धुक्यातून उलगडणारे जी.ए. - ४

May 15, 2008 at 12:06 pm (Uncategorized)

‘ हे परमेश्वरा, आता माझे आयुष्य संपणार व मी तुझ्यापुढे येऊन उभा राहणार. मी फार पापी आहे, म्हणून त्या क्षणी तू मला क्षमा कर. पण तूच मला असे निर्माण करून ठेवलेस, याबद्दल त्या क्षणी मीदेखील तुला क्षमा करीन.’
-उमर खय्याम

जी.एं. चे मराठी वाचन

जी. एं. चे बरेचसे आयुष्य कर्नाटकात गेले. ते कानडी उत्तम बोलत असत. त्यांचा अभ्यासाचा आणि अध्यापनाचा विषय इंग्रजी. आणि त्यांचे लिखाण आहे ते सगळे मराठीमध्ये. मराठी भाषेबद्दल - किंवा एकंदरीतच भाषांबद्दल - त्यांना आदर वाटत असे. भाषा ही कोणत्याही लेखकापेक्षा मोठी आहे, असते असे त्यांना वाटे.एखाद्या  लेखकाने अमुक एका भाषेला काही दिले असे म्हणणे म्हणजे आपल्यासारखा मुलगा झाला म्हणून आपल्या आईचे अभिनंदन करण्यासारखे आहे, असे ते म्हणतात. मराठीच्या भवितव्याविषयी कपाळावर काही वैचारिक आठ्या चढवण्याची सध्या फॅशन आहे पण पंचवीस - सव्वीस वर्षांपूर्वी ‘समजा, जर काही जण मराठीच्या विरुद्ध पचंग बांधून तयार झाले आहेत, आणि तेवढ्याने कापरे भरण्याइअतकी जर मराठी दुबळी असेल तर तिने सरळ उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी जावे हे बरे’ हे जी. एंनी लिहिलेले वाक्य बरेच काही सांगून जाते.

कुलकर्णी हे आडनाव आणि इतरांना कस्पटक्षुद्र लेखण्याची वृत्ती यात काही गणित आहे का ते एकदा पाहिले पाहिजे. जी.एं चे मराठी वाचनही भरपूर असले तरी फारच कमी मराठी लेखक - कवींच्या रचना त्यांना आवडत असत. बालकवी, खानोलकर, ग्रेस ही काही चटकन आठवणारी नावे. माडखोलकरांविषयीही त्यांनी बरे लिहिले आहे. माडखोलकरांच्या लिखाणात ‘प्रमाथी’ , ‘उर्जस्वल’ असे शब्द येत असले तरी त्यांच्या लिखाणाला स्वतःची एक ऐट, एक श्रीमंती आहे असे त्यांना वाटते.  जुन्या पिढीतले लेखक विनायक लक्ष्मण बर्वे उर्फ ‘कवी आनंद’ यांनी केलेल्या ग्रेच्या विलापिकांचा अनुवाद आणि त्यांची ‘मुचकुंददरी’ ही कादंबरी आपल्याला आवडल्याचे ते लिहितात. अनिलांच्या कविता आणि कुसुमावती देशपांड्यांचे लिखाण हे जी. एंच्या आवडीचे. पण त्यांच्या प्रेमपत्रांच्या संग्रहावर (’कुसुमानिल’) बाकी ते तुटून पडलेले दिसतात. खरेच आहे म्हणा! अगदी साहित्यीकांची झाली म्हणून काय झाले, प्रेमपत्रे ही काय प्रसिद्ध करण्याची गोष्ट आहे?

माधव आचवल ही जी.एंचे दूरपर्यंतचे मित्र. त्यांच्या ‘किमया’ या पुस्तकाविषयी लिहिताना जी.एंना शब्द पुरत नाहीत. ”आचवलांचे लेखन स्वयंप्रकाशी आहे. स्वतःचा निळसर लाल प्रकाश घेऊन ते ताजे असते’ असे ते म्हणतात.किमया’ कडे वाचक - टीकाकारांनी दुर्लक्षच केले, ही जाणीवही त्यांना टोचून जाते. ‘ समुद्रातून एखादी जलपरी सुळकी मारून वर येऊन निघून जावी, आणि कडेच्या कट्ट्यावर बसून बकाबका भेळ खाणाऱ्यांचे तिकडे लक्षही नसावे’ असे काहीसे त्यांनी या पुस्तकाबाबत लिहिले आहे. (जी.एंचे वैयक्तिक आयुष्य विरोधाभासांनी आणि पूर्वगृहांनी भरलेले असले तरी आचवलांना खूष करण्यासाठी जी.एं असले काही लिहितील, असे वाटत नाही. अनंतराव कुलकर्णी हेही जी.एंचे जवळचे मित्रच. पण त्यांचे पुस्तक (जेनी) जी.एंना मुळीच आवडले नाही. तसे त्यांनी अनंतरावांना स्पष्टपणे लिहिले आहेच.)

पण अशी उदाहरणे फार कमी. याउलट शरच्चंद्र चॅटर्जी, टागोर या लोकप्रिय लेखकांविषयी जी.एं. चे मत फारसे बरे नव्हते. पतीसाठी भयंकर त्याग वगैरे करणाऱ्या शरदबाबूंच्या नायिकांची जी.एं नी भरपूर टवाळी केली आहे. टागोरांची विश्वमानव ही कल्पना तर त्यांना कधीच पटली नव्हती. ‘माणूस नावाचा बेटा’ या आपल्या कथेत त्यांनी या कल्पनेची खिल्ली उडवली आहे. ‘कवितेत टागोरांचे काळजीपूर्वक विंचरलेले केस कधी विस्कटत नाहीत’ या शब्दांत त्यांनी टागोरांना निकालात काढले आहे. उर्दू शायरीही त्यांना फारशी रुचत नसे. ‘वन ऑफ माय ग्रेटेस्ट प्लेझर्स इन लाईफ वुड बी टु कॅच होल्ड ऑफ टेन फ्लॅबी उर्दू पोएटस ऍंड किक दी हेल आउट ऑफ देअर माशाल्ला- सुभानल्ला’ असे ते लिहितात. कळस म्हणजे ज्या पु. ल. ,सुनीताबाई देशपांड्यांशी त्यांचे त्यातल्या त्यात बरे होते, त्या पु. लं. चा विनोदही जी.एंना फारसा आवडत नसे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधले एक व्यक्तिचित्र (नंदा प्रधान?) आपल्याला आवडल्याचे त्यांनी लिहिले आहे. इतरत्र बाकी पु. लं च्या लिखाणाविषयीची त्यांची भूमिका म्हणजे ‘ पाच -दहा मिनिटांच्या सूचनेने गदगदून जाणारा लेखक’, ‘विनोद करताना आपण विनोद केलाच पाहिजे असा त्यांचा इतका जॉनीवॉकरध्यास असतो, की एखादी ‘जागा’ आपण चुकलो नाही ना, असा त्यांना अधीरपणा असतो. एखादा पहिलवान जसा दिसेल त्याला धोबीपछाड टाकायच्या विचारात असावा, तसे विनोदी लेखक दिसेल त्या सिच्युएशनमधून विनोद उकळण्याच्या नादात असतात’ अशी आहे. (जी. एंचे हे म्हणणे  दुटप्पीपणाचे तर आहेच, पण फारसे पटणारेही नाही. फारसे एवढ्यासाठी की पु. लंनीही आपला विनोद काही वेळा सस्त्या लोकप्रियतेसाठी वापरल्यासारखे वाटते. विशेषतः त्यांनी स्वतःच्या लिखाणाच्या काढलेल्या ध्वनीमुद्रिकांच्याबाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. या क्षणी आठवणारी दोन उदाहरणे अशी - ‘असा मी असामी’ मधील धोंडो भिकाजीच्या कपड्यांच्या खरेदीबाबत ‘आपल्या नवऱ्याला मळकट रंगाचे कपडे घेतले तरच आपलं सौभाग्य अबाधित राहील अशी आमच्या हिची समजूत असावी’ असे ते मूळ लिखाणात म्हणतात. ध्वनीमुद्रिकेत बाकी ते ‘आमचं सगळं मळखाऊ डिपार्मेंट ना.. ‘ असे म्हणतात. ‘राणीसाहेबांच्या चंद्रशेखर या कुत्र्याचे शेपटीवरील फोड गुरुदेव आपल्या अंगावर कुठे घेणार या चिंतेने मी प्रदक्षिणेच्या निमित्ताने गुरुदेवांच्या मागच्या अंगाला असलं काही एक्सटेन्शन आहे का हे बघून घेतलं’  असा ध्वनीमुद्रिकेत उल्लेख आहे. आता यातला एक्सटेन्शन हा शब्द मूळ लिखाणात नाही. हे बदल करावे असे पु. लंना का वाटले असावे? ही काही श्राव्य माध्यमाची गरज नाही. मला तर हे पब्लीकला खूष करण्यासाठी केलेले वाटते. ज्या काळात हे ध्वनीमुद्रण झाले त्या काळात पु. लं. मराठी साहित्यविश्वाच्या सम्राटपदी होते. तरीही ही आळवणी करणे पु. लंना गरजेचे का वाटले असावे? असो.) भास्करबुवा बखले यांचे गायन पु. लंनी प्रत्यक्षात कधी ऐकले नाही. त्यांच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रिकाही उपलब्ध नाहीत - पण पु. लंनि त्यांच्या गायकीवर मोठा लेख लिहिला, या उबवलेपणाचीही जी.एंनी टिंगल केली आहे. पु. लं. च्या लिखाणाविषयी सुनीताबाई देशपांड्यांना लिहिलेल्या पत्रांत बाकी जी.एंनी सतत प्रशंसेचा सूर लावला आहे. केशवराव दाते आणि भास्करबुवांची व्यक्तिचित्रे आपल्याला ‘सपाट’ वाटली असे त्यांनी सुनीताबाईंना लिहिले आहे खरे, पण इतरांना पु. लंविषयी लिहिताना असलेली धार त्यांनी इथे जाणीवपूर्वक बोथट केल्याचे जाणवते. हा दुटप्पीपणा जी.एंच्या इतर बऱ्याच बाबतींतही दिसून येतो, पण त्याविषयी नंतर कधीतरी.

