीतलं. “दामले, एक लक्षात ठेव. पुन्हा त्या मुलीला काही त्रास होता कामा नये. तिच्या केसालाही धक्का लावशील तर पस्तावशील. तिच्यामागं कुणी नाही असं समजू नकोस. तिच्यामागं हा गौतम सरदेसाई आपल्या सगळ्या शक्तीनिशी उभा आहे… “
“आणखी काही? ” दामले कुऱ्यात म्हणाला.
“गेट आऊट! “
दामलेंनी नाटकीपणानं मान झुकवली आणि बुटांचा टपटप आवाज करत ते निघून गेले.
गौतमनं सिगरेट पेटवली. “तुला माहिती आहे, बापू, आफ्रिकेतल्या जंगलांत काही वेली आहेत. पहिली काही वर्षं त्या अगदी निरुपद्रवी, अगदी सामान्य असतात. एका ठराविक वयानंतर बाकी त्यांच्यातल्या रसाचं जणू जहर व्हायला लागतं. त्यांच्या लाईफसायकलच्या एका विशिष्ट स्टेजला त्या अगदी विषारी, प्राणघातक होतात. असं का होतं हे अद्याप कुणालाही कळालं नाही. पण तसं ते होतं खरं. हा माणूस, दामले, तसलाच वाटतो मला. मूळचा हुषार, अगदी प्रतिभावान, पण अक्कल कुठे वापरली बघ त्यानं.. “
मी काहीच बोललो नाही.
“आणखी एक, एखादा कलाकार जसा आपल्या कलाकृतीवर कुठेतरी आपली स्वाक्षरी नोंदवून ठेवतो, तसे हे गुन्हेगारही आपल्या गुन्ह्यांवर कुठेतरी आपले फिंगरप्रिंटस ठेवून जातात. भिंतीत कलात्मक भोक पाडून चोरी करणारा आणि ‘कल जब लोग देखेंगे तब प्रशंसा होनी चाहिये’ म्हणणारा ‘उत्सव’ मधला चोर आठवतो ना तुला. या गुन्ह्यावरही दामलेनं स्वतःची एक स्वाक्षरी ठेवली आहे. त्यामुळंच तर मला पक्की खात्री पटली.
“काय? कुठली स्वाक्षरी? “
“दिलीप. दिलीप वासुदेव दातार. त्याची आद्याक्षरं घे, दि. वा. दातार. काही आठवतं? “
“दिवाकर दातार! “
“बरोबर! बाकी गोष्टींनी माझा संशय बळावतच चालला होता, या एका गोष्टीनं बाकी खात्री झाली. ” गौतम म्हणाला.

“पण गौतम.. हा माणूस… काका म्हणते ती मुलगी त्याला. कित्येक वर्षांचे संबंध त्यांचे. तो माणूस इतका नीचपणा करू शकेल? कशासाठी? फक्त – फक्त पैशासाठी? माणूस इतका घसरू शकतो? “
“हेच बापू, हेच. मी म्हणत होतो ते जळतं, धगधगीत वास्तव हेच. सगळी नाती, मानवी मूल्यं आणि कायकाय तुमच्या शब्दांच्या कागदी होड्या बुडवून टाकणारा माणसाचा स्वार्थ, माणसाची विकृती, हेच ते वास्तव. आता मला सांग बापू, आहे का कुणा लेखकाच्या लेखणीत ताकद.. असलं काही कागदावर आणण्याची? “
“पण हा हलकट तर… आणि त्याला शिक्षा काहीच नाही? “
“दुर्दैवानं – काहीच नाही. या खोलीत जे झालं ते आपण न्यायालयात सिद्ध करू शकणार नाही, आणि सिद्ध झालं तरी एखाद्या मुलीचा प्रेमभंग करणं याला आपल्या घटनेत शिक्षा नाही अजून. “
“आणि शर्वरी.. तिचं काय? “
“आपण काय करू शकतो बापू? तिला सावध करणारं एक पत्र टाकतो मी आज. स्पष्ट काही लिहित नाही, पण त्या दामलेपासून जरा सावध राहा, असं लिहितो. तिला ‘ता’ वरनं ताकभात कळत असेल, तर तिच्या लक्षात येईल. नाहीतर ती आणि तिचं नशीब. त्या दिलीपच्या स्वप्नांतून बाकी ती काही बाहेर येईल असं वाटत नाही. पण दिलीपच्या गायब होण्यामागं दामलेचा हात आहे, एवढं जरी तिला कळालं, तरी दामले संपलाच म्हणून समज. अरे, एखाद्या स्त्रीच्या स्वप्नांशी खेळणं म्हणजे वाघिणीच्या गुहेत शिरून तिच्या बछड्यांना हात घालण्यासारखं आहे. होय की नाही? घे, सिगरेट घे बापू. “

(सर आर्थर कॉनन डॉइल यांच्या ‘ अ केस ऑफ आयडेंटिटी’ वर आधारित )

