एका खेळियाने

दिलीप प्रभावळकरांच्या’एका खेळियाने’ ची सुधारित आवृत्ती नुकतीच वाचनात आली.’अक्षर प्रकाशन’ च्या या आवृत्तीत प्रभावळकरांनी त्यांच्या ‘वा गुरु!’ या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतचा त्यांच्या रंगमंच आणि चित्रपटसृष्टीतल्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. ‘दिलीप प्रभावळकरसारखा आर्टिस्ट जर तिकडे (पाश्चिमात्य देशांत ) असता तर त्यानं रान पेटवलं असतं’ हे पु.ल. देशपांडेंचं वाक्य या पुस्तकाच्या वेष्टणावर छापलेलं आहे. (का? कुणास ठाऊक!वेष्टणावर प्रभावळकरांची प्रशंसा करणारी इतरही वाक्यं आहेत. पुस्तक नीट निरखून बघून वाचायला सुरवात करणार्‍यांना हा प्रथमग्रासे मक्षिकापात वाटू शकेल. प्रभावळकरांची प्रतिमा एका नटापलीकडे विचार करणारा, अर्थपूर्ण लेखन करणारा बहुरुपी कलाकार अशी आहे, त्यामुळे वेष्टणावरील ही वाक्ये आणि मुखपृष्ठावरील आणि पहिल्या काही पानांवरील मुद्दाम ‘पोझ’ देऊन काढलेले फोटो हे सुरवातीलाच विरस करुन जातात. उलट मलपृष्ठावरील आबा, सासू, नंदू आणि बापू या चार मोजक्या भूमिकांचे फोटो बघायला बरे वाटते. मुखपृष्ठाच्या जागी मलपृष्ठ आणि मलपृष्ठाच्या जागी मुखपृष्ठ अशी ‘अक्षर’ वाल्यांकडून ‘उसंडु’ झाली काय? ) रान पेटवणं म्हणजे काय हे माहिती नाही, पण मराठीतला (आणि आता हिंदीतलाही) एक गुणी अभिनेता, एक प्रयोगशील कलाकार, एक विचारी माणूस आणि एक सिद्धहस्त लेखक अशा अनेक भूमिकांतून प्रभावळकर आपल्याला भेटत आलेले आहेत. कॉलेजातील हौशी नाटकांनतर व्यावसायिक नाट्यभूमीवरची प्रभावळकरांची पहिली जोरदार ‘एंन्ट्री’ म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’ मधली त्यांची चेटकीण. या चेटकिणीबद्दल (आणि पुण्यात दोन प्रयोग असताना दुसर्‍या प्रयोगाला वेळ होतो म्हणून भर ट्रॅफिकमधून या चेटकिणीने स्कूटरवर मागे बसून लोकांना घाबरवत, दचकवत ‘जस्ट फॉर लाफ्स गॅग्ज’ मधल्या प्रसंगासारख्या केलेल्या प्रवासाबद्दल ) प्रभावळकरांनी इतरत्रही लिहिले आहे.त्यानंतरच्या ‘प्रेम कहाणी’, ‘आरण्यक’, ‘नगर अंधेरा’ या नाटकांमधून प्रभावळकरांची स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रियाच सुरु होती असे वाटते. ‘पोर्ट्रेट’ या एकांकिकेत प्रभावळकरांनी साकारलेल्या लष्करी अधिकार्‍याच्या भूमिकेबाबत बाकी कुतुहल वाटते. मतकरींची ही एकांकिका पहायला मिळायला हवी होती असे वाटते.