पण एक माणूस म्हणून पु. लं विषयी जी.एंना आदर असावा असेच वाटते. पु. लंनी सामाजिक कार्याला केलेल्या मदतीविषयी आणि त्यातही स्वतः अनामिक रहण्याच्या निर्णयाविषयी जी.एं अत्यंत भारावून गेलेले दिसतात. विकास आमटेंना लिहिलेल्या पत्रात ते पु. लं. विषयी ‘ मला वाटते हा माणूस निघून गेल्यावर बसलेल्या जागी थोडा सूर्यप्रकाश सांडलेला आढळत असेल -आणि त्या प्रकाशाला मंद सुगंध असतो तो सौ. सुनीता देशपांडे यांच्या साहचर्याचा’ ‘ असे लिहितात. पु. लं. च्या गप्पांची मैफल जमवण्याच्या हातोटीविषयीही जी.एंनी असेच कौतुकाने (आणि थोड्या असूयेनेही?) लिहिले आहे. इचलकरंजीच्या फाय फाउंडेशनच्या समारंभात - जी. एंनी हजेरी लावलेल्या अत्यंत मोजक्या समारंभांपैकी एक - ‘पु. लं माझ्याविषयी फार मोठ्या मनाने बोलले - जुन्या काळच्या एखाद्या तालेवार स्त्रीने मोठ्या मोठ्या पशांनी ओटी भरावी त्याप्रमाणे.’ असे जी. एं लिहितात तेंव्हा फक्त या शब्दांची आणि त्यामागच्या भावनांची गर्भश्रीमंती लक्षात राहते. तो दुटप्पीपणा, ती विसंगती गेली खड्ड्यात!  

जी. एंचा मराठी कवितांचा जबरदस्त अभ्यास होता. पाडगावकर आणि बोरकर हे जी.एंच्या आवडत्या कवींमधले. पण पु. शि. रेग्यांच्या कविता या आपल्या आयुष्यातला एक ‘ब्लाईंड स्पॉट’ राहिला आहे, असे ते म्हणतात. मर्ढेकरांच्या कवितांविषयीही जी.ए. ‘इनडिफ्रंट’ होते, असेच वाटते. सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे विविध संतांनी केलेल्या रचनांविषयीही जी.एंना फारशी आपुलकी वाटत नसे. याला कारण म्हणजे जी.एंचा पराकोटीचा नास्तिकवाद असावा. मर्ढेकरही नास्तिक असले, तरी ते श्रद्धाळू होते. जी.एं. कडे बाकी असल्या कसल्याही श्रद्धा सापडत नाहीत.  तरी मर्ढेकरांच्या काही कवितांचा ते आपल्या लिखाणात उल्लेख करतात.  (त्या कविताही अशा चमत्कारिकच आहेत - उदाहरणार्थ ‘ दाखवितील ते भोक रिकामे, जिथे असावे मांसल लिंग’ या ओळींचा उल्लेख करावा - किमान दोनदा- असे जी.एंना का वाटले असावे? त्यातही जी.एं या ओळींचे स्वतःचे म्हणून जे रुप सादर करतात ‘जेथ असावे मांसल लिंग, त्या ठिकाणी निव्वळ भोकच नव्हे तर वळवळणारे किडे..’ जिथे असावे मांसल लिंग, तिथे दिसावा निव्वळ बुरसा..’ हे सगळे काय आहे?) ग्रेसच्या कवितांना बाकी ते ‘विशाल उग्र आयुष्याने मध्येच डोळा उघडून आपल्याकडे रोखून पाहावे असा अनुभव देणारी तुमची कविता’ असे ते म्हणतात. खानोलकर हेही जी. एंचे आवडते लेखक - कवी. ‘खानोलकरांना लाभलेला तेजस्पर्श असलेला मराठीत आज दुसरा लेखक नाही’ असे त्यांचे मत होते. कवी मनमोहन यांच्याविषयी त्यांनी ‘ ताऱ्या - ग्रहांची बटणे लावणारा हा माणूस असल्यामुळे जो भाग बटणे लावून झाकावा, तोच उघडा पडला’ असे जी.ए. लिहितात. मराठी समकालीन कथाकारांच्या थोड्या कथा मनापासून आवडल्याचे जी. एंनी  लिहिले आहे. गाडगीळांची ‘तलावातले चांदणे’, गोखल्यांची ‘यात्रा’, थोरल्या माडगूळकरांची ‘वीज’, दळवींची रुक्मिणी, खानोलकरांची ‘सनई’ आणि शंकर पाटलांची ‘दसरा’ या कथा आपल्याला आवडल्याचे जी. ए. लिहितात- बऱ्याच वेळा या कथा आपण न लिहिल्याबद्दलची खंतही त्यांच्या लिखाणात येते. या कथांवर एक नजर टाकली की स्वतःच्या आवडीनिवडींविषयीचे जी.एं नी वारंवार (आणि कदाचित जाणीवपूर्वक) अधोरेखित केलेले ‘गावाचे एक आणि गावंढ्याचे (गावड्याचे?) एक’ हे मत ध्यानात येते. ( माडगूळकरांची ‘वीज’ घ्या - ही खरेतर जी. एं धाटणीचीच कथा. कुरुप, अपंग मुलात जागृत होणाऱ्या लैंगिक भावना आणि त्याची घुसमट या विषयावरची की कथा. ) जी. एं. ची स्वतःची अशी विकसित झालेली शैली - आणि त्यांच्या टीकाकारांच्या मते त्यांची मर्यादाही - अशीच कुठून कुठून जमा होत गेली असली पाहिजे. मराठीतल्या काही अतिशय अपरिचित,  अनोळखी लेखक -लेखिकांचा जी.ए. मुद्दाम उल्लेख करतात. अच्युत पारसनीस,  कृष्णा जे. कुलकर्णी,  मीना दीक्षित हे त्यातले काही लेखक. वामन चोरघडे यांच्या जिवंत अनुभवाने जी.ए. प्रभावित झालेले दिसतात,  पण त्यांच्या कथांमध्ये बाकी या अनुभवांच्या वर्णनाचा खोटा,  चोरटा सूर - जसा सुधीर फडक्यांच्या काही गाण्यांत लागला आहे तसा -  लागला आहे,  असे त्यांना वाटते. मामा वरेरकरांचे ‘अवघा महाराष्ट्र आपल्याला अनुल्लेखाने मारतो आहे’ हे मत हाही जी. एं. च्या टवाळीचा आवडता विषय. 

अगदी आश्चर्यकारकरीत्या खांडेकर हे जी.एंचे एके काळचे आवडते लेखक - दैवतच - होते. याच खांडेकरांची जी.एंनी ‘ हरीभाऊनी मराठी साहित्यात आणून टाकलेल्या सामाजिक गाठोड्यांचा शेवटचा फेरीवाला’ अशी थट्टाही केली आहे. नंतरनंतर बाकी खांडेकर हे लेखक म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून आपल्याला श्रेष्ठ वाटत होते असे त्यांनी म्हटले आहे, ही बाकी थोडी सारवासारव वाटते.  श्री.म. माटे यांच्या काही कथांविषयीही जी.एं भरभरून लिहितात. पण इथेही त्यांचा खवचटपणा आहेच. ‘सावित्री मुक्यानेच मेली’ हे कथेचे नाव आहे की एखाद्या टूथपेस्टची जाहिरात?’ हा खास जी.ए. शैलीचा प्रश्न.  इतर बाजारू लेखकांना - विशेषतः स्त्री लेखकांना- त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांनी फक्त तळायचे शिल्लक ठेवले आहे. त्यांच्या खोट्या, उबवलेल्या शब्दांना, उपमांना जी. एंनी काटेफांजराने झोडपले आहे. नयना आचार्य यांच्या ‘प्रतिभेचा स्पर्श, सूक्ष्म निरीक्षण, तरल संवेदना’ अशा शब्दांवर टीका करताना ‘ या बाईंना, काही लोकांना सतत शिंका येतात तसे प्रतिभेचे झंकार येतात. ‘ असे जी. ए. लिहितात. विशेष म्हणजे जी. एंच्या स्वतःच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक लिखाणातही - इतक्या तकलादू नसल्या तरी - उपमा -उत्प्रेक्षा खच्चून भरलेल्या असतात. या विरोधाभासाचे नवल वाटते.  धनी वेलणकरांच्या पुस्तकात आलेल्या असंख्य विसंगतीपूर्ण उल्लेखांचा ( दर शनिवारी मुंग्यांना साखर घालणे पण साखर संपली की मुंग्या चिरडून टाकणे -कारण मुंग्या उपद्रवी असतात! ) ते असाच टोपीउडवू उल्लेख करतात. पण अशा विक्षिप्त वृत्तीच्या लोकांविषयी आपल्याला एक सुप्त कुतूहल आहे, असे त्यांनी कबूल केले आहे. (उदाहरणार्थ, स्त्री ही आपल्या विकासातील मोठी धोंड आहे असे मानून आपल्या बायकोचा जाहीर पाणउतारा करणारा आणि नंतर अतिव वैफल्याने तिच्याशीच रत होणारा टॉलस्टॉय - त्याला म्हणे चौदा की सोळा मुले झाली! )  विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते ‘सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही’ असे म्हणतात. गो. नि. दांडेकरांची बरीच पुस्तके जी.एंनी वाचली होती आणि त्यांतल्या भाबडेपणावर त्यांनी सणसणीत टीकाही केली आहे. जयवंत दळवींचे लिखाण - आणि ‘ठणठणपाळ’ - जी.एंना आवडत असे. दळवींचे आणि जी. एंचे अनेक वर्षाचे मैत्रीचे संबंध होते, पण - आणि हा ‘पण’ हा जी. एंच्या आयुष्याचाच एक भाग झाला होता - पण यालाही एक विचित्र विरोधाभासाचा वास आहे. एकंदरीतच जी. एंचे साहित्यिक आयुष्य - आणि खाजगी आयुष्य तर जास्तच - विरोधाभास, विसंगती, पूर्वग्रह यांनी भरलेले एक गाठोडे होते.