Published in: on June 15, 2009 at 12:05 pm Leave a Comment

माझ्या संग्रहातील पुस्तके – मिरासदारी

द. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही. मिरासदारांचा विनोद टाळ्या खूप घेतो, पण तो ‘टंग इन चीक’ च्या मर्यादा क्वचितच ओलांडतो. बर्‍याच वेळा मिरासदारांचे लिखाण हे शाळकरी मुलांनी शाळकरी मुलांसाठी केलेले, बाळबोध वाटते. शारिरीक व्यंगे, हाणामारी, आळशीपणा, झोप अशा विषयांवरील मिरासदारांचा विनोद प्राथमिक अवस्थेत अडकून राहिल्यासारखा वाटतो. मिरासदारांच्या कथांमधील व्यक्ती गंमतीदार, तर्‍हेवाईक आणि विविधरंगी असल्या तरी त्या कचकड्याच्या वाटतात. भोकरवाडी आणि तिथले ग्रामस्थ यांच्याविषयीच्या मिरासदारांच्या कथा वाचताना क्वचित हसू येते, पण दीर्घकाळ स्मरणात राहाणारा आणि केवळ स्मरणानेही आनंद देणारा विनोद मिरासदारांच्या हातून क्वचितच लिहिला गेला आहे.
अर्थात वरील नकारात्मक विधाने ही मिरासदारांच्या सर्वच लिखाणाला लागू नाहीत. मिरासदारांचे बरेचसे विनोदी लेखन (मला) कमअस्सल वाटत असले तरी मिरासदारांनी काही अगदी जिवंत, खरोखर गंमत आणणार्‍या आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गंभीर आणि हृदयस्पर्शी अशा कथा लिहिल्या आहेत. एक लेखक म्हणून आवश्यक असणारे सगळे गुण – उत्तम निरिक्षणशक्ती, शब्दांवरील पकड आणि लेखनाची रचना करण्यासाठी गरजेची ती कुसर – क्राफ्ट – हे मिरासदारांकडे आहेत याचा पुरावा देणार्‍याच या कथा. दुर्दैवाने मिरासदारांनी विनोदनिर्मिती करण्यासाठी अतिशयोक्ति, अतिरंजन हे साधन प्रामुख्याने निवडले; आणि म्हणून त्यांच्या कथा या तिखटामिठाच्या लाह्यांसारख्या तडतडीत झाल्या आहेत. खमंग, तोंडात असताना बर्‍या लागणार्‍या, पण भूक फक्त चाळवणार्‍या. मराठी वाचकाची भूक भागवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात अभावानेच आढळते.
‘मिरासदारी’ या मिरासदारांच्या निवडक कथांच्या संग्रहात मिरासदरांच्या अशा गर्दीखेचक कथांबरोबरच त्यांच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवून देणार्‍या काही सुंदर कथाही आहेत. खेड्यातली शाळा या विषयावर मिरासदारांनी पुष्कळ कथा लिहिल्या आहेत. ‘शिवाजीचे हस्ताक्षर’, ‘शाळेतील समारंभ’, ‘माझ्या बापाची पेंड’, ‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ या त्यातल्या काही कथा. यातल्या काही कथांमधला नायक हा शाळेत जाणारा लहान मुलगा आहे; त्यामुळे त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी सरळ, साफ आहे. आणि त्याच्या आसपासची मंडळी बाकी तयार, बेरकी आहेत. या विसंगतीमुळे काही विनोदी प्रकार घडतात. गावाकडची तर्‍हेवाईक मंडळी आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमती यावर मिरासदरांनी लिहिलेल्या ‘भुताचा जन्म’, ‘धडपडणारी मुले’, ‘व्यंकूची शिकवणी’, ‘नदीकाठचा प्रकार’, ‘निरोप’, ‘झोप’ वगैरे कथाही माफक विनोदनिर्मिती करतात, पण त्या वाचताना नकळत (आणि तसे करणे योग्य नाही हे माहिती असूनही) अशा प्रसंगांवर व्यंकटेश माडगूळकरांनी केलेले अस्सल देशी आणि कसदार लिखाण आठवते. असे बरेवाईट करणे योग्य नव्हे, हे खरे, पण तशी तुलना होते खरी ; आणि मग तिथे मिरासदार काहीसे फिके पडल्यासारखे वाटतात. पण मिरासदारांचे लिखाण इतके विपुल आहे, की त्यांच्या खरोखर दर्जेदार कथा तुलनेने कमी असूनही बर्‍याच आहेत.’नव्व्याण्णवबादची एक सफर’, ‘कोणे एके काळी’ ‘विरंगुळा’, ‘गवत’, ‘पाऊस’, ‘साक्षीदार’ ‘स्पर्श’ या प्रस्तुत संग्रहातील अशा काही कथा. (मिरासदारांच्या या संग्रहात नसलेल्या ‘हुबेहूब’ वगैरे इतर काही कथाही या निमित्ताने आठवतात.)
‘नव्व्याण्णवबादची एक सफर’ ही गावातल्या थापाड्या नाना घोडक्याची कथा. खेड्यातल्या रुक्ष, आशाहीन जीवनात गावकर्‍यांना नानाच्या थापांचाच विरंगुळा आहे. त्या लोणकढ्या आहेत हे जसे नानाला ठाऊक आहे, तसे गावकर्‍यांनाही. तरीही नाना तर्‍हेतर्‍हेच्या गोष्टी सांगतो आहे आणि गावकरीही त्या ऐकून घेताहेत. आपले लग्न व्हावे ही सुप्त आशा ठेऊन असलेल्या नानाला एक देवऋषी खोटे बोलू नको, मग मार्गशीर्षापर्यंत तुझे लग्न होईल असे सांगतो. त्याप्रमाणे नाना त्याच्या अद्भुत कथा सांगणे बंद करतो. मग हळूहळू त्याची लोकप्रियताही ओसरते. रोजच्या, तुमच्या आमच्यासारख्या अळणी आयुष्यात कुणाला रस असणार? मार्गशीर्ष येतो आणि जातो, पण बिचार्‍या नानाचे लग्न काही होत नाही. जिवाला कंटाळलेला नाना जीव द्यायला पाण्यात उडी घेतो, पण गावकर्‍यांपैकी कुणीतरी त्याला वाचवते. भानावर आलेल्या नानाला ओळखीचे चेहरे दिसतात, त्याला सगळे आठवते, आणि आपल्या आयुष्यात आता हिरवळ येणार नाही हे पचवलेला नाना परत एक फर्मास गोष्ट सांगायला लागतो. मिरासदार लिहितात,’.. आणि मग संध्याकाळच्या त्या शांत, उदास वेळेला नानाच्या आयुष्याला पुन्हा एकदा अर्थ आला. तो गोष्ट सांगत राहिला, माणसे तन्मय होऊन ऐकत राहिली आणि ते रुक्ष, भकास वातावरण पुन्हा एकदा अद्भुततेने भरुन गेले.’
‘कोणे एके काळी ‘ ही मिरासदारांच्या पोतडीतून निघालेली एक वेगळी चीज आहे. एका राजाच्या पदरी असलेल्या एका सामान्य रुपाच्या पण बुद्धीमान विदूषकाची ही कथा मिरासदारांनी जुन्या, संस्कृतप्रचुर भाषेत लिहिली आहे. भाषेचा बाज राखण्यात थोडेसे कमी पडलेले मिरासदार कसदार कथानकाने ही कसर भरुन काढतात. प्रथमपुरुषी निवेदनात्मक शैलीने लिहिलेल्या या कथेत काही वाक्ये विलक्षण चटका लावणारी आहेत. ‘अभिसाराला आलेली ती सुंदर चतुर तरुणी मोठ्या उत्कंठेने अंतर्गृहात गेली – माझ्या दृष्टीसमोर गेली – आणि एखाद्या तपस्व्यासारखी शुष्क मुद्रा धारण करुन मी तेथेच उभा राहिलो. वज्रासारखे अंगावर पडणारे चांदणे मोठ्या धैर्याने सहन करीते एकटाच उभा राहिलो..’
‘विरंगुळा’ ही निर्विवादपणे मिरासदारांच्या सर्वश्रेष्ठ कथांपैकी एक ठरावी असे मला वाटते. कोर्टातल्या गरीब कारकुनाची ही कथा वाचकाला हळवी करणारी आहे. आयुष्यात कसलीच उमेद नसलेल्या तात्यांचा विरंगुळाही भेसूर, जगावेगळा आहे. कुणी मेले की त्याच्या मर्तिकाची व्यवस्था करण्यापासून त्याची महायात्रा संपवून येणे हाच तात्यांचा छंद आहे. त्यात एकदा गुंतले की एरवी गरीबीने, परिस्थितीने पिचलेले, गांजलेले तात्या उत्तेजित होतात, त्यांच्या अंगात काहीतरी वेगळे संचारते. मग तिथे त्यांच्या शब्दांना किंमत असते, त्यांना मान असतो, त्या जगात ते सांगतात आणि इतर सगळे ऐकतात… पण एकदा का ते सगळे आटोपले आणि तात्या घरी आले की परत डोळ्यांसमोर ते भीषण दारिद्र्य उभे राहाते. ते बकाल घर, घरातल्या कधी न संपणार्‍या मागण्या आणि चार पैशाचा हट्ट पुरवला न गेलेली, आईच्या हातचा मार खाऊन, गालावर अश्रूंचे ओघळ घेऊन मुसमुसत झोपी गेलेली लहान मुले…
मिरासदारांच्या प्रतिभेविषयी जर कुणाला शंका येत असेल तर ती नि:संशयपणे नाहीशी करणारी त्यांची कथा म्हणजे ‘स्पर्श’. ही कथा म्हणजे कधीकधी साहित्यीक आपल्या नैसर्गिक पिंडाला संपूर्ण छेद देणारे काही लिहून जातो, तसे आहे. अगदी सर्वमान्य उदाहरण द्यायचे तर ‘नंदा प्रधान’ सारखे. कुटुंबातल्या वृद्ध स्त्रीच्या निधनानंतर तिच्या दहाव्याला आलेले नातेवाईक. त्या स्त्रीच्या आठवणी. पुन्हापुन्हा भरुन येणारे डोळे. पिंडाला न शिवता घिरट्या घालणारा कावळा. अस्वस्थ झालेले भटजी आणि या सगळ्यांतून काही भेदक अर्थ काढणारी मने. मध्यमवर्गीय, संस्कारजड, भाबडी मने. या सगळ्या वैराग्यवातावरणाबाबत मिरासदार काही जबरदस्त वाक्ये लिहून जातात. ‘पिंड उन्हात चमकत होता. झाडावर कावळे उगीच बसून राहिले होते. एखादा मध्येच कावकाव करत होता. काही तरी गूढ, न कळणारे समोर उभे होते. एकदा ते चित्र निरर्थक वाटत होते आणि मग त्यात फारच गहन तत्व भरलेले दिसत होते. मृत्यूची महानदी, काळेभोर अथांग पाणी, ऐलतीरावरची जिवंत माणसे आणि पैलतीरावरील धूसर वातावरण – सरळ साधा व्यवहार आणि अगम्य गोष्टी यांचे नाते जोडण्याची धडपड. यत्न आणि कर्मफळ यांचे लागेबांधे. उजेडातून अंधाराकडे पाहण्याची कोशीस… सुन्न मनात विचाराची मोहोळे उठत होती. असले काहीतरी जाणवत होते आणि तरी ते फार अस्पष्ट होते’
असले लिहू शकणार्‍या मिरासदारांनी विनोदी (म्हणून जे काही लिहिले आहे ते) साहित्य लिहिले नसते तरी चालले असते, असे वाटते.
असल्या काही अरभाट आणि काही चिल्लर कथांचे ‘मिरासदारी’ हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
मिरासदारी
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
३६५ पृष्ठे
किंमत १०० रुपये

