2013 in review

The WordPress.com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog.

Here’s an excerpt:

A New York City subway train holds 1,200 people. This blog was viewed about 6,500 times in 2013. If it were a NYC subway train, it would take about 5 trips to carry that many people.

Click here to see the complete report.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 1 टिप्पणी

उत्क्रांती

कत्तलीच्या वाटे झुंजती कोंबडे
पडलेले सडे जागोजागी

बोलरोंची रांग स्कॉर्पिओंची रांग
क्वार्टरींची रांग टेबलावरी

ब्रेस्लेटे रेबॅन आयफोन रेबॉक
विवेकाला बाक सुखे देऊ

श्रावणात गर्जे डॉल्बी दणादण
सत्यनारायण कॉर्पोरेट

पोपट बोलती पोपट ऐकती
कुंठलेली मती या ठिकाणी

चारचाकीमध्ये साईरामधून
राँगवेमधून दामटता

नवस बोलले नवस फेडले
पापांचे डबोले झाले रिते

काय भले बुरे मला काय त्याचे
धरु काये वाचे मग्रुरीही

रस्त्यावर थुंकी विष्ठा आणि बोळे
यातुनि उमाळे दिव्य सनातन

ओरबाडू आज ओरबाडू उद्या
शिकवू ही विद्या मुलाबाळां

मेल्या म्हातारीच्या दिवसांची नशा
जितेपणी आशा अर्ध्या भाकरीची

शुभ शकुनांचे पुनीत दिशांचे
कौल-करण्यांचे पीक आले

शेंबडे नागडे रस्त्यांत भणंग
चोरे मन अंग पांढरपेशे

कधी कोणी कोठे नाकारील सारे
वाहतील वारे विध्वंसाचे

महाप्रलयाच्या उठतील लाटा
चिंबतील वाटा दाही दिशा

जखमी धरेची छाती उकलेल
नभी उसळेल अग्निरक्त

पडतील खच भग्न शरीरांचे
मानवी किड्यांचे निर्दालन

मग कुठेतरी कडाडेल वीज
पुन्हा एक बीज अंकुरेल
हिरवे पोपटी पुन्हा एक पान
ठेवुनिया भान उमलेल
थिजलेले सर्व विराट विशाल
किंचित हलेल पुढेमागे
गावंढळ जग किड्या कीटकांचे
अळ्या गांडुळांचे अवतरेल
क्षितिजापर्यंत नसेल तरंग
अथवा तवंग प्रगतीचा

जाणता निसर्ग ओळखेल हाक
थांबवेल चाक उत्क्रांतीचे

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां

शंभर मिनिटे

खिडकीच्या उघड्या दारातून पहाटेचा गार वारा येतो. पाच मिनिटे. अजून फक्त पाच मिनिटे. हे मनात दोनदा म्हणून झालं की बाकी मी उठून बसतो. बाहेर कधी नव्हे ती शांतता असते. अजून अंधार आहे, पूर्वेला फटफटलेलंही नाही. पंखा बंद केला तरी चालेल – करावाच- थंड हवा. उठावं.
चहा. सकाळच्या चहाचा पहिला घोट- सुखाच्या कल्पनांमध्ये खांडेकरांनी हा उल्लेख केला आहे. सकाळच्या डाकेने आलेलं दोनच ओळींचे पत्र – रस्त्यावरुन जाताना ऐकू आलेल्या ‘हरीभजनावीण काळ घालवू नको रे..’ या ओळी असं काहीबाही होतं त्या यादीत.. बाकी काही आठवत नाही आता.
नेटवर थोडीशी उलथापालथ. पूर्वी चहा-पेपर हे समीकरण असे; आता ते चहा-जीमेल असं झालं आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो. पक्षांचे आवाज सुरु झालेत, एखादी खारही चिवचिवते. चला, ब्राह्ममुहूर्तावर बाहेर पडायला हवं. मिलिंद बोकील म्हणतात तशी हीच ती वेळ. ब्राह्ममुहूर्त. प्रस्थान ठेवण्याची वेळ. शतकानुशतके ते सर्व पुरुष याच वेळेला घराबाहेर पडले. बाकी सगळं जग झोपलेलं असताना. अर्थात ते परत न येण्यासाठी. सर्व थोर पुरुष घराबाहेर पडले ती हीच ती वेळ.आपल्याला परतही यायचं आहे आणि आपण काही थोरबीर नाही. तरीही चला. बूट चढवून, कानाला बोंडुक लावून मी बाहेर पडतो. कोरी चुनरिया आतमा मोरी मैल है मायाजाल, वो दुनिया मोरा बाबुल का घर, ये दुनिया ससुराल.. रात्री पाऊस होऊन गेलेला दिसतोय. रस्ते ओले आहेत. रस्ते झाडणारे लोक अर्धवट उजेडात बाकी त्या ओल्या रस्त्यांवरचा कचरा झाडूने गोळा करताहेत. प्लॅस्टिकच्या पिशव्या, गुटख्याची पाकिटे , कागदाचे कपटे… सगळं गोळा करुन मोठ्या हातगाड्यांत भरताहेत. हे खरे हीरोज. इतरांनी केलेली घाण उचलणारे, उन्हापावसात काम करणारे हे खरे हीरोज. यांना सलाम करायला पाहिजे…याबरोबर भल्या सकाळी वर्तमानपत्रे टाकणारे, घरोघरी दूध पोचवणारे हे खरे हीरोज. गुले गुलजार क्यूं बेजार नजर आता है, चष्म-ए-बद का शिकार यार नजर आता है, छुपा ना हाल-ए-दिल सुना दे तू, तेरी हसीं की कीमत क्या है, ये बता दे तू… क्या बात है,चष्म-ए-बद हा किती सुंदर शब्द आहे… प्राणचा अभिनय एरवी खरं तर थोडा लाऊडच असतो, पण काहीकाही रोलमध्ये बाकी.. परिचय! तेच म्हटलं नाव कसं काय आठवत नाही आपल्याला..या मध्यमवयीन बायका इतक्या हळू हळू का चालतात? अहो, ताशी पाच किलोमिटर इतका वेग ठेवला पाहिजे. पाच नाहीतर किमान चार. आणि चालताना सारखं बोलू नये. पण यांचं आपलं सारखं ‘गवार आवडत नाही हो कुणाला, तिची जाऊ आहे दीनानाथला अ‍ॅडमिट, घनश्यामला आता वाईट वाटायला लागलंय, डिझाईन आवडलं नाही तुला गाडगिळांकडचं?…’ एक ना दोन…आपण पुढे निघावं. ये चुप भी एक सवाल है अजीब दिल का हाल है हर एक खयाल खो गया की बस अब यही खयाल है की फासला ना कुछ रहे हमारे दरमियां…पायाखालचं थोडं थोडं दिसायला लागलंय. एकदा का सकाळी कुत्र्यांना फिरवणारी मंडळी रस्त्यांवर आली की बघून पावलं टाकायला लागतात. आमीर खानला सांगायला पाहिजे, हेपण घे तुझ्या कार्यक्रमात म्हणून. कहीं दर्द के सहरा में, रुकते चलते होते इन होंठों की हसरत में, तपते जलते होते मेहरबान हो गयी, ज़ुल्फ़ की बदलियाँ… काय शब्द आहेत नाही!. हिंदी गाणी नसती तर आपलं काय झालं असतं? हिंदी, मराठीपण…त्रिशूल डमरु पिनाकपानी चंद्रकला शिरी, सर्प गळयातूनी युगायुगाचा भणंग जोगी, तोच आवडे मनी… इंग्रजी गाणी बाकी आवडून घ्यायचं वय निघून गेलं. पण तरी तीन भाषा येतात म्हणायला हरकत नाही. काल काय म्हणाला तो टीव्हीवर.. तीन भाषा येतात तो मल्टिलिंग्विस्ट, दोन येतात तो बायलिंग्विस्ट, आणि एकच येते तो… अमेरिकन! चला, आपले अमेरिकन मित्र पिसाळणार आता…उस देस में तेरे परदेस में सोनेचांदी के बदले में बिकते है दिल, इस गाव में दर्द की छांव में, प्यार के नाम पर ही धडकते है दिल….हे ऐकलं की डोळ्यांसमोर ते शॉट येतात. गाण्याचे शब्द, चाल, गायकी याबरोबर त्याच्या पिक्चरायझेशनमुळंपण बरीच गाणी लक्षात राहिली आहेत. एका बाजूला झोपडपट्टीत सगळे मस्तीत गाताहेत, त्यांच्यातलाच एक गवळी मुखडा गुणगुणत सायकलवरुन दुसरीकडे जातो आणि मग तिथं आपल्या घराच्या दारात बसलेली नायिका ते गाणं पुढं सुरु करते ‘याद आती रही, दिल दुखाती रही, अपने मन को मनाना ना आया हमें, तू न आये तो क्या, भूल जाये तो क्या प्यार करके भुलाया ना आया हमें..’ ही खरी दिग्दर्शकाची क्रिएटिव्हिटी…
जब जीरो दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आयी, तारोंकी भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई, देता न दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का, अंदाजा लगाना मुश्किल था.. ‘चुप क्यूं को गये? और सुनाओ..’ मदन पुरीचा आवाज. हे भरदार मर्दानी आवाजाचे लोक कुठे गेले? सप्रू, मुराद, के.एन. सिंग… आता हृतिक रोशनचा आवाज नायकाचा म्हणून खपवून घ्यायला लागतो…यौवनाच्या खुणा मिरवत चाललेल्या या तरुणी, खालचा ओठ लोंबता ठेवून काठीवर रेलत, खुरडत चाललेला हा म्हातारा, कुत्र्याला फिरवायला आणणारा त्रासिक चेहर्‍याचा हा तरुण आणि त्याच्याहूनही त्रासिक चेहर्‍याचा हा त्याचा कुत्रा…’देख लिया कहां रहता हूं? जहां मौत जिंदगी से खेलती है..’ ‘वो दिन दूर नही दीपक, जब जिंदगी मौत से खेलेगी’ ‘लेकिन कब? कैसे?’ ‘मालूम नही, चलो मुझे घर पहुंचा दो..’ हा ‘मालूम’ खास मीनाकुमारीचा. ‘दिलकी सदापे ऐ सनम, बढते गये मेरे कदम अब तो चाहे जो भी हो, दिल तुझे मै दे चुकी’ काय जोडी आहे! मीनाकुमारी बरोबर अजित? हम तुम्ही लिक्विड ऑक्सिजनमे डाल देंगे, लिक्विड तुम्हे जीने जही देंगा और ऑक्सिजन तुम्हे मरने नही देंगा..पण गाणं सुरेख आहे..’ जागे ना कोई, रैना है थोडी, बोले छमाछम, पायल निगोडी’ यातल्या निगोडीच्या आधीचा पॉज आणि त्यातली तबला आणि सतार यांची जुगलबंदी याला तोड नाही. नाधिनधिनना, नाधिनधिनना, नाधिनधिनना, नाधिनधिनना… गुलाम महंमद हा संगीतकारपण इतका दुर्लक्षित का रहावा कळत नाही… आणि मिर्जा गालिबमधली सगळीच गाणी.. मै भी मूंह में जुबान रखता हूं, काश पूछो की मुद्दआ क्या है.. जुबान रखना ही उर्दूची नजाकत. तोंडात जीभ आहे.. मराठीचा सगळा रासवट कारभार… राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा…काहेको बजाये तू मीठी मीठी ताने….हे गाणं बासरीवर वाजवायला सोपं आहे असं आपला एक मित्र म्हणतो. पण काय बासरी आहे! सालं आपल्याला एखादं वाद्य वाजवायला येत असेल शपथ! हे देव म्हणजे तरी हरामखोर की हो! नको तिथं नेऊन घालतंय बघा सगळं….
ओळखीचे चेहरे दिसू लागले आहेत. अनोळखी माणसांना नमस्कार-बिमस्कार करायची काय आपली संस्कृती नाही. नाही म्हणायला टेकडीवर रोज भेटणारे एक आजोबा न चुकता आपल्याला ‘जय श्रीराम’ म्हणतात. पण बहुदा आपल्याला ग्रीट करण्यापेक्षा बहुदा त्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यातच जास्त इंटरेस्ट असावा असं म्हणतात. उद्या त्यांनी ‘जय श्रीराम’ म्हटलं की त्यांना ‘वालेखुम सलाम’ म्हणून बघावं. असो. मेरे अरमां भी ले जाते, मेरी हसरत भी ले जाते, नजर से छीनकर अपनी हसीं सूरत भी ले जाते अंधेरे और इन आंखोंमें छा जाते तो अच्छा था…अण्णा.. हा द्वंद्वगीतांचा कार्यक्रम चांगला आहे. पण मध्येच निवेदकाचा चोरटा, फाजील, अभ्र्यात उशी कोंबावी तशा शब्दांत भावना कोंबण्याचा प्रयत्न करुन काढलेला आवाज कशाला? निवेदन करुच नका.. एकामागोमाग एक गाणी लावा फक्त. ते बरं उलट. पूछे कोई के दर्दे वफा कौन दे गया, रातों की जागने की सजा कौन दे गया, कहने पे हो मलाल… मलाल म्हणजे काय? कुणास ठाऊक… काय अर्थ आहे बघायला पाहिजे. उर्दू शिकायला पाहिजे होती. राहून गेलेल्या गोष्टी – ती यादी कमावलेल्या गोष्टींच्या यादीपेक्षा खूप मोठी आहे.. निलेश नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. चेहर्‍यावर हा इतका माज कसा काय कमावतात हे लोक? राज कुंद्रासारखा दिसतोय नाही का हा जरासा? शिल्पा शेट्टीच्या कॉस्मेटिक सर्जरीची चित्रं बघून मळमळायला होतंय. प्रीती झिंटानंही आपल्या नाकाचं काय करुन घेतलंय. आपल्या बाह्य रुपाबाबत एवढे का कॉन्शस असतात हे लोक? उगीच मायकेल जॅकसनला का नावं ठेवायची? अमिताभ बच्चनचाही टोप आता ओळखायला येतो. स्ट्रेचरवर आडवा असलाकी -आणि हल्ली बर्‍याच वेळा तसाच असतो तो – माकडटोपी घालून टोप पडणार नाही याची काळजी घेत असतो बिचारा. आपल्याच प्रतिमेत कैद झालेले हे दुर्दैवी लोक – राजेश खन्नाला तर त्या हॅवेल्सच्या जाहिरातीत बघवत नाही. दिलीपकुमारला तर म्हणे आता जेवताना आपल्या अंगावर सांडलेलंही कळत नाही. मग केसांना तो काळाभोर कलप करण्याचा अट्टाहास कशासाठी? समाजातल्या खटकणार्‍या गोष्टीत तेंडुलकरांनी कलप केलेले केस असं लिहिलेलं आहे. ते किती खोल आहे हे असलं काही आठवलं की कळतं..वहशत-ए-दिल, वहशनो-जार से रोकीं ना गयी, किसी खंजर किसी तलवार से रोकीं ना गयी, इश्क मजनू की वो आवाज है जिसके आगे कोई लैला किसी दीवार से रोकीं ना गयी.. अकरा मिनिटांची कव्वाली -रचणारेही थोर आणि ती सिनेमात ठेवणारेही थोर. कव्वालीत कृष्ण आणि राधेचा उल्लेख असलेलं दुसरं उदाहरण आपल्याला तरी आठवत नाही. खरं तर त्या काळात जातीचा कलेशी फारसा संबंधच नसावा. मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया, हमनें उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने बक्षी थी हमें एक ही धरती , हमनें कहीं भारत कहीं इरान बनाया…. ‘ओहोहो.. काय इकडे कुणीकडे? अस्सं? रोज येता? मीपण… मग इतके दिवस कसे काय भेटलो नाही… असो, बाकी काय म्हणताय? परवा त्या हिच्या लग्नात दिसला नाहीत? लग्न ना? अगदी जोरात.. त्याना काय हो… बारातेरा लाख उडवले म्हणतात..अग्दी साग्रसंगीत झालं.. सीमांतपूजनापासून गोदभराई.. आपलं… बिदाईपर्यंत… सीडी बघीतली असेलच तुम्ही… सगळ्या पोरी नुसत्या नाचत होत्या जीजू जीजू म्हणून.. मेहंदी, डीजे, चपला लपवणं.. काय छान लग्नं करतात हो हल्ली. अगदी प्रोफेशनल..असायला पाहिजे होता तुम्ही.. मजा आली… बराय, मग रोज येता तर भेटू परत…’ चला, आता या रस्त्यावर परत फिरायला यायची सोय नाही. बर. बघू. शोधू नवे रस्ते….पहाडोंको चंचल किरन चूमती है, हवा हर नदी का बदन चूमती है, यहां से वहां तक है छाओं के सायें…शुभम फुड्स.. आता आधी शुभम हे नाव तर नंतर फुडस कशाला आणि हे पाय मोडलेला म जोडायचं काय एक खूळ आहे कुणास ठाऊक. परवा काय बघितलं तर चक्षुम ऑप्टिक्स म्हणे. आणि फुड्स असं नका रे लिहू. उच्चार कसा करतो आपण? फूssss ड असा करतो की नाही? जरा र्‍ह्स्वदीर्घाचे नियम पाळा रे. अरुंद पुल म्हणे आता हा पूल इतका अरुंद आहे का की त्यावर पू चा दीर्घ उकारही मावणार नाही? पण जाऊ द्या. भाषेवर अत्याचार करणारे आणि घरातही हिंसाचार करणारे जर त्याचं समर्थनच करत असतील तर प्रश्नच मिटला. व्हेन स्मॉल पीपल बिगिन टु कास्ट लाँग शॅडोज, इट इज दी टाईम फॉर दी सन टु सेट..बापरे, हा चढ म्हणजे अगदी कस बघणाराच आहे…किस लिये मिल मिल के दिल टूटते हैं, किस लिये बन बन महल टूटते हैं, पत्थर से पूछा, शीशे से पूछा, खामोश है सबकी जुबां… द्विजेन मुखर्जीच्या आवाजात काय वाईट आहे? आणि सुबीर सेनच्या? पण हे लोक काही फार पुढे आले नाहीत. यांना आणि ब्रेक मिळाले ते बहुतेक सलील चौधरींकडे किंवा इतर बंगाली प्रॉड्यूसर -डायरेक्टर लोकांकडेच. शेवटी काय ग्रूपिझम सगळीकडेच आहे हो. गर्भाचि आवडी, मातीचा डोहळा तेथिचा जिव्हाळा तेथे बिंबे.. बंगाली मस्त असतात पण.पण बंगाल्यांना ‘बोंग’ म्हणतात ते बाकी फार चीप वाटतं. तो अभिषेक बच्चन परवा कुठल्या तरी मुलाखतीत राणी मुखर्जीला सारखा ‘बोंग’ ‘बोंग’ म्हणत होता. अभिषेक आहेच साला चीप. इतक्या गोड बंगाल्यांना ‘बोंग’ म्हणणं म्हणजे नाजूक काचसामानाच्या दुकानात रेडा शिरल्यासारखं वाटतं. कुठं वाचलं होतं बरं हे वाक्य? नाजूक काचसामानाच्या दुकानात रेडा…? खांडेकरांचा लघुनिबंध होता बहुतेक. ‘अच्छा’ या शब्दाच्या वापराबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं, असं वाटतंय. जब रात जरा शबनम पे ढले, लहरायी हुई वो जुल्फ खुले, नजरोंसे नजर एक भेद कहे, दिल दिलसे कहे एक अफसाना… मेंडोलीन मस्त वाजवलं आहे. इतकंसं नऊ इंचांचं वाद्य. सज्जाद हुसेनने म्हणे एकदा सवाई गंधर्व महोत्सवात त्यावर कुठलासा राग वाजवला होता. इलाही है तूफान है किस बला का, के हाथों से छूटा है दामन हया का, खुदा की कसम आज दिल कह रहा है, के लुट जाऊं मै नाम लेकर वफा का…
पावसानं दमट झालेलं गवत. बुटाला चिखल चिकटून आता ते जड व्हायला लागलेत. ‘सकाळ’चा बातमीदार असता तर त्यानं ‘भारी’ व्हायला लागलेत असं म्हटलं असतं. बापरे! ‘पैर भारी होना’ याचा अर्थ भलताच आहे! मराठी कुठे, हिंदी कुठे…पण आता अशी जुनाट मते न बाळगलेली बरी. एका भाषेत दुसर्‍या भाषेतले शब्द मिसळले तर वावगं काय, असाच एकूण सूर दिसतो. अगदी आशा बगेंसारखी लेखिकाही ‘मनवणे’ हे क्रियापद सरसकट वापरते. पण काय ठाऊक, असेल कदाचित तो नागपुरी बाज. ‘केल्या गेली आहे…’ सारखा…मनवणे,पकाऊ,निपटारा… जय हो! सुनो, तुम्हारा असली नाम क्या है? जी… मेरा असली नाम जॉनी. और नकली? नकलीभी जॉनी. इसके अलावाभी कोई नाम है? जी हां.. जानी.. आपको ज्यादा पसंद है? विजय आनंदवर एखादा लेख लिहायला पाहिजे. जरा पंख झटक, गयी धूल अटक और लचक मचक के दूर भटक, उद डगर डगर कसबे कूचे, नुक्कड बस्ती… मीरा के प्रभू, गिरिधर नागर, प्रभू चरणोंमें, हरी चरणोंमें, शाम चरणोंमें लागी नजरीया….अभी कल तलक तो मोहब्बत जवान थी मिलन ही मिलन था, जुदाई कहा थी मगर आज दोनों ही बेआसरा है….शनिवार आहे वाटतं आज. रस्त्याच्या कडेला एका फूटपाथवर शनिदेवाच्या देवळाचं अतिक्रमण झालेलं आहे. त्या देवळातल्याच एका दगडावर – आता दगडाला दुसरं काय म्हणणार? – तेल घालायला इतक्या सकाळीही गर्दी होऊ लागली आहे. मला बढती मिळू दे, माझ्या मुलीचं लग्न ठरु दे, माझ्या जमिनीच्या कज्ज्याचा निकाल माझ्या बाजूने लागू दे. ही एक गर्दी आणि चार पावलं पुढं दारुच्या दुकानात होऊ लागलेली गर्दी – दोन वेगळे जमाव – किंवा खरंतर एकच….चहाच्या टपर्‍या कुठेकुठे उघडू लागल्या आहेत. चहाचे पहिले अर्धे कप रस्त्यावर ओतलेले दिसत आहेत. बसेस, रिक्षा, ट्रकचे आवाज… ओ मेरी जां, ओ मेरी जां, मेरे को मजनू बना के, कहां चल दी कहां चल दी प्यार की पुंगी बजा के ….कोपर्‍यावरुन मी घराच्या दिशेने वळतो – आलं, जग आलं. रस्ता झाडणार्‍या बायका, देशी दारुच्या दुकानातली वर्दळ, त्यांच्या दारांवरचे मळकट, ओशट पडदे, रस्त्यावर सुरु झालेल्या पानाच्या पिचकार्‍या, आलं जग आलं..
दारात पेपर अडकवलेले आहेत….अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कडक उपाययोजना करणार…तत्वांवर आधारित युतीला आमचा विरोध नाही…बेदरकार चालकाचे तीन बळी…आलं.जग आलं…. मी थकून पंख्याखाली बसतो. बूट काढतो. ‘चहा दे गं अर्धा कप’…म्हणतो.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 7 टिप्पणियां