Permalink 1 Comment

धुक्यातून उलगडणारे जी ए-३

May 9, 2008 at 11:56 am (Uncategorized)

जी.एं. चे इंग्रजी वाचन

‘शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी ईच टाईम ट्राईंग टु कट निअरर टु द एकिंग नर्व्ह’ 
                                                       -स्ट्रिंडबर्ग

चांगला लेखक हा उत्तम वाचक असलाच पाहिजे यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही.  जी.एं चे इंग्रजी साहित्याचे वाचन अफाट होते. (याला त्यांचे इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक असणे एवढेच कारण असावे असे वाटत नाही. प्राध्यापकांचे वाचन आणि त्यांचा व्यासंग चांगला असला पाहिजे, हे सूत्र तर कधीच कालबाह्य झाले आहे!)  कर्नाटक विश्वविद्यालयाचे वाचनालय हे तर त्यांचे दुसरे घरच होते. जगातले उत्तमोत्तम साहित्य मिळवून ते वाचणे, त्यावर विचार, चिंतन (! ) करणे हा जातिवंत वैचारिक गुण जी. एंमध्ये प्रकर्षाने दिसतो. धारवाडमध्ये त्यांच्या घरी स्वतः विकत घेतलेल्या चार - साडेचार हजार पुस्तकांचा संग्रह होता. चार - साडेचार हजार! याशिवाय वेळोवेळी वाचनालयातून आणून वाचलेली, मित्रांनी, स्नेह्यांनी वाचायला दिलेली असंख्य पुस्तके, जवळजवळ तितकीच मासिके - हे निव्वळ आकडेच चकरावून टाकणारे आहेत. जी. एंचे इंग्रजी वाचन हे थोडेसे त्यांच्या पेशातील गरजेमुळे, आणि बरेचसे त्यांच्या इंग्रजीवरील प्रेमामुळे झाले आहे. ‘इंग्रजी भाषेला एक आणि सिगारेटला एक - अशा दोन गोष्टींना अर्पण करण्यासाठी मला दोन पुस्तके लिहायची आहेत’  असे त्यांनी म्हटले आहे.

जी. एंच्या इंग्रजी वाचनाचा धांडोळा घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.  एकतर त्यांनी आपले आवडते म्हणून जे लेखक/ कवी सांगितले आहेत, ते भलतेच आहेत. ‘गावाचे एक तर गावड्याचे (गावंढ्याचे? ) एक’ हे तर त्यांचे आवडते वाक्य. ‘जे जे लोकप्रिय आहे, ते दर्जेदार नसतेच’ हा त्यांचा जबरदस्त पूर्वग्रह इथेही तितक्याच प्रभावीपणे दिसतो.  ‘इफ अ बुक इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर, आय बिकम सस्पिशिअस अबाउट इट. दी लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर ऑफ इंटेलिजन्स इन ऍन ऑर्डिनरी रीडर इज सो लो, दॅट इफ अ बुक टचेस दॅट, ऑलवेज इन्व्हेरिएबली दी बुक मस्ट बी बॅड’ असे त्यांनी म्हटले आहे. थोडा विचार केला तर हे पटूही लागते. ‘वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की सहा महिने त्याच्याकडे बघवतही नाही’ या एका वाक्यात ते त्या थोर लेखकाची वाट लावून टाकतात. अमेरिकन पेपरबॅक्सवर तर त्यांनी निव्वळ जहरीपणाने लिहिलेले आहे. आयन रँड ही लोकप्रिय लेखिकाही जी. एंना वर्ज्यच होती. ‘काळ्या काचेचे मणी घालून एखाद्या प्रॉफेटेसचा आव आणणारी ही बाई म्हणजे एक बुडबुडा होती’ असे त्यांना वाटते. तिची ‘वुई द लिव्हिंग’ ही कादंबरी दोस्तोव्हस्कीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे समजणाऱ्या एका मित्राशी त्यांचे संबंध दुरावले. ही कादंबरी फार फार तर एखाद्या हिंदी चित्रपटासाठी योग्य आहे, असे त्यांना वाटे. जी. एंचे हिंदी चित्रपटांविषयीचे मत ध्यानात घेता धिस इज सेईंग अ लॉट!

दोस्तोव्हस्की हे तर त्यांचे व्यसनच होते. दोस्तोव्हस्की आणि ओ’नील यांच्या कथांमधील आकर्षक साचाहीनता ओ. हेन्रीच्या कथांमधील निव्वळ कसबापेक्षा त्यांना कितीतरी सरस वाटत असे. इंग्रजी साहित्यातले जी.एं. चे स्वतःचे आवडते लेखक अगदी दुर्लक्षित, लोकप्रिय नसलेले असे होते. ल्यूक्रेशियस हा इसवीसनपूर्व काळातला रोमन कवी आणि तत्त्वज्ञ जी.एं. नी स्वतःच्या तिशीच्या आत वाचला होता आणि त्याने ते बरेच प्रभावितही झाले होते. ल्यूक्रेशियस नंतर त्यांना बराच अपूर्ण वाटत असे. असेच त्यांचे झ्वाईगच्या बाबतीतही झाले होते. एक वाचक म्हणून मला स्वतःला जी. एंचा हा मोठा गुण वाटतो. वयानुसार आणि अनुभवानुसार अभिरुचीत असा बदल घडत राहणे आवश्यकच आहे, असे मला वाटते. अगदी पालापाचोळा तुलना करायची तर ‘ग्रीन सॅलड डेज’ मध्ये व. पु. काळे वाचणे व त्या पुस्तकांच्या प्रेमात वगैरे पडणे आणि नंतर त्यांचे कोणतेही पुस्तक हातातही न धरवणे - अशी जशी अगदी सामान्य वाचकाची उत्क्रांती होते तसे!  (लग्नानंतर प्रथम शरीरसंबंधाचा अनुभव घेतल्यानंतर या सगळ्याचा अर्थ काय असा प्रश्न पडणारा ‘पार्टनर’ मधला नायक  आजही थोडा सुसंगत वाटतो, पण यावर उत्तर म्हणून ‘चांदनी रात सनम चांदके लच्छे लच्छे, दो उंगली चमडी के लिये, मर गये अच्छे अच्छे’ लिहिणारा पार्टनर त्या वेळी फार मोठा तत्त्वज्ञ वगैरे वाटला होता, आज तो पोरकटच नव्हे तर चक्क खुळचट वाटतो ! असो. ) आवडता कलाकार हा अथपासून इतिपर्यंत आवडला पाहिजे या भाबडेपणापासूनही  जी. ए. दूर होते. इथे जी. एं आणि पु. ल. यांच्यातला मोठा फरक दिसून येतो. ‘वुडहाऊस हा बालगंधर्वांच्या गाण्यासारखा आहे, तो एकतर पूर्ण आवडतो, किंवा अजिबात आवडत नाही’ असे पु. लंचे मत आहे. एक आस्वादक म्हणून मला जी. एंची वस्तुनिष्ठता अधिक पटते. ‘रायटिंग, नॉट द रायटर!’ मग एखाद्या आवडत्या लेखकाच्या लिखाणात हिणकस काही आले, तर ते तसे आहे, हे सांगण्याचे धैर्य पाहिजे.  (वुडहाऊअसचे तरी सगळे लिखाण कुठे दर्जेदार आहे? ) ‘मी उगाच सांगत नाही ‘ या गडकऱ्यांच्या ओळींवर ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ मध्ये जी टिंगल आहे, ती जी.एंच्या याच मताचे प्रतिबिंब आहे. ऑलिव्ह श्रायनर या लेखिकेचे ‘स्टोरी ऑफ ऍन आफ्रिकन फार्म’ हे जी. एंचे आवडते पुस्तक. त्याचे भाषांतर करण्याचाही त्यांना कैकदा मोह झालेला आहे. पण या लेखिकेच्या इतर कादंबऱ्या ‘ आपल्याकडे स्त्री लेखिका ज्या लायकीच्या कादंबऱ्या लिहितात, त्याच लायकीच्या’ असे जी. एंचे मत होते. स्त्री लेखिकांविषयी जी. एंची मते ध्यानात घेता त्यांना काय म्हणायचे आहे, ते कळते. हेन्री जेम्सचे फक्त ‘आर्ट ऑफ फिक्शन’ हे पुस्तक जी. एंना आवडत होते. त्याची इतर पुस्तके न वाचण्याच्या लायकीची असे त्यांचे रोखठोक मत होते. या सगळ्या यादीत मॉमचा समावेश असावा, याची गंमत वाटते. मॉम हा तसा लोकप्रिय लेखक. तरी जी. एंनी तो त्यांच्या प्रसिद्ध नियमाला बगल देऊन वाचला, आणि त्याचे ‘ऑफ ह्यूमन बॉंडेजेस’ त्यांना आवडले, हे एक नवलच. नीत्शे या तत्त्वज्ञ कवीच्या ‘बर्थ ऑफ ट्रॅजेडी’ या पुस्तकाचा ते तसाच आवडलेल्या पुस्तकांत उल्लेख करतात . विल्यम गोल्डिंगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे, हे तर सर्वज्ञातच आहे. ओ’नीलच्या ‘लाँग डेज जर्नी इंटू नाईट’ या नाटकाचाही त्यांनी ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ या नावाने अनुवाद केला आहे. (आपल्या) दुर्दैवाने त्यांनी त्या हस्तलिखितावर ‘हे प्रकाशनार्थ नाही’ असे स्पष्टपणे लिहिले असल्याने तो अनुवाद वाचकांसाठी उपलब्ध नाही.