या पुस्तकात वर्णन केलेल्या ‘एलिअनेशन थिअरी’ या जर्मन रंगभूमीवरील कल्पनेची हे पुस्तक वाचताना गंमत वाटते. मराठी रंगभूमीवरची कल्पना काय तर अभिनय इतका खोल, उत्कट असावा की प्रेक्षकाचाही रंगमंच आणि वास्तव यात गोंधळ व्हावा. प्रेक्षकाला लेखकाने आपल्या लिखाणाने आणि अभिनेत्याने आपल्या अभिनयाने आपल्यामागे फरफटत नेले पाहिजे. ‘एलिअनेशन थिअरी’ मध्ये याच्या बरोबर विरुद्ध विचार मांडलेला आहे. एखाद्या नाट्यपूर्ण, उत्कट प्रसंगानंतर विंगेतून एका लाकडी बॉक्सवर हातोड्याने प्रहार करुन ‘टॉक’ असा मोठा आवाज काढला जाई, का, तर प्रेक्षकांना हे सगळं नाटक आहे, याचा फक्त भावनिक पातळीवर विचार करु नका, वैचारिक पातळीवरुन करा याची जाणीव करुन देण्यासाठी. ‘रसभंग’ वगैरे कल्पनांना येथे स्थान नाही, कारण मुळात प्रेक्षकाला नाटकात आस्वादक असे गुंतू द्यायचेच नाही. ‘समीक्षक’ या भूमिकेत माणूस शिरला की त्याला रसग्रहणापेक्षा चिरफाडीतच अधिक रस कसा वाटू लागतो याचे हे उदाहरण आहे, असे मला वाटते.
‘गजरा’ या दूरदर्शवरील कार्यक्रमांतून अनेक मराठी कलाकारांना ‘ब्रेक’ मिळाला आहे. त्याबद्दल दूरदर्शनचे आपण कायम आभार मानले पाहिजेत. ‘गजरा’ मध्ये प्रभवळकरांना या माध्यमात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तिचे सोने केले. ‘गजरा’ मध्ये काम करत करत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरवात झाली असावी. ‘पंचवीस एके पंचवीस’सारखी ‘बेस्ट ऑफ गजरा’ मध्ये समाविष्ट केलेली नाटिका दुसर्‍या कर्यक्रमासाठी टेप उपलब्द्ध नाही म्हणून पुसली जाते हे वाचून वैषम्यही वाटते.
त्यानंतरचा प्रभावळकरांचा मोठा पल्ला म्हणजे चिमणराव. प्रभावळकरांनी चिमणराव जिवंत केला, घराघरात नेला हे त्यांचे कर्तृत्व आहेच, पण ते चिमणरावात गुंतून पडले नाहीत, हे त्याहूनही मोठे कर्तृत्व आहे असे मला वाटते.’चिमणराव’ मालिका यशस्वी झाली पण तो चित्रपट चालला नाही याचे आपल्याला खूप वाईट वाटले असे प्रभावळकर लिहितात. पण त्या निमित्ताने त्यांना चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला हे एक बरे झाले. चिमणरावांच्या प्रतिमेतून बाहेर पडणे हे त्या वेळी प्रभावळकरांसमोरचे मोठेच आव्हान असले पाहिजे. ‘एक डाव भुताचा’ या प्रभावळकरांच्या पुढील – आणि खरे तर त्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाच्या- चित्रपटाच्या वेळी आपल्याला आलेले अनुभव, विशेषतः अशोक सराफ या अभिनेत्याबरोबर काम करताना आपल्याला अभिनेता आणि माणूस म्हणून त्याची जवळून झालेली ओळख याविषयी प्रभावळकरांनी मनापासून लिहिले आहे. आपली अशोक सराफ या अभिनेत्याविषयी मते काहीही असोत, पण नव्या मराठी माणसाला सांभाळून घेणारा, मदत करणारा मराठी माणूस हे -अगदी भूतकाळातले असले तरी- वाचायला बरे वाटते.