Published in: on June 14, 2009 at 12:27 am Leave a Comment

माझ्या संग्रहातील पुस्तके – ७ कुसुमगुंजा

जी.ए.कुलकर्णींच्या काहीशा अपरिचित पुस्तकांपैकी एक म्हणजे १९८९ साली प्रकाशित झालेले ‘कुसुमगुंजा’ हे पुस्तक. या पुस्तकाची रचना व त्याचे नाव जी.एंनी आपल्या हयातीत ठरवले होते, मात्र या पुस्तकावर शेवटचा हात फिरवण्याइतका वेळ बाकी त्यांना मिळाला नाही. जी.एं च्या ‘माणसे – अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकाबाबतीतही असेच झाले आहे. पण ‘माणसे’ प्रमाणेच ‘कुसुमगुंजा’ हे पुस्तकही अपूर्ण किंवा कच्चे वाटत नाही.
‘कुसुमगुंजा’ हा जी.एंनी त्यांच्या हयातीतल्या वेगवेगळ्या टप्प्यांत लिहिलेल्या छोट्या कथांचा संग्रह आहे. यातल्या सर्व कथा जी.एंच्या नेहमीच्या कथांच्या तुलनेत अगदी लहान आहेत. ‘एक मित्र – एक कथा’ ही लेखसदृश कथा ही या संग्रहातील सर्वात मोठी. पण अस्सल प्रतिभावंताला वातावरणनिर्मितीसाठी भारंभार लिहावे लागत नाही, हा दृष्टांत देणार्‍याच जणू या कथा आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुरुषोत्तम धाक्रस म्हणतात,’ज्याच्या लिखाणातील शब्द काढता येत नाही किंवा काढताना दहा वेळा विचार करावा लागतो तो लेखक महान – या पट्टीने मोजून घ्यावा असा हा लेखक असल्याचे इथे सतत जाणवते.’ ‘कुसुमगुंजा’ तील कथाकथांवर जी.एंची अशी एक न पुसली जाणारी स्वाक्षरी आहे. अर्थात अट्टल जी.ए.प्रेमींना ‘काजळमाया’ किंवा ‘पिंगळावेळ’ च्या तुलनेत ‘कुसुमगुंजा’ मधील काही कथा किंचित खांडेकरी छापाच्या आणि बाळबोध (बालीश हा शब्द लिहायला हात कचरतो!) वाटण्याची शक्यता आहे (अगदी ‘सोनपावले’ मधल्या कथांइतक्या नसल्या तरी!) जी.एंना गूढकथा व काहीशा रहस्यमय छापाच्या कथांचेही आकर्षण होते हे एक, आणि आरंभीच्या काळात जी.एंच्या कथांवरील चेकॉव्हचा प्रभाव हे दुसरे लक्षात घेतले तर ‘क्षुद्र’, ‘देवपूजा’, ‘लिरा’, काळी आजी’ या कथांमधून हळूहळू स्वतःच्या वाटेला जाणारे जी.ए. दिसू लागतात. जी.एंच्या पश्चात त्यांच्या काही हस्तलिखितांवरुन आणि ध्वनीफितींवरुन घेतलेल्या ‘तपकिरी बी’, ‘कधी तरी’,'पिवळा पक्षी’ वगैरे कथाही या संग्रहाची पाने वाढवण्यासाठी परचुरेंनी घातलेले पाणी आहे की काय असे वाटू लागते. पण या पुस्तकाच्या मध्यात असलेल्या ‘चैत्र’, ‘लग्न’, बारसे’, ‘ फेड’, ‘ सिनेमा’, ‘ग्रहण’, ‘गार्‍हाणे’,'होळी’, ‘एक मित्र-एक कथा’ या कथा बाकी चोख बावनकशी आहेत. यातली ‘अंधार’ ही कथा खरे तर ‘सांजशकुन’ मध्ये कशी काय आली नाही याचे नवल वाटते. जी.एंच्या काही अप्रतिम दृष्टांतकथांपैकी ही एक. रखरखत्या उन्हातून प्रवास करणारे दोन प्रवासी. पैकी एक अंध. त्यांच्या वाटेत आलेला एक भव्य रुद्र तेजस्वी पुरुष.अंधाला प्रकाश म्हणजे काय ते माहीत नाही, तर त्या भव्य पुरुषाला अंधार म्हणजे काय हे माहीत नाही. त्याला प्रकाशाचा चिरंतन शाप आहे. हे एकदोनदा ऐकून त्या अंधाचा सहप्रवासी विचारतो,
“मनुष्याच्या वाट्याला दु:ख आलं, पण रात्रीच्या शांत विश्रांतीची देणगीही आली. ती सम्राटापासून दरिद्री माणसापर्यंत सगळ्यांना मिळते. हा अंध आहे. त्याला चांदण्याचं वैभव माहीत नाही, पाण्यावरील जरतारी नक्षी ठाऊक नाही. पण तोदेखील स्वतःच्या दु:खापासून स्वतःला अंधारात हरवतो. मग आपणंच असं का म्हणता?”
तो भव्य पुरुष किंचित हसला. ते हसणे आर्त होते. त्याचा आवाज भोवती पसरलेल्या उन्हाप्रमाणे धगधगीत होता.
“पण माझ्या वाट्याला मात्र चिरंतन प्रकाशाचा शाप आला. तू मानव असून भाग्यवान आहेस. हे मानवा, मी सूर्य आहे.”
‘चैत्र’, ‘लग्न’, ‘बारसे’, ‘फेड’, ‘सिनेमा’ या कथा लहान मुलांभोवती फिरतात. यातल्या
विषयी मी पूर्वी लिहिले होते. ‘फेड’ हीसुद्धा अशीच एक सुरेख कथा. (गेल्या वर्षी एका कार्यक्रमात ‘फेड’ आणि ‘पराभव’ या जी.एंच्या कथांचे दूरदर्शनसाठी केलेले रुपांतर पाहिले होते आणि असले काही जी.एंच्या हयातीत झाले नाही याचेच समाधान वाटले होते!) ‘ग्रहण’ हीसुद्धा अशीच एक खास जीएस्पर्श असलेली कथा. पावसात भिजत ग्रहणाचे दान मागायला आलेल्या म्हातारीच्या कटकटीला कंटाळून दादूभट एक फाटका सदरा देतो खरा, पण काही उनाड टाळकी हिसकाहिसकी करुन त्या सदर्‍याचा एक हातच फाडून पळवून नेतात. त्या पोरांवर चिडलेल्या दादूभटाकडे बघून म्हातारी हसत म्हणते,”हेच तर बेस झालं दादा. म्हातारीची कटकट र्‍हायली नव्हं! नाही तर बघा, डोळे फोडून घेत म्हातारीलाच उसवत बसावं लागलं असतं सगळं किचकट्ट! पोरांनी उपकारच केला की डोंगराएवढा. अवो, आता काय सांगायचं नशीब? माझ्या पोरग्याला पुरा उजवा हातच नाही वो दादा!”
‘गार्‍हाणे’ ही तसे विशेष काही कथासूत्र नसलेली पण उत्तम कथा. संततीसौख्याला पारख्या झालेल्या रमाकाकूंचे ते एक व्यक्तिचित्रच. पण जी.एंचा स्पर्श या व्यक्तिचित्राला विलक्षण उंची देऊन जातो. तसलेच एक व्यक्तिचित्र ‘एक मित्र-एक कथा’ मध्ये आहे आणि इथे बाकी हा माणूस हयात असता तर आपण त्याला भेटायला गेलो असतो असे मला वाटून गेले. जी.एंसारखेच पराकोटीचे पूर्वग्रह आणि इसाळ बाळगून असलेला हा तर्कटी डोक्याचा खरखरीत माणूस पण साबणाच्या वड्यांसारख्या एकसारख्या एक दिसणार्‍या मऊ बुळबुळीत माणसांमध्ये हा आणूस एक उग्र ओरखडा काढून गेला असावा असे वाटले. याच कथेत एका जहाजावरील गर्भार मांजरी व बुशमास्टर साप यांच्याविषयी ‘अर्गसी’ मासिकात प्रकाशित झालेल्या एका कथेचा उल्लेख आहे. या कथेचे भाषांतर करण्याचे मनात असूनही ते जी.एंकडून झाले नाही याची जी.एंना चुटपूट लागलेली दिसते. तशी ती आपल्यालाही लागते.
आणि या संग्रहाचाचा शेवट करणारे ते दीड पानाचे व्याकूळ टिपण – ‘निरोप’. आपल्या शर्तींवर ताठ मानेने जगून, लेखन, वाचन, चित्रे, चहा, पुस्तके, सिगारेटी यांच्यात शांत गावात रमून आणि जनांच्या गलबल्यातून सतत दूर राहून कुणाच्या नकळत पलीकडे निघून गेलेल्या एक तपस्व्याचा निरोप. ‘माझे हात रिकामे दिसले तरी ते रिते नाहीत’ असे दिंडी उघडणार्‍या द्वारपालांना सांगणारा निरोप. धुळीने भरलेल्या अनवाणी पण रोख पावलांनी घेतलेला निरोप.आणि या निरोपाचीही जी ए याचना करत नाहीत, तर पुस्तक वाचताना पान उलटावे तितक्या सहजपणाने हातातले हात सोडवून घेऊन अंधारात निघून जातात. ‘काही झाले तरी माझ्या आयुष्यभर तू सांगाती सहप्रवास केलास. आता आपले मार्ग निराळे होत आहेत. अशा या अंतिम क्षणी तू मला मुक्त मनाने निरोप दे. कारण आता मी निघालो आहे. मला स्वच्छ निरंजन मनाने निरोप दे’ हे वाचताना काळा चष्मा लावलेला, मधोमध भांग पाडलेला, तपकिरी रंगाचा कोट घातलेला हा माणूस हळूहळू दिसेनासा होतो. त्याच्या हातातील जळत्या सिगारेटचे टोक काही काळ अंधारात चमकत राहाते. नंतर तेही दिसेनासे होते. आपले पुस्तक वाचून संपलेले असते.
जेमतेम सव्वाशे पानांचे पण विलक्षण अनमोल असे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.
कुसुमगुंजा
परचुरे प्रकाशन मंदिर
आवृत्ती पहिली १० जुलै १९८९
मूल्य १२५ रुपये

Published in: on June 10, 2009 at 2:49 pm Leave a Comment

निशापती महाराजांची चिकीर्षा

प्रावृष ऋतूच्या आगमनाची द्वाही फिरवणारे केकास्वर निशापती महाराजांच्या महालाभोवती रुंजी घालून गेले तरीही प्रत्यक्ष पर्जन्याचे आगमन होण्यास विलंब होणार असेच संकेत दिसत होते. दिनक्षयसमयी प्रवातागमन नित्याचे झाले होते, तथापि उदकधारांचे उर्वीमीलन काही केल्या होत नव्हते. वातावरणातील उत्ताप काही कमी होत नव्हता.

आपल्या महालात व्याकुलावस्थेत पहुडलेल्या निशापती महाराजांना उष्माप्रकोपाची पीडा असह्य झाली होती. प्रस्वेदबिंदूंनी निशापती महाराजांचे पीनमुख प्रच्छन्न झाले होते. आपल्या पीवर करकमलांत धरलेल्या कार्पासपटाने  ते पुनःपुन्हा घर्ममोचनाचा यत्न करत होते तथापि वसंतसमयातील पुष्पांवर वारंवार आकर्षित होणाऱ्या भृंग्याप्रमाणे स्वेद त्यांच्या गात्रागात्रांकडे आकृष्ट होत होता. परिश्रांत होऊन निशापती महाराजांनी आपली तुंदिल तनू शय्येवरून उन्नत केली.  वासगृहाच्या वातायनाला सन्मुख होऊन ते काही क्षण अर्धनिःसंज्ञावस्थेत तिष्ठत राहिले. तेवढ्यातही दिवाकराच्या रश्मिदंडांने त्यांच्या लोचनांस काही कष्ट झाले.  संधारावरील एक परिपक्व आम्रफल उचलून त्यांनी त्याचे अवघ्राण केले, तथापि आपल्या अशनाहीनतेचे स्मरण होताच त्यांनी ते फल पुनःश्च संधारावरील तबकात ठेवले.
विभ्रमावस्थेतच त्यांनी किंचित तीव्र असे करताडन केले. एकदा, दोनदा. त्यांच्या अधिर कृतींमधून त्यांचे क्षीण मनस्वास्थ्य प्रतीत होत होते. द्वारावरील यवनिकांचे सूक्ष्म आंदोलन झाले आणि महाराजांचा प्रियतम परिचारिक भ्रातृभजन महालात प्रविष्ट झाला. महाराजांना प्रणाम करून तो नम्रपणे महालाच्या भित्तीनिकट उभा राहिला. उभयतांच्या मौनावस्थेत कालाने काही पळांचे भक्षण केले.