बेलॉक हा जी. एंचा आवडता लेखक. बेलॉकच्या ‘हिज सिन्स वेअर स्कार्लेट, बट हिज बुक्स वेअर रेड’ या वाक्याचा आणि त्यातील ‘रेड’ या शब्दावरील श्लेषाचा ते उल्लेख करतात.  याशिवाय Wole Soyinka या आफ्रिकन नाटककाराचे The Strong Breed हे व इतर नाटके, मार्टीन ब्यूबर नावाचा एक ज्यूईश तत्त्वज्ञ, अनेक अप्रसिद्ध लेखकांची प्रवासवर्णने, थोर हेरुडू नावाच्या लेखकाचे ‘अकू अकु’ हे पुस्तक, प्रेस्कॉट या लेखकाचे ‘कॉंक्वेस्ट ऑफ पेरु’ हे पुस्तक… बापरे! यातली बरीचशी पुस्तके वाचणे तर सोडाच, पण त्यांची आणि त्यांच्या लेखकांची नावेही ऐकलेली नाहीत.  

ऑलिव्ह श्रेनर, कॉनराड रिक्टर, डब्ल्यू. एच. हडसन हेही जी.एंचे आवडते लेखक. रिक्टरच्या कादंबऱ्यांचे तर त्यांनी अनुवादही केले आहेत. निसर्ग विरुद्ध माणूस हा संघर्ष हा जी. एंच्या वाचनाचा आणखी एक आवडता विषय. त्यातही जी.एंचा नियतीवादी (आणि निराशावादीही) पिंड लक्षात घेता कष्ट आणि यश यापेक्षा करुणा आणि भीषणता याकडे त्यांचे मन अधिक आकर्षित होत असले पाहिजे. ‘नाईल नदीचा उगम शोधत जाणारे प्रवासी, वेश पालटून मक्केला जाऊन येणारा रिचर्ड बर्टन, ऍथेऑनच्या खोऱ्यात वेड्याप्रमाणे शिरलेली माणसे, उघड्या डोळ्यांनी मृत्यू पत्करणारा ओटस.. या विविध माणसांत असमाधानाचा असला कोणता अंगार होता की ज्यासाठी आम्ही क्षुद्र माणसे कणाकणाने झिजत शेणगोळा आयुष्य जगतो, ते सगळे बाजूला सारून त्यांना असला जुगार खेळणेच भाग पडावे? ‘असा प्रश्न त्यांना पडतो. हाच तो जी. एंच्या वाचनातला दुसरा विशेष. सरधोपट, मिळमिळीत आयुष्यापेंक्षा, अनुभवांपेक्षा तीव्र, टोकदार आणि दाहक अनुभव जी. एंना जास्त आकर्षक वाटत असत असे दिसते. ‘आपले स्वतःचे आयुष्य असेच नीरस, कोमट, निरर्थक  झाले म्हणून जी.ए. हतबल, निराश झाल्यासारखे वाटतात’ असे जी. एंच्या पत्रांच्या चौथ्या खंडाची प्रस्तावना लिहिणारे विजय पाडळकर यांना वाटते.  आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल - विशेषतः आपल्या लिखाणाबद्दल जी. ए. असमाधानी असतीलही - किंबहुना होतेच- ‘आत्मचरित्र लिहिणे म्हणजे एका अर्थाने आपले आयुष्य पुन्हा जगणे - आणि माझे एकच आयुष्य इतके असह्य आहे, की ते पुन्हा जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही’ या अर्थाचे त्यांनी काहीसे लिहिले आहे. कदाचित म्हणूनच जगावेगळे तीक्ष्ण अनुभव त्यांना अधिक आकर्षक वाटत असावेत. मृत्यूविषयीचे जबरदस्त आकर्षण हेही त्यांच्या याच वृत्तीचे द्योतक वाटते.  

‘आत्महत्या आणि खून या दोन बिंदूंशिवाय जास्त उत्कट, जळजळीत काही असूच शकणार नाही, आणि नेमके हेच शब्द वाड.मयाला कधी गवसत नाहीत’ असे जी. एंना वाटत असे. त्यामुळेच की काय, जी. एंच्या आवडत्या बऱ्याच साहित्यीकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कोसलर, सिल्व्हिया प्लाथ, बेरिमन, स्टीफन झ्वाइग, कावाबाटा, हेमिंग्वे इत्यादि.   जी. एंचा स्वतःचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच होती.

या सगळ्याशी अत्यंत विसंगत अशी गोष्ट म्हणजे लैंगिक साहित्याचे वाचन. ‘माझ्याजवळ जितके लैंगिक साहित्य आहे, तितके इतर कोणत्याही लेखकाकडे असणार नाही’ असे त्यांनी (म. द. हातकणंगलेकरांना) लिहिल्याचे आठवते. त्या काळात अगदी इरसाल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लैंगिक साहित्याचे जी. एंनी अगदी भरपूर वाचन केले होते. त्यातल्या खाचाखोचा, एकंदरीत स्त्री-पुरुषांमधल्या शारिरीक संबंधाबाबत सगळी नैसर्गिक (आणि अर्थातच अनैसर्गिक) माहिती त्यांना होती.

पण हा काही जी. एंनी वाचलेल्या इंग्रजी पुस्तकांचा ताळेबंद नव्हे. जी. एंच्या एकंदर वाचनातील दहा टक्केसुद्धा नावे या लेखात आली नसतील. पण तो मुद्दाच नाही. एखाद्या आडगावी राहून, जगाच्या कानाकोपऱ्यातून दुर्मिळ, अनोळखी लेखकांना धुंडाळून सातत्याने त्यांचे वाचन करणे- व्यासंग हा एरवी सस्ता वाटणारा शब्द इथे चपखल बसावा - एवढेच नव्हे, तर त्यावर स्वतःची रसग्रहणात्मक - टीकात्मक मते तयार करणे, त्यांची समकालीन लेखकांशी, मित्रांशी दीर्घ पत्रांतून देवाणघेवाण करणे - हा सगळा केवढा जगड्व्याळ उपक्रम आहे! आणि हे सगळे करत असताना प्रत्यक्ष स्वतःचे लेखन या सगळ्याशी अंघोळीपुरताही संबंध नसलेल्या मराठी भाषेतून करणे हे आणखी एक थोर. इंग्रजीप्रमाणे जी. एंचे मराठी वाचनही जबरदस्तच होते.   

Permalink 3 Comments

बॆंक ऑफ महाराष्ट्र, गुलबकावलीचे फूल आणि नानजकर

March 22, 2008 at 1:10 am (Uncategorized)

  प्रास्ताविक: ‘माणूस, बेडूक आणि उप्पीट्टम’ या थाटाची ही न-नवकथा वगैरे नाही.
एका सामान्य माणसावर ओढवलेल्या प्रसंगाचे हे (प्रत्ययकारी वगैरे) चित्रण आहे.
 अगदी गुलबकावलीच्या फुलासकट यातली सर्व पात्रे व प्रसंग खरे आहेत. ते तसे न वाटल्यास ती लेखकाची आणि त्याच्या लेखनसामर्थ्याची मर्यादा समजावी.

झाले काय, की काही वर्षांपूर्वी मी एका खाजगी कंपनीत कामाला लागलो होतो. त्या काळाच्या मानाने पगार बेताचाच होता, पण भविष्यकाळ उज्वल आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. तो तसा फारसा उज्वल वगैरे निघाला नाही, पण तो मुद्दा नाही.

त्या कंपनीत वाईकर नावाचे एक गृहस्थ होते. फावल्या वेळात ते इन्शुरन्स एजन्सी, पब्लीक प्रॉव्हिडन्ड फंडाची एजन्सी असले बरेच व्यवसाय करत. पण माणसांना मरणाची आणि वहानधारकाला अपघाताची भीती घालून त्यांचा विमा उतरवणे हा त्यांचा आवडता जोडधंदा. माणूस वृत्तीने फेव्हिकॉल तयार करणाऱ्या कंपनीने जाहिरातीत मॉडेल म्हणून वापरावा, इतका चिकट. त्यांची ही ख्याती जगजाहीर असल्याने मे बरेच दिवस त्यांच्यापासून जपून होतो. पण कसले काय, एक दिवस त्यांनी मला त्यांच्या स्कूटरवरुन लिफ्ट दिली आणि त्या चारपाच किलोमिटरच्या प्रवासात एवढे काही ऐकवले की ‘भीक नको पण कुत्रा आवर’ या न्यायाने मी त्यांच्याकडून पीपीएफ चे एक खाते उघडायला राजी झालो. ‘मला कुणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, पण ज्यांनी बेल्जियम सैनिकांनी वापरलेले संडास पाहिलेले नाहीत, त्यांना मी म्हणेन, की जगात तुम्ही काहीच पाहिलेलं नाही’ असं वुडहाऊसनं लिहिलेलं आहे. त्याच धर्तीवर ‘ज्यांना छळ म्हणजे काय हे माहिती नाही, त्यांना आजवर कधीही एखाद्या संध्याकाळी एखादा इन्श्युरन्स एजंट भेटायला आलेला नाही’ असंही कुणीतरी म्हटलेलं आहे. तर ते असो. वाईकरांनी उत्साहाने सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि मी ते खाते उघडले. नाही नाही म्हणता त्यात इतक्या वर्षांत काही रक्कम जमा झाली. दरम्यान मी ती नोकरीही सोडली आणि आता लहानसहान व्यवहारांसाठी मला बॆंक ऑफ महाराष्ट्रच्या त्या वाईकरांच्या घराशेजारच्या शाखेत, इतक्या दूर काही जायला जमेना. बरे, आता वाईकरांना भेटणेही अवघड झाले होते.  मग महत्प्रयासाने मी मीझे ते खाते माझ्या घराशेजारच्या शाखेत गेल्या वर्षी बदली करुन घेतले.