एका खेळियाने

दिलीप प्रभावळकरांच्या’एका खेळियाने’ ची सुधारित आवृत्ती नुकतीच वाचनात आली.’अक्षर प्रकाशन’ च्या या आवृत्तीत प्रभावळकरांनी त्यांच्या ‘वा गुरु!’ या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतचा त्यांच्या रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. ‘दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं रान पेटवलं असतं’ हे पु.ल. देशपांडेंचं वाक्य या पुस्तकाच्या वेष्टणावर छापलेलं आहे. (का? कुणास ठाऊक!वेष्टणावर प्रभावळकरांची प्रशंसा करणारी इतरही वाक्यं आहेत. पुस्तक नीट निरखून बघून वाचायला सुरवात करणार्‍यांना हा प्रथमग्रासे मक्षिकापात वाटू शकेल. प्रभावळकरांची प्रतिमा एका नटापलीकडे विचार करणारा, अर्थपूर्ण लेखन करणारा बहुरुपी कलाकार अशी आहे, त्यामुळे वेष्टणावरील ही वाक्ये आणि मुखपृष्ठावरील आणि पहिल्या काही पानांवरील मुद्दाम ‘पोझ’ देऊन काढलेले फोटो हे सुरवातीलाच विरस करुन जातात. उलट मलपृष्ठावरील आबा, सासू, नंदू आणि बापू या चार मोजक्या भूमिकांचे फोटो बघायला बरे वाटते. मुखपृष्ठाच्या जागी मलपृष्ठ आणि मलपृष्ठाच्या जागी मुखपृष्ठ अशी ‘अक्षर’ वाल्यांकडून ‘उसंडु’ झाली काय? ) रान पेटवणं म्हणजे काय हे माहिती नाही, पण मराठीतला (आणि आता हिंदीतलाही) एक गुणी अभिनेता, एक प्रयोगशील कलाकार, एक विचारी माणूस आणि एक सिद्धहस्त लेखक अशा अनेक भूमिकांतून प्रभावळकर आपल्याला भेटत आलेले आहेत. कॉलेजातील हौशी नाटकांनतर व्यावसायिक नाट्यभूमीवरची प्रभावळकरांची पहिली जोरदार ‘एंन्ट्री’ म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’ मधली त्यांची चेटकीण. या चेटकिणीबद्दल (आणि पुण्यात दोन प्रयोग असताना दुसर्‍या प्रयोगाला वेळ होतो म्हणून भर ट्रॅफिकमधून या चेटकिणीने स्कूटरवर मागे बसून लोकांना घाबरवत, दचकवत ‘जस्ट फॉर लाफ्स गॅग्ज’ मधल्या प्रसंगासारख्या केलेल्या प्रवासाबद्दल ) प्रभावळकरांनी इतरत्रही लिहिले आहे.त्यानंतरच्या ‘प्रेम कहाणी’, ‘आरण्यक’, ‘नगर अंधेरा’ या नाटकांमधून प्रभावळकरांची स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रियाच सुरु होती असे वाटते. ‘पोर्ट्रेट’ या एकांकिकेत प्रभावळकरांनी साकारलेल्या लष्करी अधिकार्‍याच्या भूमिकेबाबत बाकी कुतुहल वाटते. मतकरींची ही एकांकिका पहायला मिळायला हवी होती असे वाटते.
या पुस्तकात वर्णन केलेल्या ‘एलिअनेशन थिअरी’ या जर्मन रंगभूमीवरील कल्पनेची हे पुस्तक वाचताना गंमत वाटते. मराठी रंगभूमीवरची कल्पना काय तर अभिनय इतका खोल, उत्कट असावा की प्रेक्षकाचाही रंगमंच आणि वास्तव यात गोंधळ व्हावा. प्रेक्षकाला लेखकाने आपल्या लिखाणाने आणि अभिनेत्याने आपल्या अभिनयाने आपल्यामागे फरफटत नेले पाहिजे. ‘एलिअनेशन थिअरी’ मध्ये याच्या बरोबर विरुद्ध विचार मांडलेला आहे. एखाद्या नाट्यपूर्ण, उत्कट प्रसंगानंतर विंगेतून एका लाकडी बॉक्सवर हातोड्याने प्रहार करुन ‘टॉक’ असा मोठा आवाज काढला जाई, का, तर प्रेक्षकांना हे सगळं नाटक आहे, याचा फक्त भावनिक पातळीवर विचार करु नका, वैचारिक पातळीवरुन करा याची जाणीव करुन देण्यासाठी. ‘रसभंग’ वगैरे कल्पनांना येथे स्थान नाही, कारण मुळात प्रेक्षकाला नाटकात आस्वादक असे गुंतू द्यायचेच नाही. ‘समीक्षक’ या भूमिकेत माणूस शिरला की त्याला रसग्रहणापेक्षा चिरफाडीतच अधिक रस कसा वाटू लागतो याचे हे उदाहरण आहे, असे मला वाटते.
‘गजरा’ या दूरदर्शवरील कार्यक्रमांतून अनेक मराठी कलाकारांना ‘ब्रेक’ मिळाला आहे. त्याबद्दल दूरदर्शनचे आपण कायम आभार मानले पाहिजेत. ‘गजरा’ मध्ये प्रभवळकरांना या माध्यमात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तिचे सोने केले. ‘गजरा’ मध्ये काम करत करत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरवात झाली असावी. ‘पंचवीस एके पंचवीस’सारखी ‘बेस्ट ऑफ गजरा’ मध्ये समाविष्ट केलेली नाटिका दुसर्‍या कर्यक्रमासाठी टेप उपलब्द्ध नाही म्हणून पुसली जाते हे वाचून वैषम्यही वाटते.
त्यानंतरचा प्रभावळकरांचा मोठा पल्ला म्हणजे चिमणराव. प्रभावळकरांनी चिमणराव जिवंत केला, घराघरात नेला हे त्यांचे कर्तृत्व आहेच, पण ते चिमणरावात गुंतून पडले नाहीत, हे त्याहूनही मोठे कर्तृत्व आहे असे मला वाटते.’चिमणराव’ मालिका यशस्वी झाली पण तो चित्रपट चालला नाही याचे आपल्याला खूप वाईट वाटले असे प्रभावळकर लिहितात. पण त्या निमित्ताने त्यांना चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला हे एक बरे झाले. चिमणरावांच्या प्रतिमेतून बाहेर पडणे हे त्या वेळी प्रभावळकरांसमोरचे मोठेच आव्हान असले पाहिजे. ‘एक डाव भुताचा’ या प्रभावळकरांच्या पुढील – आणि खरे तर त्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाच्या- चित्रपटाच्या वेळी आपल्याला आलेले अनुभव, विशेषतः अशोक सराफ या अभिनेत्याबरोबर काम करताना आपल्याला अभिनेता आणि माणूस म्हणून त्याची जवळून झालेली ओळख याविषयी प्रभावळकरांनी मनापासून लिहिले आहे. आपली अशोक सराफ या अभिनेत्याविषयी मते काहीही असोत, पण नव्या मराठी माणसाला सांभाळून घेणारा, मदत करणारा मराठी माणूस हे -अगदी भूतकाळातले असले तरी- वाचायला बरे वाटते.
‘पळा पळा कोण पुढे पळतो तो’ या फार्ससंदर्भात प्रभावळकरांनी केलेले लिखाण मुळातून वाचावे असे आहे. एकतर बबन प्रभूंचा हा फार्स लेखन या दृष्टीकोनातून सगळ्यात अधिक जमलेला आहे. माझ्याकडे कुठेतरी त्याच्या संहितेचे जुनी, जीर्ण पुस्तक होते. ते वाचतानाही धोधो हसू फुटत असे. महामहोपाध्याय बिंदूमाधवशास्त्री , प्रमोदिनी, गागाचार्य, बन्सीधर, उकिडवे.. सगळी धमाल होती. एका वेळी पाच धोतर-पगडीवाल्यांची स्टेजवर पळापळ – त्यातही आत्माराम भेंडे, प्रभावळकर, भक्ती बर्वे ही कास्ट आणि भेंडेचं दिग्दर्शन यामुळे तो प्रकार भन्नाटच होत असणार यात शंका नाही.नटांच्या हातात नसलेल्या काही कारणांने हे प्रयोग बंद पडले असे प्रभावळकर म्हणतात तेंव्हा ते काय कारण असावे या भोचक कुतुहलापेक्षा काहीही असले तरी ते प्रयोग चालू रहायला पाहिजे होते असे वाटते.
‘झोपी गेलेला जागा झाला हे प्रभावळकरांचे त्यानंतरचे नाटक. ‘झोपी गेलेला जागा झाला’ चे गेल्या वर्षी ‘सुबक’ तर्फे पुनरुज्जीवन होऊन काही प्रयोग झाले होते. ‘झोपी…’ हा तसा त्या मानाने दुय्यम दर्जाचा फार्स. लेखनापेक्षा दिग्दर्शकाच्या आणि नटांच्या ‘इम्प्रूव्हायझेशन’ वर अधिक बेतलेला. ही पुढे मराठीतली पहिली प्रायोजित मालिका वगैरे झाली. दरम्यान प्रभावळकर नट म्हणून रंगभूमीवर आणि दूरदर्शनवर चांगलेच स्थिरावले होते. मराठी चित्रपटातही त्यांची वाटचाल सुरु होती. पण या माध्यमाबाबत, विशेषतः सुरवातीच्या काळात त्यांना मिळालेल्या मराठी चित्रपटांतील भूमिकांबाबत त्यांनी या पुस्तकात असमाधान व्यक्त केले आहे. ते बरोबरच आहे असे मला वाटते. अलका कुबलबरोबर नाचतानाचा त्यांचा एक फोटो या पुस्तकात आहे. त्याखाली ‘हे मी का करतोय?’ असं शीर्षक त्यांनी दिले आहे. ते अगदी योग्य वाटते. बेर्डे, पिळगावकर, कोठारे (आणि काही प्रमाणात अशोक सराफ) यांनी मराठी चित्रपटाला जे काही केले त्या अपराधाची तुलना एकता कपूरने खाजगी टीव्ही मालिकांना जे काही केले त्याच्याशीच होईल. त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही, वाड्यावरची धेंडे दोंद वाढवतात आणि माझ्या काशाचे पाय बाकी पांगळे होतात, आणि मोगरा मात्र फुलतच राहातो…त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही.. असो. प्रभावळकर या सगळ्यात खेचले गेले हे त्यांचे नशीब. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले हे आपले नशीब.’माझे सुदैव असे की मी त्यांची सून झाले, पण त्याहूनही मोठे सुदैव असे की मी त्यांची बायको झाले नाही’ प्रमाणे! याचे कारण असे की या माध्यमातूनच प्रभावळकरांनी पुढे ‘चौकट राजा’, ‘रात्र आरंभ’ असे परफॉर्मन्सेस दिले. पण ती पुढची गोष्ट झाली.
‘वासूची सासू’ हा प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातला पुढचा आणि महत्वाचा टप्पा. या पुस्तकात दिलेला दाराच्या चौकटीला रेलून उभ्या राहिलेल्या या सासूचा फोटो (एक चौकटीवरचा पुरुषी हात सोडला तर) ‘मारु’ दिसतो. एकूण हा सासूचा प्रयोग भन्नाटच होता. अरुण नलावडे, अतुल परचुरे (थोडाफार सुसह्य अविनाश खर्शीकरही) आणि दोन अफलातून भूमिकांत प्रभावळकर. बेरकी अण्णा नंतरनंतर सासूची भूमिका ‘एन्जॉय’ करायला लागतात तेंव्हाच्या गोंधळाला तर तोड नाही. ते चंद्रनमस्कार, ते लाडीक ‘शीतल, शीतल..’ ‘फार त्रास झाला हो हिच्या वेळेला’ वगैरे. या सगळ्या प्रकारात आपण जे करतो आहे ते यशस्वी होतं आहे हे कळाल्यानंतर नटाचं भान सुटणं अगदी शक्य असतं, पण आपलं ते सुटलं नाही असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. ते अगदी पटण्यासारखं वाटतं.
प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातले पुढचे महत्वाचे टप्पे म्हणजे ‘एक झुंज वार्‍याशी’, ‘नातीगोती’ , ‘एक हट्टी मुलगी’ आणि ‘घर तीघांचं हवं’ मधल्या त्यांच्या भूमिका. (तीघांचं मधली ‘ती’ हा उच्चारानुसार दीर्घ आहे, मग ती तिखटातल्या ‘ति’ सारखी र्‍हस्व का लिहिली जाते? पण ते असो.) \’एक झुंज वार्‍याशी’ हे पु.लंनी अवघ्या चार दिवसांत रुपांतरीत केलेलं आणि वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक आणि त्यातली सामान्य माणूस ही भूमिका हे मोठं आव्हान होतं आणि त्या प्रयोगाचा गंभीर ताण यायचा असं प्रभावळकर लिहितात. या नाटकादरम्यानची एक महत्वाची आठवण प्रभावळकरांनी लिहिली आहे. या नाटकात ‘सद सद् विवेकबुद्धी हा शब्द बर्‍याच वेळा येतो. बरेच लोक हा शब्द सत् सत् विवेकबुद्धी असा उच्चारतात.( हे दोन्ही शब्द सलग, पूर्ण असे वाचावेत) या नाटकाच्या प्रयोगाच्या तालमीदरम्यान मुद्दाम येणारे डॉ. अशोक रानडे यांनी नटांना हा शब्द कसा म्हणायचा – पहिला ‘द’ पूर्ण, दुसरा अर्धा हे मुद्दाम शिकवलं, आणि ते नाटकात काटेकोरपणे पाळलं गेलं. भाषाशुचितेचा हा आग्रह ‘केल्या गेली आहे.’ च्या जमान्यात मला फार निर्मळ वाटतो.
जवळजवळ वीस वर्षे अभिनय करुनही ‘एक झुंज वार्‍याशी’ या नाटकातून बरंच शिकायला मिळालं, फक्त आपली शिकायची तयारी हवी असं प्रभावळकर लिहितात तेंव्हा तर ते एका यशस्वी कलाकाराचं सूत्रच सांगून जातात असं वाटतं.
‘नातीगोती’ हेही गंभीर प्रकृतीचं नाटक. त्यातला काटदरे साकारताना आपण आपल्याला त्यात गुंतू दिलं नाही, त्यातला मतिमंद बच्चू गेल्यानंतर दोन्ही हातांनी तोंड झाकून ओक्साबोक्सी रडताना हाताच्या आड बाकी आपला चेहरा कोरा रहात असे असे प्रभावळकर लिहितात. कदाचित ‘एलिनेशन थिअरी’ चा त्यांच्यावरील प्रभाव तोवर कायम असेल. किंवा कदाचित हेच कलाकाराचं खरं कौशल्य असेल. त्यामुळे ‘नातीगोती’ मधले काटदरे बघताना प्रेक्षकांना त्रास होत असे, पण ते साकारताना आपल्याला अजिबात त्रास होत नसे, असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. ‘नातीगोती’ च्या प्रयोगादरम्यान जळगावच्या प्रेक्षकांनी प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांच्यामधील एका गंभीर प्रसंगात अश्लील शेरेबाजी केली आणि मग प्रभावळकरांना त्यांची काटदरेंची भूमिका सोडून त्या प्रेक्षकांना खड्या आवाजात कसं सुनवावं लागलं त्याची एक आठवण या पुस्तकात आहे. गावात बदल, बाकी अशी एखादी आठवण प्रत्येक अभिनेता-अभिनेत्रीच्या पुस्तकात असतेच. पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी एका लहान खेड्यात गणपत पाटलांच्या नाट्यप्रयोगाला त्या खेड्यातल्या भाबड्या, गोजिर्‍या, निरागस प्रेक्षकांनी हाच प्रकार केला होता, त्यावेळी मी तिथे होतो. गणपत पाटलांनी शेवटी मग आपला ‘नाच्या’ चा आवाज सोडून एकदम कणखर आवाज लावला होता. प्रेक्षक चरकले होते. पंचवीसेक वर्षांपूर्वी ‘भरत’ मध्ये अभिनेते राजशेखर यांना हाच प्रकार करावा लागला होता आणि विक्रम गोखलेंनी प्रयोगादरम्यान (प्रयोगाआधी आवाहन करुनही) कुणा एका ‘रसिका’चा मोबाईल फोन वाजू लागला तेंव्हा स्वतःच्याच थोबाडीत मारुन घेतली होती… असे प्रसंग हा प्रकार वाचताना आठवले. गंधर्वांच्या शालूंचं आणि थिरकवासाहेबांच्या तबल्याचं माहेरकौतुक असलेल्या रसिक, सहृदय मराठी प्रेक्षकाचा हा एक हिडीस, थिल्लर चेहरा प्रत्येक नटाने आणि कलाकृती बघण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक रसिकाने ध्यानात ठेवला पाहिजे, असे माझे मत आहे.
‘एक हट्टी मुलगी’ मधला इरसाल तात्या, ‘घर तीघांचं हवं’ मधला व्यसनी डीएन आणि ‘कलम ३०२’ मधील दुहेरी भूमिका – प्रभावळकरांच्या या भूमिका पहायला हव्या होत्या असे वाटते. पुढे ‘संध्याछाया’, ‘जावई माझा भला’ वगैरे नाटकांपर्यंत त्यांच्यातल्या प्रयोगशील अभिनेत्यावर त्यांच्यातल्या व्यावसायिक कलाकाराने मात केलेली असावी असेही वाटते. पण एकंदरीत या पुस्तकातील प्रभावळकर या अभिनेत्याचा नाट्यप्रवास- आणि प्रभावळकरांनी त्याचे केलेले शब्दांकन – हे दोन्हीही आपापल्या गुणामुळे वाचनीय झालेले आहेत.
‘हसवाफसवी’ आणि ‘बटाट्याची चाळ’ या दोन प्रयोगांच्या उल्लेखाशिवाय प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासाचे वर्णन पूर्ण होऊच शकणार नाही. ‘हसवाफसवी’ हा एक वेगळा, प्रसन्न प्रयोग होता. ‘बॉबी मॉड’ सोडला तर त्यातले काहीही कृत्रीम, चिकटवलेले वाटत नाही. कृष्णराव हेरंबकर अगदी त्यांच्या शेवटच्या ‘चिंतना’ सकट अस्सल वाटतात. (तेच काहीसे विकसित स्वरुपात गंगाधर टिपरे म्हणून नंतर दूरदर्शनवर आले) दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबाची आपल्या मुलीशी बोलतानाची जी आफ्रिकन म्हणून भाषा आहे तिच्यात स्वाहिली आणि पोर्तुगीज भाषेतले काही शब्द आपण वापरले तर प्रिन्स वांटुंग पिन् पिन् च्या भाषेत काही जपानी शब्द वापरले असे प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. प्रेक्षकांना जे स्टेजवर किंवा पडद्यावर दिसतं त्यामागे विचार करणार्‍या कलाकाराचा किती अभ्यास असतो, किती मेहनत असते, हे यावरुन ध्यानात येतं. पण ‘हसवाफसवी’ त खरा बाजी मारुन जातो तो अष्टवक्र नाना पुंजे. गेंगाण्या आवाजात वाकडीतिकडी पावले टाकत अत्यंत आगाऊपणे बोलणारा हा नाना कोंबडीवाला अतिशय लोकप्रिय झाला होता. एकूणच ‘हसवाफसवी’ यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाले होते. त्याचे ७५० प्रयोग झाल्यावर प्रभावळकरांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. कलाकाराकडे फक्त व्यावसायिक दृष्टीकोन असून चालत नाही, त्याला सतत आपल्यातल्या कलाकाराची वाढ चालू ठेवावी लागते – हे सगळं लिहायला-वाचायला ठीक आहे, पण यासाठी खरोखर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली की बरेच लोक कच खातात. प्रभावळकरांनी तसे केले नाही, हे फार बरे झाले.
‘बटाट्याची चाळ’ हे अर्थातच प्रभावळकरांना (आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींना) एक वेगळं आव्हान असलं पाहिजे. त्याच्या प्रयोगांत ‘पुलं’ आणायचे नाहीत, पण मूळ कलाकृतीला विटाही लावायच्या नाहीत असली काहीतरी कोंडी या दोघांची झाली असली पाहिजे. पुलंची ‘चाळ’ मी पाहिलेली नाही, पण प्रभावळकरांची चाळ बघताना मला हाच नट हे आव्हान पेलू शकतो असं जाणवलं होतं. चाळीमधलं ‘चिंतन’ सादर करताना त्यात ‘गंगाधर टिपरे’ डोकावतील की काय या शंकेने आपण ‘कॉन्शस’ झालो होतो असं प्रभावळकरांनी लिहिलं आहे. कलाकाराला आपल्या भूमिकांचं ‘बेअरिंग’ सांभाळताना आवश्यक असणार्‍या या एका वेगळ्या कौशल्याची जाणीव या लिखाणातून होते.
‘वा गुरु!’ या प्रभावळकरांच्या अगदी अलीकडच्या नाटकाविषयी प्रभावळकर मोजके लिहितात. यातील सप्रेसरांच्या भूमिकेचा अजून शोध सुरु आहे असे ते म्हणतात.
दूरदर्शनवरील प्रभावळकरांच्या काही प्रयोगांबाबत मी वर लिहिले आहे. त्यानंतर खाजगी वाहिन्या सुरु झाल्यावर आलेली ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका मराठीतल्या काही सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक ठरावी. ‘लोकप्रिय आहे ते ते सगळे थिल्लर असते’ या प्रमेयाला छेद देणारी ही मालिका. त्यातले आबा आपल्याला फार लवकर सापडले असे प्रभावळकर लिहितात. या मालिकेतले शिर्‍याचे -म्हणजे आबांच्या नातावाचे आणि आबांचे प्रसंग लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीन्ही दृष्टीकोनांतून सरस ठरले आहेत. प्रभावळकरांनी त्यांच्या आबा या भूमिकेविषयी फार सुरेख लिहिलं आहे. बर्‍याच लोकांना ठाऊक नसणारी आणि काही लोकांच्या विस्मरणात गेलेली ‘साळसूद’ या मालिकेतील प्रभावळकरांची ‘भार्गव’ ही खलभूमिका मला हे पुस्तका वाचताना आठवली आणि फार बरे वाटले. या सगळ्या मालिका, हे नाट्यप्रयोग पुन्हा एकदा पहावेसे वाटले.
शेवटी प्रभावळकरांच्या चित्रपटातील भूमिकांविषयी अगदी थोडे. अगदी अनपेक्षितपणे साकारावा लागलेला ( आणि म्हणून तयारीला अगदी वेळ न मिळालेला) ‘चौकट राजा’ मधला नंदू, ‘एन्काऊंटर-दी किलिंग’ मधला पुनाप्पा, ‘रात्र आरंभ’ मधले ठोंबरे, ‘कथा दोन गणपतरावांची’ मधले गणपतराव तुरे-पाटील, ‘मुन्नाभाई’ मधले गांधी आणि ‘सरकार राज’ मधले रावसाहेब या प्रभावळकरांच्या काही उल्लेखनीय भूमिका. विस्तारभयास्तव या भूमिकांबद्दल फार लिहीत नाही (आणि खुद्द प्रभावळकरांनीही आपल्या चित्रपटांतील भूमिकांबद्दल तसे कमीच लिहिले आहे. डॉ. लागूंनी ‘लमाण’ मध्ये असेच केले आहे. मुळात नाटकाची आवड असलेल्या कलाकाराला सिनेमा हे माध्यम फारसे आकर्षित करणारे वाटत नसावे!), पण ‘रात्र आरंभ’ हा चित्रपट ज्यांनी बघीतला नाही त्यांनी तो आवर्जून आणि शक्य तितक्या लवकर बघावा असे बाकी मला आवर्जून लिहावेसे वाटते.
‘सरकार राज’ रिलीज झाला त्या दिवसाची गोष्ट. रांगेत उभे राहून रात्रीच्या खेळाची तिकिटे काढली होती. सोबत एक असाच अमिताभ बच्चनचा ‘डाय हार्ड’ फॅन होता. सिनेमा सुरु झाला. बच्चन पितापुत्र रावसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला जातात असा प्रसंग होता. झोपाळ्यावर पाठमोरे बसलेले रावसाहेब आणि त्यांना वाकून नमस्कार करणारे बच्चन पितापुत्र असा तो प्रसंग. रावसाहेबांचा चेहरा आधी दिसत नाही. कॅमेरा हळूहळू वर येतो आणि मग फेटा बांधलेले, वृद्ध रावसाहेब आशीर्वाद देताना दिसतात. प्रभावळकरांचा चेहरा दिसल्यावर माझा बच्चनप्रेमी मित्र उत्स्फूर्तपणे म्हणाला, “हां… हे ठीक.हे ठीक. मला वाटलं साहेबांना कुणा ऐर्‍यागैर्‍यासमोर वाकायला लावतात काय…” या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याचे आठ रिटेक्स झाले आणि पर्यायाने बच्चनद्वयींना आठ वेळा प्रभावळकरांना वाकून नमस्कार करावा लागला. ‘पोएटिक जस्टिस’ यालाच म्हणतात की काय, कुणास ठाऊक!
काही असो, हे पुस्तक मला आवडले. आत्मचरित्रांचा सुकाळ झालेला असताना प्रभावळकरांनी ज्या संयमाने आणि खोल विचार करुन हे पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर प्रभावळकरांचा मी अधिकच मोठा प्रशंसक, चाहता झालो आहे असे मला वाटते. आनंद आहे.
एका खेळियाने
दिलीप प्रभावळकर
अक्षर प्रकाशन
सुधारित आवृत्ती, मे २०११, किंमत ३५० रुपये.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 4 टिप्पणियां