‘पळा पळा कोण पुढे पळतो तो’ या फार्ससंदर्भात प्रभावळकरांनी केलेले लिखाण मुळातून वाचावे असे आहे. एकतर बबन प्रभूंचा हा फार्स लेखन या दृष्टीकोनातून सगळ्यात अधिक जमलेला आहे. माझ्याकडे कुठेतरी त्याच्या संहितेचे जुनी, जीर्ण पुस्तक होते. ते वाचतानाही धोधो हसू फुटत असे. महामहोपाध्याय बिंदूमाधवशास्त्री , प्रमोदिनी, गागाचार्य, बन्सीधर, उकिडवे.. सगळी धमाल होती. एका वेळी पाच धोतर-पगडीवाल्यांची स्टेजवर पळापळ – त्यातही आत्माराम भेंडे, प्रभावळकर, भक्ती बर्वे ही कास्ट आणि भेंडेचं दिग्दर्शन यामुळे तो प्रकार भन्नाटच होत असणार यात शंका नाही.नटांच्या हातात नसलेल्या काही कारणांने हे प्रयोग बंद पडले असे प्रभावळकर म्हणतात तेंव्हा ते काय कारण असावे या भोचक कुतुहलापेक्षा काहीही असले तरी ते प्रयोग चालू रहायला पाहिजे होते असे वाटते.
‘झोपी गेलेला जागा झाला हे प्रभावळकरांचे त्यानंतरचे नाटक. ‘झोपी गेलेला जागा झाला’ चे गेल्या वर्षी ‘सुबक’ तर्फे पुनरुज्जीवन होऊन काही प्रयोग झाले होते. ‘झोपी…’ हा तसा त्या मानाने दुय्यम दर्जाचा फार्स. लेखनापेक्षा दिग्दर्शकाच्या आणि नटांच्या ‘इम्प्रूव्हायझेशन’ वर अधिक बेतलेला. ही पुढे मराठीतली पहिली प्रायोजित मालिका वगैरे झाली. दरम्यान प्रभावळकर नट म्हणून रंगभूमीवर आणि दूरदर्शनवर चांगलेच स्थिरावले होते. मराठी चित्रपटातही त्यांची वाटचाल सुरु होती. पण या माध्यमाबाबत, विशेषतः सुरवातीच्या काळात त्यांना मिळालेल्या मराठी चित्रपटांतील भूमिकांबाबत त्यांनी या पुस्तकात असमाधान व्यक्त केले आहे. ते बरोबरच आहे असे मला वाटते. अलका कुबलबरोबर नाचतानाचा त्यांचा एक फोटो या पुस्तकात आहे. त्याखाली ‘हे मी का करतोय?’ असं शीर्षक त्यांनी दिले आहे. ते अगदी योग्य वाटते. बेर्डे, पिळगावकर, कोठारे (आणि काही प्रमाणात अशोक सराफ) यांनी मराठी चित्रपटाला जे काही केले त्या अपराधाची तुलना एकता कपूरने खाजगी टीव्ही मालिकांना जे काही केले त्याच्याशीच होईल. त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही, वाड्यावरची धेंडे दोंद वाढवतात आणि माझ्या काशाचे पाय बाकी पांगळे होतात, आणि मोगरा मात्र फुलतच राहातो…त्यामुळे बाप्पा तुला क्षमा नाही.. असो. प्रभावळकर या सगळ्यात खेचले गेले हे त्यांचे नशीब. त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले हे आपले नशीब.’माझे सुदैव असे की मी त्यांची सून झाले, पण त्याहूनही मोठे सुदैव असे की मी त्यांची बायको झाले नाही’ प्रमाणे! याचे कारण असे की या माध्यमातूनच प्रभावळकरांनी पुढे ‘चौकट राजा’, ‘रात्र आरंभ’ असे परफॉर्मन्सेस दिले. पण ती पुढची गोष्ट झाली.
‘वासूची सासू’ हा प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातला पुढचा आणि महत्वाचा टप्पा. या पुस्तकात दिलेला दाराच्या चौकटीला रेलून उभ्या राहिलेल्या या सासूचा फोटो (एक चौकटीवरचा पुरुषी हात सोडला तर) ‘मारु’ दिसतो. एकूण हा सासूचा प्रयोग भन्नाटच होता. अरुण नलावडे, अतुल परचुरे (थोडाफार सुसह्य अविनाश खर्शीकरही) आणि दोन अफलातून भूमिकांत प्रभावळकर. बेरकी अण्णा नंतरनंतर सासूची भूमिका ‘एन्जॉय’ करायला लागतात तेंव्हाच्या गोंधळाला तर तोड नाही. ते चंद्रनमस्कार, ते लाडीक ‘शीतल, शीतल..’ ‘फार त्रास झाला हो हिच्या वेळेला’ वगैरे. या सगळ्या प्रकारात आपण जे करतो आहे ते यशस्वी होतं आहे हे कळाल्यानंतर नटाचं भान सुटणं अगदी शक्य असतं, पण आपलं ते सुटलं नाही असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. ते अगदी पटण्यासारखं वाटतं.