या महिन्यातली गोष्ट. सहज विचार आला, की या खात्यावर इतकी वर्षे आपले पैसे पडून आहेत, त्यातले काही काढता येतात का बघू.  ’आजच्या तारखेपासून पाच वर्षे आधी पीपीएफच्या खात्यावर जितकी रक्कम असेल, त्यातली निम्मी काढता येते’ वाईकरांची सूचना आठवली.

बँकेत गेलो. प्रचंड गर्दी होती. ‘पीपीएफ’ असे काही कुठल्या खिडकीवर लिहिलेले नव्हते. अंदाजाने ‘डिपॉझिटस’ असे लिहिलेल्या खिडकीसमोरील एका रांगेत उभा राहिलो. पाचदहा मिनिटांनी खिडकीतून माझे पासबुक आत सरकवले. आतल्या सज्जनांना माझी इच्छा सांगितली. त्यांनी समोरच्या संगणकावर काहीसे केले आणि स्वत:शीच नकारार्थी मान हलवली. अशा प्राथमिक प्रतिक्रियांना मी आता भीत नाही. कुठलीही बॆंक, सरकारी कार्यालये इथे पहिली प्रतिक्रिया अशी नकारार्थीच असते. आपल्याला जे करायचे आहे, ते कसे करता येणार नाही, हे अशा कार्यालयात गेल्यागेल्या आधी समजून घ्यायचे असते.
“नाही…”
“काय?”
“नाही…”
“काय नाही?”
“पैसे नाही काढता येणार तुम्हाला”
“का?”
“अहो, अकाऊंट उघडून पाच वर्षं व्हायला लागतात…”
“मग झाली की पाच वर्षं. एकोणनव्वद सालचं आहे अकाउंट..”
“इथं तर गेल्या वर्षीची एन्ट्री आहे..”
“अहो, ती ट्रान्स्फर आहे, हे बघा, आधीचं पासबुक..”  
“बघू”
सज्जनांनी ते पासबुक बघीतले. त्यांची मुद्रा चिंताग्रस्त झाली. त्यांनी परत त्या संगणकाची थोडी मनधरणी केली.
 दरम्यान रांगेत माझ्या मागे थोडी चुळबूळ सुरु झाली होती.
“गेल्या वर्षी अकाउंट उघडलंय, असं म्हणतोय तो…”
“कोण तो?”
“कॉम्प्युटर..”
“अहो कमाल करताय तुम्ही! मी अकाऊंट उघडलंय, तुम्हाला पासबुक दाखवतोय, कॉम्प्युटरचा काय संबंध इथे?”
“अहो, तो तसा प्रोग्रॅम फीड केलेला असतो… एक मिनिट हं..”
मग सज्जन उठून मॅनेजर बाईंच्या टेबलाशी गेले. बाई कामात होत्या. आता मागच्या रांगेचे प्रेशर जाणवून मी जरा अस्वस्थ झालो होतो.
 तेवढयात मागच्या गृहस्थांनी खांद्यावर टकटक केले.
“पीपीएफ मधून पैसे काढताय का?”
“हो..” आता पीपीएफ मधून स्वत:चे पैसे काढणे ही काहीतरी अनैतिक गोष्ट असल्यासारखे मला वाटू लागले होते.
“माझं ऐका, नका काढू..”
“आं?”
“ओन्ली ऍन ऍडव्हाईस. पण पीपीएफ एवढी सेफ इन्व्हेस्टमेंट नाही दुसरीकडे कुठे. शेअर मार्केट तुम्ही बघताच आहात…”
मी खरंतर मॅनेजर बाईंच्या टेबलाशी उभे असलेल्या त्या सज्जनांकडे बघत होतो. खांद्यावर पुन्हा टकटक झाली.
“माझं एक ऐका..”
आता हा माणूस “चार घास खाऊन घ्या…” असं म्हणतो की काय असं मला वाटलं
“काय?”
“तुमचं एक अकाउंट आता मॅच्युअर झालंच आहे, आता दुसरं एक उघडा. वाटल्यास मुलाच्या नावे उघडा. हे माझं कार्ड. कुठे राहता आपण?”
‘इट इज नन ऑफ युवर बिझनेस’ हे वाक्य मराठीत कसे म्हणावे या विचारात माझे अर्धे मिनिट गेले. तेवढ्यात मॅनेजर बाईंच्या टेबलाशी उभ्या असलेल्या सज्जनांनी अंगविक्षेप करून मला तिकडे बोलावून घेतले.
“गुड मॉर्निंग मॅडम” कधीकधी माझ्या अंगात स्त्रीदाक्षिण्य संचारते. बाईही दिसायला जरा… असो.
गुड मॉर्निंग. बसा. राणे, काय प्रॉब्लेम आहे यांचा?”
मग राणेंनी परत एकदा साधुवाण्याची कथा सांगितली. दरम्यान माझी अवस्था ‘रुपया नही तो डॉलर दे दे, कमीज नही तो कमीजका कॉलर दे दे’ अशी झालेली. बाईंनी आता त्यांच्या संगणकावर काहीतरी केले. दरम्यान राणे ‘तळ्यात-मळ्यात’ अशा अवस्थेत घुटमळत होते. पाचसात मिनिटे गेली.
“गेल्या वर्षीपर्यंत पद्मावती शाखेत खातं होतं ना तुमचं?”
“होय.”
“मग इकडे का ट्रान्स्फर केलं तुम्ही?”
“चूक झाली हो. खरं तर मी ते नाशिकला ट्रान्स्फर करायला पाहिजे होतं, म्हणजे मला अधिक गैरसोयीचं झालं असतं..”
“हे बघा, कुजकटपणा करण्याचं कारण नाही. ट्रान्स्फर म्हणाजे नवं खातं उघडल्यासारखंच असं म्हणतोय तो…”
“हे बघा बाई…” मी म्हणालो. अधिकारी महिलावर्गासमोर अगतिकतायुक्त संताप व्यक्त करायचा असेल तर हे संबोधन वापरावे. तसे करत असताना नाना पाटेकरसारखे चष्म्याच्या काचेवरून सदर महिलेकडे बघता आले तर फारच उत्तम. “हा कोण जो तुमचा तो आहे, मला माहिती नाही. तो माझ्या खात्यावरचे व्यवहार का कंट्रोल करतो आहे, मला कल्पना नाही. मला एकच सांगा, माझ्यासारख्या गरीबाला माझे स्वतःचे पैसे माझ्याच खात्यातून काढता येतील अशी काही तरतूद तुमच्या बँकेत आहे का?”
“खातं बंद करणार का तुम्ही?
“तसं करता येईल का?”
 यावर बाई ‘त्याला विचारावं लागेल’ असं म्हणतायत काय अशी मला शंका आली. पण सुदैवाने त्या “हो, त्यात काय, सात नंबर खिडकीतून फॉर्म घ्या” म्हणाल्या. आपल्याला आपले खाते बंद करता येते या आनंदात मी सात नंबरच्या खिडकीसमोर बारी लावली. माणूस कसा अल्पसंतुष्ट होत जातो पहा. माणसाला त्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून द्यायची असेल तर त्याला हिमालयातल्या एखाद्या भव्य सुळक्यावर न्यावे. ते अवघड असेल तर एखाद्या सरकारी कार्यालयात न्यावे. सगळा नक्षा उतरतो. दहा मिनिटांनंतर तो खास सरकारी रंगाचा फॉर्म हाती मिळाला. त्याच्या तळाला एक अतिसूक्ष्म आकाराचा चौकोन होता आणि त्यात ‘अफिक्स रेव्हेन्यू स्टँप हिअर’ असे लिहिलेले होते. रेव्हेन्यू स्टँप आणि पासपोर्ट साईज फोटो लावायचे चौकोन त्या त्या आकाराचे  का असत नाहीत कुणास ठाऊक. मी चपळाईने खिडकीतून एक रुपयाचे नाणे सरकावले.
“नाही, फॉर्मचे काही पैसे नाहीत”
“हो, ते माहिती आहे मला..”
“मग?” मी त्यांना एक रुपयाची लाच देतो आहे की काय असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
“अहो, रेव्हेन्यू स्टँप..”
“तो इथं नाही मिळत.”
“मग कुठे मिळतो?”
“मला काय माहीत हो? मॅनेजरांना विचारा.”
चला, परत बाईंकडे. आता फॉर्म न भरता का चौकशीला आला म्हणून बाई परत खवळायला नकोत म्हणून आधी फॉर्म भरला, त्यावर ‘फायनल विद्ड्रॉल’ असं लिहिलं आणि परत मॅनेजर बाईंकडे आलो.
“हं. झालं? त्यावर फायनल विद्ड्रॉल असं.. हं, लिहिलंय नाही का तुम्ही.. आता त्यावर रेव्हेन्यू स्टँप लावून सही करा आणि पासबुक आणि तो फॉर्म राणेंकडं द्या. दोनतीन दिवसांत तुम्हाला पे ऑर्डर मिळेल..” 
“बाई..” माझी परत चष्म्यावरुन नजर. “आता तो रेव्हेन्यू स्टँप तेवढा कुठं मिळेल ते सांगा की..”
“इथं नाही बाई मिळत..”
बाई आता ‘इश्श’ म्हणून एखादा मुरका मारतात की काय  या शंकेने मी कसासाच झालो.
“अहो, मग कुठं मिळेल ते सांगा”
“असं करा, पोस्टात विचारा, नाहीतर स्टँप व्हेंडरकडे नक्की मिळेल”
माझ्या माहितीतला स्टँप व्हेंडर तिथून दोन किलोमिटरवर आहे. त्यापेक्षा पोस्ट जवळ म्हणून मी पोस्टात चालत निघालो. आता ऊन मी म्हणायला लागलं होतं. धापा टाकत मी पोस्टातल्या तिकिटांच्या खिडकीशी आलो आणि ठळक अक्षरात लिहिलेली ‘रेव्हेन्यू स्टँप शिल्लक नाहीत’ ही पाटी दिसली.
आमच्या पोस्टातल्या बाई अतिशय शांत स्वभावाच्या आहेत. माणसं कितीही गाढवासारखी वागली तरी त्या बिचाऱ्या आपला पारा चढू देत नाहीत. हे माहिती असल्यानं मी रांगेत उभा राहिलो आणि माझा नंबर आल्यावर स्पष्ट आवाजात एकेक शब्द तोडून म्हणालो,

“रेव्हेन्यू   स्टँप   कधी   येणार   आहेत?”