ती

तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला.
“हॅलो, कोण बोलतंय?….” ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा लांब न्यावा लागला. आवाज एकदम खणखणीत. भाषेला थोडासा हेल . थोडासा कोल्हापुरी, थोडासा अमराठीही.
“हॅलो… बाबा…. आहेत का?” मी चाचरत विचारले.
“ह्हो…” पुन्हा तसाच ठसकेबाज आवाज.”बाबा, तुझा फोन आहे.”
मग मी तिच्या वडीलांशी वगैरे बोललो. नंतर लवकरच त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी तिला पहिल्यांदा बघीतले. तिच्याकडे बघताना अगदी प्रथम जाणवला आला तो तिच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास. सहा-सात वर्षे वय, लहानसर चण, गोरा म्हणता येईल असा वर्ण, सोनेरी छटा असलेले मोकळे सोडलेले सुळसुळीत केस, पांढरेशुभ्र, लहानसे, एकसारखे रेखीव दात, चमकदार भिरभिरते डोळे आणि चेहर्‍यावर आत्मविश्वास. नुकतेच सगळे जग जिंकले आहे असा आत्मविश्वास. ही मुलगी मला प्रथमदर्शनीच आवडून गेली.
“ये इकडे” मी तिला जवळ बोलावले. या वयाच्या मुली साधारण असे कुणी जवळ बोलावले की लाज लाज लाजतात. आपल्या आई बाबांच्या अंगावर लोळण घेतात , पळून जातात आणि काही म्हणजे काही केले तरी जवळ येत नाहीत. इथे या मुलीने पहिला धक्का दिला. ती चक्क माझ्या व माझ्या पत्नीच्या शेजारी येऊन बसली. नावगाव विचारले तर तिने ते अगदी स्पष्ट शब्दांत न लाजता सांगितले आणि मी तिला देऊ केलेले चॉकलेट माझ्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतले. मी हसलो. “राहतेस का आमच्याबरोबर इथेच हॉटेलात?” मी तिला विचारले. “च्क्क…” ती म्हणाली. “माझी मॅथ्सची टेस्ट आहे उद्या..” मग बघता बघता तिच्याशी गट्टी जमली. तिने मग तिच्या वर्गातील सगळ्या मुला-मुलींची एक ते एकोणचाळीस अशा वर्गक्रमांकानुसार नावे म्हणून दाखवली (हे या वयातल्या मुला-मुलींच्या लक्षात कसे राहाते कुणास ठाऊक!), मांडीवर उलटा-सुलटा हात आपटत ती शिकत असलेल्या कर्नाटक संगीतातले एक गाणे म्हणून दाखवले (तिचे वडील मागून ‘आता पुरे… हं, आता बास…अशा खाणाखुणा करत होते!), माझ्या मुलाचा मोबाईल फोन हातात घेऊन त्यातल्या कायकाय गंमतीजंमती बघीतल्या आणि उरलेला वेळ कधी एका पायावर तर कधी दोन्ही पायावर नाचत मस्त धुडगूस घातला.
मग एकदोन दिवसांत आम्हाला त्यांच्या घरी एक दिवस राहायला जायचा योग आला. तो दिवसभर ही मुलगी भिंगरीसारखी भिरभिरत होती. दुपारच्या जड जेवणानंतर तिने कुणाच्या डोळ्याला डोळाही लागू दिला नाही. सतत तिची काही ना काही बडबड, कधी आपली चित्रे दाखवणे, आपल्या शाळेबद्दल काही सांगणे असे काहीकाही सुरु होते. दुपारी आम्ही बाहेर गेलो. गाडीत जरा गर्दी होत होती, म्हणून मी तिला पुढच्या सीटवर माझ्याजवळ बोलावले. माझ्या मांडीवर बसून ती मला त्या शहरातल्या वेगवेगळ्या जागांविषयी, ठिकाणांविषयी सांगत होती. तिची स्कूल बस कुठे येते, किती वाजता येते, शाळेत पहिली सुट्टी किती वाजता होते, मग लंच ब्रेकमध्ये ती डब्यातून नेलेले कायकाय खाते हे सगळे सगळे तिने सांगून घेतले. मध्येच गाडी पार्क करताना गाडीच्या मागच्या बाजूला एक कुत्रे आले तर ती अस्सल कोल्हापुरी हेल काढून म्हणाली,”कुत्रं मरतंय आता..” आणि पुन्हा खळखळून हसली. मला हसू आवरेना. महाराष्ट्राबाहेर जन्मलेली, वाढलेली ही एवढीएवढी मुलगी – घर सोडले तर आसपास मराठी बोलणारेही कुणी नसावे- तिच्यात हे कृष्णेचे-पंचगंगेचे पाणी कुठून आले? कॉलेजात असताना शिकलेल्या जेनेटिक्स या विषयाला परत एकदा सलाम करावासा वाटला.
त्याच दिवशी आम्हाला परत यायला निघायचे होते. आमच्या त्या स्नेह्यांच्या पत्नीने त्या मुलीच्या हातात आम्हाला देण्यासाठी काही भेटवस्तू दिल्या. त्या मुलीने मग “दादा , हे तुला, काकू, हे तुला..” असे म्हणून त्या आमच्या हातात दिल्या. त्या कुटुंबाच्या आदरातिथ्याने आधीच संकोचलेलो आम्ही अधिकच संकोचलो. “आवडलं का तुम्हाला?” त्या मुलीने धीटपणे आम्हाला विचारले. तिला तिच्या आईने तसे विचारायला सांगितले असावे.
त्या छोट्या मुलीला मी जवळ घेतले. “हो, खूप खूप आवडलं” मी म्हणालो. “पण सगळ्यात जास्त आम्हाला तू आवडलीस…”
आमचे स्नेही आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला येणार होते. त्या मुलीला व तिच्या आईला वेगळीकडे जायचे होते. त्या दोघींना रिक्षा स्टँडवर सोडून आम्ही पुढे निघालो तेंव्हा तिच्या आईबरोबर तिनेही तिचा छोटासा पंजा हलवून आम्हाला निरोप दिला. रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात तिचे सुळसुळीत केस चमकत होते आणि तिच्या लहानशा चेहर्‍यावर तेच आत्मविश्वासपूर्ण हसू होते.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 6 टिप्पणियां