प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासातले पुढचे महत्वाचे टप्पे म्हणजे ‘एक झुंज वार्‍याशी’, ‘नातीगोती’ , ‘एक हट्टी मुलगी’ आणि ‘घर तीघांचं हवं’ मधल्या त्यांच्या भूमिका. (तीघांचं मधली ‘ती’ हा उच्चारानुसार दीर्घ आहे, मग ती तिखटातल्या ‘ति’ सारखी र्‍हस्व का लिहिली जाते? पण ते असो.) \’एक झुंज वार्‍याशी’ हे पु.लंनी अवघ्या चार दिवसांत रुपांतरीत केलेलं आणि वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक आणि त्यातली सामान्य माणूस ही भूमिका हे मोठं आव्हान होतं आणि त्या प्रयोगाचा गंभीर ताण यायचा असं प्रभावळकर लिहितात. या नाटकादरम्यानची एक महत्वाची आठवण प्रभावळकरांनी लिहिली आहे. या नाटकात ‘सद सद् विवेकबुद्धी हा शब्द बर्‍याच वेळा येतो. बरेच लोक हा शब्द सत् सत् विवेकबुद्धी असा उच्चारतात.( हे दोन्ही शब्द सलग, पूर्ण असे वाचावेत) या नाटकाच्या प्रयोगाच्या तालमीदरम्यान मुद्दाम येणारे डॉ. अशोक रानडे यांनी नटांना हा शब्द कसा म्हणायचा – पहिला ‘द’ पूर्ण, दुसरा अर्धा हे मुद्दाम शिकवलं, आणि ते नाटकात काटेकोरपणे पाळलं गेलं. भाषाशुचितेचा हा आग्रह ‘केल्या गेली आहे.’ च्या जमान्यात मला फार निर्मळ वाटतो.
जवळजवळ वीस वर्षे अभिनय करुनही ‘एक झुंज वार्‍याशी’ या नाटकातून बरंच शिकायला मिळालं, फक्त आपली शिकायची तयारी हवी असं प्रभावळकर लिहितात तेंव्हा तर ते एका यशस्वी कलाकाराचं सूत्रच सांगून जातात असं वाटतं.
‘नातीगोती’ हेही गंभीर प्रकृतीचं नाटक. त्यातला काटदरे साकारताना आपण आपल्याला त्यात गुंतू दिलं नाही, त्यातला मतिमंद बच्चू गेल्यानंतर दोन्ही हातांनी तोंड झाकून ओक्साबोक्सी रडताना हाताच्या आड बाकी आपला चेहरा कोरा रहात असे असे प्रभावळकर लिहितात. कदाचित ‘एलिनेशन थिअरी’ चा त्यांच्यावरील प्रभाव तोवर कायम असेल. किंवा कदाचित हेच कलाकाराचं खरं कौशल्य असेल. त्यामुळे ‘नातीगोती’ मधले काटदरे बघताना प्रेक्षकांना त्रास होत असे, पण ते साकारताना आपल्याला अजिबात त्रास होत नसे, असं प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. ‘नातीगोती’ च्या प्रयोगादरम्यान जळगावच्या प्रेक्षकांनी प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांच्यामधील एका गंभीर प्रसंगात अश्लील शेरेबाजी केली आणि मग प्रभावळकरांना त्यांची काटदरेंची भूमिका सोडून त्या प्रेक्षकांना खड्या आवाजात कसं सुनवावं लागलं त्याची एक आठवण या पुस्तकात