“काही सांगता येणार नाही हो…”
“????????”
“बहुदा नाही येणार…”
“आं?”
“अहो, त्याचं काय आहे, पूर्वी त्यावर पोस्टाला जे कमीशन मिळायचं ना, ते हल्ली देत नाहीत. म्हणून आम्ही नाही ठेवत रेव्हेन्यू स्टँप.”
‘पब्लीकला साला असाच ठेचून काढला पाहिजे’ हा विचार गिळत मी म्हणालो,
“मग…?”
“ट्रेझरीत मिळतील बघा. नाहीतर एखाद्या स्टंप व्हेंडरकडे असतील.”

‘काय सांगताय? खरंच असतील का हो? आणि कदाचित मला मिळेलसुद्धा एखादा, नाही का? तुम्हाला काय वाटतं?’ हा आपला आत्मसंवाद.

हताशपणानं घराकडे चालत येत असताना मला अचानक मुक्याची आठवण झाली. मुक्या म्हणजे मुकुंद रानडे. आमचा मित्र. तो ट्रेझरीजवळच्याच एका बँकेत नोकरीला आहे. वाटलं, कुणी सांगावं, त्याच्या बँकेत असेलही एखादा गुप्त रेव्हेन्यू स्टँप. नसलाच तर ट्रेझरी जवळच आहे त्याच्या बँकेच्या. येताना घेऊन ये म्हणून सांगू पाचदहा. त्याचा फोन फिरवला. ‘हात्तीच्या, लगेचच आणतो आणि संध्याकाळी टाकतो तुझ्याकडं’ मुक्या आत्मविश्वासानं म्हणाला. अर्धाएक तास गेला आणि फोन वाजला. मुक्याच होता.

“अण्णा….”  मुक्या म्हणाला. “मी ट्रेझरीतूनच बोलतोय..”
“बोल”
“रेव्हेन्यू स्टँप आहेत इथं.”
“काय सांगतोस! है शाब्बास..”
“पण ते सुट्टे मिळत नाहीत म्हणे”
“??????”
“किमान एक हजार घ्यायला लागतील म्हणतायत.”
“हा….हा… हजार?”
“होय, एक हजार. काय करु?”
“…….”
“अरे बोल की”
“अरे काय करू काय….मुक्या, मोबाईल डाव्या हातात धरला असशील ना?”
“हो, का?”
“एक काम कर, उजव्या हातानं तुझ्यासमोर जो कोणी असेल त्याच्यासमोर स्वतःला एक खाडकन थोबाडीत मारून घे. कारणबिरण काही विचारू नकोस. संध्याकाळी मी भेटलो की मलापण एक हाण, म्हणजे फिटाफिट”

संध्याकाळी मुक्या काही भेटला नाही पण नानजकर भेटला. नानजकर हाही इन्शुरन्स एजंटच, पण दोस्तांमधला असल्यामुळे अगदी प्राणघातक वगैरे नाही. मनाच्या चिरफाळलेल्या अवस्थेत मी नानजकरला ही सगळी कथा सांगितली आणि म्हणालो, “जग कसं आहे बघ नान्या, एक रुपयाच्या टिनपाट स्टँपसाठी माझा अर्धा दिवस वाया गेला. शिवाय काम झालं नाही ते नाहीच आणि वरतून मनस्ताप…”
“मूर्ख आहेस.” नान्याने धृपद म्हटले.
“आता या वेळी का, ते तेवढं सांग..”
“अरे, मला फोन करायचा.”
“का? पोस्टमास्टर जनरल तुझा सासरा आहे वाटतं? आणि तुला फोन करून काय करायचं?”
“म्हणायचं की मला असा असा रेव्हेन्यू स्टंप पाहिजे आहे…”
“मग तू काय केलं असतंस?”
“मी असा खिशात हात घातला असता, असं पाकीट बाहेर काढलं असतं, असा त्यातनं तो स्टँप काढला असता, आणि असा तुझ्यासमोर टाकला असता..”

असं म्हणून नानजकरनं तो लाखमोलाचा रेव्हेन्यू स्टँप माझ्यासमोर टाकला!

Permalink 5 Comments

धुक्यातून उलगडणारे जी ए -२

March 8, 2008 at 3:30 am (Uncategorized)

लेखनाची सुरुवात - सोनपावले

जी.एं. च्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित कथा, अनुवाद आणि इतर साहित्यप्रकारांचे एक बाड जी.एं च्या भगिनी प्रभावती सोलापूरकर यांना मिळाले. त्यातल्या काही साहित्याचे परचुरे प्रकाशन मंदिराने ‘सोनपावले’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.  हे तसे जुनेच पुस्तक ( ११ डिसेंबर १९९१). सु.रा. चुनेकर यांनी संपादन केलेल्या या पुस्तकात जी.एं. च्या लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातल्या प्रयोगांचे चित्र दिसते. अगदी सुरुवातीला शालेय जीवनातले जी.एं. चे लेखन ‘ओळखा पाहू’, कोडी या स्वरुपाचे आहे. त्यानंतरच्या जी.एं. च्या स्वतंत्र कथालेखनाच्या पहिल्यापहिल्या प्रयत्नांवर   त्या काळी प्रसिद्ध असलेल्या लेखकांची, विशेषतः खांडेकरांची मोठी छाप आहे. जी.ए. आणि खांडेकर हे गणित आज ऐकायलाही विचित्र वाटत असले तरी खांडेकरांमुळे जी.ए. त्यांच्या तरुणपणी प्रभावित झाले होते हे निश्चित. ‘बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे’, ‘पंतांना वाटले, या दुसऱ्या बाळपणात सुगंध, पाकळ्या, रंग वगैरे सर्व जातात, फक्त काटे मात्र वाटणीला उरतात!, अश्रू जरी डोळ्यांवाटे बाहेर पडत असले तरी त्यांचे उगमस्थान हृदयच आहे’ असली आज हास्यास्पद वाटणारी वाक्ये जी.एं. या त्या वेळच्या कथांमध्ये सर्रास दिसून येतात, हे आज काहीसे गमतीशीर वाटते. नंतरच्या काळात बाकी जी.एं. ना खांडेकरांच्या आदर्शवादी विचारांतला पोकळपणा कळालेला दिसतो. (स्वतः खांडेकरांना तो कळाला की नाही कुणास ठाऊक!) पण एकाच विचाराची पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल केलेला लेखक म्हणून जी.एं. ना खांडेकरांविषयी आदर वाटत आला होता. जी.एं. ची खांडेकरांशी प्रत्यक्ष भेट कधी झाली होती असे दिसत नाही, पण खांडेकरांबरोबर त्यांचा पत्रव्यवहार होता. खांडेकर दत्तक जाण्यापूर्वी त्यांचे नाव गणेश आत्माराम खांडेकर की असे काहीसे होते आणि म्हणून त्यांच्या व जी.एं. च्या नावाची आद्याक्षरे एकच -GAK- हे कळाल्यावर आपल्याला एक शाळकरी आनंद झाला होता, असे पुढे कधीतरी जी.एं. नी एका पत्रात लिहिले आहे.

१९४० - ४२ च्या सुमारास सुरू झालेले जी.ए. चे लेखन त्यांच्या त्या वेळच्या वयानुरुप शालेय व अगदी बाळबोध आहे. मात्र वयाच्या पंचविशीपर्यंत (१९४८) जी.एं. चे वाचन - विशेषतः इंग्रजी साहित्याचे वाचन- प्रगल्भ होऊ लागले होते, हे त्यांनी केलेल्या मॉमच्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेच्या भाषांतरातून जाणवते. याच काळात जी.एं. नी अनेक इंग्रजी कथांचे उत्तमोत्तम अनुवाद केले आहेत. यातल्या बऱ्याच कथा ओ. हेन्रीच्या किंवा चेकॉव्हच्या कथांप्रमाणे पिरगाळून टाकणाऱ्या शेवटाच्या - ‘ट्विस्ट इन द टेल’ या स्वरुपाच्या आहेत. घोडागाडीवाला आणि त्याचा मरण पावलेला मुलगा - म्हणजे एकंदरीत माणसाचे एकटेपण या चेकॉव्हच्या कथेच्या जवळपास जाणारी ‘भागीदार’ नावाची एक कथा जी.एं. नी या काळात लिहिली आहे. गंमत म्हणजे -गंमत कसली म्हणा,- याच काळात जी.एं नी त्या प्रसिद्ध कथेचा ‘भुर्र’ या नावाने एक उत्तम अनुवादही केला आहे. त्याचाच काळजाला हात घालणारा शेवट इथे देण्याचा मोह आवरत नाहीः
“ए बेट्या, झोपलास की काय?” आयोना घोड्याला म्हणतो, “बराय, बराय, झोप. आज पोटापुरतंदेखील मिळवलं नाही. आपण दोघेही गवत खाऊन राहू. गाडी हाकायचं कामच होत नाही रे आता माझ्या हातून! माझा मुलगा कसा, एक नंबर घोडा हाकीत असे. आज असायला हवा होता रे तो-”
घोड्याच्या काचेसारख्या दिसणाऱ्या डोळ्यांकडे पाहात तो क्षणभर थांबतो.
“हं, काय समजलं? माझा पोरगा मेला. या जगात जगायला आम्हाला टाकलं आणि आपण उडाला भुर्र. आता समज, तुलाच एक शिंगरू असतं, आणि जर ते तुला एक दिवस असंच सोडून गेलं असतं, तर तुलाही फार वाईट वाटलं असतं, नाही?”
घोड्याचे तोंड हलविणे चालूच राहतो. तो मध्येच वाकडी मान करतो व आयोनाचा हात हुंगतो.
इतका वेळ त्या मुठीएवढ्या जागी दडपून ठेवलेल्या भावना एकदम उचंबळतात. सारे बांध त्यांच्यापुढे पार वाहून जातात व त्या अमर्याद पसरतात.
घोड्याच्या तोंडावरुन हात फिरवीत हलक्या आवाजात आयोना त्याला अगदी पहिल्यापासून सारी हकीकत सांगू लागतो.
 