सुनीताबाई

सुनीताबाई देशपांडे यांचे निधन होऊन आता दीडेक वर्ष होऊन गेले. पु.ल. हयात असताना आणि त्यानंतरही सुनीताबाईंबद्दल बरेच बरे-वाईट बोलले-लिहिले जात असे. बरे कमी, वाईटच जास्त. ’पु.लं च्या प्रतिभेमागची खरी शक्ती’ इथपासून ते ’पु.लंच्या दारातलं कुत्रं’ इथपर्यंत विविध विशेषणे सुनीताबाईंना लावली गेली. गंमत म्हणजे यातली बरीचशी त्यांच्या कानावरही गेलेली होती. पु.लंच्या एकूण बहुरुपी व्यक्तिमत्वापुढे सुनीताबाईंची प्रतिमा (आणि प्रतिभा) काळवंडलेली, झाकोळल्यासारखीच राहिली असे खूप लोकांचे –अगदी खुद्द – पुलंचेही मत होते. ’आहे मनोहर तरी..’ नंतर तर त्यात भरच पडली. ’आहे मनोहर तरी…’ चे जसे कौतुक झाले तशी त्यावर सडकून टीकाही झाली. कितीतरी (भाबड्या) लोकांना हा सुनीताबाईंनी हेतुपुरस्सर केलेला मूर्तीभंजनाचा प्रकार वाटला. दरम्यान पुलंना महाराष्ट्रातील रसिकांनी आपले दैवत वगैरे बनवून टाकलेले होतेच. लेखन, संगीत, दिग्दर्शन, अभिनय अशा अनेक कलाक्षेत्रांत लीलया संचार करणारा हा माणूस चार भिंतींच्या आत तुमच्याआमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, एक टिपिकल नवरा आहे – किंवा कुठलाही माणूस, नवरा तसाच असतो- हे काहीसे कटु सत्य वाचकांपर्यंत पोचवण्याचे महत्त्वाचे काम ’आहे मनोहर तरी..’ ने केले. सामान्य वाचकांच्या त्या पुस्तकावर उड्या पडल्या त्या पुलं आणि सुनीताबाई यांच्या खाजगी जीवनाबद्दल त्यांच्या मनात असलेल्या कुतुहलामुळेच. ’आहे मनोहर तरी…’ या पुस्तकात इतर बरेच काही आहे, पण त्यातून लक्षात राहिला तो म्हणजे सुनीताबाईंनी पुलंच्या आयुष्यात आणलेला व्यवहारीपणा, त्याला लावलेली शिस्त आणि त्यामुळे पुलंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात पडलेला फरक.
पुढे जी.ए.कुलकर्णी यांनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रांचा एक मोठा खंड, सुनीताबाईंनी जी.एंना लिहिलेल्या पत्रांचे ’प्रिय जी.ए.’ हे पुस्तक, त्याशिवाय सुनीताबाईंनी स्वतंत्रपणे लिहिलेली ’सोयरे सकळ’, ’मण्यांची माळ’, ’समांतर जीवन’ ही पुस्तके प्रकाशित झाली. यांतून सुनीताबाईंची एक स्वतंत्र, स्वयंप्रकाशी प्रतिमा वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी राहात गेली. मंगला गोडबोल्यांनी लिहिलेले व अरुणा ढेरे यांच्या एका स्वतंत्र लेखाचा समावेश असलेले, सुनीताबाईंच्या मृत्यूनंतर एका वर्षाने प्रसिद्ध झालेले ’सुनीताबाई’ हे पुस्तक नुकतेच माझ्या संग्रहात आले आहे.
मंगला गोडबोले या काही माझ्या फार आवडीच्या लेखिका आहेत असे म्हणता येणार नाही. त्यांची विनोदी पुस्तके एका विवक्षित वर्गात कितीही लो्कप्रिय झालेली असली तरी ’बडीशेप चघळताना वाचायची पुस्तके’ यापलीकडे त्यांचे फारसे अस्तित्व नाही असे माझे मत आहे. एकूणात चिंचाआवळी भाबडेपणा हाच त्यांच्या पुस्तकांचा स्थायीभाव आहे. त्यातल्या त्यात पु.ल.देशपांड्यांबद्दल लिहिताना तर मंगलाबाई देवघरात निरांजन लावून हातात मीठमोहर्‍या घेऊनच लिहायला बसत असल्यासारख्या वाटतात. असो. या पुस्तकात हा भाबडेपणा त्यांनी टाळला आहे असे त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, पण सुनीताबाईंशी अत्यंत मोजका परिचय असताना त्यांनी सुनीताबाईंचे इतके तपशीलवार चरित्र लिहिणे हे म्हणजे भास्करबुवा बखल्यांना एकदाही न पहाता किंवा त्यांची एकही रेकॉर्ड न ऐकता त्यांच्या गायकीविषयी पुलंनी लिहिलेल्या लेखाइतके विचित्र वाटते. पण हा एक दोष सोडला तर मंगलाबाईंनी हे पुस्तक लिहून एक फार दांडगे काम केले आहे.
The borderline between genius and insanity is very thin असे म्हणतात. अलौकिक प्रतिभा आणि वैयक्तिक आयुष्यातले यश, त्यातली शिस्त असा एकत्र मिलाफ क्वचितच बघायला मिळतो. नित्यनूतननिर्मितीचा वर आणि विस्कटलेल्या आयुष्याचा शाप हेच बहुदा एकत्र नांदताना दिसतात. पुलंची एकूण वृत्ती आणि संस्कारांतून त्यांची झालेली जडणघडण यातून एरवी त्यांचे आयुष्य काही उधळले गेले असते असे वाटत नाही, पण ते इतके सार्थ झाले असते असेही नाही. अर्थात अमुक झाले असते तर, तमुक झाले असते तर अशा कल्पनांना काही अर्थ नाही, पण व्यवस्थितपणा, व्यवहारीपणा, गोष्टी वेळच्या वेळी करणे, लक्षात ठेऊन करणे हे अपला स्वभावातच नाही याची जाहीर कबुली पुलंनी दिलेली आहे. सुनीताबाईंनी पुलंच्या जीवनातला हा सगळा व्यवहार काटेकोरपणे सांभाळला. सुनीताबाईंना ओळखणार्‍या लोकांना त्यांच्या परवानगीशिवाय पुलंचे दर्शनसुद्धा कसे अशक्य होते याची कल्पना आहे. सुनीताबाई या स्वत: अत्यंत तत्वनिष्ठ, आदर्शवादी आणि कणखर स्वभावाच्या होत्या. याउलट पुलंचा स्वभाव काहीसा घळ्या म्हणता येईल असा. पुलंच्या या स्वभावाचा लोकांनी गैरफायदा घेणे हे एकदा सोडून अनेकदा झाले. (’गुळाचा गणपती’ चे उदाहरण सर्वश्रुतच आहे) त्यामुळे पुलंमधली सर्जनशीलता जपायची असेल आणि त्यांच्या हातून अधिकाधिक नवनिर्मिती व्हायची असेल तर त्यांच्यावर आणि त्यापेक्षा अधिक त्यांच्या चाहत्यांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे असे सुनीताबाईंना वाटले असावे. हा अंकुश ठेवणे म्हणजे तरी काय? तर त्यांच्या लेखना-वाचनाच्या वेळा सांभाळणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांच्या नाट्यप्रयोगांची, पुस्तकांच्या आवृत्यांची, काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची, प्रवासाची व्यवस्था बघणे आणि यापलीकडे जाऊन पु.ल.देशपांडे फाऊंडेशन चे सतत विस्तारत जाणारे काम बघणे. ही नुसती यादी बघीतली – आणि तशी ती फारच अपूर्ण आहे- तरी सुनीताबाईंच्या कामाची व्याप्ती ध्यानात येते.
हे सगळे सुनीताबाईंनी आनंदाने, प्रेमाने केले. पुलंच्या आयुष्यात विलक्षण उंची गाठून गेलेले काही क्षण केवळ सुनीताबाईंच्या आग्रहामुळे, काही वेळा अट्टाहासामुळे आले. मग ते कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम करणे असो नाहीतर आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या सरकारस्थापनेच्या गौरवसभेत जाहीर भाषण करण्याला नकार देणे असो. पुलंच्या एका नाट्यप्रयोगाचे पन्नास प्रयोग झाले की त्यांनी दुसरा प्रयोग लिहायला घ्यायचा या सुनीताबाईंच्या आग्रहामुळेच पुलंकडून इतके विपुल लिखाण लिहून झाले हे अगदी सुनीताबाईंच्या टीकाकारांनाही नाकारता येणार नाही. याशिवाय ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीच्या सुनीताबाईंनी जे जे करायचे ते उत्तमच झाले पाहिजे असा सतत आग्रह धरला. म्हणूनच पुलंचे लिखाण, त्यांचे नाट्यप्रयोग, कवितावाचन आणि मुख्य म्हणजे पु.ल. देशपांडे फाऊंडेशनचे सामाजिक कार्य इतके चोख, निर्दोष आणि देखणे झाले. आपले काम उत्तमच असावे, असे प्रत्येकालाच वाटते, पण त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेण्याची किती लोकांची तयारी असते? अशी मेहनत सुनीताबाईंनी आयुष्यभर घेतली. मग ते पुलंनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे मुद्रणशोधन असो की पुलंच्या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान क्षणभर विंगेत येणाया पुलंसाठी हातात घोटभर पाण्याचा ग्लास घेऊन उभे राहाणे असो. पुलंच्या प्रयोगांची तिकिटविक्री, ध्वनिक्षेपण यंत्रणा, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था, कलाकारांची येण्याजाण्याची व्यवस्था, त्यांना देण्यात येणारे मानधन यात कुठेही चूक होता कामा नये यासाठीच सुनीताबाईंनी अत्यंत चोख आणि अथक प्रयत्न केले. Behind every successful man there is a woman हे म्हणायला ठीक आहे, पण सुनीताबाईंनी ते आपल्या कणखरपणाने सिद्ध करुन दाखवले.
सुनीताबाईंच्या या कणखरपणाची कितीतरी उदाहरणे या पुस्तकात आहेत. त्यातली बरीचशी वाचताना ’हे जरा जास्तच होते आहे की काय?’ असे वाटते. काही प्रसंग बाकी माणसात इतके आंतरिक बळ येते तरी कुठून असा प्रश्न पडावा असे आहेत. मालेगावच्या महात्मा गांधी विद्यालयचा बोजवारा उडाल्यावर आणि भाऊसाहेब हिरे आणि शंकरराव देव कितीही आदर्शवादी असले तरी मखरात बसलेले मातीच्या पायांचे देव आहेत हे ध्यानात आल्यावर सुनीताबाईंनी त्यांच्या फटकळ स्वभावानुसार तडकाफडकी राजिनामा दिला. मालेगावातल्या गैरव्यवहाराची कबुली देणारी आणि त्याबद्दल माफी मागणारी भाऊसाहेब हिर्‍यांची पत्रे सुनीताबाईंकडे आहेत हे कळाल्यावर त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न आचार्य अत्र्यांनी केला. ती पत्रे मिळवण्यासाठी अत्र्यांनी विनवण्या, पैशाची लालूच दाखवणे आणि नंतर चक्क दमदाटी असले प्रकार केले, पण सुनीताबाई मुळीच बधल्या नाहीत. अत्रे हे त्या काळात फार मोठे प्रकरण होते. त्यांच्यासमोर त्या तुलनेने सर्वार्थाने अगदी लहान असलेल्या सुनीताबाईंचा हा कणखरपणा थक्क करुन टाकणारा आहे. असा खंबीरपणा त्यांनी आयुष्यात बर्‍याच वेळा दाखवला. पुलंच्या प्रत्येक नाट्यप्रयोगाची रॉयल्टी मिळण्याबाबत असो, की पु.ल देशपांडे फाऊंडेशनचा चोख व्यवहार सांभाळण्याबाबत असो, सुनीताबाईंनी कधीही तडजोड केली नाही.