आहे. गावात बदल, बाकी अशी एखादी आठवण प्रत्येक अभिनेता-अभिनेत्रीच्या पुस्तकात असतेच. पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी एका लहान खेड्यात गणपत पाटलांच्या नाट्यप्रयोगाला त्या खेड्यातल्या भाबड्या, गोजिर्‍या, निरागस प्रेक्षकांनी हाच प्रकार केला होता, त्यावेळी मी तिथे होतो. गणपत पाटलांनी शेवटी मग आपला ‘नाच्या’ चा आवाज सोडून एकदम कणखर आवाज लावला होता. प्रेक्षक चरकले होते. पंचवीसेक वर्षांपूर्वी ‘भरत’ मध्ये अभिनेते राजशेखर यांना हाच प्रकार करावा लागला होता आणि विक्रम गोखलेंनी प्रयोगादरम्यान (प्रयोगाआधी आवाहन करुनही) कुणा एका ‘रसिका’चा मोबाईल फोन वाजू लागला तेंव्हा स्वतःच्याच थोबाडीत मारुन घेतली होती… असे प्रसंग हा प्रकार वाचताना आठवले. गंधर्वांच्या शालूंचं आणि थिरकवासाहेबांच्या तबल्याचं माहेरकौतुक असलेल्या रसिक, सहृदय मराठी प्रेक्षकाचा हा एक हिडीस, थिल्लर चेहरा प्रत्येक नटाने आणि कलाकृती बघण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक रसिकाने ध्यानात ठेवला पाहिजे, असे माझे मत आहे.
‘एक हट्टी मुलगी’ मधला इरसाल तात्या, ‘घर तीघांचं हवं’ मधला व्यसनी डीएन आणि ‘कलम ३०२’ मधील दुहेरी भूमिका – प्रभावळकरांच्या या भूमिका पहायला हव्या होत्या असे वाटते. पुढे ‘संध्याछाया’, ‘जावई माझा भला’ वगैरे नाटकांपर्यंत त्यांच्यातल्या प्रयोगशील अभिनेत्यावर त्यांच्यातल्या व्यावसायिक कलाकाराने मात केलेली असावी असेही वाटते. पण एकंदरीत या पुस्तकातील प्रभावळकर या अभिनेत्याचा नाट्यप्रवास- आणि प्रभावळकरांनी त्याचे केलेले शब्दांकन – हे दोन्हीही आपापल्या गुणामुळे वाचनीय झालेले आहेत.
‘हसवाफसवी’ आणि ‘बटाट्याची चाळ’ या दोन प्रयोगांच्या उल्लेखाशिवाय प्रभावळकरांच्या नाट्यप्रवासाचे वर्णन पूर्ण होऊच शकणार नाही. ‘हसवाफसवी’ हा एक वेगळा, प्रसन्न प्रयोग होता. ‘बॉबी मॉड’ सोडला तर त्यातले काहीही कृत्रीम, चिकटवलेले वाटत नाही. कृष्णराव हेरंबकर अगदी त्यांच्या शेवटच्या ‘चिंतना’ सकट अस्सल वाटतात. (तेच काहीसे विकसित स्वरुपात गंगाधर टिपरे म्हणून नंतर दूरदर्शनवर आले) दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबाची आपल्या मुलीशी बोलतानाची जी आफ्रिकन म्हणून भाषा आहे तिच्यात स्वाहिली आणि पोर्तुगीज भाषेतले काही शब्द आपण वापरले तर प्रिन्स वांटुंग पिन् पिन् च्या भाषेत काही जपानी शब्द वापरले असे प्रभावळकरांनी लिहिलेलं आहे. प्रेक्षकांना जे स्टेजवर किंवा पडद्यावर दिसतं त्यामागे विचार करणार्‍या कलाकाराचा किती अभ्यास असतो, किती मेहनत असते, हे यावरुन ध्यानात येतं. पण ‘हसवाफसवी’ त खरा बाजी मारुन जातो तो अष्टवक्र नाना पुंजे. गेंगाण्या आवाजात वाकडीतिकडी पावले टाकत अत्यंत आगाऊपणे बोलणारा हा नाना कोंबडीवाला अतिशय लोकप्रिय