या काळात जी.एं. नी लिहिलेल्या बऱ्याच कथा त्यांच्या इतर कथांप्रमाणेच शोकपर्यावसायी आहेत. या वेळेपर्यंत जी.एं. च्या खाजगी आयुष्यात ‘पुरेसे’ दुःख पसरलेले होतेच. यातील काही कथा तर गूढ- रहस्य या सदरात मोडतील अशा आहेत. मानवी नात्यांचा अनाकलनीय ताण, पीळ आणि परिस्थिती, नियती, नशीब, काहीही म्हणा - त्याच्या हातातले बाहुले होऊन आयुष्य कंठण्याची वेळ आलेली माणसे ही जी.एं ची लाडकी पात्रे या कथांमधून पुन्हा पुन्हा डोकावतात. पण एकंदरीतच ही शैली काहीशी विस्कटलेली, गोंधळलेली वाटते. अनुवाद म्हणून या कथा उत्तम आहेत, पण यांबाबत जी.ए. स्वतः समाधानी असतील असे वाटत नाही. किंबहुना इंग्रजी वाङ्मयातील उत्तम कथा आणि स्वतःच्या कल्पना यातले जी.एं. चे चाचपडणे या काळात चालले असावे. यातल्या कथांच्या शेवटी ‘आधारित’ किंवा ‘इंग्रजीवरुन’ असे लिहिलेले आहे, पण त्या कथा मूळ कोणत्या आणि कोणाच्या  कथांवर आधारित आहेत हे कळाले असते, तर बरे झाले असते. लेखक म्हणून स्वतःचाच सुरू झालेला हा शोध जी.एं. च्या अखेरपर्यंत सुरुच होता. आपल्या लिखाणाबाबतचे हे असमाधान जी.एं. च्या आयुष्यात उत्तरोत्तर वाढतच गेले. पण त्याविषयी पुढे कधी तरी.

 

१९५५ मध्ये ‘मौज’ च्या अंकात त्यांनी ‘अनाकलनीयाचे आकर्षण’ हे ‘आणखी एक वासुकी’ या टोपणनावाने लिहिलेले पत्र जी.एं. च्या विकसित होणाऱ्या शैलीवर प्रकाश टाकते. जी.एं. च्या सार्वजनिक लिखाणात फारशी दिसत नसली तरी खाजगी लेखनात त्यांनी काही काही वेळा इतर लेखक, टीकाकार वगैरेंवर अगदी जहाल, विषारी शब्दांत टीका केली आहे. अगदी - आणि विशेषतः, संतवाङ्मयही यातून सुटलेले नाही. जी.एं. ची शब्दकळा इतकी प्रभावी की एखाद्याची साल काढायची म्हटली की त्याला अगदी रक्तबंबाळ केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. त्याचीच बीजे या पत्रात आढळतात. मर्ढेकरांच्या कवितांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या या पत्रात त्यांनी काव्य हे कायम अर्थपूर्णच असले पाहिजे असे म्हणणाऱ्यांवर तिरकस शेरे मारले आहेत. ते म्हणतात, ‘अर्थासाठी तळमळणाऱ्या लोकांसाठी मामलेदाराच्या स्वागतासाठी शाळामास्तरांनी लिहिलेल्या स्वागतगीतांची एक सस्ती आणि घरेलू आवृत्ती कोणी अर्थवाला प्रकाशक प्रसिद्ध करील काय?’

बालकवी आणि गडकरी यांचे काव्य यांचा जी.एं. वर काहीसा अनाकलनीय प्रभाव होता. त्या मानाने त्यांच्या मनोवृत्तीच्या जवळ जाणारे मर्ढेकर बाकी त्यांना फारसे जवळचे वाटले नाहीत. (वर उल्लेख केलेले पत्र सोडले तर जी.एं. नी मर्ढेकरांच्या समर्थनार्थ फारसे काही लिहिलेले नाही. पु. शि. रेगे हा तर आपल्या आयुष्यातला एक ‘ब्लाइंड स्पॉट’ राहिलेला आहे, असे ते लिहितात) पुढील आयुष्यात त्यांनी ग्रेसच्या कवितांचा गौरवाने उल्लेख केला आहे. आणखीही काही कवी जी.एं. ना आवडत. इतर म्युनसिपालटी कवी  त्यांनी घाऊकपणे झिडकारून टाकले आहेत. याच पत्रात जी.एं. नी ‘अन्वयार्थच सांगायचा तर त्यासाठी एखादा कवीच कशाला खर्ची घालायला पाहिजे? गिरीश आणि काव्यविहारी देखील ते काम करू शकतील’ असा एक झणझणीत फटका मारला आहे. काव्य म्हटल्यावर त्यात ‘ग्रेट युनिव्हर्सल थीम्स’ आल्या पाहिजेत असे म्हणणाऱ्या लोकांसाठी ते लिहितात, आणि ते ग्रेट युनिव्हर्सल थीम्स म्हणजे तरी काय? या शब्दांचा शब्दशः अर्थ घेतला तर जन्म आणि मृत्यू हे दोनच विषय युनिव्हर्सल ठरतात. या निकषाने मग बेळगावच्या म्युनसिपालटीतील जननमरणाचे दप्तर जगातील महाप्रचंड महाकाव्य ठरायचे! या ठिकाणी परसात वाती वळत बसलेल्या आजीबाईपासून उजदारी गटारात खेळणाऱ्या बाब्या आणि बेबीपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन जे वाचावे ते साहित्य अशी कोणी तरी केलेली सोज्वळ, बोटचेपी व भोंगळ व्याख्या मला आठवते. काव्य किंवा कला म्हणजे साऱ्यांच्या जीवनात हजर असलेल्या भावनांचा लघुतम साधारण विभाज्य नव्हे.’

जी.एं.चे हे विचार पुढे आयुष्यभर त्यांनी बाळगलेल्या लेखक आणि लेखनाविषयीच्या सगळ्या श्रद्धांवर प्रकाश टाकून जातात, असे मला वाटते. पण अशा प्रकारचे जाहीर वाद- प्रतिवाद यात जी.ए. अजिबातच  अडकलेले दिसत नाहीत. (पु. लं किंवा दळवी यांची या संदर्भात आठवण येते) याच काळात जी.एं. नी समाजातल्या ढोंगीपणावर आणि दुटप्पीपणावर वक्रोक्तिपूर्ण आणि विनोदी असेही काही लिहिले आहे. ‘मारून मुटकून पुरोगामी’ ही जी.एं. ची नाटिका अशीच. तिच्याविषयी आणि इतर काही वेगळ्या लेखनाविषयी पुढील लेखात…

Permalink 2 Comments

धुक्यातून उलगडणारे जी ए -१

March 8, 2008 at 3:27 am (Uncategorized)

थोडेसे प्रास्ताविक:
११ डिसेंबर हा जी.ए. कुलकर्णींचा विसावा स्मृतिदिन. अशा प्रकारच्या लेखाची सुरुवात साधारणतः ‘मराठी कथाविश्वावर आपल्या लिखाणाचे लालजर्द स्वस्तिकचिन्ह उमटवून अचानक अंधारात विरून गेलेल्या ज्येष्ठ कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी यांच्या पवित्र स्मृतीला अनेकानेक वंदन करून..’ वगैरे अशा घसाभरू वाक्याने करण्याचा शिरस्ता आहे. या सगळ्या प्रकाराचा जी. एं. ना विलक्षण तिटकारा होता. लेखक हा फक्त त्याच्या लिखाणातून बघावा, त्यापलीकडे तो एक सर्वसाधारण माणूस असतो, त्यामुळे ‘Writing, Not the writer’ हे वाक्य जी. एं. च्या वैयक्तिक आणि खाजगी लिखाणात अनेक वेळा येते. पण इतके वस्तुनिष्ठ राहणे विशेषतः मराठी माणसाला परवडत नाही. जरा कुणी कुठे काहीसे बरे केले की कधी एकदा आपण त्याला देव करून टाकतो, असे त्याला होऊन जाते. पण ते असो. तर या निमित्ताने जी. एं चे काही तसे अनोळखी लिखाण आणि त्यांनी केलेला उदंड पत्रव्यवहार यातून या कोड्यासारख्या माणसाची लेखक म्हणून काहीशी नवी ओळख करून घेता येते हे पाहावे हा या प्रस्तावित लेखमालिकेचा उद्देश आहे.
हे करत असताना मनात पहिली भावना आहे ती अपराधीपणाची. आपल्या लिखाणाची आणि त्यातूनही आयुष्यभर जपलेल्या आपल्या खाजगी आयुष्याची अशी चिरफाड - चिरफाडच, त्याला रसग्रहण वगैरे म्हणणे योग्य नाही - जी. एं. ना अजिबात रुचले नसते. इंग्रजी लेखकांच्या मृत्यूनंतर त्यांचा पत्रव्यवहार प्रकाशित करण्याची पद्धत आहे. इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास - व्यासंगच- असणाऱ्या जी.एं. ना हे माहीत नसणे शक्यच नाही. तरीही त्यांनी आपण लिहिलेल्या बऱ्याच पत्रांत ‘हे अगदी घरगुती आणि खाजगी आहे, चुकूनही यातला एकही शब्द बाहेर जाऊ देऊ नका’ असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या काही पत्रांतले काही उल्लेख अस्वस्थ करणारे, क्वचित त्यांच्या आपल्या मनातल्या प्रतिमेला छेद देणारेही आहेत. मग हे सगळे कशाला करायचे? आधीच असंख्य पूर्वग्रह आणि गैरसमजांच्या जाळ्यात गुरफटलेल्या या दिवंगत साहित्यिकाचे असे विच्छेदन कशासाठी?