या पुस्तकाच्या निमित्ताने संसारात नवराबायकोने एकमेकांवर किती अधिकार गाजवावा असा एक प्रश्न वाचकाच्या मनात येतो. खुद्द सुनीताबाईंनाही पुलंच्या हयातीत (आणि विशेषत: पुलंच्या निधनानंतर) ’आपण जरा जास्तच केले की काय?’ अशी टोचणी लागली होती. ’मी त्याचा गिनिपिग तर केला नाही ना?’ असा प्रश्न त्यांनी ’आहे मनोहर तरी..’ मध्ये स्वत:लाच विचारला आहे. सुनीताबाईंच्या या प्रचंड कष्टाळू, झपाटलेल्या आणि ’परफेक्शनिस्ट’ वृत्तीचा अतिरेक होतो आहे की काय असे वाटावे असे काही उल्लेख या पुस्तकात आहेत. सुनीताबाईंच्या अतिचिकित्सक वृत्तीमुळे पुलंचे, एकूण मराठी साहित्यविश्वाचे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा आणि पुलं यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्‍या असंख्य रसिकांचे नुकसान झाले की काय असे वाटावे असेच हे उल्लेख आहेत. परदेशात लेखकाच्या निधनानंतर त्याला आलेली (आणि बहुतेक वेळा त्याने इतरांना लिहिलेली) पत्रे प्रकाशित करण्याची पद्धत आहे. मराठीत ’जीएंची निवडक पत्रे’ चे चार खंड आणि ’प्रिय जी.ए., सप्रेम नमस्कार’ यांचे ढळढळीत उदाहरण आहे. पुलंच्या मृत्यूनंतर पुलंना आलेली मान्यवर लोकांची सुमारे अडीच हजार पत्रे प्रकाशित करावी, त्यातून समाजाच्या त्या काळातल्या जडणघडणीवर काही प्रकाश पडावा अशी योजना पुढे आली होती. पण पत्रावर प्रताधिकार कुणाचा – पत्र पाठवणार्‍याचा की पत्र ज्याला पाठवलं त्याचा यावर सुनीताबाईंनी इतका खल केला की शेवटी ती योजनाच बारगळली. कदाचित त्यांना आधी आलेल्या एकदोन कटु अनुभवांमुळे असेल, पण ’पुस्तक छापून आल्यावर एकाही पत्रलेखकानं आक्षेप घेतलेला मला चालणार नाही’ अशी भूमिका सुनीताबाईंनी घेतली. त्यांच्या या अलवचिक धोरणामुळे यातलं एकही पत्र आजवर प्रकाशित होऊ शकलेलं नाही. काही गोष्टी वेळच्या वेळी होण्यात गंमत असते. आता तर पुलं जाऊनही अकरा वर्षे होऊन गेली. आता अशी पत्रे प्रकाशित झाली तरी पुलंना आणि त्यांच्या जबर्‍या लोकसंग्रहाला ओळखणारी पिढीच आता हळूहळू संपत चालली आहे. सुनीताबाईंनी त्यांची ताठर भूमिका किंचित शिथील केली असती तर हा अनमोल ठेवा रसिकांसमोर वेळेत आला असता. असेच काहीसे खुद्द पुलंनी लिहिलेल्या पत्रांबाबतही वाटते. पुलं स्वत: जबरे पत्रलेखक होते. पुलंच्या निधनानंतर ’पुलंची निवडक पत्रे’ काही प्रसिद्ध झाली नाहीत. जी.एंच्या पत्रांच्या प्रसिद्धीबाबबत पुढाकार घेणार्‍या सुनीताबाईंनी याबाबत असे का केले असावे?
पुलंच्या नाट्यप्रयोगांबाबतही असेच झालेले दिसते. ऐन बहरातल्या पुलंच्या नाट्यप्रयोगाचे चित्रीकरण सुनीताबाईंनी करु दिले नाही. चित्रीकरण करताना पुलं कॉन्शस होतील, प्रेक्षकांचा रसभंग होईल, या चित्रीकरणाचा पुढे दुरुपयोग होईल अशा सबबी पुढे करुन सुनीताबाईंनी पुलंच्या प्रयोगांचे चित्रीकरण करण्यास मनाई केली. यामागची निश्चित मानसिकता आजही ध्यानात येत नाही. पुलंच्या आज उपलब्द्ध असलेल्या चित्रफितींचा दर्जा अत्यंत सामान्य आहे. याहून उत्तम दर्जाचे चित्रीकरण करुन पुलंचे हे असामान्य प्रयोग अजरामर करुन ठेवता आले असते. सुनीताबाईंच्या या भूमिकेमागचे, त्यांना असे चित्रीकरण करण्यामागचे ऐतिहासिक महत्त्व त्यावेळी ध्यानात आले नसावे हे कारण आज पटत नाही. त्यांच्यासारख्या असामान्य बुद्धिमत्तेच्या स्त्रीला रंगमंचावर घडणारे हे असले काही विलक्षण नाट्य अजरामर करुन ठेवण्याचे महत्त्व नक्की कळाले असणार. मग सुनीताबाईंनी हे चित्रीकरण का करु दिले नाही? यावर लेखिकेने सुचवलेले दुसरे कारण – या ना त्या प्रकारे आपला पुलंच्या प्रयोगावरच नव्हे तर आयुष्यावर वरचष्मा असावा असे सुनीताबाईंना वाटले असावे – हेच खरे असावे असे वाटते आणि मग ते कारण आपल्याला अस्वस्थ करुन जाते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना स्वत:लाही आपल्या या वर्तनाचा पश्चाताप झाला असावा असे दिसते आणि मग तर या वरकरणी एकमेकांना अत्यंत अनुरुप अशा जोडप्यामधला हा कळत नकळत जाणवणारा विसंवाद मनाला खिन्न करुन जातो. अगदी कोणतीही पुरुषी मानसिकता बाळगायची नाही असे ठरवले तरीही अशा प्रसंगी पुलंनी किती तडजोडी केल्या असतील, त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना येते आणि अशा कटुतेचे कोणतेही प्रतिसाद आपल्या वागण्यात, जगण्यात आणि लिखाणात उमटू न देणार्‍या त्या पुरुषोत्तमाविषयीचा आदर वाढीला लागतो.
’ललित’ मध्ये पुलंनी मासिक सदर लिहावं अशा प्रस्तावाला पुलं काहीसे अनुकूलच होते. पण सुनीताबाईंनी नाना शंका, प्रश्न उपस्थित करुन त्या प्रस्तावाला फाटे फोडले. शेवटी ते झाले नाहीच. हे करण्यामागचा सुनीताबाईंचा उद्देश कितीही पवित्र असला – की सदरलेखनात पुलंची प्रतिभा त्यांच्या मते ’वाया’ जाऊ नये – तरी त्यामुळे पुलंच्या लेखनाचा एक वेगळा आणि अनोळखी पैलू कायमचा अंधारात राहिला हे डोळ्यांआड करता येत नाही. माणसांमध्ये रमणार्‍या पुलंच्या लोकसंग्रहावर, लोकसंवादावर सुनीताबाईंनी मर्यादा आणल्या. यात पुलंसारख्या प्रतिभावंत कलाकाराचा वेळ वाया जाऊ नये हा सुनीताबाईंचा हेतू उदात्त असेलही; पण पुलंच्या वैयक्तिक आनंदाचे काय? नवनिर्मितीचे समाधान मिळावे म्हणून आपल्या वैयक्तिक खुषीचे असे किती क्षण पुलंना आपल्या मनाविरुद्ध कुर्बान करावे लागले असतील? पुलंच्या अवघ्या आयुष्याची ’योजना’ करणाया, त्यांच्या आयुष्याचेच व्यवस्थापन करणाया सुनीताबाई जेंव्हा पुलंच्या सन्मानार्थ दुसर्‍या कुणीतरी आयोजित केलेल्या मेजवानीचा ’मेनू’ ठरवू लागतात, ’भाईला हे आवडतं, हे त्याला सोसत नाही..’ असं सांगू लागतात आणि न राहावून ती मेजवानी आयोजित करणार्‍यांपैकी कुणीतरी धीर एकवटून त्यांना सांगतो की पुलंना आवडते ते त्यांना खाऊ घालणे हा आमचा आनंद आहे, तो कृपया आम्हाला मिळू द्या, त्यांना काय आवडतं, काय नाही हे त्यांना सांगू द्या तेंव्हा आपल्या कडक शिस्तीने पुलंच्या प्रतिभेला नवनवीन पालवी फुटू देणाया सुनीताबाईंची शिस्त ही तुरुंगातील, इस्पितळातील शिस्त वाटू लागते. पुलंविषयीच्या कणवेने मन भरुन येते. पण तो सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला.
पुलं गेल्यानंतर सुनीताबाईंनीही आवराआवरीला सुरुवात केली होती. पुलंच्या आकाशवाणीवरील भाषणांचे व श्रुतिकांचे ’रेडिओवरील भाषणे व श्रुतिका’ हे पुस्तक त्यांनी पुलंच्या पहिल्या स्मृतिदिनाला मौज प्रकाशनाकडून प्रसिद्ध करुन घेतले. पुलंच्या इतर भाषणांचे ’सृजनहो’ हे पुस्तक त्यानंतर वर्षाने प्रसिद्ध झाले. पुलंचा खाजगी पत्रव्यवहार नष्ट करण्याचे प्रचंड काम त्यांनी काही मदतनिसांना हाताशी घेऊन पूर्ण केले. पुलंसारखी आपली आपल्या शेवटच्या आजारात अवस्था होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याला कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये या आशयाचं ‘ऍडव्हान्स डायरेक्टिव्ह फॉर हेल्थ केअर’ नावाचं इच्छापत्र तयार करुन घेतलं. त्यानंतर सुनीताबाईंनी स्वत:ला जवळजवळ घरात कोंडूनच घेतलं. काही मोजके प्रसंग सोडले तर त्यानंतर त्या घराबाहेर पडल्याच नाहीत. सावरकरांप्रमाणे आपल्याला कुणी या गलितगात्र अवस्थेत बघू नये, आपली जनमानसातली प्रतिमा ढळू नये यासाठीच ही धडपड होती का? कुणास ठाऊक! पण पुलं गेल्यानंतर जगण्याचे प्रयोजनच संपावे अशी सुनीताबाईंनी स्वत:ची करुन घेतलेली अवस्था समजण्याच्या पलीकडची होती. पहिला जी.ए.कुलकर्णी पुरस्कार स्वीकारायलाही त्या आल्या नाहीत. तो पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला आणि त्याची चित्रफीत दुसया दिवशी रसिकांना दाखवली गेली. त्या चित्रफीतीत अशक्तपणे आपले केस सावरणार्‍या, आपण चांगले दिसतो आहोत की नाही याबाबत कॉन्शस झालेल्या सुनीताबाई बघून मनाला यातना झाल्या. ’परी यासम हा..’ हा लघुपट रसिकांबरोबर बघणारे आणि तो संपल्यावर टाळ्यांच्या गजरात रसिकांकडे वळून त्यांना नम्रपणे नमस्कार करणारे हे जोडपे आठवले. ’ध्यानीमनी’ नाटकाचा प्रयोग पहिल्या रांगेतून बघणारे आणि तो प्रयोग संपल्यावर कितीतरी वेळ टाळ्या वाजवणारे हे जोडपे आठवले. या दोन्ही प्रसंगात वाजणारी एक टाळी माझी होती हेही मला आठवले.
असे स्वयंप्रकाशी, तेज:पुंज सार्थ आयुष्य लाभलेल्या सुनीताबाईंचा शेवट पुलंप्रमाणेच करुण व्हावा हे बाकी मनाला पटत नाही. पुलं अखेरपर्यंत प्रकाशात राहिले, त्यामुळे त्यांची प्रकृती, त्यांच्या वेदना, त्यांचे केविलवाणे परावलंबित्व लोकांना माहिती होत राहिले. सुनीताबाईंच्या बाबतीत असे झाले नाही. ऑगस्ट २००८ ला घरच्या घरी सुनीताबाई तोल जाऊन पडल्या आणि मग अगदी शेवटपर्यंत ७ नोव्हेंबर २००९ पर्यंत त्या अंथरुणाला खिळूनच राहिल्या. त्या काळात त्यांना नको ते परावलंबित्व, आर्थ्रायटिसच्या यातना आणि एकटेपण असे कायकाय सहन करावे लागले. इतके संपन्न आयुष्य जगलेल्या सुनीताबाईंचा असा परावलंबी अवस्थेत कणाकणाने शेवट व्हावा हे काही बरे झाले नाही. शेवटपर्यंत आपला दिमाख, तोरा न सोडलेल्या सुनीताबाई तशाच, एखादी वीज चमकून नाहीशी व्हावी तशा, एखादा तारा निखळून पडावा तशा लुप्त व्हायला पाहिजे होत्या असे वाटले.
’सुनीताबाई’ हे पुस्तक मला आवडलेच, पण या पुस्तकाने मला अस्वस्थ केले. याच पुस्तकात ’ऐसे कठिण कोवळेपणे’ या नावाचा अरुणा ढेरे यांचा सुनीताबाईंवरचा एक सुंदर लेख आहे. अरुणा ढेरे यांना देशपांडे कुटुंबाचा प्रत्यक्ष सहवास बराच काळ लाभला. अरुणाबाईंचा हा लेख म्हणजे या पुस्तकावरचा कळसच आहे.
अशी पांखरुन छाया, लावोनियां माया
आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया
या आरती प्रभूंच्या या लेखात ढेरे यांनी उधृत केलेल्या ओळी या जोडप्याला किती समर्पक होत्या असे वाटून जाते.
या पुस्तकात काही दुर्मिळ सुंदर छायाचित्रेही आहेत. त्यातली बरीचशी मंडळी आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. एका पानावर पूर्ण पानभर सुनीताबाईंचे एक कृष्णधवल छायाचित्र आहे. लख्ख गोर्‍यापान वर्णाच्या, साधीशी साडी नेसलेल्या करारी मुद्रेच्या ताठ उभ्या असलेल्या सुनीताबाई. पु.ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची पत्नी यापलीकडे आपल्या तत्वांशी, मूल्यांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या, सच्च्या मनाच्या, संवेदनशील, कष्टाळू, प्रतिभावान आणि रसिक सुनीताबाई. या पुस्तकाचे मुखपृष्ठ याच चित्रावर आधारलेले आहे. सगळे पुस्तक वाचून झाल्यावर मनात विचाराविचारांचा गल्बला होतो, घशाशी काही कढ येतात, ’न मागता दिलेल्या आणि न सांगता परत नेलेल्या या देवाघरच्या माणसां’ बद्दल बरेच काही वाटत राहाते. पण शेवटी लक्षात राहातात त्या या सुनीताबाई.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 14 टिप्पणियां

माझ्या संग्रहातील पुस्तके ११ ‘समुद्र’