झाला होता. एकूणच ‘हसवाफसवी’ यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाले होते. त्याचे ७५० प्रयोग झाल्यावर प्रभावळकरांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. कलाकाराकडे फक्त व्यावसायिक दृष्टीकोन असून चालत नाही, त्याला सतत आपल्यातल्या कलाकाराची वाढ चालू ठेवावी लागते – हे सगळं लिहायला-वाचायला ठीक आहे, पण यासाठी खरोखर कठोर निर्णय घेण्याची वेळ आली की बरेच लोक कच खातात. प्रभावळकरांनी तसे केले नाही, हे फार बरे झाले.
‘बटाट्याची चाळ’ हे अर्थातच प्रभावळकरांना (आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींना) एक वेगळं आव्हान असलं पाहिजे. त्याच्या प्रयोगांत ‘पुलं’ आणायचे नाहीत, पण मूळ कलाकृतीला विटाही लावायच्या नाहीत असली काहीतरी कोंडी या दोघांची झाली असली पाहिजे. पुलंची ‘चाळ’ मी पाहिलेली नाही, पण प्रभावळकरांची चाळ बघताना मला हाच नट हे आव्हान पेलू शकतो असं जाणवलं होतं. चाळीमधलं ‘चिंतन’ सादर करताना त्यात ‘गंगाधर टिपरे’ डोकावतील की काय या शंकेने आपण ‘कॉन्शस’ झालो होतो असं प्रभावळकरांनी लिहिलं आहे. कलाकाराला आपल्या भूमिकांचं ‘बेअरिंग’ सांभाळताना आवश्यक असणार्‍या या एका वेगळ्या कौशल्याची जाणीव या लिखाणातून होते.
‘वा गुरु!’ या प्रभावळकरांच्या अगदी अलीकडच्या नाटकाविषयी प्रभावळकर मोजके लिहितात. यातील सप्रेसरांच्या भूमिकेचा अजून शोध सुरु आहे असे ते म्हणतात.
दूरदर्शनवरील प्रभावळकरांच्या काही प्रयोगांबाबत मी वर लिहिले आहे. त्यानंतर खाजगी वाहिन्या सुरु झाल्यावर आलेली ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका मराठीतल्या काही सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक ठरावी. ‘लोकप्रिय आहे ते ते सगळे थिल्लर असते’ या प्रमेयाला छेद देणारी ही मालिका. त्यातले आबा आपल्याला फार लवकर सापडले असे प्रभावळकर लिहितात. या मालिकेतले शिर्‍याचे -म्हणजे आबांच्या नातावाचे आणि आबांचे प्रसंग लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीन्ही दृष्टीकोनांतून सरस ठरले आहेत. प्रभावळकरांनी त्यांच्या आबा या भूमिकेविषयी फार सुरेख लिहिलं आहे. बर्‍याच लोकांना ठाऊक नसणारी आणि काही लोकांच्या विस्मरणात गेलेली ‘साळसूद’ या मालिकेतील प्रभावळकरांची ‘भार्गव’ ही खलभूमिका मला हे पुस्तका वाचताना आठवली आणि फार बरे वाटले. या सगळ्या मालिका, हे नाट्यप्रयोग पुन्हा एकदा पहावेसे वाटले.