“भ्रातृभजना.. ” महाराजांनी त्या अभाषणाचे खंडन करत वक्तव्य केले. “आमच्या प्रिया, सखी, मार्गदर्शक सुभाषिणीदेवी सांप्रत कोणत्या स्थळी आहेत याचे तुला प्रज्ञान आहे काय? “
एखाद्या मंजूषेत भयंकर विषारी सर्प आहेत याचे ज्ञान असतानाही  ती  मंजूषा मस्तकावरून वाहण्याचे बळ व्हावे तसे  भ्रातृभजनाच्या ओष्ठांचे अल्पस्फुरण झाले. संकोच आणि निष्ठा यांच्यातील त्याच्या अंतःकरणात चाललेल्या  द्वंद्वाचे त्याच्या मुखावर किंचित्काल प्रकटन झाले. तथापि महाराजांच्या लवणभक्षणाला स्मरून   महाराजांच्या प्रती असलेल्या त्याच्या निष्ठेने त्याच्या मनातील स्वाभाविक संकोचावर जय मिळवला. कंठातील श्लेष्माचे निर्मूलन करण्याचा त्याने काहीसा असफल यत्न केला आणि सेवकाच्या मर्यादाशील स्वरात तो म्हणाला, “महाराज, सुभाषिणीदेवींचे स्वास्थ्य ढळल्याचे श्रवणात आले आहे. गुरुदेव राजवैद्यांच्या महाली त्यांच्यावर वैद्योपचार सुरू आहेत. “
“काय? हे वर्तमान आमच्या कर्णांपर्यंत येण्यास इतका विलंब का झाला भ्रातृभजना? देवींना काय कष्ट होत आहेत भ्रातृभजना? “
“क्षमा असावी महाराज. परंतु सेवकाच्या अधिकाराबाहेरच्या या गोष्टी आहेत. सुभाषिणीदेवी.. “
“विराम घेऊ नकोस, भ्रातृभजना, तुला आमचे अभय आहे. देवींना…? “
“महाराज, देवींना काही मनस्ताप असल्याचे ऐकतो आहे. काही कालापूर्वी आपल्या साम्राज्याच्या शत्रुपक्षातील काही व्यक्तिविशेषांबद्दल देवींकडे काही पृच्छा झाली होती, असे ऐकिवात आले आहे. त्यामुळे आधीच अतिसंवेदनशील असलेल्या सुभाषीणीदेवींचे मन भयशंकाग्रस्त झाले आहे. त्याकारणे त्या क्रोधातिरेकाच्या आहारी जाऊन मतिभ्रमित झाल्या आहेत. देवींना तीव्र निद्रानाश जडला असल्याचे वृत्त आहे. समस्त नरजातीविषयी त्यांच्या मनी काही छद्म उपजले आहे. गुरुदेव वैद्यराज उपचार करत आहेत, महाराज. आपण स्वस्थ राहावे….. “
“आम्ही कसे स्वस्थ राहाणार भ्रातृभजना? कसे स्वस्थ राहाणार? सुभाषिणीदेवींच्या सामर्थ्यावर तर आमच्या राज्याचे क्षेम अबाधित आहे. जा, भ्रातृभजना, सत्त्वर गमन कर. या क्षणी  गुरुदेव वैद्यराजांच्या महाली जा आणि आम्ही त्यांचे स्मरण केले आहे हा आमचा संदेश त्यांच्यापर्यंत संवाहित कर. ते जर अन्नग्रहण करत असतील, तर त्यांना हस्तप्रक्षालनासाठी राजमहालात आमंत्रित कर. जा भ्रातृभजना, त्वरा कर… “
महाराजांना प्रणाम करून भ्रातृभजन द्रुतगतीने महालाबाहेर गेला. निशापती महाराजांनी घर्मनिर्मूलनाचा पुनःप्रयास केला. आपल्या व्रणांचे अवलेहन करणाऱ्या अनुविद्ध भेरुण्डाप्रमाणे ते आपल्या महालात एकाकी बसून राहिले.

सायंकाल झाला होता. महालाच्या निकट असलेल्या न्यग्रोधपादपांच्या छायांनी आता लंबाकार धारण केले होते. शीतलक अनिलाने  वेग धारण केला होता. महाराजांचे स्वेदोत्सर्जन आता नियंत्रणात आल्यासारखे वाटत होते. कक्षाच्या बाहेरून प्रतिहारीचा पदरव आला आणि त्याबरोबरच गुरुदेव वैद्यराजांनी धारण केलेल्या तीव्र सुगंधद्रव्याच्या परिमलच्या उर्मिकांनी महालात नर्तन सुरू केले. महाराजांचा भालप्रदेश किंचित्काल संकोचल्यासारखा झाला. एखाद्या मदोन्मत्त कुंजराने अरण्यातल्या वृक्षलतांचे बलात्काराने पादपतन करावे तद्वत महालातल्या चित्रकटांवर आघात करीत गुरुदेव वैद्यराज महालात प्रविष्ट झाले. महाराजांना त्यांनी अतिनम्रपणे प्रणिपात केला.
“काय हा विलंब दल्यप्रवाद? आमचा आवेग आपल्याला ज्ञात नाही काय? “
“क्षमा असावी, महाराज. काही व्यक्तिगत कार्यात व्यग्र होतो. आपला संदेश मिळताच त्या कार्याची पूर्तता केली आणि सत्वर निघालो. “
“कसले कार्य दल्यप्रवाद? “
गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवादांच्या मुद्रेवर लज्जेच्या विरल अवगुंठनाने आच्छादन केले. “प्रातःकाली दर्पणावलोकन करीत असताना आमच्या केशभारात काही पाण्डुछटा उमटल्याचे आमच्या अवलोकनात आले, महाराज. रुपयौवनाचे आपल्या साम्राज्यातील महत्त्व आपण जाणताच, महाराज. आपल्या महालात मद्रदेशीय ललनांची अनेक छायाचित्रे लावून आपणही हे वारंवार सिद्ध करण्याचा यत्न करत असता. काही उत्पीडक व्यक्ती याला शृंगभंग करून गोवत्सांत क्रीडा  करण्याचा यत्न करणे असे म्हणतात, पण आपण निश्चिंत असावे, महाराज… “
“विषय आमचा नाही, तुमचा आहे दल्यप्रवाद. विषयांतर करून स्वजनांचा हर्षध्वनी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आम्ही राजदरबारात स्थान दिले आहे. आपले भाष्य मर्यादेत ठेवा, दल्यप्रवाद. आपल्या श्वेतकेशांसंदर्भात आपण भाष्य करत होतात.. “
” यथार्थ, महाराज.  त्या शुभ्रचूडांवर आम्ही रक्तगर्भाचे अवच्छेदन करण्यात व्यस्त होतो. ते कार्य संपन्न होण्यास विलंब लागला महाराज. केशमार्जन, केशशुष्कीकरण होताच सत्त्वर आम्ही प्रस्थान केले, महाराज.” 
महाराजांना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास अतीव प्रयास पडल्याचे दिसले. तथापि आपल्या स्वरांतील संयम ढळू न देता ते म्हणाले, ” देवी सुभाषिणींचे स्वास्थ्य कसे आहे, दल्यप्रवाद? “
“आता क्षेम आहे, महाराज. देवींना असाधारण असे कष्ट नाहीत, परंतु आदिम सर्वदा कलहप्रिय प्रकृती आणि त्यावर संदेहाचे उपवासन यामुळे देवींच्या मस्तिष्काला काही व्यावर्तने पडली आहेत. आम्ही दिलेला कल्प आणि दैनंदिन कार्यांतून संपूर्ण निवृत्ती यांनी देवी अल्पावधीतच कार्यचपल होतील. “
“निवृत्ती? कसले भाष्य करता आपण दल्यप्रवाद? देवी आमच्या कूटप्रमुख आहेत. देवी आमच्या साम्राज्यातल्या मंत्री तर आहेतच, पण महत्प्रयासाने आम्ही देवींना इतर साम्राज्यांच्याही अमात्यपदी नियुक्तीची योजना केली आहे. त्यासाठी शीतांशुमहाराजांचे आम्हांस किती प्रशंसन करावे लागले, ते आम्हीच जाणतो. उत्तरनगरात देवींचे अमात्यपद आहे, म्हणून आमची कीर्ती अबाधित आहे. अन्यथा उत्तरनगरात आम्हाला  रिपुन्यूनत्व नाही, हे गुह्य आपल्यालाही ज्ञात आहे. आमचे उत्तरनगरात आगमन झाले ही वार्ता क्षणभरात षटकर्णी होते. गजवदनाचे बाहुबळ सांप्रत त्याच्या करांमधील कृपाणिकाइतकेच पीडादायक ठरते आहे. आणि हा रासभ… आमचा सुहृद रासभ.. आमच्या मंत्रीमंडळातील कौस्तुभ असा हा रासभ… तो अल्पभाषी आहे, तथापि त्याच्या वाणीने आमचे अंतःकरण क्षतिग्रस्त होते दल्यप्रवाद.. आणि या सर्वांहून असह्य असे ते मुक्तादेवींचे हलाहल. नको, दल्यप्रवाद, नको.  त्या स्मरणानेही आमच्या मनाचा दाह होतो. या सर्वांतून आम्हाला तारण करतात त्या आमच्या देवी सुभाषिणी. आणि आपण म्हणता देवींनी निवृत्ती स्वीकारावी? प्रबोधित व्हा, दल्यप्रवाद, चेतनावस्थेत या…. “ 
“महाराजांचे भाष्य अप्रस्तुत आहे असे म्हणण्याचे धार्ष्ट्य कुणी करेल, महाराज? तथापि एक तुच्छ प्रश्न मनात उत्पन्न होतो आहे, महाराज. आज्ञा असेल तर…. ”
“वदते व्हा, दल्यप्रवाद. “
“महाराज, मूषकवंश साम्राज्याची कीर्ती सांप्रत  जीवलोकात दुदुंभते आहे. आपण तर या साम्राज्याचे सम्राट! अवघ्या मूषकांचे नृपाधिराज! आज आपण अंगुलीनिर्देश कराल ती पूर्वा! असे असून आपणांस उत्तरनगराचा मोह का होतो याचा बोध होत नाही, महाराज. इथे आपण सुखासनात राहावे महाराज. आपल्या क्रीडांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या मरुभूमीचा मोह का? क्षमा असावी महाराज.. “
निशापती महाराज निःशब्द झाले. ‘आता आम्ही तुम्हाला काय सांगावे, दल्यप्रवाद? इथला जनसंकुल.. आपल्यासारखाच. मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते. आमच्या कुहूर लीला येथे जनप्रिय होतात, पण तेथे… तेथे समालोचकांच्या अग्निवर्षावात आमचे स्वत्व दग्ध होऊन जाते. देवींच्या अमात्याधिकारात आम्ही अनुजीवित तरी राहातो, पण देवी नसतील तर…? ‘
  ”आपण येता आमच्यासह दल्यप्रवाद? उत्तरनगरात आम्ही आपल्यासाठीही एक अमात्यपद निर्माण करु. नवपरिणीत शीतांशू महाराजांचा आमच्यावर अनुग्रह आहेच, आम्ही आमच्या लांगुलचालनकौशल्याने तो वर्धित करु” निशापती महाराजांच्या प्रकट बोलण्यात ओज होते. “आपण सहित असाल तर आपण उत्तरनगराचेही मूषकवंश करु.. “
गुरुदेव वैद्यराजांचे मुख शिखापतित झाले होते. त्यांच्या चक्षुंच्या परीघांवर जलसंचय झाल्यासारखा वाटत होता. एखाद्या प्राचीन मानभंगाची स्मृती होऊन त्यांचे अंतःकरण विषादमय झाले होते. क्षीण स्वरात ते उद्गारले, “महाराज, उत्तरनगरीचा मोह मला नाही, असे असत्यवदन मी तरी का करावे? पण महाराज, त्या नगरीतले ‘धरित्रीसौष्ठव’ मला सहन   होत नाही. माझे स्वास्थ्य ढळते, महाराज, मला वमनाची आणि अतिसाराची भावना होते. महाराज, क्षमा असावी.  क्षमा असावी, महाराज…. “
जानुबल नष्ट झाल्याप्रमाणे गुरुदेव वैद्यराज दल्यप्रवाद कंप पावत होते. निशापती महाराज जालकाला सन्मुख होऊन उभे राहिले.
चन्डवातामुळे धूलीकणांचा एक विशाल स्तंभ गगनाकडे आकृष्ट होत होता. त्या स्तंभापलीकडे उत्तरनगरीतले दीप प्रज्वलित झालेले दृष्टोत्पत्तीस येत होते. प्रवातासोबत सूक्ष्म वालुकणांचा एक उत्कट धारासंपात गवाक्षातून महाराजांच्या महालात प्रविष्ट झाला. महालातील प्रकाश धूम्र झाला. दल्यप्रवादांनी आणि अन्य सेवकांनी आपले नेत्र रुद्ध केले होते. निशापती महाराज मात्र उत्तान नेत्रांनी धूलीकणांच्या तिरस्करिणींतून अद्याप उत्तरनगरातील दीपांकडे पाहाण्याचा यत्न करीत होते.