‘ स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?’ ‘व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?’ हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो. नवरा-बायकोच्या नात्यात तर हे अधिकच प्रकर्षाने दिसते. एकमेकांत मिसळून गेलेले नवरा बायको खरोखर तसे मिसळून गेलेले असतात का? (तसे मिसळून जाणे आवश्यक आहे का हा वेगळा प्रश्न आहे). वर्षानुवर्षे एकत्र जगल्यानंतर (सहजीवनानंतर म्हणा हवे तर) ‘अमक्याची बायको’ किंवा ‘अमक्याचा नवरा’ ही स्त्री-पुरुषांची एकच ओळख शिल्लक राहाते का? राहावी का? याही पलिकडे जाऊन ज्याच्याबरोबर किंवा जिच्याबरोबर आपण सगळे आयुष्य काढतो त्याच्या किंवा तिच्या मनातले सगळे पदर आपल्याला उलगडलेले असतात का?
हा काही नवीन प्रश्न नाही. पण या विषयावरची मिलिंद बोकिलांची ‘समुद्र’ ही नव्वद पानांची कादंबरी अगदी नव्या पद्धतीने विचार करायला लावणारी आहे. मिलिंद बोकील हा तशा नव्या पण झपाट्याने जुन्या होत जाणार्‍या पिढीतला वेगळ्या वाटेने जाणारा लेखक. बोकिलांच्या ‘उदकाचिया आर्ति’ आणि ‘झेन गार्डन’ या कथासंग्रहांतून मानवी नात्यांमधली गुंतागुंत समजून घेण्याची त्यांची कुवत आणि त्यांचे यथायोग्य चित्रण करण्याची त्यांची क्षमता दिसून आलेलीच आहे. ‘समुद्र’ मध्ये बोकील एक पाऊल पुढे टाकतात. भास्कर आणि नंदिनीच्या लौकिकार्थाने अत्यंत सुखी संसारातला एक तिढा ते दोघे सुटीवर म्हणून गेलेले असताना उघडा होतो. विश्वास या पायावर आधारलेले त्या दोघांमधले नाते या नव्या खुलाशाने किंचित थरथरते. ‘हे असे का?’ हा भास्करला प्रश्न पडतो. एखाद्या टिपिकल साचेबंद नवर्‍याप्रमाणे त्याचीही प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होते. आधी लिहिल्याप्रमाणे ‘स्त्रीला नेमके काय हवे असते?’ हा प्रश्न त्यालाही पडतो…
स्पॉयलर अलर्टचा दोष पत्करुन लिहायचे झाले तर ‘अस्तित्व’ या महेश मांजरेकरच्या चित्रपटाच्या चाकोरीतून जाणारी कथा. पण या कथेच्या निमित्ताने बोकील एकूणच स्त्री-पुरुष यांच्यामधील नात्यांवर काही मार्मिक भाष्य करतात. स्त्री आणि पुरुष हे फक्त शरीरांनी नव्हे तर शरीरांपासून प्रत्येक गोष्टीने, विशेषतः मनाने, भिन्न आहेत, आणि भिन्नच असतील – यात सरस-निरस हा प्रश्नच नाही – हे ‘समुद्र’ चे फार ढोबळ असे सार झाले. खरे तर ‘समुद्र’ चे अमुक असे सार नाहीच. ‘समुद्र’ ही या मध्यमवयीन जोडप्याने दोघांना एकत्र वेळ काढता यावा म्हणून घेतलेली सुटी आहे. या सुटीच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारी समुद्राची मंद गाज आहे. हवेतला किंचित उकाडा आहे. आणि या सगळ्या सुस्तावलेल्या सुटीत या जोडप्याचे हळूहळू सुटे होत जाणारे आयुष्य आहे, ‘सहजीवन’ आहे.
‘समुद्र’ आपल्याला विचार करायला लावते. स्वतःला तपासून बघायला लावते. पुस्तकाचे किंवा एकंदर कुठल्याही कलाकृतीचे हे यश म्हणावे लागेल. नवर्‍याच्या हातात हात गुंफून फिरायला बाहेर पडलेली बायको या ठोकळ दृष्याकडे बघताना आरशासमोर आरसा ठेवलेला असावा पण प्रत्येक आरशातले प्रतिबिंब दुसर्‍या प्रतिबिंबापेक्षा जरासे तिरके असावे तशा काही शक्यता दिसायला लागतात. ‘खरेखुरे आयुष्य हे काल्पनिक विश्वापेक्षा कितीतरी नाट्यमय, अकल्पनीय असू शकते’ हे एक (काल्पनिक) कादंबरी वाचतानाच पटते.
बाकी बोकिलांची सरळ, संयत भाषा आता परिचित झाली आहे. शरीरसंबंधांची वर्णने करताना ती जरा अधिक अलंकारिक, सूचक होते, पण तेवढे क्षम्य ठरावे. रस्त्यावरच्या रहदारीपासून सुटीवर गेल्यावर खोलीत गेल्यागेल्या अधीरपणे बायकोला मिठीत घेणार्‍या नवर्‍यापर्यंत बोकीलांनी बारीक निरखलेले असते. आणि त्यांच्या लिखाणात ते तसे बारकाईने आणि अगदी सहजपणाने येत जाते. नवरा गाडी चालवत असताना नकळत झोपी जाणारी नंदिनी आपण कुठेतरी पाहिलेली असते, पण नवर्‍याच्या दंडातले गोळे बघून ‘इट ऍक्चुअली टर्नस अस ऑफ’ असे ती म्हणते तेंव्हा आपण थोडे थबकतो.
‘समुद्र’ हे ‘मौज’चे मार्च २००९ चे प्रकाशन. जुलै २०१० मध्ये या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. म्हणजे एकंदरीत मराठी पुस्तकाच्या मानाने बरेच म्हणायचे. मराठीतली काही सर्वोत्तम पुस्तके निवडली तर त्यात ‘समुद्र’ ची वर्णी लागणार नाही. पण ‘समुद्र’ मला आवडली. एका बैठकीत संपली हेही आवडले आणि पुस्तके विकत घेताना शंभर वेळा विचार करायच्या सध्याच्या दिवसांत ८० रुपये ही या पुस्तकाची किंमत तर फारच आवडली.

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो

विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते. उर्दू साहित्यातील प्रखर आणि विवादास्पद लिखाण करणार्‍या सआदत हसन मंटोची ओळख करुन देणारी पुस्तिका नुकतीच वाचनात आली. मंटो या लेखकाचे नाव जितके विचित्र, तितकाच तो माणूसही विचित्र होता. मंटो जेमतेम त्रेचाळीस वर्षे जगला, पण त्याची ही वर्षे एखाद्या निखार्‍यासारखी होती. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच. मंटोच्या साहित्यात हेच झालेले दिसते. मंटोचा आयुष्यपट बघताना त्याच्या व इतर काही थोर साहित्यीकांच्या जीवनातील काही विस्मयकारक साम्ये डोळ्यांसमोर येतात. साहीरप्रमाणे मंटोचे त्याच्या वडीलांशी कधी पटले नाही. गालिबसारखा तो ’आधा मुसलमान’ होता आणि मजाजसारखा (’ऐ गमे दिल क्या करुं’ वाल्या) तो दारुच्या जबरदस्त आहारी गेलेला होता. मजाजसारखाच मंटोलाही दारुनेच संपवला. पण मला वाटते संवेदनशील माणसाची हीच शोकांतिका असते. ’गम कुछ इस कदर बढे, की मैं घबराके पी गया’ हे लिहिले आहे साहीरने, पण ते इतरही बर्‍याच साहित्यिकांना लागू असावे, असे वाटते. याचा अर्थ कुणीही दारुड्या गणागणपाने स्वत:ला संवेदनशील आणि जगाच्या निर्घृणतेचा बळी म्हणवून पीत राहावे असे नाही, पण शैलेंद्रपासून मदनमोहनपर्यंत आणि अशी अनेक उदाहरणे ही शोकांतिका अधोरेखित करुन जातात, हे खरे. असो.
मंटोचे घराणे मूळचे काश्मिरवासी. नंतर ते पंजाबमध्ये येऊन स्थायिक झाले. मंटोची भावंडे धार्मिक वृत्तीची, प्रतिष्ठीत आणि संयमी स्वभावाची होती. मंटो बाकी पहिल्यापासूनच क्रांतिकारक, बंडखोर, नास्तिक आणि बेफाम प्रवृत्तीचा होता. मानवी स्वभावाचा हा एक पीळ न समजण्यासारखा आहे. एकाच कुटुंबातील दोनपाच लोक सरळ, रेल्वेच्या रुळासारखे, कागदी पिशव्यांसारखे, घड्या घातलेले आयुष्य जगत असतात आणि त्यांचाच एखादा रक्ताचा भाऊ संपूर्ण उद्धस्त, विस्कटलेले भणंग आयुष्य जगतो (आणि एक दिवस मरुन जातो!). हे असे का होते याला काही उत्तर नसावे. असलेच तर ते शंभर टक्के पटेल असे नाही. वाचनाची जबरदस्त आवड असणारा मंटो, वाचलेली पुस्तके विकून टाकून त्या पैशांतून उंची सिगारेटी ओढणारा मंटो, तरुण वयात शिक्षणावरुन लक्ष उडाल्याने बेछूटपणे जगत राहाणारा मंटो, स्वातंत्र्यपूर्व काळात कधी सशस्त्र क्रांतीची स्वप्ने बघणारा तर कधी वैफल्यग्रस्त होऊन स्मशानात जाऊन बसणारा मंटो, तरुण वयातला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी दारु, चरस, कोकेनसारखी व्यसनं करणारा मंटो आणि एकदा लेखन हेच आपलं खरं काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा तुफानी वेगानं नाटकं, निबंध, व्यक्तिचित्रं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा लिहिणारा मंटो … यातला खरा मंटो कोणता हेच कळेनासे होते. उत्तम लेखक हा आधी उत्तम वाचक असावा लागतोच. मंटोने विशेषत: परदेशी साहित्यिकांचे उत्तमोत्त्म साहित्य वाचलेले होते. लिहायला सुरवात केल्यानंतर प्रथम पत्रकारिता, नंतर हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित लिखाण आणि मग स्वतंत्र नाटके, कथा असा मंटोचा लेखनप्रवास घडला. मंटोच्या मुंबईतील सिनेमाच्या विश्वातील सफरीबद्दल या पुस्तकात फारसे नाही. पण एकंदरीत या मायानगरीला मंटो फारसा पसंत पडला नाही, असेच दिसते. १९४८ साली मंटो पाकिस्तानात निघून गेला आणि पाकिस्तानात गेल्याचा त्याला (साहिरप्रमाणेच) पश्चाताप होत राहिला. त्याने अहमद नदीम कासमी यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: ’ वास्तविक मी आता अशा अवस्थेला पोहोचलो आहे जिथे नकार आणि विश्वास यात फरकच राहिलेला नाही’. हे वाचल्यावर मला चटकन ’गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया’ हेच आठवले. पाकिस्तानात त्याने विपुल लिखाण केले हे खरे, पण वैयक्तिक जीवनात त्याची घसरणच होत राहिली. त्याचे मद्यपान तो मुंबईत असतानाच वाढले होते, पाकिस्तानात गेल्यावर मात्र ’दारुनेच त्याला प्यायला सुरवात केली’.
मंटोच्या वैयक्तिक वैफल्याला त्याने शहरात बघीतलेले दाहक जीवन मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेले दिसते. ग्रामीण आणि प्रादेशिक जीवनाबद्दल मंटोने फारसे लिहिले नाही. मंटोचे लेखन हे तात्कालिन शहरी संस्कृती, फाळणी, हिंदु-मुस्लीम दंगे, त्या काळातील शहरी जीवनातील समस्यांचे आळोखेपिळोखे आणि सामाजिक प्रश्न अशा विषयांवर केंद्रित झालेले आहे. वेश्या आणि वेश्यांचे आयुष्य यांवर मंटोने कित्येक कथा लिहिल्या आहेत. त्यातल्या कैक कथांवर अश्लीलतेचे आणि बीभत्सतेचे आरोप झाले. ’ठंडा गोश्त’, ’काली सलवार’, ’खोल दो’ अशा त्याचा कथा प्रचंड वादग्रस्त ठरल्या. त्यामागची कारणेही सहज समजण्यासारखी आहेत. साठेक वर्षांपूर्वीचा काळ, समाजात वेगाने होणारी स्थित्यंतरे आणि दुटप्पी, कावेबाज समाजाला सहन न होणारे मंटोचे ढोंगे उघडी करणारे लेखन हे समीकरणच स्फोटक असले पाहिजे. ’खोल दो’ या कथेत सकीनावर तिच्याच जातीचे लोक, रजाकार, अत्याचार करतात. बेशुद्ध पडलेल्या सकीनाला उपचाराकरता डॊक्टरांकडे नेतात तेंव्हा डॊक्टर म्हणतात की तिला खुली मोकळी, हवा मिळण्यासाठी ’खिडकी खोल दो’. ’खोल दो’ हे शब्द ऐकून अर्धवट शुद्धीत असलेली सकीना आपल्या हातांनी आपल्या पायजम्याची नाडी सोडते आणि विजार खाली सरकवते. हे असले सगळे लिहिणाया मंटोला त्या काळातील लोकांनी सैतान समजून जिवंत जाळले नाही हेच नवल. मंटोच्या कथांमध्ये थैमान घालणारी कामवासना, हिंसाचार, शारिरीक व मानसिक कुरुपता, ओंगळपणा हे सगळे एकूण समाजाला पचायला जडच गेले असणार.
एका बाजूला असले भेदक लिखाण करत असताना मंटोने दुसरीकडे हलकेफुलके विनोदी लिखाणही केले आहे. मंटोची विनोदी नाटके, लेख, निबंध यांची संख्या खूप मोठी आहे. पाकिस्तानात असताना मंटोचे बारा कथासंग्रह, दोन निबंधसंग्रह, दोन व्यक्तिरेखांचे संग्रह, एक लघुकादंबरी आणि त्याच्या कथांवर झालेल्या खटल्यांच्या संदर्भातले एक पुस्तक असे बरेच साहित्य प्रसिद्ध झाले होते. पाकिस्तानात असताना जवळजवळ दिवसाला एक कथा असा त्याचा लिखाणाचा वेग होता. वर्तमानपत्राच्या कार्यालयातल्या खुर्चीत उकीडवा बसून मंटो झरझर लिहीत असे. कथा लिहून झाली की तिच्या मानधनातून दारु खरेदी करत असे. असले काही वाचले की एकीकडे त्याच्या प्रतिभेबद्दल आदर आणि दुसरीकडे त्याच्या व्यसनांबद्दल घृणा असले काहीसे मनात येते. मंटोने त्याच्या मुंबईतील मुक्कामात बकालातले बकाल आयुष्य अनुभवलेले होते. भायखळा आणि नागपाडा भागातल्या अंधार्‍या चाळी, म्हशींचे गोठे, घोड्यांचे तबेले, इराण्यांची हॉटेले आणि वेश्यांची मोठी वस्ती असलेला फोरास रोड हे सगळे त्याने बघीतले, अनुभवले. यातूनच त्याने उर्दू भाषेत ’टंटा, मस्तक, मस्का-पॊलिश, मालपानी, दादा, घोटाला, फोकट, कंडम’ अशा अनेक शब्दांची भर घातली. त्यामुळे मंटोची स्वतःची उर्दू लेखनाची एक शैली विकसित झाली असावी असे वाटते.
सआदत हसन मंटोवरच्या वारिस अल्वी यांनी लिहिलेल्या आणि विश्वास वसेकरांनी अनुवादित केलेल्या या लहानशा पुस्तकाने मंटोचे लेखन वाचावेसे मला वाटू लागले आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांचे हेच साध्य असते. मंटोचे जितके पचेल तितके लेखन मुळातून वाचावे, इतर अनुवादित स्वरुपात वाचावे असे हे पुस्तक वाचून इतरही वाचकांना वाचले तर साहित्य अकादमीचा हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल. अशा लहानशा पुस्तकाची किंमत अकादमीने अगदी नाममात्र – पंचवीस रुपये- ठेवली आहे हे या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल.