शेवटी प्रभावळकरांच्या चित्रपटातील भूमिकांविषयी अगदी थोडे. अगदी अनपेक्षितपणे साकारावा लागलेला ( आणि म्हणून तयारीला अगदी वेळ न मिळालेला) ‘चौकट राजा’ मधला नंदू, ‘एन्काऊंटर-दी किलिंग’ मधला पुनाप्पा, ‘रात्र आरंभ’ मधले ठोंबरे, ‘कथा दोन गणपतरावांची’ मधले गणपतराव तुरे-पाटील, ‘मुन्नाभाई’ मधले गांधी आणि ‘सरकार राज’ मधले रावसाहेब या प्रभावळकरांच्या काही उल्लेखनीय भूमिका. विस्तारभयास्तव या भूमिकांबद्दल फार लिहीत नाही (आणि खुद्द प्रभावळकरांनीही आपल्या चित्रपटांतील भूमिकांबद्दल तसे कमीच लिहिले आहे. डॉ. लागूंनी ‘लमाण’ मध्ये असेच केले आहे. मुळात नाटकाची आवड असलेल्या कलाकाराला सिनेमा हे माध्यम फारसे आकर्षित करणारे वाटत नसावे!), पण ‘रात्र आरंभ’ हा चित्रपट ज्यांनी बघीतला नाही त्यांनी तो आवर्जून आणि शक्य तितक्या लवकर बघावा असे बाकी मला आवर्जून लिहावेसे वाटते.
‘सरकार राज’ रिलीज झाला त्या दिवसाची गोष्ट. रांगेत उभे राहून रात्रीच्या खेळाची तिकिटे काढली होती. सोबत एक असाच अमिताभ बच्चनचा ‘डाय हार्ड’ फॅन होता. सिनेमा सुरु झाला. बच्चन पितापुत्र रावसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला जातात असा प्रसंग होता. झोपाळ्यावर पाठमोरे बसलेले रावसाहेब आणि त्यांना वाकून नमस्कार करणारे बच्चन पितापुत्र असा तो प्रसंग. रावसाहेबांचा चेहरा आधी दिसत नाही. कॅमेरा हळूहळू वर येतो आणि मग फेटा बांधलेले, वृद्ध रावसाहेब आशीर्वाद देताना दिसतात. प्रभावळकरांचा चेहरा दिसल्यावर माझा बच्चनप्रेमी मित्र उत्स्फूर्तपणे म्हणाला, “हां… हे ठीक.हे ठीक. मला वाटलं साहेबांना कुणा ऐर्‍यागैर्‍यासमोर वाकायला लावतात काय…” या प्रसंगाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्याचे आठ रिटेक्स झाले आणि पर्यायाने बच्चनद्वयींना आठ वेळा प्रभावळकरांना वाकून नमस्कार करावा लागला. ‘पोएटिक जस्टिस’ यालाच म्हणतात की काय, कुणास ठाऊक!
काही असो, हे पुस्तक मला आवडले. आत्मचरित्रांचा सुकाळ झालेला असताना प्रभावळकरांनी ज्या संयमाने आणि खोल विचार करुन हे पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर प्रभावळकरांचा मी अधिकच मोठा प्रशंसक, चाहता झालो आहे असे मला वाटते. आनंद आहे.
एका खेळियाने
दिलीप प्रभावळकर
अक्षर प्रकाशन
सुधारित आवृत्ती, मे २०११, किंमत ३५० रुपये.

यह प्रविष्टि Uncategorized में पोस्ट की गई थी। बुकमार्क करें पर्मालिंक

4 Responses to एका खेळियाने

  1. Sandy कहते हैं:

    Nicely written…ani he pustak me nakki vachen..thanks!

  2. bhushanshashi कहते हैं:

    Avadtya abhinetyache thatastha chitran kelyabaddal kharokhar dhanyavad!

  3. Prabhakar Pethkar कहते हैं:

    shri Sanjop Rav,

    MiPa varun Shri Pras hyanchya post mule Eka Kheliyaneche parixan vachanyat aale. Masta lihile aahe. Bharatat gelyavar nakkich pustak vikat gheun vachen. Dhanyawad.

  4. anu कहते हैं:

    chhan lihiley.
    Barech divasani ha blog pahila atyanand raav
    -Anu

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s