Published in: on May 17, 2009 at 5:59 am Comments (4)

धुक्यातून उलगडणारे जी ए – ७ – तुती

‘ आपल्या कथा या आपण आपल्या स्मरणातील व्यक्तींना, प्रसंगांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे’ या अर्थाचे (अर्थाचेच – जी. ए. ‘श्रद्धांजली’ वगैरे शब्द वापरणाऱ्यांतले नव्हते!) जी. एं नि बऱ्याच वेळा, बऱ्याच लोकांना लिहिले आहे. आपल्या कथांमधील बहुतेक व्यक्ती आणि  प्रसंग आपल्या पंचविशीपर्यंतच्या आयुष्यावर आधारलेले आहेत असेही ते लिहितात. बहिणीचे प्रेम  ( आणि गाय) या गोष्टीचा जी. एंच्या कथांमध्ये अगदी तो टवाळीचा विषय होईपर्यंत उल्लेख होतो. सुशी आणि जाई या जी. एंच्या अकाली निधन पावलेल्या बहिणी हा त्यांच्या आयुष्यातील एक फार खाजगी, हळवा कोपरा होता. जी. एंसारख्या उग्र राखुंडी प्रतिमा असलेल्या व्यक्तीचा हळवेपणा हा विरोधाभास वाटेल, पण जी. ए. वैयक्तिक आयुष्यात अतिशय संवेदनशील, हळवे असले पाहिजेत असे मला वाटते. हा हळवेपणा आपला कमकुवतपणा म्हणून लोकांसमोर येऊ नये, म्हणून त्यांनी माणूसघाणेपणाचे, तुसडेपणाचे वस्त्र पांघरले असावे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

जी. एंच्या ‘तुती’ या कथेतला निवेदक हा एक लहान मुलगा आहे. अगदी भोंगळ विधान करायचे तर हे लहानपणीचे जी. एच.  हा ’मी’ आणि त्याचे बालपण यावर आधारीत जी. एंच्या काही फार सुंदर कथा आहेत. ‘तुती’,'कैरी’, ‘राधी’ (आणि जी. एं ना लिहायची असलेली पण (दुर्दैवाने) त्यांनी न लिहिलेली ‘केळी’ ) अशी काही चटकन आठवणारी उदाहरणे. गावाकडचे सर्वसामान्य घर. दुबळे, अशक्त पण मिस्कील वडील नाना (’राधी’ मधले आबा) , करारी, फटकळ आई, तापट, चटकन डोक्यात राख घालणारा दादा आणि निरागस, मायाळू मोठी बहीण सुम्मी. या बहिणीविषयी ‘कैरी’ मध्ये फार सुरेख वर्णन आहे. तानीमावशी या सुम्मीविषयी बोलताना म्हणते,’ आमच्या लहानपणी गणपतीच्या आरतीसाठी ताम्हणात रांगोळी काढावी लागे. त्या वेळी कमळी (कथानायकाची आई) ताम्हण घासून लालभडक करून त्यात पातळ गंधाची रांगोळी दुर्वांच्या टोकाने काढत असे. आणि शेवटी मग तिच्यावर अगदी नाजूक अशी श्री काढायची. नंतर तिला सुम्मी झाली तीदेखील असल्याच श्रीसारखी – कोवळी शांत वासाची!’  पण असल्या घरगुती, उबदार गोधडीसारख्या कुटुंबावर सतत पडत असलेली अठराविश्वे दारिद्र्याची छाया – तिचे काय? त्या गरीबीच्या तडाख्यांने ते कुटुंब बघताबघता विस्कटल्यासारखे होते. देवघरातल्या शांत समईसारख्या बहिणीचे म्हाताऱ्या बिजवराशी लग्न लावून देण्याशिवाय नानांना काही पर्याय राहत नाही. त्या उर्मट, रानवट घरात सुम्मी विझून, करपून जाते. आणि शेवटी माजघरात, हातपाय बांधून, तोंडात बोळा घालून सासरच्यांकडून मारहाण सहन करुन, अंगावरचे चटके सहन करून शेवटी आड जवळ करणाऱ्या असंख्य सुम्मींसारखी ती संपून जाते.
आणि या सगळ्याचा साक्षीदार असणारा तो कथानायक – त्याला काही धड समजतच नाही. आठवड्यात चारदा वांग्याची भाजी झाली असली तरी नाना परत धोतरात बांधून जांभळी, गुळगुळीत वांगी का आणतात आणि’ वा! आज काय सुरेख वांगी मिळाली! आता भरल्या वांग्याची भाजी कर, फार दिवस झाले खाऊन!’ असे का म्हणतात , ज्या मल्लाप्पा कासाराच्या घरी आपण भाड्याने राहतो, तो मल्लापा हल्ली नानांना तडतडा का बोलतो आणि त्यावर नाना काही बोलत का नाहीत, आईच्या हातातल्या बांगड्या ओरबाडून करकरीत तिन्हीसांजेला नाना का बाहेर पडले आणि त्या रात्री कुणी कुणाशी बोलले का नाही, सुम्मीच्या लग्नात इतके सगळे जिवापाड करुनही तिच्या सासरच्या मंडळींचे वाट्टेल ते बोलणे नानांना का ऐकून घ्यावे लागले, ‘तिच्या सासरी जाते आणि त्यांच्या मोलकरणीपर्यंत सगळ्यांच्या पाया पडते’ असे म्हणून आई रडू का लागली, सुम्मीच्या हातावर डागल्याचा जांभळा डाग का पडला आणि ती सुम्मी… सुम्मी विहिरीत पडून गेल्याचे कार्ड येताच खूप भूक लागलेली असतानाही आपल्याला जेवण नको, काही नको, कोपऱ्यात जाऊन एकीकडे बसावे आणि रडावे असे का वाटले…. यातले काही त्या लहान पोराला समजत नाही.
असली ही खास जी. ए. शैलीची कथा तुती. जुन्या घरातल्या परसात तुतीचे झाड होते. तुतीचे गुपीत फक्त सुम्मी, दादाला माहीत होते. तुती थोडी कच्चीच असावी. म्हणजे अगदी कच्ची नव्हे तर थोडी पिकलेली, अगदी पिकलेली नव्हे तर थोडी कच्ची – म्हणजे गोडही लागते आणि आंबटही लागते. जीभ रवरवते, आणि गोडही लागते. मग तुती बराच वेळ ध्यानात राहते. हे सुम्मी- दादाला माहीत होते, पण ते तर आता इथे नाहीत….
आणि सुम्मी? ती तर आता कुठेच नाही. हसली की देव्हाऱ्यावरच्या पितळी तोरणाचे घुंगरू वाजल्यासारखे वाटत ती आईच्या चेहऱ्याची सुम्मी, ‘अहा बघा भागुबाई! विहिरीला घाबरतोय. ती काय गिळतेय की काय तुला? ‘ म्हणून हसणारी सुम्मी, सुट्टीत दादाशी सारखी भांडणारी, पण सुट्टीनंतर दादा कॉलेजला जायला निघाला की लहान मुलीसारखी रडणारी सुम्मी,  वयाने आपल्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या  बिजवराशी आपल्याला कुणी न विचारता लग्न ठवल्यावर गुढग्यावर हनुवटी ठेवून गप्प बसणारी सुम्मी आणि लग्नात धाकट्या भावाने निरागसपणे ‘ सुम्मी, तू आता आमच्याकडे कधी येणार? ‘ असे विचारताच समजूतदारपणाने ‘तुम्ही बोलवाल ना भाऊसाहेब, त्या वेळी! ‘ असे म्हणणारी आणि त्याला जवळ घेऊन ‘मला विसरायचं नाही हं, आणि दादा भेटला तर सांग त्यालाही.. ‘ असे हळूच म्हणणारी सुम्मी…  
सुम्मी तर आता कुठेच नाही. तिच्या आवडीचे रायआवळे, तुती आता जुन्या घरात राहिले. कृष्णी गाय नव्या घरात आली खरी, पण सुम्मी गेल्यावर नानांनी जे अंथरुण धरले, ते तिला समजले की काय कुणास ठाऊक! तिच्या डोळ्यांतून अखंड पाणी वाहू लागले. ती का रडते? तिला कसल्या आठवणी येतात? हे सगळे समजायच्या आतच तीही संपून गेली. दोघातिघांनी तिला उचलून बाहेर आणले, दर चौकटीला तिची शिंगे खटखट बडवली आणि तीही निघून गेली….
आणि या नव्या, खुराड्यासारख्या घरात आता अंथरुणाला खिळलेले नाना, आता अगदी चेपल्यासारखी झालेली, हाडे वर आलेली आई आणि या सगळ्याचा साक्षीदार असलेला श्रीपूमामा….
आणि मग पहिलीत पास झालेल्या या कथानायकाला ती विझून गेलेली आई म्हणते, ‘कारट्या, तू बी. ए. हो अगर होऊ नको, पण आतून बाहेरून अगदी दगड हो, अगदी घट्ट, डोंगरी दगड हो बघ!’ 
 हे असले घट्टे पडलेले, धोंड्यासारखे होणे बाकी जी. एंना जमले नसावे.
पण ‘तुती’ म्हणजे केवळ अशी दारिद्र्यात पिचलेल्या कुटुंबाची आणि आपल्या पित्याच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालून हसत हसत चितेवर चढणाऱ्या समंजस वगैरे भारतीय मुलीची हाय हाय कथा नाही. ‘तुती’ मध्ये जी. एंनी त्यांच्या इतर अनेक कथांप्रमाणे आयुष्याचे वरचे विरविरीत पापुद्रे सोलून आतला लसलशीत गाभा उघडा केला आहे. शब्दांचे कोणतेही खेळ, विभ्रम न करता साध्या अक्षरांतून आता कालौघात नष्ट झालेल्या, पण कोणे एके काळी अस्तित्वात होता या कल्पनेने अस्वस्थ करणाऱ्या समाजाचे चित्रण केले आहे. चित्रण हा शब्दही आता गुंडगोळा झाला आहे खरा, पण तो वापरावा वाटतो याचे कारण असे की ही आणि अशा कथा वाचताना जणू आपण एखाद्या चित्रपटाची पटकथा वाचतो आहोत असे वाटते. ही सगळी माणसे, प्रसंग फक्त कागदावरील अक्षरे राहत नाहीत, ती आपल्या आसपास वावरू लागतात. काहीसा असाच अनुभव माडगूळकरांचे लेखन वाचताना येतो. खानोलकरांचेही. पानवलकरांचेही.
जी. एंच्या लिखाणात हे सातत्याने दिसते, हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘तुती’ मधील अशी चित्रदर्शी भाषेची आणि प्रसंगांची असंख्य उदाहरणे इथे देण्याचा मोह टाळतो. कारण एकचः ज्यांनी आजवर ‘तुती’ वाचली नाही, त्यांना ती मुळातून वाचावी, असे वाटावे.