एकतर या सगळ्या चिल्लर- खुर्दा गोष्टींपलीकडे जाऊन एक लेखक आणि एक विचार करणारा अभ्यासू माणूस म्हणून जी.एं. नी कायकाय मिळवले होते - आणि त्याचे प्रदर्शन न मांडता ते स्वतःबरोबरच संपवून टाकले होते - हे समजून घेणे त्यांच्या लिखाणाचा एक चाहता म्हणून मला अतिशय रंजक वाटते. दुसरे असे की ‘चमत्कारिक, विक्षिप्त, माणूसघाणा’ म्हणून बदनाम झालेला हा माणूस खरा कसा होता - किंवा तो जसा बदनाम झाला तसा असला तरी तसा तो का होता याचा काहीसा उलगडा आता होतो आहे असे वाटते. अलौकिक प्रतिभावान आणि वेडसरपणा यातली सीमा अगदी धुरकट असते असे म्हणतात. आसपासच्या बुटक्या, खुज्या लोकांमध्ये वावरताना जी.एं. ना किती गुदमरल्यासारखे होत असेल याची कल्पना - फक्त कल्पनाच - करता येते. ‘बाजीचा-ए-अतफाल’ म्हणणाऱ्या गालिबसारखीच जी.एं. ची मानसिकता कशी आणि का झाली हे कळू लागते. शेवटी खांडेकरी बोधकथा ते ‘माणसे- अरभाट आणि चिल्लर’ पर्यंतचा जी.एं.चा लेखनप्रवास, एक जबरदस्त वाचक म्हणून त्यांच्यावर जगातील विविध भाषांतील लेखकांचा प्रभाव आणि यात आपले लिखाण कुठेतरी अगदी पायपुसण्यासारखे आहे अशी एक निराशेची, अतृप्ततेची त्यांची भावना अशी त्यांच्या प्रतिभेची विलक्षण गरुडझेप ध्यानात येते.

हा सगळा अभ्यासाचा - वैयक्तिक आवडीचा - कदाचित थोडासा कंटाळवाणा भाग झाला. याबरोबर जी.एं. चे नवीन लिखाण वाचताना परत त्यांची ती देदीप्यमान भाषाशैली, त्यांचा तिरकस पण निर्विष विनोद आणि मराठी (आणि इंग्रजीही) साहित्याच्या तथाकथित केंद्रबिंदूंपासून इतके दूर दडून बसूनही बारीकसारीक गोष्टींची नोंद घेण्याची आणि त्यांची संगती लावण्याची त्यांची क्षमता हे सगळे नव्याने ध्यानात येते.

असामान्य बुद्धिमत्ता आणि क्रियाशीलता यापुढे विनम्र होणे आता काळाशी सुसंगत आहे की नाही, कुणास ठाऊक! जी.ए. वरील लिखाणाच्या निमित्ताने समाजाच्या एका तुकड्याला हे तपासून पाहता आले, तरी या प्रस्तावित लिखाणाचा हेतू सफल होईल, असे वाटते.

Permalink 1 Comment

का कल्लोळ कल्लोळ-देवराई

March 5, 2008 at 3:33 pm (Uncategorized)

माणसाचे मन ही मोठी अजब गिजबीज आहे. मनाचे व्यापार, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचा विज्ञानाला उलगडा झाला आहे. मानसिक रोगांचीही तीच कथा आहे. मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यांची कारणे आणि नेमके उपचार याबाबतचे माणसाचे ज्ञान मर्यादितच आहे. मनोरुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनही फारसा बदललेला नाही. भारतात तर नाहीच नाही.

स्किझोफ्रेनिया किंवा दुभंगलेले व्यक्तिमत्व हा असाच एक गंभीर मानसिक आजार. ‘देवराई’ मधला शेष देसाईला हा आजार झाला  आहे. मुळातच काहीसा एककल्ली, आत्ममग्न, सतत कसला ना कसला विचार करत राहणारा, पण अतिशय बुद्धीमान असा हा शेष हळूहळू जास्तजास्त चिडचिडा, तापट होत गेला आहे. त्याचे वडील लहानपणीच गेलेले, आई आणि धाकटी बहीण सीना, एवढेच त्यांचे कुटुंब. पण शेषची खरी जवळीक आहे ती कल्याणीशी. कल्याणी शेष आणि सीनाची मामेबहीण. तिची आई गेल्यावर ती तिच्या आत्याकडे, शेष आणि सीनाच्या आईकडेच वाढली आहे. कल्याणी, शेष आणि सीना यांचे बालपण कोकणातल्या त्या गावात मोठ्या मजेत गेले आहे. गावाजवळ देवराई आहे. देवराई म्हणजे सेक्रेड ग्रोव्ह - देवाच्या नावाने वाढलेले, वाढवलेले जंगल. ते तोडायचे नसते. लहानपणापासून शेषला देवराईचे वेड आहे.त्यातच वाडीवर काम करणाऱ्या पार्वतीमध्येही शेषची काही चमत्कारिक भावनिक गुंतवणूक झाली आहे, पण पार्वतीचे गावातल्यच शंभूशी लग्न झाले आणि शेषचे सगळे बिनसायला सुरुवात झाली. शंभू दिसायला दांडगा, पार्वती एवढीशी, नाजूक. शेषचा विक्षिप्तपणा वाढतच गेला. त्यातच परिस्थितीने असे काही चमत्कारिक वळण घेतले की कल्याणीला ताबडतोब तिथून निघून जावे लागले. सीनाचेही लग्न झाले. मुळात एकांडा असलेला शेष आता पार एकाकी झाला. त्याचे शिक्षण अर्धवटच राहिले होते. त्याला जे मनापासून करायचे होते, ते देवराईवरचे संशोधन तसेच राहिले. लग्न वगैरे झाले नाहीच. मुळात अतिशय बुद्धीमान असलेलेया शेषच्या आयुष्याची अशी वाताहात झाली. त्याच्या मनात विचारांचा, कल्पनांचा एक भलामोठा गुंता झाला. त्याच्या मनातल्या दोन हळव्या बिंदूंची - पार्वतीची आणि देवराईची - गल्लत होऊ लागली. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यात देवराई तोडली जाणार असे ऐकताच तर शेषचा स्फोटच झाला. देवराई? की पार्वती? देवराई तोडणार? म्हणजे पार्वतीला मारणार? कोण? शंभू? मग हे सगळं सांगायचं कुणाला? सीना? कल्याणी? पार्वती? देवराई….

स्किझोफ्रेनिक लोकांच्या मनातल्या या कल्लोळाचे सुरेख चित्रण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा ‘देवराई’. ‘देवराई’ ची सुरुवात थोडीशी भयपटाच्या अंगाने होते. जंगलात वरखाली होणारा कॅमेरा, खर्जातल्या गूढ आवाजात ‘शेष… शेष…’ अशा अनामिक हाका वगैरे. पण त्यानंतर बाकी का चित्रपट संपूर्ण पकड घेतो. वास्तविक या चित्रपटाच्या कथेत मानसिक आजार आणि पर्यावरण असे दोन विषय आहेत. पण या दोन्ही विषयांवर प्रेक्षकाला विचार करायला लावतानाही हा चित्रपट क्षणभरही प्रचारकी थाटाचा वाटत नाही, हे महत्त्वाचे.

‘देवराई’ हा खऱ्या अर्थाने दोन कुलकर्ण्यांचा चित्रपट आहे. अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी. अतुल कुलकर्णीची शेषची भूमिका ही एकंदरीत मराठी चित्रपटांच्या इतिहासातील काही उल्लेखनीय भूमिकांपैकी एक मानली जावी, असे मला वाटते. मानसिक आजारांनी ग्रस्त लोक ज्यांनी पाहिले आहेत, त्यांना मी असे का म्हणतो हे ध्यानात येईल. शेषचा एकलकोंडेपणा, त्याचे गर्दीत मिसळतानाचे अवघडलेपण, त्याचे लोकांशी नजर न मिळवणे, चाचरत, अडखळत बोलणे आणि खरे जग आणि कल्पनेतले जग यातल्या सरमिसळीने हताश, उद्विग्न होऊन हिंसक होणे हे अभिनयाची ‘केस स्टडी’ म्हणून बघावे असे आहे. आधी खेळकर, हसरा असणारा, बहिणीचे लाड करणारा शेष, हळूहळू मानसिक आजाराच्या विळख्यात असहाय झालेला शेष, हतबलपणे ‘माझ्या डोक्यात कसंतरी होतंय’ असं म्हणणारा शेष आणि सीनाच्या घरी चाललेल्या पार्टीत ‘किस चीज का पेटंट लोगे तुम? व्हॉट डू यू नो अबाऊट बायोडायव्हर्सिटी?’ म्हणून थैमान घालणारा शेष…. त्याच्या दुखण्याच्या भीषण स्वरुपाला त्याचा लहान भाचा घाबरतो आणि ‘माझी पुस्तकं फाडू नकोस..’ असं ओरडत आपल्या आईकडं धावतो, तेंव्हा गोंधळलेला, कोसळलेला शेष ‘फाडत नाहीये, फाडत नाहीये..’ असं फाटक्या आवाजात किंचाळतो आणि आपलं मन त्याच्या विषयी कणवेनं भरून येतं. एकदा टॉयलेटमध्ये असताना त्याचा विलक्षण गोंधळ होतो. आपण आहोत नक्की कुठे? घरी? देवराईत? कधीकधी भानावर असताना आपल्या लहान बहिणीचा हात हातात घेऊन शेष