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

तर्क जाणत्यांचा

ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्‍याच लोकांनी त्यांचा हेतू साध्य झाल्यावर तिच्याकडे मागे वळून पाहिलेही नाही. त्याबद्दल तिला खंत वाटली असेलही, पण तिने त्याचा सल मनात ठेवला नाही. तिचे आयुष्य तसे कष्टातच गेले. आज सत्तरीच्या पुढे असणार्‍या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशा खस्ता खाल्या, ज्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला, तसे तिनेही केले. त्यातून तिने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले.  दुर्गम  भागात  तिने  शिक्षिका  म्हणून  नोकरीला  सुरवात केली. लहान वयात लग्न झालेले, तशाच लहान वयात तिला मातृत्व लाभले.  तिच्या लहानग्या मुलाला दुर्गम भागात औषधोपचार न मिळाल्याने मृत्यू आला. विशीतल्या जोडप्याला अशा प्रसंगाने खचवून टाकले असते, पण अत्यंत सकारात्मक भूमिकेमुळे ती आणि तिचा नवरा या घटनेनंतर चोवीस तासांत आपापल्या कामावर रुजू झाले. नंतर  तिच्या नवर्‍यावर अत्यंत अवघड अशी दुखणी आली. या सगळ्यांतून ती जिद्द आणि श्रद्धा यांच्या बळावर तरून गेली. ईश्वरावर तिची अढळ श्रद्धा होती. कर्मकांडेही ती करायची, पण तिच्या नवर्‍याच्या निधनानंतर पुढच्या पिढीने दिवस वगैरे काही विधी करायचे नाहीत असे ठरवल्यानंतर तिने त्या निर्णयाला अजिबात विरोध केला नाही. उलट त्या पैशांतून काही गरीब विद्यार्थ्यांना जेवण, शाळांना पुस्तकांची भेट असे बरेच काही तिने केले. नंतर नंतर कर्मकांडांमधील फोलपणा तिच्या ध्यानात आला आणि तसे मोकळेपणाने मान्य करण्याचा मनाचा मोठेपणाही तिने दाखवली.
एक उत्तम शिक्षिका म्हणून तिने अनेक सन्मान आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रेम मिळवले. संस्कृतवर तिचे प्रभुत्व होते आणि तो विषय शिकवण्याची तिच्याजवळ हातोटी होती. दहावीला तिच्याकडून संस्कृत शिकलेल्या आणि संस्कृतमध्ये बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही शेकड्यांत मोजावी लागेल. शिक्षणक्षेत्रात काम करत असतानाच तिने सहकारी बँकेचे संचालकपद स्वीकारले आणि त्या क्षेत्रात एक निस्पृह आणि प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती म्हणून नाव कमावले.   शिक्षण आणि सहकार या दोन्ही तशा बदनाम क्षेत्रांत काम करुनही तिचे मन कधी कडवटले नाही. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता तिने अनेक मुलांना अन्नाला लावले, अनेकांवर चांगले संस्कार केले, अनेकांना मदत केली.
एप्रिल महिन्यात तिला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. तिची भूक कमी झाली आणि तिला थकवा जाणवू लागला. तिची पाठदुखी  दिवसेंदिवस वाढतच गेली. सर्व प्राथमिक तपासण्यांत काही निष्पन्न झाले नाही. पुण्यात कबीरबाग येथे सांधेदुखीवर आसने आणि व्यायाम असे उपचार दिले जातात. ते उपचार तिने एकदोन दिवस घेतले असतील, नसतील तोच तिच्या पायांमधील शक्ती कमीकमी होत गेली. शेवटी शेवटी तर  तिला  पायाची  बोटेही  हलवता  येईनाशी  झाली.  पायांत  संवेदना  होत्या, पण  पाय  लुळे  पडले.  हे सांध्यांशी, हाडांशी संबंधीत दुखणे असावे, असे वाटल्याने तिला संचेती हॉस्पेटलमध्ये दाखल केले. तेथे तिच्या असंख्य तपासण्या झाल्या. एमाराय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी…. शेवटी तिच्या पाठीचे मणके वयोमानाप्रमाणे झिजले आहेत, त्यांतील काही मणक्यांवर कसलीशी वाढ झाली आहे आणि  शस्त्रक्रिया केल्याशिवाय काही नक्की काय झाले आहे ते कळणार नाही  असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत पडले.  तिच्या पायाच्या नसांवर दाब पडल्याने तिच्या पायांमधील शक्ती गेली आहे असे डॉक्टरांना वाटत होते.   त्याप्रमाणे तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेत तिच्या मणक्यांचे ‘डीकॉंप्रेशन’ केले आणि मणक्यांना आधार म्हणून धातूची एक पट्टी काही खिळ्यांच्या सहाय्याने तिच्या पाठीत बसवली.  ती पाठीच्या मणक्यावर जी काही गाठ होती ती ‘नॉन हॉजकिन्स लिंफोमा’ ची होती असे बायॉप्सीमध्ये कळाले. दरम्यान तिच्या पायांच्या हालचालींत काहीच फरक पडला नव्हता. तिचे पंगूपण तसेच होते. एरवी अत्यंत उत्साही आणि सतत कामात असणार्‍या या स्त्रीला असे पडून राहाणे किती त्रासदायक झाले असेल याची कल्पनाही करता येणार नाही. तिच्या जखमेचे टाके सुकले असतील, नसतील इतक्यात तिच्यावर उपचार करण्यासाठी काही  कर्करोगावरील उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर  संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हे कॅन्सर स्पेशालिस्ट रुबी हॉल क्लिनिकमधील होते. बरेच नावाजलेले, पेशंटसचा अखंड ओघ असणारे हे तज्ज्ञ. त्यांनीही बर्‍याच  तपासण्या केल्या आणि  या लिंफोमावर अत्यंत तातडीने रेडिएशन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे ती जखम अर्धवट सुकलेली असतानाच तिला पाच सत्रांत रेडिएशनचे उपचार देण्यात आले.  त्यामुळे ती जखम थोडीशी चिघळली पण ते नॉर्मल आहे, आणि काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सगळे ठीक होईल असे या कॅन्सर स्पेशालिस्टनी सांगितले.
काही दिवसांसाठी या स्त्रीला घरी सोडण्यात आले. पण तसे करतानाच आता या कॅन्सरवर केमोथेरपी घेणे आवश्यक आहे असे सांगून एका आठवड्यानंतर पुन्हा इस्पितळात दाखल होण्यास सांगण्यात आले. या एका आठवड्यात ही स्त्री घरी आपल्यावर योग्य उपचार होत आहेत, आणि आपण लवकरच रोगमुक्त होऊन आपल्या पायावर उभे राहू या समजात अत्यंत आनंदात होती. दरम्यान तिला देण्यात येणारी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट तिने अतिशय मनापासून स्वीकारली. विविध प्रकारचे व्यायाम ती अगदी मन लावून करत राहिली. त्याबरोबर  तिचा  जप,  स्तोत्रे  आणि एकंदरीतच देव आपल्या पाठीशी आहे ही श्रद्धा यामुळे तिचे मनोबल उत्तम प्रकारे टिकून राहिले होते. येणार्‍याजाणार्‍याला ती ‘आता लवकरच मी माझ्या पायावर उभी राहणार’ असे हसून सांगत असे. आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची आपल्याला अजिबात भीती वाटली नाही कारण भुलीच्या औषधांचा परिणाम होईपर्यंत सतत माझ्या तोंडात ‘माझ्या’ देवाचे नाव होते असे ती सांगत असे.
एका आठवड्यानंतर तिला परत संचेती हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीसाठी दाखल केले. सतत चोवीस तास काही ना काही औषधे तिच्या शरीरात शिरेवाटे देण्यात आली. नंतरचेही तीनचार दिवस बरे गेले. मग अचानक तिची प्रकृती खूपच खालावली. खाणेपिणे बंद झाले. श्वासोच्छ्वासाला त्रास होऊ लागला, धाप लागली, रक्तदाब खूपच खाली आला आणि रक्तातल्या पेशींचे प्रमाण धोकादायक रीत्या ढासळले. त्या दरम्यान घेतलेल्या रक्याच्या नमुन्यात प्लेटलेटसची संख्या ३००० पर्यंत कमी होती. अर्थात हे रक्तविश्लेषणाचे रिपोर्टस रुग्णाच्या नातेवाईकांपर्यंत कधी पोचलेच नाहीत हा भाग वेगळा. मग धावाधाव झाली. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तिच्यावर औषधांचा भडिमार झाला. बारा -चौदा तासांत सुमारे लाखभर रुपयांची औषधे तिच्या शरीरात सोडली गेली.  श्वास  घेताना ती  तडफडू  लागली.  तोंडावरचा  ऑक्सिजन  मास्क  हाताने बाजूला करून ‘मी दमून गेले आहे’ असे तिने मला खोल आवाजात सांगितले.  ‘ शी इज क्रिटिकल बट नॉट (यट) ऑन हर डेथ बेड’ असे डॉक्टरांनी सांगितले. ‘वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट’ हे अजरामर वाक्य तर होतेच.तर पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कार्डियाक अरेस्टने तिचे हृदय बंद पडले. ते पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नानंतर ते अडखळत, अनियमितपणे सुरू झाले. त्यातच तिला रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. हे तिचे अगदी अख्रेरचे क्षण आहेत हे ध्यानात आल्यावर ‘डॉक्टर, प्लीज डोंट डू एनीथिंग. लेट हर गो’ असे म्हणून मी आयसीयूच्या बाहेर पडलो. पाचेक मिनिटांत डेथ सर्टिफिकेटमधला तपशील विचरण्यासाठी  आयसीयूमधल्या नर्सने माझ्या खांद्यावर टकटक केली.
औषधांनी , इंजेक्शनसनी सुजलेला तिचा देह, ऑक्सिजन मास्कने व्रण पडलेला तिचा निस्तेज चेहरा… हे सगळे सुन्न मनाने  विद्युतदाहिनीत सरकवताना माझ्या मनात दुःख अधिक होते की राग हे आज सांगणे कठीण आहे. दु:खाचे विश्लेषण होऊच शकत नाही. रागाचे तसे नाही. हा राग फक्त डॉक्टरांच्यावर नव्हता. कसाईपणा हा त्यांचा धर्म आहे, आणि त्यांनी त्या धर्माचे पालन केले इतकेच. यातला  थोडा राग त्या निधन पावलेल्या स्त्रीवरही होता. इतका संपूर्ण विश्वास कुणावरही असणे बरे नव्हे, हे तिला कळायला पाहिजे होते. डॉक्टरच्या दृष्टीने पेशंटचे शरीर ही एक प्रयोगशाळा असते आणि विविध प्रयोग ‘करून बघण्या’पलीकडे त्यांनाही फार करता येत नाही, हे तिला कळायला हवे होते. त्यांचा तर्कही सामान्यांपेक्षा थोडा जाणता असला तरी तो निव्वळ तर्कच आहे, हे तिने ओळखायला पाहिजे होते. पेशंटवर उपचार, त्यांना बरे करणे ही डॉक्टरांची प्राथमिकता असते असा तिचा समज होता. ते तसे नसते, हे तिला मरण्यापूर्वी कळायला हवे होते.
 थोडा राग तिचा ज्याच्यावर संपूर्ण आणि अचल विश्वास होता त्या परमेश्वरावरही होता. ‘तो’ आपल्या पाठीशी आहे म्हणजे आपले सगळे बरे होणार हा विश्वास ‘त्याने’ तिला दिला होता. या भाबड्या विश्वासाने कदाचित तिचे शेवटचे काही दिवस सुखाचे गेलेही असतील, पण अगदी अखेरच्या क्षणी मृत्यूच्या कराल जबड्यात जाताना हा परमेश्वरही आपल्या मदतीला फारसा आला नाही, हे तिला समजायला पाहिजे होते. समजलेही असेलही, कुणास ठाऊक!
इस्पितळातून परत आणलेल्या सामानातील तिची जपाची माळ, देवतांच्या छोट्या तसबीरी, आरत्यांची, स्तोत्रांची लहानशी पुस्तके या सगळ्या गोष्टी एकेक करून बाजूला ठेवत असताना माझे मन पूर्ण निर्विकार झाले होते. ‘अपंग म्हणून जगणे तिला अत्यंत क्लेशदायक झाले असते, म्हणून झाले हे फार बरे झाले’ या विचाराचे पांघरुण खूप अपुरे, तुटक वाटत होते. एरवी प्रत्येक क्षणाला सोबत असणारे तर्काचे आयुध या क्षणाला तरी अगदी लहानसे, बोथट झाल्यासारखे वाटत होते.

Uncategorized में प्रकाशित किया गया | टिप्पणी करे

केतकर

शिक्षक या व्यक्तीविषयी आदर वाटावा असे फार कमी लोक आजवर भेटले. लहानपणी शाळेत असताना आमच्या हिंदी शिक्षकांचे ज्ञान ‘मकान’ म्हणजे शेत आणि ‘मूंगफली’ म्हणजे मुगाच्या डाळीपासून तयार केलेला पदार्थ असे सांगण्याइतपत अगाध होते. त्या वेळी मी नुकताच ‘रोटी, कपडा और मकान’ हा अप्रतिम चित्रपट पाहिलेला असल्याने ‘मकान’ म्हणजे शेत असणे शक्य नाही, इतपत माहिती होते. त्यावरून मी हिंदीच्या शिक्षकांशी वाद घातलेलाही आठवते. वाद घालण्याची परंपरा इतकी जुनी आहे. असो.

काही वर्षांपूर्वी एका व्यवसायानिमित्त मुंबईच्या गुप्ता नावाच्या माणसाला भेटलो. त्याने मला पुण्यातल्या केतकर नावाच्या गृहस्थांना भेटायला सांगितले. ‘उसने नीम के ऍप्लिकेशनपे बहुत काम किया है, ही इज नोन ऍज दी नीम मॅन’ असे म्हणून त्याने मला केतकरांचा नंबर दिला. केतकर हे नाव आणि पत्ता शनिवार पेठ, पुणे म्हटल्यावर मी जरा भीतभीतच केतकरांना फोन केला. चारपाच वेळा रिंग वाजली आणि कुणीतरी फोन उचलला.

“केतकर.” करारीपणा आणि तुसडेपणा यांच्या मधल्या आवाजात कुणीतरी म्हणालं.

मी स्वतःचा परिचय करून दिला आणि काम आहे, कधी भेटायला येऊ? असं विचारलं.

“रविवारी सकाळी साडेनऊ वाजता फोन करा.” आवाज पुन्हा तसलाच. हा काय पुण्याच्या हवापाण्याचा गुणधर्म आहे की काय कुणास ठाऊक!

“रविवारी…. ” मी चाचरत म्हणालो, “जरा तातडीचं काम होतं, आज उद्या नाही का भेटता येणार?””रविवारी म्हणजे रविवारी.” केतकर कडकपणे म्हणाले. “चौदा तारखेला. त्याच्या आधी मला वेळ नाही. नमस्कार. ”

मग मी रविवारी (फोन करून) त्यांच्या घरी गेलो. शनिवार पेठेतल्या एका जुन्या वाड्यात पहिल्या मजल्यावर ते राहत होते. दारावर एम. के. पेस्ट कंट्रोल आणि मोहन केतकर अशा पाट्या होत्या. मी बेल वाजवली. केतकरांनी दार उघडलं.

सडपातळ अंगयष्टीने अधिकच वाटणारी बर्‍यापैकी चांगली उंची, मूळचा उजळ असावासा वाटणारा पण आता रापलेला वर्ण, चेहर्‍यावर वयाच्या आणि कष्टाच्या रेषा, डोक्यावरच्या बर्‍याच केसांनी निरोप घेतलेला, भरपूर नाक आणि भेदक डोळे. भेदक पण जरासे मिष्किलही. पण एकंदरीत जरा दबकल्यासारखं व्हावं असंच व्यक्तिमत्त्व.

परिचय, नमस्कार चमत्कार झाले. “चहा घेता? ” केतकरांनी विचारलं

“घेऊ की!” मी म्हणालो. शनिवार-सदाशिव या परिसरात तुम्ही संकोचलात की मेलात. चहापाणी सोडाच, कुणी उन्हाळ्यात पंखाही लावणार नाही, इतपत पुणं आता मला समजायला लागलं होतं.

चहा झाला. केतकरांनी सिग्रेट पुढे केली. मीही जरा मोकळा झालो. मग तुम्ही कुठले, आम्ही कुठले हे झालं. त्यात केतकर काही दिवस जयसिंगपूरला झुऑलजी शिकवायला होते, असं कळालं. बायॉलजीचा मास्तर आणि तोही गावाकडचा! मी खूष झालो. ओळखीपाळखी निघाल्या आणि मला तर केतकरांना एका ठिकाणी भेटल्याचंही आठवलं. केतकरांच्या बाकी काही लक्षात नव्हतं.