Published in: on May 7, 2009 at 4:28 pm Comments (2)

माझ्या संग्रहातील पुस्तके

फार दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात ह. मो. मराठे यांच्या बहुचर्चित लेखाचे ‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’ या नावाचे पुस्तिकारुप आणि त्याला जणू उत्तर म्हणूनच संजय सोनवणींनी लिहिलेली ‘ब्राह्मण का झोडपले जातात?’ ही पुस्तिका पाठीला पाठ लावून ठेवलेली दिसली. ही दोन्ही पुस्तके विकत घेऊन वाचली. वाचताना खूप मनोरंजन झाले, काही वेळा हसूही आले. पण दोन्ही पुस्तके वाचून संपवल्यावर बाकी मन विषण्ण झाले. ‘जात नाही ती जात’ हे आधीपासून माहिती होते, पण आता ‘जाता जाणार नाही ती जात’ असे वाटावे इतका विखार या दोन्ही पुस्तकांत भरलेला आहे. या दोन्ही पुस्तकांत उल्लेखलेले विविध वर्तमानपत्रांतील आणि पुस्तकांतील संदर्भ आणि विविध लोकांची वक्तव्ये यांमुळे ही पुस्तके अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक वाटावी अशी झाली आहेत खरी, पण एका जातीचा दुसर्‍या जाती इतका तिरस्कार करु शकतात हे कळाल्यावर एकसंध समाज वगैरे निव्वळ कागदी गफ्फा वाटू लागल्या. या दोन्ही पुस्तकांमधले सगळे मुद्दे या लेखात मांडणे शक्य नाही – तशी गरजही नाही.पण या पुस्तकांमधील काही मुद्द्यांनी बाकी डोके चकरावून गेले. विस्तारभयास्तव या पुस्तिकेमधल्या हमोंच्या पुस्तिकेचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.सोनवणींच्या पुस्तकांतील मुद्द्यांविषयी पुन्हा कधीतरी.

‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’
ह. मो. मराठे
‘विद्वेषाच्या विरोधात जागृती मंच’ द्वारा प्रकाशित
पाने ९६, किंमत २५ रुपये
मराठेंच्या पुस्तकात आपल्याला हे पुस्तक का लिहावे वाटले (मूळ स्वरुप ‘किस्त्रीम दिवाळी २००४) हे त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या मुद्द्यापासून सुरु झालेले मराठेंचे विवेचन नंतर सरळसरळ ब्राह्मण विरुद्ध् मराठा समाज या मुद्द्यावर येते. ब्राह्मण्याची खूण म्हणून मानले जाणारे जानवे (आणि शेंडी) या गोष्टीचा कालबाह्य झालेली गोष्ट म्हणून आपल्याला त्याग करावा असे कसे वाटले आणि ब्राह्मण नव्हे तर कोणत्याच जातीचा असे लेबल लावून घेण्याला आपली कशी ना आहे यावर विस्ताराने लिहून मराठेंनी आपल्या पुरोगामीपणाची बैठक तयार केली आहे. (पाच वर्षांपूर्वीची हा लेख प्रसिद्ध झाला. सहा महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या ब्राह्मण महासंमेलनात एका विदुषींनी शेंडी आणि जानवे यावचा ब्राह्मणांनी त्याग करावा असे म्हणताच गदारोळ झाला होता!) हाच पुरोगामीपणा ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या काळापासून कसा अवलंबला आहे, याविषयीही मराठे लिहितात. (जातीव्यवस्था आणि वैचारिक मागासलेपणा आजही टिकवून ठेवण्यातला ब्राह्मणांचा सहभाग याविषयी मराठे इथे काही बोलत नाहीत) ब्राह्मण समाजाविरुद्ध ब्राह्मणेतरांच्या मनात असलेला आकस याबाबत मराठेंनी दिलेली उदाहरणे आपण कोणत्या जगात, कोणत्या समाजात रहातो आहोत याविषयी मनात शंका निर्माण करणारी आहेत. यातली काही विधाने विविध वक्यांनी आपल्या भाषणांत केलेली आहेत, काही लेखकांनी आपल्या लिखाणात लिहिलेली आहेत, तर काही मराठेंनी आपल्या लेखात ‘ब्राह्मणांवरील आरोप’ या मथळ्याखालील एकत्र केलेली आहेत. यातील काही मुद्द्यांचे मराठेंनी स्पष्टीकरणही दिले आहे. (ते वेगळ्या रंगात दाखवले आहे)यातले काही मुद्दे असे:
१.मुंबई, गुजराथ येथील दंगलीतून आपल्या पोलिसांतील ब्राह्मणवादी विकृती सगळ्या जगानं पाहिल्या!
२.ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी समाजाला अंधश्रद्धेच्या व रुढींच्या गर्तेत अडकवणार्‍या कर्मकांडांतून मुक्त करण्याचा फुलेंचा प्रयत्न होता
३.आज मराठी साहित्यात अशी स्थिती आहे की बहुजन समाजातील लेखकांना ब्राह्मणाचा आशीर्वाद मिळावा लागतो. आजही ब्राह्मण लेखकांच्या मान्यतेखेरीज बहुजन समाजातील लेखक मान्यता पावत नाही.
४.तत्कालिन समाजव्यवस्थेने संत ज्ञानेश्वरांना ब्राह्मण म्हणून मान्यता दिली नसल्याने संत ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हते
५.आज ब्राह्मण लोकांनी जे शिक्षण बहुजन समाजापर्यंत पोचवले आहे, त्याचा अभ्यास त्यांनी दहा वर्षांपूर्वीच केला असून त्याद्वारे नोकर्‍याही मिळवल्या आहेत. आता नको असलेल्या त्या शिक्षणाला त्यांनी बहुजन समाजाला दिले आहे.
६.हिंदुत्ववाद्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर चरित्र लिहिले, नाटके लिहिली, चित्रपट निर्माण केले,एकपात्री प्रयोग केले आणि त्यातून भरपूर पैसा कमावला
७.देशातील राजकीय नेते सत्ता मिळवण्यासाठी बहुजन समाजाचा वापर करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोध्रा हत्याकांड. या हत्याकांडात किती ब्राह्मण मेले याची सरकारने आकडेवारी द्यावी असे आवाहन मी सतत करत आहे.
८.आपण एतद्देशिय असल्याचे ब्राह्मण भासवत आहेत. संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे, म्हणून बहुजनांनी तिचा स्वीकार न करता इंग्रजीचा स्वीकार करावा.
९. इथल्या आदिवासींच्या जमिनींवर आक्रमण झाले, म्हणून आदिवासी राजा दशरथाकडे गेले, पण त्याच्या मुलाने मात्र आदिवासींना राक्षस म्हणून चिरडले
१०. शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विषप्रयोग करुन ठार मारले. संत तुकारामांच खून ब्राह्मणांनी केला.
११.रामदासांची व (शिवाजी) महाराजांची प्रत्यक्षात कधीही भेट झाली नाही, तसेच भवानीने तलवार दिल्याची कुठेही नोंद नाही. यापाठीमागे महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून घेण्याचे षडयंत्र ब्राह्मणांचे होते
१२.परकियांनी देशावर् इतकी वर्षे राज्य केले, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक म्हणजे आत्ताच्या ब्राह्मणवाद्यांचे पूर्वजच होते. त्यामुळे तेच खरे देशद्रोही आहेत.
१३. भांडारकर संस्थेवर जो हल्ला झाला तो ब्राह्मण समाजाला समोर ठेवून झाला होता.
१४.शिवाजींचा लढा मुस्लिमांविरुद्ध् नव्हे तर ब्राह्मण आणि त्यांनी तयार केलेल्या विषमतेविरुद्ध होता. (महाराजांच्या मंत्रीमंडळातील आठपैकी सात मंत्री ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला घेऊन देणारे बापूजी देशपांडे, पुरंदर किल्ल्यावर महाराजांना सर्वाधिक सहाय्य करणारे नीळकंठ सरनाईक, महाराजांच्या हेरखात्याचे पहिले प्रमुख नानाजी देशपांडे हे सर्व लोक ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांची सुमारे २०० पत्रे उपलब्ध आहेत, त्यातील सुमारे १०० पत्रांत त्यांनी ब्राह्मणांना काहीतरी दान केल्याचा किंवा इनाम दिल्याचा उल्लेख आहे. ‘महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती’ हा उल्लेख स्वतः महाराजांनी एक पत्रात केला आहे. खुद्द महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घ्यायला संकोच वाटत नव्हता. अफजलखानचा वकील ब्राह्मण होता हे ब्राह्मणद्वेषाचे कारण असल्यास अफजलखानचे अनेक देहरक्षक मराठा होते व त्यातले दोघेजण शिवाजी महाराजांचे जवळचे नातेवाईक होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.)
१५.मुस्लिमांनी शिवाजीची बदनामी कधीच केली नाही, मात्र परदेशातील लेनच्या डोक्यात इथल्या ब्राह्मणांनी विकृती घतली.
१६.बहुजनांनी इतिहास घडवला, पण तो ब्राह्मणांनी लिहिला, म्हणून ब्राह्मण इतिहासाचे पद्धतशीर रीत्या विकृतीकरण करत आहेत.
१७.दादोजी कोंडदेव आणि रामदास महाराज यांना जबरदस्तीने शिवाजी महाराजांचे गुरु बनवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दादोजी कोंडदेव हे स्वराज्याच्या विरोधात होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता, म्हणून राज्याभिषेकासाठी गागाभट्टांना काशीहून बोलावण्यात आले. रामदास हा माणूस जर शिवाजींचा गुरु होता तर तो (मूळ वाक्यातील एकवचनी उल्लेख) महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित का नव्हता? ( छत्रपतींच्या राज्यभिषेक काळात गागाभट्ट हे नाशिक मुक्कामी होते, राज्याभिषेकाचा प्रस्ताव गागाभट्टांकडूनच आला, त्यावर महाराजांनी आपले कुलगुरु अनंत भट आणि बाळकृष्ण आर्वीकर यांना बोलावून त्यांचे मत घेतले. त्यांनी आणि नाशिक, त्र्ञंबकेश्वर येथील ब्राह्मणांनी संमती दिल्यावरच राज्याभिषेक करण्याचे ठरले. रामदास हे संन्यासी होते. अशा प्रसंगी बैरागी, संन्यासी यांनी उपस्थित राहू नये हा परिपाठ आहे)
१८. रामदास हे चारित्र्यहीन होते (मूळ शब्द ‘रंडीबाज)
१९.थुंकण्याची मडकी आपल्या गळ्यात बांधण्याची सक्ती दलितांवर ब्राह्मण पेशव्यांनी केली.
२०.कोल्हापूरच्या शाहू महाराजांना कार्तिक स्ननाच्या वेळी पुराणोक्त संकल्प सांगणारा नारायणभट या वेश्यावृत्तीचा होता. त्याला आणण्यासाठी सरकारी गाडी वेश्यावस्तीत पाठवावी लागत असे.
२१. ‘भांडारकर झांकी है, शनिवारवाडा बाकी है’
२२.विद्यापीठीय आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम ब्राह्मणांनी लिहिल्यामुळे दलितांना या परीक्षांत म्हणावे तसे यश मिळत नाही, व हे कारस्थान वर्षानुवर्षे चालत आले आहे.
२३. हिंदुधर्म हा आमचा नसून तो विदेशी आर्य ब्राह्मणांचा आहे असे शिवधर्माच्या स्थापनेत पुढाकार घेतलेल्यांचे म्हणणे आहे. “शिवधर्म हिंदुविरोधी नाही, पण ब्राह्मणविरोधी आहे, त्यामुळे या धर्मात ब्राह्मणांना प्रवेश नाही” असे शिवधर्म स्थापनेच्या मेळाव्यात झालेल्या भाषणांत म्हटले गेले,” शिवधर्म स्थापनेच्या आजच्या प्रसंगी आम्ही बहुजनांनी ब्राह्मणांबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत. यापुढचे सर्व विधी बिनशेंडीच्या माणसाने करायचे आहेत. यापुढे शिवधर्मियांसाठी मनुस्मृती, मत्स्यपुराण हे विकृत ग्रंथ त्याज्य आहेत. भटा ब्राह्मणांची सर्व बौद्धिक, सांस्कृतिक, मानसिक गुलामगिरी झुगारायची आहे. या पुढील असे विकृत धार्मिक ग्रंथ केवळ जाळायचेच नाहीत, तर असे धर्मग्रंथ लिहिणार्‍यांनाही आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही” असेही म्हणण्यात आले.
२४.जिजाऊंच्या उच्च, उदात्त, मानवी रुपावर दैवतीकरणाचे एकही पुट चढणार नाही याविषयी आपण सदैव जागरुक राहू या असे मानणार्‍या शिवधर्माच्या प्राथमिक संहितेत बाकी जिजाऊंचे पूजन करुन बालकाचे नामकरण करावे असे म्हटले आहे. या संहितेत जिजाऊंची आरतीही दिली आहे.