“अहो म्हणजे केतकरसाहेब, माझ्या मामाला, मावशीला तुम्ही शिकवलेलं असणार. म्हणजे सर तुम्ही आमचे. अहो, मग मला अहोजाहो काय म्हणताय? अरे म्हणा!” मी म्हणालो. कसं कुणास ठाऊक, केतकरांना ते पटलेलं दिसलं. मग पहिल्या भेटीतच त्यांनी मला अरे म्हणायचं आणि मी त्यांना सर, हे ठरून गेलं.

“हं. तर मायक्रोबायॉलॉजिस्ट काय तू?… कायकाय विषय असतात रे तुमच्या एमेस्सीला?” केतकरांनी मुलाखत घेताना विचारावं तसं विचारलं. मी सटपटलोच. आता हा प्राध्यापक माझी लक्तरं धुवायला काढतोय की काय म्हटलं! मी काहीतरी जुजबी सायटॉलजी, बायोकेमिस्ट्री अशी उत्तरं दिली.

“बायोकेमिस्ट्री काय? टीसीए सायकल आठवतंय का?” केतकर सोडायला तयार नव्हते.

“अहो, फार वर्षं झाली त्याला सर. टीसीए म्हणजे क्रेब्ज सायकल ना? थोडंथोडं आठवतंय, ऑक्झॅलोऍसिटेट, सायट्रेट, आयसोसायट्रेट, अल्फाकीटोग्लुटारेट…. ” मी अडखळलो.

“पुढे?” केतकर मिष्किलपणे म्हणाले

“नाही बुवा आठवत.”

“सक्सिनिल को ए, सक्सिनेट, फ्युमॅरेट आणि मॅलेट. नॉट बॅड हां!” हे ते मला म्हणाले की स्वतःला कुणास ठाऊक! पण एकंदरीत केतकरांना बरं वाटलं असावं.

पहिल्या भेटीतच हे पाणी काही वेगळं आहे असं माझ्या ध्यानात आलं. मग केतकर बर्‍याच वेळा भेटले, भेटतच राहिले. काही व्यावसायिक कारणानं आम्ही एकत्र आलो खरे, पण ते कारणही नंतर विरघळून गेलं. केतकर झुऑलजीचे प्रोफेसर होते खरे, पण त्यांनी प्राध्यापकी सोडूनही आता बरीच वर्षं झाली. गेली काही वर्षं ते पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. त्या आधी काही वर्षं त्यांनी इंडस्ट्रीतही काम केलं होतं. आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे, मुलंही आपापल्या मार्गाला लागली आहेत, पण केतकरांचा धडपड्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सतत त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं.

प्रखर बुद्धी, विज्ञानावर गाढ श्रद्धा, प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या कानसेवर पारखून घ्यायची जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती आणि असं इतकं चिकित्सक राहायचं असेल तर त्याला आवश्यक असणारा किंचित तुटक, तिरका स्वभाव. आजपर्यंत केतकर मला इतके समजले आहेत. एरवी गंभीर आणि कडक वाटणारे केतकर खेळकर आणि मिष्किलही आहेत. बोलताबोलता ते एखादा खोचक विनोद करतील आणि खळखळून हसतीलही. त्यांच्या बोलण्याची एक विशिष्ट ढब आहे. संथपणे, किंचित कापर्‍या, हेलकावणार्‍या खर्जातल्या आवाजात ते बोलतात. त्यांचं मराठी आणि इंग्रजी उत्तम आहे, पण उच्चारांवर छाप बाकी अस्सल पुणेरी. एखाद्या किचकट शास्त्रीय प्रयोगाचं वर्णनही ते करतात ते मंत्रपुष्पांजली म्हटल्याच्या आविर्भावात. त्यांचं मराठीही वेगळंच आहे. त्यांच्या बोलण्यात जुने, बोलीभाषेतून हद्दपार झालेले शब्द सहजपणे येतात. ‘जरा वेळ थांब’ ला ते सहजपणानं ‘क्षणभर थांब’ म्हणून जातात. काहीतरी जबरदस्त दिसलं, झालं, कळालं की त्याला ते ‘ज्याचं नाव ते!’ असं म्हणतात. एकदा मी त्यांना दुपारी काय करताय? असं विचारत होतो.

” उद्या दुपारी ना? अं.. अरे हो, माझं उद्या दुपारी त्या ऑयस्टर हॉटेलमध्ये लग्न आहे..”

“आँ…?” माझ्या हातातली काडेपेटी खाली पडली.

केतकर नेहमीप्रमाणे खळखळून हसले. “लग्न म्हणजे, जायचंय मला किडे मारायला!” त्यांनी हाताने पंप मारल्याचा आविर्भाव केला. “म्हणजे पेस्ट कंट्रोलला रे….” ते म्हणाले.

साधारणतः पन्नाशीनंतर माणसाची शारीरिक आणि मानसिक लवचिकता कमी होत जाते. नवीन गोष्टी शिकण्याची, स्विकारण्याची इच्छाही. केतकरांचंही थोडंसं तसं झालं आहे. “मला त्या तुमच्या कंप्युटरमधलं आणि इंटरनेटमधलं काही कळत नाही.” असं ते वरचेवर म्हणतात. पण इंटरनेटबद्दल त्यांना सगळी माहिती असते. “आता नवीन काही वाचावसं वाटत नाही” असंही ते परवा म्हणाले. पण जे ठाऊक आहे, आणि ज्याचा अभ्यास केलेला आहे, ते केतकरांच्या मनात अगदी जिवंत, धगधगीत आहे. केतकर एरवी इतके मोकळे असले तरी काहीकाही बाबतीत त्यांनी स्वतःला शिंपल्यासारखं मिटून घेतलेलं आहे. (हे स्वतः केतकरांनी लिहिलं असतं तर कदाचित ‘हर्मिट क्रॅब’ सारखं असं म्हणाले असते!)

मध्यंतरी एकदा गोमूत्राचा शेतीसाठी वापर या विषयावर बोलत होते. म्हणाले, ” हे बघ, कुणी काही सांगतो म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवणं बरं नव्हे. शास्त्राचे विद्यार्थी ना आपण? आता शेतजमिनीत गोमूत्र, गोमय, आणखी काही – काय ते तुम्ही अमृतपाणी की काय म्हणता ते – हे घातलं की नक्की कायकाय होतं त्याचा अभ्यास करायला पाहिजे. केमिकल चेंजेस काय होतात, फ्लोरा आणि फॉना कसा बदलतो याचा शास्त्रीय अभ्यास व्हायला पाहिजे. खूप मोठं काम आहे रे हे. टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे कुणीतरी. मग हे जर खरंच उपयोगाचं आहे असं दिसलं तर त्याचं स्टँडर्डायझेशन करून ते शेतकर्‍यांना देता येईल. आणि असंलं काहीही होत नाही असं जरी आपल्याला प्रूव्ह करता आलं तरी हेसुद्धा महत्त्वाचंच फाईंडिंग आहे. अरे, रिसर्चमध्ये निगेटिव्ह रिझल्टसही महत्त्वाचे असतात…”

“अहो, तुम्ही म्हणताय ते खरंच महत्त्वाचं आहे.” मी उत्साहानं म्हणालो, “आपण एक प्रोजेक्ट करुया का यावर? मी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला असलेली मुलं देतो. तुम्ही फक्त त्यांना गायडन्स द्यायचा. वाटल्यास आपण तीनचार गट करुया. एक गट बेसवर्क करेल. दुसरा… ”

केतकर नकारार्थी मान हलवत होते.

“काय झालं, सर?”

“ही सगळी सव्य अपसव्यं तू कर हवी तर! पण मला बाकी आता विद्यार्थ्यांशी बोलायला लावू नकोस. त्रास होतो रे! एखादा असतो मारे एमेस्सी झुऑलजी वगैरे. त्याला विचारलं की बाबा पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांत फरक काय? तर त्याचा चेहरा असा होतो की ज्याचं नाव ते! मग त्याला म्हटलं की जाऊ दे, तुला मराठीत विचारतो; कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट म्हणजे काय माहिती आहे का तुला? तर तो म्हणतो की हे बीएस्सीला होतं, आता विसरलो. आता काय बोंबलणार अशा पोरांसमोर? एखादा बॉटनीवाला असतो, त्याला म्हटलं की वांग्याची, मिरचीची फॅमिली सांग तर तो म्हणतो, अहो हे सगळं हल्ली इंटरनेटवर लगेच आणि फुकट मिळतं. ते कुणी कशाला लक्षात ठेवेल? अरे, मी तर आता जुना झालो, ही मुलं तरुण आहेत; त्यांचं ज्ञान जास्त अपडेटेड असायला पाहिजे. त्यांनी मला चार नव्या गोष्टी सांगायला पाहिजेत. आणि होतंय काय, की मला जे पन्नास वर्षांपूर्वीचं आठवतंय तेवढंही या कार्ट्यांच्या लक्षात असत नाही. म्हणून प्लीज, मला असलं काही करायला सांगू नकोस…” मी काहीच बोललो नाही.

तसाच कधीतरी ‘म्युझियम ऑफ ऑर्थ्रोपोडा’ चा विषय निघाला. कीटकांचा शास्त्रोक्त अभ्यास करून केलेला हा पुण्यातला एकमेव संग्रह. तोही केतकरांच्या घराण्यानंच केलेला. पुढे ज्या जागेवर तो संग्रह होता, ती जागाच पाडली गेली म्हणून तो संग्रह पुण्यातला एका प्रथितयश महाविद्यालयाला देणगी म्हणून देण्यात आला. अपेक्षा अशी होती की ते महाविद्यालय त्या संग्रहाचं जतन आणि शक्य झाल्यास संवर्धनही करेल.

“धूळ खात पडलीत रे सगळी स्पेसिमेन्स!” केतकर सांगत होते. “कित्येक तर बुरसून, किडून गेलीयत. माती झाली रे माती सगळ्याची! कितीतरी शिकता आलं असतं त्यातून. किती लोकांना उपयोग झाला असता. किती रिसर्च करता आला असता, पण कुणाला काय आहे त्याच?…” केतकरांचा आवाज अधिकच कापरा झाला होता.

मध्ये एकदा मी त्यांना फोन केला होता.
“सर, एक काम आहे. ”

“बोल. ”

“अहो, घरात कुठून तरी एक उंदीर शिरलाय. हुसकावून जात नाही. लपून बसतोय. वैताग आलाय आणि किळस वाटत्ये हो! काही उपाय सांगा की.. ”

“घे लिहून. ” केतकर म्हणाले. “औषधाचं नाव रोबॅन. स्पेलिंग आर ओ बी ए एन. वीसेक रुपयांचं एक पाकिट असतं. सहा वड्या होतील त्याच्या. वर्तमानपत्राचा चतकोर कागद घ्यायचा. त्यावर एक वडी ठेवायची. त्यावर थेंबभर गोडंतेल टाकायचं आणि आपलं कपाट, फ्रिज आणि भिंत याच्यामध्ये मोकळी जागा असते की नाही, त्यात हा कागद गुंडाळून ठेवायचा.”

“गुंडाळून का बरं?”

“कारण उंदीर इज अ क्यूरियस ऍनिमल. तू त्याचं खाद्य उघड्यावर ठेवलंस तर त्याला संशय येईल. तो पहिल्या दिवशी नुस्ता वास घेऊन जाईल. दुसर्‍या दिवशी ते खाद्य तिथंच दिसलं तर तो खाईल. आता रोबॅन कंटेन्स ब्रोमोडायलॉन. काय आहे हे?”

“नाही बुवा माहिती!”

“इट इज ऍन ऍंटीकोऍग्युलंट. त्यामुळं त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव होईल. इंटर्नल ब्लीडिंग. आणि तो घराच्या बाहेर जाऊन मरेल.”

“वा. आता कुठं मिळेल मला हे रोबॅन? ”

“कुठल्याही शेती सेवा केंद्रात मिळेल. तू मंडईच्या बाजूला जाणार आहेस का एकदोन दिवसांत? बरं मग स्वारगेटकडे? मग असं कर, माझ्या घरी ये. तुला रोबॅन देतो, शिवाय एक कप चहा आणि एक सिग्रेटही देतो. अगदीच नशिबवान असलास तर रात्रीचं उरलेलं काही खायलाही देतो.”

“रात्रीचं उरलेलं? हा काय प्रकार आहे?

“अरे, कोकणस्थाच्या घरी पाहुण्याला खायला म्हणजे शिळंपाकंच..!” केतकर खदखदून हसले.

तर असे हे केतकर! ज्या वयात कोणत्याही नवीन ओळखी नको वाटत असतील अशा त्यांच्या वयात मी त्यांना भेटलो. ज्या वयात गुरू म्हणून आपला अहंकार फुलू लागलेला असतो, अशा माझ्या वयात मला ते गुरू या भूमिकेत भेटले. वास्तविक त्यांचं माझं जमण्याचं काहीच कारण नव्हतं. पण हे मेतकूट जमून गेलं. त्यांचं माहिती नाही, पण माझा बाकी बराचसा स्वार्थ साधून गेला. एका खरोखर ज्ञानी माणसाची संगत मला लाभली. त्याहून महत्त्वाचं म्हणजे निखळ ज्ञान, चिकीत्सा आणि सत्य – सगळे पूर्वग्रह, संस्कार, संकेत बाजूला ठेऊन शोधलेलं निव्वळ झळझळीत सत्य – यावरचा माझा विश्वास केतकरांनी पुनरुज्जीवित केला, अधोरेखितही केला.

अलिकडे एखाद्या रविवारी फोन वाजतो. केतकर असतात.
“आहेस का घरी? ”

“आहे की! काय हुकूम? ”

“काही नाही. तुझ्या घराच्या कोपर्‍यावर आलोय, म्हटलं रिकामा असशील तर ये सिग्रेट ओढायला.”

“अहो, हे काय बोलणं झालं सर? आलोच. ”

मी जातो. केतकर एका सिग्रेटीच्या थोटकावर दुसरी पेटवत असतात.
“जाड झालास.”

“होय हो. आजकाल कामात अडकलोय इतका! वेळच होत नाही व्यायामाला. खाणंपिणंही बिनसलंय.”

“अरे सकाळी व्यवस्थित खाऊन बाहेर पडत जा, रात्री जेवला नाहीस तरी चालेल. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, डिनर लाईक अ पॉपर, माहिती आहे ना?”

“होय. सर, हल्ली ते आपोआपच होतं. प्रोफेसर आणि पॉपर यात फरक आहे कुठं आता ”

आम्ही दोघेही हसतो. केतकर सिग्रेट पुढे करतात.
“घे.”

“नको, हा तुमचा ब्रँड झेपायचा नाही मला. मी आपली लाईट घेतो. बाकी काय म्हणताय?”

“चाललंय. किडे मारतोय. अरे, परवा तुझी आठवण आली होती. म्हटलं तुला विचारावं. तू मायक्रोबायॉलॉजिस्ट…”

“अहो सर, माझा आणि मायक्रोबायॉलजीचा काही संबंध आहे का आता? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आठवतंय मायक्रोमधलं..!”

“नाही तरीपण तू तज्ज्ञ त्यातला! मला एक सांग, समज एक चांगली सुपीक जमीन आहे. ब्लॅक कॉटन सॉईल. भरपूर ऑरगॅनिक मॅटरही आहे त्यात. आपल्याला त्यात समज सोयाबीन लावायचं आहे. काय? आता मी त्यात समज एक बॅक्टेरिअल कल्चर घातलं. किती? तर प्रत्येक एकराला… ”

केतकर रंगात येऊन बोलत असतात. त्यांच्या चेहर्‍यावर एखाद्या नुकत्याच सायन्स शिकायला लागलेल्या मुलाचं कुतूहल असतं. त्यांचा आवाज एका विज्ञानाच्या प्राध्यापकाचा नसतो, एका वस्तुनिष्ठ अभ्यासकाचा असतो. त्यांच्या डोळ्यात एका विज्ञानप्रेमीची चमक असते. केतकर बोलत असतात, आणि मी भारावून, अधिकाधिक नम्र होत ऐकत असतो. केतकरांच्या सिग्रेटीवर अर्धा इंच राख जमलेली असते. माझ्याही.

Uncategorized में प्रकाशित किया गया | 2 टिप्पणियां