ब्राह्मण समाजाला टिपण्यासाठी सगळा ब्राह्मणेतर समाज असा पचंग बांधून तयार झालेला आहे असा वाचकाचा समज करुन देण्यात जवळजवळ यशस्वी झाल्यानंतर ‘शस्त्राघाता शस्त्रच उत्तर’ या न्यायाने मराठे आपले आणि आपल्या लेखाला आलेल्या प्रतिसादांमधले काही विचार मांडतात. ते वाचून तर औषधापेक्षा आजार परवडला असे वाटू लागते. त्यातले काही विचार असे:
१. शेवटी जीवन मरणाचाच प्रश्न आला तर ब्राह्मणही काही विचार करतील. कोंडलेले मांजर जसे हिंसक बनते तसे ब्राह्मणांसही व्हावे लागेल (!). ते शस्त्र हातात घेऊन नाही तर डोके लढवून.
२.धम्मप्रवर्तन दिनानिमित्त लाखो दलित मुंबई व नागपूर येथे जमा होताततसे वर्षातील कोणतेतरी दोन दिवस ठरवून त्या दिवशी लाखो ब्राह्मणांनी शहराशहरातून व गावोगावातून मिरवणुका काढल्या पाहिजेत.
३.ब्राह्मणांची व्होट बँक संघटित करणे आवश्यक आहे
४. यापुढे ब्राह्मणांनी भिक्षुकीची किंवा पौरोहित्याची कामे बंदच करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ज्यांची मुलेबाळे व्यवस्थित नोकरी धंदा करीत आहेत, त्या भिक्षूकांनी भिक्षुकीची कामे ताबडतोब थांबवावीत.
५.वास्तविक पहाता आजचा तरुण ब्राह्मणवर्ग रानावनात राहून अदिवासी लोकांच्या आश्रमशाळा चालवण्याचे, त्यांन औषधोपचार करुन सेवा करण्याचे विधायक काम करण्यात गुंतला आहे.
६. ब्राह्मण महासंमेलनात व्यक्त करण्यात आलेले विचारः ब्राह्मण मुलींनी ब्राह्मणेतरांशी अजिबात लग्ने करु नयेत. ती कधीच सुखाची होत नाहीत ( या उद्गारांना तरुण ब्राह्मण स्त्रियांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला) ब्राह्मणांनी संततीनियमन अजिबात करु नये. ब्राह्मणांनी प्रजा वाढवावी. सरकार काही ब्राह्मणांना पोसत नाही. ( या उद्गारांना टाळ्यांच्या गजरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला!)
६. १९६० नंतर सर्व क्षेत्रातील खालपासून वरपर्यंतची सर्व सत्ताकेंद्रे ब्राह्मणेतरांच्य हाती गेली आहेत,आणि ब्राह्मणांना कटाक्षाने दूर ठेवले जात आहे. हे आता अटळ आहे
तथापि जगात संपूर्ण चुकीचे असे काही नसते या न्यायाने या स्फोटक पुस्तिकेत विवेक शाबूत ठेऊन केलेले काही विचारही वाचायला मिळाले. त्यातले काही असे:

१. ब्राह्मणांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सिंधी, गुजराथी समाज हा ब्राह्मणांपेक्षाही अल्पसंख्याक असतानादेखील त्यांच्याविरुद्ध ब्राह्मणांविरुद्ध आहे तितकी अप्रीती नाही. याचे कारण कुठेतरी आपला आहंभाव असावा.सर्वात जास्त ब्राह्मणद्वेष महाराष्ट्रातच का याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वार्थी, अप्पलपोटे, जातीचा दुराभिमान बाळगणारे, इतरांना तुच्छ लेखणारे, सामाजिक समस्यांचे भान नसलेले, धर्माच्या आधारे बहुजन समाजाचे शोषण करणारे अशी ब्राह्मणांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. ही प्रतिमा बदलवली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.
२. आजवर ब्राह्मण गरिबीत जगले. यापुढे ब्राह्मणांनी गरीबीचा नव्हे तर श्रीमंतीचा ध्यास घेतला पाहिजे.
३. ब्राह्मणवाद हा फक्त ब्राह्मणांतच असतो असे नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी मुख्यमंत्रीच असला पाहिजे असे म्हणणार्‍या बॅ. अंतुलेंच्या मंत्रीमंडळातील एक महिला मंत्री यासुद्धा ब्राह्मणवादीच ठरतात. कै. वसंतराव नाईक यांना ‘वंजारडा’ आणि कै. यशवंतराव चव्हाण यांना ‘कुणबट’ या विशेषणांनी संबोधणारे नेते होऊन गेलेच ना? शूद्र व अतिशूद्रातील एका जातीने दुसर्‍या जातीला नीच समजणे हेसुद्धा ‘ब्राह्मण्य’ च आहे.

एखाद्या कलाकृतीने आपल्याला अस्वस्थ केले तरे ते त्या कलाकृतीचे यश मानावे असा संकेत आहे. या पुस्तिकेने मी अस्वस्थ झालो, पण ते या पुस्तिकेचे यश असे म्हणायला मन तयार होत नाही. सोनवणींची पुस्तिका वाचून तर ही अस्वस्थता वाढली.
हे सगळे काय चालले आहे?

Published in: on April 18, 2009 at 6:01 am Comments (1)

धुक्यातून उलगडणारे जी ए – ६ – जी. एं. च्या कथांचा अर्थ – (अ)

जी. एं. च्या कथांची एकंदरीत वाटचाल पाहिली तर सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कथांवर असलेला पाश्चिमात्य लेखकांचा ( चेकॉव्ह वगैरे) प्रभाव स्पष्ट दिसतो. गूढकथा, भयकथा अशा कथाप्रकारांबद्दलही जी. एं. ना आकर्षण होते. या सगळ्याशी अगदी विसंगत अशा खांडेकरी आदर्शवादी बोधकथांचाही त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कथांवर प्रभाव दिसतो. अर्थात यात विस्मय वाटण्यासारखे काही नाही. प्रत्येक लेखकाला आपली वाट सापडण्याआधी अशी आंधळी धडपड करावी लागतेच. नंतर बाकी जी. एं. ना आपल्या या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथा अजिबात आवडत नसत. ‘सोनपावले’ या जी. एं. च्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या गोळाबेरीज कथासंग्रहात अशा बऱ्याच बाळबोध कथा आहेत, हे मी आधी लिहिले आहेच. यातील काही कथा सुखांतिक स्वरुपाच्याही आहेत, आणि काही तर विनोदीही. आपले वळण गाठल्यानंतर बाकी जी. एं. नि असले काही लिहिल्याचे दिसत नाही. अपवाद म्हणजे जी. एं. ची (बहुदा एकमेव अशी सुखांतिका) ‘कवठे’ ही कथा आणि अर्थातच ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ हे पुस्तक. यातील ‘माणसे.. ‘ मध्ये खास जी. एं. चा विखारी विनोद असला तरी या पुस्तकाचा शेवट विलक्षण गंभीर आणि चटका लावणारा आहे. जणू जी. एं. नि स्वतःसाठी लिहिलेला ‘एपिटाफ’च. आणि ‘कवठे’ ही कथा म्हणजे तर जी. एं. च्या हातून लिहिला गेलेला ‘नंदा प्रधान’ सारखा अजब प्रकार आहे. पण हे सगळे अगदी अपवादाने.

एरवी बाकी जी. एं. च्या कथा सरधोपट असत नाहीत. त्यांची ‘माणसाचे काय, माकडाचे काय’ अशा नावाची एक कथा आहे. सकृतदर्शनी ती कथेतल्या सुब्राव या व्यक्तीच्या एकाकीपणाची कथा वाटते. मंदाकिनी जोशी यांना लिहिलेल्या पत्रात जी. एं. नि या कथेमागचा त्यांचा विचार स्पष्ट केला आहे. (जी. एं. नि हे असे अगदी क्वचितच केले आहे) हा विचारही कळायला अवघडच आहे. ते म्हणतात, ‘ किड्याच्या डोळ्यापासून आभाळातील अतिभव्य तारकापुंजापर्यंतच्या पटात माणसाचे स्थान किती याविषयी ती कथा आहे. एकाकीपणा ही भावना शेवटी खरे तर राहू नये, कारण सगळीच लहान – मोठी शून्ये समजल्यावर उलट इतरांशी असलेल्या नात्याचीच जाणीव होईल. पण लहान मोठ्या शून्याशी आपणही शून्य असल्याने होणाऱ्या जवळिकीमुळे शून्याला काहीच अर्थ नाही, ही अर्थहीनतेची भावना त्या कथेत दिसावी. ‘

हे असेच काहीसे त्यांच्या ‘प्रदक्षिणा’ या गाजलेल्या कथेबाबतही झाले आहे. या कथेचे रसिकांनी स्वागत केले ते सामाजिक जीवनातील एका व्यक्तीचे – दादासाहेबांचे -खरे श्वापदासारखे जिवंत चित्रण म्हणून. त्यातही नियतीचे वेडेवाकडे पिळे आणि त्यामुळे शांताक्कांच्या वाट्याला शेवटी आलेलेले रिकामे, भंगलेले नशीब – हे सगळेही रसिकांच्या पसंतीला उतरले. पण जी. एं. ना खरोखर हे असे आणि एवढेच म्हणायचे होते काय? त्यांनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या पत्रात लोकांना या कथेमागचे सूत्र कळालेच नाही, याविषयी असमाधान व्यक्त केले आहे. या कथेत शांताकांप्रमाणेच ससेहोलपट झालेल्या आबाजींचे एक पात्र आहे. “पण माझं ऐकणार कोण? ” हे पालुपद आबाजींच्या तोंडी असते. आबाजी घरातून कायमचे निघून गेल्यावर त्यांची नक्कल करणाऱ्या नोकराच्या तोंडचे ते शब्द दादासाहेबांच्या अर्धपुतळ्यावरून येतात, अशी एक अस्पष्ट सूचना जी. एं नि ठेवली आहे. दादासाहेबांच्या या सगळ्या स्वार्थी, आपमतलबी, ढोंगी चित्रात त्यांची स्वतःची काहीतरी बाजू असेल, पण ती ऐकणार कोण असे आपल्याला सुचवायचे आहे, पण ते काही वाचकांच्या ध्यानात आले नाही, आणि ही कथा म्हणजे केवळ एक ‘सटायर’ होऊन बसली आहे, म्हणूनच ती आपली एक अयशस्वी कथा आहे, असे जी. एं. ना वाटत असे.

त्यांच्या या कथेवर कुणीतरी एक एकांकिका लिहिली आणि तिच्यात तर शेवटी शांताक्का दादासाहेबांचा पुतळा फोडतात असला बटबटीत शेवट दाखवला तेंव्हा जी. ए. कमालीचे अस्वस्थ झाले होते. असेच काहीसे त्यांच्या ‘कैरी’ या कथेबाबत अमोल पालेकरांनी काढलेल्या चित्रपटाबाबत झाले आहे, झाले आहे असे विजय पाडळकर जी. एं. च्या पत्रसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे. ‘मन लावून एखादी नाजूक सुंदर रांगोळी काढावी आणि उठून जाता जाता आपणच तिच्यावर पाय द्यावा असे काहीसे पालेकरांनी या चित्रपटात केले आहे. ‘ असे ते म्हणतात. मी ‘कैरी’ पाहिलेला नाही, पण अगदी पालेकरांसारखा तालेवार दिग्दर्शक असला तरी त्याला कैरीसारखी जातीवंत, डोक्यावर पदर घेतलेली कथा चित्रपट या माध्यमातून पुढे आणणे अवघड आहे, असे मला वाटते. पूर्वी जी. एं. च्या ‘पराभव’ आणि ‘चैत्र’ या कथांचे दूरदर्शनने केलेले नाट्य/ चित्र रुपांतर मी पाहिले होते, आणि ते त्यावेळी अगदी बघवले नव्हते.

आता इथे एक दुष्ट, वाकडी शंका मनात येते. ‘जे जे लोकप्रिय, ते ते हिणकस’ हे जी. एं. चे मत प्रसिद्धच आहे. त्याच न्यायाने अगदी आपली कथा का असेना, ती लोकप्रिय झाली, लोकांना तिचा एक अर्थ लागला, की ते तसे आपल्याला म्हणायचेच नव्हते असे म्हणावे असे जी. एं. ना वाटले असेल का? (जी. एं. चाच ‘वडारकांगावा’ हा शब्द येथे आठवतो) त्यांच्या ‘पुनरपी’ या कथेत मांजरीने पिलांना जन्म देणे आणि त्याचवेळी दादासाहेबांचा झालेला मृत्यू एवढी सांकेतिकता वाचकांना समजली, पण यापुढे दारात उभी असलेली एक नवी मांजरी, तिच्या पोटाचा भरदार, गोलसर आकार आणि त्यातून माईंना स्वतःच्या मृत्यूची लागलेली चाहूल, हे बाकी जी. एं. नि स्वतः (कदाचित हतबल, हताश होऊन) सांगेपर्यंत वाचकांना कळाले नाही. या अर्थाने आपल्या कथा अयशस्वी आहेत, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. तरीही जे जनतेला कळाले, आवडले नाही ते श्रेष्ठ, या त्यांच्या मतानुसार या अपयशी कथा यशस्वीच आहेत, असे जी. एं. ना जाताजाता सुचवायचे होते काय? जी. ए. हे कमालीचे बुद्धीवान होते. त्यामुळे एकाच कथेचे दोन-तीन अर्थ तयार ठेवून लोकांना जो अर्थ लागेल, ते आपल्याला म्हणायचेच नव्हते असेही त्यांनी जाणीवपूर्वक केले असावे काय? जी. एं. च्या कथा आवडणाऱ्यांनाही (’भक्त’ वगैरे शाळकरी शब्द बाजूला ठेवून) अस्वस्थ करायला लावणारा हा विचार आहे.

Published in: on March 16, 2009 at 5:29 am Comments (2)

जाताजाता

नको देवराया
विरक्तीचा ठेवा
आसक्तीत न्हावा
जीव माझा

ज्याला त्याला आले
सत्छीलाचे न्हाण
पायीची वहाण
मीच बरा

जहाले उदंड
पुण्यवान जगी
पुण्याचीच लागी
चढाओढ

फासल्या विभूती
जप कोटीकोटी
नेसली लंगोटी
वैराग्याची

सौजन्याचे डोह
भक्तीचेच तळे
पिकवले मळे
चारित्र्याचे

मन मात्र माझे
पापात बुडाले
लाभले भोगले
पुरेपूर

पुण्याचे संचय
तिकडे जळो दे
नको पापामध्ये
भागीदार

वारुणीची रात्र
स्तनाकार पेला
ऐसा आला गेला
जन्म माझा

त्यागाचाच त्याग
मुक्तीतून मुक्ती
आयुष्या या युक्ती
फसवले

ऐशा आयुष्याचे
बांधोनी संचित
तथापि सस्मित
निघालो गा

 

 

Published in: on December 9, 2008 at 3:51 am Comments (1)

मिरवणूक

असं समाजाशी इतकं तुटक राहून कसं चालेल
म्हणून गाडीची काच खाली घेतली
आणि बोटांनी ठेकाही धरला सूक्ष्म
एका ओळखीच्या मोरयागीताच्या रिमिक्सवर

तरुण आहेत, थोडी मस्ती चालायचीच
म्हणून कौतुकाचाही प्रयत्न केला
काही लचकणाऱ्या कमरा बघून
जरा मनाचे कोपरे दुमडूनच
पण तरीही

आणि उलट्या दिशेने येणाऱ्या
एका सहकुटुंब मोटारसायकलवाल्यालाही
हसून हात केला ओळखीचा
बिचारा असेल मुलाबाळांना
आरास दाखवायला आला
अशी समजूत काढत
स्वतःचीच

एरवी असतोच की आपण शिस्तबद्ध
जबाबदार आणि शांतताप्रेमी
काही दिवस असेही
संस्कृती, श्रद्धा, भावना यांचे
असं म्हणत गाडून टाकली
उसळणारी मुक्ताफळं
शेवटी समाज म्हणजे तरी काय
वगैरे वगैरे

आणि एका धूमधडाक्यानं
हादरलो अचानक अंतर्बाह्य
गुलालाचा एक ढग
अंगाखांद्यावर कोसळेपर्यंत
एक पिचकारीही आली काचेशी, अंगाशी
गुटख्याची, किंचित हातभट्टीचीही

काच वर करता करता
पहिला सलाम केला तो
आपल्या अल्पसंख्याक बुद्धीवादी वगैरे नपुंसकतेला
आणि दुसरा
खुद्द बाप्पालाच

म्हणालो मनापासून
विघ्नहर्त्या
ही उरलीसुरलीही नाळ
असलेली समाजाशी
कापून टाक बाबा
पुढच्या वर्षीपर्यंत

मग ये लवकर
किंवा तुला हवा तेंव्हा
माझं काहीही
म्हणणं नाही

Published in: on September 9, 2008 at 1:21 am Comments (2)